Tuesday, May 19, 2026

माजा नाखावा गेलाय होर्मुज खाडीला

माजा नाखावा गेलाय होर्मुज खाडीला

माजा नाखावा गेलाय होर्मुज खाडीला
कवा येईल परतून काळजी लागली मला ||ध्रू||

जवा येईल तवा आणीन पेट्रोल डिजेलला
कवा येईल परतून काळजी लागली मला ||१||

सैपाक करत होती तवाच सिलेंडर संपला
कवा येईल परतून काळजी लागली मला ||२||

साडी चोळी नको, नको घेऊ माळ तू मला
एकडाव पेट्रोलची टाकी भरून दे गाडीला ||३||

कोबीची भाजी करपली, मासे नाही भाजीला
डोनाल्ड अन बेंजामीनचा मुडदा बशिवला ||४||

राकेल नाय मिळत, झाडं नाय सरपणणाला
लवकर ये घराला, काळजी लागली मला ||५||

- पाभे
१८/०४/२०२६

पाषाणभेद चुल, स्टोव्ह प्रशिक्षण, विक्री, दुरूस्ती, सुट्टे भाग विक्री केंद्र

 May be an image of text

"द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम

"द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम (सदर कथेमध्ये मानवी मनाच्या कल्पनेचा विस्तार केला आहे. सदर कथेमध्ये कोणत्याही जिवीत अथवा मृत व्यक्तीचा, देशाचा, संस्थेचा संबंध नाही. तसे आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. सदर कथा काल्पनिक आहे. वाचकांचे मनोरंजन व्हावे या हेतूने लिखाण केले आहे.) 

२१ व्या शतकाच्या मध्यावर जग एका विचित्र टप्प्यावर येऊन ठेपले होते. विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अवकाश तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती झाली होती; पण मानवाचे जुने स्वभाव सत्ता, भीती आणि वर्चस्व अजूनही तसेच होते. या पार्श्वभूमीवर राण नावाच्या छोट्या पण हट्टी देशाने इतिहासात नोंद होईल अशी लढाई लढली. राण हा भूगोलाने लहान पण मनाने मोठा देश होता. डोंगर, दऱ्या, जंगले आणि कठीण हवामान यामुळे त्याची जमीन जिंकणे कधीच सोपे नव्हते. लोक साधे, मेहनती आणि स्वाभिमानी होते. त्यांच्या संस्कृतीत स्वातंत्र्याला देवासारखे स्थान होते. 

पण जगाच्या राजकारणात मोठा खेळ सुरू झाला. महासत्ता मानले जाणारे दोन मित्रदेश इस्त्रा आणि मेरीका यांनी एकत्र येऊन राणवर दबाव टाकायला सुरुवात केली. त्यांना राणच्या पर्वतरांगांमध्ये सापडलेल्या दुर्मिळ ऊर्जा खनिजावर नियंत्रण हवे होते. त्या खनिजामुळे पुढील पिढीची ऊर्जा तंत्रज्ञान क्रांती घडणार होती. इस्त्रा आणि मेरीका तंत्रज्ञानात अत्यंत पुढे होते. त्यांच्या सैन्याकडे स्वयंचलित ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्तेने चालणारे युद्धरोबोट, हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे आणि अवकाशातून माहिती देणारे उपग्रह होते. युद्ध सुरू होण्याआधीच जगातील बहुतेक विश्लेषकांनी निकाल लावला होता “राण काही दिवसांत शरण येईल.” पण इतिहास नेहमी गणिताप्रमाणे चालत नाही. युद्धाचा पहिला दिवस आला तेव्हा इस्त्रा-मेरीकाच्या आकाशात ड्रोनची काळी सावली पसरली. त्यांच्या स्मार्ट क्षेपणास्त्रांनी राणच्या अनेक सैनिकी तळांवर अचूक हल्ले केले. उपग्रहांमधून प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जात होती. 

तरीही राणचे सैनिक मागे हटले नाहीत. राणच्या सैन्याकडे फारशी आधुनिक साधने नव्हती; पण त्यांच्याकडे होते भूभागाचे ज्ञान, स्थानिक लोकांचे समर्थन आणि एक जिद्द: “जमीन गमावली तरी चालेल, स्वाभिमान नाही.” डोंगरातील बोगदे, जंगलातील लपवलेल्या मार्ग आणि छोट्या मोबाइल तुकड्यांच्या मदतीने त्यांनी गुरिल्ला युद्ध सुरू केले. रात्री अचानक हल्ले, दिवसाढवळ्या अदृश्य होणे हे त्यांचे तंत्र होते. त्यांनी इस्त्रा-मेरीकाच्या महागड्या ड्रोनना साध्या इलेक्ट्रॉनिक जॅमिंग उपकरणांनी गोंधळात टाकले. काही ठिकाणी गावकऱ्यांनी स्वतःचे नेटवर्क तयार करून शत्रूच्या हालचालींची माहिती सैन्याला दिली. जगभरातील लोकांना आश्चर्य वाटू लागले. तंत्रज्ञानाने भरलेली मोठी सैन्ये एका छोट्या देशासमोर अडकली होती. महिने गेले. युद्ध लांबत गेले. इस्त्रा आणि मेरीकाच्या अर्थव्यवस्थेवरही ताण येऊ लागला. प्रत्येक दिवसाच्या युद्धखर्चाने त्यांच्या लोकांमध्ये प्रश्न निर्माण होऊ लागले “इतक्या छोट्या देशासाठी आपण इतके का लढतो आहोत?” राण मात्र अजूनही उभा होता. शेवटी एक गोष्ट स्पष्ट झाली: युद्ध केवळ मशीन जिंकत नाहीत. मानवाची इच्छाशक्ती, जमीनाशी असलेले नाते आणि स्वातंत्र्याची भूक हे कधी कधी अत्याधुनिक तंत्रज्ञानालाही थांबवू शकतात. आणि म्हणूनच इतिहासात त्या संघर्षाला नंतर एक नाव दिले गेले “द जिद्द ऑफ राण”. 

राण-इस्त्रा-मेरीका युद्ध सुरू झाल्यानंतर काही महिन्यांतच त्याचे परिणाम संपूर्ण जगावर दिसू लागले. ऊर्जा पुरवठा खंडित झाला, व्यापारमार्ग विस्कळीत झाले आणि जागतिक अर्थव्यवस्था डगमगली. पण या सगळ्यात सर्वात जास्त उलथापालथ झाली ती भार देशात. भार हा मोठा, लोकसंख्येने प्रचंड आणि विविधतेने भरलेला देश होता. पण युद्धकाळात त्याची व्यवस्था ढासळू लागली. इंधनटंचाई इतकी वाढली की शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर दोन-दोन दिवस रांगा लागत. अन्नधान्याच्या गोदामांवर ताबा मिळवण्यासाठी काही ठिकाणी लोकांनी दरोडे टाकले. बेरोजगारी वाढली आणि कारखाने बंद पडू लागले. 

या काळात सत्तेत होते दाम सरकार. त्या पक्षाची एक विचित्र परंपरा होती.जो कोणी प्रधानसेवक असे, त्याच्याच नावाने सरकार ओळखले जाई. त्यामुळे लोक सरकारपेक्षा व्यक्तीकडेच जास्त पाहत. पण परिस्थिती आणखी बिघडली जेव्हा प्रधानसेवकांचे नाव अचानक “पिस्टन कागदांमध्ये” समोर आले. त्या गुप्त कागदपत्रांमध्ये जगभरातील काही नेते आणि उद्योगपतींच्या आर्थिक व्यवहारांबद्दल गंभीर आरोप होते. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी ही बातमी उचलून धरली आणि भारची प्रतिमा डळमळू लागली. देशात आधीच अस्वस्थता होती. लोकांच्या मनात प्रश्न उभे राहू लागले. “युद्धामुळे त्रास आहे की व्यवस्थेतील चुका?” “देश चालतोय का फक्त घोषणांनी?” 

दाम पक्षाचे सर्वेसर्वा दाम मात्र राजकारणाचे जुन्या पद्धतीचे पण चतुर खेळाडू होते. त्यांना माहीत होते की संकटाच्या वेळी लोकांचे लक्ष वळवणे, भावना पेटवणे आणि सामूहिक कृती निर्माण करणे ही एक राजकीय रणनीती असते. म्हणूनच त्यांनी काही प्रतीकात्मक उपक्रम जाहीर केले. पहिला उपक्रम होता २२ मार्च ३०२६. त्या दिवशी संध्याकाळी ठरावीक वेळी लोकांनी घराच्या बाल्कनीत उभे राहून टाळ्या आणि थाळ्या वाजवाव्यात असे आवाहन करण्यात आले. अधिकृत स्पष्टीकरण असे दिले गेले की संकटकाळात काम करणाऱ्या “नेते, राज्यपाल, पक्षप्रमुख, बुथप्रमुख आणि मातृसंस्था ‘राजा स्वयंभक्त संत’ (रास्वसं)” यांचे आभार मानायचे आहेत. 

सरकारी माध्यमांनी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर दाखवला. दूरचित्रवाणीवर सतत संदेश चालू होते. “एकता दाखवा.” “राष्ट्रासाठी आवाज करा.” “कृतज्ञता व्यक्त करा.” काही शहरांमध्ये लोकांनी खरोखर उत्साहाने थाळ्या वाजवल्या. काही ठिकाणी मात्र लोकांनी केवळ शांतपणे पाहिले. काहींनी तर उपहासाने रिकाम्या भांड्यांवर चमचे आपटले.जणू अन्नटंचाईचीच आठवण करून देत. पण दाम इथेच थांबले नाहीत. दुसरा उपक्रम जाहीर झाला ५ एप्रिल ३०२६ साठी. रात्री ८ वाजून ८ मिनिटांनी सर्वांनी ८ मिनिटांसाठी दिवे बंद करून मेणबत्त्या, दिवे किंवा मोबाइल फ्लॅश लावावेत असे सांगितले गेले. त्यामागे अधिकृत कारण दिले गेले - युद्ध आणि टंचाईच्या काळात लोकांना मानसिक आधार देणे आणि “अंधारावर प्रकाशाचा विजय” दाखवणे. त्या रात्री भार देशातील अनेक शहरांमध्ये विचित्र दृश्य दिसले. उंच इमारतींच्या खिडक्यांतून लुकलुकणारे छोटे दिवे दिसत होते. काही ठिकाणी लोकांनी छपरांवर येऊन दिवे लावले, तर काही भाग पूर्ण अंधारातच राहिले. जगातील माध्यमांनी हे दृश्य दाखवले. “संकटात सापडलेला देश, पण प्रतीकात्मक एकता दाखवण्याचा प्रयत्न.” 

पण जमिनीवरची वास्तविकता वेगळीच होती. दिवसाढवळ्या रेशन दुकानांवर भांडणे होत होती. काही औद्योगिक शहरांत कारखाने बंद पडल्याने हजारो कामगार गावाकडे परतत होते. ग्रामीण भागात अन्नधान्य लपवून ठेवण्याच्या अफवा पसरत होत्या. शहरांमध्ये रात्री दरोड्यांचे प्रमाण वाढले. 

लोकांच्या मनात दोन भावना एकाच वेळी वाढत होत्या. एकीकडे थकवा आणि असुरक्षितता, आणि दुसरीकडे शांतपणे उगवणारा प्रश्न: “प्रतीकांनी देश वाचतो का?” इतिहासकार नंतर म्हणाले की त्या काळात भार देशात दोन वेगवेगळे वास्तव एकाच वेळी चालू होते. एक प्रकाश आणि घोषणांचे, आणि दुसरे टंचाई आणि अस्वस्थतेचे. आणि त्या दोन वास्तवांच्या मध्येच पुढील मोठ्या राजकीय वादळाची बीजे शांतपणे रुजत होती.

दत्तगुरूच्या चरणी लीन व्हावे

 दत्तगुरूच्या चरणी लीन व्हावे ||१|| 

किती घ्यावे पुण्य जळूनी पाप जाय ||२|| 

कृपानिधींचा आशीर्वाद सदा असे डोई ||३|| 

त्रैमूर्ती सदोदीत डोळ्यासमोरी राही ||४||

ब्लॅंकेट काढ, दुलई काढ

ती: खूप थंडी आहे यंदा. पांघरायला ब्लॅंकेट काढू का दुलई काढू? 

तो: ब्लॅंकेट काढ. 

ती: पण ब्लॅंकेट धुवायला लागते आधी. 

तो: मग दुलई काढ. 

दुलई फार हलकी आहे वजनाला. 

मग ब्लॅकेट काढ. 

ब्लॅंकेटने काय थंडी थांबते का? 

मग दुलई काढ. 

दुलई थोडी आपरी आहे. 

मग ब्लॅंकेट काढ. 

ब्लॅंकेट अंगाला टोचते. 

मग दुलई काढ. 

दुलई कॉटनच्या कापडाची नाही नं. 

मग ब्लॅंकेट काढ. 

ब्लॅंकेट लई महागाचं आहे नं. 

मग दुलई काढ. 

जाऊद्या, आपली गोधडीच बरी आहे.

रानफुले

असाच भटकत रानात असता
रानफुले समोर येती

नव्हता कसला गंध तयांना
रंगही नव्हते भरजरी 
 
विविध परी तयांत होती 
नक्षी बारीक नाजूक सुंदर 
 
कोमल पिवळे गेंद 
उन्हात चमके वार्यावरती 
 

वेड लागले मलाच तेथे 
दृष्य मनोरम खरोखर ते 
 
डोंगर उतार पठारावरती 
फुले पाहता लागली समाधी 
 
घोस तयांचे लेऊन घ्यावे 
वाटले तक्षणी अंगावरती 
 
एकरूप व्हावे, तेथेच रमावे 
परत न फिरावे घराप्रती 
 
बघतो जेव्हा अचानक 
रानफुले समोरी येती 
 
- पाभे (03/10/24) 
(काल डोंगर उतारावर पाहिलेले दृष्य)

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट: लग्नातले उखाणे

 अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नात एकमेकांनी उखाणे कसे घेतले असतील? आपण कल्पना करू आणि तुमच्या कल्पनेतले उखाणे येथे टाका. 

लेक लाडकी मोठ्या घरची होणार सुन मी अंबाणीची 

मोबाईलचा बॅलंस आयुष्यभराचा टाकला अनंतरावांसारखा जोडीदार भेटला 

लग्नाला आले बॉलीवूड आणि हॉलीवूड अंनंतरावांचे नाव घेते स्पर्श करते टचवूड 

स्वप्नातला राजकूमार पाहीला होता सुखाने न्हाले मी अंनंतरावांसारखा पती मिळता.

भाकरीचे पीठ

कविल सकाळीच उपाशीपोटी शेतात मळणी करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी जेवण काय न्यावे या चिंतेत होती. भाकरीचे पीठ संपले होते.

व्हाटस अपवर तिने पीठ संपल्याचे स्टेटस टाकले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायको तान्याने ते स्टेटस बघितले आणि तिने वृशांतला सांगून आपला मुलगा चिन्मय यास शेताच्या बांधावरून कॉल करून बोलावून घेतले. तान्याने त्याचेजवळ भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा कायराकडे पाठवीला.

कायरा आता चिंतामुक्त होती. कविल आज पोटभर जेवणार होता. तिचे मन भरून आले.

बांधाला बांध लागून असलेच शेजारी शेतकरी सर्वांना मिळोत अशी तिने प्रार्थना केली.

- पाभे

बग आली माझ्या कोडा

धाव धाव टीम लिडरा
बग आली माझ्या कोडा

किती आता गुगलावे?
एआय मदतीला घ्यावे?

डेडालाईन मृत्यू भासे
चहा कॉफी नरडी डाचे

टेस्टर, क्यू.ए. इग्नोर करी
क्लायंटाला पटव भारी

एकच विनंती असे तुझीया ठाई
मी केवळ आयटी हमाल भार वाही

सुखरूप माझी असाईनमेंट पार कर
गो लाईव्ह जावूदे जोडतो दोन्ही कर

आता उद्धरण्या केवळ तूच येई
पाषाणाची चुकली नाव पार नेई 

- पाभे २६.०३.२०२४