Tuesday, May 19, 2026

माजा नाखावा गेलाय होर्मुज खाडीला

माजा नाखावा गेलाय होर्मुज खाडीला

माजा नाखावा गेलाय होर्मुज खाडीला
कवा येईल परतून काळजी लागली मला ||ध्रू||

जवा येईल तवा आणीन पेट्रोल डिजेलला
कवा येईल परतून काळजी लागली मला ||१||

सैपाक करत होती तवाच सिलेंडर संपला
कवा येईल परतून काळजी लागली मला ||२||

साडी चोळी नको, नको घेऊ माळ तू मला
एकडाव पेट्रोलची टाकी भरून दे गाडीला ||३||

कोबीची भाजी करपली, मासे नाही भाजीला
डोनाल्ड अन बेंजामीनचा मुडदा बशिवला ||४||

राकेल नाय मिळत, झाडं नाय सरपणणाला
लवकर ये घराला, काळजी लागली मला ||५||

- पाभे
१८/०४/२०२६

पाषाणभेद चुल, स्टोव्ह प्रशिक्षण, विक्री, दुरूस्ती, सुट्टे भाग विक्री केंद्र

 May be an image of text

"द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम

"द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम (सदर कथेमध्ये मानवी मनाच्या कल्पनेचा विस्तार केला आहे. सदर कथेमध्ये कोणत्याही जिवीत अथवा मृत व्यक्तीचा, देशाचा, संस्थेचा संबंध नाही. तसे आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. सदर कथा काल्पनिक आहे. वाचकांचे मनोरंजन व्हावे या हेतूने लिखाण केले आहे.) 

२१ व्या शतकाच्या मध्यावर जग एका विचित्र टप्प्यावर येऊन ठेपले होते. विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अवकाश तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती झाली होती; पण मानवाचे जुने स्वभाव सत्ता, भीती आणि वर्चस्व अजूनही तसेच होते. या पार्श्वभूमीवर राण नावाच्या छोट्या पण हट्टी देशाने इतिहासात नोंद होईल अशी लढाई लढली. राण हा भूगोलाने लहान पण मनाने मोठा देश होता. डोंगर, दऱ्या, जंगले आणि कठीण हवामान यामुळे त्याची जमीन जिंकणे कधीच सोपे नव्हते. लोक साधे, मेहनती आणि स्वाभिमानी होते. त्यांच्या संस्कृतीत स्वातंत्र्याला देवासारखे स्थान होते. 

पण जगाच्या राजकारणात मोठा खेळ सुरू झाला. महासत्ता मानले जाणारे दोन मित्रदेश इस्त्रा आणि मेरीका यांनी एकत्र येऊन राणवर दबाव टाकायला सुरुवात केली. त्यांना राणच्या पर्वतरांगांमध्ये सापडलेल्या दुर्मिळ ऊर्जा खनिजावर नियंत्रण हवे होते. त्या खनिजामुळे पुढील पिढीची ऊर्जा तंत्रज्ञान क्रांती घडणार होती. इस्त्रा आणि मेरीका तंत्रज्ञानात अत्यंत पुढे होते. त्यांच्या सैन्याकडे स्वयंचलित ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्तेने चालणारे युद्धरोबोट, हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे आणि अवकाशातून माहिती देणारे उपग्रह होते. युद्ध सुरू होण्याआधीच जगातील बहुतेक विश्लेषकांनी निकाल लावला होता “राण काही दिवसांत शरण येईल.” पण इतिहास नेहमी गणिताप्रमाणे चालत नाही. युद्धाचा पहिला दिवस आला तेव्हा इस्त्रा-मेरीकाच्या आकाशात ड्रोनची काळी सावली पसरली. त्यांच्या स्मार्ट क्षेपणास्त्रांनी राणच्या अनेक सैनिकी तळांवर अचूक हल्ले केले. उपग्रहांमधून प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जात होती. 

तरीही राणचे सैनिक मागे हटले नाहीत. राणच्या सैन्याकडे फारशी आधुनिक साधने नव्हती; पण त्यांच्याकडे होते भूभागाचे ज्ञान, स्थानिक लोकांचे समर्थन आणि एक जिद्द: “जमीन गमावली तरी चालेल, स्वाभिमान नाही.” डोंगरातील बोगदे, जंगलातील लपवलेल्या मार्ग आणि छोट्या मोबाइल तुकड्यांच्या मदतीने त्यांनी गुरिल्ला युद्ध सुरू केले. रात्री अचानक हल्ले, दिवसाढवळ्या अदृश्य होणे हे त्यांचे तंत्र होते. त्यांनी इस्त्रा-मेरीकाच्या महागड्या ड्रोनना साध्या इलेक्ट्रॉनिक जॅमिंग उपकरणांनी गोंधळात टाकले. काही ठिकाणी गावकऱ्यांनी स्वतःचे नेटवर्क तयार करून शत्रूच्या हालचालींची माहिती सैन्याला दिली. जगभरातील लोकांना आश्चर्य वाटू लागले. तंत्रज्ञानाने भरलेली मोठी सैन्ये एका छोट्या देशासमोर अडकली होती. महिने गेले. युद्ध लांबत गेले. इस्त्रा आणि मेरीकाच्या अर्थव्यवस्थेवरही ताण येऊ लागला. प्रत्येक दिवसाच्या युद्धखर्चाने त्यांच्या लोकांमध्ये प्रश्न निर्माण होऊ लागले “इतक्या छोट्या देशासाठी आपण इतके का लढतो आहोत?” राण मात्र अजूनही उभा होता. शेवटी एक गोष्ट स्पष्ट झाली: युद्ध केवळ मशीन जिंकत नाहीत. मानवाची इच्छाशक्ती, जमीनाशी असलेले नाते आणि स्वातंत्र्याची भूक हे कधी कधी अत्याधुनिक तंत्रज्ञानालाही थांबवू शकतात. आणि म्हणूनच इतिहासात त्या संघर्षाला नंतर एक नाव दिले गेले “द जिद्द ऑफ राण”. 

राण-इस्त्रा-मेरीका युद्ध सुरू झाल्यानंतर काही महिन्यांतच त्याचे परिणाम संपूर्ण जगावर दिसू लागले. ऊर्जा पुरवठा खंडित झाला, व्यापारमार्ग विस्कळीत झाले आणि जागतिक अर्थव्यवस्था डगमगली. पण या सगळ्यात सर्वात जास्त उलथापालथ झाली ती भार देशात. भार हा मोठा, लोकसंख्येने प्रचंड आणि विविधतेने भरलेला देश होता. पण युद्धकाळात त्याची व्यवस्था ढासळू लागली. इंधनटंचाई इतकी वाढली की शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर दोन-दोन दिवस रांगा लागत. अन्नधान्याच्या गोदामांवर ताबा मिळवण्यासाठी काही ठिकाणी लोकांनी दरोडे टाकले. बेरोजगारी वाढली आणि कारखाने बंद पडू लागले. 

या काळात सत्तेत होते दाम सरकार. त्या पक्षाची एक विचित्र परंपरा होती.जो कोणी प्रधानसेवक असे, त्याच्याच नावाने सरकार ओळखले जाई. त्यामुळे लोक सरकारपेक्षा व्यक्तीकडेच जास्त पाहत. पण परिस्थिती आणखी बिघडली जेव्हा प्रधानसेवकांचे नाव अचानक “पिस्टन कागदांमध्ये” समोर आले. त्या गुप्त कागदपत्रांमध्ये जगभरातील काही नेते आणि उद्योगपतींच्या आर्थिक व्यवहारांबद्दल गंभीर आरोप होते. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी ही बातमी उचलून धरली आणि भारची प्रतिमा डळमळू लागली. देशात आधीच अस्वस्थता होती. लोकांच्या मनात प्रश्न उभे राहू लागले. “युद्धामुळे त्रास आहे की व्यवस्थेतील चुका?” “देश चालतोय का फक्त घोषणांनी?” 

दाम पक्षाचे सर्वेसर्वा दाम मात्र राजकारणाचे जुन्या पद्धतीचे पण चतुर खेळाडू होते. त्यांना माहीत होते की संकटाच्या वेळी लोकांचे लक्ष वळवणे, भावना पेटवणे आणि सामूहिक कृती निर्माण करणे ही एक राजकीय रणनीती असते. म्हणूनच त्यांनी काही प्रतीकात्मक उपक्रम जाहीर केले. पहिला उपक्रम होता २२ मार्च ३०२६. त्या दिवशी संध्याकाळी ठरावीक वेळी लोकांनी घराच्या बाल्कनीत उभे राहून टाळ्या आणि थाळ्या वाजवाव्यात असे आवाहन करण्यात आले. अधिकृत स्पष्टीकरण असे दिले गेले की संकटकाळात काम करणाऱ्या “नेते, राज्यपाल, पक्षप्रमुख, बुथप्रमुख आणि मातृसंस्था ‘राजा स्वयंभक्त संत’ (रास्वसं)” यांचे आभार मानायचे आहेत. 

सरकारी माध्यमांनी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर दाखवला. दूरचित्रवाणीवर सतत संदेश चालू होते. “एकता दाखवा.” “राष्ट्रासाठी आवाज करा.” “कृतज्ञता व्यक्त करा.” काही शहरांमध्ये लोकांनी खरोखर उत्साहाने थाळ्या वाजवल्या. काही ठिकाणी मात्र लोकांनी केवळ शांतपणे पाहिले. काहींनी तर उपहासाने रिकाम्या भांड्यांवर चमचे आपटले.जणू अन्नटंचाईचीच आठवण करून देत. पण दाम इथेच थांबले नाहीत. दुसरा उपक्रम जाहीर झाला ५ एप्रिल ३०२६ साठी. रात्री ८ वाजून ८ मिनिटांनी सर्वांनी ८ मिनिटांसाठी दिवे बंद करून मेणबत्त्या, दिवे किंवा मोबाइल फ्लॅश लावावेत असे सांगितले गेले. त्यामागे अधिकृत कारण दिले गेले - युद्ध आणि टंचाईच्या काळात लोकांना मानसिक आधार देणे आणि “अंधारावर प्रकाशाचा विजय” दाखवणे. त्या रात्री भार देशातील अनेक शहरांमध्ये विचित्र दृश्य दिसले. उंच इमारतींच्या खिडक्यांतून लुकलुकणारे छोटे दिवे दिसत होते. काही ठिकाणी लोकांनी छपरांवर येऊन दिवे लावले, तर काही भाग पूर्ण अंधारातच राहिले. जगातील माध्यमांनी हे दृश्य दाखवले. “संकटात सापडलेला देश, पण प्रतीकात्मक एकता दाखवण्याचा प्रयत्न.” 

पण जमिनीवरची वास्तविकता वेगळीच होती. दिवसाढवळ्या रेशन दुकानांवर भांडणे होत होती. काही औद्योगिक शहरांत कारखाने बंद पडल्याने हजारो कामगार गावाकडे परतत होते. ग्रामीण भागात अन्नधान्य लपवून ठेवण्याच्या अफवा पसरत होत्या. शहरांमध्ये रात्री दरोड्यांचे प्रमाण वाढले. 

लोकांच्या मनात दोन भावना एकाच वेळी वाढत होत्या. एकीकडे थकवा आणि असुरक्षितता, आणि दुसरीकडे शांतपणे उगवणारा प्रश्न: “प्रतीकांनी देश वाचतो का?” इतिहासकार नंतर म्हणाले की त्या काळात भार देशात दोन वेगवेगळे वास्तव एकाच वेळी चालू होते. एक प्रकाश आणि घोषणांचे, आणि दुसरे टंचाई आणि अस्वस्थतेचे. आणि त्या दोन वास्तवांच्या मध्येच पुढील मोठ्या राजकीय वादळाची बीजे शांतपणे रुजत होती.

दत्तगुरूच्या चरणी लीन व्हावे

 दत्तगुरूच्या चरणी लीन व्हावे ||१|| 

किती घ्यावे पुण्य जळूनी पाप जाय ||२|| 

कृपानिधींचा आशीर्वाद सदा असे डोई ||३|| 

त्रैमूर्ती सदोदीत डोळ्यासमोरी राही ||४||

ब्लॅंकेट काढ, दुलई काढ

ती: खूप थंडी आहे यंदा. पांघरायला ब्लॅंकेट काढू का दुलई काढू? 

तो: ब्लॅंकेट काढ. 

ती: पण ब्लॅंकेट धुवायला लागते आधी. 

तो: मग दुलई काढ. 

दुलई फार हलकी आहे वजनाला. 

मग ब्लॅकेट काढ. 

ब्लॅंकेटने काय थंडी थांबते का? 

मग दुलई काढ. 

दुलई थोडी आपरी आहे. 

मग ब्लॅंकेट काढ. 

ब्लॅंकेट अंगाला टोचते. 

मग दुलई काढ. 

दुलई कॉटनच्या कापडाची नाही नं. 

मग ब्लॅंकेट काढ. 

ब्लॅंकेट लई महागाचं आहे नं. 

मग दुलई काढ. 

जाऊद्या, आपली गोधडीच बरी आहे.

रानफुले

असाच भटकत रानात असता
रानफुले समोर येती

नव्हता कसला गंध तयांना
रंगही नव्हते भरजरी 
 
विविध परी तयांत होती 
नक्षी बारीक नाजूक सुंदर 
 
कोमल पिवळे गेंद 
उन्हात चमके वार्यावरती 
 

वेड लागले मलाच तेथे 
दृष्य मनोरम खरोखर ते 
 
डोंगर उतार पठारावरती 
फुले पाहता लागली समाधी 
 
घोस तयांचे लेऊन घ्यावे 
वाटले तक्षणी अंगावरती 
 
एकरूप व्हावे, तेथेच रमावे 
परत न फिरावे घराप्रती 
 
बघतो जेव्हा अचानक 
रानफुले समोरी येती 
 
- पाभे (03/10/24) 
(काल डोंगर उतारावर पाहिलेले दृष्य)

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट: लग्नातले उखाणे

 अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नात एकमेकांनी उखाणे कसे घेतले असतील? आपण कल्पना करू आणि तुमच्या कल्पनेतले उखाणे येथे टाका. 

लेक लाडकी मोठ्या घरची होणार सुन मी अंबाणीची 

मोबाईलचा बॅलंस आयुष्यभराचा टाकला अनंतरावांसारखा जोडीदार भेटला 

लग्नाला आले बॉलीवूड आणि हॉलीवूड अंनंतरावांचे नाव घेते स्पर्श करते टचवूड 

स्वप्नातला राजकूमार पाहीला होता सुखाने न्हाले मी अंनंतरावांसारखा पती मिळता.

भाकरीचे पीठ

कविल सकाळीच उपाशीपोटी शेतात मळणी करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी जेवण काय न्यावे या चिंतेत होती. भाकरीचे पीठ संपले होते.

व्हाटस अपवर तिने पीठ संपल्याचे स्टेटस टाकले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायको तान्याने ते स्टेटस बघितले आणि तिने वृशांतला सांगून आपला मुलगा चिन्मय यास शेताच्या बांधावरून कॉल करून बोलावून घेतले. तान्याने त्याचेजवळ भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा कायराकडे पाठवीला.

कायरा आता चिंतामुक्त होती. कविल आज पोटभर जेवणार होता. तिचे मन भरून आले.

बांधाला बांध लागून असलेच शेजारी शेतकरी सर्वांना मिळोत अशी तिने प्रार्थना केली.

- पाभे

बग आली माझ्या कोडा

धाव धाव टीम लिडरा
बग आली माझ्या कोडा

किती आता गुगलावे?
एआय मदतीला घ्यावे?

डेडालाईन मृत्यू भासे
चहा कॉफी नरडी डाचे

टेस्टर, क्यू.ए. इग्नोर करी
क्लायंटाला पटव भारी

एकच विनंती असे तुझीया ठाई
मी केवळ आयटी हमाल भार वाही

सुखरूप माझी असाईनमेंट पार कर
गो लाईव्ह जावूदे जोडतो दोन्ही कर

आता उद्धरण्या केवळ तूच येई
पाषाणाची चुकली नाव पार नेई 

- पाभे २६.०३.२०२४

Tuesday, March 19, 2024

ग बाई माझी करंगळी दुखावली

ग बाई माझी करंगळी दुखावली

(हा लेख मिसळपाव.कॉम या संकेतस्थळावर सन २०२३ च्या दिवाळी अंकात प्रकाशीत केला गेला आहे.‌)

वाहनांशी तसा माझा संबंध केवळ ती चालवण्यापुरता मर्यादीत आहे. असे असतांना गेल्या काही वर्षांपासून त्या वाहनांच्या कामगीरी, कारागीरी, त्यातील लहान मोठे दोष, उणीवा समजावून घेणे, त्यावर चर्चा करणे, रस्त्यावरील वाहतूकीचे नियम या विषयाला वाहिलेल्या आमच्या एका व्हाटसअ‍ॅपवरील गृपमधल्या चर्चांमध्ये मी नेहमी सहभागी होत असतो. त्यात जास्त लक्ष देण्यामुळे रस्त्यावरील चालणार्‍या वाहनांकडे आपसूक लक्ष जात राहते. त्यातून आपल्या वाहनातील दोष तसेच देखभालीकडेही लक्ष जाते. इतर वाहनांमधील तुलना मनात होवून काय योग्य अयोग्य आहे याबाबत मत पक्के होत जाते हा देखील एक फायदाच आहे.

असे करतांना आपसूक चारचाकी वाहनांमधील एसी ची तुलना करण्याची सवय लागली. ज्या ज्या चारचाकीमध्ये बसलो त्यातील एसी कसा काम करतो, हवा थंड आहे का? ती कितपत थंड आहे? इत्यादी बाबी लक्षात येऊ लागल्या. एकदा माझ्या मामेभावाच्या चारचाकीत एका गावाला सायंकाळी जाणे झाले. गाडीत आम्ही दोघेच असल्याने मी पुढच्याच सीटवर बसलो होतो. त्या गावी पोहोचेपर्यंत गाडीत मला विशेष त्रास जाणवला नाही. परततांना रात्र झाली होती. येतांना मला गाडीत चक्कर आल्यासारखे वाटू लागले. त्यानंतर मळमळ किंवा उलटीचीही भावना होऊ लागली. समोरील काच वायपरने घासल्या गेली होती. काचेवरील अर्धवर्तूळूकार ओरखड्यांमुळे समोरील वाहनांचा येणारा प्रकाश मला त्रासदायक ठरू लागला होता. काचेतून पाहून त्रास अधीक वाटत असल्याने माझी नजर मी इतरत्र वळवली. परतत असतांना थोडा पाऊस लागला. खिडक्यांतून पाऊस लागू नये म्हणून खिडक्या बंद केल्या व गाडीतील एसी सुरू केला. एसीच्या कोंदट हवेमुळे मला होणार्‍या त्रासात अधीकच भर पडली.

मला माझ्या स्वःताच्या गाडीतील एसीची सवय असल्याने इतरांच्या एसीच्या हवेतील फरक लगेचच जाणवतो. काही एसी देखभाल न केल्याने एक वेगळाच दर्प असलेली हवा बाहेर टाकतात. हवेतील नैसर्गीक ताजेपणा, उल्हासीतपणा त्या एसीच्या हवेत नसतो. त्यातच काही वाहनचालक नशा आणणारे तंबाखूयुक्त पदार्थ, सुगंधीत पदार्थ, गुटका इत्यादी खात असतात, किंवा त्या वाहनांत तसे पदार्थ सेवन करणारे प्रवासी प्रवास करतात किंवा या आधी तसले प्रवासी त्या वाहनांत बसलेले असतात. त्यामुळेदेखील गाडीत तो वास भारलेला असतो. गाडीचे इंटेरीअर, कुशन, कारमधले पायपुसणे इत्यादींनी तो वास शोषलेला असतो. गाडीच्या काचा बंद केल्या व एसी सुरू केला की गाडीच्या आतील हवा थंड होवून गाडीत तिच हवा पसरली जाते. माझासारखे या दर्पाला जास्त सजग असणार्‍यांना या वासाचा त्रास होतो.

वर उल्लेखलेल्या प्रवासात आमच्या परतीचे ठिकाण लवकर आल्याने मला उलटी वगैरे काही झाली नाही. मामेभावाला त्याच्या गाडीच्या एसी बद्दल तक्रार केली तर तो थोडा नाराज झाला.
असल्याच प्रकारचा त्रास मला माझ्या जवळच्या एका नातेवाईकांच्या वाहनातून प्रवास करतांना नेहमी होतो. अगदी जवळचे नाते असल्याने मला त्यांच्याच वाहनातून एकत्र प्रवास टाळणे शक्य नसते. तरी देखील दोन तिन वेळा मला त्यांचा चारचाकीत असल्याच एसीच्या वासाने हैराण केले आहे. एकतर त्यांना सुगंधीत पान खाण्याची सवय आहे. उद्या पहाटे जर प्रवासाला निघायचे असल्यास रात्रीच ते पानांचा साठा त्या ठरलेल्या पानवाल्याकडून तयार करून घेतात इतकी वाहन चालवतांना पान खाण्याची सवय त्यांना आहे. एकदा तर त्यांच्या वाहनांत ते नातेवाईक नव्हते तर बदली ड्रायव्हर होता. तो काही खाणारा नव्हता तरीदेखील मला त्या वाहनात उलटीची भावना, मळमळ होणे असा त्रास झाला तो झालाच. सुदैवाने प्रवासाचे ठिकाण जवळच असल्याने इतर काही प्रकार झाला नाही.

एका नातेवाईकांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांच्या मोठ्या ट्रकमधून नाही पण त्यांच्या खाजगी चारचाकीत एकदोन वेळा मला गावातल्या गावात प्रवास घडला. त्या वाहनांत उलटी, मळमळ असे काही झाले नाही पण ते गाडीतला एसी अयोग्य पद्धतीने वापरत असल्याचे पाहून मी आश्चर्यचकीत झालो. त्यांच्या गाडीत बसल्यावर त्यांनी एसी सुरू केला तेव्हा नैसर्गीक थंड हवेचा झोत काही जाणवला नाही. मी काही बोललो नाही पण लक्ष आपसूक एसी कंट्रोल पॅनलवर गेले. तेथला एअर सर्क्यूलेटींग चा लिव्हर बाहेरील हवा आत घेण्याच्या बाजूला होता. मी तो बंद केला व त्यांना तो लिव्हर मी सेट केला तसाच योग्य आहे असे सांगीतले. त्यानंतर त्यांनी मीच कसा अयोग्य आहे हे सांगीतले, पण मी त्यांना त्या लिव्हरची तांत्रीक बाजू, त्याचा वापर समजावून दिले मग त्यांना थोडे पटल्यासारखे झाले. त्यांनी त्याचा कितपत वापर नंतर केला हे काही समजले नाही कारण नंतर त्यांच्या गाडीत कधी बसण्याचा योग आला नाही.

माझे एक नातेवाईक असे आहेत की ते स्व:त वाहन कधीही चालवत नाहीत. चारचाकी वाहन चालवण्याचा त्यांनी क्लासवगैरे लावूनही त्यांच्यात वाहन चालविण्याचे धैर्य काही आले नाही. बाहेरगावी जाण्यासाठी ते ड्रायव्हर घेऊन जातात. आपले वाहन इतरांच्या ताब्यात दिल्यावर जे व्हायचे ते होते. बाहेरून किंवा आतून त्यांचे वाहन चांगले जरी असले तरी मला त्यांच्या वाहनात कोंदट वास जाणवतोच. बहूदा त्यांचे निरनिराळे ड्रायव्हर्स पान तंबाखूचे शौकीन असावेत.

इतरांच्या वाहनांतील वास व त्याचा एसी हवेशी, एसी च्या देखभालीच्या स्थितीबाबत जाणून घेण्याची व त्याचा त्या वाहनधारक किंवा वाहनचालक यांच्या मनस्थिती ताडून पाहण्याची माझी सवय एकदा माझ्या अंगाशी आली होती. झाले असे की गेल्या महीन्यात मी मोटरसायकलने हायवेने शहरात प्रवेश करत होतो. बाजूलाच सर्वीस रोड समांतर जात होता. एका चौफुलीवर स्पीड ब्रेकर असल्याने माझी मोटरसायकल मी अगदी हळू करून त्या स्पीड ब्रेकरच्या अगदी डाव्या हाताला ठेवली जेणेकरून तेथे त्या ब्रेकरचा उंचसखलपणा कमी असावा. त्याच वेळी एक पॅसेंजर कार माझ्या उजव्या बाजूने जात होती. त्या कारमधून प्रवाशाला त्या चौफूलीवर उतरायचे असल्याने तिचा वेग काही जास्त नव्हता. त्या कारच्या खिडक्यांच्या काचा खालीच होत्या. ज्यावेळी ती कार माझ्या जवळून गेली त्यावेळी त्या कारमधून मला त्रासदायक ठरणारा गुटकामिश्रीत वास माझ्या नाकाला झोंबला. एवीतेवी कार हळू झालेली होतीच त्यातून ती थांबण्याच्या बेतात होती. मी त्या कारच्या डावीकडे थोडे अंतर राखून स्पीडब्रेकरवर होतो. तो वास नक्की त्याच कारमधून व त्या गुटख्याच्याच कारणामुळे येतो आहे हे मला ताडून पाहण्याची उर्मी मला स्वस्थ बसू देत नव्हती. स्पीड ब्रेकर संपल्या संपल्या मी त्या कारच्या डाव्या बाजूच्या मागच्या दरवाजाजवळ थांबलो. त्या वाहनधारकाला प्रवासी उतरवून देऊन चौफूलीवरून सरळ न जाता डाव्या रस्त्याला जायचे असल्याने त्याने त्याची कार त्याच दिशेने वळवून माझ्या मोटरसायकलच्या अगदी जवळ आणून ठेवली. माझ्या डाव्या बाजूने सर्वीस रोडची ट्राफीक वेगात जात असल्याने मला त्या कारपासून जास्त अंतरही थांबता येत नव्हते. तेवढ्यात कारमधून मागील दरवाजा उघडून एक महिला प्रवासी त्यातून उतरली. त्या कारचा दरवाजा माझ्या मोटरसायकलच्या एक्स्लरेटच्या लिव्हरला लागला व त्या दरम्यान माझ्या उजव्या हाताच्या करंगळीला इजा पोहोचली. दरवाजा हळू आदळल्याने काही गंभीर दुखापत न होता केवळ खरचटले व दोन दिवस करंगळी सरळ करता येत नव्हती. त्या कारचालकाने व त्या महिला प्रवाशाने झाल्या प्रकाराबद्दल दिलगीरी व्यक्त केली. तेव्हढ्या वेळेत मला कारच्या उघड्या काचेतून मला त्रासदायक ठराणारा तंबाखू-गुटखामिश्रीत वास आला व माझ्या मनात जे होते त्याला एकप्रकारे पुष्टी मिळाली.

- पाषाणभेद
२४/०२/०२३

Friday, October 21, 2022

शहरातले गाव

रस्त्याने जातांना अचानक
उंच इमारती डोंगर होतात
त्यावरील काचेची तावदाने
डोंगरावरील हिरवळ होते
रस्त्यांच्या नद्या होतात
त्यातून रहदारीचे पाणी वाहते
जाणारी वाहने होड्या होतात
बाजूची घरे शेतातली झाडे होतात


त्यावेळी मात्र मी
शहरातल्या गर्दीपासून दूर गावात पोहोचतो

- पाभे
२१/१०/२०२२

Wednesday, September 14, 2022

गडकरींनी पुण्यात केले 'हे' वक्तव्य... खड्ड्यात वाहन गेले की...

 



Primary tabs

पुणे वार्ताहर: दि. १४ सप्टेंबर.

रस्त्यातील असलेले खड्डे दुरुस्ती करणे किंवा त्या जागी नवे रस्ते करणे सरकारला लगेचच अशक्य आहे. भारतावर चीन ने राज्य केले तरच ते शक्य आहे. अशा परिस्थितीत रस्त्यांत असलेले खड्डेच वाहनचालकांच्या मदतीस येतील, कारण असल्या खड्ड्यांतूनच वीजनिर्मिती भविष्यात करू अशी घोषणा रस्ते वाहतूक मंत्री श्री. गडकरी यांनी काल पुण्यात केली. गणपती विसर्जन झाल्यानंतर आलेल्या पावसाच्या पुराची पाहणी पुण्यात केल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलत होते. ही परिषद रात्री ११ वाजता शासकीय विश्रामगृहात झाली.

गडकरी पुढे म्हणाले की, रस्त्यांवरील खड्डे हे आपले मित्रच आहेत. त्यांना वैरी संबोधू नका. असल्या खड्ड्यांतून वाहने गेली की खड्यांत बसवलेल्या सेंसर्स व इलेक्ट्रॉनिक सर्कीटमुळे विद्यूतजनित्र चालू होईल व त्याद्वारे वीजनिर्मिती होईल. ही निर्माण होणारी वीज त्याच रस्त्याच्या वरती असलेल्या ग्रीडमध्ये जाईल व त्या ग्रीडमधली वीज वाहने खेचतील व त्यावर वाहने चालतील ही घोषणा तर आधीच केली आहे, याची आठवण त्यांनी पत्रकारांना करून दिली.

पुणे शहरात हा पायलट प्रोजेट सध्या कात्रज, भोसरी, तळेगाव व पंढरपूर रोड येथे उभारण्यात येईल. त्यानंतर असले प्रकल्प गुजरात व उत्तर प्रदेश येथे राबविण्यात येईल.

गडकरी पुढे असेही म्हणाले की, खड्यांत जनित्र व इलेक्ट्रॉनिक सर्कीट बसवण्यासाठी ते खड्डे पुरेसे मोठे व योग्य आकारात पाडण्याची जबाबदारी तेथील स्थानिक नागरीक, महानगरपालिका व कंत्राटदारांची असेल. केंद्र शासन खड्डे निर्माण करणार्या अशा महानगरपालिकांना योग्य ते अनुदानही देणार आहे. अशी विजनिर्मीती झाली तर वीज महामंडळांवरील भारही काहीसा हलका होईल अशी आशा गडकरींनी व्यक्त केली.

'पुण्यात बसेस हवेत उडतील' या आधीच्या घोषणेबाबत पत्रकारांनी गडकरींना छेडले असता त्यांनी हसून तो प्रश्न उडवला. उडत्या बस ऐवजी उडते ड्रोन मात्र चाकणच्या कंपनीने आधीच तयार केले आहे व त्याद्वारे एक व्यक्ती प्रवास करू शकतो हे त्यांनी सुचीत केले. असले ड्रोन पुण्याच्या पीएमपीएमएल द्वारे हडपसर गाडीतळावरून उडतील असे ते म्हणाले. हे वक्तव्य करतांना गडकरी जास्त उत्साहात दिसले.

पत्रकारांबरोबर रात्रीचे जेवण घेतांना अनौपचारिक गप्पांमध्ये गडकरी असेही बोलले की, आताच्या भाजपाच्या केंद्रसरकारने रस्ते कोंडी व पडणारे खड्डे यावर सखोल विचार केला आहे. आगामी काळात भारतात लोह व जस्त युक्त रस्ते निर्मीण्याचा विचारही बोलून दाखवला. या विषयीचे व खड्ड्यांतून वीजनिर्मिती असले दोन शंशोधने व स्वतंत्र पेटंट भारतीय रोड काँग्रेसने २०१९ सालीच घेतलेले आहे. या आधीच्या सरकारने जर सरकारी अधिकार्यांना कामाला लावले असते तर हे संशोधन व पेटंट आधीच घेतले गेले असते, पण आधीच्या सरकारची काम करण्याची इच्छाच नव्हती, असे ताशेरे त्यांनी आधीच्या काँग्रेस सरकारवर वाजवले.

टोलमुक्त रस्त्यांबाबत ते काहीसे नाराज दिसले. सरकार रस्ते निर्मीतीतून पैसे निर्माण करत असते. टोल टाळले तर नवे रस्ते कसे तयार होतील असा उलट प्रश्न त्यांनी पत्रकारांना विचारला. नवे वाहन घेतांनाच पूर्ण आयुष्याचा टोल आधीच घ्यायचा असला विचार चालू असल्याचे ते बोलले. त्यात वाहनाच्या किंमतीत केवळ ५०% मामूली किरकोळ वाढ अपेक्षित असल्याचे ते बोलले.

चालकांच्या कमरेचा पट्टा हाच सिटबेल्ट म्हणून वापरता येईल का या बाबत संशोधन पुण्यातील शासकीय एआरएआय भोसरी, या संस्थेत चालू असल्याचे त्यांनी सांगितले. महीलांच्या कमरेच्या साखळ्या सीटबेल्ट मानावा असा कायदा संसदेच्या पटलावर असल्याचे त्यांनी नजरेस आणून दिले. रिक्षातून शाळेत जाणारी मुले, जेष्ठ नागरीकांना व जेष्ठ महीलांना सिटबेल्ट वापरण्यात त्यांनी सुट दिल्याचे सांगितले.

जे चालक सीटबेल्ट लावणार नाहीत त्यांना दंड तर केला जाईलच पण त्यांचेवर गुन्हे दाखल करून त्यांचे वाहन रस्ते निर्मीती करण्यात कामाला लावावे, प्रसंगी त्यातून सिमेंट वाहतूक करावी अशी सुचना त्यांनी पोलीसांना केली.

Sunday, August 21, 2022

मिपाकट्टा संपन्न - पावसाळी भेट मु. मोहाडी ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक, १५ ऑगस्ट, २०२२

 मिपाकट्टा संपन्न - पावसाळी भेट मु. मोहाडी ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक, १५ ऑगस्ट, २०२२

<iframe src="https://www.facebook.com/plugins/post.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fpashanbhed%2Fposts%2Fpfbid0qCnCnisJ7PvnuUFnrPQynACYzwDYXbYKEg4pdMmcxShGETsb9PG8FNpnrpa8Mgrkl&show_text=true&width=500" width="500" height="219" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowfullscreen="true" allow="autoplay; clipboard-write; encrypted-media; picture-in-picture; web-share"></iframe>

http://www.misalpav.com/node/50590


मिपाकट्टा संपन्न - पावसाळी भेट १५ ऑगस्ट, २०२२
मु. मोहाडी ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे भेट व सह्याद्री फार्म हा कारखाना पाहणी.

ठरल्याप्रमाणे मिपाकट्टा अर्थात पावसाळी भेट १५ ऑगस्ट, २०२२ रोजी संपन्न झाला. 

मिपाकर पिंगू व वहिनी नव्या मुंबईतून नाशिकला आले. मयुरेश पालकर आधीच आले होते. त्यांची गाडी खराब झाल्याने ते उशीरा जॉईन होणार होते. 

मी, माझी पत्नी व माझी मुलगी तसेच पिंगू व वहिनी मोहाडी येथे दुपारी१२ च्या सुमारास पोहोचलो. आजूबाजूला अतिशय रम्य व हिरवागार परिसर आहे. डाळींबांच्या बागा, पेरू, द्राक्षांच्या बागा, ऊस व भाजीपाला यांची हिरवी शेते यामुळे पावसाळ्यात हा प्रदेश नयनरम्य दिसत होता. 

मोहाडी गावातील खालील ठिकाणे पाहिली. 

<img src="https://scontent.fnag6-3.fna.fbcdn.net/v/t39.30808-6/300248341_5277379952311916_1505253774932598123_n.jpg?stp=dst-jpg_p118x90&_nc_cat=110&ccb=1-7&_nc_sid=dbeb18&_nc_ohc=VBfdXoDK7ZMAX91S6Y9&_nc_ht=scontent.fnag6-3.fna&oh=00_AT8IuSqZ4iMKV7MpI3xvaylnDRvzCZTML7W79j1qrYdQXw&oe=63066628" alt="Ashtabahu mandir" /> 

अष्टबाहू गोपाळकृष्ण मंदीर (जुनी बांधणीचे दुमजली लाकडी बांधकामातील मंदीर. रंगकाम सुरेख)

<img src="https://scontent.fnag6-2.fna.fbcdn.net/v/t39.30808-6/300573691_5277385578978020_5919585894345469881_n.jpg?_nc_cat=105&ccb=1-7&_nc_sid=dbeb18&_nc_ohc=-ucIRW7BO-sAX9lHdfS&_nc_oc=AQnr6xCxtCMLWULpe8rI-goDDWUmjGJR7sNaIMyUkDTnonsg75b2rTc0YUdH8xYc3PI&_nc_ht=scontent.fnag6-2.fna&oh=00_AT_FO8ZGeL5zBZhKte5gKxaTq0clFdWQj2bZmen0lYbIaw&oe=63071AAB" alt="Board" />

गोसावी समाज साधू मंदीर
नवनाथ मंदीर
मोहाडेश्वर मंदीर

<img src="https://scontent.fnag6-1.fna.fbcdn.net/v/t39.30808-6/300372996_5277405638976014_4520969102662771969_n.jpg?stp=dst-jpg_p118x90&_nc_cat=107&ccb=1-7&_nc_sid=dbeb18&_nc_ohc=1gCmpCSyDoAAX_DpZ3t&_nc_ht=scontent.fnag6-1.fna&oh=00_AT-aFN0ZrwsYLJd4A7OpwcMmTJJtUnEOIpfKOBMmFMzmAg&oe=6306F34D" alt="barav" />

अहिल्यादेवी बारव
मोहाडमल्ल देवस्थान

<img src="https://scontent.fnag6-3.fna.fbcdn.net/v/t39.30808-6/300215017_5277352085648036_804545264554639319_n.jpg?stp=dst-jpg_p160x160&_nc_cat=100&ccb=1-7&_nc_sid=dbeb18&_nc_ohc=Gwxr0pcVgtoAX8mMuYB&_nc_ht=scontent.fnag6-3.fna&oh=00_AT_BleDrmilLieauQl-uFOvtaNIKAIiplEViawnOTwpcVw&oe=63067D4F" alt="Somavanshi Wada" />

सोमवंशी वाडा

त्यानंतर सह्याद्री फार्म कारखाना येथे गेलो. जेवणाची वेळ झाल्याने प्रथम कारखान्याच्या कॅन्टीनमध्ये जेवण केले.

सह्याद्री फार्म हा शेतीमाल प्रोसेस करणारा कारखाना आहे. येथे फळे व भाज्या पॅकींग, कोल्ड स्टोरेज करणे, जॅम, जेली, सॉसेस बनवणे इत्यादी कामे चालतात. 

पर्यटकांना बॅचेसमध्ये कारखाना दाखवला जातो. १५ ऑगस्ट असल्याने कारखान्यात वर्कर्स नव्हते. त्यामुळे वर्कींग पाहता आले नाही. इतर सर्व विभाग गॅलरीतून दाखवतात. परिसर खूप मोठा आहे. सह्याद्री फार्मच्या कार्पोरेट कार्यालयापुढे अतिशय उंच उभारलेला १५ ऑगस्टचा झेंडा फडकत होता. पाऊस अधून मधून सुरूच होता. 

तशाच वातावरणात पुन्हा नाशिकला प्रयाण झाले.

पुढील कट्टा असाच गर्दी नसलेल्या निसर्गरम्य ठिकाणी ठरवू या अन तेथे भेटूया.

Friday, July 22, 2022

Book: Noise Pollution: Problems and Solutions

 Book: Noise Pollution: Problems and Solutions


Noise Pollution: Problems and Solutions

• Are you bothered by the noise you hear?
• Does the noise of vehicles irritate you?
• Do night shifts and noise during the day cause you sleeplessness?
• Have there been irritations, anger, distress frustration and disturbances lately?
• Does it have a negative effect on learning ability and memory?
• Are you facing noise issue in factories?

If this is the case then you may be suffering from noise pollution. What is the source of this deadly pollution? What exactly are the health problems it causes? What are the solution? 

Pollution of water, air in the atmosphere is often talked about, but we take noise pollution very lightly. It doesn't take much effort to make sounds. The tendency to be careless about the sound is rising in the society. Since the sound medium can't be seen like air, its density, intensity is not immediately felt. We can't even close our ears. Even if we don't want some sounds to be hear, we are forced to listen it. Many people do not even know that there is noise pollution thing. Noise pollution causes many health problems in human beings as well as other organisms. This is very unfortunate.

All this is discussed in this book. A separate chapter has been written on noise pollution caused by vehicles, it should be helpful to the readers. 

Wednesday, July 20, 2022

वह्या पुस्तके आणि कव्हर

जून महिना सुरू झाला की साधारणपणे मध्यमवर्गीयांच्या घरात शालेय वस्तू खरेदी करण्याची लगबग सुरू होते. बहूतेक कुटूंबवत्सल पालक पगार झाला की शाळेसाठी लागणार्‍या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात निघतात. मान्सूनचा पाऊस जरी चालू असला तरी एखाद्या सुटीच्या दिवशी आपापली मुले, त्यांच्या आया यांची स्कुटरवर निघालेली गर्दी रस्त्यावर पहायला मिळते. 

आजकाल सरकारी शाळातच सरकारी पुस्तके मिळत असतात. त्यामुळे शालेय सामाना मिळणार्‍या दुकानांत पुस्तकांची विक्री सोडून वह्या व इतर गोष्टी विकायला ठेवतात. नाही म्हटले तरी इंग्रजी शाळांतील मुलांना मात्र पुस्तके दुकानातूनच खरेदी करावी लागतात. काही शाळा रिझल्टच्याच दिवशी शाळेतच वह्या पुस्तके विकण्याचे स्टॉल्स लावतात. तेथली मुलांची, पालकांची लगबग, गर्दी पाहण्यालायक असते. पण तेथली खरेदी काही खरी खरेदी मानता येणार नाही. वह्या पुस्तकांची खरी खरेदी ही बाजारपेठेतील आपल्या ओळखीच्या दुकानातच होते.

पुस्तकांच्या बाबतीत मी फार सुदैवी गणला जावा. मझ्या लहाणपणी आम्ही वडीलांबरोबर त्यांच्या ओळखीच्या दुकानात जाऊन वह्या पुस्तके खरेदी करत असू.  ज्या दिवशी ज्या इयत्तेचा शेवटचा पेपर मी देऊन घरी येत असे त्या दिवशी किंवा फार तर त्याच्या दुसर्‍या दिवशी मी माझ्या वडीलांना बरोबर घेऊन ओळखीच्या नेहमीच्या दुकानात जात असू. दुकानदारही ओळखीचे तोंडभरून भरपूर स्वागत करत असे. त्यावेळी मी पुढल्या इयत्तेचे सगळी सरकारी शालेय पुस्तके विकत घेत असे. म्हणजे सुटीतच पुढल्या इयत्तेतले धडे, अभ्यासक्रम वाचून मी तयारीत असे. वह्यांची खरेदी मात्र शाळा चालू झाल्यानंतरच असे.

परीक्षा झाल्या की सर्वात प्रथम जुनी पुस्तके बाजूला काढणे होई. ती जुनी पुस्तके जुन्या नव्या पुस्तक विक्रेत्याकडे विकून जे पैसे हातात पडत त्याचा कोण आनंद होई. मग त्या पैशातून खाऊच्या वस्तू घेतल्या जात. जुन्या वह्यांतली कोरी पाने काढणे हा एक मोठा उद्योग असे. त्या कोर्‍या पानांपासून मग वह्या तयार करायला घेतल्या जात. कोपर्‍यावरील एखाद्या चप्पल दुरूस्ती करणाराकडून ती पाने टाचून घेतली जात असत. 

पुस्तके घेतल्यानंतर त्यांना कव्हर लावण्याचा स्वतंत्र गृहउद्योग समजला जावा असे मला सतत वाटत आले आहे. शाळा सुरू होण्याच्या एकदोन महिने आधी नंतर एखाद्याने केवळ वह्या पुस्तकांना कव्हरं लावायचा धंदा केला तर गिर्‍हाईकांची त्याचेकडे रांग लागेल. घरात जर दोन शाळेत जाणारे विद्यार्थी असतील तर त्यांच्या वह्या पुस्तकांना कव्हरं लावण्यासाठी त्यांच्या वडीलांना कमीतकमी चार दिवस लागावेत असे गुणोत्तर आपण मांडू शकतो. कव्हरं लावण्याचे काम बहूदा वडीलच करतात. त्या मुलांची आई मात्र शुज कसे घ्यावेत, शालेय गणवेश कुठे स्वस्त अन टिकाऊ मिळतो, ते गणवेश वाढत्या मापाचे कसे घ्यावेत या असल्या कामात एक्सपर्ट असते. 

"गणू, आण रे तुझ्या शाळेचे वह्या पुस्तके, आज मी कव्हर लावून देते", अशा अर्थाची वाक्य महिलावर्गाकडून कमीच ऐकू येतात. त्यापेक्षा, "अहो, नुसते टीव्ही काय बघत बसलात? त्यापेक्षा बघताबघता सोन्याच्या वह्यापुस्तकांना कव्हरं लावा एकदाची" अशा अर्थाने एखादी गृहीणी बोलली की ते गृहस्थ  तिचे पुढचे बोलणे कव्हर करायला लागू नये म्हणून वह्या पुस्तकांसाठी कव्हर लावण्यासाठीचे कागद आणायला बाजारात लगबगीने निघतात. अशा कव्हर लावणार्‍या माणसांसाठी शाळापुस्तकांची खरेदी करतेवेळी एकतर कव्हर संपलेली असतात किंवा विकत घेण्यास विसरली तरी असतात. वह्यांच्या खरेदीबरोबर त्यावर नाव, शाळेचे नाव, इयत्ता, तुकडी असलेली कोरी लेबलंपण घेतली जायची. वह्या पुस्तकांना कव्हर लावल्यानंतर ही लेबल्स त्यावर चिकटवून त्यावर नाव, इयत्ता वगैरे लिहावे लागे. 

कव्हर या इंग्रजी शब्दाला मराठीत मलपूष्ठ, आच्छादन, आवरण, एखादी जागा व्यापणे, झाकणे अशा अर्थाचे प्रतिशब्दही आहेत. पण कव्हर हा शब्द अतिशय मराठी होऊन गेला आहे. क्रिकेट या खेळातही सिली पॉईंटच्या पुढे कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर असल्या प्रकारचे चार चार कव्हर पोजिशन्स असतात. आपल्या राहूल द्रविडने कव्हर ड्राईव्ह शॉट मारून 613 धावा केल्यात व त्या क्रमवारीत त्याचा तिसरा क्रमांक आहे. पाऊस पडल्यावर क्रिकेटचे मैदान, घराचे छप्पर इत्यादीवर प्लास्टीक टाकून ते कव्हर केले जातात. वर्तमानपत्रात बातम्या लिहीणारे पत्रकार एखादी बातमी कव्हर करायच्या कामगिरीवर बाहेर पडतात. एखादा मुलाखतकार बड्या नेता, अभिनेत्याची मुलाखत कव्हर करतात. गल्लीत, शाळेत मुलांमध्ये भांडण झाले तर दोन्ही गट एकमेकांची बाजू मांडून (भांडून?) एकमेकांना कव्हर करतात. सैन्यात पुढे लढणार्‍या तुकडीला एखादी तुकडी खास कव्हर करून कव्हर फायरींग करत कव्हर करत असते. बॉडीगार्ड आपल्या नेमून दिलेल्या नेत्याला कव्हर करत असतात. 

एका अर्थाने कव्हर करणे, कव्हर लावणे हा आतील वस्तूचे संरक्षण करण्याचा उपाय असतो. 

वर्तमानपत्रात कव्हर स्ट्रोरी, कव्हर पेज, कव्हर फोटो, कव्हर चित्रअसते. सायकल, मोटरसायकल तसेच कारमध्ये सिट कव्हर असते. सोफा, गादी, उशी, मोटरसायकल, कार यांना देखील कव्हर असतात. मोबाईलला कव्हर असते. गिटार किंवा इतर वाद्याला, खेळण्याच्या कॅरम बोर्डाला झाकण्याचे कव्हर बाजारात मिळतेच पण त्याच कॅरम बोर्डाच्या खेळात क्वीन असलेल्या सोंगटीला जिंकण्यासाठी कव्हर असलेली सोंगटीही पॉकेटमध्ये टाकावी लागते. ऑफीसात एखादे पत्र लिहीले असेल तर त्यात काय लिहीले आहे अशा अर्थाचे एखादे कव्हर लेटरही लिहील्या जाते. नोकरीसाठी अर्ज करतांना बायोडाटासोबत कव्हर लेटर लिहीण्याची प्रथा जवळपास संपत आली आहे. आताश: नोकरीसाठी उमेदवाराने केवळ बायोडाटा पाठवूनही काम भागते. एखादा विमा काढला तर त्यात जास्तीच्या आजारासाठी जास्त पैसे भरून अ‍ॅडीशनल कव्हर खरेदी करून तो आजार त्या पॉलीसीत कव्हर केला जातो. 

कव्हरच्या पुढचा शब्द रिकव्हर असा आहे. त्याचा अर्थ प्राप्त करणे, आजारातून बरे होणे, वसूली तसेच आधीच असलेल्या कव्हरवर पुन्हा कव्हर लावणे (नवीन आच्छादन (मलपूष्ठ) चढवणे) करणे अशा अर्थाने आहे. अजून एक शब्द आहे - अनकव्हर. याचा अर्थ कव्हर काढणे, उघड करणे, एखादी खाजगी बातमी सर्वांना माहित पडू देणे असा होतो. 

वह्या पुस्तकांना कव्हर वेगवेगळ्या प्रकारात लावता येतात. म्हणजे कव्हरचे साहित्य कोणते, ते कशा प्रकारे लावले जाते, चिकटवले जाते यावर त्याचे उपप्रकार पडतात. छापील पुस्तकांना पेपरबॅक, जाड तसेच पुठ्ठा बांधणीचे कव्हर घातले जाते. शाळेच्या पुस्तकांना घरी आणल्यानंतर खाकी रंगाचे किंवा पारदर्शक प्लास्टीकचे कव्हर लावले जाते. 
कहर म्हणजे आजकाल इंग्रजी शाळा पाल्यांना एकाच रंगाचे कव्हर असणार्‍या वह्या देतात व त्यांना असणार्‍या जाड कागदाच्या कव्हरवर देखील लावायला निराळे प्लास्टीकचे कव्हर देतात. (अर्थात त्याचे पैसे वेगळे घेतात.) वह्यांना आधीच जाड कागदाचे वेष्टन असतांना त्यावर आणखी एखादे कव्हर लावणे म्हणजे पैशाची नासाडीच म्हणता येईल. 

लिखाणकाम करण्यासाठी वह्यांचे असंख्य प्रकार आहेत. कोरी, कसल्याही ओळी नसलेल्या वह्या, एकेरी, दुरेघी, चार रेघी, चौकोन असलेल्या वह्या, एक पान कोरे व एक पान एकेरी ओळींच्या वह्या, आलेख वही, नकाशा वही, प्रयोगवह्या, रजिस्टरे, डायरी, चित्रे काढण्यासाठीच्या वह्या, लक्ष्मी पुजनासाठी वापरतो त्या वह्या, हिशेबाच्या चोपड्या हे झाले वापरण्याच्या पद्धतीवरून वह्यांचे प्रकार. आकारनुसार व कागद, कव्हर नुसार आणखी त्यात प्रकार पडतात. म्हणजे पुठ्ठा बांधणीच्या हार्डबाऊंड वह्या , थोडे जाड कागद कव्हरअसलेल्या सॉफ्टबाऊंड वह्या, स्टेपल पीन लावून बांधणी केलेल्या वह्या, दोर्‍याने शिवलेल्या वह्या, सुटे कोरे कागद टाचून केलेल्या वह्या, स्पायरल बाऊंड, खिशात ठेवता येणाच्या आकाराच्या वह्या, नेहमीच्या आकाराच्या रेग्यूलर वह्या, B6, B5, A6, A5 आकारातील वह्या असल्या आकार प्रकारातील वह्यांची यादी करायला एखादी वहीच लागेल की काय अशी शंका मनात येते. पूर्वी जाड पुठ्ठ्याच्या व कापडाने चिकटवलेल्या वह्या मिळत. तशा वह्या आता पहायला मिळत नाहीत. नाही म्हणायला १०० पानी वहीत केवळ ८४च पाने, २०० पानी वहीत केवळ १८०च पाने, कमी आकाराच्या वह्या असल्या दात कोरून पोट भरण्याच्या प्रकारांनी गिर्‍हाईके हैराण झाली आहेत. थोडक्यात कारखानदार वह्यांत कमी पाने लावून गिर्‍हाईकांच्या तोंडाला पाने पुसतात. 

"अहो, ही वही आकाराने छोटी दिसते आहे.", ग्राहक.
"त्या कट साईजच्या वह्या आहेत. फुल साईज च्या वह्या महाग आहेत." - दुकानदार.
"ह्या वह्या बनवणार्‍या कारखानदारांनी कट साईजच्या वह्या बनवून आम्हाला फुल बनवले. कट प्रॅक्टीसचा कट केलेला आहे तुम्हां लोकांनी. वह्यांच्या धंद्यानी अगदी वाह्यात बनवले आहे तुम्हाला." - ग्राहक.

मी तर कॉलेजात एकच जाड वही सगळ्या विषयांना केली होती. कोपरे दुमडून प्रत्येक विषयाला पाने वाटून घेतली. खूप "अभ्यासू" असल्याने त्यातीलही बरीचशी पाने तिन वर्षांनंतरही कोरीच होती हा विषय वेगळा म्हणा. अर्थात जेथे योगमार्गातील अधिकारी पुरुष संत चांगदेव महाराज यांचेही ज्ञानेश्वरांना लिहीलेले पत्र कोरेच राहिले तेथे माझ्यासारख्याची वहीच्या वही कोरी असली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. 

शाळेकडून विद्यार्थ्यांना ज्या वह्या मिळतात (खरेदी कराव्या लागतात) त्यांचे कव्हर एकाच रंगात, एकाच प्रकारचे किंवा कसलेही चित्र नसतांना केवळ शाळेचा लोगो असलेले असतात. वह्या पुस्तकांवर वेगवेगळे चित्र असतील तर कोणती वही कोणत्या विषयाला आहे हे समजणे विद्यार्थ्याला सोपे पडते. ते चित्र पाहून त्याच्यातील कलाकार जागृत होतो. पुस्तकांना कव्हर लावायला सांगणार्‍या व त्यातही खाकी कव्हर लावायला सांगणारर्‍या शाळा (पक्षी शिक्षक) अगदीच अरसीक समजावे. लहान लहान मुलांना कसलेही चित्र नसलेल्या अनेक वह्या बाळगाव्या लागतात. त्यापेक्षा पूर्वी झाडे, पाने , पक्षी, नक्षी, (हिरो हिरविणी) इत्यादींचे फोटो कव्हरवर असणार्या वह्या लगेच ओळखू यायच्या. मध्यंतरीच्या काळात काही संधीसाधू लोकांनी एका साधूचे फोटो वह्यांवर छापले व त्या वह्या विकून पैसे छापले व त्या साधूंच्या प्रसिद्धीच्या वलयाची संधीसाधून घेतली. शाळेतील दप्तरात एका वहीवर कत्रीना कैफचा फोटो व त्याच ठिकाणी दुसर्‍या वहीवर ह्या साधूंचे चित्र असलेला फोटो कसा असू शकेल याचा विचार मनात येतो. नाही म्हणायला लोकजागृती झाल्याने वह्यांवर नट नट्यांचे फोटो आजकाल पहायला मिळत नाहीत. त्या ऐवजी राष्ट्रीय पुरूष, निसर्गातील दृष्ये, देशातील स्मारके, सैनीक इत्यादींची चित्रे पहायला मिळतात ही निश्चित चांगली बाब आहे. आजकालच्या वह्यांच्या शेवटच्या पानावर काही मनोरंजक किंवा माहितीपूर्ण माहीती छापली जाते.

माझ्या मते पुस्तकांना कव्हर लावूच नये. अगदीच लावायची ठरली तर मुखपृष्ठ व मलपृष्ठ इत्यादीवर जे चित्र असलेले पान असते ते कापून आपण लावलेल्या कव्हरवर पुन्हा चिकटवावी. अर्थात इतके कोणी करत नाही. वास्तविक पाहता, शालेय पुस्तकांच्या (त्यातही स्टेट बोर्डाची, बालभारतीची पुस्तके) कव्हरवर कितीतरी अर्थपूर्ण, सयुक्तीक व मनोरंजक चित्र असतात. लहान मुले गवतावर खेळत आहेत. एखाद्या इयत्तेच्या पुस्तकावरच्या चित्रात पक्षी, बदक आजूबाजूला आहेत. कौलारू घर किंवा शाळा मागे आहे. कुणा एका मुलाच्या हातात त्याच इयत्तेचे पुस्तक आहे ज्यावर तसलेच चित्र आहे. असल्या प्रकारची बालभारती, कुमारभारती, युवकभारतीची पुस्तके असतात. त्यात गणिताची पुस्तके असतील तर चित्रातील मुलांचा धिंगणा बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार इत्यादी चिन्हांसोबत चाललेला असतो. आपल्या शि द फडणीस यांनीदेखील बालभारतीतील पुस्तकांत चित्रं रेखाटली आहेत. 

सदर लेख हा देखील अशाच वह्यांची कोरी पाने फाडून शिवलेल्या पानांवर लिहून पाडलेला आहे हा खुलासा जाता जाता करतो अन आपली रजा घेतो.

- पाषाणभेद
१२/०७/२०२२