Showing posts with label राहणी. Show all posts
Showing posts with label राहणी. Show all posts

Monday, August 24, 2020

इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजारः जगावरचे संकट

 (महाराष्ट्रीय राज्य पाठ्यपुस्तक अनावलोकन व टिप्पणी असंशोधीत खाजगी मंडळ, पुणे-१२)

इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजारः जगावरचे संकट

(प्रस्तावना: कोरोना आजारापश्चात एखाद्या इयत्तेतील अभ्यासक्रमात एखादा पाठ कसा असू शकेल हे लेखकाच्या मनात आल्याने "इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजारः जगावरचे संकट" हा पाठ लिहीला आहे. )

जगात सर्वप्रथम कोरोना अर्थात कोविड-१९ या आजाराचा उद्रेक चीन देशातील वुहान या शहरात डिसेंबर २०१९ च्या दरम्यान झाला होता. या शहरातून इतरत्र तसेच इतर देशात गेलेल्या व्यक्तींमार्फत हा आजार इतर देशांत पसरला. साधारण जानेवारी २०२० च्या शेवटी कोरोना या आजाराची लागण असलेले रुग्ण भारतात सापडले. एप्रिल २०२० च्या मध्यानंतर हा आजार भारतात सर्वत्र पसरला होता.

या आजारात कोवीड विषाणू हवेतून तसेच स्पर्शामधून पसरत असत. त्या काळात या आजारावर कोणतेच औषध तसेच लस उपलब्ध नव्हती. लाखो लोक या आजारामुळे जगात दगावले. अनेक देशांनी आपल्या देशांतील सार्वजनीक व्यवहार अनेक महिने बंद ठेवले होते. जगभरातील विमानसेवा ठप्प होती. इतकेच नव्हे तर अनेक गावेच्या गावे एकमेकांपासून विलग केलेली होती. प्रशासनाच्या परवानगी विना कोणीही व्यक्ती दुसर्‍या गावात प्रवेश करु शकत नव्हता. भारतात देखील प्रशासनाने जिल्हाबंदी, गावबंदी असे उपाय अंमलात आणले होते. सार्वजनीक ठिकाणी वावरतांना तोंडावर रुमाल किंवा मास्क लावणे सक्तीचे होते. दोन व्यक्तीत कमीतकमी तिन चार फुटांचे अंतर राखावे अशी अपेक्षा होती. कोरोना विषाणू स्पर्शाद्वारे पसरत असल्याने वरचेवर हात सॅनिटायझरने किंवा साबणाने धुवावे असे वारंवार सांगितले जात होते.

त्या कालावधीत होणार्‍या परिक्षा रद्द झाल्या होत्या. मात्र शैक्षणिक वर्ष चालू झाल्याने अनेक शाळांनी ऑनलाईन वर्ग घेणे चालू केले होते. त्या वर्गात दहावी बारावी सारखे मोठे वर्ग तर होतेच पण अगदी बालवाडी, पहिली दुसरीचेही वर्ग होते. शिक्षक, विद्यार्थी, पालक इत्यादींना नवे तंत्र शिकणे, इंटरनेटचा अभाव, मोबाईल, लॅपटॉप आदींची अनुपलब्धता अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. यावर मात करत अनेक ठिकाणी शिक्षण चालू झाले होते.

त्या काळात कामगार वर्गाचे फार हाल झाले. लॉकडाऊनमुळे कित्येक कारखाने चार महिने बंद होते. अनेक व्यापारी दुकाने बंद पडली. कित्येकांनी आपले व्यवसाय बदलले. कारखान्यातले कामगार, मजूर आदी आपापल्या गावी परतू लागले. रेल्वे, बस सेवा बंद असल्याने कित्येक कामगार आपले कुटूंबाबरोबर पायी आपल्या गावी जात असणारे चित्र रस्त्यावर दिसत होते. अनेक जणांनी रस्त्यातंच प्राण गमावले. कित्येकांचे पगार होत नव्हते किंवा त्यात कपात केली जात होती. आर्थीक कुचंबणा होत होती. बाजारपेठेत पैशाचे चलनवलन थांबलेले होते. भारतातच नव्हे तर अनेक विकसीत देशांतही परिस्थीती काही निराळी नव्हती.

ऑगस्ट २०२० महिन्यात सार्वजनिक व्यवहार साधारणपणे चालू करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली. त्यामध्ये सुरूवातीला काही बाजारपेठा सम आणि विषम पद्धतीने चालू करणे, मोठे मॉल्स बंद ठेवणे, चित्रपट गृहे बंद ठेवणे, हॉटेल व्यवसाय बंद, बस सेवा चालू जरी असली तरी त्यात ई-पास आणि दोन प्रवासीदरम्यान अंतर राखणे आदी पद्धती अवलंबल्या गेल्या. 

जागतीक आरोग्य संघटना अर्थात डब्लू.एच.ओ. ने या आजाराविषयी विश्वासार्ह माहिती देण्याचे काम केले नव्हते. त्यांच्या वेळोवेळी प्रसारीत होणार्‍या बातम्यांबद्दल दुमत व्यक्त केले जात होते. जगात चीन देशानेच हा आजार मुद्दाम तयार केला आणि पसरवला याविषयी मत बनत चालले होते. अमेरीकेसहीत अनेक देशांनी याबाबत चीनविरूद्ध उघड भुमिका घेतल्याने जग तिसर्‍या महायुद्धाच्या उंभरठ्याच्या दिशेने जात आहे की काय अशी शंका वेळोवेळी येत होती. संपूर्ण जगाचे राजकारण कोरोना या आजाराभोवतीच फिरत होते.

अनेक देशांतील औषधे निर्माण करणार्‍या किंवा संशोधन करणार्‍या संस्थांनी या आजारावर प्रतिबंधक लस निर्माण करण्याचे संशोधन सुरू केले होते. त्यात यश मिळण्याचे प्रमाण मात्र अगदी नगण्य होते. ऑगस्ट २०२० महिन्याच्या मध्यावर रशीया देशाने सर्वप्रथम कोरोना आजारवरची लस बनवल्याचे आणि ती लस बाजारात आणल्याच्या बातम्या येत होत्या. परंतु या लशीच्या यशाच्याबाबत बरेच देश आणि जागतीक आरोग्य संघटनाच साशंक होत्या.

कोरोना या आजारानंतर सर्वसामान्य मानव समाजाची जिवन जगण्याची शैली बदलली होती. सार्वजनीक उत्सव, सण, समारंभ एवढेच नाही तर दुख:द प्रसंगी जमावाने एकत्र येणे टाळले जात होते. एकमेकांच्या घरी सहज जाणे, गप्पा मारणे आदी लक्षणीय रित्या कमी झालेले होते. बाजारात जातांना किंवा घराबाहेर पडतांना तोंडाला मास्क लावूनच पडावे लागत होते. हात साबणाने धुणे, सॅनिटायझर वापरणे आदी सवयी लोकांच्या अंगवळणी पडले होते. पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस आणि हॉस्पीटलमधील सेवा देणारे, नगर/महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी यांनी या काळात जीवाची पर्वा न करता काम केले. लॉकडाऊन काळात बंदोबस्त ठेवून पोलीस आणि प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मदत केली. कित्येक डॉक्टर तसेच नर्सेस हे इतरांवर उपचार करतांना दगावले. 

कोरोनासारखा आजार, निसर्ग वादळ या नावाचे महाराष्ट्रावर आलेले संकट, बेरोजगारी, व्यापार, व्यवसाय कमी होणे, नोकर्‍या जाणे, बंद शाळा, आर्थिक चणचण, बदललेली जीवनशैली अशा अनेक अर्थांनी साल २०२० हे एक वेगळेच वर्ष आहे हे जाणवत होते. जागतीक स्तरावरील ही स्थिती कशा प्रकारे बदलेल आणि पूर्वीचे जिवन कसे सुरळीत होईल याविषयी सर्वांच्याच मनात शंका होती.

Saturday, January 11, 2020

सुडंबन: (आंघोळ: एक उत्साहवर्धक क्रिया)

सुडंबन: (आंघोळ: एक उत्साहवर्धक क्रिया)

मला आंघोळ फार आवडते. अगदी आवडच आहे म्हणा ना! फार म्हणजे फारच. लहाणपणी मी बळजबरी पाण्याच्या लहान टबात बसत असे असे घरचे सांगतात. ते माझ्या अगदीच लहाणपणी असावे. शालेय वयातदेखील मी अगदी थंडीतही सकाळी आंघोळ करूनच शाळेत जात असे. आंघोळीच्या बाबतीतला चटपटीतपणा माझ्या अंगाअंगात मुरलेला आहे. गरम असू दे किंवा गार असू दे, कोणतेही पाणी मला आंघोळीसाठी अन शरीराला मानवते. गरम पाण्यासाठी आता अनेक सोई झालेल्या आहेत. इलेक्ट्रिक हीटर, गॅस हीटर, गॅसवर भांडे ठेवून गरम पाणी करणे किंवा गरम पाण्याचा बंब असो. कोणत्याही साधनांनी गरम पाणी आले म्हणजे झाले. ते नसलेच तर सरळ थंड पाण्याच्या नळाखाली बसायचे अन आंघोळ उरकायची. गरम पाण्यातल्या आंघोळीला मनाची तयारी करायची गरज नसते. मस्तपैकी नळाने किंवा वर उल्लेखलेल्या साधनांनी येणारे गरम पाणी बादलीत घ्यायचे अन सरळ आंघोळीला सुरूवात करायची. थंड पाण्याच्या आंघोळीला मात्र मनाची अन शरीराची तयारी असावी लागते. उन्हाळ्यात थंड पाणी चांगले वाटत जरी असले तरी सकाळी ते थंड पाणी अधीक थंडच असते. त्यामुळे अशा आंघोळीसाठी आधी पायापासून सुरूवात करावी लागते. थंड पाण्याने आंघोळ करायची असे मनाने ठरवले की आधी पायावर पाणी टाकून शरीर आंघोळीसाठी तयार होते. मग कमरेवर आणि मग छाती, खांदे, डोके असे वरचढ प्रमाणात मगाने पाणी अंगावर घ्यावे लागते. एकदा का एखाद दोन मग थंड पाणी अंगावर पडले की मग मात्र गरम पाण्याच्या तुलनेने हि आंघोळ अधीक वेगात होते. चटचट डोके, अंग धुतले जाते, शॅम्पू, साबण चोपडला अन धुतला जातो. टॉवेलने खसखसा अंग पुसलेदेखील जाते. अशा आंघोळीनंतर मात्र एकदम प्रसन्न अन उत्साही वाटते. हातात अगदी डोंगर फोडायचे काम दिले तरी ते होवून जाईल असा उत्साह अंगी संचारतो. थंड पाण्याच्या तुलनेत गरम पाण्याची आंघोळ एक बुळा प्रकार आहे असे माझे प्रामाणीक मत आहे.

एक आठवण सांगतो. कॉलेजला असतांना आमचे होस्टेल हे थोडे गावाबाहेर होते. गरम पाण्याची काही सोय नव्हती तेथे. मग बाकीचे विद्यार्थी गरम पाण्यासाठी हीटरचा रॉड वगैरे घेवून सोय करायचे. मी मात्र उन्हाळा असो की हिवाळा, सकाळी साडेपाचच्या दरम्यान दोन तिन किलोमिटर पळायला जायचो. जॉगींग वगैरे प्रकार नव्हता तेव्हा. मी एकटाच पळून यायचो आणि अंग घामाने थबथबून जायचे. मग मी सरळ गार पाण्याच्या नळाखाली बसायचो. ज्यांना मी पळून येवून आंघोळ करतो आहे हे माहीत नव्हते ते आश्चर्यचकीत व्हायचे. इतर मुलांनी ब्रश देखील केलेला नसतांना मी मात्र सगळ्यात पहिला आंघोळ करून कपडे धुवून तयार झालेलो असायचो. आता मात्र अंग गरम पाण्याला सोकावलेले आहे. पण गार पाण्याची सवय शरीराला अजूनदेखील आहे हे गेल्याच आठवड्यात मी मध्य प्रदेशात गेलो असतांना जाणवले. तेथे हॉटेलवर सकाळी गरम पाणी मिळेल हे सांगितलेले होते. पण सकाळी नळाला गरम पाणी येत नव्हते. मग शेजारच्या रूममधल्या कुटूंबाला गरम पाण्याबाबत विचारले तर तेथेही गरम पाणी येत नसल्याचे समजले. मग मी सरळ रूममध्ये येवून नळाखाली बादलीत पाणी घेतले अन माझी गार पाण्याची लिटमस टेस्ट घेतली अन मी त्यात तेवढ्या थंड वातावरणात उत्तीर्ण झालो.

असलीच थंड पाण्याची आंघोळ हि कधीकधी बळजबरी करावी लागते. त्यातील एक हमखास वेळ म्हणजे लग्नाच्या वर्‍हाडाबरोबर किंवा एखाद्या ठिकाणी काही कार्यक्रमानिमीत्त सामूदायीकरित्या मुक्कामी जाणे. तेथल्या मुक्कामी सकाळी गरम पाणी अभावानेच मिळते. "असेल नशीबात तर आंघोळ होईल गरम पाण्यात" अशी परिस्थीती असते. सगळ्याच ठिकाणी मुक्कामासाठी हॉटेल नसते. यजमान ठेप ठेवणारा जरी असेल तरी कार्यस्थळी पाहूण्यांची गर्दी असल्यामुळे गरम पाणी तरी किती जणांना पुरेल असाही सामाजीक विचार मनात येतो. काही होतकरू अन अनूभवी मंडळी सगळ्यात आधी उठून आंघोळीला रांगा लावतात अन बाथरूम अडवून बसतात. आपल्याच कुटूंबाची आंघोळ आधी व्हावी हा स्वार्थी विचार प्रत्येक कुटूंबधारक करत असतो. मग त्यात सख्खे नातेवाईकही बाद होतात. लग्नात तर हमखास बाथरूम अडवणूक होते. मी अन माझी बायको-नवरा-मुले यांची आंघोळ आधी कशी होईल यातच प्रत्येक वर्‍हाडी गुंततो. लग्नातल्या महिलांना एकमेकींचा रुसवा करण्यास आंघोळ हे एक कारण भेटते. 'माझ्या नणंदेने बघा मला आंघोळ देखील आधी करू दिली नाही, साबण तर दिलाच नाही' असले रुसवे कुटूंबात रंगतात. वरमायची आंघोळ हा देखील एक प्रकार असतो. त्यातही रुसवे फुगवे घडतात. एकदा का सगळ्यांच्या आंघोळी झाल्या तर मग या रुसव्याची भरपाई नाष्ट्याच्या आग्रहाने होते. काही अनूभवी मंडळी गावातल्या इतर नातेवाईकांकडेच मुक्काम ठोकतात किंवा किमानपक्षी आंघोळीलातरी तेथे जातात.

एखाद्या निरर्गरम्य ठिकाणी सहल म्हणा किंवा आजच्या जमान्यातले विकएंड पर्यटन म्हणा किंवा देवदर्शन कम भटकंतीच्या निमीत्ताने आजकाल गाड्या भरभरून लोक पर्यटन करत आहेत. प्रवासाच्या सोई वेगवान अन पाहीजे तेथे उपलब्ध झाल्याने आजकाल जो तो उठतो अन शुक्रवार संध्याकाळ ते सोमवार पहाटपर्यंतच्या विकांतात  पर्यटनाचाचा विचार करतो आहे. अशा पर्यटन स्थळी किंवा धार्मीक स्थळी आंघोळ हे एक कार्य असते. काही ठिकाणी धार्मीक पर्यटन हे केवळ आंघोळ करवून घेण्यासाठीही आपल्याकडे प्रचलीत आहे. नर्मदेतले स्नान, गोदावरी- नाशकातले रामकूंडातले किंवा कुंभमेळ्यातले स्नान, अलाहाबाद - प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील किंवा त्रिवेणी संगम आदी ठिकाणावरील स्नान हे धार्मीक स्नानात मोडते. भारतात कोणत्याही नदीत स्नान केले तर गंगेत स्नान केले असे म्हटले जाते एवढे स्नानाचे महत्व आहे. एखाद्या धबधब्याखाली जावून अंग भिजवणे, रेन डान्स असलेले किंवा वॉटर पार्क मधले भिजणे हे हौशी पर्यटनाखाली मोडते. अगदीच झाले तर कोणत्याही स्विमींग पूल मध्ये पोहोण्याआधी अंग धुवावे लागते. झालेच तर काही हौशी व्यक्ती समुद्रस्नान किंवा मड बाथ किंवा सूर्यस्नान, किंवा पावसातले स्नान देखील करतात. काही ठिकाणी चॉकलेटचे स्नान किंवा देवादिकांची मध, दूधाने घातलेली आंघोळ आदी देखील प्रकार प्रचलीत आहेत. ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी किंवा रायगड येथील सुधागड येथील उन्हेरे येथे गरम पाण्याचे कुंड आहे. तेथे गंधक मिश्रीत पाण्याचे झरे वाहतात. तेथे केलेले स्नान हे वैद्यकीय दृष्ट्या त्वचारोगावर उपाय मानला जातो.
हॉस्पीटलातले रुग्णाला केलेले स्पंजींग देखील एक आंघोळीचाच प्रकार आहे.

दिवाळीतले अभ्यंगस्नान हा देखील एक वैविध्यपूर्ण प्रकार आपल्यात आहे. कार्तीक महिन्यातली थंडी अन त्या थंडीत सकाळी उठणे आणि उटणे, तेल लावून, मोती साबण लावून केलेले स्नान किती प्रसन्न असते. त्या आंघोळीला धार्मीकतेचा वारसा आहेच पण वैद्यकीयदृष्ट्याही अधिष्ठान आहे. बोचर्‍या थंडीत शरीराला तेलाने मर्दन केल्याने शरीरातील तेलाची कमतरता भरून निघते हा हेतू आपल्या पुर्वजांनी जाणला असावा आणि मग तशी आंघोळ करण्याची प्रथा पडली असावी. असले उटणे वगैरे लावून केलेली आंघोळ हि केवळ दिवाळीच्या एका दिवसापर्यंत मर्यादीत न राहता वर्षभर असावी असे मला वाटते. महिलावर्ग या उटण्याच्या आंघोळीला मुकतो हे मात्र खरे. महिलांवर कायमच अन्याय होत असल्याचे हे पाणीदार उदाहरण आहे. समस्त महिलावर्गाने आणि स्त्री मुक्तीवाल्यांनी केवळ महिलांसाठी असलेली एखादी आंघोळ शोधायला हरकत नाही. अर्थात भोगी, रथसप्तमी इत्यादी सणांना महिला नदीवर स्नान करण्यासाठी जातात. ती देखील एक मुहूर्ताची आंघोळच असते.

पुरानकाळापासून माणूस हा प्राणी आंघोळ करत असल्याचे पुरावे मिळतात. रोमन साम्राज्यातील किंवा हडप्पा, मोहोंजोदरो येथील स्नानगृहे, न्हाणीघर, तेथील पाणी वाहून नेण्याच्या जागा आदी पुरावे उत्खननात मिळालेले आहेत. प्रत्येक धर्मात स्नानाचे महत्व आहे. क्रिश्चन लोकांत बाप्तीस्मा घेण्याचे स्नान असो, मुस्लीमांतले शुक्रवारचे स्नान, आपल्या हिंदूमधले नद्यांमधले पवित्र स्नान, लग्नातले वधू वरांनी एकत्र केलेली सार्वजनीक आंघोळ, त्याच वधू वरांनी लग्नानंतर एकत्र केलेली खाजगीतली आंघोळ, लहान मुलांची आंघोळ, शेवटची आंघोळ, बादलीत पाणी घेवून केलेली आंघोळ, शॉवर खाली केलेली आंघोळ आदी अनेक प्रकार आंघोळीचे असतात. युरोप अमेरीकेत पूर्वी आंघोळीसाठी सार्वजनीक जागाही होत्या. तेथे सामुदायीकरित्या आंघोळ करत असत. हमाम में सब नंगे हि म्हण त्यातूनच उदयाला आली असावी. 

चित्रकारांनाही आंघोळ हा विषय चित्र काढण्यासाठी महत्वाचा वाटलेला आहे. अनेक चित्रकारांनी या आंघोळीच्या चित्रांमधे हात धुवून घेतलेला आहे. गोपीका नदीत स्नान करत आहेत अन श्रीकृष्ण त्यांचे कपडे चोरतो या विषयावर अनेक चित्र आहेत. जशी परिस्थीती आंघोळीच्या चित्रांमध्ये आहे तशीच परिस्थीती चित्रपटांमध्येही आहे. अनेक दिग्दर्शकांनी त्यांच्या चित्रपटातल्या नायिकांना चित्रपटात आंघोळीला बसवलेले आहे. ब्रम्हचारी चित्रपटातील यमुनाजळी खेळ खेळू यातील मिनाक्षी, राम तेली गंगा मैली मधली मंदाकीनी, किशन कन्हैया मधली राधा बीना है किशन अकेला म्हणणारी शिल्पा शिरोडकर कोण विसरेल? काही प्रसंगात तर नायीका भिजवण्यासाठी खास प्रसंग निर्माण केलेले आढळतील. पावसाचे कोणतेही वातावरण नसतांना चित्रपटात नायक नायीका पावसात भिजतात. ओढून ताणून ओलेत्या केलेल्या प्रसंगांना नायक नायीकांनी आक्षेप घेतलेला आढळत नाही. केवढे  हे आंघोळीविषयी प्रेम!

एकूणच परिपुर्ण आरोग्य आणि निकोप मनासाठी आंघोळ हे एक आद्य कर्त्यव्य आहे. ज्या दिवशी आंघोळ झाली नाही तो दिवस खराब जातो हे निश्चीत. मुंबईत  लोकलमधून प्रवास करून, घामाने न्हावून ( बघा, घामाने न्हाणे हे देखील आंघोळीतच गणले जाते!) घरी आल्यानंतर प्रथम आंघोळ होते. त्यानंतरच मंडळी कुटूंबाच्या प्रेमात न्हातात.   

दिवसाची सुरूवात आंघोळ करून प्रसन्न होते याचा अनूभव तुम्ही, आम्ही सर्वांनीच घेतलेला असेल. आंघोळीने शरीर धुतले जाते. त्वचेचे आजार आंघोळीने नष्ट होतात. आंघोळ केल्यानंतर प्रसन्न वाटते. उत्साह निर्माण होतो. पर्यायाने मनाचे आरोग्य राखले जाते.

ब्रह्ममुहूर्तावर हा लेख प्रकाशीत करून मी आजचे चंद्रग्रहण संपल्याच्या कारणास्तव एवढ्या थंडीत मस्त गरम पाण्याने आंघोळ करायला पळतो.

- पाषाणभेद
११/०१/२०२०

Monday, November 11, 2019

आंघोळ : एक कंटाळवाणी क्रिया

सदर लेख मिसळपाव.कॉम या संकेतस्थळाच्या दिपावळी २०१९ च्या दिवाळी अंकात छापला (हार्डकॉपी तसेच सॉप्टकॉपीत) गेला आहे.

(खालील लेख प्रचंड कंटाळवाण्या लेखकाचा अतिप्रचंड कंटाळवाणा आहे अन तो त्याने अगदी आळसात लिहिला आहे. लेख पूर्ण करण्यासही कित्येक दिवस - नव्हे, महिने लागलेले असल्याने तो आपणस कितपत रुचेल हे माहीत नसल्याने आपआपल्या जबाबदारीवर तो वाचावा. झोप येण्यासाठी वाचावयास उत्तम आहे. तरीही धीर करून वाचताना आळस आल्यास जिथल्या तिथेच थांबून एक आंघोळ करून यावी. किमानपक्षी तोंड धुऊन पुन्हा वाचनास बसावे. झालेच तर एक पाभेचा चहा मारावा. त्याही पुढे जाऊन वाचल्यास लेखाखाली प्रतिक्रिया देऊन आपण फारच सक्रिय आहोत असे सिद्ध करायच्या भानगडीत पडून नये. मस्तपैकी आळस करून लेखाला कचर्‍याची कुंडी दाखवावी किंवा ऑनलाइनच्या जमान्यातल्यासारखे 'इग्नोर' मारावे. लेख वाचून प्रचंड कंटाळा आल्यास याच लेखकाचा आंघोळ: एक उत्साहवर्धक क्रिया हा लेख वाचून आंघोळ करून ताजेतवाने व्हावे.)
आंघोळीचा मला फार तिटकारा आहे. अगदी आळसच म्हणा ना! फार म्हणजे फारच. लहानपणी मला बळजबरीने आंघोळ घालायचे. ते अगदीच लहानपणी असावे. शालेय वयात कित्येकदा मी आंघोळीची गोळी घेऊन शाळेत गेलो आहे. तसाही प्रत्येक बाबतीत आळस हा माझ्या अंगाअंगात मुरलेला आहे. आंघोळीचेच पाहा ना! ती पाणी गरम करायची प्रक्रिया करा.. इलेक्ट्रिक हीटरचे बटण दाबा.. मग गरम पाणी येईल याची वाट पाहा. गॅस हीटरची तीच तर्‍हा. पूर्वी तांब्याचे बंब असायचे गरम पाण्यासाठी. आता तांब्याचे म्हणजे पाणी पिण्यासाठी तांब्या असतो तो नाही, तर तांबा हा धातू असतो. तुमच्यापैकी कुणी ते पाहिले नसतील. खेडेगावात अजूनही दिसतील. आताशा ते बंब गॅल्वनाइज पत्र्याचे असतात. पूर्वी ते तांब्याच्या धातूचे असायचे. एक दोन-अडीच फुटी उंचीचा अन दीड-पावणेदोन फुटी व्यासाचा तांब्याच्या पत्र्याचा दंडगोल असायचा अन मध्ये एक नळकांडे असायचे. खाली जाळी अन वरती झाकण असायचे. हा संच एका तिवईवर ठेवलेला असायचा. त्यात वरतून थंड पाणी घालण्याची सोय असायची अन खाली नळातून गरम पाणी बाहेर काढता यायचे. मधल्या पोकळ नळकांड्यात वरतून लाकडे टाकायची अन खालून ते पेटवायची, असा प्रकार असायचा.
हे बंब प्रकरण प्रचंड म्हणजे प्रचंड कंटाळवाणे काम असायचे. नळकांड्याच्या आत जाणारी लाकडे फोडून ठेवा.. ती लाकडे ज्याला बंबफोड म्हणत ते महिन्याच्या हिशोबाने वखारीतून आणा.. त्याचा साठा करा.. सकाळी उठून बंब पेटवा.. सगळ्यांच्या आंघोळी होईतो त्यात वेळोवेळी लाकडे अन थंड पाणी टाकत बसा.. गरम पाणी काढा.. राख काढा.. नसते उपद्व्याप. त्यापेक्षा मस्तपैकी आंघोळ न करता राहिलेले किती उत्तम! नको ती गरम पाण्यासाठी एवढी मरमर अन नको ती आंघोळ. मी तर कित्येक सकाळी अशा न-अंघोळीच्या घातलेल्या आहेत.* (*वाचकहो, हे वाक्य तीन-चार प्रकारे लिहिले होते. पण पुरोगामी टच असल्याचे हे योग्य वाटले आणि हेच कायम ठेवले.)
.
हे झाले बंबाच्या बाबतीत. बंब नसल्यास एका भांड्यात पाणी घेऊन ते पाणी गॅसवर तापवावे लागते.. बादलीतून बाहेरून गार पाणी प्रथम आणायचे.. ते त्या भांड्यात ओतायचे.. मग तापलेले पाणी परत बादलीत घेऊन ती बादली मोरीत नेऊन अंघोळ करायची.. किती ते उपद्व्याप! त्यातल्या त्यात सोलर असेल तर ठीक असते. पण गॅस हीटर असो, सोलर हीटर असो किंवा इलेक्ट्रिकल हीटर असो, त्रास हा असतोच. एक नळ चालू करून ते गरम केलेले पाणी बादलीत काढा अन दुसरा थंड पाण्याचा नळ चालू करून आधीचे गरम पाणी कोमट करण्यासाठी त्यात थंड पाणी मिसळा. त्यासाठी गरम अन थंड पाण्याचे कॉक चालू करावे लागतात. असे दोन दोन नळ - एक गरम पाण्यासाठी अन एक थंड पाण्यासाठी सुरू करावे लागतात. कित्ती कित्ती कंटाळवाणे काम आहे की हा नळ गरम पाण्याचा अन हा थंड पाण्याचा हे लक्षात ठेवणे?* (*मटा - गूगल ट्रान्सलेशन मेथड.) अन त्यातही एक नळ घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने अन दुसरा नळ घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने फिरवावा लागतो. म्हणजे ते कंटाळवाणे कामही लक्षात ठेवा. परत गरम पाणी खूपच गरम असेल तर त्यात हात घालून किती गरम आहे ते पाहावे लागते. पुन्हा त्यात उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या ऋतूप्रमाणे गरमपणाचे प्रमाण कमी जास्त असते. त्या पाण्यात आपल्याला सोसवेल असे थंड पाणी योग्य प्रमाणात मिसळणे खूपच कंटाळवाणे काम आहे.
हे झाले बादलीत पाणी काढण्याबद्दल. शॉवरसाठी हीच क्रिया जास्त कंटाळवाणी होते. न भिजता शॉवरच्या बाहेर राहून दोन्ही नळ योग्य त्या प्रमाणात फिरवायचे. नंतर योग्य तापमानाचे गरम अथवा गार-कोमट पाणी येईपर्यंत वाट पाहायची. सकाळी सकाळी खरोखर कंटाळवाणे काम आहे हे. एवढे केल्यानंतर आपल्याला आंघोळीसाठी कामगारांच्या भाषेतल्यासारखी 'चाल' भेटते. तुम्ही म्हणाल की आता बाजारात पाण्याचे तापमान दाखवणारे नळ आले आहेत ते. अहो, पण त्याचे तापमान आधी सेट करावेच लागेल ना? अन निरनिराळ्या ऋतूसाठी निरनिराळे तापमान कसे लक्षात ठेवायचे? आजकाल हवामान इतके बेभरवशाचे झाले आहे की एका दिवशी थंडी, दुसर्‍या दिवशी पाऊस अन तिसर्‍या दिवशी कडकडीत उनही पडते. एवढे कष्ट आंघोळीसाठीच्या पाण्यासाठी घ्यायचे फारच कंटाळवाणे काम आहे.
आता तुमचे (म्हणजे माझ्यासाठीचेच. शास्त्र असते ते म्हणण्याचे.) योग्य तापमानाचे पाणी काढून झाले तर मग प्रत्यक्ष आंघोळीला बसावे लागते. हे आंघोळीला बसणे फारच कंटाळवाणे काम आहे. त्यापेक्षा शॉवरखाली उभे राहणे हे एकदम सोपे आहे. पण शॉवरखाली उभे राहिले अन अंघोळीदरम्यान साबण हातातून सटकला, तर तो उचलायला खाली वाकणे खूपच कंटाळवाणे काम असते. साबण जर लांब घरंगळत गेलेला असला, तर तेथपर्यंत जाणे हे फरशीवरून सटकण्यालाही कारणीभूत ठरत असते. त्यामुळे मनात ती धाकधूक असते. जरी डोके धुवायचे नसेल तरी पंचवीस टक्के डोके या शॉवरमुळे भिजतेच भिजते. मग ते आणखी जास्त टक्के डोके भिजणार नाही याची काळजी घेत आंघोळ करावी लागते. त्यापेक्षा पाटावर बसून व बादलीत पाणी घेऊन केलेली आंघोळ परवडते. शॉवरखाली आंघोळ ही जास्त जागरूक राहून करावी लागते अन पाटावर बसून केलेली आंघोळ जास्त आळशीपणात होते, हे माझे निरीक्षण आहे. बसून आंघोळ करण्यात साबण सटकला तर जास्त लांबवर घरंगळत नाही. आपल्या शरीराच्या परीघातच तो पडतो अन त्यामुळे चेहर्‍याला साबण फासला असतानाही अंदाजाने चाचपडत हाताने शोधता येतो. बसून केलेल्या आंघोळीमध्ये डोके ओले करायचे नसल्यास शंभर टक्के आपण त्यात यशस्वी होतो, हा मोठा फायदा आहे. डोके ओले न केल्याने पुढे आंघोळ संपल्यानंतर ते पुसण्याचा प्रश्नच येत नाही. वाचलेला वेळ इतर आळशीपणात घालवता येतो. तसेही डोके धुवायचे असल्यास शॅम्पू, कंडीशनर वगैरेच्या पुड्या ओल्या हातांनी कशा फाडायच्या? हा मोठाच प्रश्न असतो. कारण आंघोळीच्या सुरूवातीला आळशीपणा होत असल्याने त्या पुड्या कातरीने न कापण्याचा आळशीपणा या वेळेपर्यंत नडतो. मग दातांनी त्या पुड्या फाडाव्या लागतात. बसून आंघोळ केल्यास त्या पुड्या वेळेवर हाताशी, किमानपक्षी पायाशी येतात हा मोठा फायदाच आहे. आंघोळीचा आणखी एक प्रकार म्हणजे टब बाथ. सर्वसामान्यांना याचा लाभ होत नाही, पण मग एखाद्या हॉटेलातल्या मुक्कामी याची चव बर्‍याच जणांनी चाखलेली असते. हा स्नानाचा एकदम शाही अन एकदम आळशी प्रकार आहे. पूर्ण टब पाण्याने भरून घ्यायचा. मग त्या पाण्यात शिरायचे. गुलाबाच्या पाकळ्या, साबणाचा फेस, जोडीने आंघोळ आदी सिनेमातल्यासारखे प्रकार तुमच्या डोळ्यासमोर आलेही असतील.
.
आंघोळ एकदाची संपल्यास पाटावरून उठावे लागते किंवा शॉवरच्या बाहेर यावे लागते. मग टॉवेल शोधणे, अंग, डोके पुसणे इत्यादी क्रिया कराव्या लागतात. परदेशात ( म्हणजे अमेरिका हं) आतापर्यंत वॉशिंग मशीनमध्ये कपडे सुकवण्यासाठी जसा ड्रायर असतो, तसा माणूस सुकवण्याचा ड्रायर वापरातही आला असावा. मला हे परदेश म्हणजे अमेरिका, नॉर्वे, स्वीडन, कॅनडा, इंग्लंड आदी उत्तर गोलार्धातील देश फार आवडतात. तेथील थंड हवामानामुळे आंघोळीची गरज नसणे अन आंघोळ न करता आठवडेच्या आठवडे तसेच राहणे किती आनंददायक असू शकते, हे तेथे राहिल्यावरच समजेल.
अशी आंघोळ एकदाची पार पडल्यावर कोरडी अंतर्वस्त्रे परिधान करणे हा एक उपद्व्यापच असतो. अंडरपँटमध्ये पाय घालण्यासाठी एक पाय ओल्या फरशीवर - लादीवर असतो अन एक पाय आधांतरी हवेत असतो. दोन हातातली उघडी अंडरपँट तोंडाचा आ करून पायाचा घास घेण्याच्या तयारीत असते. या वेळी हटकून ओला पाय त्या पँटच्या कापडावर घासला जातो अन ती पँट ओली होते. त्यामुळे पाय लवकर त्यात जात नाही. बाथरूमध्ये शेकडा ६७.८९%* घसरून पडण्याचे प्रकार याच वेळेस होतात. (*अशी आकडेवारी लिहिल्यास अन त्यातही शेकडा, टक्केवारी आकडे वापरल्यास लेखक किती शास्त्रीय विचारसरणीचा आहे यावर वाचकांचा विश्वास बसतो. हे रहस्य मी तुम्हाला आपले जवळचे संबंध आहेत म्हणून सांगितले आहे. इतर कुणाला सांगू नका.)
आंघोळ झाल्यानंतर बाहेर येऊन इतर कपडे घालणे हे एक काम असते. ते आटोपल्यानंतर केस सुकवणे बाकी असते. आळस हा माझा मित्र असल्याने मी जास्त केस ओलेच करत नाही. मग ते कोरडे करणे आठवड्याच्या हिशोबाच्या मानाने कमी होते. तरीही आंघोळ केल्यानंतर किमान केस विंचरावे तर लागतातच. तेल लावणे होत असल्यास हात तेलकट होतात अन मग ते तेलकट हात हँडवॉशने किंवा साबणाने पुन्हा धुवावे लागतात. ते झाल्यानंतर पावडर लावणे, बॉडी डिओ मारणे करावे लागते. ते एक वाढीव काम असते. महिलांच्या बाबतीत नटणे, सजणे आदी प्रकार असल्याने त्याला वेळेचे बंधन नसते.
आपल्याला (की दुसर्‍याला?) कोणता सुवास आवडतो त्या सुवासाची पावडर, डिओ दुकानात जाऊन निवडणे हे आंघोळीच्या अनुषंगाने येणारे कंटाळवाणे काम आहे. साबण निवडतानाही तसेच होते. किती ते साबण, त्याचे प्रकार अन सुगंध! माणूस वेडाच होईल निवडताना. उत्तर कोरियातल्या किम जाँग सरकारने तेथल्या सर्वसामान्य नागरिकांना एकाच रंगाचे - शक्यतो राखाडी रंगाचे अन एकाच प्रकाराचे शर्ट-पँट शिवायची परवानगी दिली आहे. मोदी सरकारनेही या साबण, पावडर अन डिओ-सुगंध तयार करणार्‍या कंपन्यांवर असले निर्बंध येथे लादायला हवे. एकाच आकार, प्रकार अन सुगंधातील साबण, पावडर, शॅम्पू, डिओ तयार करण्याची परवानगी सरकारने द्यायला हवी. त्यातून कितीतरी माणसांचे अन स्त्रियांचे मानवी तास/ वेळ या उत्पादनाच्या निवडण्याच्या वेळेतून वाचतील. नागरिक स्वच्छ भारत अभियानात या वाचलेल्या वेळेचा सदुपयोग करतील. तसेही आंघोळ करणे हे ही स्वच्छ भारतमध्येच गणले गेले पाहिजे. म्हणजे मोदी सरकारच्या अशा आकडेवारीत आणखी भर पडेल अन सरकार या उपक्रमाचे फुगवलेले आकडे ते आणखी फुगवू शकतील.
हे असले आंघोळीदरम्यानचे वेळखाऊ, कंटाळवाणे प्रकार करण्यापेक्षा आंघोळ न करता दिवसच्या दिवस आळशीपणात घालवणे हा एक उत्तम उपाय आहे, असे माझे ठाम मत आहे. आंघोळ न करण्यामुळे पाणी वाचवले जाऊन पर्यावरणाच्या संवर्धनास आपण एक प्रकारे मदतच करत असतो.

Sunday, June 23, 2019

पथनाट्य: बचत पाण्याची, समृद्धी जीवनाची!


पथनाट्य: बचत पाण्याची, समृद्धी जीवनाची!


कलाकारः सुत्रधार आणि दोन सहकारी कलाकार (दोघांकडे एक एक वाद्य असेल तर उत्तम.)
(शक्य असल्यास पथनाट्य सादरीकरणाआधी स्थानिक जनतेच्या अवलोकनार्थ, वातावरण निर्मीतीसाठी पाण्याच्या अपव्ययाचे, दुष्काळाचे प्रातिनिधीक छायाचित्रे असलेला फलक लावावा.)

एक सहकारी कलाकार (पाणीवाल्याच्या भुमिकेत ): पाणी घ्या पाणी, पाणी घ्या पाणी!

दुसरा सहकारी (स्त्री भुमिकेत): अरे ए पाणीवाल्या कसे दिले पाणी?

पाणीवाला: शंभर रुपयाचा एक ग्लास पाणी, पाणी घ्या पाणी.

स्त्री:
काय! शंभर रुपयाला एक ग्लास!
अरे बाबा काल तर होते स्वस्त, आज लाव थोडे रास्त.
काल होता ग्लास नव्वदला!
आज अचानक का भाव वाढवला?

पाणीवाला:
बाई, अहो आज मोठ्या मार्केटमध्ये
पाण्याचे टँकर आले होते कमी.
आम्ही तर साधे पाणीविक्रेते,
आम्हाला स्वस्त मिळण्याची कसली हमी?
हे पाणी विकून तुम्हाला
पोटाला मिळायला पाहीजे आम्हाला.

स्त्री:
बरं बरं बाबा दे
चारच ग्लास पाणी दे.
आज कसेतरी घेवू धकवून.
पण उद्या नक्की ये.

सुत्रधार: मंडळी तुम्ही आम्ही पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आताच विकत घेतो. पण ते प्रवास करतांना, बाहेर जातांना. पाण्याची अशीच परिस्थीती असेल तर भविष्यात दररोजच्या वापराचेही पाणी आपल्याला ग्लासच्या मापात अन भाजीसारखे विकत घ्यायला लागेल हे सत्य आहे.

आता मंडळी या बातम्या ऐका.
ए गोंद्या वाच जरा या बातम्या.

(सहकारी कलाकार बातम्या वाचतो)
पाण्यासाठी दोन गावात मारामारी.
जिल्ह्यात पाण्याचे टँकरांची शंभरी गाठली.
पिण्याच्या पाण्यासाठी धरणाचे दरवाजे बळजबरी उघडले.
दुष्काळामुळे गावकर्‍यांचे शहराकडे रोजगाराठी स्थलांतर.
गावात पाण्याचे नळ नसल्याने मुलांची लग्ने होत नाहीत.
गावात पाण्याचे स्त्रोत आटले, विहीरी आटल्या.
५ किमीवरून पाणी आणण्यात महिलांचा दिवस जातो.
३०० लिटर पाणी चोरीची तक्रार पोलीसठाण्यात दाखल.


सुत्रधार: तर मंडळी, या अन अशा बातम्या आपण रोज वाचतो. वाचतो की नाही?
सहकारी (एका सुरात): हो वाचतो
सुत्रधार: रोज टिव्ही वर पाहतो.
सहकारी (एका सुरात): हो पाहतो.
सुत्रधार: दररोज वाचता, दररोज पाहता मग यातून काही बोध घेता का?
सहकारी (एका सुरात): नाही.


सुत्रधार: बघा मंडळी, पाण्याच्या बाबतीत किती उदासीनता आपण बाळगून असतो.

(माडीवरच्या इमारतीतून एक बाई गीत गात गात खाली अंगणात सडा मारत आहे. )

{गीत}

चला बाई सकाळ झाली चला सडा मारू
सडा मारून रस्ता साफ करू ॥ध्रू॥ 

किती छान आहे अंगण, सड्या विणा का राहू द्यावे कोरडे?
दररोज सडा मारून सुंदर दिसते माझे अंगण पहा हे गडे
मोठ्ठी रांगोळी काढून रंग त्यात चला आता भरू 
चला बाई सकाळ झाली चला सडा मारू ॥१॥

{बाईंचे गाणे संपते.} 

सहकारी एक: अहो या बाई पहा. राहतात वरच्या मजल्यावर अन वरून सडा मारतात खालच्या रत्यावर.

(एक माणूस गाणे गुणगुणत नळाच्या पाण्याने गाडी धुवत आहे) 

{गीत}
धुवां धुवां धुवां धुवां
कैसा है ये धुवां
प्यार कीआग तुने लगाई
और उठा है यह धुवां

{चाल बदलून}
धुवा धुवा धुवा धुवा
आपली गाडी मस्तपैकी धुवा
कसली आग अन कसले काय
पाणी आले नळाला आपले काय जाय
मग 
धुवा धुवा धुवा धुवा
धुवा धुवा धुवा धुवा


सहकारी दोन: हे गृहस्थ पहा, गाडी सरळ नळाच्या पाण्याला नळी लावून धुवत आहेत.
सहकारी एक: अन या बाई पहा. दररोज सकाळ संध्याकाळ घरासमोरील अंगण धुतात. स्वच्छता पाहीजे त्यांना.
सहकारी दोन: या मावशी पहा, किती तरी पाणी कपडे धुण्यासाठी चुकीचे वापरत आहेत.
सहकारी एक: ते भाऊ पहा, सरळ नदीतच त्यांची जनावरे धुवत आहेत.


सुत्रधार: मंडळी, असे पाणी वाया घालवू नका. पाणी महत्वाचे नैसर्गीक वरदान आहे. सर्व सजीवांना पाण्याची आवश्यकता आहे. जितका मानवाचा पाण्यावर हक्क आहे तितकाच हक्क इतर सजीवांचा पाण्यावर आहे. कित्येक विकसनशील देशांत जनावरे जे पाणी पितात तेच पाणी तेथल्या नागरीकांना नाईलाजाने प्यावे लागत आहे. त्याने तेथील रोगराईदेखील वाढली आहे.


सहकारी एक: पाणी जपुन वापरा, पिण्याचे पाणी इतर कामासाठी वापरू नका.
सहकारी दोन: सडा मारू नका. वाहन कमी पाण्यात धुवा. धुणी भांडी स्वच्छ करतांना पाणी कमी वापरा.
सहकारी एक: नळाच्या तोट्या बंद करा. पाणी वाया जावू देवू नका.
सहकारी दोन: पावसाचे पाणी अडवा, जिरवा. तरच पाण्याची समृद्धी येईल.
सहकारी एक: बचत पाण्याची, समृद्धी जीवनाची!


सुत्रधार: चला मित्रांनो, आज आपण पाणी बचतीचा संकल्प करू. आपल्या मुलाबाळांच्या पुढच्या पिढीसाठी पाणी राखून ठेवू.


(सुत्रधार अन सहकारी रांगेत हात जोडून उभे राहतात अन गीत गातात)

नका वाया घालवू पाणी
वाया घालवाल तर होईल पाणीबाणी || धृ||

नका मारू सडा
होईल राडा रोडा
नका पाणी फेकू
नका शिळे पाणी टाकू
नका धुवू घोडा अन गाडी
तसे केले तर होईल पाणीबाणी||११||

पाणी शिळे होत नसते
पाणी वरदान असते
पाणी जीवन अनमोल
तुम्ही जाणा त्याचे मोल
ऐका तुम्ही पाषाणाची वाणी
वाया घालवाल तर होईल पाणीबाणी ||२||

- पाषाणभेद
२३/०६/२०१९

Sunday, April 29, 2012

पानी आनाया जावू कशी

पानी आनाया जावू कशी

हांडा घेतला बादली घेतली घेतली ग बाई मी कळशी
पन पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||धृ||

दुसरी स्त्री: का गं आसं काय म्हनतीया?

आगं विहीर कोरडी, हापसा तुटका
नाला भाकड, नदी सुकी ग बाई नदी सुकी
मग पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||१||

दरवर्शाची ही रडगानी पावसाळ्यात म्होप पानी
हिवाळा सरता अंगावर काटा पान्यासाठी लई बोभाटा
प्यायाला नाही पानी आन कशी करावी सांगा शेती
मग पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||२||

दिस सारा पान्यात जायी त्याच्यासाठी सारी घाई
दोन मैल गेल्याबिगर पानी काही दिसत न्हाई
चार्‍यापायी गाय गेली, गोर्‍ह्याला कशी टाकू ग पेंढी
मग पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||३||

बायकांचं जीनं आबरूचं कोनी नाही तिला वाली ग
बकरू मोठं केलं अन विकलं जसं खाटकाला ग
दुश्काळानं मढं केलं उपेग काय घेवून फाशी
मी पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||४||

- पाषाणभेद

Saturday, March 17, 2012

काशीबाई काशीबाई

काशीबाई काशीबाई

काशीबाई काशीबाई तुमच्या साडीचा कसोटा घट्ट खोचा
वारा येईल भसाभसा तर होईल मोठा लोचा ||धृ||

अशी कशी हो तुम्ही नेहमीच करता घाई
कामावर यायची उगाच करता नवलाई
भांडी निट घासा नाहीतर आणाल त्यांना पोचा ||१||

तुम्ही सांगून बोलून रजा घेत जा हो
न सांगता दांडी मारू नका हो
निट मी सांगते नका असे भांडू कचाकचा ||२||

नगरसेवक पुतण्या अन हवालदार तुमचा भाचा
तालेवार व्याही असून एक नाही काही कामाचा
सोन्याचा चमचा त्यांच्या तोंडी तुम्हां सांगती गौर्‍या वेचा ||३||

बरं जावूद्या शेजारीण काय बोलली ते जरा सांगा
चुगलखोर कळलावी मेली घेतेय माझ्याशी पंगा
बोलणं आपलं दोघींचं काय झालं सांगू नका वचावचा ||४||

- पाषाणभेद

Tuesday, March 6, 2012

ताप नको देवू माझ्या डोक्याला

ताप नको देवू माझ्या डोक्याला

ताप नको देवू माझ्या डोक्याला
काय करायचं ते जा कर तूला

आधीच मी रात्रपाळी करतो
घाम गाळून मी थकून जातो
दिवसातरी लागूदे डोळा डोळ्याला
ताप नको देवू माझ्या डोक्याला

कधी तू सांगते आणा तुम्ही भाजी
निट बघून आणा ताजी ताजी
गोड हसून फसवी भाजीवाली मला
ताप नको देवू माझ्या डोक्याला

घरात करतात फार गलका पोरं
खायला उठतं मग घर सारं
जरा पाठव त्यांना आता शाळेला
ताप नको देवू माझ्या डोक्याला

ह्या हप्त्यामधे झाला नाही पगार
किराणा आण सारा तू उधार
पैसे नंतर देईन जा सांग वाण्याला
ताप नको देवू माझ्या डोक्याला

महागाईने फार कमाल केली
गरीबाची भाकरी पळवीली
काय म्हणावे पाषाणाच्या नशिबाला
ताप नको देवू माझ्या डोक्याला

काम करून कावला जीव
तुला जरा तरी येवू दे कीव
संधी साधून जवळ ये दिवसाला
ताप नको देवू माझ्या डोक्याला

- आळशी पाभे

Monday, January 23, 2012

काय सैपाक काय करू मी बाई

काय सैपाक काय करू मी बाई


घरधनी उठलं सकाळी रामपारी
उसतोडीची आमी केली तैयारी
न्यारी डब्यासाठी आंग खंगाळूनी
चुल पेटवली पाचट काड्या पेटवूनी
हाताशी पोळपाट परात घेवूनी
जाळ केला चुलीवर तवाठेवूनी
धुर डोळ्यात जाई फुकनीनं फुकूनी
पाण्याचा तांब्या शेजारी ठेवूनी
भाईर धन्यानं गाडी केली बैलं जुपूनी
ठेवला विळा कोयता दोर कळशीत पाणी
"घाई कर" म्हनं पोराला उठवूनी
रडत उठलं पोरं...रट्टा दिला ठिवूनी
सारी तयारी झाली झालं त्यांचं आवरूनी
चला उठा निघायचं हाळी आली शेजारूनी
पिठाचा डबा घेई हाती करूनी घाई 
पाहते तर डब्यामधी बाजरीचं पिठच नाही


ऐन वक्ताला काय करावं सुधरंना
बावरली मी खायाला काय नाहीना
त्याच येळेला शेजारीन आली धावूनी
एक शेर उसनं पिठ घेई तिच्या कडूनी
बडवल्या भाकर्‍या उलट्यापालट्या करूनी
पिठलं टाकलं ठेचा केला मिरच्या भाजूनी
घाईतच डबा झाला भाकर्‍या फडक्यात बांधूनी
कपाळी कुकू लावूनी आली झोपड्यातूनी
निघालो सम्दी सारी बैलगाडीतूनी
घरधनी म्हणे "येळ का ग येवढा होई"
सांगीतलं त्याला खरं खोटं बोलले नाही
आवो डब्यामधी बाजरीचं पिठच नाही


आग येडी का खुळी तू हाई
मला सारं कालच व्हतं म्हाईत
सकाळीच शेजारी मीच गेलो पहिलं
शेजारणीला संसाराच रडगाणं सांगीतलं 
तिच्याकडं हिच होती परिस्थिती सारखी
तरी बी तीच म्हणे पिठ देते चटदिशी
म्हणून तीच आली बघ तुझ्याकडं धावूनं
पिठ दिलं भाकर्‍यांसाठी तुझी काळजी पाहूनं
"चला तुम्ही म्हणजे लईच हाईसा" म्या बोलली लाजून
संसाराची काळजी तुम्हालाबी हाये आलं मला समजून
फाटक्या संसाराची विटक्या लुगड्याची लाज मला नाही
उद्याला तिचं तिचं पिठं तिला देवून देई
तिच्याकडं बी कधी पिठं नसतं तेव्हा मी पिठं देई
ती बी कधी मधी तेल मिरच्या पिठं घेवूनी जाई
तिच्या डब्यामधीबी बाजरीचं पिठ राहत नाही


- पाभे

Saturday, September 24, 2011

अशी कशी ही म्हागाई

अशी कशी ही म्हागाई

अशी कशी ही म्हागाई वाढ वाढ वाढली
माझ्या खर्चाची झोळी हिनं फाडली ||धृ||

नका डाळ तुम्ही म्हणू; नका तांदूळ तुम्ही म्हणू
गहू जोंधळं झालं आहे सोनं जणू;
पाहून बाजरीचे भाव मी पिशवी खुंटीला टांगली ||१||

दह्या दुधाचे भाव कसे वाढता वाढं; शेरभर ताकालाबी धा रूपये लागं
पोरं झालीत वाळून बारीक रोड;
पामतेल डालातुपाविना देवू कशी भाजीला फोडणी? ||२||

राकेल गॅस प्रेटोल डिझल; याबीगर चाक कसं चालंल?
ऐश्टी गाडीबी पैशाविना हालंना;
पेशल रिक्षा कशी करावी? साध्या प्रवासाची सोय नाय आता राह्यली ||३||

संसाराचा कसा ओढावा गाडा; घरखर्च रोज घाली राडा
पगारात मालक घाली खोडा;
अवशीधपान्याविना तब्बेत चांगली नाही राह्यली ||४||

कुनी यावर उपाय सांगा राव; या तेजीचा कमी करा कुनी भाव
आमी गरीब आहो नाही कुनी साव;
रोज सस्ताईची किंमत कमी होत चालली ||५||

तर्‍हा येगळीच बघा शिक्शनाची; शाळा झेडपीची बरी हाय पोरांची
आस तिथं खिचडी मिळण्याची;
चांगली विंग्रजी शाळा पोरांनी नाय कधी पाह्यली ||६||

{{ सांगा कसं जगावं आमी ऐटीत; आडवं केलं म्हागाईनं एका फायटीत
यंदा पोराचं लगीन करावं म्हनतो; दोन इंजीनानं गाडी वढावी म्हनतो
सांगा एखांद्या स्थळी
आय.टी.वाली पोरगी आसल तर चांगली ||७|| }}

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२४/०९/२०११

Sunday, September 4, 2011

लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी

लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी

किती दिस झालं, आठवंना सालं
गोष्ट सांगतो मी खरीखुरी;
लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी ||धृ||

हि असली कसली चढती महागाई
वाढत्या भावानं जीव निघून जाई
पहिल्या आठवड्यात पगार संपतो
बँक खाते अन खिसा रिकामा होतो
पैसा जावून मी जणू होतो भिकारी
लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी ||१||

ह्या भाववाढीनं डोकं वर काढलं
महागाईनं आगीत तेल टाकलं
पेट्रोल सत्तर रूपये लिटर झालं
गरीबीत दिवस काढणं आलं
उसनवारी करावी लागती दारोदारी
लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी ||२||

चांगलचुंगलं पोटात आता जाईना
पोरासोरांची हौस करता येईना
बायकोला सांगावं तरी काय?
गेला माझाच फाटक्यात पाय
अशीच स्थिती आहे शेजारीपाजारी
लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी ||३||

महिन्याला पडतं कोनी आजारी
आठवड्याला येती पैपाव्हनं घरी
कमाईला माझे दोन हातं राहती
खायला रावनाचे दहा तोंडं असती
रिकाम्या खिशानं कसा जावू बाजारी
लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी ||४||

करता येत नाही वरकमाई मला
नाही कसला जोडधंदा करायला
कामगाराची नोकरी करतो मी आता
नाही सहावा वेतन आयोग, महागाई भत्ता
रातंदिस करावी लागे कंपनीत रोजंदारी
लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी ||५||

आसं वाटतं व्हावं आपन पुढारी
नाहीतर व्हावं गुंड अन मवाली
त्यांची जात असते लई माजोरी
जनतेचं पैसं खावून करती शिरजोरी
पर गरीबाला नाही कोणी वाली
त्याचं होत नाही कोणी कैवारी
म्हनून मी रोज अंथरून पाहून पाय पसरी
लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी ||६||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२३/०५/२०११

Friday, September 2, 2011

अंतर्वस्त्रे परिधान करण्याची योग्य रीत

आता केवळ 'अंतर्वस्त्रे' (अंडरविअर) हा शब्द या धाग्यात आहे म्हणून नाक मुरडू नका. 'अंतर्वस्त्रे' म्हणजे जे बाहेरील कपड्यांच्या आतच घालतो तशीच वस्त्र हे लक्षात घ्या अन पुढे वाचा.

आता ही अंतर्वस्त्रे' किंवा अंडरविअर (उदा. बनियन) आपण शर्ट किंवा पँटच्या आत आपण घालतो. त्या अंतर्वस्त्रांवर (बनियनवर) एक लेबल त्या त्या कंपनीने लावलेले असते. ती त्यांची जाहीरात असते अन त्यावर त्या बनियन च्या मापाचा एक नंबर लिहीलेला असतो. तो साधारणता: इंचात असतो. म्हणजे ज्याची छाती २८ इंचाची असते त्याला २८ नंबरचा बनियन फिट होतो. (फिट्ट नाही तर फिट म्हणजे योग्य मापात बसतो).
तर आपले लेबल. हे लेबल आजकाल सिन्थेटीक धाग्यातले येते किंवा बनीयनच्याच कापडाचे ते नसते. तुम्ही जर ते लेबलचे अंडरविअर (बनियन) अंगात घातले तर ते सेन्सीटीव्ह त्वचा असणार्‍याला रूतते. हे कधी कोणाच्या लक्षात आले नसेल पण आता त्याकडे निट लक्ष द्या म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. उन्हाळ्यात घामाची पहीली धार मानेच्या त्याच भागातून खाली जात असल्याचे तुमच्या लक्षात येईल.




काही शर्टच्या कॉलरच्या आतल्या बाजूलाही टेलरचे नाव असलेले लेबल असते. ते सुद्धा असेच रुतते किंवा त्या भागात खाजवावे लागते. नविन शर्ट किंवा अंडरविअर असल्यास तेथे जास्तच लागते.
हा झाला मुद्दा क्रमांक १.


आता मुद्दा क्रमांक २. बनियन जर सँन्डो असेल तर त्याचे वरचे दोन निमूळते भाग गळ्याजवळील भागाजवळ जुळलेले असतात. अन बाहीचे असेल तर त्याचा गळा शिलाईने शिवलेला असतो. तेथे शिलाई मारलेली असल्याने तेथील भाग जास्त फुगीर असतो. आता तो कुणाला रुतत वैगेरे नाही. अंतर्वस्त्रांचे (बनियनचे) काम शरीराला आलेला घाम शोषून घेणे हा असतो. अन ते शर्ट-पँटच्या आत असते. त्यामुळे ते सुलट घातले काय किंवा उलट घातले काय काही फरक पडत नाही.
पण त्यावर असलेले लेबल मानेला रूतू नये म्हणून व बाह्यांचे बनियन असेल तर गळ्याला अन काखांना त्याची शिलाई रूतू नये म्हणून ते अंतर्वस्त्र (किंवा बनियन) हे उलटे (म्हणजे शिलाई किंवा ते लेबल बाहेर असलेले ) घातले पाहीजे असे माझे मत आहे.

आता शर्टतर उलटा घालू शकत नाही, म्हणून त्याचे कॉलरचे लेबल अन बनियनचे लेबल आपण नक्कीच फाडू शकतो.

तर मित्रांनो, घ्या कात्री अन फाडून टाका अंडरविअर अन कॉलरचे लेबल, अन बघा तो किती 'आराम का मामला' होतो ते.

Friday, May 20, 2011

महागाईगीत: कसली भाजी करू मी आज

महागाईगीत: कसली भाजी करू मी आज

अहो काही सुचेना मला रोजरोज
कसली भाजी करू मी आज ||धृ||

दोडके गिलके भेंडी मटार
शेवगा भोपळा वाल गवार
सार्‍यांनीच मार्केटात संप केला आज
कसली भाजी करू मी आज ||१||

बटाटे आणले सगळेच संपले
फ्रिजमध्ये टोमॅटो काहीच न उरले
काय! चिकन करू म्हणता ताजं?
कसली भाजी करू मी पतिराज ||२||

८० रुपये किलो आहे तुरदाळ
असलीच महाग झाली मुगदाळ
महागाईने केला कसला हा माज
कसली भाजी करू मी आज ||३||

साखरेची तसलीच गत झाली
तेलातुपाविना रयाच गेली
खिर पुरी खाऊन झालेत फार दिवस
कसली भाजी करू मी आज ||४||

काय करू मी आज सैपाकाला
भाजी नाही आज डबा करायला
रोजचीच कटकट झाली आहे मज
कसली भाजी करू मी आज ||५||

गहू तांदूळाने केली फार दैना
एका पगारात कसा काढावा महिना
काहीतरी आणा घरी कामकाज
कसली भाजी करू मी आज ||६||

जे आहे ते सुखाने खाऊ
महागाईचा नका करू बाऊ
चैनीचा परवडणार नाही माज
कसली भाजी करू मी आज ||७||

अहो काही सुचेना मला रोजरोज
कसली भाजी करू मी आज ||धृ||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०१/१०/२०१०
(3rd Page)

Monday, December 6, 2010

नव्या वर्षाची गुढी उभारू चला

नव्या वर्षाची गुढी उभारू चला

फाल्गून सरला चैत्री पाडवा आला
नव्या वर्षाची गुढी उभारू चला ||धृ||

नऊवार साडी चौरंगी खण
काठी धुवून टाका बांधून
लिंबाचा पाला हारकड्याने
सजवू धजवू तिला
नव्या वर्षाची गुढी उभारू चला ||१||

शुभमुहूर्त असे चैत्र शुद्ध प्रतिपदेचा
शुभ काळ असे नव्या कार्यरंभाचा
पाने आंब्याची फुले झेंडूची घेवून
तोरण लावू दाराला
नव्या वर्षाची गुढी उभारू चला ||२||

धरती नटली चैत्रपालवी
घरात सजली गृहलक्ष्मी
विसरा १ जानेवारीच्या वेड्या जल्लोशाला
सण मराठी वर्षारंभाचा आला
नव्या वर्षाची गुढी उभारू चला ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२२/०७/२०१०

रखमा

रखमा


--------------------------------------------------------------------------------------------
सक्काळचे ६
काय मेला बघूं र्‍हायलाय निसता. सक्काळी सक्काळी बोलीवलं मला त्या भाड्या शेटनं अन म्हनतू कसा की 'ए रखमे पानी मारलं का नाही त्या कालच्या भिंतींवर ते?'. आता मी सांगते तुमाला. माला काय ह्ये नविन हाय का ह्ये. दहा वर्स झाली या लायनीत राहून. तुमाला सांगते बिगार्‍याच आयुक्श लई खराब. त्यात माझ्यासारक्या बायामान्सांच्या हालाचं तर ईचारूच नका. आता तुमीच बगाना त्या भाड्या बिल्डर शेटच यवढ्या सक्काळी सक्काळी इथं पालात येवूनशान भिताडावर पानी मारायला सांगायच काय काम व्हतं का? आन त्ये बी माझं मालक पालात नसतांना? बरं मी काय त्या भाड्याला वळखीत नाय का त्ये? लुभ्रा मेला. त्याची नजर काय बरूबर नाय. मागला शेट लई चांगला व्हता. त्याच्याबरूबर आमी सात आट बिल्डींगी केल्या नव्ह का? मग. व्हताच तसा त्यो. लय दयाळू. दोन वर्साच्या ऐन दिवाळीच्या दिशी माझं तान्ह लेकरू आजारी पल्डं तवा त्यानं त्याच्या गाडीत घालूनशान दवाकान्यात डागदरकडं घ्येवून गेला. आन माझ्या हातावर २०० रुपयं द्येवून 'काय लागलं तर सांग रखमे. दोन दिस रोजी नगं करू. आन तुझ्या नवर्‍याला पन सांग की दोन दिस ताडी न प्येता काम कर आन त्या पैशानं आवशीद आन पोराला.' त्याची नजर काय या शेटसारकी वाईट नवती. मालाच नाय तर बाकीच्या रोजंदारीच्या बायांनाबी त्यो लय दयाळू लागायचा. त्याला दोन मोट्या पोरी आसल्यानं जगात काय चालतं त्ये समजत आसल. आसत्यात आशी मान्स. आन हा भाड्या. सदाअनकदा घिरट्या घालतू माझ्या पालात. मागल्या येळंला यांना म्हनतो कसा ' रमेश, आता नव्या बिल्डींगचा तिसरा स्लॅब पडतोया तवा तू तुज्यावालं बिर्‍हाड आता पयल्या मजल्याच्या यका फिल्याटमदी टाक. माझं मालकं बी लय भोळसट येडं. लागलीच फशी पडाया लागलं. म्या शेटला म्हनलं की, 'आमी गरीब मान्सं. आमी हायेत तितंच ठिक हायेत. आमी ही बिलडींग व्हयीपत्तूर पालातच राहू. आन खाली राहूनशान बिलडींग ची राकनदारीपन व्हती. त्येवढ्येच दोन पैसं तुमी त्यामूळं आमाला त्याचे द्येत्यात नव्हं का.'
बिलडींग ची राकनदारीचा इशय निगाला तवा त्या मेल्या शेटनं आपला नाद टाकला. आन आत्ता सक्काळी सक्काळी इथं हजर कामं सांगाया.

आन आत्ता पंदरा मिन्टांत लाईट जातील. तवा म्या कशी मोटार सुरू करू आन कशी पानी मारू त्या भिताडावर सांगा तुमी. हा नवा शेट माझ्या मालकाला दुसरं कायबी काम सांगतो आन मी एकली आसतांना न्येमका हतं येत्यो. मागल्या येळंला माझा नवरा गावाकडं यवतमाळला ग्येला व्हता तवा तर माज्या जिवात जिव नव्हता. मालाच आता पुढं व्हवूनशान दुसरीकडं काम पाहायला लागल.

मी तुमच्याशी काय बोलूनं राह्यले इथं. तिकड माझा चाहा वोतू जाईल.

"काय रं सुंदर्‍या, कवापासून त्वांड घासतो? चाहाच्या आधनाला उकळी आली का बघ की जरा. आन तुला साळा हाय ना आत्ता साडेसातला? आन तुज्या बाला बलीव चाहा प्यायला. सक्काळी सक्काळी ग्येला दुसर्‍या सायटीवर."
-------------------------------------------------------------------------------------
सक्काळचे ८

चला आता दुसर्‍या मजल्यावरच्या सल्याबवर ईटा पोचवायच्या हायेत. तुमाला सांगते या बिलडींगच्या पायर्‍या जास्तीच हायेत. आन त्याच्यात दुसरा सल्याब म्हंजी पायात गोळं यायचंच काम. डोक्यावर बारा बारा ईटांचं वझं घ्येवूनशान चढायच म्हंजे मरवणूकच हाय जनू. नाय आता एखांद्या तासात बाकीच्या रोजंदारीच्या बाया येतील हात लावायला तवा थोडी मदत व्ह्यईल कामाला पन म्या इथंच राहातू राखनदार म्हनून तर जास्तीचं काम करावा लागतं. आन दोन पैसं जास्तीचे मिळून सौंसारालाबी हातभार लागतू.

-------------------------------------------------------------------------------------
सक्काळचे ९

आज ज्येवायला पिठलं भाकरी करत्ये. त्योच आता न्याहारीला व्ह्यईल. आमी आताच कायबायी आसल त्ये आताच्या येळला न्याहारीला खावून घ्येतो. दुपारच्या १ वाजंपर्यंत बुड ट्येकायलाबी सवड राहात नायी मग. कामाच्या रगाड्यात आंग पिळून निघतं. घ्या ! त्येलाला आत्ताच संपाया पायजे व्हतं का? कोपर्‍यावरच्या शेटच्या दुकानीत जाया पायजे. कालच संद्याकाळी त्येल संपल्याच माज्या घ्यानात व्हतं पन रातीला ईसरून ग्येले आन आता घाईच्या वक्ताला आशी फजिता व्हती.

'शेट, १० रुपायाचं त्येल आन ५ रुपायाचं डाळीचं पिठ द्या.'

'काल संध्याकाळी तुज्या नवर्‍यानं २ रुपायाच्या इड्या आन १ रुपायाचं फुटानं न्येलं. त्ये घरून आता उधारी ७३ रुपये झाली बघ. कवा देशील?'

'शेट आता ह्ये सामान द्या आन म्होरल्या बुधवारी रोजी भरली का द्येतो की पैसं.'

'बरं बरं. लक्षात ठिव म्हंजे झालं'
-------------------------------------------------------------------------------------
सक्काळचे ११

आता त्या मिस्तरीच्या हाताखाली कामं करावी लागतील बया. आज त्यो वरच्या मजल्यातल्या भिती चढवलं. बाकीच्या बाया काय काम करीत नाय बघा. नुसत्या कुजुकुचु करत टायम खोटी करतात. त्या रानीला तर काय कामच कराया नगो. आता माला सांगा, मिस्तरीला वर माल कालवाया वाळू लागल का नायी? पन या रानीला खाली वाळू गाळाया ठ्येवलं तर तिच आपलं बोलनं चालूच हाय बाकीच्या बिगार्‍यांशी. मेली. हा शेट आंगाखाली घ्येईल तवा समजलं तिला काय आसतं त्ये. मरो आपल्याला काय करायचं दुसर्‍यांचं. आपन आपलं काम करावं ह्येच बरं.

--------------------------------------------------------------------------------------
दुपारचं १
आरं ए सुंदर, तुजं ज्येवन झालं आसंल तर तुज्या बा ला बलीव ज्येवन करायला. त्येंला काय कामामधी सुद नसती बग. तरी म्या सांगत आसत्ये की ह्ये बिगार्‍याच काम सोडून मिस्तरीचं काम शिकून घ्या. पन नायी. आपन काय परगती करायची नाय आन आपली गाडी अधोगतीकडं न्यायची. आन तू पन मुडदा म्येला त्येच्याच लायनीला जानार. शाळंतून आल्यापास्न बगत्ये हाये मी निसता मातीतच उंडारू र्‍हायलाय तू. जा तुज्या बा ला हाक मार ज्येवायला.
--------------------------------------------------------------------------------------
दुपारचं ५
आज काम करूंनशान लय थकाया झालं. मगाशी चा पिवून थोडं बरं वाटलं. आता त्या मुकडदमला हातचं काम सोडून माला पलास्टर च्या कामाला लावायचं काय काम व्हतं का? तुमाला सांगत्ये हा मानूस लई डांबीस हाय बगा. काम करून घ्येतो आन पैसं पन येळवारी देत नाय. आता सा वाजल्यानंतर सुट्टी करून माला उद्याच्यासाटी एखांदी भाजी आनाया बाजारात जायाच हाय तवा हातात धा ईस रुपयं नगो का? आपन आप्लं येळवारी पैसं मागून घ्यायला पायजे त्याच्याकडून.
------------------------------------------------------------------------------------------
रातीचं ७

'आव म्या काय म्हंते, तुमी एका दिसाचं औशीद नका प्येवू पन रेडीवोच्या बॅटरीक संपल्यात. त्या आनायच्या हायीत. झालंच तर सुंदरचे आंगांवरचे कापडं बी आनायचे हायीत. ढुंगनावर सगळ्या चड्या ग्येल्या त्येच्या. या बुधवारच्या सुट्टीत आपन बाजाराला जावू आन सगळं सामान घ्येवून येवू.'

'बरं बरं जावू आपन या बुधवारला. पन म्या काय म्हंतो ज्येवान झालं का? माला भुक लागलीया.'

'ह्ये काय ज्येवन तयार हाय. सुंदर्‍याचं झालं का तुमी बसा, म्या गरमागरम भाकरी थापती.'
--------------------------------------------------------------------------
राती १०

'आगं ए रकमे सुंदर लई लवकर झोपला आज.'

'तर वो. निस्ता वाळू आन मातीत खेळतो. मग दमूनशान लवकर झोपनार नायी तर काय?'

'आता तू काय करती तिकडं. ईकडं ये झोपाया. दिसभर लांब आस्तो आपन. ह्या बुधवारला तुलापन एक पातळ घ्येवून टाकू. कधीचं फाटकंच पातळ शिवून घालू राहीली. माला दिसत नाय का व्हय?'

'आत्ता आटवली का रकमा, माझ्या भोळ्या सांबाला.'

Thursday, May 27, 2010

मधूमेहाविरुद्ध लढा

मधूमेहाविरुद्ध लढा

अदिती ताईंच्या या प्रश्नामुळे मला लिहावेसे वाटले.

मी मराठीचा उदोउदो करण्यासाठी भांडत असतांना एके ठिकाणी त्यांनी मला 'तुमच्या सहीत इंग्रजी आहे' ते बदला अन आताच्या प्रश्नात 'तुमच्या सहीतला 'ओ' आणि ते इंग्लिश वाक्य अजून तसंच आहे. आणि हो मधुमेहाशी कसं लढायचं?' असं विचारलं.

त्यांचा चेष्टेचा अन मस्करीचा सूर मी समजलो अन त्यांना खालील उत्तरे तेथेच देवून आमची चेष्टा तेथेच थांबवता आली असती. पण प्रश्न हा सामाजिक जागृतीचा असल्याने नविन धागा काढून लिहीत आहे. (अन्यथा मी कविता केली असती. पण अदिती ताई कविता केवळ विडंबन तयार करण्यासाठी वाचतात व त्यांनी डायबेटीस ची कविता वाचली नसती. असो. इथे चेष्टा मस्करी फार झाली हं.) असो.

तर माझी सही म्हणजे एक मोठा निळं वर्तूळ आहे. त्याखाली इंगजीत Unite for Diabetes असे अन मराठीत 'डायबेटीस विरूद्ध लढा' असे लिहीले आहे.
माझ्या घरात वडिलांना डायबेटीस आहे. तो अनूवंशीक नाही. पण त्यांच्या उपचाराच्या दरम्यान मी डायबेटीस बाबत जागरूक झालो. नंतर माध्यमांतून असेही समजले की काही वर्षांत भारत हा डायबेटीस असणार्‍यांचा देश होवू शकतो.

तो कसा अन का होतो, त्याबाबतची काळजी कशी घ्यायची वैगेरे चर्चा नंतर होईलच पण सहीमध्ये असले वर्तूळ हे 'जागतिक डायबेटिस शिखर संघटना ' (International Diabetes Federation (IDF)) यांचा लोगो आहे. डायबेटीस विरूद्ध जागरूकता आणण्यासाठी, संघटनेच्या प्रयत्नांना दाद देण्यासाठी अन मधूमेहा विरूद्ध लढा देण्यासाठी संकेत म्हणून हा लोगो वापरला जातो. हा लोगो कुणीही वरील कारणांसाठी वापरू शकतो.

डायबेटीस होवो न होवो, कमीतकमी दोन लोकांनी हे काय आहे म्हणून विचारावे अन मी सांगावे या साठी हा लोगो मी सहीत वापरत आहे. आपल्यातले बरेचसे बैठे काम करतात. कमीतकमी त्यांनी जागरूक व्हावे हा हेतू.

बाकी अदितीबाईंच्या सांगण्यावरून माझ्या सहीतले 'डायबेटीस विरुद्ध लढा' चे मी 'मधूमेहाविरुद्ध लढा' असे केले आहे.

The universal symbol for diabetes
'मधूमेहाविरुद्ध लढा'

Wednesday, March 17, 2010

लेखन व लेखकाचे बाह्यरुप

लेखन व लेखकाचे बाह्यरुप

हा धागा केवळ मौजमजेखातर आहे. तत्राप यात काही वैज्ञानीक तथ्य असेल तर आपण सांगू शकतात.

असे म्हणतात की आपण जे लिहीतो तसे आपले मन असते. आपल्या मनातले आहे ते कागदावर उमटते. थोडक्यात आपले लिखाण आपला स्वभाव, वागणूक दाखवते. या लेखनात कार्यालयात केले जाणारे लेखन, अनौपचारीक पत्रे येत नाहीत. जे ललीत आहे, जे लेखकाला आनंद देते व जे खरे आहे ते लेखन येथे अभिप्रेत आहे.
थोडक्यात केले जाणारे लेखन लेखकाच्या मनाचा आरसा असते. अशाच प्रकारच्या मनाच्या आरशातून त्या लेखकाचे बाह्यरुप देखील आजमावता येईल का? बाह्यरुप म्हणजे तो लेखक/ लेखिका कसा / कशी आहे? त्याला कोणत्या आवडीनिवडी आहेत? पुरूष लेखक असेल तर त्याला मिशा ठेवण्याची आवड आहे का? त्याला कोणते कपडे आवडत असतील? लांब बाह्यांचे सदरे की अर्धी बाही? त्याला कसले व्यसन आहे? नाही? डोळ्यांचा रंग / केसांची ठेवण कशी आहे? असे काही जाणता येते का?
लक्षात घ्या की येथे स्वभाव कसा आहे याची पडताळणी घ्यायची नाही. केवळ बाह्यरूप कसे असेल याचा धांडोळा घ्यायचा आहे. येथे असणार्‍या लेखकांच्या मनात काही प्रतीमा तयार झाल्यात. आपल्याही मनात असल्या काही प्रतीमा तयार झाल्या आहेत काय?

येथे कोणतेही भविष्य वर्तवण्याचा हेतू नाही. किंवा 'सहीवरून स्वभाव, अक्षरावरून स्वभाव' वर्तवण्याचा हेतू नाही. कारण भविष्य व 'सहीवरून स्वभाव, अक्षरावरून स्वभाव' असे काही असते यावर माझा विश्वास नाही.

माझे वरील लिखाण थोडे विस्कळीत वाटेल पण जे जाणकार आहेत त्यापर्यंत माझ्या मनाच्या भावना पोचल्या असतील. कोणी माझ्या मतांची त्यांच्याबद्दल खाजगीरीत्या मागणी केली तर मी माझे मत त्या पर्यंत पोचवू शकतो.

अवांतर : (आज हा लेख लिहून मिपावरच्या माझ्या लेखांची शंभरी भरली आहे. शंभरी गाठल्याबद्दल मी माझेच अभिनंदन करतो व तुम्ही मला सहन केले त्याबद्दल तुम्हाला आधीच धन्यवाद देतो. माझ्या लेखनाने तुम्हाला थोडाजरी आनंद मिळाला असेल तर मी धन्य आहे. )

Friday, April 3, 2009

दोन राज्यांचे रेल्वे स्टेशन - Railway Station of two States

नवापुर - (हो तेच ते बर्ड फ्लू वाले) हे महाराष्ट्र आणि गुजरात या राज्याच्या हद्दीवर वसलेले तालूक्याचे ठिकाण आहे. येथूनच राष्ट्रीय महामार्ग ६ (नागपूर- सुरत) जातो. ते नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यात मोडते. स्वतंत्र महाराष्ट्र होण्यापुर्वी हे गाव गुजरात मध्ये जाणार होते. त्या वेळी तेथील लोकांनी ठराव करून हे गाव महाराष्ट्रात आणले. (गुजरात मधील सुब्बत्ता बघुन त्यांचे आत्मे आता पस्तावत असतील.) या गावात मराठी तसेच गुजराथी लोक गुण्यागोवींदाने राहतात. शहरात नगरपालिका स्वच्छ्तेची विषेश काळजी घेते असे दिसले।

Navapur is a taluka place in tribal Nandurbar District, situated on the National Highway No. 6, and it is the last town on the Maharashtra border. Gujarat state Border starts after 1 KM from this city. Marathi as well as Gujarati community lives here. In the year of 2006 Bird Flew hits Navapur poultry industry badly.

गाव उकाई धरणाच्या पाण्याच्या फुगवट्याच्या (मराठीत आपले 'बॅक वॉटर' हो)जवळ आहे. निसर्गाने या तालूक्याला भरभरून दान दिले आहे. या तालुक्यात सागाची भरपूर वने आहेत. पावसाळ्यात येथे जातांना चरणमाळ आणि कोंडाईबारी या घाटांमध्ये असलेल्या जंगलातले द्रुष्य तर मनोरम असते.
येथील आदिवासी रहीवासी कष्टाळू आहे. शासनाच्या क्रुपेमुळे (!!) त्यांची आर्थीक परीस्थीती चांगली आहे.
या ठिकाणी लाकूड कताई / लाकूड काम फार मोठ्या प्रमाणात चालते. सुतार लोक प्रामाणीक आहेत. गिर्‍हाईकाकडुन योग्य मोबदला घेवुन सागवानी ला़कडाचे सामान बनवून दिले जाते.

This town is on the banks of Ukai Dam. There is lots of Jungle having many trees of Sag.While going Navapur during rainy season, The Ghats of Charanmal and Kondai Bari looks fabulous.

या गावाच्या परीसरात बर्ड फ्लू च्या साथीने कोंबड्या मरण्यापुर्वी (२००६) कोंबड्याची शेते (पोल्र्ट्री फार्म) फार मोठ्याप्रमाणात होती. इतकी की, गाव ५-६ कि.मी. वर असतांना कोंबड्यांच्या शेतांमधुन विशीष्ट वास येई. आता ते प्रमाण फारच कमी झाले आहे.
या गावाची भौगोलीक रचना काहीतरी वेगळी असल्याने येथील हवा कोरडी असुनसूद्धा फार गरम होते. थंड वारे सहसा वाहतच नाही. बारोमास तुम्ही पंख्याशीवाय राहूच शकत नाही. (१ कि.मी. च्या फरकाने हेच गाव गुजराथ मध्ये असले असते. गुजरात मध्ये भारनियमन नाही. )सुरत, बारडोली, बडोदा सारखे मोठे शहरे जवळ असूनही येथील MIDC नावालाच आहे. ("गुजरात मधील सुब्बत्ता बघुन ..." ह्या वाक्याचा संदर्भ आत्ता तुमच्या लक्षात आला असेल.) असो. कालाय तस्मै नमः

The tribal community here is very hardworking community.
You can found lots of wood cutting / wood working mills here. The carpenters are the good worker and they make the wooden furniture of Sag wood due to plenty supply of Sag trees.
Due to geographical situation here, you can't live here without electric fan. Even though the air is dry and trees as well as jungle around here, there is always a hot air during a year.

आता या लेखाच्या मुख्य शीर्षकाबद्दल्...नवापुर रेल्वे स्टेशन हे पश्चिम रेल्वे च्या सुरत-जळगाव या मार्गात येते. येथे जो रेल्वे फलाट आहे तो अक्षरशा: निम्मा महाराष्ट्रात आणि निम्मा गुजरात राज्यात येतो.
The uniqueness of Navapur's railway station is its railway platform is exactly half in Maharashtra and half in Gujarat.
जसा:===========गुजरात हद्द [ नवापुर रेल्वे फलाट ] महाराष्ट्र हद्द============
Navapur RS1
छायाचित्र क्रमांक १. विकीमॅपीयावरील नवापुर रेल्वे स्टेशनचे छायाचित्रछायाचित्रात जी लाल रेषा आहे त्या ठिकाणी दोन्ही राज्याची हद्द सुरु होते (किंवा संपते). (मी जसे काही वाघा बॉर्डर वर उभा आहे असे सांगतो आहे. )
Photo. 1. This photo is taken from Wikimapia. The read line divides the Navapur railway platform in to half in Maharashtra and half in Gujarat. This photograph shows exact border of these states.

Navapur RS2छायाचित्र क्रमांक २. आस्मादिकांचे चिरंजीव महाराष्ट्रात तर भाचेराव फुटभर लांब असलेल्या गुजरातेत उभे!
Photo 2. This photo shows the monument on the Navapur railway platform. The boy who salutes is my son who is in Maharashtra and nephew stands in Gujarat, a few feet apart.


Swarali at a Navapur Railway Station: A Railway Station of Two States - Maharashtra and Gujrat
स्वराली नवापुर रेल्वे स्थानकावर, नवापुर रेल्वे स्थानक महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमेवर आहे.
 
ह्या फलाटावर तिकीट देणारा कारकून हा महाराष्ट्रात बसतो (छायाचित्रात पत्रे टाकलेली जागा जरा बारकाईने बघा); आणि तिकीट घेणारा पासिंजर हा गुजरातेत उभा असतो (आग विझवणार्‍या बादल्या / सिमेंटची जाळी या मागे). पासिंजरचा खांदा गुजरातेत आणि पैसे घेतलेला हाताचा पंजा महाराष्ट्रात असतो.

The ticket booking clerk sits in Maharashtra (behind the roofing sheets) and the passenger stands in Gujarat (behind the fire sand buckets).

Navapur RS3छायाचित्र क्रमांक ३. नवापुर रेल्वे स्टेशनची पाटी
Photo 3. Navapur railway Station Board.
The ticket booking clerk sits in Maharashtra (behind the roofing sheets) and the passenger stands in Gujarat (behind the fire sand buckets).

Navapur Co-op. Sugar Factoryछायाचित्र क्रमांक ४. डोकारे (नवापुर) येथील सहकारी साखर कारखाना
Photo 4. Dokare (Tal. Navapur) Adivasi Co-operative Sugar Factory

आम्ही गेलो तेव्हा उसासाठी मारामार चालु होती. त्यामुळे कारखाना बघण्यासाठी थोडे थांबावे लागले. नंतर कारखान्याच्या कार्यस्थळापासुन जवळच असलेल्या गावी एका लाकुड काम करणार्‍या सुताराच्या वर्कशॉप ला भेट दिली।
We have to wait for a while we visited Sugar Factory as there is shortage of sugarcane. After that we visited a carpenter's workshop.