Showing posts with label गोष्ट. Show all posts
Showing posts with label गोष्ट. Show all posts

Monday, June 28, 2021

"वैरी भेदला" या विनोदी वगनाट्याचे ई पुस्तकाचे आज ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुन:प्रकाशन

 http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/vairi_bhedala_sachin_boras...

https://www.facebook.com/Vagnatya/photos/a.395135740861318/395135597527999



येथील मुख्य पानावर "वैरी भेदला" हे विनोदी वगनाट्य असलेले माझे ई पुस्तक आज ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुन:प्रकाशीत झालेले आहे.

सदर पुस्तक हार्डकॉपी स्वरूपात 2017 सालीच अमिगो पब्लिशरतर्फे प्रकाशीत झालेले होते.

सदर पुस्तक आपण विनामूल्य स्वरूपात "वैरी भेदला" विनोदी वगनाट्य येथून किंवा ई साहित्य प्रतिष्ठान- नाटक विभाग येथील नाटक विभागातून डाऊनलोड करून वाचावे.

"वैरी भेदला" या पुस्तकासाठी आपणास कोणतेही मूल्य देण्याची गरज नाही. हे पुस्तक विनामूल्य आहे. आपण ते वाचावे आणि आपल्या ओळखीच्या वाचकांत विनामूल्य वाचनास देण्याचे करावे ही विनंती.

हे ई पुस्तक वाचल्यानंतर आपण तीन मिनिटात तीन गोष्टी करू शकतात.

1. आपणास हे पुस्तक कसे वाटले ते फोन, व्हाटस अ‍ॅप मेसेज किंवा ईमेल करून लेखकाला कळवू शकतात.
2. ई साहित्य प्रतिष्ठानला ईमेल करून हे पुस्तक कसे वाटले ते सांगावे.
3. आपले मित्र तसेच सर्व मराठी लोकांना या पुस्तकाबद्दल आणि ई साहित्य प्रतिष्ठानबद्दल सांगा.

कळावे.

आपला,
पाषाणभेद उर्फ सचिन बोरसे
982 Three4 O2554

कथा: पोळी शब्दाच्या इतिहासातील उल्लेखाची

कथा: पोळी शब्दाच्या इतिहासातील उल्लेखाची

चेहरापुस्तकावर पोळी आणि चपाती यापैकी योग्य मराठी शब्द कोणता यावर वाद झडत असतांना इतिहासाची पाने चाळतांना काही ऐतिहासीक पुरावे हाती लागले.

त्यातील एक संदर्भ म्हणजे, संस्कृतग्रंथ "भुकंबलीतम: - वेदोपदेश" (प्राकृतातः भुकबळी) .
सदर ग्रंथ संत पाषाणभेद ( जन्मसाल: उपलब्ध नाही, मृत्यू: शके १६६१ किंवा ६२) यांनी लिहीलेला आहे.
( "भुकंबलीतम: - वेदोपदेश" ग्रंथ प्राकृतात अनुवाद दगडफोड्या यांनी "भुकबळी" या नावाने केला आहे. (रचनाकालखंड उपलब्ध नाही.)
(सदर दोनही ग्रंथांची उपलब्धता अतिशय दुर्मीळ आहे. इच्छूकांनी शोध घ्यावा.‌)

सदर ग्रंथात "पोळीयस्य कारणेन" (पोळीच्या कारणाने) या अध्यायात तत्कालीन भिकारी अन एक साधूजन यांच्या भुकेची तुलना एक धनवान सावकार कसा करतो याचा स्पष्ट उल्लेख आहे. पोळी न मिळाल्याने भिकारी जग सोडतो आणि तो साधू त्या सावकाराकडून पोळी मिळवून ती खाऊ घालण्यासाठी त्या भिकार्यास जीवदान देतो अशी कथा आलेली आहे.

ती कथा येथे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

कथा सुरू होते आहे:

प्राचीन काळी मर्‍हाटी राज्यात जनटक प्रांतात त्रिकंस्थान नावाचे एक गाव होते. गाव तसे लहानच होते. गावाच्या आसपास शेती करणारे आणि त्या अनुषंगाने व्यवसाय करणारे राहत असत. पर्जन्यछायेच्या प्रदेशात हे गाव येत असल्याने दुष्काळ तर गावाच्या पाचवीलाच पुजलेला होता. अनेकदा बियाणे पेरावे अन ते उगवण्याआधीच पक्षांचे अन्न व्हावे अशी परिस्थीती होती. होता येईल तितके अन्न उगवावे अन ते पुरवून पुरवून वापरावे, इतर वरकामे करून जीवन जगावे अशी तेथल्या गावकर्‍यांना सवय झालेली होती.

गावात एक औंदाजी नावाचा गरीब राहत होता. गावाच्या सीमेवर त्याची झोपडी होती. मजूरी करून दिवस कंठत तो म्हातारा झालेला होता. आताशा त्याचेकडून काही काम होत नसे. दिवसभराचे कोरान्न मिळवायला तो काम करण्यासाठी इतरांकडे याचना करत असे पण त्याच्या शारिरीक विपन्नावस्थेकडे पाहून कोणताही स्त्री-पुरूष त्याला दया म्हणून चतकोर शाक भाकरी देत असे. औंदाजी बापडा देखील त्याला आता सरावला होता. एक पाय ओढत तो चारपाच दारी भिक्षा मागे अन आपल्या पोटाची खळगी भरण्याइतके अन्न मिळवून आपल्या झोपडीत जाऊन पडत असे. गेला आठवडा औंदाजीच्या पायाचे दुखणे वाढलेले होते. त्यातच अन्न न मिळाल्याने त्याला ग्लानी येत होती. कसेबसे पाण्यावर दिवस काढत होता बापडा.

त्याच समयाला त्रिकंस्थान गावाच्या दामाजी सावकारांकडे नातवाच्या बारशाच्या समारंभ होता. पंचपक्वान्नाची जेवणे नुकतीच आटोपल्यामुळे मंडळी सुस्तावलेली होती. विडा पान खाऊन वडीलधारे वामकुक्षी घेत होती. स्त्रीया माजघरात आवराआवर करत होत्या. लहान मुले वाड्यातल्या चौकात खेळत होती. अशा समयाला औंदाजी आपला दुखरा पाय सरकत सरकत तेथे भिक्षा मागण्यासाठी आला. त्याने फार काही नको, फक्त चतकोर अर्धी पोळी अन प्यायला पाणी द्या अशी विनंती तेथे केली. सुस्तावलेल्या दामाजी सावकारांनी पाहुण्यांसमोर आपली आब दाखवण्यासाठी औंदाजीला पोळी, भाजी, पाणी देण्यास साफ नकार दिला. इतकेच नव्हे तर त्या वाड्यासमोरून लगेच निघून जाण्यास त्याला फर्मावले.

पोटातली दोन दिवसांची भुक, उन्हाचा त्रास, आजारी शरीर, झालेले वयोमान या सगळ्यांचा एकत्रीत विपरीत परिणाम होवून औंदाजीने सावकाराच्या वाड्याच्या पायरीवरच आपले प्राण सोडले.

हे सर्व पाहुणे अन सावकारासमोर घडले. सावकारासही आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला व तो त्याने सगळ्यांना बोलून दाखवला. घटना तर घडून गेली होती. आता पश्चाताप करण्यात काही अर्थ नव्हता. कदाचित औंदाजीला तेथेच मरण यावे अशी नियतीची इच्छा असावी.

याच दरम्यान संत पाषाणभेद तेथे अवतिर्ण झाले. काखेत झोळी, हातात कमंडलू, पायी खडावा, अंगात कफनी, डोईस मुंडासे, कपाळी रेखीव चंदनी सूर्य अशा वेशात ते सावकाराच्या वाड्यासमोर उभे ठाकले. आपल्या उंच आवाजात ओमकाराचे स्मरण करून त्यांनी सावकाराकडे कोरडा शिधा मागितला. परंतु सावकार, तेथील पाहुणे, स्त्रीया इत्यादी मंडळी औंदाजीच्या शवाभोवती गोळा झालेली होती. संतांकडे कुणाचेही लक्ष नव्हते. अजून दोन वेळा ओमकार करून भिक्षा मागून जर नाही मिळाली तर पुढल्या घरी जाण्याचा संतांचा विचार होता तितक्यात सावकाराचे लक्ष त्यांच्याकडे गेले. सावकाराने घडलेला सगळा प्रकार पाषाणभेदांच्या कानावर घातला. तसेच थोडी वाट पाहून औंदाजीला पोळी भाजी तसेच गोडान्न देण्याची त्यांच्या मनीची प्रांजळ भावना होती हे देखील सावकार वदले.

संत पाषाणभेदांनी आपल्या ठाई असलेल्या आंतरीक ज्ञानाने सर्व काही आधीच जाणले होते. झालेल्या घटनेत सावकाराची काही चूक नव्हती. भिक्षा देणे न देणे हे सर्वस्वी दात्याच्या मनात असते. त्याला भिक्षेकरी आक्षेप घेवू शकत नाही, तसेच कसलाही श्राप देणे हे देखील उचीत नाही हे ते जाणत होतेच.


त्यांनी सावकारास मानसीक धीर दिला आणि सावकाराने त्यांचे चरण धरले. थोडे मागे सरत लगोलग संत पाषाणभेदांनी औंदाजीचे शव उचलले आणि ओसरीवर ठेवले. शवाच्या बाजूस डोळे मिटून सिद्धासनात त्यांनी बैठक घेत ईश्वराचे स्मरण केले. आपली प्रार्थना संपवत संत पाषाणभेदांनी उपचार म्हणून आपल्या कमंडलूतील पाणी औंदाजीच्या पापण्यांना आणि कपाळाला लावले. पुन्हा एकवार संतांनी ईश्वराचे स्मरण केले. अगदी थोड्या कालाने औंदाजीच्या शरीरात श्वास वास करू लागला. हाती पायी थरथर जाणवली. पुढच्याच क्षणाला औंदाजीने डोळे उघडले. समस्त मंडळींच्या आश्चर्यास पारावार उरला नाही. वयस्कर स्त्रीयांनी आपल्या सुना-मुलांना औंदाजीसाठी पोळी भाजी घेवून येण्यास पिटाळले. सावकारांच्या आनंदाला तर पारावार उरला नाही. त्यांनी औंदाजीला बसते केले अन पोळी भाजीचा पहिला घास आपल्या हाताने त्याला भरवला. 'पोट भरून खा अन तुझ्या दुखर्‍या पायाच्या उपचाराची जबाबदारीही मी घेतो', हे सावकारांचे बोलणे ऐकून औंदाजीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. काय घडले हे तो समजून चुकला होता. मनोमन त्याने संताचे आभार मानले. पाहूणे मंडळीही ते द्रृष्य बघून भावूक झाली होती.

उपस्थित सज्जन भावनेतून सावरत असतांना सावकारांना संत पाषाणभेद भिक्षा मागण्यासाठी आल्याची आठवण झाली. ते सभोवार पाहू लागले. पण संत पाषाणभेद तेथे होतेच कोठे? ते तर तेथून केव्हाच निघून गेले होते. तेथील सज्जनांनी संत पाषाणभेद निघून गेल्याच्या दिशेने श्रद्धेने हात जोडले.

"भुकंबलीतम: - वेदोपदेश" (प्राकृतातः भुकबळी) या ग्रंथातील "पोळीयस्य कारणेन" (पोळीच्या कारणाने) हा अध्याय येथे संपतो.

"पोळी" या शब्दाच्या अर्थाचे विवेचन:
जनटक प्रांत तसेच त्रिकंस्थान नावाचे एक गाव महाराष्ट्रातच नाशिक भागात होते असे विद्वान इतिहासकारांचे मत आहे. "भुकंबलीतम: - वेदोपदेश" (प्राकृतातः भुकबळी) या ग्रंथाची रचना कालखंड हा शके १६६१ च्या आधीचा असावा. तो संत पाषाणभेद ( जन्मसाल: उपलब्ध नाही, मृत्यू: शके १६६१ किंवा ६२) यांनी लिहीलेला आहे. त्याकाळी महाराष्ट्र प्रांतात पाकृतात पोळी हा शब्द असल्याचे या ग्रंथवाचनावरून सिद्ध होते. थोडक्यात 'पोळी' हा अस्सल मराठी शब्द आहे.

तसेच सदर ग्रंथांत अनेक मराठी शब्दांचा उलगडा होऊ शकतो इतके शब्द आलेले आहेत. वेळोवेळी आपण ते अभ्यासू या.

३०/०४/२०२१

आमचीबी आंटी जन टेस

आमचीबी आंटी जन टेस

गावात कायबी काम नव्हतं आजकाल. सगळे निसते बशेल. कोरूनामुळं नाम्याचं रसाचं गुर्‍हाळबी बंद पडेल व्हतं.
त्येच्यायच्या त्या कोरूनाच्या. सकाळ संध्याकाळचा आमच्यावाला आड्डा आसा बंद पडेल. वावरातबी कांदे काढेल व्हते, आन या येळेला भाव काय मिळाला नाय. टॅक्टरचा हप्ता घरातून द्यावा लागला, आता बोला.

या कोरूनाची आंटी जन टेस करून घ्या, आंटी जन टेस करून घ्या म्हनून मलेरीया डाक्टर आन आशाबाई गावात फिरत व्हती. मलेरीया डाक्टर लई बाराचं हाय बरं का आमच्या आरोग्य शेंटरवरचं. कायम आशाबाईला बरूबर घेवूनच फिरतं लेकाचं.

जाऊद्या, आपल्याला काय म्हना.

तर मलाबी वाटलं की आपलीबी करून घ्यावी आंटी जन टेस. आंटी जन टेसला काय काय करावं आसं कोनाला तरी विचारावं आसं वाटत व्हतं. कारन, आंटीपर्यंत ठिक हाय पन जन म्हणजे जनता. आता ती आंटी आन मी, समद्या जनांसमोर काय आन कसं करनार आसा मला प्रेश्न पडला. कोनाला विचारायचीबी लय लाज वाटत व्हती. जनांसमोर काय झालं तर गावात त्वांड दाखवायला जागा नव्हती. सगळे सगे सोयरे गावातच. तसं झालं तर कायम तोंडाला पट्टी लावावी लागणार आशी भिती मनात आली. पन आंटी काय करनार, ती कशी आसंल, ती काय काय देईल, न देईल या विचारानं रात्रीची झोपबी येईना झाली.

संज्या आन राम्या तसं आंटी टेस करून आल्यालं व्हतं, पन त्यांना विचारावं म्हंजे आगीत हात घालन्यासारखं व्हतं. आन संज्या तर माझी हिरॉईन करीनाच्या शेजारीच राहतो. भाड्या मुद्दाम माझ्यासमोर तिचं खरं नाव करूना मोठ्यानं बोलत राहतो. माला सांगा, कोरूनाच्या काळात आसं चिडवनं बरं हाय का? ऊस जळलं त्याच्या वावरातला अशानं. कांदा करपलं उन्हाळ्यातला त्याचा.

जाऊद्या, आपल्याला काय म्हना.

मनाचा हिय्या करून लालचंद मारवाड्याच्या दुकानातून मुद्दाम वीस किलो तांदूळ घेतांना या आंटी जन टेसची थोडी माहीती काढली. त्ये म्हनलं की, आधार कार्ड घेवून जा आन लायनीत थांब. नंबर आला की आंटी टेस व्हईल.

आता या आंटी जन टेसला आधार कार्ड नंबर देऊन लायनीत थांबायचं म्हनजे लई काळजी वाटू लागली. आंटीनं आधार नंबर कुनाला दिला आन त्ये आपल्या घरी पत्ता काढत आलं म्हणजे? आंटीनं काय काळाबाजार केला तर काय आशी चिंता मनाला लागून राहीली.

धडगत करून आरोग्य शेंटरला गाडी लावली. सकाळी गेलेलो. बाहेर धा बारा जनांची लाईन व्हती. वळखीचं कुनीच नव्हतं हे बरं होतं. मधी आसलेली आंटी जन, लोकांना कवा भेटल आसं वाटत व्हतं. एकानं आधार नंबर घेतला. नाव बीव लिहून घेतलं. एक आडूसा होता. तिथंच आंटी आसल, अन जन, लोकं तिथंच तिला भेटत आसतील आसं वाटलं. एवढ्या गर्दीत आंटीला भेटनं काय बराबर वाटंना. पन एकदा का व्हईना भेट झाली म्हंजे आपलं गाडं पुढं रेटता येईल आसा विचार मनात आला.

माझ्यावाला लंबर आला आन मी आडूशामागे गेलो. तवा आंटी बिंटी काय दिसली नाय.

तिथं दवाखान्यासारखं मांडलेलं व्हतं अन एक नर्स व्हती. मंग त्या पोरीनंच नाकात कायतरी खुपासलं. आन जा म्हनाली.

लय फसगत झाली राव. द्राक्षे काढणीला यावे आन पाऊस पडून सगळा माल बेचीराख व्हावा, अगदी पावडरी मारायलाबी येळ मिळू नये आसं झालं. आसं कुठं आसतंय व्हय?

आशी झाली आमच्यावाली आंटी जन टेस.

जाऊद्या, आपल्याला काय म्हना.

- पाषाणभेद
२६/०४/२०२१

Friday, November 13, 2020

खडकवासल्याच्या खडकवाडी खुर्द खेड्यातील खडकेवाड्यातील खासदार खासेराव खडके खासेपाटलांनी खडकसिंगची खोड मोडली

 (पार्श्वभूमी: आमच्या मित्राने नुकतीच खडकवाडी, खडकवासला गावाला भेट दिली. त्या अनुषंगाने तेथील खासदार खासेराव खडके खासेपाटील यांची साहसकथा त्याला ऐकवावी असे वाटले. )

खडकवासल्याच्या खडकवाडी खुर्द खेड्यातील खडकेवाड्यातील खासदार खासेराव खडके खासेपाटलांनी खडकसिंगची खोड मोडली

ख्यातनाम खासदार खासेराव खडके खासेपाटील यांचा खाजगी खडकेवाडा खडकवासला धरणाच्या खालच्या खडकाळ अंगाला खडकवाडी खुर्द खेड्यात होता.

खासेपाटील यांचा खानसामा खच्चून खटकी होता. त्याला खासेरावांचा मुलगा खगेंद्र डोळ्यात खटकत होता. खगेंद्र खूप खाऊ खात असल्याने खानसामा खार खाऊन होता. खानसामा खारे दाणे, खिचडी खाद्यपदार्थ बनवून कंटाळत असे. 'खाई त्याला खवखवे' अशी स्थिती असल्याने खा-खा करणारा खादाडखाऊ खगेंद्र खाऊ खाऊन खो-खो खूप खेळत असे. खगेंद्राचा खून करून यंदाच्या खानेसुमारीत खासेपाटलांच्या खानदानीतून एक नाव कमी करण्यासाठी त्याने खडकसिंग खरबंदा या डाकूला पैसे दिले.

"खडकसिंग च्या खडकण्याने खडखडतात खिडक्या", असे खंकाळ (दुष्ट, रागीट, क्रृर, तिरसट), खुजा असलेला खडकसिंग वारंवार खोकलत बोले. खाल्ल्या पैशाला जागत खडकसिंग खबरदारीने खंदकातून बाहेर पडला. खास खेचरावर तो बसला अन खुरडत खुरडत खुशमस्कर्‍या खेळगडींसह खडकवाडीत आला.

खोडकिडीसारखा खालावलेला खडकसिंग खगोलात खूप तारे असतांना खडकेवाड्यातील खंदक ओलांडून खोलीत खोलवर शिरला तेव्हा खकाणा उडाला. एक खंगलेला दरवाजा खंगारातून (वीट, पक्की वीट) खिटी (अडसर, पाचर) नसल्याने उखडला होता. खट्याळ खुशमस्कर्यांनी खडकसिंगची खुशामत केली. खुशालचेंडू खडकसिंग खुशीत आला. खुन करण्याची खुणगाठ बांधलेला खडकसिंग खळखळून हसला.

खडकेवाडा खंगाळल्यानंतर त्याला खुलासा समजला की खगेंद्र खानदेशात खर्डे खरडतो आहे. या खीळ बसणार्‍या खात्रीलायक खबरीमुळे खूनाच्या कामाचा खेळखंडोबा झालेला खडकसिंग खुळ्यासारखा खचला आणि खासेपाटील खुदुखुदु हसून खदखदू लागले. खवळलेला खडकसिंग खुळा झाला.

खड्गांची खडाखड खणाणणारी खडाजंग झाल्यानंतर खासेरावांनी आपला खास खुपीया खबरी खंडू खोडके याचा खुबीने वापर करून खडकसिंगाच्या कामात खो दिला. खडकसिंगने खलबत करून खोड काढण्याच्या आत पोलीस खात्यात खडसावणारा खुंखार फौजदार ख्वाजा खुर्शीद खान तेथे आला. त्याने खडकसिंग आणि त्याच्या खोगीरभरतीचा खरपूस समाचार घेतला आणि खटल्याचा खलिता खंडन्यायालात रवाना केला.

खुन करण्याचे खूळ करणारा खानसामा खडकेवाड्याच्या शेजारी खाणीच्या खड्ड्यात असलेल्या एक खिडकी, एक खांबी खोलीत खितपत पडला.

खरोखर, खरे खडक खडकवासल्यासारख्या खोल खड्ड्यात खचत नाही व खोट्याची खोड खोड्यात पाडते.

Friday, May 29, 2020

ढासळला वाडा: कथा

ढासळला वाडा: कथा

नुकतेच गावी जाणे झाले. या असल्या बँकेच्या बदली असणार्‍या गावातल्या एकटे राहण्यामुळे मुळ गावी आताशः जाणे होत नाही. अन त्यात माझी बदली मध्यप्रदेशातल्या गुना या जिल्ह्यातील एका खेडेगावी. खेडेगाव अगदीच आडमार्गाला असल्यामुळे तेथे सामान्य सुविधादेखील नव्हत्या. केवळ प्रमोशन टाळायचे नव्हते म्हणून ही बदली स्विकारली. मोठा दुद्दा मिळाला पण त्यासाठी कुटूंबाला नागपूरलाच ठेवावे लागले. मोठा मुलगा इंजिनीअरींगला नागपूरलाच होता. लहानगीचे कॉलेज, मिसेसचा खाजगी शाळेतील जॉब नागपूरलाच असल्याने त्यांना नागपूर शहर सोडवत नव्हते. मी देखील इतक्या दुरवरून प्रत्येक आठवड्यातून अप डाऊन करणे टाळत होतो. एकतर प्रवासाची दगदग मला आता या रिटायरमेंटच्या वयात सहन होत नाही. अन दुसरे म्हणजे ट्रेनचा सरळ रूट नाही. बस किंवा इतर वाहनांनी मला प्रवास सहन होत नाही. त्यामुळे महिन्या दिड महिन्यात मी नागपूरला चक्कर मारत असे. 

असाच एकदा नागपूरला आलो असता या वेळी मात्र मुद्दामच गावी चक्कर मारावी लागली. एका नातेवाईकाच्या मुलीसाठी स्थळ सोधण्याचे काम होते. ते गाव आमच्या मुळ गावाच्या नदीच्या पलीकडे एक किलोमीटर अंतरावर होते. मी नागपूरला आलेलोच होतो. पुढे दोन दिवस गुडफ्रायडे, शनिवार, रविवार अन माझी रजा अशी पाच एक दिवसाची सुट्टी होती. त्याच्या मुलीला पहायला आलेल्या मुलाच्या स्थळाची चौकशीसाठी त्याला गावी जाणे भाग होते. मी त्याच भागातला असल्याने माझी झालीच तर मदतच होईल अशा अर्थाने त्याने मला तिकडे येण्याविषयी त्याने आग्रह धरला होता. मी तयारच होतो. वेळ मिळाला तर गावाकडच्या घराकडे चक्कर मारता येईल असा विचार होताच. त्याचे काम झाल्यावर मी स्वतंत्रपणे नागपूरला येईल असे त्याला सांगितले. सकाळीच आम्ही नागपूर सोडले अन त्याच्या खाजगी कारने गावी निघालो.

गावी आता फार काही राहीले नाही आमचे. एक मोठा वाडा आमच्या कुटूंबाचा होता. लहाणपणी माझे वडील, त्यांचे सख्खे चार भाऊ, तिन बहिणी, त्यांचे दोन चुलत भाऊ त्या वाड्यात राहत असत. वाडा भला थोरला दोन मजली होता. बाजूलाच त्यांचा सावत्र चुलत भाऊ अन त्याचा परिवार राहत होता. झालेच तर नातेवाईक, नातेवाईकांचे नातेवाईक असे सारे त्या गावात होते. गावी आमच्या समाजाच्या नावाची गल्लीच होती. मध्यवर्ती असल्याने मुख्य बाजार आमच्याच गल्लीत भरायचा. समाजाची मालकी असलेल्या लाकडी कोरीव काम असलेल्या मोठ्या विठ्ठल मंदीरात लग्न कार्ये होत.    

लहाणपणी काय असेल ते असो पण मोठ्या माणसांतली भाऊबंदकी आणि त्यावरून होणारी भांडणे मला समजायची नाही. एकतर माझ्या वडीलांचीही बदली होत असे. त्यामुळे गावी वाड्यावर जाणे अन राहणे हे शालेय सुट्या अन काही कार्य असेल तरच होई. इतर वेळी आम्ही त्यांच्या बदलीच्याच गावी राहत असू. नाही म्हणायला गावातून कोणी आमच्या घरी आले तर ते शेतातले धान्य, भाज्या किंवा तत्सम वस्तू आणत. तेवढाच गावाचा संबंध. बाकी गावाची शेती वडील आणि त्यांच्या भावांच्या एकमेकातल्या भांडणात, चुलत भावांच्या व्यसनाधीनतेत कमी कमी होत गेली. मी, माझे चुलत भाऊ नोकर्‍यांमुळे गावातून बाहेर पडलो होतो. वडिलांची पिढी खपल्यानंतर गावाच्या जमीनीचा वारस कोण किंवा वाडा आहे की पडला याचीही काही खबरबात मला नव्हती. एकप्रकारे गावापासून मी तरी नोकरीमुळे तुटलो होतो. नाही म्हणायला अधून मधून गावाकडून एखादी लग्नपत्रीका किंवा कुणी नातेवाईक गेल्याची बातमी यायची. तेवढाच गावाशी संबंध. 

ड्रायव्हरने रस्त्यात चहा पिण्यासाठी गाडी रस्त्यात एका हॉटेलपुढे थांबवली अन मी माझ्या जुन्या विचारांतून बाहेर पडलो. आता यापुढील रस्ता कच्चा असल्याने स्थळ असलेल्या गावी पोहोचायला कमीत कमी एक तास तरी लागेल असे त्याने बोलून दाखवले. आम्ही सार्‍यांनी नाश्टा चहा घेतला अन निघालो. उरलेल्या प्रवासात मला छान झोप लागली. साधारण अकराच्या सुमारास आम्ही नातेवाईकाच्या स्थळाच्या गावी पोहोचलो. चहा पाणी होईपर्यंत बोलण्यातून आमची ओळख निघाली. जुने संदर्भ, धागे जुळले. बरोबरच्या नातेवाईकाने मुलाची चौकशी केली. त्यांचे पुढे एकदोन बैठका घेण्याचे ठरले अन जेवण करण्याची वेळ झाल्याने आम्ही तेथेच जेवणे केली. नातेवाईक तेथे थोडा वेळ अजून थांबणार असल्याने मी सर्वांचा निरोप घेवून मी गावी जाण्यास निघालो.

मधली नदी अन त्यावरील पुल ओलांडला की लगेचच माझ्या गावी पोहोचणे होणार होते. केवळ एखाद किलोमीटरचा प्रश्न होता. परंतु तेवढ्या अंतरासाठीही प्रवासी रिक्शा तेथे हजर होत्या. वास्तविक हा पुल आणि रस्त्याचा हा भाग म्हणजे माझ्या गावाच्या मागचा भाग होता. गावाच्या समोरून जाणारा व तालूक्याला जोडणारा रहदारीचा मुख्य रस्ता बरोबर या पुलाच्या विरूद्ध दिशेला होता. तिकडेच बस स्टॅंड होता. मी जर बसने गावी गेलो असतो तर मला त्या बाजूलाच उतरावे लागले असते. पण एका बस स्थानकाभोवती जशी गर्दी असते तशी वाहन-दुकानांची गर्दी या पुलाकडच्या रस्त्यावर झालेली होती. 

मला आठवते, आता असलेला हा पुल पूर्वी नव्हता. नदी काही बारोमास वाहणारी तेव्हाही नव्हती आताही नाही. तेव्हा मात्र पावसाळा अन हिवाळा असे दोन ऋतू तरी नदीला पाणी असायचे हे नक्की. माझ्या चुलत भावंडांबरोबर मी नदीला पाणी असतांना त्यात खेळलोही होतो. मला पोहोता येत नसल्याने काठावर असलेल्या थोड्या पाण्यात मी पडून राही. गावातल्या स्त्रीया नदीवर घुणे धुत. नदीत दगड वगैरे असे काही नव्हते. मऊशार वाळूच वाळू होती. तेव्हा नदीतून वाळू काढण्याचे प्रकार होत नसत. नदीचे सर्व पात्र पावसाळ्यात पाण्याने भरलेले असे. त्या नदीपात्रातच गावाची यात्रा भरत असे. उन्हाळ्याच्या सुटीत आम्ही त्या पात्रात पाणी नसल्याने पतंग उडवणे किंवा क्रिकेटचा डाव आदी खेळत असू. आताच्या काळासारखे त्या काळी क्रिकेटचे प्रस्थ नव्हते. गावातल्या सोनार कुटूंबात असलेल्या मुलाकडे क्रिकेटची बॅट होती. त्यामुळे त्याला खेळात घेतले जाई. काहीच खेळ जरी नसला तरी केवळ भटकायला म्हणून आम्ही लहान मुले नदी किंवा आसपास फिरत असू.

मी पुलावरून चालत गेलो. नदीला अर्थातच आताही पाणी नव्हते. आजूबाजूचा बराचसा भाग पूर्वीपेक्षा जास्त  रखरखीत, भकास वाटला. रस्त्यातील शेतं, त्यातली घरे, विहीरी यांची पूर्वीची ओळख पुसल्यासारखी झाली. दोन गावाच्या जवळील रस्ता असल्याने आजूबाजूला आता घरे झाली होती. पूर्वी याच भागात शेते किंवा खळे होती. रस्ता सुनसान असायचा. आमच्या गावाला येण्यासाठी नदीतून वर चढावे लागे. त्या चढावाच्या रस्त्यावर बैलगाडी चढतांना बैलांची दमछाक होत असे. आता मी पुलावरून आमच्या गावात शिरलो तेव्हा त्या चढाचे नामोनिशाणदेखील राहीले नव्हते. अगदी सपाट रस्त्याने काहीही श्रम न पडता मी गावात शिरलो होतो. गावात शिरतांना लागायचे ते वडाचे झाड होते तसेच होते. मात्र त्या खाली आता टपर्‍या अन हातगाड्यांनी वेढा दिला होता. माझ्या लहाणपणी तेथे सायकल रिपेअरचे मुसलमान चाचाचे केवळ एकच दुकान होते. मला आठवते, त्या दुकानातून आम्ही भावंडे लहान सायकली तासावर भाड्याने घेत असू. भाड्याने देण्यासाठी असलेल्या इतर मोठ्या सायकली देखील रांगेने तेथे लावलेल्या असत. गावातील गरजू किंवा फिरते विक्रेते अशा सायकली भाड्याने घेत. त्या दुकानाचा बहुदा मालक किंवा वरीष्ठ असलेला तो पांढरी दाढीधारी चाचा एका साधूप्रमाणे डोळे झाकून स्वस्थ बसलेला असे. केवळ पैसे घेणे-देण्याचेच काम तो करी. सायकली दुरूस्त करणारे त्याचे भाऊबंद त्याला ओरडून गिर्‍हाईकांचे किती पैसे घ्यायचे ते सांगत. आता ते दुकान होते त्या पेक्षा छोटे झालेले दिसले. भाड्याने देण्याच्या मोठ्या सायकली दिसल्या नाहीत. मोटरसायकलींच्या जमान्यात आजकाल कोण सायकल अन ती सुद्धा भाड्याची असलेली वापरणार? गल्यावर बसणारे दाढीधारी चाचा काही दिसले नाहीत. अर्थात ते केव्हाच निवर्तले असावे. ते तेथे असण्याची अपेक्षाच चुकीची होती. मध्ये पन्नास एक वर्षांचा कालावधी गेलेला होता. जुन्या ओळखीच्या खुणा बदलल्या असणारच. 

वडाच्या झाडाखाली बकाल परिस्थिती झालेली दिसली. तेथली हॉटेले, हातगाड्या, कटिंगची दुकाने आदी सारे सारे इतर गावांच्या सुरूवातीला असते तसे वातावरण तयार करत होते. त्या देखाव्याला एकजिनशीपणा म्हणाल तर होता किंवा नव्हता. नव्हता अशा अर्थाने की तेथेल्या टपर्‍या अन दुकानांमुळे नदीकाठाच्या माझ्या मनात असलेल्या दृष्याला कोठेतरी तडा गेल्याचे मला जाणवले. वडाच्या झाडाच्या आजूबाजूला बरेच मोकळे वातावरण पूर्वी होते. तेथून चारशे पाचशे मीटर अंतरावर एका साधूच्या समाधीचे मंदीर आधी होते त्या पेक्षा मोठे केलेले दिसले. आधीचे मंदीर लाकडी अन छोटेखानी होते. आता ते आधूनिक पद्धतीने विटा-सिमेंटमध्ये बांधलेले होते. मंदीरावरील कळस, कंपाऊंडची भिंत लांबूनही दिसत होती. त्या मंदीराच्या बाजूला एक मोठी विहीर होती. आताही असावी. तिचे पाणी त्या महात्म्याच्या पुण्याईने कधी न आटणारे समजले जाई. पण एका उन्हाळ्याच्या सुट्टीत मी गावी गेलो असता ती विहीर कोरडी पडल्याचे मी पाहीले होते.

तेथून जवळच एका मोकळ्या जागी ग्रामपंचायतीने तयार केलेली व्यायामशाळा तेव्हा होती. तेव्हाची ती बैठी खोली तेथेच होती पण तिची बरीच पडझड झालेली दिसली. तेथे त्या काळी लहान असलेले पिंपळाचे झाड मात्र मोठे झालेले दिसले. थोडे पुढे आल्यानंतर माझ्या मोठ्या चुलत्यांच्या मित्राचे ‘उपाध्ये हॉटेल’ आणि त्यांचे घर असलेली इमारत लागे. त्या इमारतीपासूनच खरे गाव सुरू होत असे. हॉटेलीत पेढे बनवतांना जो कुंदा तयार होत असे तेव्हा माझे चुलते आम्हा लहानांना तेथे नेत असत. आम्ही सारे लहान भावंड डुगडुगणार्‍या टेबल बाकड्यांवर बसून तो गरम कुंदा खात असू. काका तसे हौशी होते. यात्रेत सर्कस पाहण्यास तेच नेत. निरनिराळी खेळणी मागीतली असता त्यांचा नकार आलेला कधी पाहीला नव्हता. फार लवकर गेले बिचारे. आताही ते हॉटेल तेथे होते. रस्ता आता उंच झाल्याने ते हॉटेल असलेली इमारत खुजी दिसत होती. हॉटेलची पाटी जुन्याच पद्धतीने ऑईल पेंटमध्ये रंगवलेली पत्र्याची होती. आधूनिक फ्लेक्सच्या जमान्यात ती अगदीच विजोड वाटत होती. दुकानाची रयाही गेलेली दिसली. माडीवर लोखंडी ग्रील टाकून इमारत विभागली गेलेली दिसली. एका बाजूला लाकडी जीना होताच पण दुसर्‍या बाजूने लोखंडी जीना तयार केलेला दिसला. वाढत्या संसाराबरोबर उपाध्यांच्या वारसांनी इमारतीची वाटणी केल्याचे पाहताक्षणीच समजत होते. हॉटेलात जावून जुनी ओळख वगैरे दाखवावी हा विचार मनात होता. पण का कोण जाणे एकप्रकारे अनोळखी किंवा अलिप्त राहत गावात जे जे पहायला मिळेल ते ते पहावे असा विचार बळकत होत गेला आणि मी तेथे न थांबता पुढे निघालो. 

पुढे एक शाळेची इमारत होती. तेथे बाजूलाच बैठ्या खोलीत त्या काळी दहा बारा विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय संस्थेने केलेली होती. आता त्या शाळेच्या इमारतीच्या वर एक मजला चढवून त्यावर पत्रे टाकलेले दिसले. खाली जुने दगडी बांधकाम आणि वरचा मजला वीटकामातला अशी ती इमारत डोळ्यांना अजिबात चांगली दिसत नव्हती. त्यातच वीटकामाला साधे प्लास्टरही केलेले नव्हते. शाळेसमोर मोठे मातीचे पटांगण होते त्या काळी. लहाणपणी तेथे खो-खो चे खांब रोवलेले आणि कबड्डी साठीचे मातीचे रेखीव मैदान होते. आता तेथे आजूबाजूला घरे आली. पटांगणात तर वाळू, वाहनतळ समजून पार्क केलेल्या गाड्या अन छोटे टेंपो यांची गर्दी झालेली होती. रस्त्याच्या बाजूने चार पाच दुकानांसाठी गाळे काढून ते भाड्याने देऊन संस्थेने कायमस्परूपी उत्पन्नाची सोय केलेली दिसली. एकुणच समाजसंस्था व्यावसायीक झाल्याचे ते द्योतक होते. वास्तवीक आहे तीच इमारत छान बांधता आली असती. मैदानाची देखभाल करून राखून ठेवता आले असते. संस्थेने सरकारी अनुदान कल्पकतेने वापरले पाहीजे होते.

त्याच्याच पुढे जिल्हा परिषदेने बांधलेली वर्ग एक ते चारची कौलारू इमारत आहे तशीच होती. आताचा दिसणारा बदल म्हणजे शाळेच्या आजूबाजूला बांधलेले दगडी कंपाऊंड. माझे चुलत भावंड याच शाळेत शिकून मोठे झाले होते. एक दोन भावंडांना मी मोठा म्हणून त्यांना शाळेत सोडायला देखील गेलेलो होतो. का कोण जाणे पण मला ती शाळा कधीच आवडलेली नव्हती. त्या भावंडांना शेण गोळा करून शाळा सारवायला देखील लागे. बदलीच्या गावी माझी शाळा या शाळेपेक्षा कितीतरी पटींनी चांगली होती. लहाणपणी शाळेची तुलना करायचो तशी तुलना आताही माझ्या डोक्यात होत होती. 

डाव्या हाताला वळून आता मी गावाच्या मुख्य भागाकडे वळलो. सुरूवातीलाच होत्या त्याच जागी ग्रामपंचायतीची इमारत आता सिमेंट मध्ये बांधलेली दिसली. इमारतीच्या वरतीच तलाठी कार्यालायाचादेखील   फलक लावलेला दिसला. माणसांच्या गर्दीने ती इमारत व्यापलेली होती. आजूबाजूला एक दोन हॉटेल आणि किराणा दुकान होती. झेरॉक्स काढून मिळेल अशा अर्थाचे पिवळे बोर्ड उन्हात नजरेला त्रास देत होते. एका अर्थाने माझे हे गाव आजूबाजूच्या पंचक्रोषीत मोठे अन टुमदार होते. नदीच्या पाण्याने आजूबाजूला बागायती होती. गावाच्या ग्रामपंचायतीला आजूबाजूची चार एक खेडीही जोडलेली होती. शेतीमाल, भाजीपाला अन अन्यधान्य यांनी शनिवारी भरणारा आठवडी बाजार गजबजून जाई.
 
आठवडे बाजाराचे मैदान सोडून मी सरळ निघालो अन आमचा वाडा असणार्‍या गल्लीत शिरलो. गल्ली खूपच बदलेली दिसली. सुरूवातीच्या दोन घरांमध्ये असलेले शिंपीकामाचे दुकान आता तेथे नव्हते. त्या काळी हे दुकान खूपच उंचावर होते. लाकडी पायर्‍या चढून आत शिरावे लागे. माझ्या आजोबांच्या काळात मला एकदा तेथूनच शाळेचा गणवेश शिवला होता. आता केवळ ते दुकानच नव्हे तर सगळी गल्लीच बुटकी वाटायला लागलेली होती. खूप दिवसांनंतर एखादी वस्तू पाहील्यावर ओळख पटेनाशी होते तसे माझे झाले होते. त्या घराशेजारीच आमच्या एका नातेवाईकाचे घर होते. त्या काळी ते नातेवाईक गावचे मोठे प्रस्थ होते. शेतजमीन भरपूर असल्याने त्यांच्या लाकडी इमारतीच्या दर्शनी भागात धान्याने भरलेल्या पोत्यांच्या थप्या लागत. इमारत देखील गेरू अन चुन्याच्या रंगाने रंगवलेली दिसे. आता आहे त्या इमारतीला गेल्या कित्येक दिवसांत रंग तर सोडाच पण तेथे झाडलेले देखील जाणवत नव्हते. पुर्वीची लाकडी दारे जावून आता तेथे लोखंडी दरवाजे दिसत होते. त्या सलग चार एक खोल्या होत्या. कधी काळी मी त्या खोल्यांमध्ये गेलोही होतो. आता तेथे जाण्याचे काहीच कारण नव्हते. 

लांबून पाहीले असता आमची गल्ली तिरपी तिरपी पुढे गेल्याचे तुम्हाला आढळेल. पूर्वी गाव वसेल तसे वसत असे. ज्याची जशी जागा आणि ऐपत तसे बांधकाम ज्याने त्याने केलेले असे. आताही पूर्वी होते तेच घरे, वाडे कुणी सांभाळले होते किंवा पडले, लक्ष न देता आले म्हणून बख्खळ सोडले होते. पूर्वी होत्या त्या घरांसमोरील सांडपाण्याच्या गटारी होत्या तशाच होत्या. फक्त त्या वेळचे मातीचे रस्ते जाऊन आता सिमेंटचे रस्ते आलेले होते. त्या रस्त्यांच्या भर टाकण्यामुळे आहे ती घरे रस्त्याच्या खाली गेलेली होती. आधी घरांत शिरतेवेळी कमीतकमी तिन चार पायर्‍या चढाव्या लागत. आता पायर्‍या चढणे दुरच उलट काही घरात शिरण्यासाठी खोल पायर्‍या केलेल्या आढळल्या. एका मोकळ्या जागी पाण्यासाठी हातपंप त्या वेळी होता. आता तेथे हातपंप काढून जलपरी असलेली मोटर लावून ते पाणी नळाद्वारे पुढे नेलेले दिसले. बहूदा नळाच्या पाण्याची सोय ग्रामपंचायतीने तेथूनच केलेली असावी. पुढे आलो असता आमचा पडका वाडा दिसला. वाड्याची सद्यस्थिती पाहून नकळत डोळ्यात आसवे दाटून आली. 

एकेकाळी याच वाड्यात आम्ही राहीलो, खेळलो होतो. वर्षाचा दिवाळीसारखा सण सारे काका चुलते, भावंड एकत्र साजरे करत असू तेव्हा गल्लीत आमच्यासारखी शोभा कुणाचीच नसे. मोठ्या काकांना फटाके फोडण्याचा मोठा शोक. त्या काळीही ते हजार हजार रुपयांचे नव्या फॅशनचे फटाके निवडून निवडून आणत. आमच्या वाड्याच्या एका तुळईला दोर्‍याचे एक टोक अन थोडे पुढे असलेल्या रस्त्यावरील विजेच्या खांबाला दुसरे टोक बांधून त्यावर आगगाडी असलेला फटाक्याचा प्रकार ते लावत. ती आगगाडी असलेला फटाका या टोकापासून सुरू होवून समोरील विजेच्या खांबाला धडकून पुन्हा आमच्या वाड्यापर्यंत आला की आम्ही लहानगे जल्लोष करत असू. संपुर्ण गल्ली फटाक्याचा हा प्रकार पाहण्यासाठी आमच्या वाड्यापुढे जमे. त्यामुळे चुलते हा प्रकार सर्वात शेवटी पेटवत. त्या आधी आम्ही लहान मुले लवंगी आणि लक्ष्मी फटाके फोडत असू. एके दिवाळीला चुलत्यांनी फुलझाड असणारा नविन प्रकार आणला होता. एका नळकांड्यच्या आकाराचा तो फटाका आधी फुलझाड म्हणून पेटे आणि ते फुलझाड संपले की त्याचा फटाक्यासारखा स्फोट होई. त्या ऐन लक्ष्मीपुजनाच्या  दिवशी तसले एक दोन फुलझाड व्यवस्थित पेटले अन फुटले. चौथा फटाक्याचे फुलझाडही पेटले पण फुलझाड संपत आले तेव्हा त्या फटाक्याचे नळकांडे आडवे झाले आणि त्याचा पुढचा प्रकार असणारा फटाका जोरात फुटला. तो जसा फुटला त्याच्या ठिणग्या समोरील घराच्या व्हरंड्यात खेळणार्‍या लहान मुलीच्या नव्या फ्रॉकला भिडल्या. फ्रॉकने पेट घेतला. आम्ही लहान तर घाबरलोच. लगोलग इतर चुलते, त्या मुलीचे पालक पळत गेले आणि त्यांनी ती आग विझवली. त्या मुलीला काही इजा झाली नव्हती म्हणून अगदी थोडक्यात निभावले. त्या वेळेपासून काकांनी असले नव्या प्रकाराचे फटाके आणणे बंद केले. 

आता त्या वाड्यात दिवाळी साजरी करणारे कुणीच उरले नसल्याचे माझ्या लक्षात आले. उमाळा येवून तेथेच रडे फुटते काय असा भास मला झाला. मी स्वत:ला सावरले. काळ किती निष्ठूर असतो याची प्रचीती मला येत होती. तिन पिढ्या आनंदाने नांदवणारा वाडा आता पोरका झाला होता. त्याची देखभालदेखील करणारा आता कुणीच उरला नव्हता. चुलत भावडांपैकी आता कुणीही त्या वाड्यात राहत नव्हते. प्रपंच चालवण्यासाठी शेतावरील घरात राहणे त्यांना भाग होते. भावकीच्या वाटणीत माझ्या वडीलांच्या वाट्याला काही न आल्याने, पर्यायाने मी तेथला कागदोपत्री वारस नसल्याने तो एवढा मोठा वाडा मला असून नसल्यासारखा झाला होता. वाड्याचा वरचा मजला कधीच पडलेला असावा. होते ते सागवान लुटल्या गेलेले दिसले. जर होता तोच वाड्याचा साठा निट उतरवला असता तर कुणी त्या लाकडाला खरेदीदारही भेटला असता. परंतु भाऊबंदकी फार वाईट. मला मिळाले नाही तरी चालेल पण इतरांना मिळू देणार नाही ही वृत्ती त्या भरलेल्या वाड्याच्या नाशाला कारणीभूत ठरली होती. वाड्याचा दर्शनी भाग थोडाफार शाबूत होता. मुख्य दरवाजाला कुलूप जरी लावलेले दिसत असले तरी बाजूच्या भिंती पडक्या होत्या. मुख्य दरवाजाशेजारी असलेल्या खोलीला देखील कुलूप होते. परंतु त्या खोलीत चुलतभावांचा वावर असावा. बाहेर एक सायकल उभी होती. झालेच तर झोपण्यासाठीची एक खाटही तेथे होती. वाड्याच्या आतमध्ये मात्र बरीच पडकी माती, घराचे काही भाग तसेच एक बाभळीचे झाडही होते. कधी काळी माझ्या आजोबा आजीने वाड्यासाठी कष्टाने उचलेले दगड भिंतीतून निखळले होते. काही दगडांचीही उनपाऊस खाऊन माती झाली होती. होती ती लाकडे कुजली होती. जळणासाठी चोरून नेण्याच्याही लायकीची ती उरली नव्हती. कधी काळी लग्न कार्यात शे-दोनशे पाने उठवणारा वाडा आज सुना झालेला होता. कित्येक वेळा शेतातली गडी माणसे रात्रीच्या वेळी आधार म्हणून वाड्यात मुक्कामाला राहीली होती त्याच वाड्यात आता उंदीर घूस यांनी घरे केली होती. वाड्याचा साठाच तुटका झाला होता. ज्या कोनाड्यांमध्ये दिवाळीच्या पणत्या तेवल्या होत्या तेथे काजळीचा अंधार पसरला होता. एक भग्न वास्तू पाहून मन विषण्ण होत होते. तिकडे न पाहताच तेथून निघून जाण्याचे मन करत होते. डोळ्यात आसवे साठलेलीच होती. ती खळ्ळकन गालावर कधी आली ते मलाच समजले नाही. कमीतकमी एक विधवा आत्या तरी तेथे असावी अशी माझी अपेक्षा फोल ठरली होती. एकटी बाईमाणूस या पडक्या पसार्‍याला कोठे पुरे पडणार होती? ती देखील आता या वयात या वाड्यासारखीच विदिर्ण, उध्वस्त झाली असावी. तो वाडा म्हणजे एक सांधता पुल होता. जुन्या-नव्या पिढीला सांधणारा. तो तर कोसळलाच होता. आमच्यासारखी नोकरी करणारी भावंडे पांगली गेली होती. आपुलकीचे वस्त्र असणारे आठवणींचे धागे उसवले होते. वेळीच सावरायला कुणीच कसे पुढे आले नाही याची खंत मनात होती. वाडा लयाला जाण्यामागे प्रत्येकाचे संसार- पाश, भांडण, कमाईचे स्त्रोत कमी होत जाणे, शारिरिक दुखणी, त्यापायी होणारा खर्च, एकमेकांतला दुरावा आदी कारणे निश्चितच कारणीभूत होती. आता कितीही ठरवले तरी तो वाडा उभा राहणे शक्य नव्हते. त्याचप्रमाणे नव्या नातवंडांच्या पिढीला ते आवश्यकही नव्हते. जे जुन्या पानावर आहे तेच पुढल्या पानावर चालू ठेवणे हेच सध्याच्या घडीला हितकारक ठरू पाहत होते. उगाचच फुकाचा बडेजाव करण्यात काही अर्थ नव्हता. तरी पण एखाद्या जीवंत माणसाप्रमाणेच तो वाडा आता खंगून खंगून कणाकणाने मरत होता. वास्तूमध्येही जीव असतो असे म्हणतात. खरेच असावे ते. कारण वाड्याच्या कण्हणे जणू मला ऐकू येत होते. 

त्या वाड्यासमोर मी किती वेळ उभा होतो याचे मला भान नव्हते. एवढ्या उन्हात दुपारच्या वेळी कुणी बाहेर नव्हते म्हणून बरे झाले. मलाही माझी ओळख करवून द्यायची इच्छा नव्हती. मनाचे पाश तोडून मी तेथून पुढे निघालो. थोडे दुरवर असलेल्या चुलत भावाच्या घराकडे नजर टाकली. तो तेथेच राहत असावा अन त्याचे एकूण बरे चालले असावे. घराबाहेर एक मोटरसायकल होती. एक पाळणाही हालत असल्याचा आवाज येत होता. आजूबाजूची घरेही एका वेगळ्याच तंद्रीत असल्यासारखी ढेपाळली होती. एक दोन घरांना नवा रंग दिला जरी असला तरी घरांची ठेवण काही वर्षे मागची होती. कुणी आहे त्याच खोलीचे दोन भाग केले होते. कुणाचा आहे तो जीना पाडून दुसरा लोखंडी जीना तयार केला होता. काही घरे पडीक झालेली होती तर ज्यांची ऐपत होती आणि गरज होती त्यांनी जुनी घरे पाडून नवी केलेली होती. 

मनात विचारांची जंत्री चालू होती. आठवणींचे कढ बाहेर पडत होते. येथे आलो नसतो ते बरे झाले असते असे एक मन सांगत होते. मला थोडे थकल्यासारखे झाले होते. चुलत भावाच्या घरी जाऊन ओळख काढून पाणी तरी प्यावे असे वाटत होते. पण न जाणो ते घर त्याने भाड्याने दिले असेल अन तो स्वत: शेतात राहत असेल असाही विचार माझ्या मनात आला. मी थोडा मानसिकदृष्ट्या स्थिरावलो आणि त्या शांत गल्लीच्या दुसर्‍या टोकाने मी बाहेर पडलो. 

आता त्या लहानशा गावात फिरण्यात काही अर्थ नव्हता. एकतर ऐन एप्रिल महिन्यातील उन्हाळ्याचे दुपारचे उन आता चांगलेच जाणवू लागलेले होते. त्यात मी किमान अडीच एक किलोमीटर तरी चाललो असेल. मुख्य  म्हणजे मनानेही मी खचलो होतो. कोठेतरी थांबण्यापेक्षा सरळ बसस्टॅंडकडे जावे असा विचार केला. मुख्य बाजारपेठेत दुकानांची गर्दी होती. पुढे दुकान आणि मागे घर अशी प्रत्येक खेड्यात असते तशी रचना येथेही होती. शहरात असतात तसलेच फ्लेक्सवर छापलेले दुकानांचे बोर्ड वर लावलेले होते. तेथेच एक सहकारी आणि एक राष्ट्रीयकृत बॅंकही होती. एखाद्या बॅंकेत जावून विश्रांती घेण्याचा मोह मी टाळला. तेथून बसस्टॅंड जवळच होता. बसस्टॅंडवर पोहोचताच एका फळविक्रेत्याकडून नारळपाणी प्यायला घेतले. थोडे बरे वाटून अंगात हुशारी आली. नागपूरला परत जाण्यासाठी तालूक्याच्या गावाला जाणार्‍या बसची वाट पाहत बसस्टॅंडवर एका बाकावर बसलो.

एका अर्थाने माझे एक दुखरे स्वप्न संपले होते.

- पाषाणभेद
२९/०५/२०२०  

Sunday, December 01, 2019

संदीपची हुषारी

"राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी विद्यानिकेतन हायस्कूल मधील संदीप सर्जेराव कवडे या विद्यार्थ्याची निवड" अशी पेपरमधील बातमी वाचून सर्जेरावांना आपल्या मुलाचा अभिमान वाटला.
"मी साखर कारखान्यावर जावून येतो ग. वेळ लागेल. जेवणाची वाट पाहू नको. गोविंदाला टॅक्टर घेवून डिझेल भरायला पाठवून दे. पैसे टेबलावर काढून ठेवलेत",
सर्जेराव सकाळच्या कामाचे नियोजन करत आपल्या बायकोला सुचना देत होते.
पिंपळदचे सर्जेराव कवडे मोठी आसामी होती. ते प्रतिथयश प्रयोगशील शेतकरी तर होतेच पण सोबतच त्यांचा तालूक्याच्या एमआयडीसीतल्या जागेत एक जॉबवर्कचा कारखानाही होता. सकाळपासून त्यांच्याकडे कामाची रीघ असे. त्यांना बोलायलाही सवड नसे. शेतामध्ये ऊस, कांदे अशी पिके ते घेत. झालेच तर सोबतीला टमॅटो, भाजीपालाही करत. शेतीत गडीमाणसे असल्याने त्यांच्यावर फार लक्ष ठेवून कामे करवून घ्यावी लागत. आताची साखर कारखान्यात जाण्याची लगबग म्हणजे तेथे जनरल बॉडी मिटींग होती अन सर्जेराव तांत्रीक संचालक होते. नवीन क्रशर कशापद्धतीने बसवायचा म्हणजे ऊसाचे गाळप वेगाने चांगले होईल यावर त्यांना आज बोलायचे होते.
"आता साखर कारखान्यावर जातच आहात तर या महिन्याची साखरही घेवून या. ड्रायव्हरकडे कार्ड दिलेय मी. तो आणेल. पण त्याला तेवढा वेळ द्या म्हणजे तो गेटवर जाईल अन घेवून येईल", सौ. रंजना सर्जेराव कवडे गृहीणीच्या काळजीने बोलल्या. साखर कारखान्याचे सभासद असल्याने त्यांना दर महिन्याला त्यांच्या शेअर्सवर त्या वाट्याची साखर मिळत असे. आता कारखान्यावर चक्कर होतच आहे तर साखरही आणणे होईल या हिशोबाने त्या बोलल्या.
"आणि हो, संदीपच्या शाळेत या पंधरा तारखेला, पुढच्या आठवड्यात, शनिवारी वार्षिक स्नेहसंमेलन आहे. कमीतकमी तो दिवस तरी मोकळा ठेवा."
"पाहू. शनिवारचे तसे नियोजन करतो घरीच थांबण्याचे. पण ऐनवेळी काही काम निघाले तर सांगता येत नाही", सर्जेराव सावध बोलले. कामाच्या गडबडीतून बाहेर पडून संदीपचा कार्यक्रम पाहणे शक्य होईल का या बाबतीत ते शाशंक होते.
"संदीप घरी आला की त्याला परवा आपल्या फॅक्टरीत मी घेवून जाईन याची आठवण दे", सर्जेराव पायात बूट चढवित म्हणाले अन ड्रायव्हरला गाडी साखर कारखान्याकडे घ्यायला सांगितली.
संदीप - सर्जेरावांचा धाकटा मुलगा इयत्ता आठवीत तालूक्याला जात असे. आपल्या मुलाच्या स्नेहसंमेलनातील नाटकातील भाग वडिलांनी पहावा अशी संदीपच्या आईची इच्छा असल्याने शनिवारी मोकळा वेळ ठेवण्याची तिने सर्जेरावांकडे आग्रह धरला होता. संदीप जात्याच हुषार अन लहाणपणापासून चपळ होता. निरनिराळे खेळ अन अभ्यासात तो दर इयत्तेत त्याची चुणूक दाखवत असे. त्यामुळे चांगले शिक्षण भेटावे म्हणून सर्जेरावांनी त्याला तालूक्याच्या चांगल्या शाळेत घातले होते. अर्थात तालूका अन शाळा फार काही लांब नव्हती. किंबहूना त्यांचे गाव हे तालूक्याच्या गावाचे उपनगरच गणले जात होते. घरापासून शाळा केवळ पाच सहा किलोमिटर अंतरावर होती. शाळेसाठीचे इतके दुरचे अंतर तर शहरातदेखील असते. शाळेत जा ये करण्यासाठी घरापर्यंत शाळेची बस यायची. त्यामुळे त्या बाबतीत संदीपच्या आईला काही काळजी नव्हती. सकाळी डबा घेवून संदीप सात सव्वासातला घरून निघत असे अन दुपारी साडेतीन पर्यंत घरी येत असे. संदीप वेळच्यावेळी अभ्यास करत असल्याने त्याच्याकडे सर्जेराव अन रंजनाबाईंना लक्ष द्यायची गरज नव्हती.
सर्जेराव कामात व्यस्त जरी असले तरी त्यांचे घराकडे लक्ष होते. संदीपपेक्षा मोठी मुलगी दहावीला होती. अन सर्वात मोठा मुलगा इंजिनीअरींग च्या दुसर्‍या वर्गात होता. मोठा मुलगा आपला स्वत:च्या फॅक्टरीकडे बघेल अशा हिशोबाने त्याला मॅकॅनिकल शाखा घ्यायला लावली होती. झालेच तर त्याने पुढे जावून साखर कारखान्यात मशीन पार्ट्स पुरवठा करण्याचे काम मिळवावे अशीही त्यांची इच्छा होती. आतापासून संदीपलाही ते अधून मधून कारखान्यावर घेवून जात असत.
स्नेहसंमेलनातल्या नाटकात भाग घेतल्यानंतर शाळेतून घरी आल्यानंतर संदीप त्याच्या नाटकातल्या भागाची तयारी करत असे. घराच्या बाजूला अंगणात एका मोबाईलमध्ये नाटकाचे संवाद मोठ्याने लावून तो त्याबरोबर बोलत हालचाली करत असे. बाजूला एक दोन गडी माणसे त्याचे श्रोते होत असत. मग संदीपची आई
कामाचा खोळंबा होत आहे असे पाहून त्या गडीमाणसांना बोलून कामाला लावत असे. या शनिवारचा संदीपचा कार्यक्रम बघण्यासाठी त्याच्या घरातले सदस्य आतूर झाले होते. तो कार्यक्रम पहायला संदीपचा आतेभाऊ सतिश गुरूवारीच आला होता. सतिशदेखील संदीपच्याच वयाचा सातवीतला विद्यार्थी होता. आपल्या मामेभावाच्या तालमीला संध्याकाळी तो हजर होता. संदीपच्या पाठांतराची त्याने जातीने तयारी करून घेतली. पाठांतर अर्थातच छान झाले होते. रात्री जेवण करतांना संदीपच्या वडिलांना उद्या संदीपला सुटी असल्याचे समजले. जेवण संपत आले तेव्हा त्यांनी संदीपला उद्या शुक्रवारी बँकेत एक चेक जमा करायला सांगितला. संदीपला बँकेच्या व्यवहाराची माहिती व्हावी हा त्यांचा हेतू होता. संदीपनेही आनंदाने होकार भरला अन जेवणानंतर टिव्ही बघून तो अन सतिश झोपले.
दुसर्‍या दिवशी, शुक्रवारी स्नेहसंमेलनाच्या आदला दिवसाची सुटी असल्याने संदीप जरा उशिरा उठला. आईने केलेला उपमा अन दूध पिवून तो अन सतिश बँकेत जायला तयार झाले. खांद्यावरील बॅगेत त्याने चेकचे पाकीट अन पिण्याच्या पाण्याची बाटली घेतली. मग संदीप आणि सतिश यांची जोडगोळी सायकलीवर बँकेत जायला निघाली. जिल्हा सहकारी बँकेची शाखा तशी जवळच बाजारपेठेतील गल्लीत होती. बैठ्या इमारतीत बँकेचे कामकाज चाले. लहान गाव असल्याने बँकेच्या शिपायापासून ते मॅनेजरपर्यंत सारे जण संदीपला सर्जेरावांचा मुलगा म्हणून ओळखतच होते. या आधीही संदीप किरकोळ कामे करायला बँकेत आलेला होता. बाजूला अंगणात वाहने थांबवायची जागा केलेली होती तेथे त्यांनी सायकल उभी केली. मुख्य मार्ग लोखंडी दरवाजा आणि त्याला साखळी अशा रचनेचा होता. तेथे बँकेत सुरक्षारक्षक असलेले रामभाऊ चौरे हे आपली बंदूक घेवून उभे होते. त्यांनी संदीपला आज तुझे बाबा नाही आले का तुझ्या बरोबर? असे विचारून त्याच्या सोबत असलेल्या सतिशची चौकशी केली. त्यांना उत्तर देवून हे दोघे भाऊ आत शिरले. सकाळचे सव्वादहा वाजायची वेळ असल्याने अजून बँकेत फारशी वर्दळ नव्हती. सगळा स्टाफ आलेला होता. मॅनेजरसाहेब त्यांच्या कॅबीनमध्ये कुणाशीतरी बोलत होते. कॅश काऊंटरवर चार पाच जण उभे होते. कॅशीअर कॅश मोजण्याच्या कामात मग्न होता. बाजूला तिन क्लार्क त्यांच्या कामात होते. त्यापैकी दोघांसमोर एक एक व्यक्ती खुर्चीवर बसलेली होती.  
संदीपने आपल्या बॅगेतून पेन आणि चेक काढला आणि कॅश काऊंटरच्या बाजूला भरणा करण्याच्या स्लिप असलेल्या टेबलकडे गेला.  सतिशही त्याच्या बाजूला असलेल्या बाकावर बसण्याच्या तयारीत होता. संदीपने बॅग सतिशकडे दिली आणि तो चेक जमा करण्याचे चलन लिहू लागाला. तेव्हढ्यात मुख्य दारातून एक दाढी राखलेला व्यक्ती आत शिरला आणि आत येताच त्याने हातातील पिस्तूल दाखवत ओरडला,
"खबरदार, कुणीच हलू नका. जागेवर उभे रहा. कुणी मोबाईलदेखील काढू नका. नाहक मला गोळ्या झाडाव्या लागतील."
या अशा ओरडण्याने बँकेत उपस्थित असणार्‍या सर्व लोकांच्या मनात भिती दाटली. बँकेत दरोडा पडलेला होता. नक्की काय करावे हे कुणालाच सुचेनासे झाले.
त्यानंतर आलेल्या आणखी दोन जणांनी सुरक्षारक्षक असलेल्या रामभाऊंच्या हातातली बंदूक हिसकावली आणि एकजण त्यांच्या जवळच थांबला. उरलेला दुसरा व्यक्ती मॅनेजरसाहेबांच्या कॅबीनकडे पळाला. कॅश काऊंटरवर त्यांचा एक साथीदार आधीच रांगेत पैसे भरण्याच्या बहाणा करत उभा होता. तो कॅशिअरवर ओरडला, "गडबड करू नको. आहे ती कॅश ड्रावरमधून काढून वर टेबलावर काढून ठेव." त्याने हाततल्या पिशवीत पैसे भरण्याची तयारी केली.
कॅश काऊंटरजवळ हि गडबड उडाली असतांनाच सतिश आणि संदीपने पाहिले की मधल्या मोकळ्या जागेत एक जण हातात पिस्तूल घेवून उभा आहे आणि दुसरा मॅनेजरच्या कॅबीनकडे पळत जात आहे. त्या दरोडेखोराने पळत जावून मॅनेजर साहेबांसमोरील व्यक्तीला खुर्चीतच बसायला सांगितले आणि मॅनेजरसाहेबांना त्यांच्या खुर्चीला दोरखंडाने बांधले. इकडे तो दाढी असलेला इसम हातातील पिस्तूल रोखत कॅशीअरकडे जाण्यासाठी वळाला. तेव्हढ्यात संदीपने त्या दरोडेखोराचे आपल्याकडे लक्ष नसल्याचे पाहून चपळाईने सतिशला बाकावरून उठवले आणि तो बाक मोठ्या ताकदीनिशी त्या पिस्तूलधारीच्या पायाकडे ढकलला. ते ढकलत असतांनाच तो मोठ्याने ओरडला, "सतिश पळ, रामभाऊकाकांना सोडव."
संदीपच्या ओरडण्याने सतिशलाही क्षणभर काय करावे ते समजले नाही. पण तो तात्काळ सावरला आणि दरवाजाकडे पळाला. संदीपच्या आवाजाने आणि सतिशच्या पळण्याने दाढी असलेला दरोडेखोर भांबावला. तेवढ्यात त्याच्या पायांवर संदीपने ढकललेला बाक आदळला. त्या वेदनेने तो कळवळला आणि तोल जावून खाली पडला. तेव्हड्या वेळात सतिश रामभाऊंकडे पोहोचला होता. रामभाऊंची बंदूक घेतलेला दरोडेखोर थोडा आरामातच होता. सतिशने त्याला धक्का दिला. रामभाऊही संधी बघतच होते. त्यांनी तात्काळ शेजारच्या दरोडेखोराकडून आपली बंदूक हिसकावली आणि बंदूकीच्या दस्त्याने त्या दरोडेखोराला मारले. त्याचा ताबा आता रामभाऊंनी घेतला होता.
मुख्य पिस्तूलधारी दरोडेखोर बाकामुळे पडलेला पाहून आणि रामभाऊंनी एका दरोडेखोराला ताब्यात घेतलेले पाहून बँकेच्या दोन कर्मचार्‍यांनी काऊंटरवरून उडी मारून त्याच्या हातातले पिस्तूल ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला. बँकेत आलेल्या एका ग्राहकाने त्या दरोडेखोराच्या हातावर जोरदार पाय मारला. त्या दणक्याने ते पिस्तूल त्या दरोडेखोराच्या हातातून गळून बाजूला फेकले गेले. एका कर्मचार्‍याने ते पिस्तूल ताब्यात घेतले.
इतक्या वेळात मॅनेजरसाहेबांनी संधी साधून पायाच्या गुढग्याने त्यांच्या टेबलाखाली बसवलेल्या संकटकाळी सायरन वाजवायचे बटन दाबले. तात्काळ सायरनचा भोंगा वाजू लागला. हे सर्व इतक्या कमी क्षणात घडले की कॅश काऊंटरवरचा आणि मॅनेजर साहेबांच्या कॅबीनमधले दोघेही दरोडेखोर भांबावून गेले. भोंगा वाजायला सुरूवात होताच बँक ज्या रस्त्यावर होती तेथील आजूबाजूच्या दुकानातील लोक काय घडले हे पाहण्यासाठी बँकेच्या दिशेने धावले. त्यात जे पुढे होते त्यांना घडलेला प्रकार तात्काळ लक्षात आला. त्या लोकांनी प्रथम रामभाऊंच्या ताब्यातील दरोडेखोराला पकडले. सर्वत्र आरडाओरड चालू झाली. त्या गर्दीतील कुणीतरी व्यक्तीने पोलीसांना फोन केला.
आता ते चारही दरोडेखोर गावातल्या आणि बँक कर्मचार्‍यांच्या ताब्यात होते. मॅनेजरसाहेबही आता दोरखंडातून सुटलेले होते. बाहेर वाहनाचा सायरन वाजवत पोलीस आले. त्यांनी ताबडतोप परिस्थीतीवर नियंत्रण मिळवले आणि चारही दरोडेखोरांना ताब्यात घेतले.
पोलीस इन्स्पेक्टरांना बँकेच्या मॅनेजरांनी घडलेली सारी गोष्ट सांगितली. दरोडेखोर कसे आले, त्यांनी लोकांना कसे धमकावले आणि संदीप व सतिश यांनी ज्या चतूराईने धावपळ करत बाजू उलटवली ते ऐकून इन्स्पेक्टर अगदी आश्चर्यचकीत झाले. इतक्या कमी वयाच्या संदीपने बाक फेकून आपल्या धाकट्या आतेभावाला ज्या सुचना दिल्या ते ऐकून त्यांनी संदीपच्या चतूराईचे कौतूक केले. सतिशनेही त्याची कामगिरी चोख बजावलेली होती. त्याच्या धावपळ करण्याने इतर दरोडेखोरांचे लक्ष पांगले होते. इन्स्पेक्टर साहेबांनी त्या दोघा मुलांचे तोंडभरून कौतूक केले. त्यांनी तात्काळ संदीपच्या वडीलांना फोन करून हि बातमी सांगितली. सरकारदरबारी उच्चपदी या दोन मुलांच्या धाडसाची बातमी मी स्वतः सांगून शुर बालकांसाठी असलेल्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी शिफारस आणि त्यासाठी पाठपुरावा करेन याचे आश्वासन दिले.
दुसर्‍या दिवशी संदीपच्या शाळेच्या स्नेहसंमेलनात संदीप आणि सतिशचा भव्य सत्कार करण्यात आला. कधी वेळ न मिळणारे सर्जेराव या सत्कारसमारंभाला आणि संंदीपच्या नाटकाला आवर्जून उपस्थित होते हे सांगणे न लगे.

Sunday, October 13, 2019

जुळे नवरे, जुळ्या नवर्‍या

एका पुरूषांच्या जुळ्यांच्या जोडीचे
स्त्री जुळ्यांच्या जोडीशी जुळले

(जोड्या स्त्री-पुरूषांच्या होत्या. आधीच खुलासा केला. कारण कुणी कलम ३७७ चा विचार करतील!)

जुळले ते जुळले
कुणा न कळले

ज्याच्यात्याच्या जोडीदाराचा हातात हात घालूनी
प्रत्येक जोडी हनिमूनास निघाली

एकत्र मजा करायचा विचार नेक
भटकायचे ठिकाण ठरवले एक

बूक केले छानसे सी फेसींग हॉटेल थ्री स्टार
रूम शेजारी शेजारी नंबर दोनशे तिन, दोनशे चार

दिवसभर फिरले डोंगरावर
खाल्ले पिल्ले पोटभर

सेल्फी काढल्या घालून गळ्यात गळे
व्हाट्सअ‍ॅप फेबूवर स्टेटस शेअर केले

हॉटेलातले जेवण त्यांनी एकत्र केले संध्याकाळी
हनिमून मात्र एकट्याने साजरा करण्याची रात्र झाली

दोन्ही नवर्‍या वॉशरूममध्ये गेल्या फ्रेश व्हायला
नवरे दोनही थांबले बाहेर, लागले वाट पहायला

एक नवरी आधी आली बाहेर, दुसरीला लागला वेळ
निरोप घेतला एकमेकींचा, हनिमूनचा खेळायचा होता खेळ

बाहेर येवून ती नवरी एका नवर्‍याबरोबर निघाली
निरोप घेवून दुसर्‍या नवर्‍याचा, ह्या जोडीने रूमकडे जाण्याची घाई केली

हॉटेलच्या गार एसी रूममध्ये गोष्ट वेगळी घडली
दोनशे तिनची नवरी दोनशे चारच्या नवर्‍या बरोबर गेली

- पाभे
१३/१०/२०१९

Monday, September 30, 2019

लहानांसाठी गोष्ट: पावसाचा ढग

पावसाचा देव आहे इंद्र. इंद्राकडे पाऊस पाडणारे अनेक सरदार असतात. ते सरदार पृथ्वीवर पाऊस पाडत असतात. हे सरदार म्हणजे मोठे मोठे काळे ढग असतात. ते पाणी साठवतात आणि पाऊस पृथ्वीवर पाडतात.

एकदा एका ढगाला इंद्राने पृथ्वीवर पाऊस पाडण्यासाठी पाठवले. पण तो ढग पाऊस न पाडता एका राज्याच्या मैदानावरील मुलांचा खेळ बघण्यात रमून गेला. ही गोष्ट इंद्राला समजल्यावर त्याने त्या ढगाला पाण्याचा ढग न राहण्याचा शाप दिला. आता त्या ढगात पाणी साठून राहू शकत नव्हते. तो ढग पाण्याविना पांढरा दिसू लागला. मग त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप झाला. त्याने इंद्राची माफी मागीतली. इंद्राने त्याला 'पृथ्वीवर तू चांगले काम करशील अन मगच पुन्हा स्वर्गात येशील', असा उषा:प दिला.

त्यानंतर पृथ्वीवर धुके पसरले. त्या धुक्यातून तो ढग पृथ्वीवरील एका राजाच्या राज्यात मानव रुपाने उतरला. तो आता एक सामान्य मानव झाला होता. राज्यातील एका गावात तो लोहाराचे काम करू लागला. निरनिराळे औजारे बनवणे, घराच्या उपयोगी वस्तू बनवणे असली कामे तो करू लागला. परंतु त्या राज्याची जनता दुष्काळामुळे त्रस्त झालेली होती. गेली सलग काही वर्षे तेथे पाऊसच पडला नव्हता. पाऊस नसल्याने त्या राज्यात दुष्काळ पडला होता. जनता वाटेल ती कामे करून पोटासाठी अन्न मिळवत होती. रोगराई अन भूक यामुळे जनता चोर्‍या करणे, लुबाडणे या गोष्टी करू लागली होती. राज्यात अदांधुंदी माजली होती. राज्याचे होणारे हाल पाहून राजाला खंत वाटत होती. प्रजेची काळजी घेणारा राजा असल्याने प्रजेची स्थिती पाहून तो दु:खी झाला. जो कुणी राज्याला दुष्काळी स्थितीतून बाहेर काढेल त्याला योग्य ते इनाम देण्याची घोषणा राजाने केली. या लोहाराने ही घोषणा ऐकली आणि राज्याला दुष्काळातून बाहेर काढण्याचा प्रयत्न आपण केला पाहीजे असे त्याला वाटू लागले.

दुसर्‍या दिवशी तो तरूण लोहार राजाकडे गेला. राज्याच्या दुष्काळाबद्दल मदत करण्याबाबत त्याने राजाकडे इच्छा प्रगट केली. राजाने त्या तरूणाकडे पाहीले अन राजाला त्याबद्दल आशा वाटू लागली. त्याच्या बाबत राजाचे चांगले मत बनले. राजाने त्याला लागेल ते संसाधने देण्याची तयारी दर्शवली पण दुष्काळ हटला पाहीजे अशी मागणी केली. त्या तरूणाने राज्यातील तरूण आणि शेतकर्‍यांची मदत घेवून झाडे लावण्याची तयारी केली. झाडांसाठी खड्डे खणले. बी बियाणे तयार केले. डोंगरउतारांवर चर खणले. आहे त्या नद्या स्वच्छ केल्या. त्या नद्यांची खोली वाढवली. धरणांतला गाळ काढून तो गाळ शेतांमध्ये टाकला.

या कामानंतरच्या हंगामात पावसाळ्यात त्या राज्यात थोडा पाऊस पडला. त्या तरूणाच्या प्रयत्नाने दुष्काळावर मात करण्याच्या झालेल्या कामांमुळे पाऊस जरी थोडा पडला होता तरी त्या पावसाचे पाणी स्वच्छ अन खोल केलेल्या नद्यांमधून वाहीले. ते पाणी निरनिराळ्या धरणांमध्ये साठून राहीले. राज्यात शेतांमध्ये असलेल्या विहीरींना पाणी लागले. त्या हंगामात शेतात चांगली पिके आली. राज्यातील दुष्काळ हटला. लोकांना खायला अन्न अन जनावरांना चारा भेटू लागला. लोक आनंदाने आणि समृद्धीने राहू लागले. गुन्हेगारी नष्ट झाली. रोगराई पळून गेली. आधीच ठरल्याप्रमाणे राजाने त्या तरूणाला शेतीसाठी जमीन बक्षीस रुपाने एका गावात दिली.

इकडे इंद्र आकाशातून त्या राज्याकडे पाहत होता. तरूणाच्या रुपात शाप असलेल्या ढगाने दुष्काळ हटवण्याचे केलेले प्रयत्न पाहून तो आनंदी झाला. त्याने त्या तरूण असलेल्या सरदार ढगाला शापमुक्त केले आणि पुन्हा वर स्वर्गात बोलवून घेतले. तेव्हापासून तो ढग पावसाचे पाणी घेवून पुन्हा पाऊस पाडू लागला.

३०/०९/२०१९