Tuesday, November 27, 2018

मी घेतली यॉट

मी घेतली यॉट

ढिसक्लेमरः केवळ हलके घेण्यासाठी. कुणाही व्यक्ती, शक्ती, राजकीय पक्ष-पुढारी, मुळशी पॅटर्न, वाढदिवस बॅनरवाले यांचा उपमर्द करण्याचा हेतू नाही.

मी तर घेतली बाबा यॉट
फेरारी पेक्षा फार मोठ्ठा तिचा थाट
मी तर घेतली ब्वॉ यॉट || धृ ||

नकोच कसले रस्ते आता धुळभरी ट्रॅफीकचे
अन नकोच ते लफडे आता पार्कींगसाठीचे
मध्यमवर्गीयाला सांगतो त्याला आहे माझ्याशी गाठ ||१||
इंग्लीश मेडीअम मधला मी कॉन्व्हेंट एज्यूकेटेड
मराठी हिंदी धेडगुजरी भाषा म्हणजे कटकट

मराठी शाळेची मुले म्हणजे आहेत नुसतीच माठ ||२||
आय.आय.टी., आय.आय.एम. शिकलोय
मोठ्या कंपनीत मध्ये मॅनेजर झालोय
मल्टीनॅशलांचे दररोज कॉल येती सत्राशेसाठ ||३||

नकोच ते मुलूंड ठाणे माहीम बोरीवली चेंबूर घणसोली कोपर येथे राहणे
किंवा नकोच ते सदाशिवपेठीय वागणे
कुलाबा पाली हिल किंवा पाषाण कर्वेनगरातील घेतलाय मोठा ब्लॉक ||४||

मी तर घेतली ब्वॉ यॉट
मी तर घेतली ब्वॉ यॉट

- यॉटकरी यॉ - पाषा भेदकर

प्रश्न:

१) यॉट कशाचे प्रतीक आहे?
२) मुलूंड ठाणे माहीम, बोरीवली, चेंबूर, घणसोली, कोपर येथे कोण राहते? (उपेक्षीत व्यक्तीसमुहाचे नाव अपेक्षीत)
३) वर प्रश्न क्रमांक २ मधे राहण्यार्‍या ठिकाणांव्यतिरीक्त इतर ठिकाणी कोण राहते? (अपेक्षीत व्यक्तींचे उल्लेख अपेक्षीत.)
४) आय.आय.टी., आय.आय.एम. मध्ये कोण शिकू शकतात?
५) चार महाग असलेल्या चारचाकी वाहनांची नावे सांगा.

(मिळून मिसळून【ツ】या व्हाटसअ‍ॅप गृपवर पुर्वप्रकाशीत. (येथे केवळ मिपावासीयांना प्रवेश आहे. सामील होण्यासाठी "उपयोजक" या सदस्यांशी संपर्क साधावा.)

वरील झैरातीचा मोबदला अद्याप मिळालेला नाही हे बोलून मी माझे भाषण संपवतो.

आर्थिक गुंतवणूक आणि घोटाळे

वीस एक वर्षांपुर्वी नाशकातल्या त्रिमुर्ती चौकात दक्षिण भारतीय लोकांनी एक बंगला भाड्याने घेतला होता. तेथे त्यांनी संसारोपयोगी वस्तू विकण्याचा धंदा सुरू केला होता. म्हणजे लोखंडी खुर्च्या, पातेले, जग, कढई, चटया, कूकर, फॅन, पलंग अगदी पाण्याचा पेला देखील. तर या सार्या वस्तू ते कमी किमतीत विकत. काही दिवसांत त्यांचा जम बसला. त्यावेळी लोकवस्ती नवीनच होती. लोकं वस्तू विकत घेत आणि इतर वस्तूंची आगावू मागणी करत. आगावू मागणीच्या वस्तूसाठी ते लोक आधीच पैसे मागत. गिर्हाईकही स्वस्तात वस्तू मिळते म्हणून पैसे जमा करत. असे सहा सात महीने झाले. एके दिवशी ते दक्षिण भारतीय लोक फरार झाले आणि लोकांचे आगावू घेतलेले पैसे बुडाले.
काही खाजगी गुंतवणूक संस्था जसे की केबीसी, पॅन कार्ड क्लब, ईमू पालन, समृद्ध आदी अशा अनेक खाजगी गुंतवणूक संस्था होत्या की त्यांचे आर्थिक घोटाळे उघडकीस येवून गुंतवणूकदारांचे पैसे बुडतात अशा बातम्या आपण नेहमी वाचतो. सहारा इंडीया किंवा डी. एस. के. यांच्यासारख्या नावाजलेल्या संस्थानीही गुंतवणूकदारांची फसवणूक केलेली आहे. एवढेच नव्हे तर काही सहकारी बँका आणि पतसंस्था आदींनीदेखील गुंतवणूकदारांना फसवल्याची उदाहरणे आहेत. काही प्लॉटमध्ये गुंतवणूक करणार्या, शेळीपालन करणार्या, झाडे लावणार्या संस्था, मल्टी लेव्हल मार्केटींग करणार्या संस्थादेखील अशाच प्रकारे फसवणूक करतात.
असल्या ठेवी स्विकारणार्या संस्था बिगर बँकींग वित्तीय संस्था म्हणजेच नॉन बँकींग फायनांशीअल इन्स्टीट्यूशन म्हणून गणल्या जातात. संस्था या सेबी आणि/ किंवा (आरबीआय) यांच्या मान्यता असणार्या असाव्या लागतात. सेबी, आरबीआय अशा संस्थांवर लक्ष ठेवून असतात. तरीही काही संस्थांनी घोटाळा केलाच तर या नियामक संस्था कायदेशीर हस्तक्षेप करु शकतात. वर उल्लेखलेल्या किती संस्था मान्यताप्राप्त होत्या हा संशोधनाचा विषय आहे.
वरील उदाहरणातील वस्तू विक्रेते किंवा इतर उदाहरणातील वित्तीय संस्था, बँका आदींनी अती लोभ - जसे कमी किंमत, जास्त व्याजदर आदी अमीष दाखवल्याने अनेक मध्यमवर्गीय अशा दुकान किंवा संस्थांकडे आकर्षित झालेले होते. या आर्थिक गुंतवणूकीत शहर, ग्रामीण असा काही भेद नाही. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांपासून ग्रामीण भागातही असे गुंतवणूकदार सापडतात. अनेक वेळा लोक घरे, शेती, दागीने गहाण टाकतात अन पैसे गुंतवतात. या अशा गुंतवणूकीत एक समान धागा आढळतो. सुरूवातीला अशी संस्था गुंतवणूकदारांना आकर्षक व्याजदर नियमीत देण्याचा वायदा केला जातो. तोंडी प्रसिद्धीमुळे एकमेकांचे नातेवाईक, शेजारीपाजारी असे गुंतवणूकदार वाढत जातात. हा एकप्रकारचा कल्टच असतो. सुरूवातीच्या गुंतवणूकीदारांना नंतर येणार्या गुंतवणूकीदारांच्या पैशातून व्याज दिले जाते. काही संस्था हा पैसा शेअरमार्केट मध्ये, वायदेबाजारात लावतात व त्यावर येणार्या नफ्यातून व्याज दिले जाते. कोठेतरी हि साखळी तुटते आणि मग अशा संस्थांचा डोलारा कोसळतो. सुरूवातीचे पैसे सोडवून घेणारे सोडले तर इतर सर्व जण या आर्थिक घोटाळ्यात अडकतात. न्यायालयात जरी असे खटले गेले तरी त्यांचा निकाल वेळेवर कधीच लागत नाही हे सत्य आहे. पै पै जमवून केलेली गुंतवणूक परत मिळत नाही. म्हातारपणी, रिटायरमेंटनंतर लागणारे पैसे, लग्नकार्य, आजारपण आदींच्या खर्चाची तरतूद वाया जाते. कित्येक जणांनी याची हाय खावून आत्महत्या केल्याचीही उदाहरणे आहेत.
या सर्वांवर उपाय काय? खाली काही मार्गदर्शक टिपा दिल्या आहेत जेणेकरून गुंतवणूक अशा आर्थिक घोटाळ्यांमध्ये न जाता चांगल्या ठिकाणी करता येवू शकते.
१) अती लोभ सर्वात वाईट. तो कसल्याही गोष्टीचा का असेना. जास्त व्याजदर मिळावा हि अपेक्षा सर्वांचीच असते. पण अती लोभापायी गुंतवणूक योग्य ठिकाणी करत नाही. गुंतवणूक करतांना अती लोभ ठेवू नका.
२) जास्त व्याजदराचे आकर्षण. बाजारभावापेक्षा जास्त व्याजदर म्हणजे धोका अधिक. अधीक व्याजदराची, दुप्पट, तिप्पट असा उल्लेख असलेल्या योजनांमध्ये गुंतवणूक करु नका.
३) मान्यताप्राप्त संस्था नसणे. बर्याच वेळी अशा संस्था सेबी किंवा/ वा आरबीआय मान्यताप्राप्त नसतात. असल्याच तर त्यांच्या गुंतवणूकदारासाठी अशा संस्था नामसाध्यर्म असणार्या योजना आखतात व त्यामध्ये गुंतवणूक घेतात.
४) संस्था किती विश्वासू आहे याचा तपास न करता केलेली गुंतवणूक वाया जावू शकते.
५) अर्थात विश्वासू संस्थांनीदेखील गुंतवणूकदारांना दगा दिलेला आहे. म्हणजेच आपल्या गुंतवणूकीचे शेवटी जबाबदारी आपलीच (गुंतवणूकदारांचीच) ठरते.
६) आपल्या नातेवाईकाने, शेजार्याने गुंतवणूक केली म्हणजे आपण तेथेच केली पाहीजे असे नाही. सारासार विचार करून निर्णय घ्या.
सुरक्षित गुंतवणूकीचे प्रकार/ योजना:
वर दिलेल्या गुंतवणूकीच्या प्रकारात भान ठेवून गुंतवणूक करावी व त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी असावी. उरला प्रश्न महागाईपेक्षा (inflation) आपल्या गुंतवणूकीतून थोडा जास्त (अगदीच भरमसाठ नाही) परतावा, व्याज कुठे मिळेल किंवा अशा काही योजना आहेत का?
१) पोस्ट, राष्ट्रीयकृत बँकांच्या मुदत ठेवी, क्रिसील, इकरा, केअर अशा क्रेडीट रेटींग्ज देणार्या संस्थांनी दिलेल्या आणि ए+ किंवा ए मानंकनाच्या मुदत ठेवी योजना ( यात बाँडस येवू शकतात) तुलनेने योग्य व्याजदर देवून सुरक्षीततेत वरचढ ठरतात.
२) सारेच म्युच्यूअल फंड शेअर मार्केटमध्ये पैसे लावत नाहीत. डेट फंड हे कंपनी डिपॉझीट, बॉन्ड अशा सुरक्षीत ठिकाणी पैसे गुंतवतात. याचे व्यवस्थापन असेट मॅनेजमेंट कंपनी व्यावसायीकरीत्या करत असते. मुद्दा क्रमांक मधील गुंतवणूकीच्या पद्धतीपेक्षा थोडा जास्त परतावा मिळू शकतो.
३) एखादे म्युच्यूअल फंड बंद जरी झाले तरी नियामक संस्था अशा बंद पडलेल्या अशा फंडाला दुसर्या एखाद्या फंडात एकत्र करते. उदा. आयएनजी वैश्य यांचे फंड बिर्ला सनलाईफ म्युच्यूअल फंडात मर्ज झाले आहे.
आणखी एक दुराव्याचे उदाहरण देता येईल. सहारा या कंपनीने गुंतवणूकदारांची फसवणूक केली त्यामुळे सेबीने त्यांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. पण त्याच कंपनीने स्पॉन्सर केलेला सहारा म्युच्यूअल फंड अजून चालू आहे.
४) ईक्वीटी म्युच्यूअल फंड हे शेअरबाजारात पैसे लावतात. त्यातही किती टक्के पैसे लावतात यावर उपप्रकार पडतात. त्यात मार्केटप्रमाणे परतावा मिळतो. जास्त मुदतीसाठी पैसे ठेवायचे असल्यास हा प्रकार योग्य आहे. अर्थातच म्युच्यूअल फंडातली गुंतवणूक मार्केटवर अवलंबून असते हे लक्षात ठेवावे.
५) शेअर बाजारात तुलनेने जास्त परतावा मिळतो. पण त्यामध्ये गुंतवणूक करतांना कंपनी तोट्यात जावू शकते हे लक्षात ठेवावे.
६) प्लॅट, प्लॉट, शेतजमीन, पोस्ट असो वा म्युच्यूअल फंड असो वा शेअर बाजार, यात गुंतवणूक करतांना योग्य आणि मान्यताप्राप्त आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. आर्थिक व्यवहारात सारे काही आपणच केले पाहीजे हा ध्यास टाळा. असे आर्थिक सल्लागार जरी थोडीफार फी आकारत असतील तरी त्याबदल्यात योग्य सल्ला देत असतात. गुंतवणूकीच्या सार्‍या आतील गोष्टी आपणाला ठावूक असतीलच असे नाही. मार्केटमध्ये काय चालू आहे याबाबतही आपण अनभिज्ञ असू शकतो. सल्लागार त्याच क्षेत्रात काम करत असल्याने माहीतीत तो मार्गदर्शक ठरतो.
७) आयुर्विमायोजना हि गुंतवणूक ठरू शकत नाही. आयुर्विम्याव्यतिरिक्त इतर योजनांमध्ये गुंतवणूक केलीच पाहीजे.

- पाभे

कॉसमॉस बँकेतील लूट कशी केली असावी?

कॉसमॉस बँकेतील लूट कशी केली असावी? एटीएम स्वीच काय असते? आपला नेहमीचा पण आडव्हान्स नेटवर्क स्विच की एन्क्रीप्शन डिव्हाईस? की ती एक सिस्टीम असते ज्यात पेमेंट हे एटीएम मशीन मधून अथोराईज करण्यापासून ते पैसे हातात येण्यापर्यंत त्याची सर्व प्रोसेस केली जाते?
की हॅकर्सनी डमी पेमेंट गेटवे स्थापन केला होता?
की हॅकर्सनी वीसा कार्डाला समांतर व्यवस्था स्थापन केली होती?
बँक अधीकार्‍याच्या मते लुट ही कमी रकमेच्या अनेक व्यवहारांनी केली गेली जसे १०० डॉलर ते २००० डॉलर वैगेरे. आणि ते ही पेट्रॉल पंप , एटीएम मधून.
संदर्भः https://www.youtube.com/watch?v=Cijv1GVlGqw (श्री. मिलींद काळे, चेअरमन, कॉसमॉस बँक)
(२ तास १३ मिनीटात १२ हजार व्यवहार झालेत.)
आता निरनिराळ्या २५/३० देशांतून अशा कमी रकमेच्या व्यवहारांनी ९५ कोटी लुटणे अशक्य वाटते. तेवढे प्रशिक्षीत मनुष्यबळ कोणत्याही दरोडेखोरांच्या / हॅकर्सच्या टोळीला इतक्या विविध देशांत रात्री/दिवसा ७/८ तास ठेवणे अशक्यप्राय गोष्ट आहे.
डार्क नेट, डीप वेब चा हा प्रकार नसावा? कारण यात एका ठिकाणी बसून निरनिराळ्या देशांचे आयपी अ‍ॅड्रेस घेता येवू शकतात.
एवढी मोठी लुट होते म्हणजेच यंत्रणेत काहीतरी तृटी होती. मानवी हस्तक्षेप सोडला तर तांत्रीक बाबीत काय तॄट होती , असावी? बँकेचे एटीएम हे व्यवहार करणार्‍या सर्व्हरबरोबर शक्यतो (किंवा नेहमीच) व्हीपीएन कनेक्षन ने कनेक्टेड असतात. आणि हे कनेक्षन फायरवॉलमधून होत असते.
काही वेळा असे व्हीपीएन कनेक्षन (एटीएम किंवा ब्रांच कनेक्टीव्हीटी साठी) पॉईंट टू पॉईंट लिंकने किंवा एमपीएलएस लिंकने (एक प्रकारची एनक्रिप्टेड पी टू पी लिंकच) सुरक्षीत केले गेलेले असतात. मग असे काय झाले की हे सेक्यूअर्ड व्हीपीएन टनेल फोडल्या गेले?
की पासवर्ड लिक झाला होता काय? हि व्यवस्था पाहणार्‍या अ‍ॅडमीन, किंवा त्या डिपार्टमेंटच्या एखाद्याचा सहभाग असू शकतो काय?
नॅशनल पेमेंट गेटवे/ एनीएफटी/ आरटीजीएस पेमेंट प्रोसेसमध्ये तॄटी होती काय?
असल्यास अशा तॄटींवर मात करता येईल काय? काय सुधारणा अपेक्षीत आहेत?
आपण आयटीत जरी अव्वल स्थानावर असलो तरी आपल्याकडे तांत्रीक रिपीटेटीव्ह कामेच (आय टि हमाल) जास्त केली जातात. ( हे खरे सॉप्टवेअर नाही, आदी आदी चर्चा येथे अनाठाई आहे.) असे असतांना पैशाच्या व्यवहारांसाठी ऑनलाईन, इंटरनेट आदीवर किती भिस्त ठेवली पाहीजे? आणि आपण जरी ऑनलाईन व्यवहार केले नाहीत तरी इतर कुणी आपले बँकेतले पैसे परस्पर ऑनलाईन व्यवहाराने लुटू शकतो. यामुळे बँकेच्या संगणकीय व्यवहारांवर किती भिस्त ठेवली पाहीजे?
छोट्या बँकांच्य आयटी प्रणाली अजून विकसीत झालेल्या नाहीत. माझाच अनुभव सांगतो. एनकेजीएसबी को ऑफ. बँकेच्या माझ्या पासबुकमध्ये जमा / खर्चाच्या रकमेच्या रकान्यात रकमेचा आकडा रू. 894:40 असा न छापता तो रू. 894,40 असा छापला जात होता. मी याबाबत तक्रार केली असता चलता है छाप उत्तर आले.
एटीएमचा पीन विसरलो असता आठ दिवसांनी तो पीन हेडऑफीसमधून छापलेल्या कार्बन कागदावर बँकेत आला. मी स्वतः चौकशी केली असता तो मला घेण्यास बँकेत जावे लागले. यात दिवसांचा अपव्यय झाला.
तेथेच माझ्या खात्यात सिस्टीम रू. ५००००/- जास्त दाखवत होती. मी ती रक्कम काढूही शकत होतो. पण मी याबाबत अगदी मॅनेजरला सांगूनही ती दुरूस्ती पाच महीने होवूनही झालेली नव्हती.
पुन्हा तेथेच माझे एक मोठे एनईएफटी पेमेंट समोरच्या पार्टीला त्याच दिवशी सकाळी केले असता संध्याकाळपर्यंत मिळालेले नव्हते. ते दुसर्या दिवशीही मला रिव्हर्ट झाले नव्हते. चौकशी केली असता बँकेच्या डेटा सेंटरच्या युपीएसला आग लागल्याचे सांगितले गेले. मला ते पटले नाही पण मग तोपर्यंत माझ्या पैशांची स्थिती कोठे आहे हे देखील समजले नव्हते. नंतर मी ज्या बँकेतून पैसे ट्रान्सफर केले त्या येस बँकेत चौकशी केली असता तुमचे पेमेंट क्लिअर झाले असे समजले.
मोठ्या बँकाही काही मागे नसाव्यात. मला आयसीआयसीआय बँकेच्या माझ्याच नावाने असलेल्या दुसर्या खातेधारकाचे व्यवहारांचे ईमेल्स कालपरवापर्यंत येत होते. मी तक्रार केल्यानंतर ते थांबले.
आयडीबीआय बँकेचे दररोजचे बँकमॅनेजर आणि त्याच्या सहकार्‍यांचे ऑफीशीअल आकडेवारी, दररोजचे व्यवहार, रकमा असलेले ईमेल्स देखील मागे मला येत होते.
सेंट्रल बँकेचा अधीकारी माझा रजीस्टर्ड फोन नंबर बदलायला घाबरत होता.
थोडक्यात काही बँकांच्या आयटी रिसोर्समध्ये व्यवस्था, देखभाल यथातथा असते.
कशा प्रकारे हि लूट केली असावी? काही तर्क?

(टिपः काही तांत्रीक शब्दांना मराठीत प्रतिशब्द तयार नसल्याने इंग्रजी शब्द वापरले आहेत.)

Monday, August 6, 2018

लहानपणाची आठवण

पावसाळी ढग आकाशात होते. समोर जॉगींग ट्रॅक आणि मधले खेळाचे मैदान होते. आज कुणीच खेळत नसल्याने मोकळे होते ते. त्या शांत वातावरणात मी भरभरून मोकळा श्वास घेतला. शहरातल्या त्या जॉगींग ट्रॅकवर पावसाळ्यामुळे गर्दी बरीच कमी होती. एका कोप-यात बसलो. लहान मुलं खेळत होती. काही व्यक्ती चालत होत्या. काहीपावसाळ्यामुळे, ग्रीन जीम करत होत्या. मी पावसाळ्यात तयार झालेल्या हिरव्यागार गवताच्या काठावर बसलो होतो.  

समोर असणारे  रानटी गवत पाहून मला माझ्या लहाणपणाचे दिवस आठवले. सहावी सातवीत असेन तेव्हा. आमच्या घराच्या पुढच्या गल्लीत तालूक्याचे न्यायालय होते. तेथे मोठे मोकळे आवार होते. त्यात मुख्य न्यायालाची बैठी कौलारू इमारत होती. जुन्या काळातली, दगडी लाकडी बांधकाम होते ते. तसे त्या आवारातल्या सार्‍या कचेर्‍या ह्या दगडीच होत्या. बहूदा पन्नासातल्या दशकातल्या असाव्यात. बाजूलाच वकीलांची बार रुम. दुरवर कस्टडी मिळालेल्या किंवा कोर्टाची तारीख असणार्‍या आरोपींना ठेवायची रुम होती. बाकीच्या इमारती कौलारू होत्या पण आरोपी ठेवण्याची कोठडी पत्र्याच्या छताची होती. त्या खोलीच्या बाजूलाच त्या आवाराची राखण करायच्या रखवालदाराची राहण्याची खोली होती. त्याने मोठ्या हौशीने फुलझाडे, आणि अळूची रोपे अंगणात लावली होती. त्या अंगणातच एक पाण्याचा नळ होता. 

संपुर्ण कोर्टाच्या आवाराला दगडी भिंतीचे उंच कंपाऊंड होते. आम्ही गल्लीतील मुले त्या भिंतीवर चढून पुर्ण चक्कर मारत असू. त्यावरून आपण पडू वैगेरे भिती कधी जाणवली नाही त्या वेळी. सुटीत किंवा न्यायालयाचे कामकाज बंद असतांना आम्ही तेथे खेळायला जात असल्याने मोठे प्रवेशद्वार बंद असे. पण त्याच्या बाजूलाच एक गोल फिरणारे लोखंडी दार होते. त्यावर उभे राहून गोल फिरण्याचा आनंद मिळत असे.

आवारातच एक मारूतीचे मंदीर होते. छोटेसे, दगडी. बहूतेक ( की सगळ्याच?) न्यायालयाच्या आवारात मारूतीचे मंदीर (का)असते.(?) तसेच हे देखील. दर शनीवारी माझ्या घरासमोरील माझ्याच वयाचा मित्र त्या मारूतीला तेल आणि उडदाची दाळ वहायला जात असे. त्याचे पाहून माझी आईदेखील मला त्याच्याबरोबर तेल, दाळ वहायला पाठवत असे. संध्याकाळच्या वेळी न्यायालयाचे कामकाज आटोपल्यामुळे सारे आवार रिकामे असे. संपुर्ण शांतता असे. त्या विस्तीर्ण आवारात झाडे असल्याने आजूबाजूच्या घरे, इमारती दिसत नसत. पुर्ण एकांत, शांतता त्या परिसरात असे.

सुटीच्या दिवशी आमच्या शाळेला आणि न्यायालयादेखील सुटी असे. उन्हाळ्यातदेखील शाळेसारखी न्यायालयाचे मोठी सुटी असते हे आत्ता मोठे झाल्यावर माहीत झाले. कारण शनिवार रविवारची सुटी असो की मे महिन्यातली मोठी सुटी असो आम्ही गल्लीतली मुले न्यायालयाच्या आवारातच खेळायला जात असू. आमचे तेथील खेळ म्हणजे झाडावर चढणे, आवारातल्या भिंतींवर चढणे, जांभळे तोडणे, गवतात पळणे, गवतफुलांवर उडणारी पिवळी फुलपाखरे पकडणे, रंगीत भुंगे पकडून त्यांच्या पायांना दोरा बांधून उडवणे किंवा काडेपेटीत जमा करणे, मारामार्या करणे, विटीदांडी, पावसाळ्यात चिखल मातीमध्ये लोखंडी कांबी- गज खुपसणे आदी कमी खर्चाचे होते. न्यायालयाच्या मुख्य इमारतीच्या मागे बरीच मोठी पडीक जागा होती. तिचा वापर नसल्याने गवत तेथे कायम माजलेले असे. त्या गवताची जात काहीशी वेगळी असल्याने ते उंच होते. साधारणतः लहान मुलाच्या गुढग्या-मांड्यांच्या वर ते असे. त्यात फुलपाखरांना पकडण्यासाठी पळावे लागे. आता विचार केला असता ते किती धोक्याचे होते ते लक्षात येते. कारण त्या उंच गवतात साप, विंचू इतर जनावरे असण्याची शक्यता होती. पण आम्हाला अटकाव करणारे त्या आवारात कुणीच नसल्याने आम्ही लहान मुले बिनधास्त त्या गवतात खेळत असू. कधी कधी न्यायालयाचे कामकाज सुरू असण्याच्या दिवशीही तेथे खेळणे झाल्यास बाररूममधील वकीलांनीही आम्हा मुलांवर कधी ओरडल्याचे आठवत नाही.

बाररूमच्या बाजूलाच, मंदीराच्या समोर एक उंच जांभळीचे झाड होते. त्यावर थोड्या अंतरावर चढता येत असे पण तेथे जांभळे नसत. मग आम्ही खाली पडलेल्या जांभळाच्या सड्यांमधून जांभळांचा आस्वाद घेत असू. न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर एक मोठे विलायती चिंचेचे झाड, कौठाचे होते. तिकडे फारसे खेळणे होत नसल्याने विलायती चिंचा कधी पाडल्याचे आठवत नाही पण एक दोन आषाढी कार्तीकी किंवा महाशिवरात्रीच्या उपासांच्या आधीमधे कौठाची फळे पाडल्याचे आठवते. त्या झाडांच्या पलीकडेच तालूक्याचे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि डाव्या बाजूला सरकारी शाळांच्या बैठ्या कौलारू इमारती होत्या. कंपाउंडच्या भिंतीवर चक्कर मारतांना तो परिसर, तेथील रुग्ण आदींचे दर्शन होई. शाळेचे आवार मोठे होते. जवळपास चार बैठ्या इमारतींच्या मध्ये दोन मोठी खेळण्यासाठी मैदाने होती. तेथे आम्ही क्रिकेट खेळत असू. खेळायला दगडी चेंडू असल्याने कुणी यष्टीरक्षणाला तयार होत नसे. मग मीच यष्टीरक्षक होत असे. न्यायालयाच्या उजव्या बाजूला, आरोपींच्या खोलीच्या मागे रांगेने गुलमोहोराची झाडे होती. त्यांच्या शेंगा वाळल्यावर तलवारीसारख्या खेळण्याच्या कामात येत. कधी कधी गुलमोहोराच्या फुलांचा तुरा खाणे होई.

काही कालावधीनंतर मंदीरामागच्या मोकळ्या जागेत एका कोपर्‍यात तालूकान्यायमुर्तींसाठी सिमेंटचे घर बांधले गेले. अर्थात ते घर एका कोपर्‍यात असल्याने आणि त्यात राहणार्‍यांनीही आमच्या खेळण्यावर कधी आक्षेप घेतला नाही. कधीतरी पुढल्या वर्षात तेथे राहणार्‍या न्यायमुर्तीच्या मुलाने शाळेत माझ्या वर्गात प्रवेश घेतला. त्याची भाषा काहीशी वेगळी होती आणि तो अबोल असल्याने त्याच्याशी मैत्री होवू शकली नाही. 

असेच एकदा आमच्या शाळेतच मोठ्या वर्गात असणार्‍या एका विद्यार्थ्याशी काही कारणामुळे शाळेत भांडण झाले. तो आमच्या गल्लीच्या पुढल्या गल्लीतच रहायला होता. त्याने शाळेतील भांडणाचा बदला घेण्याच्या हेतूने मला न्यायालयाच्या आवारात गाठले. मग त्याची अन माझी मारामारी सुरू झाली. तो काहीसा बुटका पण मजबूत असल्याने अधीक कालावधीसाठी मारामारी चालू राहीली. ठोसे, बुक्या आदींचा दोन्हीकडून मारा झाला. नंतर कुणीतरी मोठ्या व्यक्तीने मारामारी सोडवली. नंतर तो मुलगा वरचेवर दिसत असे पण मग त्याने अन मीही  जुना वाद उकरून काढला नाही. नंतर शहरात तो एका झेरॉक्सच्या दुकानात कामाला लागला तेव्हा त्याच्याशी भेटणे, बोलणे झाले. 

वय वाढले तसे पुढे मोठ्या वर्गात गेल्यानंतर त्या न्यायालयाच्या आवारात खेळण्यासाठी जाणे कमी होत गेले. कधीतरी मधूनच लहर आली तर मारूतीच्या मंदीरात दर्शनासाठी जात असे. त्यावेळीही तेथे आधीसारखीच शांतता असे. आता मी ते गाव सोडले आहे. त्या गावाला अन पर्यायाने न्यायालयाच्या त्या आवाराला भेट देणे झाले नाही. इतक्या वर्षांनंतर तेथे खुप बदल झाला असणारच. न्यायालयाची इमारत जुनी झाली किंवा जागा कमी पडते या कारणामुळे पाडून नवी काँक्रीटची इमारतदेखील बांधली गेली असेल. तेथील झाडे, गवत आदी देखील नसणार. मारूतीचे मंदीर मात्र असेल पण त्यातही बदल झाला असेल. कधीकाळी तेथे जाणे झालेच तर तो परिसर कसा असेल याची उत्सूकता आहे. काळानुरूप बदल होत जाणारच. गतकाळातील तेथील आठवणी मात्र माझ्यासोबत नेहमी असतील.

Friday, March 2, 2018

सप्तश्रृंगी देवी

सप्तश्रृंगी देवी


काल रातीला देवी माझ्या सपनात आली
गड देवीचा चढायाला सुरूवात मी गा केली || धृ ||

रडतोंडीचा घाट होता लई अवघड
पाहून छातीमधी बाई व्हयी धडधड
रस्त्यामुळं नांदूरीगड चढण आता सोपी झाली ||१||

अठरा शस्त्रे घेतले तू ग अठरा हातामधी
सौभाग्याचे अलंकार तुझ्या अंगावरती
महिषासुर मारी तू आदिमाया शक्तिशाली ||२||

विडा तांबूलाचा खावूनी मुखी रंगला
सप्तश्रृंगीच्या पायी जीव माझा दंगला
देवी माझी सोळा शिणगार ग ल्याली ||३||

कुंकवाचा मळवट भरला देवीच्या कपाळी
अकरा वार साडी नेसूनी अंगावर चोळी
घाई करा दुपारच्या आरतीची वेळ आता झाली ||४||

- पाषाणभेद