Tuesday, April 26, 2011

रिमझीम रिमझीम...पाउस आला

रिमझीम रिमझीम...पाउस आला


हं...अं.....हं...अं....
हं...अं.....हं...अं....
रिमझीम रिमझीम...रिमझीम रिमझीम
रिमझीम रिमझीम...रिमझीम रिमझीम
पाउस आला...
पाउस आला ||

झाडावरती पक्षी गाती
हिरव्या वेली वरती जाती
नाचाला ताल देवून
आनंद घेवून आला पाउस
आनंद घेवून पाउस आला ||

सुर्यकिरणे वर चमचम करती
दुत रवीचे इंद्रधनू रेखीती
आकाशात बघा उंच एकदा
पडले उन असूनी धारा ||

गरगर फिरूनी ओली झाले
आभाळातूनी मोती आले
भिजल्या अंगी शिरशीर ओली
थेंब ओठी नकळत गेले ||

हं...अं.....हं...अं....
हं...अं.....हं...अं....
रिमझीम रिमझीम रिमझीम रिमझीम
रिमझीम रिमझीम रिमझीम रिमझीम
पाउस आला...
पाउस आला ||

- पाषाणभेद (दगफोड्या)
२७/०९/२०१०

अहो कारभारी, हळूहळू होवू द्या, जरा दमानं घ्या

अहो कारभारी, हळूहळू होवू द्या, जरा दमानं घ्या


अहो कारभारी, हळूहळू होवू द्या, जरा दमानं घ्या
आडकल घास, थोडं पानी प्या, तुमी धिरानं घ्या ||धृ||

पुरणावरनाचं जेवन केलं निगूतीनं
तिखट सार केला मसाला वाटून
आता सारं संपवायचं, नाही म्हनू नका ||१||

कुरडई पापड कढईत तळले
वाटीमधी गुळवणी ताक दिले
हातामधी घेवून सारं तुम्ही कुस्करा ||२||

घाई नका करू जेवतांना
घास चावून घ्या खातांना
आरामात करा सारं, मग मसाला पान खा ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२६/०९/२०१०

गणपती त्यांच्या घरी गेले

गणपती त्यांच्या घरी गेले

गणपती त्यांच्या घरी गेले
मनाला रुखरुख लावूनी गेले ||धृ||

दहा दिवस थांबले घरी
आनंद आणला त्यांनी दारी
पुजा अर्चनाने घर पवित्र झाले
गणपती त्यांच्या घरी गेले ||१||

म्हटल्या आरत्या मोठ्या आवाजाने
ओवाळले निरांजन भक्तीभावाने
प्रसादाचे मोदक कितीक वाटले
गणपती त्यांच्या घरी गेले ||२||

हर्षाचा उत्सव पुर्ण झाला आता
नाच नाचून देहभान हरपता
"पुढल्या वर्षी लौकर या" सारे बोलले
गणपती त्यांच्या घरी गेले ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२३/०९/२०१०
राहून जा की आजच्या रातीला


अहो पाव्हणं राहून जा की आजच्या रातीला
सोबत व्हईल मला कुणी दुसरं न्हाय वस्तीला ||धृ||

कोरस:
अहो दाजी हिची इच्छा पुरवा तुमी, ऐका लवकरी, ऐका तिच्या मागणीला
आनमान नका धरू, उशीर नका करू, लवकर स्टार्ट करा तुमच्या गाडीला

एकली मी बाईल आहे घरात
कशी मी राहू रात नाही सरत
तुमीच या हो धिर मला द्या हो
कुणी दुसरं नाही बोलायला
सोबत व्हईल मला कुणी दुसरं न्हाय वस्तीला ||१||

चोरचिलटं झाल्यात लई
मागनं शिरन्याचा भरोसा न्हाई
कडीकुलपातला ऐवज जाई
बंदुक र्‍हावूद्या तुमची राखणीला
सोबत व्हईल मला कुणी दुसरं न्हाय वस्तीला ||२||

जेवन कराया तुमी लवकर या
तोंड रंगवाया विडा हाती घ्या
रंगमहाल सजवला फुलांनी
छपरी पलंग आहे झोपायला
सोबत व्हईल मला कुणी दुसरं न्हाय वस्तीला ||३||

झोपायची आता करू नका घाई
मी बाई काही पळून जात नाही
गुलुगुलु बोला कानात माझ्या
हात धरा माझा उशीला
सोबत व्हईल मला कुणी दुसरं न्हाय वस्तीला ||४||

कोरस:
अहो दाजी हिची इच्छा पुरवा तुमी, ऐका लवकरी, ऐका तिच्या मागणीला
आनमान नका धरू, उशीर नका करू, लवकर स्टार्ट करा तुमच्या गाडीला

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२३/०९/२०१०

माऊलीच माझ्या शेतात भजन गाई

माऊलीच माझ्या शेतात भजन गाई



पीक वार्‍यावर हालेडूले, मागेपुढे होई
माऊलीच माझ्या शेतात भजन गाई ||धृ||

शाळू, बाजरी, मका अन गहू
विठ्ठलाचे रूप किती मी पाहू
सारं शेतं माझं पांडूरंग होई
माऊलीच माझ्या शेतात भजन गाई ||१||

विहीरीचे पाणी होई चंद्रभागा
सावळा विठू दिसे निळ्या आसमंता
कशाला मग मी पंढरीसी जाई
माऊलीच माझ्या शेतात भजन गाई ||२||

कशाला गरज लागे टाळचीपळ्यांची
नको कशाला गरज अबीरबुक्याची
हातातला विळा वाजवीतो टाळी
कपाळाला लागे बांधावरची भुई ||३||
माऊलीच माझ्या शेतात भजन गाई

मजूर वारकरी निंदणी करती
पीकातले पाप कापून काढती
पुण्यवान पीक तरारून येई
माऊलीच माझ्या शेतात भजन गाई ||४||

पीक वार्‍यावर हालेडूले, मागेपुढे होई
माऊलीच माझ्या शेतात भजन गाई ||धृ||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२२/०९/२०१० (अनंत चतुर्दशी)

इंद्रधनुष्य ऑगस्ट २०१०

इंद्रधनुष्य ऑगस्ट २०१०

photo
छायाचित्र: १

photo
छायाचित्र: २

photo
छायाचित्र: ३

खराब रस्त्यांचे फायदे

खराब रस्त्यांचे फायदे

भारतातील रस्ते अन त्यांची स्थिती यावर मी पिएचडी करायची ठरवीलेली आहे. भारतात कोठेही जा. बिहार, झारखंड, महाराष्ट्र, पश्विम बंगाल, उत्तरप्रदेश, तमिळनाडू. सगळ्या ठिकाणी सारखीच परिस्थिती आहे. त्यातल्या त्यात गुजरात मध्ये थोडीफार परिस्थिती बरी आहे. ग्रामिण भागात तर रस्ता १० चा २० होतो. काही ठिकाणी बरा रस्ता असल्याने तो १० चा १५ होतो. १० चा १० असणारे रस्ते फारच दुर्मीळ. (१० चा x असणे हे रस्त्याची परिस्थिती मोजण्याचे आमच्याकडचे परिमाण आहे. १० चा १० म्हणजे एखाद्या गाडीला १० किमी जायला नॉर्मल वेळ लागत असेल तर तेच १० चा २० म्हणजे त्याच वेगाने १० किमी जायला गाडीला दुप्पट वेळ लागेल.)

परदेशात (म्हणजे अमेरीका आदी आदी.) अगदी गुळगुळीत रस्ते असतात. ते आपण टिव्ही, आंतरजालावर बघतोच. इतरही देशात चांगले रस्ते असतात. आफ्रिका खंडातल्या पुढारलेल्या देशातही चांगले रस्ते आहेत. जपान, सिंगापुर, चीन, रशीया, इटली, डेन्मार्क येथे व्यापारी मार्ग आहेत. जर्मनीत असल्या रस्त्यांना अ‍ॅटोबान असे म्हणतात. म्हणजेच आपल्याकडचा मुंबई पुणे फ्रि वे.

अमेरीका, ब्रिटन, डेन्मार्क, कॅनडा, दक्षीण आफ्रिका, आस्ट्रेलीया, जपान आदी देशात आपल्यासारखे सम हवामान नाही. काही ठिकाणी कायम बर्फ असतो तर काही ठिकाणी कायम पाउस असतो. काही ठिकाणी वाळवंट आहे तर काही देशात कधी बर्फ पडतो तर कधी उन. पाउस तर आपल्यापेक्षा जास्तच पडतो. तोही संततधार असतो. म्हणजेच आपल्या दोन चेरापुंजी इतका किंवा तिन महाबळेश्वर इतका पाउस एकाच हंगामत पडत असेल. थोडक्यात आपल्या देशातल्यासारखे हवामान तेथे नाही. आपल्या देशात गणपती, नवरात्रोत्सव, लग्नकार्य, सभा आदि रस्त्यावर घ्यायच्या असल्यास त्यांच्या मंडपांना खिळे, पहारी, बांबू ठोकण्यासाठी नगरपालीकेची परवानगी घ्यावी लागत नाही. परदेशात असले ठोकाठोकीचे प्रकार रस्त्यावर होत नसावे. म्हणजे तेथील रस्ते हवामान किंवा मानवप्राण्यामुळे उखडले जात नाही. पाउस पडो, बर्फ साचून राहो, भुकंपात रस्त्यांची हानी होवो. लगेचच तेथील यंत्रणा रस्ते परत गुळगुळीत करतात.

आपल्याकडे थोडाही पाउस पडला की रस्ते खड्डेमय होतात. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच समजत नाही.
अगदी थोड्या पावसातही रस्ते कसे खराब होतात याचा शोध आपल्या कडच्या संशोधकांना लावावा वाटत नाही की 'राष्ट्रीय प्रयोगशाळांना' वाटत नाही की अधेमधे जनसामान्यांसाठी वटहुकुम काढणार्‍या सर्वोच्च न्यायालयाला वाटत नाही. बहूतेक त्यांना तसे करायला सांगत नसतील म्हणून ते तसे करत नसतील. जे साहित्य परदेशात वापरतात, जे रस्ता बांधणी तंत्र परदेशात वापरतात ते सगळे आपल्याकडे उपलब्ध असतांना रस्ता बिचारा हालाखीतच असतो. अमेरीका, इंग्लंड मध्ये आपलेच अभियंते मोठ्या पदावर आहेत. भारतात मात्र त्यांचेच भाउबंद असतांनाही असली परिस्थीती रस्त्यांची असते.

खड्डेदुरूस्ती करण्याचे काम कमी अनुभवाच्या किंवा नुकताच अभियंतागीरी चालू केलेल्या एखाद्या कंत्राटदाराला मिळते. टेंडर पास करण्यात अधिकारीवर्ग या उमेदवार कंत्राटदारांकडून फारच जास्त लाच मिळेल अशी अपेक्षा ठेवून असत नाही. अगदीच मामूली काम असल्याने त्याकडे कमी दर्जाचा अधीकारी बघतो. खड्डेदुरूस्तीसाठी जास्त काही यंत्रणा कंत्राटदाराला लागत नाही. एखादा रोलर, ४/५ कामगार यांवर काम भागते. असले कंत्राट महानगरपालीकेकडून, PWD कडून मिळणे सोपे असते. त्यात जास्त काही आर्थीक फायदा (दोघांच्याही दृष्टीने) नसतो. त्यामुळे कामही त्याच दर्जाचे असते. असले कामे करणारा कंत्राटदार पुढे मोठे कामे मिळवत जातो अन मोठा होतो.

पावसाळ्यात खराब झालेले रस्ते पुन्हा बनविण्यात फारच मोठ्या प्रमाणात पैसा लागतो. असली कामे दोन एक वर्षातून निघतात. त्यातही काही किमी किंवा नगरपालीकेतील ठरावीक रस्तेच दुरूस्त होतात. यात अधिकार्‍यांची साखळीच कामाला लागते. महापौर, उपमहापौर, आयुक्त, विरोधी पक्ष नेता, नगरसेवक आदी ठराव पास करवून घेणे, टेंडर काढणे, आपल्याच मर्जीतील कंत्राटदाराला टेंडर देणे आदी कामात व्यस्त होतात. कंत्राटदारही मोठे प्रस्त असते. बर्‍याचदा तो महापौर किंवा अन्य व्यक्तिचा नातेवाईकच निघतो. यात आर्थीक देवाणघेवाणही मोठी असते. आमच्या गावी एके वर्षी मोजून ३०० मिटरचा रस्ता हा 'अमेरीकेच्या रस्त्यांच्या धर्तीवर' बनवला गेला. पेप्रात अगदी गाजावाजा करून, फोटो छापून त्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. तुकडपट्टीचा रस्ता तयार झाला. पुढच्याच पावसाळ्यात त्या रस्त्यावरून वाहने चालवता येत नव्हते! पुढचे वर्ष तसेच गेले. त्या नंतर कधीतरी नवीन डांबराचा थर त्यावर टाकण्यात आला. तो भारतीय पद्धतीने टाकण्यात आला. असो.

असल्या खराब रस्त्यात आपल्याकडचे राजकीय पक्ष वृक्षारोपण करतात. बहूतेक वेळा हे काम विरोधी पक्षाचे लोक करतात किंवा 'नागरीक आघाडी', 'युवक मित्र मंडळ' असल्या रिकामपणाच्या कामगिर्‍या करणारे लोकं करतात. बहूतेक वेळा उद्देश हा राजकीय हेतूने प्रसिद्ध पावण्याचा असतो. आता रस्त्यातल्या खड्यात झाड कधी जगेल काय? किंवा जगलेच तर त्याची देखभाल होवून त्याचा वृक्ष होईल काय? नाही. आपली वर्तमानपत्रात फोटोची हौस भागवली जाते. यातूनच नविन पुढारी घडविले जातात. नेतृत्वगुणाची कसोटी लागून नेतृत्व करणार्‍या पुढार्‍याला पैलू पडतात. त्याच्या केलेल्या कामांच्या यादीत एका आंदोलनाची भर पडते. कोपर्‍यावर एखादे बॅनर लावले जाते. हा एक फायदाच.

मागच्याच महिन्यात मुंबईत एक निरीक्षण मांडले गेले होते. निरीक्षण स्त्रीरोग तज्ञांचे होते. 'खराब रस्त्यांवरून वाहनांतून प्रवास करण्यामुळे गर्भपाताचे प्रमाण वाढले आहे' या अर्थाचे. एकदम खरे आहे. माझा एक नातेवाईक त्याच्या गर्भार बायकोला मोटरसायकलवर घेवून लांब देवदर्शनाला गेला. दुर्दैवाने त्याचे फळ त्याला त्याच्या होणार्‍या बाळाच्या गर्भपातात मिळाले.
असल्या खराब रस्त्यांवर जरी गर्भपात झाले तर उमेदवार जोडप्यांना नविन परिश्रम करण्याचे बळ मिळते. अवांतर खर्च वाचतो. स्त्रीरोग तज्ञांना जास्तीचे काम मिळते. त्यांच्या दवाखान्यातील परिचारीका, मावश्या, वार्डबॉय यांना कामे मिळतात. औषधे बनविणार्‍या कंपन्याना फायदा होतो. त्यांचे शेअर्स चे भाव वाढतात. हा एक फायदाच आहे.

खराब रस्त्यांवर वाहने चालवून वाहनचालकांना पाठदुखी, अंगदुखी, मणका मोडणे, मानेचे आजार होणे आदी त्रास होतात. हे त्रास झाले तर मस्तपैकी ऑफीसला दांडी घ्यावी. आराम करावा. रस्त्यानेच आपल्याला सुटी दिली आहे. त्यामुळेच आपले मेडीकलच्या बिलाचे वाढीव पैसे मिळतील हा आनंद मानावा. मेडीकलची बिले मंजूर करण्यात मोठी साखळी असते. त्या साखळीला काम मिळते, पैसा मिळतो. दवाखान्यात भरती होण्यामुळे हाडांच्या डॉक्टरांना कामे मिळतात. त्यावर अवलंबून असणार्‍यांचा रोजगार भागवला जातो हा एक फायदाच आहे, नाही का?

असल्याच खराब रस्त्यांवरून वाहने चालवून वाहनांत दोष निर्माण होतात. वाहनांची धक्केशोषण यंत्रणा (शॉकाअ‍ॅसॉर्ब ) बिघडते. वाहनांच्या टायरमध्ये खराबी येते, टायर लवकर घासले जातात. रिंग्ज आउट होतात. ट्युब पंक्चर होते. असल्या प्रकारांमुळे टायरदुरूस्ती करणारा आण्णा आनंदून जात असेल. तो लगोलग आपल्या भाउबंदाना केरळ, बिहारातून जास्तीचे काम करण्यासाठी बोलावून घेतो. त्यांना रोजगार मिळतो. टायरचा ट्युबचा खप वाढतो. टायरच्या कंपन्या तेजीत जातात. त्यांचे शेअर्स वधारतात. ते शेअर्स घेणार्‍यांना फायदा होतो. टायरट्युबच्या कंपनीच्या शेअर धारकांना डिव्हीडंड मिळतो. वाहनांचे शॉकाअ‍ॅसॉर्ब तयार करणार्‍या कंपन्यांना कामे मिळतात. वाहनांच्या कंपन्याना स्पेअरपार्ट साठी कामे मिळतात. त्यांचे वितरक, व्यापारी यांना कामे मिळतात. रस्त्यावरील वाहनदुरूस्ती दवाखाना चालकांना कामे मिळतात. याच खराब रस्त्यांवरून असले स्पेअरपार्ट घेवून जाणारे ट्रक चालतात. त्यांची रस्त्यात दुरूस्ती होते. आरटीओ, ट्रॅफीक हवालदार यांना असल्या वाहनधारकांकडून चहापाणी मिळतो. चहापाण्याची उलाढाल पोलीसांच्या अधिकार्‍यांच्या साखळीते होते.
यात करोडो रुपयांची उलाढाल असू शकते. त्याचा विचार आपण सामान्यलोकं करतच नाही. या फायद्याचा विचार सोडून आपण फक्त खराब रस्त्यांविरूद्ध ओरड करतो.

कोणत्याही देशात तेथील रस्ते म्हणजे 'रक्तवाहीन्या' ओळखल्या जातात. व्यापार, आर्थीक उलाढाल आदी रस्त्यांवरून होतात. सैन्य हालचालीतही रस्ते महत्वाची भुमीका वठवतात. रस्ते म्हणजे एकप्रकारे कोरड्या नद्याच. त्यातून वाहने, त्यातील माल, त्यातील माणसे अन त्यांची स्वप्ने वाहत असतात. या भारतातील आधूनीक प्रदुषीत सरीता खरोखर व्यापारी, आर्थीक उलाढाल करतात हे मान्य करावेच लागेल.

Saturday, April 9, 2011

फसू नका तुम्ही फसू नका

फसू नका तुम्ही फसू नका

विज्ञानाची कास धरा तुम्ही
ज्योतिषांच्या नादी लागू नका
फसू नका तुम्ही फसू नका ||धृ||

लांब दाढी कपाळी टिळा
बोटात अंगठ्या गळ्यात माळा
समोर पोपट चिठ्ठी काढतो
त्यावरचे भविष्य ज्योतिषी वाचतो

गद्य: जो दुसर्‍यांचे भविष्य वाचतो त्याला त्याचे भविष्यतरी ठावूक असते काय?

अशा ज्योतिषासमोर बसू नका, बसू नका
फसू नका तुम्ही फसू नका ||१||

देई गंडा ताईत दोरा
अंगार्‍या धुपार्‍यांचा करी उतारा
राशी ग्रह नक्षत्र कामाला लावी
पोट भरण्या तुम्हाला फसवी

गद्य: अशा भोंदूला त्याच्या जीवनात समस्या नसतात का?

अशा भोंदूकडे तुम्ही जावू नका, जावू नका
फसू नका तुम्ही फसू नका ||२||

कुणी तळहात भविष्यासाठी पाहतो
कुणी तळपायाकडे त्यासाठी जातो
कुणी चेहेरा पाहून भविष्य सांगे
कुणी त्यासाठी कुंडली मांडे

गद्य: अहो ज्योतिष पाहण्याच्या कितीतरी अजब ह्या तर्‍हा?

अशा लफग्यांच्या नादी तुम्ही लागू नका
फसू नका तुम्ही फसू नका ||३||

कुणी घरी येवून भविष्य सांगे
कुणी आजारपणावर उपाय सांगे
कुणी हॉटेलात ऑफीस उघडी
कुणी आंतरजाळावरी संस्थळ काढी

गद्य: ज्योतिष हा 'धंदा' आहे अन 'धंद्यात' फसवणूक चालते, ग्राहकराजा जागा हो!

अशा व्यापार्‍यांच्या दुकानी तुम्ही जावू नका
फसू नका तुम्ही फसू नका ||४||

विज्ञानाची कास धरा तुम्ही
ज्योतिषांच्या नादी लागू नका
फसू नका तुम्ही फसू नका ||धृ||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१६/०९/२०१०

शेतकरी गीत: शेतात जायाची माझी झाली आता येळ

शेतकरी गीत: शेतात जायाची माझी झाली आता येळ

आग कारभारनी झाली का झुनका भाकर?
शेतात जायाची माझी झाली आता येळ ||धृ||

निसती मिरची कुट ग जरा
तीचा खर्डा कर ग चवीला बरा
भाकरीबरूबर लागं तिखाट जिभंला
मंग पानी प्यावं म्हंतो पोटाला
बेगीनं आवर आन चुलीत पेटव जाळ
शेतात जायाची माझी झाली आता येळ ||१||

त्याच्यासंग दे ग तू कांदा पातीचा
लाव भाकरीला एक हात लोण्याचा
घरी राकून ठेव प्वाराला दुध गाईचं
उरल्यालं मला दे तांब्यात वाईचं
लवकर टाक त्यात उलीसा गुळ
शेतात जायाची माझी झाली आता येळ ||२||

उगा नको जास्त सैपाक करू
नको हातावर हात तू धरू
मला जायाचं हाय लई लांब
काय नाट लावती म्हनं "जरा थांब"
वाट आडवून थांबवू नको मला बळंबळं
शेतात जायाची माझी झाली आता येळ ||३||

नांगर घेवून जातो मी ग मळा
मंग दुपारच्याला तू बी ये की जरा
खुरपणी करून तण काढू भरभरा
पाखरं उडवूया करून दगडी मारा
कवाधरनं थांबावं आम्ही झाली की ग सकाळ
शेतात जायाची माझी झाली आता येळ ||४||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१५/०९/२०१०

Friday, April 8, 2011

माझ्या झोपेची झाली आता येळ

माझ्या झोपेची झाली आता येळ

आग कारभारनी हातरून टाक, चल घाई कर
माझ्या झोपेची झाली आता येळ ||धृ||

दिसभर मी राबराबतो
कष्टानं दमून जातो
किती आटवन तुझी मला येई
कामामदी बी लक्ष लागत न्हाई
दोन घटका बसावं वाटं तुझ्याजवळ
माझ्या झोपेची झाली आता येळ ||१||

कधी दिवसपाळीत दिस जाई
कधी रातपाळी आडवी येई
हातामधी हात तुझा कधी मी घेई?
त्यासाठी जीव माझा कसनुसा होई
कधी खेळायचा ग पिरीतीचा आपन खेळ?
माझ्या झोपेची झाली आता येळ ||२||

नको दुनीयेची चिंता आता तू करू
राघू मैना आपन दोघे ठरू
उगा नको नको तू म्हनू
जीव टांगनीला नको आणू
आता येतीस का भजनाचे वाजवू का टाळ? ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१५/०९/२०१०

पिकलं पान

पिकलं पान
पिकलं पान
झाडाला म्हणते बाय बाय
माझं आता
काम काय? ||१||

पिकलं पान
हिरवटपना जात नाही
केव्हा गळेल केव्हा गळेल?
झाडालाच चिकटून राही ||२||

पिकलं पान
झाडावरून गळून जाई
झाडाखाली पडून पडून
सडून जाई ||३||

पिकलं पान
झाडावरून पडून जाई
जमीनीवर पडल्या पडल्या
जुन्या दिवसांची आठवण येई ||४||

पिकलं पान
विचारी दुसर्‍याला
माझा खांदा तुला?
की तुझा खांदा मला? ||५||

पिकलं पान
फळाला म्हणालं
तुझं माझं
नशीबच निराळं ||६||

पिकलं पान
पिकलं फळ
यांची होते
वेगळी वेळ ||७||

पिकलं पान
पिकली केळी
यांचे महत्व वेगळेवेगळे
वेगवेगळ्या वेळी ||८||

पिकलं पान
खाली पडलं
तिला देण्यासाठी
वहीत ठेवलं ||९||

पिकलं पान
खाली पडलं
जाळी होण्यासाठी
पुस्तकात ठेवलं ||१०||

पिकलं पान
पडलं खाली
पुस्तकात ठेवलं
जाळी झाली ||११||

पिकल्या पान
उपयोग किती!
झाडाखालीच कुजते
त्याच झाडाला खत होण्यासाठी ||१२||

पिकलं पान
पडलं खाली
पुस्तकात ठेवलं
जाळी झाली ||||

पिकलं पान
मनात भरलं
कवितेला मग
कारण सुचलं ||||


- पाषाणभेद (दगडफोड्या)
०९/०९/२०१०

चित्रपटगीतः चला रे चला, चला गणपतीला आणू चला

चित्रपटगीतः चला रे चला, चला गणपतीला आणू चला

सिच्युएशनः गल्लीत सार्वजनीक मंडळाचा गणपती बसतोय. दोन हिरो अन दोन हिरवीनी आहेत. म्युझीक सुरू.....
(सुचना: एक ओळ हिरो नं एक म्हणेल अन दुसरी ओळ हिरो नं २ म्हणेल असाही बदल करता येवु शकतो)


दोघे हिरो: चला रे चला, चला गणपतीला आणू चला ||धृ||

हिरो नं १: गणपतीची मुर्ती आणूया आज
हिरो नं १: कशी आणायाची ठरवा लगेच

हिरो नं २: अष्टविनायक आणूया की राजा लालबागचा?
हिरो नं २: बालगणेश आणूया की श्रीमंत दगडूशेटचा?

दोघे हिरो: घाई करा घाई करा, लगेच निघु चला
कोरस: चला रे चला, चला गणपतीला आणू चला ||१||

हिरो नं १: ढोल ताशे बडवा तुम्ही रे जोरात
हिरो नं १: डिजे आणूनी लावा मोठ्या आवाजात

हिरो नं २: झाडून सारे सगळे नाचा चला रे
हिरो नं २: गणेशाच्या उत्सवात सहभागी व्हा रे

दोघे हिरो: उगा फिकीर उन्हापावसाची करता कशाला
कोरस: चला रे चला, चला गणपतीला आणू चला ||२||

हिरवीन नं १: साजिरी सुंदर गणेशाची मुर्ती
हिरवीन नं १: पुजनाने त्याच्या भक्तां येई स्पुर्ती

हिरवीन नं २: मनामध्ये साठवूया भावभक्तीने त्याला
हिरवीन नं २: आरती करा आता निरांजन ओवाळा

दोघी: नमस्कार करा सारे, प्रसादाला हात पुढे करा
कोरस: चला रे चला, चला गणपतीला आणू चला ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१०/०९/२०१०

जुना जमाना गेला आता नवा जमाना आला

जुना जमाना गेला आता नवा जमाना आला

जुना जमाना गेला आता नवा जमाना आला
शालिनता गेली सारी कुठं, दिखावूपणा राहीला ||धृ||

आईवडील मोठे करती मुलाला
आजारपणात साथ देती त्याला
शिक्षण देती गुणाचा व्हायला
म्हातारपणी मुलगा पांग फेडी
वृद्धाश्रमी धाडी म्हातार्‍या आईबापाला
जुना जमाना गेला आता नवा जमाना आला ||१||

शिक्षक विद्यार्थी नाते किती पवित्र असे
शिष्य गुरूला आधी वंदन करीत असे
आदराने मान झुकवूनी विद्यार्थी बोलायचा
शिक्षकही आदर्श व्यक्ती त्याला बनवायचा
आता शिक्षक विद्यार्थी एकत्र जाती दारू प्यायला
जुना जमाना गेला आता नवा जमाना आला ||२||

नऊवारी साडीचोळी सारं अंग झाकीतसे
मळवट कुंकू, लांब वेणी, हाती चुडा स्त्री घालीतसे
सहावारी साडी नेसूनही स्त्री सुंदर दिसे
बाई आताची मायक्रो स्कर्ट घालूनी फिरे
डेटींग चालू झाली अन रेव्ह पार्टी होई फ्रेंडशीप डेला
जुना जमाना गेला आता नवा जमाना आला ||३||

वाचली का तुम्ही 'आज्ञापत्रे' शिवाजी महाराजांची?
ताकीद दिली त्यात अधिकार्‍यांनी निट वागण्याची
रयतेस नका नाडू कणसेही नका खुडू पिकांची
विपरीत वागाल तर भिती मनात ठेवा शिक्षेची
आता अधिकारीही चाटावले लाच खाण्याला
जुना जमाना गेला आता नवा जमाना आला ||४||

मान्य आहे की प्रगती झालीच पाहीजे
जुने सोडूनी नवे अंगी बाणवले पाहीजे
आदर्श वागण्याला कोणाचे बंधन आहे हो?
कसेही वागणे म्हणजे जीवन नव्हे हो!
योग्य वर्तन करून समृद्ध करा जगण्याला
जुन्या जमान्याला विसरू नका जरी नवा जमाना आला ||५||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१३/०९/२०१०

आयटम साँग: तुन तुन तुन तुन तुन ताना ना..ना..ना...ना..ना

आयटम साँग: तुन तुन तुन तुन तुन ताना ना..ना..ना...ना..ना

हं..अं..अं..अं..अं..अं..अं..
तुन तुन तुन तुन तुन ताना ना..ना..ना...ना..ना
माझ्याबरोबर तुम्ही गाणं म्हणा
कंबर हलवूनी एकसाथ गाणं गाना
गाण्याच्या नशेमध्ये सारे चिंग व्हाना
तुन तुन तुन तुन तुन ताना ना..ना..ना...ना..ना ||धृ||

मासोळी ज्वानी माझी चमचम करी
पाण्यात पडले पोहते तेजधारेतूनी
राणी मी तुमची तुम्ही माझे राणा
तुन तुन तुन तुन तुन ताना ना..ना..ना...ना..ना ||१||

मी राणी हुकूमाची तुम्ही सारे गुलाम
एक मारी ठुमका, करी दुनीया सलाम
पत्ते हाती धरता आता उतारी सोडाना
तुन तुन तुन तुन तुन ताना ना..ना..ना...ना..ना ||२||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
११/०९/२०१०

आले गणपती माझ्या अंगणी

आले गणपती माझ्या अंगणी

आले गणपती माझ्या अंगणी
वाट पाहीली गेल्या वर्षापासूनी

मुकुट शिरावरी दिसे शोभुनी
भरजरी पितांबर अंगी नेसूनी
पुष्पमाला सुगंधी गळ्यात घालूनी
शुंडेसहित एकदंत राखूनी
आले गणपती माझ्या अंगणी

कमळपुष्प हाती धरूनी
दुसर्‍या हाती परशू घेवूनी
एका हाती मोदक लेवूनी
शुभ हाताने आशिष देवूनी
आले गणपती माझ्या अंगणी

वक्रतुंड हेरंब लंबोदर
विकट विनायक विघ्नेश्वर
गणेश महोदर विघ्नहर
अगणीत असली नावे घेवूनी
आले गणपती माझ्या अंगणी

दहा दिवस गणपती येता दारी
रोमहर्षक सोहळा घडतो भारी
मुर्ती तुझी एक सदस्य होई
कुटुंबात सुख आमच्या आणूनी
आले गणपती माझ्या अंगणी

- पाषाणभेद (दगडफोड्या)
११/०८/२०१०

नाचू या, गावू या, चला चला सारे या

नाचू या, गावू या, चला चला सारे या



नाचू या, गावू या, चला चला सारे या ||धृ||

शेवटचा दिवस आहे परिक्षेचा
दिवस आहे मजा करण्याचा
कोणा नका सोडू सारे सामील होवूया
कॉलेज, अभ्यास सारे काही विसरूया ||१||

कोण आता कोठे दुर जाईल
नोकरी धंदा कोण कोण पाहील
विसरू नका एकमेकां पुन्हा भेटुया
भेट घेवून पुन्हा आनंद लुटूया ||२||

कॉलेजातली मस्ती तुम्ही आठवा
मस्तीतले दिवस मनात साठवा
मैत्री आपली सर्वकाळ टिकवूया
विसरू नका काही सारे काही आठवूया ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१०/०९/२०१०

गौळण: असा काय करशी तु रे नंदाच्या कान्हा

गौळण: असा काय करशी तु रे नंदाच्या कान्हा

असा काय करशी तु रे नंदाच्या कान्हा
उगा खोड्या काढी मज सोड ना ||धृ||

गोड बोलणे तुझे लाघवी
यमुनातीरी वेणू वाजवी
करशी मग तु रे बळजोरी
मीही सांगे यशोदेला तुझा खोटा गुन्हा ||१||

दह्यादुधाचे विरजण लावले
लोणी सारे विकण्या निघाले
वाट अडवण्या आडवा येई
उपकार कर माझ्यावरती आता जावू दे ना ||२||

तुझ्या रुपात एकरूप झाले
माझे मी पण हरवून गेले
उरला नाही भेद कसला
कोण गौळण कोण कान्हा ओळखू येईना ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०८/०९/२०१०

शेतकरी गीत: आज सण हाय बैलपोळा

शेतकरी गीत: आज सण हाय बैलपोळा

शिंगे घासली
बाशींगे लावली
माढूळी बांधली
म्होरकी आवळली
तोडे चढविले
कासरा ओढला
घुंगुरमाळा वाजे खळाखळा हो खळाखळा
आज सण हाय बैलपोळा ||१||


गोंडे बांधले
वेसनी घातल्या
छमच्या गाठल्या
चवर ढाळली
शिक्के उठविले
गेरू फासला
घुंगुरमाळा वाजे खळाखळा हो खळाखळा
आज सण हाय बैलपोळा ||२||


नाव लिहीले
झेंडूहार घातला
झुली चढविल्या
पैंजण घातले
पट्टा आवळला
फुगे बांधले
घुंगुरमाळा वाजे खळाखळा हो खळाखळा
आज सण हाय बैलपोळा ||३||

घुंगरू वाजविले
बेगड चिकटवली
माठोठ्या बांधल्या
गाववेस फिरवीले
गोडधोड केले
सासुसुनाने ओवाळले
नैवेद्य दावला
घुंगुरमाळा वाजे खळाखळा हो खळाखळा
आज सण हाय बैलपोळा ||४||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०८/०९/२०१०

रंगमहाली बसले असता अवचीत यावं कुनी

रंगमहाली बसले असता अवचीत यावं कुनी

रंगमहाली बसले असता अवचीत यावं कुनी
हातामदी हात धरावा तुम्ही ||धृ||

आठवनीचे पाखरू उडती
कंटाळ्यामधी रातदिस जाती
सोबतीला कुणी असावं
"कसं चाललं तुझं" पुसावं
असं वाटत मनी ||१||

कालपासनं लवतो डावा डोळा
नजर जायी दारी कितीक वेळा
कुनीतरी भेटाया का येईल
का रात अशीच एकटी जाईल
वेडी शंका येई मनी ||२||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०४/०९/२०१०

गण: आमच्या गणाला गणपती आले

गण: आमच्या गणाला गणपती आले

आमच्या गणाला गणपती आले
वंदन करूनी मस्तक झुकले ||धृ||

रिद्धीसिद्धीचा स्वामी तू गणपती
शरण आलो आम्ही अल्पमती
कार्यारंभी दावूनी उपस्थीती
दयाबुद्धीने आम्हा पाहीले
आमच्या गणाला गणपती आले ||१||

कलाकारां होवोनी स्पुर्ती
जगावेगळी मिळण्या किर्ती
कला आगळी सादर करण्या
कलाकार सारे एकच झाले
आमच्या गणाला गणपती आले ||२||

सारी विघ्ने गेली सारूनी
संकटे सारी गेली हारूनी
पुढला अंक सुरू कराया
गणात नमन गणाला केले
आमच्या गणाला गणपती आले ||३||

०३/०९/२०१०

प्रेमाची बँक

प्रेमाची बँक
तुझ्या दिलाच्या बँकेमध्ये माझे अकाउंट उघडतेस का?
माझे अकाउंट उघडतेस का?
माझ्या प्रेमाच्या सेव्हिंग्जवर काही रिटर्न देशील का? ||धृ||

खाते ओपनकरण्यासाठी प्रेमपत्राचा अर्ज लिहीला
प्रेमजाणत्या मित्राला ओळखीसाठी तयार केला
इनवर्डला पडला अर्ज, आता सहिशिक्का मारशील का?
तुझ्या दिलाच्या बँकेमध्ये माझे अकाउंट उघडतेस का? ||१||

अकाउंटचे असती करंट, लोन, सेव्हिंग, रिकरींग
सगळे नकोच मजला फिक्स खातेच हवे ग
त्याच्याशी तुझे अकाउंट जॉईंट करशील का?
तुझ्या दिलाच्या बँकेमध्ये माझे अकाउंट उघडतेस का? ||२||

ऑनलाईन प्रेम, मोबाईल एसएमएस प्रेम सुविधांचे काय?
या सोईसार्‍या मिळती इतरांना मलाही मिळतील काय?
प्रेम धनाची होम डिलीव्हरी सुविधा मला मिळेल का? ||३||

आता स्नेहाची गुंतवणूक करतो
ओव्हरड्राफ्ट प्रितीची इंस्टॉलमेंट मिळवतो
तान्हूल्याच्या रूपात पोस्ट डेटेड चेक देशील का?
तुझ्या दिलाच्या बँकेमध्ये माझे अकाउंट उघडतेस का? ||४||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२७/०८/२०१०

कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड

कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड

या धाग्यातील प्रतिसादांमध्ये मंदार व प्रसाद जोशींनी म्हटले होते:
">कोथरुड थोडं सं रुड वाटटं नाई ?!!
खत्रूड शी यमक जुळतं नै, कोथरूडचं
>>>> ह्यावर एक मस्त कविता लिहिता येईल !!१
चला यमकं जमवुया"


मंग काय? आसली भारी सिच्यूएशन दिल्यावर लगेच लिहून काढली कविता. वाचा तर मग:

कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड
म्या जवा भेटाया जातो काशीला....
तवा... तवा...
तवा निसती ताठ करी मिसूरडं ||धृ||

हातात काठी अंगात डगला
दारापाशी तो राखणदार बसला
येळ काढ थोडा उगा नग रडारड
कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड ||१||

तुझी अन माझी जोडी जमली
नाही कोनीही भिती घातली
मग तुझाच बाप का घाली खोडं?
कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड ||२||

न्हाई भित मी तुझ्या बा ला
वर्‍हाड घेवून येईल सांग त्याला
जावई आहे त्याचा मी मागंपुढं
कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२८/०८/२०१०

आले आले गणपती माझ्या घरी आले

आले आले गणपती माझ्या घरी आले

आले आले गणपती माझ्या घरी आले
आगमनाने...त्यांच्या...
आगमनाने त्यांच्या हो...
घर माझे पवित्र झाले... ||धृ||

श्रावण सरता भाद्रपद महिना सुरू होता
शुक्ल चतुर्थीला गणपती बसता
आनंदाने...
आनंदाने...
मन भरून आले ||१||

मुर्ती सुंदर सुबक घरी आणली
मंदिर करूनी तिला सजवली
भक्तीभावाने...
भक्तीभावाने हो...
आरती ओवाळूनी गणेशा वंदीले ||२||

उत्सव असे हा दहा दिवसांचा
मेहनत घेवूनी आरास करण्याचा
गणेशा भजण्या...
गणेशा भजण्या हो
सारे एकच उत्साहाने न्हाले ||३||

मोदक लाडू नैव्येद्य दाखवूया
प्रसादासाठी हात पुढे करूया
वर्षाच्या सणाला...
वर्षाच्या सणाला...हो
सुटी काढून भाउबंद आले ||४||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२९/०८/२०१०

लावणी: जाल हो राया उद्या

लावणी: जाल हो राया उद्या

जाल हो राया उद्या,रात आजची खास
शृंगाराच्या राती थांबा आज विनवीते तुम्हास ||धृ||

हात नका धरू हाती, सोडा मज थोडी
लांब नाही जायची नको ओढा ओढी
तुमच्या अशा वागण्यानं वेगळं वाटं खास
शृंगाराच्या राती थांबा आज विनवीते तुम्हास ||१||

तुम्ही शेवंती गजरा आणला मला माळला
शुर रसीक पाहूनी तोरा जिव भाळला
कसं जगावं तुम्हावीण लागली तुमची आस
शृंगाराच्या राती थांबा आज विनवीते तुम्हास ||२||

कालच्या दिशी वाट पाहीली, भेट राहीली
नजरेनं घायाळ केलं, काया तुम्हा वाहीली
नका जावू आता, पुढ्यात ओतली ज्वानीची रास
शृंगाराच्या राती थांबा आज विनवीते तुम्हास ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२६/०८/२०१०

विठ्ठल उभा राहीला

विठ्ठल उभा राहीला

(धृपदात थोडी आलापी घेतली आहे त्यामुळे धृपद जरा लाबंल्यासारखे वाटेल. प्रत्यक्षात
विठ्ठल उभा राहीला |
मी तो डोळा पाहीला ||
एवढेच धृपद आहे. )


विठ्ठल उभा राहीला
विटेवरी उभा राहीला
राहीला राहीला उभा राहीला
विटेवरी विठ्ठल उभा राहीला
मी तो डोळा पाहीला
पाहीला पाहीला डोळा पाहीला
डोळा पाहीला
मी तो डोळा पाहीला ||धृ||

वाळवंटी काठी किती नाचू गावू
विठ्ठल चरणी किती लिन होवू
आनंदाचा पुर येई
आनंदाचा पुर येई
दिनांचा देव वंदिला ||१||

पापपुण्याचा हिशेब मी कसा ठेवू
माउलीविणा लेकरू मी कसा राहू
भोळा भाव माझा
भोळा भाव माझा
विठ्ठलाचरणी वाहीला ||२||

चंद्रभागेकाठी एकटा नाचलो
मुखाने अभंग तालात गायलो
साथीला येवून माझ्या
साथीला येवून माझ्या
प्रत्यक्ष विठ्ठल नाचला ||३||

कुडीमध्ये प्राण जपला जपला
विठ्ठलाविण दुजा देव नाही केला
शेवट आला आता
शेवट आला आता
कुडीमध्ये विठ्ठल बसला ||४||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२५/०८/२०१०

Thursday, April 7, 2011

एकदा तरी भेट देई मज पांडूरंगा


एकदा तरी भेट देई मज पांडूरंगा

एकदा तरी भेट देई मज पांडूरंगा
तुझ्या भेटीसाठी गातो मुखी अभंगा ||धृ||

किती वारी चालू आता किती दिंडी चालू
संसारातून सोडवी आता नको वेळ घालू
आतूरले डोळे माझे वाहे चंद्रभागा
तुझ्या भेटीसाठी गातो मुखी अभंगा ||१||

किती ग्रंथ वाचले अन म्हटल्या मी ओव्या
संतांच्या साथीने कितीक आरत्या म्हणाव्या
शिणलो रे मी आता होई पापभंगा
तुझ्या भेटीसाठी गातो मुखी अभंगा ||२||

जळावीण मासा जिव धरी कैसा
मायेविणा पोर प्रेम पाही जैसा
नको धरू राग आता नेई तुझ्या संगा
तुझ्या भेटीसाठी गातो मुखी अभंगा ||३||

आयुष्य नासले अनंते हाती केले पाप
पुण्य नाही केले कर आता माफ
शेवटाला आलो रंगलो तुझ्या रंगा
तुझ्या भेटीसाठी गातो मुखी अभंगा ||४||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२४/०८/२०१०

भाषाभान : पुस्तक परिचय

'भाषाभान' या डॉ. नीलिमा गुंडी यांच्या पुस्तकात भाषा आणि संस्कृती यांविषयीच्या मार्मीक निरीक्षणांवर आधारीत काही ललित लेख आहेत. 'भाषाभान' मध्ये ललित आणि वैचारिक स्वरूपाचे लेख समाविष्ट केले आहेत. भाषेविषयीचे भान धारदार करण्याचे काम या लेखांद्वारे होते. यातील डॉ. अशोक रा. केळकर आणि डॉ. नागनाथ कोतापल्ले या दोन जेष्ठ नामवंत अभ्यासकांच्या यातील मुलाखती विचारांना चालना देणार्‍या आहेत.

लेखीकेने प्रस्तावनेत जरी 'भाषाविषयक', 'भाषेचे' अशा अर्थाचे शब्द वापरले असतील तरी ते शब्द एका अर्थाने 'मराठी' या भाषेसंदर्भात आलेले आहे. संपुर्ण पुस्तकात मराठी भाषा वैयक्तिक कारणासाठी म्हणा की इतर कारणाराठी वापरतांना घ्यावयाची काळजी लेखीकेने अत्यंत मार्मिकतेने सांगीतलेली आहे.

डॉ. नीलिमा गुंडी यांचे बरेचसे साहित्य प्रकाशित झालेले आहे. त्यात काव्यसंग्रह, बालकवितासंग्रह, कथासंग्रह, लेखसंग्रह प्रकाशित झालेले आहे. त्यांनी विविध पुस्तकांचे संपादन सहाय्यही केलेले आहे. अशा अधिकारी व्यक्तीकडून भाषेविषयीचे भान होणे हे मराठी वाचकांना एक पर्वणी आहे.
या पुस्तकात मुलांची, माणसांची ठेवलेली नावे, लहान मुलांची शब्दसंपत्ती वाढवण्याची शक्ती, शुद्धलेखनात होणार्‍या चुका, नवतरूणांची भाषा आदी लेख विभाग १ मध्ये आलेले आहेत.

विभाग २ हा मराठी भाषेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. यात मराठी भाषेचे अभिसरण- एक आव्हान व मराठीची आजची स्थिती ह्या दोन लेखात मराठी भाषेला वैश्विक स्तरावर कसे मोठे करता येईल याचे विवेचन आहे. लेखीकेच्या मते भाषा प्रवाही असणे आवश्यक आहे. शालेय स्तरावर व व्यावहारीक स्तरावर साधे वाक् प्रचार कशा पद्धतीने शिकविले पाहिजे याचे विवेचन आहे. भाषा 'श्रवण करणे' अन त्याचा उपयोग लेखनात करणे याचे महत्व त्यांनी 'श्रॄतयोजन: भाषेचा वारसा' या लेखात सोदाहरण पटवून दिलेले आहे. 'वाचन: एक भाषिक कौशल्य' या लेखात वाचन करतांना काय काळजी घेतली पाहीजे हे सांगितले आहे. या लेखातील एक उदाहरण द्यावेसे वाटते: वाक् प्रचारात अर्थसौंदर्याचेही भान हवे. उदा. 'त्याची फे फे उडाली' हे वाक्य वाचतांना 'फे फे' चा 'नेने' सारखा आडनाव समजून उच्चार केला, तर वाचणार्‍याचीच फे फे उडत आहे, हे जाणवेल.

स्त्रियांची भाषा या विषयी दोन लेख आलेले आहेत. स्त्रियांच्या भाषेत युगजाणीव व्यक्त करण्याची, वास्तव बदलण्याची सुप्त क्षमता आहे असे लेखीका म्हणते. पु. ल. देशपांडे यांच्या 'व्यक्ति आणि वल्ली' व 'अपूर्वाई' या दोन पुस्तकांची रसग्रहणे भाषिक अंगाने आलेली आहेत. आपल्या बालसाहित्यात रुढ भाषेच्या अलिकडची पलिकडची भाषा समाविष्ट आहे का? असा प्रश्न त्या 'बालासाहित्य, बालशिक्षण आणि मुलांची भाषा' या लेखात विचारतात. खरोखर आपले बालसाहित्य या गुणांनी युक्त आहे का? यशवंतांच्या 'आई' कवितेचे परिष्करण' या लेखात कवि यशवंतांनी 'आई' या कवितेत कसे व का बदल केलेत ते स्पष्ट केले आहे.

'भाषा: व्यवस्थेशी निगडीत प्रतिमा' या लेखात भाषाव्यवस्थेशी निगडीत प्रतिमासॄष्टी मराठी कवितेत कसकशा स्वरूपात आढळते, यांचा सोदाहरण शोध घेण्याचा प्रयत्न आहे. विरामचिन्हे, पुर्णविराम, नाम, सर्वनाम आदी मराठी व्याकरणातील संकल्पना हाती धरून मराठी कवितेचा प्रांत मराठी कवींनी कसा समृद्ध केला आहे हे त्यातील उदाहरणांवरून दिसून येते. अनेक कवींनी मराठीत अशा कविता आधीच लिहीलेल्या आहेत. तरीही अशा कवींची संख्या तुलनेने कमी असल्याचे त्या मान्य करतात.

"'म' मराठीचा" या लेखात त्यांनी मराठीचा शिक्षणक्रमात अभ्यास कसा असावा याबाबत मते नोंदवलेली आहेत. आपल्या राजकारण्यांनी अस समाजकारण्यांनी त्या मताचा अभ्यास केल्यास मराठी भाषेसाठी कोणतीही चळवळ उभी करावी लागणार नाही, 'भाष्यलक्षी अभ्यासक्रम' महाविद्यालयांत सर्व शाखांसाठी सुरू करावेत. पहिलीपासूनच मराठी अनिवार्य हवी, आदी त्यांची मते आहेत. "एकंदरीत 'म' मराठीचा' असे बिंबवायला हवे!" हे त्यांचे वाक्य बरेच काही सांगून जाते.

लेखीकेने दोन भाषाधुरीणांच्या मुलाखती घेतल्या होत्या. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषातज्ञ डॉ, अशोक केळकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या मुलाखती या पुस्तकात समाविष्ट आहेत.

भाषातज्ञ डॉ, अशोक केळकर यांची मुलाखत बर्‍याच अंगांनी त्यांच्या कार्याबद्दल झाली आहे.
कुलगुरू डॉ. नागनाथ कोतापल्ले यांची मुलाखत म्हणजे आजच्या मराठीची अवस्था, शिक्षणपद्धती, मराठीचे व्यावहारीक उपयोजन आदिंची सांप्रत अवस्थेवर ओढलेले आसूड आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये.

या पुस्तकपरीचयात मी त्या मुलाखतीतील काही भाग विस्तृत प्रमाणात देत आहे, जेणे करून काही लोकांपर्यंत तरी त्याचे शाब्दीक निखारे पोहोचतील व त्यातून अंगार पेटेल.

"नृत्य, नाट्य, शिल्प आदिं कलेच्या विषयांत विद्यार्थ्याला काहीतरी कला सादर करावी लागते. मराठीचा अभ्यास करणार्‍याला काय साहित्यविषयक कला सादर करावी लागते? त्याचा अभ्यास केवळ वाड:मयाचा अभ्यास, समिक्षा, काव्यशास्त्र, भाषाविज्ञान आदींपुरताच मर्यादित असतो. किती विद्यार्थी केवळ लेखक व्ह्यायचे आहे म्हणून एम. ए. ला मराठी घेतात? काही महाविद्यालयांमध्ये मराठीची केवळ १५० पुस्तके असतांनादेखील तेथे एम. ए. मराठी करण्याची 'सोय' आहे. केवळ विद्यार्थीसंख्या वाढली आहे. गुणात्मक वाढ कमी झाली आहे.मराठी संस्थाच इंग्रजी शाळा सुरू करतात हि उद्विगनतेची बाब आहे. मराठी समाज इंग्रजीला घाबरून गेलेला आहे. महाराष्ट्र शासनाला कोठलेच शैक्षणीक धोरण नाही. पक्ष कोठलाही असो. वीसएक वर्षात कमालीची अनागोंदी शिक्षण खात्यात आहे. शाळा पाहिजे- घेवून जा. महाविद्यालय हवे- घेवून जा. व्यावसायीक शिक्षणसंस्था पाहिजे- उशीर कशाला करता असे महाराष्ट्रीय शासनाचे धोरण आहे. शासन या सर्वांतून पैसा कमावते आहे. मंत्रालयात लोकप्रतिनीधींपेक्षा कारकूनांचे अधीक महत्व आहे. शासनाकडे विचारशक्ती, कल्पनाशक्ती नाही. इतर प्रांतांमध्ये शिक्षणाचे माध्यम त्या त्या प्रादेशीक भाषा आहेत. आपल्याकडे इंग्रजी शाळांमधून लोअरलेव्हल चे मराठी शिकविले जाते. मराठीला प्राधान्य देण्याचे धोरण शासन जोपर्यंत वापरत नाही तोपर्यंत मराठी सर्वसामान्यांपर्यंत जाणार नाही.

बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील संबंध प्रेममय असले पाहिजे. कालपरवा पर्यंत खेड्यातील मराठी (आणि लोकही) हिणकस असतात असे प्रमाण मराठी वापरणार्‍यांना वाटत होते. आता ते प्रमाण कमी झालेले आहे. भाषेच्या विकासात सर्वात महत्वाची गोष्ट असते ताठ कण्याचे सरकार. महाराष्ट्र शासनाचा कणा किती ताठ आहे हे आपण पदोपदी अनुभवतोच आहोत.महाराष्ट्रातील वैचारीक घुसळण याघडीला थांबलेलीच आहे. आपण मराठी आहोत आणि सगळे व्यवहार मराठीतूनच करू असा आग्रह सोडू नका".

या प्रदिर्घ मुलाखतीतून बरेच काही शिकण्यासारखे आहे. आपल्यापैकी ज्याला ज्याला मराठीचा अभिमान आहे त्याने त्याने ही मुलाखत वाचलीच पाहीजे. या मुलाखतीचे जळजळीत अंजन प्रत्येकाने आपल्या डोळ्यातून घातले पाहीजे.

खरे पाहता 'भाषाभान' या पुस्तकाचे नाव 'मराठीचे भाषाभान' असे ठेवायला काहीच हरकत नाही.

वाच्यार्थ पोहोचवणारी 'अभिधा' शक्ती, लक्षार्थ देणारी 'लक्षणा' शक्ती आणि व्यंगार्थ (सुचवलेला अर्थ) प्रकट करणारी 'व्यंजना' शक्ती या भाषेच्या तीन शक्ती कार्यरत असतात. लेखीकेने 'भाषाभान' हे पुस्तक या तीन शक्तींना अर्पण केलेले आहे. वाचकांचे मराठी भाषाविषयक भान तल्लख होण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग होईल असा लेखीकेला विश्वास वाटतो.

लेखिकेचे मराठी भाषाविषयीचे कुतूहल आणि सामाजिक भान यांना समतोल विचारांचीही यात जोड मिळाली आहे. यातील लेख लालित्यपुर्ण शैलीमुळे वाचकांना आपलेसे करतील आणि चिंतनशीलतेमुळे त्यांना अंतर्मुखही करतील.

भाषाभान

डॉ. नीलिमा गुंडी, पुणे
प्रकाशकः उन्मेश प्रकाशन, पुणे
प्रकाशनः २००८ किंमतः १५० रू. पाने: १७१

कलाकारी


कलाकारी
विशाल मनाच्या कॅनव्हासवर
मी शब्दांचे चार फटकारे मारतो
हळुहळु शिल्प तयार होते
अन वेडी लोकं म्हणतात
"व्वा! छान कविता करतो!"