Wednesday, March 31, 2010

दै. सामना चे नाव कान्तिपूर झाले?

दै. सामना चे नाव कान्तिपूर झाले?

आजचा दै. सामना ची ऑनलाईन आवृत्ती बघीतली असता खालील प्रमाणे दिसली.

saamana ya kaantipur?
सामना या कान्तिपूर??
(वरील फोटोत कोणत्याही इमेज प्रोसेसींग सॉफ्टवेअरची मदत घेतलेली नाही. तुम्ही दै. सामनाच्या ई ईडिशनवर बघू शकतात.) वेळ सकाळची ९:०० वाजता.

कान्तिपूर हे नेपाळ मधले वृत्तपत्र आहे.
हे सामनाचे असे दिसणे म्हणजे दै. सामना एका अर्थाने खरेखूरे "हिंदू आदमीका खुदका वार्तापत्र" आहे हे साबीत झाले.

तुम्ही ऑनलाईन आवृत्ती बघेपर्यंत कदाचीत या संकेतस्थळाची व्यवस्था पहाणारे तुमच्या माझ्यासारखे व्यवसायबंधू झोपेतून जागे झाले असावे अन तुम्हाला नेहमीचा सामना दिसायला लागलेला असावा.

Monday, March 29, 2010

रेडिओ

रेडिओ


लहाणपणी मला पडायचा एक प्रश्न
असतील का रेडिओमधील माणसं सुक्ष्म?

असतील ही माणसे आपल्यापेक्षा वेगळी
एकत्र बसून वाजवतात वाद्ये सगळी

एकतर रेडिओचा आकार छोटा
गायक, वादक, तबला, पेटी, वाद्ये इतर पसारा केवढा मोठा!

खासच असतील ही माणसे एकजात
तरीही प्रश्न पडे कशी वाजवतात गाणी एकसाथ?

एका गाण्यासाठी लता मंगेशकर येते
तिचे गाणे म्हणून ती निघून जाते

नंतरच्या गाण्यासाठी किशोर कुमार येतो
त्याचेही गाणे म्हणून तो निघून जातो

निश्चितच आहे सगळे वेगळे
त्याशिवाय का सुरळीत चाले सगळे?

हे सगळे प्रश्न मी विचारले माझ्या काकांना
ते म्हटले, "तू नाच कर, तू पण दिसशील सगळ्यांना"

त्यानंतर एकदा दादाला रेडिओत झुरळ दिसले
नुसते फिरे ते इकडून तिकडे, तबकडीमध्ये ते फसले!

दादा म्हणाला, "सच्या चल, रेडिओ उघडू,
झुरळांबरोबर तुझी ती माणसेही बाहेर काढू"

रेडिओ उघडून दादाने केला तो साफसुफ
मला तर तसे काहीच दिसले नाही सगळेच सारे ओम फुस

दादा म्हणाला,"रेडिओत का कधी माणसे असतात वेड्या!
तू उद्योगी लहान म्हणून मोठी माणसे सोडतात पुड्या

अरे रेडिओ म्हणजे इलेक्ट्रॉनिक सर्किट. तुला आता नाही कळणार;
कपॅसिटर्स, रेझिस्टर्स, इंडक्टर्स, आयसीज, स्पिकर्स अन वायर्स
आताच बघून ठेव, पुढे अभ्यासात उपयोगी पडणार"

कालच लहान भाच्याने रेडिओ लावला त्याच्या वडिलांच्या मोबाईलवर
त्याच्या गॅदरिंगचे फोटो अन व्हिडिओ क्लिप्सही दाखवल्या स्क्रिनवर

मी मनात म्हटले आजची पिढी खुप पुढे गेली
पण आमच्यावेळच्या रेडिओची मजा तिला नाही कधी आली.


- सचिन बोरसे
२८/०३/२०१०

आपण विजेसाठी जास्त पैसे का मोजतो? कारण-

आपण विजेसाठी जास्त पैसे का मोजतो? कारण-
ph1
फोटो १
ph2
फोटो २

विहीर: खोल अन गुढ अंधारी, काळीकुट्ट, सगळ्यांना कवेत घेणारी

नुकतीच विहीर (थेटरात) 'पाहीली'.

'वळू' चीच बरीचशी टिम यात आहे. कथा दोन मावस भावांमधील आहे. पुण्याचा समिर (मदन देवधर) अन गावाकडचा नचिकेत (आलोक राजवाडे). सम्या आपल्या नचादादावर फार प्रेम करतो. प्रत्रांमधूनही संवाद साधत असतो. दोघेही संवेदनशील आहेत. सम्या त्याच्या आई, बहिणीबरोबर त्याच्या मावशीच्या लग्नासाठी नच्याच्या घरी, गावी येतात. वाड्यात खेळतात. विहीरीत पोहतात. सम्या पट्टीचा पोहणारा असतो तर नचादादा सांगड लावून पोहोतो.

नचादादा गुढ बोलतो. त्याचा जीव नेहमीच्या वातावरणात गुदमरतो. त्याला त्याच्या पलीकडे कोठेतरी दुर निघून जायचे असते. गायब, अद्रूष्य व्हायचे असते. तसे तो सम्याला बोलूनही दाखवतो. समिरला नचादादाला पुण्याला शिकायला आणायचे असते. तो त्याच्या आईला तसे सांगतो. नचादादालाही आग्रह करतो. नचादादा प्रतिसाद देत नाही. सम्याला त्याचा फार राग येतो. तो त्याच्याशी संवाद साधत नाही. पण मनातून त्याच्याशी नचादादाच बोलेल अन नचादादाला सम्याच त्याच्याशी बोलेल असे वाटते. सम्या पोहोण्याच्या स्पर्धेसाठी शहरात येतो. सम्या स्पर्धेहून परत येतेवेळी नचादादाचा विहीरीत मृत्यू झालेला असतो. त्याच्या मामाला त्याने (मामाने) नचादादाला सांगड ढिली बांधल्याची खंत जाणवते. सम्याला नचादादा गेल्याचे काही पटत नाही. तशातच त्याच्या मावशीचे लग्न लागते. तो कुटूंबासह पुण्यास येतो. तरीही वारंवार सम्या नचादादाचा विचार करतो. त्याचे अस्तित्व त्याला नेहमी जाणवत राहते. कुटूंबातील इतर जण कुणी गेल्यानंतर आपले नेहमीचे व्यवहार कसे करू शकतात याचे त्याला कोडे पडते.
नचादादाच्या परिक्षेचा निकाल लागल्यानंतर तो पेढे वाटून आनंदही व्यक्त करतो.
शेवटी एक दिवस तो नचादादाला शोधण्यासाठी घराबाहेर पडतो. त्याला नचादादाला केवळ एकदाका होईना भेटायचे असते. एकदोन दिवस भटकल्यानंतर त्याला एक मेंढपाळ (विठ्ठ्ल उमप) भेटतो. तो त्याला जीवनाचे तत्वज्ञान सांगतो. त्यानंतर सम्या पुन्हा गावी जातो. तो मनापासून नचादादाला हाक मारतो. त्याच वेळी नचादादा त्याला विहीरीच्या काठावर दिसतो. शेवटी हा सगळा भास असतो. सम्या पुन्हा नेहमीचे जगणे जगतो का हे त्याने प्रेक्षकांवर सोडलेले आहे.

बाकी चित्रपटातील तंत्राबद्दल, दिग्दर्शनाबद्दल, कलाकारांबद्दल बोलावे तितके थोडेच आहे.

असा हा चित्रपट पाहिल्यानंतर सम्याबद्दल खुपच कणव निर्माण झाली. एकीकडे त्याच्या भावनांशी आपण एकरूप होवू पाहतो तर त्याच वेळी अनेक अनुत्तरीत प्रश्न तो सोडून जातो.

मला चित्रपटातील काही बाबी समजल्या नाहीत. मेंढपाळ अन सम्यातले संवाद फारच कमी आहेत.
१) मेंढपाळाचं जीव असलेलं व हरवलेलं कोकरू त्याला कोणत्या शक्तीने परत मिळते? तिच शक्ती तो सम्याला कशी काय देतो? (या ठिकाणी मी जेथे चित्रपट पाहीला तेथे तो कापलेला वाटला. आत्ताच्या डिजीटल चित्रपट दाखविण्याच्या तंत्रात चित्रपट कापता येतो का?)
२)सम्याला विहीरीवर नचादादा परत भेटतो, ते दोघे परत फोहोतात. सम्याला तसा भास का होतो?
३)नचादादा पुर्ण चित्रपटभर हातात दांडकं घेवून का वावरतो?
४)पुर्ण चित्रपट समिर नचादादाचा असतांना गावातील घरातील काही दृष्यांमध्ये खुपच बारकाई का दाखविली? (जसे सम्याची आई दळण कांडतांनाचे संवाद) जे न दाखवले असते तरी चित्रपटात काही अडथळा नसता आला. मान्य आहे की बारकाईच्या द्रूष्यांत दिग्दर्शनाचे अंग आहे पण त्याचा कथेशी काही संबंध नसल्यासारखा वाटतो.
५) सम्या नच्याला शोधण्यासाठी २/३ दिवस फिरल्यानंतरही त्याच्या अंगावरची बंडी एकदम कोरी करकरीत कडक इस्त्रीची दिसते. नचादादाच्याही शर्टाची इस्त्री बर्‍याच द्रूष्यांत नजरेला टोचते.
६) विहीर च्या ऑफिशीयल संस्थळावर हे लिहीले आहे:
"Samir’s search leads him towards the experience of oneness where he can unite with Nachiket again!"
समिर एकटा पडूनही तो नचिकेत शी (किंवा त्याच्या भासमान अस्तित्वाशी) कसा एकरूप होतो? तो पुढील आयुष्य सरळ जगतो का?

काहीही असो. चित्रपट पाहून बाहेर आल्यावर हातात काही लागलं नाही तरीही जे हातात आलं नाही ते शोधण्यासाठी मेंदूने विचार जरूर केला. यातच हा चित्रपट करणार्‍यांचं यश आहे.(माझा पुण्यातील एक लांबचा भाऊ अगदी समिरसारखा दिसतो. न कळत त्याच्याशी रिलेट होत गेलो. गावी जाण्याची हुरहूर, बरोबरीचे भाऊ भेटण्याची ओढ अनुभवलेली असल्याने हा आपलाच चित्रपट आहे असे जाणवले.)

समिरच्या मनातील द्वंद, प्रश्न, संभ्रम आपले होवून जातात.

चित्रपट संपल्यानंतर बर्‍याच जणांच्या तोंडून "च्यायला, काय समजलं नाय बुवा" असे उद्गार एकण्यात आले. तशीच परिस्थीती माझीही होती. पण ते न कबूल करायची मध्यमवर्गीय मनस्थिती माझीच होती. एवढा अंतराष्ट्रीय स्तरावरचा गाजलेला हा चित्रपट आपल्याला समजला नाही आपला कमीपणा की हेच त्या चित्रपटाचे यश? खरेच विहीर फारच खोल अन गुढ आहे, अंधारी, काळीकुट्ट, खोल खोल, सगळ्यांना कवेत घेणारी.

विहीर:
दिग्दर्शक - उमेश कुलकर्णी, कथा-पटकथा - गिरीश कुलकर्णी, सती भावे
छायालेखन - सुधीर पलसाने, संकलन - नीरज वोरालिया, संगीत - मंगेश धाकडे
कलावंत - मदन देवधर, आलोक राजवाडे, रेणुका दप्तरदार, डॉ. मोहन आगाशे, ज्योती सुभाष, गिरीश कुलकर्णी, अमृता सुभाष, सुलभा देशपांडे आणि अन्य.

अवांतर: एबी कॉर्प निर्मित जरी ही विहीर असली तरी सगळी छाप ही मराठीच आहे. अमीताभ ने काही ढवळाढवळ केलेली दिसत नाही. (की केवळ मराठीच्या तथाकथित प्रेमापोटी झाले? काहीही असो. एक चांगली कलाकृतीची निर्मीती झाली हे नक्की. मराठीचा झेंडा असाच उत्तरोउत्तर उंच जावो अन विहीर सारखे विचार करायला लावणारे चित्रपट निर्माण होवो याच अपेक्षा.)

कुणास हा चित्रपट पुर्ण समजला असेल, किंवा काही वेगळा अर्थ जाणवत असेल तर सांगा.

Wednesday, March 17, 2010

काठावरती तुम्ही उभे (बैठकीची लावणी)

काठावरती तुम्ही उभे (बैठकीची लावणी)



फुलपाकळ्या कुस्कूरूनी टाकल्या तलावी या पसरूनी
काठावरती तुम्ही उभे! पाण्यात उडी घ्याना ||धृ||
अहो सजणा, मनरमणा

दिवस नाही अन रातही नाही सुर्यफुल हे उमलू पाही
सुगंधीत या पाण्यामध्ये वत्रांकित पहूडले मी एकटी
धुकाळ या अशा पहाटे मोहरली मज काया ||१||

तरी तुम्ही काठावरती उभे? पाण्यात उडी घ्याना ||धृ||
अहो सजणा, मनरमणा

चुंबूनीया मी माझाच खांदा, केला इशारा धावत याया
पाण्याविण तडफे मीन, तशीच प्रेमाविण आहे मी नं?
जळ न भासे आता हे जाळ की मजला ||२||

तरी तुम्ही काठावरती उभे? पाण्यात उडी घ्याना ||धृ||
अहो सजणा, मनरमणा

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
१६/०३/२०१०
गुढीपाडवा

(बैठकीची लावणी ही खड्या लावणीपेक्षा वेगळी असते. काही जणांना ती शास्त्रीय संगीत अन लोकसंगीत याच्या मधली वाटते. ज्या सामान्य जनांना शास्त्रीय संगीत उमगत नाही पण समजते अशा नागर जनांसाठी बैठकीची लावणी योग्य वाटते. म्हणूनच बैठकीची लावणी घोळवून घोळवून म्हटली जाते/ जावी.)
पाभे/दफो.

चला जोडीनं तण हे काढू, चला ठिबकसिंचन करू

चला जोडीनं तण हे काढू, चला ठिबकसिंचन करू

पिक आलंया जोमात औंदा त्येच्यात तणं लागलं वाढू ...
अहो राया चला जोडीनं तण हे काढू ||धृ||

अहो सजणा चला जोडीनं तण हे काढू
अहो सख्या चला जोडीनं तण हे काढू
अहो धनी चला जोडीनं तण हे काढू
अहो दिलवरा जोडीनं तण हे काढू

बांधानं या येता जाता काटं बोचत्यात पायी /* (बांधावर असणारे चुबूक काटे हे सुद्धा एका तणाचाच प्रकार आहे.) */
काढून काढून मी गं थकले उपाय गावंना काही
काट्याकुट्यात कशाला फिरता?...
अहो काट्याकुट्यात कशाला फिरता?
काटं लागल्यात वाढू ||१||

तर मंग राया चला जोडीनं तण हे काढू ||धृ||
अहो सजणा चला जोडीनं तण हे काढू
अहो सख्या चला जोडीनं तण हे काढू

कोरस :
अहो दाजी जावा जोडीनं तण ते काढा...
अहो पाव्हनं जावा जोडीनं तण ते काढा...


विहीर आपली पाण्याची तिचं पाणी लई खोल
पंप विजेचा भक्कम दांडगा आनतोय त्याला वर
पर भारनियमानं वाट लागली...
पर भारनियमानं वाट लागली
हातची पिकं जातील मरू ||२||

अहो राया चला ठिबकसिंचन करू ||धृ||
अहो सजणा चला ठिबकसिंचन करू
अहो सख्या चला ठिबकसिंचन करू
अहो दिलवरा जोडीनं ठिबकसिंचन करू

कोरस :
अहो दाजी जावा जोडीनं ठिबकसिंचन करा...
अहो पाव्हनं आता जोडीनं ठिबकसिंचन करा...


तण सारं साफ झाल्यावर दिसू लागलं दाणं
भरलेलं कणसं खाय येतील जनावरं ही बेणं
पाखरं हाकलाया तुमी ओ आता...
पाखरं हाकलाया तुमी ओ आता
झाडावरती चढा ||३||

अन राया आता तण हे काढून टाका ||धृ||
अहो सजणा जावा तण हे काढून टाका
अहो सख्या तुमी तण हे काढून टाका

कोरस :
अहो दाजी जावा तण हे काढून टाका...
अहो पाव्हनं आता तण हे काढून टाका...


०९/०३/२०१०
पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
(आगामी आकर्षण : पोवाडा मर्द मावळ्याचा)

जेवण

या. आज उशीरा आलात मास्तर. तिकडे नको इकडे बसा की पलंगावर. पंख्याचा वाराही येतो तिथं.

लवकर काय अन उशीरा काय? घरी एकट्या असणार्‍याला वेळेचे काय?

आसं कसं वेळेवर जेवण झालं ठिक असते प्रकृतीला. सगळ्या गोष्टी वेळेवर व्हायला पाहिजे.

तुमचे बरोबर आहे हो. पण वेळेआधी जेवले म्हणजे सगळाच प्रॉब्लेम. अन बाकीचे मेंबरं पण काय म्हणतील?

बाकीचे मेंबरं काय हो, गप जेवतात अन जातात. तुमचे कसे सगळे वेगळेच आहे. म्हणून तर मी तुम्हाला निरनिराळे पदार्थ देते, खावू घालते. इतरांना देत नाही असले काही.

अहो, तुमच्याकडे आम्ही काय जेवायला येतो का नुसते? पोट पुर्ण भरले तरच जेवणाची मजा आहे. आम्ही जेवणावर प्रेम करणारे आहोत.

मास्तर, तुमच्यासारख्यांच्या प्रेमानेच तर सगळे मिळते आम्हाला. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. नाहीतर आमच्यासारख्या खानावळी उघडणारे भरपूर आहेत. पण तुम्हाला काय हवं काय नको ते आज मी बघणार आहे.

वा वा आज चांगलाच योग आहे.

हो तर. आज पुर्ण जेवण करणार की नाश्ता भरवू फक्त?

तुम्ही काय देणार?

तुम्ही म्हणाल ते.

आज आम्ही पुर्णच जेवण करणार बघा.

तुम्ही काय जेवणार पुर्ण? तुम्ही तर सत्रा ठिकाणी जेवण करणारे. आधीच नाश्ता जेवण करून आलेले दिसतात. गेला असाल हाटेलात .

असं म्हणू नका. पुर्ण जेवणाच्या आशेनेच आम्ही येथे आलो नं? मग?

बरं, ठिक आहे. काय काय वाढू तुम्हाला?

तुम्ही म्हणाल तसं. काहीपण वाढा. पण सगळं साग्रसंगीत झालं पाहीजे. अगदी पाण्यापासून ते शेवटी तोंड गोडही झालं पाहीजे.

आता हे तुम्ही आम्हाला सांगता? तुम्हाला काय हवं काय नको हे सगळं आम्हाला तोंडपाठ आहे. नेहमीचं मेंबर तुम्ही आमचे. बरं कोठे बसता जेवायला? आत वाढू की येथेच बाहेर करणार जेवण?

बाहेर नको, आतच बसतो. बाहेर इतर मेंबरचाही त्रास होतो. म्हणजे पैसे ही द्यायचे अन जेवणाचे समाधानही नाही. शांतपणे जेवण करण्यातच मजा आहे. म्हणुनच तर आम्ही येथे येतो. हो की नाही?

ते तर खरेच हो. तुम्हाला आत जातीने वाढते. बघते कोण उपाशी राहते ते.

अहो आजच्या जेवणाने काय होईल? एकतर आम्ही एकटे माणूस. लग्नानंतर आम्ही घरीच जेवू. तरीही तुमची आठवण येतच राहील हो.

बरं बरं मास्तर. जास्त हरभर्‍याच्या झाडावर चढवू नका. बोलतांना तुमचे तोंड कोणी घरू शकत नाही. चला तर मग लवकर बसा.

हो हो आलो लगेचच. तुम्ही तयारी करा तर मग.

चल उसात दंगा करू

चल उसात दंगा करू

मंडळी, आप्ला ह्यो हिरो आन हिरवीन मस्तपैकी श्येताव आल्याली हायेत. त्ये काय करूं र्‍ह्यायलेय त्ये पाहू चला:
(पैकं नसल्यांनं एका डबड्यात ग्येल्येल्या पिच्चरमंधी ह्ये गानं टाकेल हाय.)


हिरो:

पिक आलं वयात आता
नको उशीर तू ग करू
अग पारू...
चल उसात दंगा करू



हिरो:

डोईवरी पदर घेवूनी आलीस मोठ्या नखर्‍याने
सांग सजणी भ्यालीस का तू माझ्या असल्या वागण्याने?



हिरवीन:

गाव बोलंना काहीबाही पन लगीन आपलं र्‍हायलंय ठरू
लाजायची येळ गेली अन मी फिकीर कशाची आता करू


हिरो:

आसंच आसलं तर मग
अग पारू...
चल उसात दंगा करू


हिरो:

पाटपान्यात भिजलेत पाय लागल्यात मासोळ्या दिसू
हात लागता हाताला मग डाळींबी दाण्यांना आलं हसू



हिरवीन:

मी तर मैना लाडाची रे तुच माझा राघू
तरीबी सांगते नका उगा कौतीक करू



हिरो:

आरं..र्रर्रर्र....
अग पारू...
चल उसात दंगा करू

काय करावे कळेना

काय करावे कळेना



काय करावे कळेना मजला
आज पाहीले मी प्रियतमेला || ध्रु ||

साडीवरती फुलली फुले, रंग तयांचा नारंगी
तसलीच कुंचूकी लांब हाती, शोभतोय अंगी
निर्‍या पायघोळ एकसरी, नेसण्याची रीत न्यारी
पाहूण जणू वाटते तु सुरी की ग दुधारी

ह्रूदय माझे तुझ्याकडे तरी
जिवंत मी कसा प्रश्न मजला || १ ||
आज पाहीले मी प्रियतमेला || ध्रु ||



चाफेकळी नाक तुझे भुवयांना वक्र बाक
काळे नयन पाणीदार पापण्यांची उघडझाप
मादक ओठ गुलाबी शब्दांचेच मदनबाण
चोरटी तू पाहू नको, मनातले सांगून टाक

मोत्यांची कांकणे ल्यालीस हाती
सुखावती नजरेला || २ ||
आज पाहीले मी प्रियतमेला || ध्रु ||

- पाषाणभेद (दगडफोड्या)

(ती अन तो )

कच्च्या मालाचे पुरवठादार : दुवा १, दुवा २ दुवा ३

ती - इ..इ....नको ना.
तो - नको काय नको
ती - धसमुसळा कुठचा!
तो - मी धसमुसळा तर तू कोण?
ती - तिकडे शिरला बघ!!
तो - आता काय करू?
ती - काय करू म्हणजे काय? जरा चपळाई दाखव की.
तो - तेच तर करतोय.
ती - हो पण तुला तेच जमत नाही.
तो - आता तुझा हात आडवा आला. मधे मधे करू नकोस तू.
ती - अरे पण तुला जमत नाही तर असा चिडतोस का? सावकाशीने घे की.
तो - हो ग सावकाशीनेच घेण्याचा प्रयत्न करतोय.
ती - हो पण इतकाही सावकाश असू नकोस. नाहितर मगाचसारखा तो ढेकूण परत गायब व्हायचा.

महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण :: प्रतिक्रिया पाठवा :: (पण कोठे?)

महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण :: प्रतिक्रिया पाठवा :: (पण कोठे?)

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=47335:2010-02-12-06-02-16&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=47334:2010-02-12-05-53-22&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117

(या असल्या धोरणाबाबतच्या बातम्या आम्हाला वर्तनामपत्रातूनच का वाचायला भेटतात? शासनाला सांस्कृतिक धोरण ठरविण्यासाठी सर्वसामान्य लोकांपर्यंत जाण्याची गरज वाटत नाही काय? असो.)

प्रा. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरविण्यासाठी एक समिती विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यावेळचे सांस्कृतिक मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आली होती.

समितीच्या शिफारशींची सविस्तर माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मिळू शकेल. प्रस्तुतचे लेख व प्रत्यक्ष शिफारशी वाचून वाचकांनी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत प्रतिक्रिया नोंदवणे अपेक्षित आहे. त्यानंतरच या समितीच्या शिफारशींवर साधकबाधक चर्चा होऊन त्याचे प्रत्यक्ष धोरणात रूपांतर होण्याची प्रक्रिया सुरू होईल. महाराष्ट्र शासनाचा या प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न असून तज्ज्ञांची मते आणि लोकांच्या सूचना यांतून समितीच्या शिफारशींची योग्यायोग्यता, आवश्यकता, उपयुक्तता पडताळून पाहिली जाणे गरजेचे आहे!

www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सदर माहिती जरी उपलब्ध असली तरी त्यावरील प्रतिक्रिया कोठे द्याव्यात यात कोठेही उल्लेख नाही. 'संपर्क करा' हा इमेल आयडी पण सापडत नाही. अशा वेळी कोणी या धोरणावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी कोठे संपर्क कराव? नाही म्हणायला एक अर्ज आहे. पण तेथे कशा प्रकारे प्रतिक्रिया चढवावी अन त्याची पोचपावती मिळेल याची खात्री काय?

थोडक्यात शासकिय संकेतस्थळाने आपली दिवाळखोरी परत एकदा जाहिर केलेली आहे.

असो. तत्राप आपल्यामध्ये कोणास या प्रतिक्रिया देण्याच्या (पक्षी लश्कराच्या भाकर्‍या भाजणे हा शब्दप्रयोग योग्य होईल काय?) मोह झाल्यास आपण जरूर करावा अन राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरविण्यासाठी सहभागी व्हावे.

रखमा

रखमा


--------------------------------------------------------------------------------------------
सक्काळचे ६
काय मेला बघूं र्‍हायलाय निसता. सक्काळी सक्काळी बोलीवलं मला त्या भाड्या शेटनं अन म्हनतू कसा की 'ए रखमे पानी मारलं का नाही त्या कालच्या भिंतींवर ते?'. आता मी सांगते तुमाला. माला काय ह्ये नविन हाय का ह्ये. दहा वर्स झाली या लायनीत राहून. तुमाला सांगते बिगार्‍याच आयुक्श लई खराब. त्यात माझ्यासारक्या बायामान्सांच्या हालाचं तर ईचारूच नका. आता तुमीच बगाना त्या भाड्या बिल्डर शेटच यवढ्या सक्काळी सक्काळी इथं पालात येवूनशान भिताडावर पानी मारायला सांगायच काय काम व्हतं का? आन त्ये बी माझं मालक पालात नसतांना? बरं मी काय त्या भाड्याला वळखीत नाय का त्ये? लुभ्रा मेला. त्याची नजर काय बरूबर नाय. मागला शेट लई चांगला व्हता. त्याच्याबरूबर आमी सात आट बिल्डींगी केल्या नव्ह का? मग. व्हताच तसा त्यो. लय दयाळू. दोन वर्साच्या ऐन दिवाळीच्या दिशी माझं तान्ह लेकरू आजारी पल्डं तवा त्यानं त्याच्या गाडीत घालूनशान दवाकान्यात डागदरकडं घ्येवून गेला. आन माझ्या हातावर २०० रुपयं द्येवून 'काय लागलं तर सांग रखमे. दोन दिस रोजी नगं करू. आन तुझ्या नवर्‍याला पन सांग की दोन दिस ताडी न प्येता काम कर आन त्या पैशानं आवशीद आन पोराला.' त्याची नजर काय या शेटसारकी वाईट नवती. मालाच नाय तर बाकीच्या रोजंदारीच्या बायांनाबी त्यो लय दयाळू लागायचा. त्याला दोन मोट्या पोरी आसल्यानं जगात काय चालतं त्ये समजत आसल. आसत्यात आशी मान्स. आन हा भाड्या. सदाअनकदा घिरट्या घालतू माझ्या पालात. मागल्या येळंला यांना म्हनतो कसा ' रमेश, आता नव्या बिल्डींगचा तिसरा स्लॅब पडतोया तवा तू तुज्यावालं बिर्‍हाड आता पयल्या मजल्याच्या यका फिल्याटमदी टाक. माझं मालकं बी लय भोळसट येडं. लागलीच फशी पडाया लागलं. म्या शेटला म्हनलं की, 'आमी गरीब मान्सं. आमी हायेत तितंच ठिक हायेत. आमी ही बिलडींग व्हयीपत्तूर पालातच राहू. आन खाली राहूनशान बिलडींग ची राकनदारीपन व्हती. त्येवढ्येच दोन पैसं तुमी त्यामूळं आमाला त्याचे द्येत्यात नव्हं का.'
बिलडींग ची राकनदारीचा इशय निगाला तवा त्या मेल्या शेटनं आपला नाद टाकला. आन आत्ता सक्काळी सक्काळी इथं हजर कामं सांगाया.

आन आत्ता पंदरा मिन्टांत लाईट जातील. तवा म्या कशी मोटार सुरू करू आन कशी पानी मारू त्या भिताडावर सांगा तुमी. हा नवा शेट माझ्या मालकाला दुसरं कायबी काम सांगतो आन मी एकली आसतांना न्येमका हतं येत्यो. मागल्या येळंला माझा नवरा गावाकडं यवतमाळला ग्येला व्हता तवा तर माज्या जिवात जिव नव्हता. मालाच आता पुढं व्हवूनशान दुसरीकडं काम पाहायला लागल.

मी तुमच्याशी काय बोलूनं राह्यले इथं. तिकड माझा चाहा वोतू जाईल.

"काय रं सुंदर्‍या, कवापासून त्वांड घासतो? चाहाच्या आधनाला उकळी आली का बघ की जरा. आन तुला साळा हाय ना आत्ता साडेसातला? आन तुज्या बाला बलीव चाहा प्यायला. सक्काळी सक्काळी ग्येला दुसर्‍या सायटीवर."
-------------------------------------------------------------------------------------
सक्काळचे ८

चला आता दुसर्‍या मजल्यावरच्या सल्याबवर ईटा पोचवायच्या हायेत. तुमाला सांगते या बिलडींगच्या पायर्‍या जास्तीच हायेत. आन त्याच्यात दुसरा सल्याब म्हंजी पायात गोळं यायचंच काम. डोक्यावर बारा बारा ईटांचं वझं घ्येवूनशान चढायच म्हंजे मरवणूकच हाय जनू. नाय आता एखांद्या तासात बाकीच्या रोजंदारीच्या बाया येतील हात लावायला तवा थोडी मदत व्ह्यईल कामाला पन म्या इथंच राहातू राखनदार म्हनून तर जास्तीचं काम करावा लागतं. आन दोन पैसं जास्तीचे मिळून सौंसारालाबी हातभार लागतू.

-------------------------------------------------------------------------------------
सक्काळचे ९

आज ज्येवायला पिठलं भाकरी करत्ये. त्योच आता न्याहारीला व्ह्यईल. आमी आताच कायबायी आसल त्ये आताच्या येळला न्याहारीला खावून घ्येतो. दुपारच्या १ वाजंपर्यंत बुड ट्येकायलाबी सवड राहात नायी मग. कामाच्या रगाड्यात आंग पिळून निघतं. घ्या ! त्येलाला आत्ताच संपाया पायजे व्हतं का? कोपर्‍यावरच्या शेटच्या दुकानीत जाया पायजे. कालच संद्याकाळी त्येल संपल्याच माज्या घ्यानात व्हतं पन रातीला ईसरून ग्येले आन आता घाईच्या वक्ताला आशी फजिता व्हती.

'शेट, १० रुपायाचं त्येल आन ५ रुपायाचं डाळीचं पिठ द्या.'

'काल संध्याकाळी तुज्या नवर्‍यानं २ रुपायाच्या इड्या आन १ रुपायाचं फुटानं न्येलं. त्ये घरून आता उधारी ७३ रुपये झाली बघ. कवा देशील?'

'शेट आता ह्ये सामान द्या आन म्होरल्या बुधवारी रोजी भरली का द्येतो की पैसं.'

'बरं बरं. लक्षात ठिव म्हंजे झालं'
-------------------------------------------------------------------------------------
सक्काळचे ११

आता त्या मिस्तरीच्या हाताखाली कामं करावी लागतील बया. आज त्यो वरच्या मजल्यातल्या भिती चढवलं. बाकीच्या बाया काय काम करीत नाय बघा. नुसत्या कुजुकुचु करत टायम खोटी करतात. त्या रानीला तर काय कामच कराया नगो. आता माला सांगा, मिस्तरीला वर माल कालवाया वाळू लागल का नायी? पन या रानीला खाली वाळू गाळाया ठ्येवलं तर तिच आपलं बोलनं चालूच हाय बाकीच्या बिगार्‍यांशी. मेली. हा शेट आंगाखाली घ्येईल तवा समजलं तिला काय आसतं त्ये. मरो आपल्याला काय करायचं दुसर्‍यांचं. आपन आपलं काम करावं ह्येच बरं.

--------------------------------------------------------------------------------------
दुपारचं १
आरं ए सुंदर, तुजं ज्येवन झालं आसंल तर तुज्या बा ला बलीव ज्येवन करायला. त्येंला काय कामामधी सुद नसती बग. तरी म्या सांगत आसत्ये की ह्ये बिगार्‍याच काम सोडून मिस्तरीचं काम शिकून घ्या. पन नायी. आपन काय परगती करायची नाय आन आपली गाडी अधोगतीकडं न्यायची. आन तू पन मुडदा म्येला त्येच्याच लायनीला जानार. शाळंतून आल्यापास्न बगत्ये हाये मी निसता मातीतच उंडारू र्‍हायलाय तू. जा तुज्या बा ला हाक मार ज्येवायला.
--------------------------------------------------------------------------------------
दुपारचं ५
आज काम करूंनशान लय थकाया झालं. मगाशी चा पिवून थोडं बरं वाटलं. आता त्या मुकडदमला हातचं काम सोडून माला पलास्टर च्या कामाला लावायचं काय काम व्हतं का? तुमाला सांगत्ये हा मानूस लई डांबीस हाय बगा. काम करून घ्येतो आन पैसं पन येळवारी देत नाय. आता सा वाजल्यानंतर सुट्टी करून माला उद्याच्यासाटी एखांदी भाजी आनाया बाजारात जायाच हाय तवा हातात धा ईस रुपयं नगो का? आपन आप्लं येळवारी पैसं मागून घ्यायला पायजे त्याच्याकडून.
------------------------------------------------------------------------------------------
रातीचं ७

'आव म्या काय म्हंते, तुमी एका दिसाचं औशीद नका प्येवू पन रेडीवोच्या बॅटरीक संपल्यात. त्या आनायच्या हायीत. झालंच तर सुंदरचे आंगांवरचे कापडं बी आनायचे हायीत. ढुंगनावर सगळ्या चड्या ग्येल्या त्येच्या. या बुधवारच्या सुट्टीत आपन बाजाराला जावू आन सगळं सामान घ्येवून येवू.'

'बरं बरं जावू आपन या बुधवारला. पन म्या काय म्हंतो ज्येवान झालं का? माला भुक लागलीया.'

'ह्ये काय ज्येवन तयार हाय. सुंदर्‍याचं झालं का तुमी बसा, म्या गरमागरम भाकरी थापती.'
----------------------------------------------------------------------------------------
राती १०

'आगं ए रकमे सुंदर लई लवकर झोपला आज.'

'तर वो. निस्ता वाळू आन मातीत खेळतो. मग दमूनशान लवकर झोपनार नायी तर काय?'

'आता तू काय करती तिकडं. ईकडं ये झोपाया. दिसभर लांब आस्तो आपन. ह्या बुधवारला तुलापन एक पातळ घ्येवून टाकू. कधीचं फाटकंच पातळ शिवून घालू राहीली. माला दिसत नाय का व्हय?'

'आत्ता आटवली का रकमा, माझ्या भोळ्या सांबाला.'

माझी अगतीकता

माझी अगतीकता

अगदी सकाळी मी उठलो,
उठलो म्हणजे काय, सध्या जागाच असतो. पण आत्ता मी जागेवरून उठलो.
तर काय सांगत होतो मी... की मी सकाळी उठलो,
निघालो रस्त्यातून.

रस्त्यात बघतो तर बहूतेक माणसे फिरायला निघालेली.
कोणी जॉगींगच्या सुटात तर कोणी पळायच्या बुटात,
बायामाणसे पंजाबीत तर कोणी घरगूती साडीत.
म्हातार्‍यांनी हातात घेतली होती काठी,
कुत्रा हातात घेवून फिरत होती तरणीताठी.
कुणी जोडीने गप्पा मारत फिरत होते
तर कुणी कानात हेडफोन लावून गाणे ऐकत होते.

मला गंमत वाटत होती.
वाटत होत खेचावी कुणाची तरी मफलर
करावी कुणाची कुणाशीतरी टक्कर.

आताशा वाहनांचीही वर्दळ सुरू झालेली होती.
एकदोन पेपरवाले सायकलीवर दिसले
अन एकदोन पिवळ्या रंगाच्या स्कुलबस दिसल्या.

रस्त्यात एक आंधळी बाई काठी टेकीत टेकीत चालली होती.
तिला सिग्नलवर रस्त्या ओलांडायचा होता म्हणून थांबली होती.
मी तिच्या जवळ गेलो.
मी पुढे झालो नाही अन तिला मदतही केली नाही.

निघालो पुढे तसाच.

पुढच्याच चौकात माझ्या मागून एक पाण्याचा फुटका टँकर पाणी गाळत पुढे गेला.
त्याने पुर्ण रस्ता ओला केला.
लगेच त्याच्या मागून एक मोटरसायकलवाला जोरात आला.
अन तो उजवीकडच्या रस्त्याला जाण्यासाठी वळला.
ओल्या रस्त्याने त्याची गाडी फरफटत गेली.
तो खाली पडला.

बरे झाले त्याच्या मागून कोणतेच वाहन येत नव्हते.
तो एकटाच पडून होता. विव्हळला.

मी जवळच होतो. पण मी मदतीला गेलो नाही.
हं.....मी नुसताच बघत होतो.
निघालो पुढे तसाच.

आता हमरस्ता लागला होता.
तेवढ्यात कर्रर्रर्रsss असा आवाज आला
अन लागोपाठ अऑ...ईईईईई असा आवाज आला.
मी मागे वळून पाहीले तर एका कारच्या खाली एक शाळकरी मुलगा आलेला होता.
रक्ताच्या चिळकांड्या उडालेल्या होत्या.
कार थांबलेली होती.
त्यातील टेपवरच्या गाण्याची धकधक येथपर्यंत ऐकू येत होती.

मी जवळ जावू लागलो.
तेवढ्यात त्या कारमधल्या युवकाने जोरात कार पुढे काढली अन तो पळून गेला.
त्या कारचा रंग, मॉडेल अन नंबर सगळे मी नीट पाहून घेतले.

ईकडे तो मुलगा विव्हळत होता. ग्लानीने आचके देत होता.
रस्त्यात तो मुलगा अन मीच होतो.
मी त्याला बाजूला केले नाही की मदतही केली नाही.
मी नुसताच बघत होतो.

तेव्हढ्यात तेथे शाळेची एक बस आली.
ड्रायव्हरने त्या मुलाला ओ़ळखले असावे.
त्याच्याच बसमधला मुलगा असावा तो.
ड्रायव्हरने त्या मुलाला धिर दिला.
त्याने व गाडीच्या क्लिनरने त्या लहानग्याला उचलले
अन त्यांच्या गाडीत टाकले अन गाडी हॉस्पिटलकडे वेगाने नेली.

मी तेथेच उभा राहीलो.

तुम्ही म्हणाल की मी असा का वागतो कुणाला मदत का करत नाही.

मला मनात खुप वाटते की मदत करावी. चांगले काम करावे.
माझी अगतीकता तुम्हाला कधीच कळनार नाही.
मी कधीच कुणाला मदत करू शकत नाही.

कारण...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण,
मला सांगा, तुम्ही कधी भुतांना मदत करतांना पाह्यलय का?

लेखन व लेखकाचे बाह्यरुप

लेखन व लेखकाचे बाह्यरुप

हा धागा केवळ मौजमजेखातर आहे. तत्राप यात काही वैज्ञानीक तथ्य असेल तर आपण सांगू शकतात.

असे म्हणतात की आपण जे लिहीतो तसे आपले मन असते. आपल्या मनातले आहे ते कागदावर उमटते. थोडक्यात आपले लिखाण आपला स्वभाव, वागणूक दाखवते. या लेखनात कार्यालयात केले जाणारे लेखन, अनौपचारीक पत्रे येत नाहीत. जे ललीत आहे, जे लेखकाला आनंद देते व जे खरे आहे ते लेखन येथे अभिप्रेत आहे.
थोडक्यात केले जाणारे लेखन लेखकाच्या मनाचा आरसा असते. अशाच प्रकारच्या मनाच्या आरशातून त्या लेखकाचे बाह्यरुप देखील आजमावता येईल का? बाह्यरुप म्हणजे तो लेखक/ लेखिका कसा / कशी आहे? त्याला कोणत्या आवडीनिवडी आहेत? पुरूष लेखक असेल तर त्याला मिशा ठेवण्याची आवड आहे का? त्याला कोणते कपडे आवडत असतील? लांब बाह्यांचे सदरे की अर्धी बाही? त्याला कसले व्यसन आहे? नाही? डोळ्यांचा रंग / केसांची ठेवण कशी आहे? असे काही जाणता येते का?
लक्षात घ्या की येथे स्वभाव कसा आहे याची पडताळणी घ्यायची नाही. केवळ बाह्यरूप कसे असेल याचा धांडोळा घ्यायचा आहे. येथे असणार्‍या लेखकांच्या मनात काही प्रतीमा तयार झाल्यात. आपल्याही मनात असल्या काही प्रतीमा तयार झाल्या आहेत काय?

येथे कोणतेही भविष्य वर्तवण्याचा हेतू नाही. किंवा 'सहीवरून स्वभाव, अक्षरावरून स्वभाव' वर्तवण्याचा हेतू नाही. कारण भविष्य व 'सहीवरून स्वभाव, अक्षरावरून स्वभाव' असे काही असते यावर माझा विश्वास नाही.

माझे वरील लिखाण थोडे विस्कळीत वाटेल पण जे जाणकार आहेत त्यापर्यंत माझ्या मनाच्या भावना पोचल्या असतील. कोणी माझ्या मतांची त्यांच्याबद्दल खाजगीरीत्या मागणी केली तर मी माझे मत त्या पर्यंत पोचवू शकतो.

अवांतर : (आज हा लेख लिहून मिपावरच्या माझ्या लेखांची शंभरी भरली आहे. शंभरी गाठल्याबद्दल मी माझेच अभिनंदन करतो व तुम्ही मला सहन केले त्याबद्दल तुम्हाला आधीच धन्यवाद देतो. माझ्या लेखनाने तुम्हाला थोडाजरी आनंद मिळाला असेल तर मी धन्य आहे. )

सुर्यग्रहण पाहण्याचा सोपा व धोकादायक नसणारा मार्ग कोणता?

सुर्यग्रहण पाहण्याचा सोपा व धोकादायक नसणारा मार्ग कोणता?

सुर्यग्रहण नुसत्या उघड्या डोळ्यांनी पाहू नये. (ग्रहण नसते तेव्हा व ग्रहणात असा काय बदल होतो जेणेकरून ग्रहणकाळातच सुर्याकडे उघड्या डोळ्यांनी बघू नये ते?) नासाच्या या साईटवर ते चांगले स्पष्ट केले आहे पण त्याचे मराठीकरण काय आहे?

आज होणारे सुर्यग्रहण पाहण्याचा सोपा व धोकादायक नसणारा मार्ग कोणता?
१) ग्रहणाचे चष्मे (ते बनावट कंपनीचेही किंवा चायनीज पण मिळू शकतात.)
२) पाण्यात / कागदावर ग्रहणाची प्रतिमा घेवून
३) पिनहोल कॅमेरा बनवून
४) डिजीटल कॅमेरॅच्या स्र्किन मध्ये
५) दुरदर्शनवर :-)

माझ्या मते सुर्यग्रहण हे डिजीटल कॅमेरॅच्या स्र्किन मध्ये बघितले असता डोळ्यांवर होणारा परिणाम हा सर्वात कमी असावा व त्यात ग्रहणही चांगले व रंगीत दिसेल.
आपले मत काय?

चालू करा तुमचे इंजन

सिचूयेशन: आप्ल्या पिच्चरचा बागाईतदार नायक निसता उंडारेल हाये. त्यो नुसता इकडतिकड पुढारपन करत फिरत आसतूया. त्येच्यावाली हिरवीन बायकू लय आंग मोडून शेतात कामं करतीया. आप्ला हिरो शेतात फिरकना झालाय. तवा काय व्हत त्ये हिरवीन गानं म्हनूनशान सांगती. ऐका:


लावनीच्या आधी आसतं तसं चालीमधलं गद्य:

{शेत आपलं मोठ भारी, निगरानी त्याची व्ह्याया हवी,
तुमी तर काय कामच करीना, फिरत्यात निसतं पुढार्‍यावानी
पाउस पडला, विहीर बी भरली, हिरव्या रानी हिरवी मखमल आली }

अहोss..सजनाs..

(चाल सुरू)

बघून काय राह्यले नुसतं तुम्ही, पिक जाईल ना वाया
अहो राया,
मग भरा हे इंधन अन चालू करा तुमचे इंजन ||घृ ||


औंदाच्या हो सालाला लावल उसाचं हो बेनं
उभ्या आडव्या वाफ्यातून हातान काढल तण
पर काय अक्रीत घडलं, विजमंडळ हे नडलं
सुरू केलया त्याने भारनियमन ||१||


तेव्हा बघून काय राह्यले राया, पिक जाईल ना वाया
अहो राया,
मग भरा हे इंधन अन चालू करा तुमचे इंजन ||घृ ||


पिक आल हाताशी हो नका त्यात घुसू देवू
जनावर ही माजलीत सारी एकेकाला हाकलून लावू
दांडक्यान रट्टा द्या हो, पहारा करा डोळ्यात टाकून अंजन ||२||


बघून काय राह्यले राया, पिक जाईल ना वाया
अहो राया,
मग भरा हे इंधन अन चालू करा तुमचे इंजन ||घृ ||


आडसाली उस झाला, तोडणी केली, उतारा वाढला
कारखान्यान दिलानं हप्ता, सपनात आल सोनं
गंजलं का इंजन? जरा चालना!
मग चोळा की बेरींगांना वंगन ||३ ||


अहो राया,
बघून काय राह्यले राया, पिक जाईल ना वाया
मग भरा हे इंधन अन चालू करा तुमचे इंजन ||घृ ||

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

श्रवण कौशल्य

एखादा आपल्या जीवनातला घडलेला प्रसंग घ्या. आपल्याला कोणीतरी काहीतरी काम सांगते व आपण ते काम जसे सांगितले अगदी त्याबरहुकूम करतोच असे नाही. असेच आपण एखाद्याला सांगितलेल्या कामाच्याबाबतीतही घडते. विद्यार्थीदशेत असल्याप्रसंगी शिक्षकाने शिकविलेले आपल्या जसेच्या तसेच लक्षात राहत नसण्याची शक्यता फारच असण्याची शक्यता असते. आपण टिव्ही, रेडिओ, चित्रपटात अनेक संवाद ऐकतो. हे संवाद आपल्याला जसेच्या तसेच लक्षात काही राहत नाहीत. अर्थात, ते लक्षात ठेवणे एवढे गरजेचेही नसते म्हणा. तरीही, एखादी गोष्ट आपण जशीच्या तशी, वाक्यन वाक्य लक्षात ठेवू शकत नाही.

मानवी जीवनात लेखन, वाचन, बोलणे व ऐकणे या क्रियांमध्ये ऐकणे अर्थात श्रवण करणे ही एक मुलभूत क्रिया घडते. अगदी लहान बाळ बोलण्याच्या आधीही श्रवणाचीच क्रिया करतो. तो जी बोलीभाषा ऐकतो ती त्याची मातृभाषा ठरते. आपण एखादे बोलणे ऐकतो तेव्हा आपण त्या बोलण्याप्रमाणे योग्य कृती केली तर आपण योग्य श्रवण केले आहे असे समजले जाते. म्हणजे, आईने जर तुम्हाला १ किलो शेंगदाणे व अर्धा किलो साबुदाणा आण असे सांगितले व तुम्ही बरोबर १ किलोच शेंगदाणे व अर्धा किलो साबुदाणेच आणले तर ती योग्य कृती ठरेल. अन्यथा तुम्ही वरवर ऐकून चुकीच्या वजनाच्या वस्तू आणल्या तर अयोग्य श्रवण क्रिया घडून अयोग्य कृती ठरेल. हेच जर तुम्ही आईने सांगितलेले जर योग्य रीतीने ऐकले तर तुमच्यात ऐकण्याचे (आज्ञा पाळणे या अर्थाने नव्हे) अर्थात श्रवण करण्याचे योग्य कौशल्य आहे असे मानले जाईल. (जे आईने सांगितले त्या संमती दाखवून आपण त्या वस्तू आणने किंवा टाळणे हा वेगळा मुद्दा आहे.) थोडक्यात एखादी गोष्ट ऐकणे व श्रवण कौशल्य वापरून लक्षपुर्वक ऐकणे ह्या भिन्न क्रिया आहेत. दैनंदिन जीवनात आपण आपले श्रवण कौशल्य वापरून आपले काम आपण सुगम बनवू शकतो. यात आपला तर फायदा आहेच पण कदाचित आपल्या ऐकण्याने समोरील व्यक्तीचे कामही योग्य प्रकारे, योग्य वेळेत होवू शकेल. लक्षपुर्वक ऐकणे ही एक अभ्यास करून उन्नत (Develop) करण्यासारखी कला आहे.

माझा धरशिल का हातात...हात

मंडली, म्या कालरातच्याला, नव्या वर्षाच्या मुहूर्तावर एक कविता ल्यिहल्येली हाय.

हिरो आन हिरवीन आपले ग्रामीन भागातले हैत. आन त्ये शेतामदी मजा कराया आलेले हैत हा शिण हाये. जरा मजे मजेच्या अंगान त्ये खेळ खेळू र्‍ह्यायलेत. डोक्याला ताप नसल्यागत आनंद लुटायाचा आसल आन सेन्सॉर सारकं व्हत नसल तर हितं टाकू काय? नाय काय आस तस लिवलेलं नाय हो. साधं सरळ हाय.

ही कविता म्या माझ्यावाले फेव्रेट आसलेल्ये शाहिर दादा कोंडके यांना अर्पण केल्येली हाय.
वाचा तर मंग आता.

माझा धरशिल का हातात...हात


माझा धरशिल का हातात
हात माझा ग तुझ्या हातात || घृ ||

येतिस का शेतात
आधी लोळूया मातीत
चढूया मग झाडावर
आपल्या या आंब्याच्या बनात || १ ||

तवा सांग माझा धरशिल का हातात
हात माझा ग तुझ्या हातात ||

पळू पळू गोल पळू
धराधरी चल ग खेळू
मळलेलं अंग मग धुव्वूया
चल जवूया विहीरीच्या पाण्यात || २ ||

मग सांग माझा धरशिल का हातात
हात माझा ग तुझ्या हातात ||

मऊमऊ तुझ्या हातांनी
का दाबतीया माझ्या हातांना
गिरकी घेवून मग अंगात
का वीज नाचवती पायात || ३ ||

तवा सांग माझा धरशिल का हातात
हात माझा ग तुझ्या हातात ||

खुसूखुसू का लावतीया
गाल तुझे हे माझ्या गालांना
फुलांचा गजरा डोक्यात
त्यानं श्वास कोंडला श्वासात || ४ ||

तवा सांग माझा धरशिल का हातात
हात माझा ग तुझ्या हातात ||

(आता हिरवीन म्हनतीया)

कायबी काय बोलतो रं
चोरून काय बघतो रं
आजुबाजू नाय कोनी बांधावर
का म्हनून असा येशी तु अंगावर || ५ ||

जवा म्या धरला र हातात
हात तुझा रं माझ्या हातात ||

- पाषाणभेद (आपला दगडफोड्या वो)

Tuesday, March 16, 2010

मराठीचा मुद्दा व साहित्यिकांची भुमीका

मराठीचा मुद्दा व साहित्यिकांची भुमीका
(लेखाचा हेतू केवळ मराठी अस्मितेचाच आहे. परप्रांतीय, नोकर्‍या, राजकारण असली गल्लत न करता वाचावा)

मराठी अस्मितेच्या मुद्याला आत्ता राज ठाकरेंनी हातात घेतल्याने उभारी आली आहे. त्या आधी शिवसेनेने हे काम केले होते. नंतरच्या काळात शिवसेना आपल्या मुळ मुद्यांपासून भरकटली. त्यानंतर कोणीही मराठीचा मुद्दा हातात घेतलेला नव्हता. राजकारणी लोक केवळ वारा आला तशी पाठ फिरवणारे व सत्तेत येण्याची वाट पाहणारे असतात ही आताशा काळ्या दगडावरची रेख झालीय. त्यात मराठी अस्मितेचा अगदीच नेभळट होता. विदर्भात मराठीच बोलली जाते. असे असतांनादेखील ते वेगळे राज्य व्हावे हा राजकारणाचा मुद्दा राजकारण्यांनी आपल्या सोईसाठी केला. ( वेड्यांनो, वेगळा विदर्भ झाला तर तुम्ही जो भ्रष्टाचार कराल तो पण कमी किंमतीचा राहील, कारण विदर्भ हे महाराष्ट्रापेक्षा छोटे राज्य होईल व त्याला उत्पन्न कमी असेल, केंद्रातून कमी आर्थीक मदत येईल हे तुम्हाला कसे समजत नाही. त्या राज्याचा मुख्यमंत्री तर एकच होईल ना? बाकी आमदार खासदार होणे म्हणजे महाराष्ट्राचे आमदार खासदार होण्यासारखेच आहे.) वेगळा विदर्भ मागणे म्हणजे संयुक्त महाराष्ट्रासाठी जे लढले त्यांच्या स्वप्नाचा अपमानच आहे. (अर्थात मान अपमान ही नैतीक बाब सामान्य जनांसाठी (वेगळ्या अर्थाने OBC)राखीव आहे.) असो.

तर मुद्दा असा की, मराठी अस्मितेच्या मुद्याला धरून वेळोवेळी होणार्‍या वेगवेगळ्या प्रश्नांबाबतीत मराठी साहित्यिक नेहमी मलूल, बोटचेपी भुमीका का घेतात? किंबहूना काहीतरी (आर या पार) एकाच मुद्द्याची भुमीका का घेत नाही? महाराष्ट्रातच मराठी बोलणारे जास्त आढळतात. (हे काही नविन संशोधन नाही.) पर्यायाने मराठी वाचक महाराष्ट्रातच सापडतात. म्हणजेच मराठी साहित्य महाराष्ट्रातच जास्त तयार होते (व खपते). महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यांतली जनता मराठी साहित्य जे काही वाचत असेल त्यांना त्यांची आवड, अभ्यास म्हणून मराठी साहित्य वापरत लागत असेल. असे असतांना मराठीतुन लिहीणारे साहित्यिक राजकारणाचा आखाडा सोडल्यास एखाद्या वेगळ्या व्यासपिठावरून (आपले मिसळपाव.कॉम व इतर माध्यमांतले काही अपवाद सोडून. मिपाचा जन्मच केवळा मराठी अभिव्यक्तीसाठी झाला आहे. वेगळे व्यासपिठ म्हणजे केवळ संकेतस्थळे नव्हेत, तर विचार व्यक्त करण्याचे माध्यम; जसे- वर्तमानपत्रे, संसदिय प्रणाली, दुरदर्शन आदी. ) मराठी साहित्य संमेलने देखील आपली भुमीका व्यवस्थीत मांडत नाही. आपल्या मराठीचा मुद्दा का मांडत नाही? की हे साहित्यिक कोणी बडा लेखक, कवी काय मुद्दा मांडतो आहे त्याची वाट पाहत आहे? की ते मराठी अस्मितेच्या मुद्याला केवळ राजकीयच मुद्दा आहे असे समजतात? की त्यांना मिळणारे केंद्रीय पुरस्कार, आर्थीक अनुदान यांची लालूच मधे येते? की राजकारण्यांचा त्यांवर वरदहस्त आहे? की 'आम्ही आपले वेगळे' आहोत असे त्यांना दाखवायचे आहे?

असे म्हणतात की साहित्यिक हे खरे बुद्धीवादी असतात. समाजाला ते वैचारीक विचारांची चालना देतात. बहुतेक प्राध्यापक, शिक्षक हे साहित्यिक असतात. भले ते फिजीक्स, केमीस्ट्री, बायोलॉजी या इंग्रजी विषयात शिकवत असले तरी त्यांनी एखादा ग्रंथ, कादंबरी , कवीता लिहीली तरी ते लेखकच असतात व पर्यायाने साहित्यिकच असतात. मराठी अस्मितेच्या मुद्याला धरून एकाही शिक्षक प्राध्यापकांनी मराठीसाठी आपली भुमिका उघड केली नाही, जाहिर केली नाही. (असे असेल का की, बहूतेक कॉलेजेस, शाळा या राजकारण्यांच्या हातात असतात व आपण नोकरी करतो त्या संस्थेच्या राजकारण्यांना कसे दुखवायचे असा विचार त्यांच्या मनात येत असेल? )

असे असतांना सर्व मराठी साहित्यिकांनी मराठी अस्मितेच्या मुद्याला उचलूनच धरले पाहिजे.

सांगा पतंग कुणी हा पाहिला?

सांगा पतंग कुणी हा पाहिला?

संक्रांतीचे दिवस जसे जवळ येतात तसे पतंग उडवण्याचेही दिवस येतात. काही ठिकाणी नोव्हेंबर महिन्यातच पतंग उडवायला सुरूवात करतात. पतंग उडवण्याचा आनंद अनेक जण लुटतात. या आनंदाच्या वेळी अनेक वेळा अपघात होतात व अनेक जण आपल्या प्राणाला मुकतात. मी पतंगामुळे होणार्‍या नेहमीच्याच अपघातांबद्दल- जसे वीज वाहक तारेला स्पर्श होणे, उंच इमारतीवरून पडणे आदी.- बोलणार नाही. हे असले अपघात पतंग उडवणार्‍यांना होतात. पतंग उडवणारे जर काळजी घेवून उडवत नसतील तर होणार्‍या परिणामांना तेच जबाबदार असतात. हे ठिक आहे. दुरर्‍या प्रकारच्या अपघातांच्या प्रकारात पतंग उडवून आनंद एक जण घेतो व त्यामुळे होणार्‍या अपघात दुसर्‍यांचेही होतात.

असले अपघात माझ्या बाबतीत दोन वेळा घडले आहेत.

एकदा मी व माझा मित्र मोटरसायकलवरून शहराच्या हमरस्त्याने जात होतो. मोटरसायकल माझा मित्र चालवत होता व मी पाठीमागे बसलो होतो. त्याच वेळी एक पतंगाचा मांजा आडवा आला. म्हणजे पतंग कटली होती व त्याचा मांजा अगदी खाली आलेला होता. पतंग व धागा लुटणारी मुले पतंगाच्या मागे होती. त्याच वेळी तो मांजाचा धागा नेमका माझ्या मित्राच्या गळ्याला लागला. हे सगळे अचानक घडले. एकतर संध्याकाळची वेळ व मांजा बारीक असल्याने दिसण्याचा प्रश्नच नव्हता. माझ्या मित्राला काहीतरी घडल्याची जाणीव झाली त्याने चालत्या गाडीवरूनच गळ्याला हात लावला व गाडी गियरमध्ये असल्याने गाडी बंद पडून व तोल जावून आम्ही दोघेही खाली पडलो. तो पर्यंत माझ्या मित्राचा गळा कापला गेलेला होता. त्यातून रक्त बाहेर येत होते. मांजा लुटणारे पसार झालेले होते. पतंग उडवणारा तर कोठे असेल त्याचा अंदाजपण करणे चुकीचे होते. दवाखान्यात गेल्यानंतर जास्त काही न दुखापत झाल्याचे समजले. मित्राने गाडी लगोलग थांबवल्याने गळा कमी प्रमाणातच कापला गेलेला होता.

त्याच्याच दुसर्‍या वर्षी मी मोटरसायकलवरूनच जात होतो. नेहमीप्रमाणे माझी हेल्मेट डोक्यावर होती. तोच माझ्या अगदी समोरून मला पतंगाचा मांजा दिसला. पतंगांचे दिवस व मागचा अपघात माझ्या लक्षात होता. मी तो मांजा माझ्या उजव्या हाताने आडवायचा प्रयत्न केला. तो मांजा त्यामुळे हातात आला. मागच्या सारखीच गाडी गियरमध्ये बंद पडली. या वेळी मी खाली पडलो नाही, पण पतंग उडवणारा मांजा ओढत असल्याने माझा तळहात कापला गेला व पुर्ण तळहात भरून दोन ठिकाणी कापल्या गेल्याच्या जखमा झाल्या. जखमेत मांजाला लावलेल्या काचा गेल्या होत्या. लगोलग ड्रेसिंग केले. ती चिघळलेली जखम पुर्ण भरायला जवळपास दिड महिना गेला होता. दोन वेळा इंजेक्शनही घ्यावे लागल्याचे आठवते.

त्याच वर्षी असल्याच कटलेल्या पतंगामुळे मोटरसायकलवरचा अपघात सिन्नर (जि. नाशिक) शहरात होवून अगदी लहान मुलीचा बळी त्यात गेलेला होता. एक मामा आपल्या ५/६ वर्षांच्या भाचीला कायनेटीक या स्कुटरवरून जात होता. कायनेटीकच्या पुढील भागात असणार्‍या फुटरेस्टवर ही लहाननगी उभी होती. रस्त्यात कधीतरी त्या चिमुरडीच्या गळ्याला कटलेल्या पतंगीचा मांजा चाटुन गेला व तिचा गळा कापला गेला. ते तिच्या मामाच्याही लक्षात आले नाही. ते थोडे पुढे गेल्यानंतर त्या मुलीने मान टाकलेली होती. गळा कापला जावून तिचा तेथेच अंत झाला होता.पतंग उडवणारे आपला आनंद घेत होते पण त्यात तिला प्राणांची बाजी लावावी लागली.

रस्त्यात पतंग उडवणारे फारच खालच्या उंचीवरून पतंग उडवत असतात. मांजा हा मोटरसायकलच्या उंचीवरून जातो. त्यानेच वरीलसारखे अपघात होतात त्यांचे परिणाम पतंगाच्या संबंघीत नसणार्‍या व्यक्तिही भोगतात.

पतंग उडवणारे पतंग उडवतीलच. चेन्नयी सारख्या शहरातले 'पतंग उडवण्याची बंदीचे' कायदे त्यांना लगाम घालू शकत नाही. आपणच आपली काळजी घेतली पाहीजे.

हा लेख ई सकाळ मध्येही आलेला आहे.

(रेडी टु इट (खास भटक्या कुत्रांसाठी))

रेडी टु इट (खास भटक्या कुत्रांसाठी)

भारतातील भटक्या अणि विमुक्त प्रजातीच्या (not appeared in OBC class) कुत्र्यांसाठी खास "रेडी टु इट" (not IT as in Information Technology or Income Tax or it म्हणजे 'ते' तर इट म्हणजे eat = खाणे. म्हणजेच "तात्काळ खाण्यास योग्य") रेसीपी. (आणि 'रेसीपी' म्हणजे पाककृती बरं का. हो आजकाल भटक्या कुत्र्यांनाही चांगले दिवस मनेकांच्या कृपेने आलेले आहेत.)

बहुसंख्य भटक्या कुत्र्यांच्या नशिबी त्यांच्या भटकंती दरम्यानचे जेवण म्हणजे कुणी टाकून दिलेले अन्न, उरलेला भात, शिळ्या पोळ्या. हे अन्न त्यांच्या प्रवासादरम्यान मिळवणं कष्टाचं आणि गरजेच असलं, तरी कधी कधी शिणवट्या मुळे कंटाळवाण सुद्धा होतं.
म्हणुन सादर आहे "रेडी टु इट"

साहित्य
१. पोळ्या शिळ्या किंवा ताज्या तश्याच घ्याव्यात.
२. आपल्या पसंतीच्या डाळी (आख्खे मुग, मुगडाळ(पिवळी), मसुर डाळ, तुरडाळ) परवडत नसतील तरीही निवडून घ्याव्यात. (हो उगाच मनेकांचा दंडूका(??) नको ना लागायला.)
३. फोडणीसाठी गावरान तुप, व ईतर साहित्य जसे जिरे,मोहरी,हिंग,हळद,धने, (आवडत अस्ल्यास बडिशेप,) कडीपत्ता, तमालपत्र,लवंगा ई.
४. उरलेल्या मटणाचा रस्सा
५. वाडगाभर भाजी
६. चवीपुरते मीठ नसले तरी चालते. मीठ नसले तरी हे अन्न खाणारी कुत्री खाल्या मिठाला जागतात व दुसर्‍या दिवशी पुन्हा पुन्हा येत राहतात.
७. कच्चे , न शिजवलेल्या मटणाचे तुकडे

कृति
१.प्रथम भांड्यात गावरान तुप गरम करावे. +
२.गरम गावरान तुपात जिरे,मोहरी,हिंग,कडीपत्ता ई.सर्व साहीत्य घालावे. येवढ्यात हळद घालुनये.(नाहीतर करपल्याने कडवट चव येइल व कुत्र्यास अन्न बेचव लागेल) +
३.या फ़ोडणित कच्चे , न शिजवलेल्या मटणाचे तुकडे तसेच उरलेल्या मटणाचा रस्सा किंवा भाजी चांगली परतुन घ्या. आणखी काही उरलेले पदार्थ असल्यास ताजे पदार्थ पाहूण्यांना देतांना ज्या प्रमाणे भाजतो त्या प्रमाणे खरपुस/कुरकुरीत परतुन घ्या. थोडाक्यात पाण्याचा अंश राहणार नाही याची काळजी घ्या. +
४.या मिश्रणात शिळ्या व ताज्या पोळ्या + डाळी (पोळ्या व डाळ यांचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे किंवा उपलब्धतेनुसार) चांगल्या तळून घ्या. चवी प्रमाणे मिठ घालते तरी चालेल न घातले तरी चालेल. +परत थोडा वेळ परतुन घ्या.
५.थंड झाल्यावर हे मिश्रण हवाबंद डब्यात भरुन ठेवा. साधारण १०/१५ दिवस सहज टिकते. टिकाउ पणाचा उद्देश वेळ व पैसा वाचवण्यासाठीच इथे फॅन्सी पदार्थ (उदा. मॅगी, गाजर का हलवा, शिरा पुरी, आम्रखंड) वापरलेला नाही.

जॉगींगला जाताना हे मिश्रण सोबत घ्या. मस्त पैकी एका दगडावर बैठक मांडा व भटक्या कुत्र्यांना बोलवा, वाडगे तयार करून त्या मधे हे वरील "रेडी टु इट" मिश्रण टाकून द्या सोबत छानपैकी कुत्र्यांचे बिस्कीट व जॅम बरोबर दे दनादण (फेकायला) सुरु करा. (हे मिश्रण फेकत असतांना आपापल्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या अँगलमध्ये फोटो काढता येतात. भटकंती दरम्यान (आपल्या हो, कुत्र्यांच्या नव्हे!) आपल्या बरोबर एखाद्या व्यक्तीला नेवून आपला फोटो काढण्यास सांगावे. नंतर सामाजीक पुरस्कार मिळवीण्यास सोपे जाते.)


नवशिक्या मनेका छाप सामाजिक कार्यकर्त्यांना अजुन काही अश्या "रेडी टु इट" रेसीपीज माहित असल्यास अवश्य येउद्यात.
फोटोसौजन्य = फोटो जालावरुन सभार.

तुमच्या गावाचे नाव काय?

तुम्ही खेडेगावात राहत असाल, शहरी असाल. तुम्ही राहता त्या गावाचे नाव घ्या, किंवा तुम्हाला माहित असलेल्या कोणत्याही गावाचे (किंवा गावांची नावे) नाव घ्या. त्या गावांची नावे कशी पडली असतील असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय? तुम्ही त्यावर विचार करून ते नाव का ठेवलेय असा कधी विचार केलाय? नक्कीच केला असणार.
मी तर बुवा गावाचे नाव कसे पडले असेल त्याचा विचार करतो.
उदाहरणच द्यायचे झाले तर:
पिंपळगाव. गावात (पुर्वी) पिंपळाची झाडे जास्त.
वडगाव : गावात (पुर्वी) वडाची झाडे जास्त होती. (आता कसली झाडे जास्त?)
हे झाले आपले सरळसोट नावे असलेली गावे. पण काही गावांची नावे इरसाल असतात. ती नावे पुर्वीच्या लोकांनी कशी ठेवली असतील? त्या नावांचा इतिहास आपल्याला माहित नसतो. तसा इतिहास कोणी लिहीलेलादेखील नसतो. कर्णोपकर्णी आपल्याला त्या त्या गावांच्या कथा सांगीतल्या जातात. आपण त्या ऐकतोही. असल्याच इतिहास नसलेल्या गावांच्या नावाबाबतीत आपल्याला काही कल्पना लढवता येतात का? आपल्या गावाच्या नावामागे काही इतिहास लपलेला आहे का?
तुम्ही काही कल्पना लढवून त्या गावाचा इतिहास सांगू शकता का?

जशी सातारा गावाची माझी कल्पना:
सातारा : सात तारा किंवा तारां सहित (एक गाव होते. त्या ठिकाणी एक माणूस सात तारांची विणा वाजवायचा. एके दिवशी त्याच्या विणेत एक तार कमी दिसली. तो विणा वाजवणार कसा? तो तार शोधता शोधता वेडा झाला. म्हणून गावाचे नाव सातारा पडले.)

मी काही गावांची नावे देतो. तसे नाव रुढ होण्यामागची माझी कल्पना अशी:

गावाचे नाव नावाची पार्श्वभूमी
भुत्याणे (ओझर मिग जवळचे गाव): गावात भुते राहत असतील.
दात्याणे(ओझर मिग जवळचे गाव): गावातली लोकं दात विचकवत हसत असतील.


ओझर मिग (मिग विमान तयार करण्याचे): हे गाव ओझर च्या जवळ वसवले गेले.
ओझर: आता याला ओझर (तांबट) म्हणतात. वरील ओझर मिग चे हे मुळ गाव. पण आता ओळख होण्यासाठी तांबटांचे ओझर म्हणून नविन ओळख घ्यावी लागली या गावाला.
नाशिक: गावाच्या नावाचा इतिहास सांगायलाच पाहिजे का? :-)
पुणे: पुण्यनगरी
मुंबई: मुंबादेवी
दिल्ली: ???
पलासनेर / पळासनेर (इंदुरला जातांना लागते): - खरोखर गावाच्या आजुबाजूच्या जंगलात पळसाची झाडे खुप आहेत. बसमधूनही दिसतात. मी विचार करतो की गावाच्या नावात 'पळास' ठिक आहे, पण 'नेर' कुठून आले? अन बाकी नेर नावाचेही एक गाव आहे.
पांगराण: आजुबाजूला पांगरीचे रान आहे.
बारामती: बारा प्रकारच्या 'मती' असणारे गाव किंवा बारा प्रकारच्या मती असणार्‍या व्यक्तींचे गाव
लोणावळा: लोण्यासारखी 'स्मुथ' वळणे असणारे गाव (लोणावळ्याच्या आसपास बरीच 'स्मुथ' वळणे आहेत घाटात.)
कर्जत: कर्जात डुबलेली जनता
आजमगड: आजमाचा गड
कोयना: आब्यांची कोय सापडत नाही असे गाव
सांगली: पुलंनी म्हटल्याप्रमाणे 'चांगली' सांगली
बाणेर (पुणे): बाण मारेल तो गाव
धनकवडी : धन सापडणारी
हडपसर:---> हाडपसर----> हाड पसर
पिंप्री: ---> पिंपरी --> पिंपराचे झाड
चिंचवड: चिंचा व वडाची झाडे
घोरपडीगाव: घोरपड सापडणारे गाव.
खेड: गावाचे नावच खेड म्हणजेच खेडं आहे.
सासवड: वड पुजणारी सासू असलेलं गाव
राजगुरूनगर: हुतात्मा राजगुरू यांचे गाव

(डिजीटल किंवा साधी) फोटोग्राफी - एक कला की विज्ञान ?

(डिजीटल किंवा साधी) फोटोग्राफी - एक कला की विज्ञान ?

डिस्क्लेमर : या काथ्याकूटात फोटोग्राफरांना व कलादालनात फोटो टाकणार्‍यांना दुखावण्याचा अजिबात हेतू नाही. या बाबत मागेच मी एका धाग्यात या बद्दल चर्चा करण्याबाबत विचारले होते.

साधा फिल्मवरचा फोटो घ्या किंवा आताचे डिजीटल कॅमेरॅवरचे काढलेले फोटो घ्या, फायनल रिझल्ट (फोटो) तुमच्या हातात येईपर्यंत तुम्हाला कोणतेतरी तांत्रीक हत्यार वापरावी लागते किंवा त्या हत्यारांद्वारे केलेली क्रिया वापरावी लागते. यात ज्याचा फोटो काढायचा आहे तो ऑब्जे़क्ट, फोटोग्राफर, फोटो कॅमेरा, फोटो डेव्हलप करण्याची रसायने, त्यातील केमीकल क्रिया, प्रिंटींग आदी क्रिया येतात.

फोटोग्राफीच्या जन्मापासूनच फोटोग्राफी ही एक कला आहे की एक तांत्रीक क्रिया आहे या बद्दल वाद आहे. काही लोकांच्या मते कलाकारांचे (चित्रकार) पोट भरण्याचा मार्ग फोटोग्राफीमुळे खुंटला गेल्याने ते फोटोग्राफी ही कला नाही अशी तक्रार करतात असे म्हणणे आहे. इतिहास तपासला असता काही समूदायाने (चित्रकारांनी) या बाबत आपला आक्रोश देखील जाहिरपणे दाखवला होता.

आता असे समजा की तुम्हाला एक फुलपाखरू आवडले. त्याचे तुम्ही ५/६ (फिल्मअसलेल्या व डिजीटल कॅमेरॅने) फोटो काढले. त्यातला एक चांगला फोटो तुम्ही डेव्हलप केला व डिजीटल फोटो सॉफ्टवेअरने प्रक्रियेने उन्नत केला. त्याच फुलपाखराचे तुम्ही मेमरी ड्रॉइंग काढले. या दोन्ही किंवा तिनही क्रियेत कोणती क्रिया त्या माणसाची जास्तीत जास्त कलेकडची नजर दाखवते? प्रत्येक जण जसा विचार करेल त्या त्या प्रमाणे त्याचे उत्तर येईल. यात अनेक वादही होतील.

अगदी उलट विचार केला तर माझ्या पाहण्यात पुर्वीचे चित्रकार होते ते आता कॉम्पुटर वापरून आपली चित्रकारीतेचा व्यवसायात रूपांतर करणारे लोकही आहेत. त्यांच्या बाबतीत कला ही पैसे कमवण्याचे माध्यम झालेले आहे.

काही जणांचे असेही म्हणणे आहे की केवळ काढलेले फोटो जसेच्या तसे (प्रोसेस न करता, कोणताही लाईट, कॉस्चूम, सॉफ्टवेअर टचींग न करता ) बघीतले /वापरले तरच ती एक कला असे आहे.

माझ्या मते फोटोग्राफी एक आनंद देणारे, भूतकाळ सांभाळून ठेवणारे एक वैज्ञानीक माध्यम आहे तर चित्रकला हीच त्याची मुळ जननी आहे व ती कला आहे. फोटोग्राफी जोपर्यंत काही प्रोसेस न करता वापरात येते तोपर्यंत काही प्रमाणातच फोटो काढणार्‍याच्या अँगलने व तो फोटो कलेच्या अँगलने बघणार्‍याच्या अ‍ॅंगलने कला आहे. अन्यथा ती एक केवळ वैज्ञानीक प्रक्रिया आहे.

Monday, March 1, 2010

अलिखीत रोजनिशीतील पाने अर्थात माझा मोटरसायकलवरचा प्रवास

अलिखीत रोजनिशीतील पाने अर्थात माझा मोटरसायकलवरचा प्रवास
पुर्वप्रकाशीत : हा भाग

२००३ साली मी एका मोठया कॉम्पूटरच्या कंपनीत नोकरीला असतांनाची ही गोष्ट आहे. गोष्ट म्हणण्यापेक्षा मी मोटरसायकलवर जो काही २००० ते २५०० किमी प्रवास केला त्याचा हा अनूभव आहे. एखाद्या अलिखीत रोजनिशीतील पाने असे म्हटले तरी चालेल.

पगारपाणी चांगले होते. पण काम मनासारखे नव्हते. काम काही जास्त नसायचे. वेगवेगळ्या सरकारी ऑफीसात भेटून निघणारे टेंडरांवर लक्ष ठेवणे व रिलेशन्स सांभाळणे हे काम होते. कामानिमीत्त फिरणे फार व्हायचे. बरे फक्त पुणे नाही तर मुंबई, नाशिक, नगर, औरंगावाद असलाही चक्कर व्हायचा. त्यातच कधीकधी कॉम्पूटरच्या पार्टस् ची डिलीव्हरी शेड्यूल पाहणे वैगेरे नियमबाह्य कामे पण बघावी लागायची.

२००३ च्या १० व्या महिन्यात (ऑक्टोबर २००३) साली कंपनीला एका मोठ्या राज्यपातळीवरील सरकारी कार्यालयातून कॉम्पूटर्स सप्लाय करण्याची ऑर्डर 'भेटणार' होती. 'भेटणार' म्हणजे अजून टेंडर निघालेले पण नव्हते पण सगळी 'सेटींग' झालेली होती. ते कॉम्पूटर्स विवीध सरकारी कार्यालये, आयटीआय, आमदार निधीसाठी, निरनिराळ्या शाळा, काही एनजीओ व मुख्य म्हणजे ठिकठिकाणच्या आदिवासी शाळांना सप्लाय करायचे होते. कंपनीने व सरकारी अधिकार्‍यांनी त्या त्या ठिकाणांची यादी आधीच तयार केलेली होती.

या कामाला मला जुंपण्यात आले. सुरवातीला मला पुणे विभाग देण्यात आला होता पण नंतर नाशिक महसूल विभाग देण्यात आला. तेथील विभागातल्या ठिकठिकाणच्या आश्रमशाळांमध्ये जावून 'आमच्या आश्रमशाळेमध्ये कॉम्पूटर फिट करण्यासाठी योग्य जागा व विज आहे. आम्हाला कॉम्पूटर ची आवश्यकता आहे' असल्या अर्थाचा एक अर्ज त्या त्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडून सहीशिक्यानिशी आणायचा होता. अर्ज तयारच होता. मला जावून फक्त सहिशिक्का आणायचा होता.

मी कंपनीतून पैसे अ‍ॅडव्हान्स उचलले. माझी भेट देणार्‍या आश्रम शाळांची नाशिक विभागातील यादी पण घेतली. नाशिक जिल्हा हा नाशिकमधला अधिकारी सांभाळणार असल्याने त्या शाळा सोडून माझ्या वाट्याला एकूण २०/२१ आश्रमशाळा आल्या. माझ्या वाटेच्या शाळांमध्ये नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा व जळ्गाव जिल्हयातल्या शाळा होत्या.

थोडे आश्रमशाळांबद्दल: आश्रमशाळा ह्या महाराष्ट्र शासनाने चालवलेल्या निवासी शाळा असतात. त्या बहूतेक करून आदिवासी भागातच आहेत. मुले मुली या शाळांत राहतात व शिकतात. काही शाळा फक्त मुलांसाठी किंवा फक्त मुलींसाठी असतात तर बहूतेक शाळा एकत्र आहेत. अगदी गरीब परिस्थीती असणारी लहान लहान मुले या शाळात शिकायला असतात. त्यांच्याकडे बघीतले तर अगदी कणव येते. फक्त दिवाळी व मे च्या सुट्यांत त्यांना घरी जाता येते. सर्व शिक्षकांना त्या त्या शाळांमध्येच असणार्‍या क्वार्टर्स मध्ये रहावे लागते. मुलांना लागणारे जेवण शाळेतच तयार केले जाते. शाळांमध्ये मुख्याध्यापक, शिक्षक, शिपाई, कामाठी आदी असतात. मुलांना सकाळी १२ वाजता तर संध्याकाळी ६ वाजता जेवण दिले जाते. (फक्त खिचडी! दोन जेवणात किती कमी अंतर आहे. नंतर सकाळच्या जेवणात किती जास्त अंतर आहे तुम्हीच बघा. कुपोषण होणार नाही तर काय होईल हो त्या गरीब मुलांचे?)
(आश्रमशाळांमध्ये अनेक गैरप्रकार घडतात. ते आपण पेपरात वाचतोच. व्यवस्थापन कसे ढिसाळ असते, मुलांचे काय हाल होतात, शिक्षणाचा दर्जा काय, हा या लेखाचा विषय नाही तरीही लेखनाच्या ओघात तसे उल्लेख येवू शकतात.)

घरी आल्यानंतर आता पुढची वाटचाल कशी करावी या विचारात गुंतलो. एकतर अनोळखी प्रदेशात जायचे होते, आणि मी आश्रमशाळांबाबतच्या दुष्किर्तीबद्दल ऐकून होतो. मला केवळ एका अर्जावर मुख्याध्यापकांचा सहीशिक्का आणायचा होता. माझे काम जरी पाच-दहा मिनीटांचे असले तरी ते त्या त्या आश्रशाळांमध्ये जावून करायचे होते. बरे कंपनीत कोणीही या माझ्या जाण्याच्या ठिकाणांना भेट देवून आलेले नव्हते. सगळे अधिकारी, ईंजीनीयर्स हे ऑफीसात बसणारे होते. माझ्या हातात केवळ आश्रमशाळांची यादी व पैसे होते. यादीत केवळ आश्रमशाळा (यापुढे शाळा) असलेली गावे व त्यांच्या तालूक्यांचा उल्लेख होता. त्या ठिकाणी कसे जावे याबाबत काहीच मार्गदर्शन नव्हते. एकूणच माझी परिस्थीती गंभीर होती.

सगळ्यात पहिल्यांदा मी बाजारात जावून महाराष्ट्राच्या नकाशाचे पुस्तक आणले. बाजारात अनेक नकाशे उपलब्ध होते. मला साधारण जिल्हा लेव्हलचा नकाशा हवा होता. त्या नकाशापुस्तकांत औरंगाबादच्या समर्थ उद्योग प्रकाशनाचा 'रोड अ‍ॅटलास महाराष्ट्र' हे पुस्तक मला चांगले वाटले.त्यात नवीन तालूके व नवीन रोड यांसहीत गावांची नावे प्रकाशीत केलेली होती.
मी सगळ्या आश्रमशाळाची यादी परत एकदा बघीतली. त्या त्या ठिकाणच्या आश्रमशाळांची (यापुढे शाळा) गावे त्या नकाशात आहेत काय हे बघीतले. नशीबाने बर्‍याचशा गावांची नावे नकाशात होती. त्या गावांच्या नावावर मी पेनाने सर्कल केले.

एकूणच परिस्थीतीचा विचार करून यादीतील वीसएक शाळांचे साधारण मी दोन गट केले. ऑफीसात मी एकाचवेळी या सगळ्या शाळांत न जाता दोन वेळात जाणार असे सांगीतले. त्यानंतर मी प्रवासाची तयारी केली. जरूरीपुरते कपडे, पैसे, शाळांची यादी, नकाशा पुस्तक, मोबाईल इ. वस्तू घेतल्या. त्याकाळी माझ्याकडे बीएसएनएल चे पोस्टपेड कनेक्शन होते. मोबाईल ग्रामीण भागात एवढा फोफावला नव्हता, तरी पण केवळ बीएसएनएल आहे म्हणून रेंज मिळेल असे मनात गृहीत धरून चालत होतो.

प्रवासाला निघण्याच्या अदल्या दिवशी मी जसे काही वनवासाला निघालो अशी माझी परिस्थीती होती. अनोळखी भाग, अपुरी माहिती, किती दिवस लागतील याची माहिती नाही. वनवासाला जाणार्‍या रामाप्रमाणे मी घरच्यांचा निरोप घेतला.

नकाशाचा अभ्यास करून मी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर तालूक्यातील 'सुकापूर' या गावापासून प्रवासला सुरूवात करण्याचे निश्चीत केले. त्यानंतरच्या दिवशी म्हणजे शनिवार ११/१०/०३ ला सकाळी १० ला मी नाशिक-नंदुरबार ही बस पकडली. नकाशात सुकापूर हे गाव पिंपळनेरच्या अलीकडे दिसत होते. बसमध्ये बसल्यानंतर मी एकदोन जणांना सुकापूरला कसे जाणार याविषयी विचारले असता पिंपळनेर पर्यंत न जाता पिंपळनेरच्या अलिकडे सुकापूरला जाण्यार्‍या रस्त्यावर उतरण्याचा सल्ला मिळाला. कंडक्टरने तिकीट पिंपळनेरचे काढण्यास सांगीतले. बस देवळा, सटाणा, तहाराबाद करत पिंपळनेरच्या २ /१ किमी अलीकडे असलेल्या एका फाट्याजवळ थांबली. मला तेथेच उतरावे लागले.

खाली उतरल्यानंतर रस्त्याच्या एका बाजूला पेट्रोल पंप होता व दुसर्‍या बाजूला एक हॉटेल होते. दुपारचा १ वाजला असल्याने मला भुक लागली होती. आता पुढील ४/५ दिवस मिळेल ते खावे लागणार ह्या हिशोबाने तयारी ठेवलेली असल्याने त्या हॉटेलात मी काहीतरकाहीतरीखाल्ले. आता आठवत नाही पण बहूतेक मिसळच असणार. (शक्यतो मी पाव टाळतो.) गल्यावर असणार्‍या माणसाला मी सुकापूर ला कसे जाणार या विषयी विचारले. त्याने मला फाट्यावर उभे रहा व एखादी जीप मिळते का ते पहाण्याविषयी सांगीतले. आश्रमशाळांत जातांना प्रत्येक ठिकाणी बस मिळेलच अशी खात्री नसल्याने मिळेल त्या वाहनाने प्रवास करण्याचे मी ठरवले होते. मी हातात बॅग घेवून फाट्यावर उभा राहीलो.

एकदोन गाड्यांना हात दिला. त्यानंतर एक खच्चून भरलेली प्रवासी जीप आली. एकहीजण खाली उतरला नाही. ड्रायव्हर अर्धा बाहेर राहून जीप चालवत होता. काही लोकं मागच्या फाळक्यावर बसलेले होते. तिनचार जण मागच्या पाय ठेवायच्या जागी उभे होते. त्या परिस्थीतीत आता मी जीपमध्ये कसा चढणार हा प्रश्न मला पडला होता. गाडीत तर माझी बॅगही ठेवायला जागा नव्हती. जीपमधल्या लोकांनी मी तेथील स्थानिक नाही हे ओळखले. एकदोन जणांनी मागे उभे राहायला सांगीतले. मला ते सगळे नवीनच होते. त्या प्रवासातील धोका ओळखून नकार देण्याची माझी तयारी होती पण पुढची सगळी कामे बघून मी बॅग जीपवरील कॅरीयरवर ठेवली व मागच्या पाय ठेवण्याच्या पायरीवर उभा राहीलो. गाडी तर ड्रायव्हर हाणत होता. रस्ता हा ग्रामीण भागातला असल्याने सिंगल असून उखडलेला होता. मला जीपचे कॅरीयर घट्ट पकडून ठेवणे भाग होते. वीसेक मिनीटात सुकापूर आले.

जीप'वरून' उतरल्यावर पाहीले तर सुकापूर अगदी छोटे खडेगाव दिसले. जवळच एका पाझर तलावाचे पाणीही दिसले. एका जणाला आश्रमशाळा कोठे आहे ते विचारले. त्याने जवळच असल्याचा हात दाखवून उल्लेख केला. मी चालत चालत शाळेत पोहोचलो. शनिवार असल्याने मुले आवारात खेळत होती. मी मुख्याध्यापकांची रुम कोणती ते विचारल्यावर त्यांनी ती सांगीतली. मी तेथे गेल्यावर माझी ओळख मी तेथील शिक्षकांना करून दिली. माझे येण्याचे प्रयोजन सांगीतले. त्यांनी मला बसायला सांगून मुख्याध्यापकांना येण्याविषयी निरोप एका मुलाकडे दिला. मी पुण्याहून आलो असे सांगताच कोणीतरी आपल्या डिपार्टमेंटचा माणुस आहे असे समजून ते बोलत होते.

मला वेळ नाही व मला फक्त सही हवी असे त्यांना सांगीतले. तुमच्या शाळेला काही दिवसांनी नवीन कॉम्पुटर मिळतील असे त्यांना सागीतले. त्यानंतर त्यांनी मला एका रुममध्ये नेले. रुमची चावी एका शिक्षकांकडून मागून घेतली. एक धूळ भरलेली रुम उघडल्यावर आत बरेचशे खोके दिसले. ते सगळे कॉम्पुटरचे खोके होते. त्या सगळ्या खोक्यांत ७ कॉम्पुटर होते. मॉनीटर व सिपीयू, प्रिंटर, युपीएस चे जवळपास वीस एक खोके अगदी सिलपॅक होते. एकही खोका फोडलेला नव्हता. त्यांनी मला सांगीतले की हे सगळे कॉम्पुटर मागच्याच वर्षी आलेली आहेत व अजूनपर्यंत इंन्टॉलही झालेले नसतांना अजून तुम्ही कॉम्पुटर्स का देता आहात! मी त्यांना सांगीतले की तो माझा प्रश्न नाही. हे आधीच ठरलेले असते. आपण नोकर माणूस. मला फक्त या या अर्जावर सहीशिक्का द्या, मला लगेचच निघावे लागेल. तेवढ्यात मुख्याध्यापक आले. त्यांना माझे प्रयोजन सांगीतले. त्यांनी काही खळखळ न करता सही शिक्का दिला. मी लगोलग त्यांचा निरोप घेतला.

परत जीपने गावात जेथे सोडले तेथे आलो. चौकशी केल्यानंतर आता अर्ध्या तासाने वरून एक बस येईल किंवा एखादे जीपडे भेटेल तर त्याने जा असे सांगीतले. गाव तर अगदी खेडे होते. मी तेथे एका टपरीवजा जागेत बसलो. जवळपास ५ वाजत आले होते. शेजारच्या एका टपरीतून टाईमपाससाठी चॉकलेटं घेतली, बसलो चघळत. तेवढ्यात तेथे एक मुस्लीम माणूस आला. त्याने एक बकरी पण आणली होती. सराईतपणे तो मी बसलेल्या टपरीत बकरी बांधून तो तयारी करू लागला. मला लगेच कल्पना आली की ती टपरी त्याची असून तो आता बकरीला कापणार. मी शाकाहारी असल्याने मला थोडी किळस आली पण हे जीवन आहे ते जगलेच पाहीजे असा विचार करून मी तेथून उठलो. आता त्या बकरीला कापतांना आपल्याला बघू न लागावे म्हणून थोडा लांब जावून उभा राहीलो. तो पर्यंत तेथे त्याचे गिर्‍हाईके येवू लागली. माझ्या नशिबाने लगेचच एक बस आल्याने पुढचा प्रसंग मला पाहता आला नाही. मी लगेचच बस मध्ये बसलो व बस पिंपळनेरच्या दिशेने निघाली.

सुकापूरहून निघून पिंपळनेर (ता. साक्री, जि. धुळे) पर्यंत पोहोचेपर्यंत सायंकाळचे ६ वाजायला आले. पिंपळनेर हे एक मोठे व्यापारी गाव आहे. माझ्या बायकोचे हे मामाचे गाव. त्या गावात मी एक दोन वेळा यापुर्वी राहीलोही होतो. आजूबाजूला पुर्णपणे आदिवासी भाग, डोंगर असलेला हे गाव. गावातील लोकं एकूणच प्रेमळ. जेवणानंतर 'गोटीसोडा' पिण्याचा फार आग्रह करतात. अर्थात हे उल्लेख मी मागे राहीलो त्यासंदर्भात आलेले आहेत.
पण आता मला तेथे राहता येणार नव्हते. अंधार पडायला सुरूवात झालेली होती. घरापासून लांब आलेलो असल्याने घरची जास्तच ओढ लागलेली होती. त्यातच अनोळखी भागात जाण्याची अनामिक भिती, पुढील प्रवासाच्या तजविजीची काळजी लागलेली होती. पिंपळनेरपासून निघून नवापूर या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. नवापूर हे माझ्या सासूरवाडीचे गाव. या गावाचा उल्लेख यापुर्वी मी येथे 'दोन राज्यांचे रेल्वे स्टेशन' असा लेख लिहून केलेलाच आहे, तो आपल्या लक्षात असेलच. मी माझ्या प्रवासाचे नियोजन नकाशात पाहून केलेले होते. त्यातल्या बर्‍याचशा आश्रमशाळा ह्या नंदुरबारच्या आसपास होत्या. त्यामुळे मला नवापुरला मुक्कामाला सोईचे जाणार होते.

मला पिंपळनेरहून नवापुरला (चरणमाळ घाटामार्गे) जाणारी बस मिळाली. पिंपळनेरहून नवापुर (म्हणजेच पुढे सुरत कडे) ला जाण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे चरणमाळ घाटामार्गे व दुसरा म्हणजे कोंडाईबारी ह्या घाटामार्गे. (कोंडाईबारी मार्गे जाणारा मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग एन.एच. ६ आहे.) दोन्ही मार्गादरम्यान सदर घाट/ बारी लागतात. निसर्गाने या भागात त्याच्या संप्पत्तीची भरभरून उधळण केलेली आहे. आपण शहरी लोक ज्या 'अनटच्ड- व्हर्जीन' असा निसर्ग शोधतो, तो येथे आहे. कोकणात असा निसर्ग आहे पण तेथेही व्यापाराचा शिरकाव झालेला आहे. ज्यांना खरोखरच
निसर्गापुढे लिन व्ह्यायचे आहे ते पर्यटक वृत्तीचे लोक या भागात भेट देवून आपली भुक भागवू शकतात. (या दोन्ही रस्त्यांवरून मी बर्‍याचदा प्रवास केलेला असल्याने हे मी अधिकाराने सांगतो आहे.)
भरपुर सागाने हरित असलेली वने, पाण्याने भरलेले ओढे, नाले व नद्या. मध्येच दिसणारे डोंगर. उत्तम शेती. त्याचबरोबर प्रेमळ आदिवासी समाज, त्यांच्या वैशिठ्यपूर्ण शैलीने चित्रांकीत केलेल्या झोपड्या असले या भागात असणारे दृष्य आपल्या नजरेला तर सुखावतेच पण प्रवासाचा त्रास पण घालवते. फक्त त्या कडे त्या नजरेने पहाण्याची वृत्ती हवी. अर्थात हे मी दिवसा केलेल्या प्रवासाबद्दल बोलतो आहे.

माझा सध्याचा प्रवास हा संध्याकाळी घडत होता. साधारणत: ८ वाजेच्या दरम्यान मी नवापुरला पोहचलो. जेवण केल्यानंतर मी माझ्या येण्याचे प्रयोजन माझ्या सासरेबुवांना सांगीतले. माझे सासरे हे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये रेंजर होते. पुर्वी त्यांनी नोकरीच्या काळात घोड्यावरून हा सगळा भाग पालथा घातलेला होता. त्यामुळे या भागात कसे फिरायचे याबद्दल ते अधीक चांगले सांगू शकत होते. माझ्याकडील आश्रमशाळांच्या गावांची यादी बघीतल्यानंतर त्यांनी मला होणार्‍या प्रवासाची कल्पना दिली. बसने प्रवास केल्यास प्रत्येक ठिकाणी बस जात नसल्याने मला जवळपासच्या गावाच्या फाट्यावर उतरून शाळेत जावे लागणार होते. बर्‍याचशा शाळा नव्याने तयार झाल्याने त्यांनाही माहीत नव्हत्या. बरे त्या शाळा काही एकाच मार्गावरील गावातल्या नव्हत्या. थोडक्यात बसने प्रवास केल्यास एका दिवसात एकच शाळेत जाणे शक्य होते. मला तर जास्त दिवस यात वाया घालवण्याची इच्छा नव्हती. मी त्यांना मोटरसायकलवरून हा प्रवास करण्याबद्दल त्यांना सांगितले. काळजीपोटी त्यांनी त्यास नकार दिला. एकतर या भागात मी अनोळखी, रस्ते माहित नाही, त्यातच मोटरसायकल प्रवास. सासूबाई तर जाण्यास नकार देत पुण्याला कंपनीत फोन करून हे काम न करण्याबद्दल आग्रही होत्या. पण मी स्विकारलेले काम पुर्ण करणे मला भाग होते. हा काही माझा पहिलाच मोटरसायकलवरून लांबचा प्रवास नव्हता. आधीच्या कंपनीत असतांना मी हायवेने मैलोगणती एकट्याने प्रवास केलेला होता. अगदी पावसात मोटरसायकलवरचा कित्येक किमी चा प्रवासाचा अनूभव माझ्या पाठीशी होता. त्यामूळे ठाम निर्णय घेवून त्यांना मी मोटरसाकल घेवूनच पुढिल प्रवास करण्याबद्दल सांगितल्यावर त्यांचा नाईलाज झाला. त्यानंतर त्यांनी मला प्रवासास होकार दिला.

दुसर्‍या दिवशी सकाळी आन्हीके आवरून मेहूण्यांची मोटरसायकल (TVS Suzuki AX 100 R) माझ्या ताब्यात घेतली. गाडीचे मेंटेनन्स नुकतेच केलेले होते. मी हवा चेक करून पेट्रोल भरून घेतले. मला हेल्मेट असल्याशिवाय मोटरसायकल चालवणे आवडत नसल्याने त्यांच्याकडचे हेल्मेट घेतले. त्याची काच तुटलेली असल्याने पुढे मला माझा गॉगल कामाला आला. (मला हेल्मेट ची ईतकी सवय लागलेली आहे की मला कोणी मला 'हेल्मेट घालून झोप' असे सांगीतले तरी मी झोपू शकेन. कंपनीत बर्‍याचशा लोकांना मी हेल्मेट घालण्याची सवय लावून दिली आहे. असो.) गाडीच्या डिक्कीत ताईंनी केलेला जेवणाचा डबा, नकाशाचे पुस्तक आदी ठेवले. गाडीचे मेंटेनन्स किट टुल बॉक्स मध्ये ठेवले व गाडीला किक मारली. माझी पुढील शाळा 'नवापाडा' या गावाची होती.

नवापाडा हे ता. साक्री, जि. धुळे यात येते. नवापुर जवळ देखील एक नवापाडा होते. एकाच तालूक्यात किंवा जिल्ह्यात एकसारखी नावे असल्याचे आढळते. नवापुरहून मी निघाल्यानंतर एन. एच. ६ (सुरत-नागपूर) चिंचपाडा, विसरवाडी कोंडाईबारी मार्गे दहिवेल या गावापर्यंत आलो. दहिवेल हे गाव थोडक्यात आपण 'जंक्शन' समजू, कारण या ठिकाणी एन. एच. ६ ला नाशिकहून येणारा राज्यमहामार्ग मिळतो. पुणे तसेच दक्षिण भारतातील मालवाहतूक करणार्‍या ट्रक्स याच रस्त्याने जातात. साउथ इंडीयातील ट्रक्स साधारण चॉकलेटी रंगाने रंगविलेल्या असतात. यातील बहूतेक ड्रायव्हर आपले जेवण स्वत:च रस्त्याच्या कडेला ट्रक उभे करून बनवतात. चिंचपाड्यात रेल्वे क्रॉसींवर रेल्वे जाणार असल्याने थांबावे लागले. एक मालगाडी गेली. तरीही रेल्वे गेट काही उघडले नाही. नंतर मात्र मी मोटरसायकल गेटखाली तिरपी करून काढून घेतली.

चिंचपाड्यात ख्रिस्ती मिशनरींचा मोठे हॉस्पिटल आहे. बर्‍याचशा आदिवासी लोकांनी ख्रिस्ती धर्म स्विकारलेला असल्याने छोटे छोटे कुडाच्या झोपड्यांतदेखील चर्चेस आहेत. ख्रिस्ती आदिवासी स्त्रिया इतर (हिंदू) आदिवासी स्त्रियांसारखाच पेहेराव करतात मात्र कपाळावर टिकली किंवा कुंकू लावत नाहीत. मला तर ते फार विचीत्र वाटले. आदिवासी समाजातली नावेही आपल्याला नविन असणारी अशीच असतात. उदा. गामण्या, सुका, हिर्‍या आदी. हिंदु आदिवासींची 'देवमोगरा माता' ही देवी आहे.

तर मी दहिवेल पर्यंत आलो. नकाशात नवापाड्याच्या जवळील तेच गाव दिसत होते. हायवेलाच कोणालातरी मी नवापाड्याचा रस्ता विचारला. त्याने डाव्या हाताचा मार्ग दाखवला. तो मार्ग एका टेकडीवरून जात होता व तोच जवळचा मार्ग असल्याचे त्याने सांगितले. मी त्या रस्त्याला लागलो. ड्रायव्हर लाईन मध्ये रस्ता किती खराब आहे ते सांकेतीक भाषेत बोलले जाते. म्हणजे अमूक अमूक रस्ता हा '१० चा १२' आहे, हा रस्ता '१० चा १५' आहे, तमूक रस्ता '१० चा १८' किंवा २० आहे वैगेरे वैगेरे. '१० चा १२' म्हणजे १० किमी जायचे व १२ किमी चा वेळ व इंधन नासवायचे. मी आता ज्या रस्त्याने गाडी चालवत होतो तो रस्ता या सांकेतीक भाषेत '१० चा २०' होता. एकतर पावसाळा नुकताच संपलेला. हा रस्ता म्हणजे एक टेकडीच्या बाजूने जो दरीसारखा खोलगट भाग असतो त्यातून दोन टेकड्यांच्या एक चंद्रकोरीसारखा भाग दिसत होता त्यातून जात होता. छोटा घाटच म्हणजेच बारी म्हणाना. रस्त्याच्या आजूबाजूला मोठी खडी येवून पडलेली होती. म्हणजेच 'अजून' रस्त्याचे काम झालेले नव्हते. डोंगरउतार असल्याने मधूनच छोटे छोटे ओहोळ रस्ता पार करत होते व त्यांना रस्त्याने जाणार्‍यांची अडचण होत होती! असला रस्ता अंदाजे १० किमी चा असावा. ताशी १० च्या 'वेगाने' मी दोन टेकड्यांच्या बारीत पोहोचलो. तेथे दोन रस्ते एकत्र आल्याने परत एका झाडाखाली काहीतरी धार्मीक कार्यक्रम करणार्‍या समूदायाला मी नवापाड्याचा मार्ग विचारला. परत मी योग्य रस्त्याने जावू लागलो. त्यानंतर एका छोट्या गावातून परत फाटे फुटल्याने योग्य मार्ग विचारावा लागला. नंतर थोडी चढण लागली व मला एक दोन पवनचक्या दिसल्या. (या ठिकाणीच आता शेकड्याने विंन्ड फार्म तयार झालेले आहे ज्यात प्रिती झिंटा, सलमान, सचिन तेंडूलकर यांच्या पवनचक्यांच्या 'विजनिर्मीती कंपन्या' आहेत. आताशा मोठ्या लोकांनी बळजबरी शेतजमीनी बळकावल्याने कायम वाद होत असतात. एकदोन खुनही झाले आहेत. ) तिथेच नवापाडा आश्रमशाळा होती.

दोन डोंगरांच्या उतारावर ह्या आश्रमशाळांच्या तीनचार एकमजली बिल्डींग दिसू लागल्या. मी तडक गाडी गेटजवळ थांबवली व मुख्याध्यापकांची रूम विचारली. तो दिवस रविवार (१२/१०/२००३) असल्याने मला माहिती सांगणार्‍याने जवळच मुख्याध्यापक राहत असणार्‍या घराकडे नेले. (आश्रमशाळेतील अध्यापकांना तेथेच राहणे बंधनकारक आहे.) मुख्याध्यापक काही घरी नव्हते. पण त्यांच्या पत्नीने त्यांच्या छोट्या मुलीस बोलवायला धाडले तोपर्यंत मी तेथेच थांबलो. मुख्याध्यापक लगेचच आले. त्यांनी घरात चहा टाकायला सांगीतले. आपण कोण, कोठून आलात, काय काम वैगेरे चौकशी केली. ते जवळच असलेल्या नवापाडा ह्या गावचेच होते. (आश्रमशाळा साधारणत: गावाजवळ असते.) त्यांचे गाव मी आलेल्या रस्त्याच्या दिशेच्या त्याच त्या छोट्या बारीजवळील एका पठारावर दिसले. त्यांच्या घरातून त्यांनी ते दाखवले. त्यांची तेथे शेतीवाडी होती. आज रविवार असल्याने ते तेथेच जाणार होते. मी थोडा उशीरा गेलो असतो तर त्यांची भेट झाली नसती, (व माझे कामही रखडले असते.) असे त्यांनी सांगीतले. चहा घेवून आम्ही पायी त्यांच्या ऑफिसाकडे- शाळेकडे निघालो. रस्त्यात त्यांनी त्यांच्याकडील असणार्‍या संगणकांच्या तक्रारी केल्या. काही चालत नाही, काही मॉनीटर बंद पडले, युपीएस लवकर बंद होतो, प्रिंटरमधली शाई संपली आदी. मी काही ते काम करण्यासाठी आलो नव्हतो पण नकार देवून आपले काम का लांबवा ? असा विचार करून मी 'काम माझे झाल्यावर बघतो' असे त्यांना सांगीतले. लगोलग आम्ही त्यांची सहीशिक्के घेतले. तेथेचे ३ /४ शिक्षक नव्याने भरती झालेले आले. त्यांनी मला त्यांची प्रयोगशाळा दाखवली. मला तर घाई होती व ते पाहणे परवडणारे नव्हते. तरीही त्यांना टाळता आले नाही. नंतर आमची वरात त्यांच्या संगणकाच्या लॅब असणार्‍या इमारतीकडे वळली. आता शाळेचे आवार बरेच मोठे होते. त्यामूळे मी येथे मोटरसायकल आणली असती तर बरे झाले असते असे वाटू लागले. लॅबकडे जातांना मागे मोठे डोंगरउतार होते. जवळच्याच नाल्यात शाळेचे विद्यार्थी आपले कपडे धुण्यासाठी आलेले होते. ते वातावरण बघून मला ते सगळे एखाद्या पुराणकालीन आश्रमाचे विद्यार्थीच वाटू लागले. पण ते आधूनिक विद्यार्थी होते व त्यांचे अध्यापकही आताच्या काळातले होते. लॅबमधील बंद असणारे संगणक मी वरवर बघितल्यासारखे केले. मी त्यांना थोडीच दुरूस्त करू शकत होतो? मी त्यांचे सिरीयल नंबर्स घेतले व मी माझ्या वरीष्ठांना सांगतो असे त्यांना सांगीतले. तो सगळा सप्लाय आमच्याकडून झालेलाच नसल्याने आम्ही त्याला खरे तर बांधील नव्हतो पण त्यांचे माझ्या वागण्याने समाधान झाले व मी त्यांना पुढील आश्रमशाळेचा पत्ता विचारला. मला 'लोय' किंवा 'कोठली' (दोन्ही जि. नंदुरबारमध्ये) या कोणत्याही जवळ असणार्‍या गावी पुढील आश्रमशाळेत जायचे होते. त्यांनी मला 'लोय' या गावाहून नंतर कोठली या गावी जाण्याचा सल्ला दिला. नकाशात तर लोय हे गाव काही दिसत नव्हते व ते कोठे आहे हे त्यांनाही सांगता येईना पण कोठली या गावाजवळ असण्याबद्दल ते ठाम होते. मी त्यांना धन्यवाद देवून त्यांचा निरोप घेतला.

परत मी आलेल्या रस्त्याने गाडी हाकू लागलो. ब्राम्हणवेल या गावामार्गे मी छडवेल (कोर्डे) या गावी आलो. गावातल्या रस्त्यांच्या बाबतीत तर बोलायचे कामच नव्हते. पण या गावांना जोडणारे रस्ते चांगले १० चा १२ किंवा १३ च्या टाईपचे होते. मी जेवण केले नाही पण दुपारचे २ वाजून गेले होते. वातावरण एकदम मस्त होते. मोटरसायकल जर आपण वेगात चालवत नसू तर मोटरसायकल चालवण्याचा आनंद घेता येवू शकतो आणि या रस्त्यांवर मी ठरवूनही वाहन जोरात चालवू शकत नव्हतो. हा आनंद बर्‍याचदा मी अनूभवला आहे. छडवेल च्या पलीकडे एक बर्‍यापैकी जंगल असलेला पाचएक किमीचा एक घाट लागला. तो रस्ता आता मला नंदूरबार या जिल्ह्याच्या ठिकाणाकडे नेत होता. घाटात रस्त्याचे काम चालू होते. त्यानंतर लागलेल्या एका गावात मी योग्य मार्गाला आहे का याची खात्री एका शेतकर्‍याकडून करून घेतली. तो शेतकरी धान्याचे कणसं वार्‍यावर उफणत होता. धान्याची मोठी रास पडलेली होती. तेथून एक रस्ता कोठली कडे जात होता तर एक नंदुरबारकडे. पण कोठलीकडे जाणार्‍या रस्त्यावरच्या फरशीवरून बर्‍याच उंचीवरून पाणी वेगाने वाहत होते. न जाणो मोटरसायकलच्या सायलेन्सर मध्ये पाणी जावून ती बंद पडायची व माझा दिवस फुकट जायचा असा विचार माझ्या मनात आला. माझी काही तेथून जाण्याची धडगत झाली नाही. त्याने सांगीतले की 'मग तुम्ही नंदुरबारच्या अलिकडून आधी लोय करा नंतर कोठली करा'. मी पुढच्या रस्त्याला लागलो. आता रस्ता फारच चांगला व मोठा होता. त्यानंतर मी लोय या गावी जाणार्‍या रस्त्याला लागलो. साधारणत: कोठेही दोन रस्ते एकत्र आले तर जवळपास माणूस बघून मी त्याला पुढील मार्ग विचारत असे. उगीच आपले डेअरींग करायचे व पुढे चुकीच्या ठिकाणी जायचे मला परवडणारे नव्हते. थोडक्यात मला आता ग्रामीण भागातून प्रवास कसा करायचा याचा अंदाज येत चालला होता. पुढील गावाची दिशा विचारायची व त्या दिशेला वाहन टाकायचे. रस्ता असेलच ही अपेक्षा केली नाही तर बहूतेक गावे एकमेकांना जोडलेली असतात. पायवाट, बैलगाडीवाट, पडीक शेत, पांधी (कोरडा नाला) असल्या रस्त्यांतून वाहन चालवायची डेअरींग केली की पुढचा मार्ग सुकर होतो हेही मी शिकलो. फक्त मोटरसायकलीत काही बिघाड नको किमानपक्षी पंक्चर तरी नको ही अपेक्षा ठेवली पाहीजे.

गाव संपले किंवा सुरू झाले की एखाद दोन किमी रस्ता चांगला असे नंतर मात्र तो खडीचा असे. लोय गावात (गाव खरे तर आश्रमशाळेपासून लांबच असते.) आलो तर आश्रमशाळा एका दाट झाडीत होती. सैनिंकांच्या बर्‍याक कशा असतात तशा या आश्रमशाळा बांधलेल्या असतात. सरकारी डिपार्टमेंट बहूदा एकच डिझाईन पास करत असल्याने सगळ्या आश्रमशाळा मला एकाच मुशीतून काढलेल्या आढलल्या. अगदी बाहेरचा दिलेला रंगही एकसारखा. दाट झाडीमुळे मला शाळा निट दिसली नाही त्यामुळे एकदोन ठिकाणी विचारावे लागले. तोपर्यंत ४.३० वाजले. तेथे असलेल्या मुलांना मी मुख्याध्यापकांबद्दल विचारले. मला बघण्यासाठी शिक्षकांच्या घरांतील काही व्यक्ती आल्या. ते बहूतेक शिक्षकच असावेत. त्यांनी सांगीतले की दिवाळीच्या सुटीत घरी गेलेली मुले अजून शाळेत आली नाही. आज रविवार असल्याने मुख्याध्यापक येथे नाहीत. मी माझे काम फक्त सहीकरण्यापूरते असल्याचे सांगीतल्यानंतर त्यांनी शिक्यांसाठी मुख्याध्यापकांची शाळेतील रूम उघडण्यासाठी चाव्या शोधायला सुरूवात केली. मुख्याध्यापकांच्या पत्नीने चाव्या त्यांच्याकडेच असल्याचे सांगीतले. आता माझी पंचाईत झाली. तात्काळ निर्णय घेवून मी तेथे नंतर येण्याचे ठरवून व चाव्या त्यांच्याकडेच घरी ठेवण्याची विनंती करून मी गाडीला किक मारली.

पुढचे कोठली हे गाव परत आलेल्या रस्त्याने मागे येवून मुख्य रस्त्याच्या आतमध्ये होते. आता अंधार पडायला सुरूवात होणार होती. मला घाई केली पाहीजे. मी मो.सा. दामटली. अगदी १५/१० मिनीटात मी गावात पोहोचलो. कोठली हे गाव आधी लागले. गावातली वस्ती ही काही वेगळ्याच लोकांची दिसली. आपल्याकडे कसे घुंघट ओढणार्‍या बाया असतात तसल्या बाया दिसल्या. कोणत्यातरी वेगळ्या समाजाची त्या गावात वस्ती होती. गावाबाहेर आश्रमशाळा होती. मोठे मैदान होते. तेथे गेल्यानंतर ऑफीससमोरच गाडी लावली. ही शाळा जरा वेगळी असल्याचे दिसले. बहूतेक शिक्षक उपस्थीत होते. शाळेचा प्युन, सुपरवायझर, क्लार्क झाडून हजर होते. मला पटापट सह्या दिल्या. नंतर मला संगणकाचे कामकाज बघणार्‍या बाईंनी मला संगणक असणार्‍या रुम मध्ये नेले. तेथे संगणक शिकवीतही असावेत कारण बहूतेक संगणक चालू होते. भिंती वर कसलेकसले तक्ते लावलेले होते. त्या बाईंची तक्रार होती की तेथे विज वारंवार जाते. लवकर येतही नाही. (भारनियमन तेव्हापण होते महाराजा.) तुमचा युपीएस लवकर संपतो. मी परत सगळे सिरीयल नंबर घेतले व वर कळवेन असे सांगीतले. बाहेर आलो तर सहा वाजलेले होते. बाहेर मुले रांगेत उभी होती. त्यांच्या हातात जेवणाची ताटे होती. बाईंनी सांगीतले की मुलांची आता जेवणाची वेळ झाली आहे. त्यांना खिचडी घेण्यासाठी एकत्र बोलावले आहे. माझे काम झालेले होते. मी तेथून निघालो व त्यांनी त्यांचे खिचडी वाटपाचे काम सुरू केले.

मी पुढे कसे जायचे हे विचारलेलेच होते. आता सहा वाजून गेलेले होते. अंधार पडायला सुरूवात झालेली होती. जवळपास मुक्कामाची सोय नव्हती. मी नवापुरला जायचे ठरवले होते. कोठलीला आलेल्या रस्त्याच्या विरूद्ध म्हणजे उत्तरेकडच्या रस्त्याने मला जायचे होते. नंतर मी धानोरा गावाहून येणार्‍या व पुढे खांडबारा या गावाच्या रस्त्याला लागायचे होते. शाळा सोडली व मी रस्त्याला लागलो. रस्ता अतिशय खराब होता. मी लवकर गाडी हाकू शकत नव्हतो. तोच एक छोटा ओहोळ व त्यावरची फरशी लागली. फरशी म्हणजे छोटा पुल किंवा स्लॅब की ज्याची उंची कमी असते. (ज्यांनी ही फरशी पाहीली नाही त्यांचा 'फरशी' नावाने गोंधळ उडू शकतो.) ती नावालाच फरशी होती. नाला पुर्णपणे तेथून वाहत होता. मी अलिकडील काठावर थांबलो असता एक अपंग माणूस व एक धडधाकट माणूस तेथे उभे होते. त्यांनी मला लिप्ट मागीतली. (म्हणजे हायवेला अंगठा दाखवतात तशी नाही तर विचारून). मी केवळ अपंगालाच बसवू इच्छीत होतो पण ते काहीतरी वेगळे समजले व ते दोघेही मागे बसले. तशातच मी ती फरशी पार केली. नंतर पुढच्या २ किमी पर्यंतच्या मुख्यरस्त्याला मी त्यांना सोडले. आता चांगलाच अंधार पडलेला होता. आजूबाजूला तर दाट जंगल लागलेले दिसत होते. झाडांची मोठी मोठी पाने ते सागाची वने असल्याचे सांगत होती. मी मोटरसायकलचा हेडलाईट चालू केला. रस्त्याने कोणीच नाही. तो काही हायवे नव्हता ट्राफीक असायला व आपल्या मुंबई पुण्याकडच्यासारखा रस्ता वाहता असायला. मुख्यरस्त्याला लागताच एक उतार व चढावाचा घाट लागला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गच्च झाली. काळोख साचायला लागलेला. मोबाईलमध्ये बघितले तर रेंज नव्हती. अर्थात त्या काळी मोबाईलच्या रेंजची या भागात अपेक्षाच करणे चुकीचे होते. अनोळखी भाग. अनोळखी घाटरस्ता. मला थोडी भिती वाटू लागली. असल्या जंगलात मी एकटाच असतांना काय होईल किंवा कोणते जनावर आडवे आले तर काय असले विचार मनात येवू लागले. कोठली येथल्या आश्रमशाळेतच मुक्काम केला असता तर बरे झाले असते असे वाटू लागले. तेथे जेवणाची व झोपायचीदेखील सोय झाली असती. आताशा दुपारचे जेवणदेखील नसल्याने मला भुकेची जाणीव झाली होती. पण आता माघारी जाणे शक्य नव्हते. मी तशीच गाडी पुढे दामटली. घाट जवळपास संपला तेवढ्यातच गाडीच्या हेडलाईटने दगा दिला. रस्त्याने काहीच दिसू नये इतका अंधार अंगावर येत होता. जवळपास काही वस्तीच सोडा पण झोपडी सुद्धा नव्हती. पुर्ण जंगलच होते ते. बरे कोणती मोठी गाडी किंवा टॅक्टर असले वाहन तेथून जात नव्हते की त्याच्या प्रकाशात मी गाडी चालवू शकेन. (अगदी विसरवाडी पर्यंत एकाही वाहनाने मला ओव्हरटेक केले नव्हते. विसरवाडीपासून पुढे नवापुरपर्यंत एन.एच ६ आहे. तो तर कायम वाहता असतो.) थोडक्यात मी थांबू शकत नव्हतो. मी अगदी सावधगीरीने गाडी चालवू लागलो. शहराच्या रस्त्यांचे बरे असते. रेडीयम चे पट्टे किंवा ट्राफिक साईन्स तरी असतात की ज्यांना धरून वाहन चालवता येते. हा तर ग्रामिण भागातला रस्ता होती. आकाशात चंद्रही नव्हता की तो प्रकाश देईल. आता जे गाव, वस्ती किंवा झोपडी लागेल तेथेच मी थांबायचे ठरवले. पण ती वस्ती तर लागली पाहिजे ना तरच मी थांबू शकलो असतो. जवळपास मी पाच एक किमी गाडी चालवली. त्यानंतर एक बैलगाड्यांचा तांडा लागला. त्यांना जवळच्या गावाबद्दल विचारले असता खांडबारा हे गाव जवळच असल्याचे त्यांनी सांगीतले. मी तशीच गाडी चालवू लागलो. पुन्हा पाच एक किमी गेल्यानंतर एका गावाचे लाईट्स दिसू लागले. माझ्या मनाला थोडा धिर आला.

पुढे गेल्यानंतर वस्ती सुरू झाली. आता मी पहिल्यांदा कोणते गॅरेज आहे का ते विचारायचे ठरवले नंतर मुक्कामाची सोय असेल तर घरी फोन करून त्यांना माझी स्थिती सांगायचे ठरवले. एकाने गावातले गॅरेज बंद झाली असल्याचे सांगीतले. तरीही एक मुस्लीम विक्रेता तुम्हाला हेडलाईट देईल असा दिलासा दिला. मी विचारत विचारत त्याच्या घरी गेलो. मी काही विचारायच्या आतच तो बोलला, "पेट्रोल खतम हुवा है. अबी नई मिलेगा. रातकोबी लोग परेशान करते है. पुलीस का डर रहेता है. " अमुक ढमूक. मला फक्त हेडलाईट लागतो आहे हे समजल्यावर त्याने मला हेडलाईट दिला. मी त्याला म्हटले की आता बसवूनच दे ना. त्याने नकार विकतो.'मी फक्त स्पेर पार्ट विकतो' असे त्याने सांगीतले. मी प्रयत्न करायचे ठरवले. टुलबॉक्स मधून स्क्रूड्रायव्हर काढला व हेडलाईटचे नट खोलायला जोर लावला. दोन्ही नट जाम झालेले होते. मी तुटफूट होवू नये म्हणून जोर लावत नव्हतो. हेडलाईटची कॅबीनेट प्लास्टीकच असल्याने जोराने तुटण्याची भिती होती. त्याने सांगीतले की गावात एक न्हाव्याचे दुकान आहे, तो गॅरेजचे काम करतो. मी तडक तिकडे निघालो. उगीच वेळ झाला तर काय घ्या? नशिबाने तो हजर होता. त्याने झटपट कारागीरी केली व हेडलाईट बदलवून दिला. तेथूनच मी कोठे आहे, कसा आहे, याबद्दल काळजी नसावी म्हणून घरी तसेच नवापुरला फोन केला. मी परत निघालो. खांडबारा येथे रेल्वे स्टेशन आहे. गाव सोडतांना मला रेल्वे रूळांवरचा क्रॉसींग पुल लागला. तो ओलांडत असतांना परत हेडलाईटने दगा दिला. परत मी माघारी येवून हेडलाईट खरेदी केला व तेथेच बदलला. आता स्क्रू ढिले असल्याने मला काही जड गेले नाही. माझा प्रवास सुरू झाला. तेथून पुढचे मुख्य हायवेवरचे गाव विसरवाडी हे होते. तीसएक किमी नंतर मी विसरवाडी येथे पोहचलो. रस्ताही चांगला होता. बाकी विसरवाडीहून नवापुरपर्यंत हायवेच असल्याने मला जास्त काही त्रास झाला नाही. रात्रीच्या वेळी मोटरसायकलस्वाराला ट्रक ड्रायव्हर कुत्र्याप्रमाणे वागवतात. आपण आपली लायकी पाहून वाहन चालवले तर बरे, नाहीतर कुत्रांसारखे कधी उडवले जावू याची खात्री नसते. मोठ्या वाहनांचे हेडलाईटस तर ईतके भगभगीत असतात की त्याने डोळे दिपतात. मी सावधगीरीने वाहन चालवत साडेनऊच्या दरम्यान नवापुरला पोहोचलो.

घरी आल्यानंतर सासरेबुवांनी सांगीतले की,' तुम्ही आलात त्या रस्त्याला रात्री रापी लावून वाहने पंक्चर करतात व कायम लुटमार केली जाते. तुम्ही कोठेतरी मुक्कामच केला पाहीजे होता'. आता मी सुखरूप परत आलो होतो त्यामूळे मी जास्त विचार न करता जेवण केले व पुढच्या प्रवासाबद्दल विचार करत झोपी गेलो.

दुसर्‍या दिवशी चतुर्थी होती. सकाळी सकाळी घरातून निघालो. आता माझे प्रयाण ढोंगसागळी या गावाकडे होते. माझा मार्ग विसरवाडीपर्यंत कालच्या रात्रीच्याच रस्त्याचा होता. मस्त सुर्यप्रकाश, थंड हवा, आजुबाजूची हिरवीगार शेते, चांगला हायवे असलेला रस्ता आणि हातात मोटरसायकल. मी मोटरसायकल चालविण्याचा आनंद पुर्णपणे घेत होतो. मला फोर स्ट्रोक मोटरसायकल पेक्षा टू स्टोक मोटरसायकलच जास्त आवडते. टू स्टोक मोटरसायकलमध्ये इंजीनाचे दोन स्टोक्स अगदी कानात ऐकू येतात. त्यामुळे आपली दोन स्ट्रोक गाडी ही केवळ वाहन न राहता एक जिवंत माणूसच आहे असे फिलींग येते. हेच फोर स्टोक मोटरसायकलमध्ये आपल्याला ऐकू येत नाही.

सासर्‍यांनी कालच सांगितले होते की ढोंगसागळी हे रस्त्यावरचे गाव आहे. विसरवाडीच्या अलीकडून एक रस्ता नंदुरबार कडे जातो त्या रस्त्याला मी लागलो. दहा एक किमी गेल्यानंतर गाव जसे जवळ आले तसे काही मुले आश्रमशाळेचा गणवेश घालून शाळेत जातांना दिसली. उजव्या हाताला आश्रमशाळांच्या इमारती दिसू लागल्या. हमरस्त्यावरून गावात जाण्यासाठी एक फाटा होता. गावाच्या जवळूनच आश्रमशाळेचा रस्त्याला एक नदी वाहत होती. शाळेच्या बाजूलाच एक छोटा बंधारा होता. शाळेचे आवार मोठे होते. इमारतीही व्यवस्था राखलेल्या, रंगवलेल्या होत्या. बाजूलाच एका इमारतीचे बांघकाम चालू होते. आधीचे संगणकांसाठी स्वतंत्र बैठी इमारत होती. एकूणच येथील वातावरण प्रसन्न होते. तेथील अध्यापकांना माझे काम सांगीतल्यानंतर जास्त काही विचारपूस न होता काम झाले व मी तेथून निघालो.

मला कालच ऑफीसातून नंदुरबारला कलेक्टर ऑफीसात जाण्याचे सांगण्यात आले होते. तेथे लँड रेकॉर्ड विभागातील संगणकाची यादी पुढील संदर्भासाठी लागत होती. तेथे आमचाच सप्लाय झालेला होता. नंदुरबार याच रस्त्याला साधारण ४०-४५ किमी होते. माझ्या नियोजीत मार्गातच ते येत असल्याने तेथे जाण्यासाठी नंतर लागणारा एक दिवस वाचल्याचे समाधान झाले. रस्ता थोडा खडखडीत होता पण आताशा मला अशा रस्त्यांची सवय झालेली होती. रस्त्याने तर एकही वाहन माझ्या पुढे गेलेले आठवत नाही. एकदोन ठिकाणी वन विभागाचे मोठे डेपो दिसले. तेथे सागवान व इतर लाकूड रचून ठेवलेले होते. काही गावे लागली. पन्नास एक किमी पुढे गेल्यानंतर नंदुरबारच्या जवळ तीन रस्ते एकत्र आलेले होते. बर्‍याचशा सरकारी इमारती होत्या. नंदुरबार हा जिल्हा १९९८ ला तयार करण्यात आला. त्यामुळे सरकारी इमारती 'सरकारी' छापाच्या नव्हत्या. त्यातीलच एका इमारतीत माझे काम होते. मी माझे काम सराईतपणे केले. तेथून लगोलग निरोप घेतला.

आताशा दुपारचा १ वाजलेले होते. सकाळचा चहा सोडला तर पोटात काहीच नव्हते. तशातच आज माझा चतुर्थीचा उपवास होता. नाही म्हणायला बरोबरच्या डब्यात खिचडी होती पण मी कोठेही वेळ वाया घालवायच्या विचारात नव्हतो त्यामुळे डबा नंतरच खावू हा विचार केला. आता मला लोभानी ता. तळोदा या गावी जायचे होते. तेथे जाण्यासाठी मला नंदुरबार गावातून जावे लागले. नंदुरबार शहर बाल हुतात्मा शिरिषकुमार याचे आहे. ब्रिटीशांनी तो आणि त्याचा सवंगड्यावर गोळ्या झाडल्या होत्या. मला काही त्याच्या स्मृती स्थळाच्या रस्त्याने जाता आले नाही. रेल्वे गेट ओलांडून मी माझ्या शहादा रस्त्याला लागलो. रस्त्याने मला पुष्पदंतेश्वर सहकारी साखरकारखाना लागला. अजून तो चालू झालेला नव्हता. एका मेंढपाळाला मी लोभानी गावाबद्दल विचारले. त्याला काही सांगता येईना. बरे हे गाव नकाशातही दिसत नव्हते. मला फक्त लोभानी गावाचा तालूका तळोदा आहे हे सांगण्यात आलेले होते. म्हणजेच मला ते गाव शोधण्यासाठी जास्तीत जास्त तळोदा या तालूक्याच्या ठिकाणी जावे लागेल असा मी विचार केला. पण मी दोन चार जणांना विचारून जवळचा एखादा मार्ग आहे का हे विचारण्याचे ठरवले. एका मोटरसायकल स्वाराला थांबवून मी त्याला त्याबद्दल विचारले. त्याने मला तळोद्याला जाण्याची काहीच आवश्यकता नसल्याचे सांगितले. आता आपण जेथे आहोत त्याच्या पुढे चार एक किमी गेले तर उजव्या हाताला जाणार्‍या रत्याने तुम्ही निझर या गावाहून पुढे सरळ तळोद्याच्या पुढे निघाल व त्याच्याच पुढे लोभानी हे गाव आहे असे त्याने सांगितले. त्याला त्याची माहीती भक्कम व ठाम असल्याची मला खात्री झाली व मी थोडा निश्चिंत झालो. मी त्याप्रमाणे पुढे निघालो. निझर हे गाव गुजरात मध्ये आहे. मी महाराष्ट्र ओलांडून निझर रस्त्याला लागलो. आजुबाजूला बाभळीची भरपूर झाडे होती. बरेच किमी पुढे गेल्यानंतर मला गाव काही लागले नाही. एक दोन जणांना आश्रमशाळेबद्दल विचारावे लागले. त्यांनी शाळा ही अगदी रस्त्यावरच असल्याचे सांगितले. शेवटी मला शाळेच्या पाच सहा इमारती दिसल्या. गाडी झाडाखाली मोटरसायकल उभी केली. तडक मी शाळेच्या ऑफिसात गेलो. शाळेच्या मैदानातूनच एक ओढा जात होता. त्याला पाणी नव्हते पण पावसाळ्यात एकूणच वातावरण मस्त करत असावा असा देखावा होता. मी शहरातल्या आपल्या शाळांचे आजूबाजूचे वातावरण आठवले. आपल्याकडील शाळांना तर खेळाचे मैदानही नसते. शाळा म्हणजे नुसते कोंडवाडे असतात आपले. येथे तर निसर्गात एकरुप होवूनच शाळा उभी असते. हां, त्यातील शाळेच्या गुणवत्तेबाबत चर्चा होवू शकते. एकूणच गावाकडच्या शाळा मुलांना प्रॅक्टिकल बनवतात. त्या शाळांमधूनही शिकण्याची ईच्छा असणारे शिकतातच.

माझे काम ठरवल्याप्रमाणे लवकर झाले. तेथील शिक्षकांनाच मी पुढच्या म्हणजे शिर्वे या गावाच्या शाळेबद्दल विचारले. ते गाव येथून फार काही लांब नव्हते. असेल ६/७ किमी. हा जो रस्ता होता तो अंकलेश्वर (गुजरात) कडे जात होता. याच रत्याला पुढे शिर्वे गावाचा फाटा होता. तेथून ३ किमी आत आश्रमशाळा होती. पुढे निघाल्यानंतर मला काही विचारण्याची गरज पडली नाही. बाहेर रस्त्याला पाटी होतीच. पण आत जाण्यासाठी रस्ता नव्हता, एक बैलगाडी जाण्याईतपत बैलगाडीच्या चाकांनीच तयार झालेला रस्ता होता. मला थोडी कसतत करावी लागली पण मी शाळेजवळ पोहोचलो. शाळा तर अगदी भकास वाटत होती. तेथे कोणीही विद्यार्थी दिसत नव्हते. मी शाळेच्या आवारात काही शिक्षक भेटतात का ते पाहीले. एक जण मला शाळेच्या मुख्याध्यापकांच्या घरी घेवून गेले. मुख्याध्यापक नुकतेच त्यांच्या घरून म्हणजे धुळ्याहून आलेले होते. आमचा परिचय झाला. त्यांनी मला चहा घेण्याचा आग्रह केला. तीन साडेतीन होत आलेले होते. त्यांनी शेजारून दुध आणून चहा केला. ते एकटेच येथे राहत होते. कुटूंबीय धुळ्याला होते. नंतर आम्ही ऑफीसात गेलो. कागदपत्रांवर सही शिक्के घेतले. नंतर मी तेथून त्यांना लोय या माझ्या कालच्या राहीलेल्या आश्रमशाळेत कसे जायचे ते विचारले. त्यांना काही माहीत नव्हते. नकाशात शिर्वे या गावातून गुजरात ओलांडून परत लोयकडे जावे लागेल असे दिसत होते. मी त्यांचा निरोप घेतला.

आता मी थोडा पुढे अंकलेश्वर रस्त्याला लागलो. वाटेत एक गुजराती आदिवासी जोडपे दिसले. त्यांना मी महाराष्ट्राकडे जाणार्‍यारस्त्याबद्दल विचारले. मी हिंदीत विचारले असता त्यांना हिंदी येत नव्हते. तरीही त्यांनी मला हावभावावरून पुढे असलेल्या कुकूरमुंडा या गावी जाण्यास सांगीतले. मुख्य रस्त्यापासून २ किमी पुढे जावून मी डाव्या हाताला वळालो. थोड्या अंतरावर कुकूरमुंडा हे गाव लागले. कुकूरमुंडा हे गाव महाराष्ट्रातल्या हद्दीतले पहिले गाव आहे. ते गाव लागेपर्यंत गुजरातमधील रस्ता १० चा १२ होता व महाराष्ट्रात जसा प्रवेश केला तसा हा रस्ता १० चा १६/१७ झाला. सगळीकडे धुळीचाच रस्ता होता. गाव सोडल्यानंतर तापी नदीवरील एक मोठा पुल लागला. नदीचे पात्रही भरपूर मोठे होते. नंतर मी चाररस्ता या ठिकाणी आलो. तेथे चार रस्ते एकत्र येत होते. तेथे एका पानटपरीवर मी लोय कडे जाण्याचा रस्ता विचारला. त्याने त्याच्या टपरीच्या मागे हात दाखवून मागेच लोय गाव आहे असे सांगितले. बहूतेक लोकं दिशा दाखवतांना भलतीकडेच हात दाखवतात. म्हणजे आपण जेथे उभे आहोत तेथून आपले गंतव्य ठिकाण जर डावीकडे असेल तर ते अगदी विरूद्ध दिशेला हात दाखवून सांगतात की, 'ते काय सरळ जा इकडे'. मला त्याच्या सांगण्याची शंका वाटली म्हणून कन्फर्म करण्यासाठी त्याच्या पानटपरीच्या मागे बघीतले तर मला फक्त एक शेत दिसले. त्यातून उस नुकताच काढलेला होता. उस काढतांना बैलगाडीने केलेला रस्ता होता. बाकी डांबरी सडक तर सोडाच पण साधी खडीही तेथे नव्हती. मी त्याला त्याबाबत विचारले तर तो आपल्या मतावर ठाम होता. मी पण जास्त काही विचारले नाही. कदाचित पुढून चांगला रस्ताही असायला हरकत नव्हती. नकाशातही लोय गाव या ठिकाणाच्या जवळच दिसत होते. तसे कालच मी लोय गावी विरूद्ध दिशेने आलेलोच होते. त्या शेतातून एकदोन मोटरसायकलवाले पण गेलेले दिसले. मी तेथूनच जाण्याचे ठरवले. शेतातील रस्तातून / बांधावरून मी 'डर्ट ट्रॅक रेस' प्रमाणे २ किमी गाडी चालवली. थोडे पुढे गेल्यानंतर एक गाव लागले. ते लोय हेच गाव होते. मागे वळून बघीतले असता माझे बरेच अंतर वाचल्याचे नजरेस आले. गावाच्या दुसर्‍या टोकाला आश्रमशाळा होती. शाळेत गेल्यानंतर कालचे न भेटलेले मुख्याध्यापक भेटले. त्यांनी पटापट मला सह्या दिल्या. आता जवळपास साडेसहा वाजले होते. मी त्यांना माझा पुढील नवापुरपर्यंत प्रवास कसा करावा याबाबत विचारले. त्यांनी लोयपासून सरळ पुढे जावून धानोरा - वेलदा टाकी - उच्छल मार्गे नवापूरला जाता येईल असे सांगितले. रस्त्याने ट्राफीकही असते असेही सांगीतले. साधारण ते ६० ते ७० किमी अंतर असेल असे ते म्हटले. मला तो मार्ग नविनच होता. एकतर आता रात्र झालेली होती. कालसारखी फजीती नको होती. मी नकाशात बघीतले असता मला नंदूरबार मार्गे नवापूर किंवा कालचा रस्ता - खांडबारा मार्गे जंगलातून किंवा आता सांगीतलेला धानोरा - वेलदा टाकी - उच्छल मार्गे नवापूर ला जाण्याचा रस्ता आदी तिन मार्ग उपलब्ध होते. अगदीच शेवटी न जाण्याचे ठरवले तर मुक्काम करण्यासाठी नंदुरबार होतेच. मला मोटरसायकलवरील प्रवासाची आवड आहे. रात्र जरी असेल तर थोडी रिस्क घेवून मी नविन मार्गाने म्हणजेच धानोरा - वेलदा टाकी - उच्छल मार्गे नवापूर ला जाण्याचा निर्णय घेतला तो केवळ मुख्याध्यापकांनी चांगला मार्ग आहे व ट्राफीक असेल असे सांगितल्यामुळेच. कालच्या प्रवासात मला कोणीच रस्त्याने दिसले नव्हते. मी या नविन रस्त्याने जाण्याने कोणीतरी सोबत मला (मुख्याध्यापकांच्या सांगण्यानुसार) भेटणार होती किंवा मला रस्त्याने वाहने तरी दिसणार होती.

आता सुर्य बुडाला होता. जवळपास साडे सात वाजायला आले होते. संधीप्रकाश जाऊन अंधार पडला होता. मी तडक धनोरा रस्त्याला लागलो. कालच मी बाजूच्या कोठली या गावाला गेलो होतो. तो रस्ता व गाव काही किमीच आत असेल. ३ किमी पुढे गेल्यानंतर मला खांडबारा कडे जाण्यार्‍या रस्त्याची चौफुली लागली. तेथूनच शिवाजी की संभाजी बिडी चा ट्रक खांडबार्‍याकडे पास झाला. तेवढीच काय ती वर्दळ. तसेच पुढे आलो. आता मी कालचा अनुभव घेवून खांडबारा रस्त्याने जायचे नव्हते तर लोयच्या मुख्याध्यापकांनी सांगितलेल्या 'वर्दळीच्या' रस्त्याने उच्छलमार्गे जायचे ठरवले होते. पुढे तीन एक किमी आल्यानंतर रस्त्यात एक जीप थांबलेली दिसली व त्यातले प्रवासी खाली उतरलेले दिसले. मी काही बरे वाईट झाले का ते पहायला थांबलो. जीपमध्ये काहीतरी बिघाड झालेला होता. ती प्रवासी जीप होती. त्यातील एका माणसाने मला वेलदा टाकी पर्यंत मला लिप्ट विचारली. मला तर सोबत हवीच होती. तो माणूस माझ्या मागे बसला. त्याच्या हातात काहीतरी सामान व प्लॅश्टीकच्या बादल्या होत्या. तो माणूस स्थानिक होता. पुढेच त्याचे गाव होते. मी त्याला पुढील मार्गाबाबत विचारले. त्याने सांगितले की, 'पुढे नवापुरला जाण्यासाठी साधारणता: सत्तर ऐंशी किमी जावे लागेल. मी काही या रस्त्याने कधी गेलो नाही रस्ता चांगला आहे. आता उसतोड करण्यासाठी या भागातून मजूर व त्यांचे तांडे पुढे गुजरात मध्ये याच मार्गाने जातात. तुम्हाला बरीच ट्रॅफीकही लागेल. मी तुम्हाला एकाद्या ट्रक च्या मागे लावून देतो म्हणजे तुम्हाला सोबतही होईल. काही घाबरायचे कारण नाही. रस्त्याने चोरी, लुटमार काही होत नाही. तरीही थोडे सांभाळून जा. थोडे जंगल आहे.'

तो माणूस चांगला बोलत होता. उच्च्चार पण चांगले होते. त्या बद्दल विचारले असता तो म्हणाला की 'मी बरेच वर्ष नाशिकमध्ये नोटप्रेस मध्ये कामाला होतो. आता मी व्हिआरएस घेतली व गावाकडे शेती बघतो.' बोलत असतांना त्याला थांबण्याचे 'वेलदाटाकी' हे ठिकाण आले. आता मी गुजरात राज्याच्या हद्दीत आलो होतो. रस्त्याच्या बाजूलाच एक मोठी पाण्याची टाकी होती. त्यावरूनच त्या भागाला वेलदाटाकी म्हणत असावे. आजूबाजूला परिसरात तापी नदीच्या पात्राचे पाणी व उकई धरणाचे बॅकवॉटर आलेले आहे. रात्रीच्या अंधारात मला दिसले नाही. तो माणूस उतरला. बाजूलाच एक टपरी होती. त्यात काही आदिवासी लोकं बसलेली होती. त्या माणसाने मला चहा पिण्याची विनंती केली. मी पण थोडावेळ आजूबाजूची परिस्थिती पाहण्यासाठी उतरलो. चहा घेताघेता तो इतर आदिवासींशी त्यांच्या भाषेत बोलला. त्याने सांगितले की आत मजुर घेवून ट्रक जातील. काहीवेळाने एक ट्रक मजुरांना घेवून आला. त्या माणसाने त्यातील ड्रायव्हरशी मसलत केली व मला त्या ट्रकच्या मागेपुढे राहायला सांगितले. मी त्याचा निरोप घेतला. ट्रक मधील मजुर आता चहा बिडीसाठी खाली उतरले.

मी पुढे रस्त्याने वर्दळ आहेच असे समजून पुढे निघालो. नाहितरी आता मला एकट्यानेच प्रवास करायचा होता. रस्ता हा काही फार उत्तम होता असे नाही. म्हणजे १० चा १५ च्या लायकीचा होता. रस्त्याने छोटे छोटे खड्डे खुपच होते. त्यामुळे सरळ गाडी चालवणे शक्य नव्हते. पण बाजूला अंधार असल्याने पुरेशा उजेडाअभावी मोटरसायकलच्या हेडलाईट मध्ये त्या खड्ड्यांना टाळणेही अशक्य होते. गाडी खड्य्यांतूनच चालवणे भाग होते. रस्त्याने काहीच ट्रॅफीक साइन्स नव्हते. ना रेडीयम चे पट्टे ना कसली खुण. मोटरसायकलचाच काय तो उजेड. तो मागचा ट्रक तर अजूनही मला क्रॉस झालेला नव्हता. (संपुर्ण प्रवासात मला एकही वाहन पुढे क्रॉस करून गेलेले नव्हते.) मी तशीच गाडी दामटत होतो. कुठले गाव दिसत नव्हते की काही जिवंतपणाची खुण दिसत नव्हती. एक दोन बस स्टॉप दिसले. बाकी कसलाही उजेड नाही. आपल्याकडील रात्रीच्या प्रवासात खेडेगावातील शेतातील घरांमधील /विहीरींवरील लाईट तरी दिसतो. येथे तसल्या काहीच खाणाखूणा दिसत नव्हत्या. मी एका मोठ्या डोंगराच्या सपाट माथ्यावरून चालण्याचा मला भास होत होता. अन डोंगरमाथ्यावर थोडीच शेती वस्ती असते? आजूबाजूला नजर टाकली तर फक्त मोठ्या मोठ्या वृक्षांच्या काळ्या कभीन्न आकृत्याच दिसत होत्या. मध्येच रस्त्याला उतार लागत होता. त्या कडे बघीतले की मनात धडकी बसायची. मी देवाला एकच प्रार्थना करत होतो की गाडीला काही होवू देवू नको. पंक्चर तर नकोच नको. मला ते परवडणारे नव्हते. तसे काही झाले असते तर मी कोठे आसरा घेतला असता? अजूनपर्यंत एकही वाहन येथून गेले नव्हते. फारफार तर आठएक वाजले असतील. तरीही एकही माणूस मला दिसला नव्हता. या रस्त्याने येण्यापेक्षा नंदुरबारला मुक्काम केला असता तर परवडले असते असा विचार मनात येत होता. मी तर आता निम्मा रस्ता पार केला होता. माघारी जाणे वेडेपणाचे होते. मी तसाच पुढे जाण्याचा विचार पक्का केला. काही किमी पुढे गेल्यानंतर मला एक गाव लागले. त्या गावाच्या आसपास भरपुर पाणी होते. ते उकाई धरणाचेच पाणी होते. बांधावरून गेल्यानंतर एक दोन तरूण मुले रस्त्याने येत होती. मी त्यांना उच्छल / नवापुर बद्दल विचारले असता त्यांनी दिशानिर्देश करून मला पुढे जाण्यास सांगितले. आता रस्ता चांगला होता. माझ्या मनात धिर आला. पुढे उच्छल गाव लागले असावे कारण मी फक्त मोटर सायकल चालवत होतो. आजुबाजूला काय आहे त्याचे मला भान नव्हते. तशातच मी नवापुरच्या रेल्वे स्टेशनच्या मागच्या भागात पोहोचलो. माझ्या मनावरचा ताण फटक्यात नाहिसा झालेला होता. एका छोट्या रस्त्याने मी नवापुरात पोहोचलो. तेथील भाग मला अपरीचीत होता. प्रवासामुळे माझी थोडी दिशाभूल झालेली होती. तेथेच काही दुकानाबाहेर युवक बसलेले होते. त्यांना मी दत्तमंदिर कोठे असल्याबद्दल विचारले. त्यांनी मला रस्ता सांगितला. मी योग्यरीतीने मुक्कामाच्या ठिकाणी पोहचलो होतो.

घड्याळात बघीतले तर रात्रीचे साडेनऊ झालेले होते. जेवण तयारच होते. मी सकाळपासून काहीच खाल्लेले नव्हते. चतुर्थीच्या उपासाची खिचडी तशीच गाडीच्या डिक्कीत होती. रस्त्यात जो काही चहा झाला तोच माझ्या पोटात होता. एकुणच मला कडकडीत उपास घडलेला होता. जेवताजेवता सासरेबुवांनी मला आजचा येण्याचा मार्ग विचारला. मी उच्छलमार्गे आल्याचे समजताच त्यांनी मला कोठेतरी मुक्काम करायला पाहिजे होता असे सांगितले. त्या भागातील जंगलात अस्वले व इतर जनावरे असल्याचे सांगितले. मी सुखरूप परतलो याचेच मला अप्रूप वाटले. त्यांनी मला उद्या कोठे कोठे जायचे ते विचारले. उद्याचा माझा दौरा थेट सातपुडा पर्वतात होता. त्यासाठी त्यांनी एकटे न जाता बरोबर मला माझ्या मेहूण्यांना घेवूण जाण्याची सुचना केली. सातपुड्यातील जंगलाबद्दल मी पण ऐकून होतो. मी काही माझे मत न मांडता त्यांची सुचना मान्य केली.

आज मला अक्कलकुवा तसेच धडगाव तालूक्यातील अनुक्रमे भांग्रापाणी व मांडवी या दोन आश्रमशाळांत जायचे होते. नवापुरहून अक्कलकुव्याला जाण्यासाठी उच्छलमार्गेच रस्ता जवळचा होता. म्हणजेच काल रात्री मी ज्या मार्गाने आलो होतो त्याच जंगली रस्त्यातून आज आम्हाला जायचे होते. मला त्या मार्गाने परत दिवसा जायची उत्सूकता होती. काल रात्रीचा प्रवास व आजचा दिवसाचा प्रवास यात दिवस रात्रीचे अंतर होते. सुनिलही या रस्त्यावरून स्थानिक असुनही कधी गेले नव्हते. त्याचप्रमाणे सातपुड्यातल्या गावांमध्येही त्यांचा पहिलाच चक्कर होता. एक नविन एक्सपीडीशन म्हणून आम्हाला दोघांना उत्सूकता होती. आम्ही कालच्याच रस्त्याने निघालो. काल रात्रीचा रस्ता व आज दिवसा बघीतलेला रस्ता यात खुपच फरक होता. रस्त्याने चार पाच छोटी गावे लागली. काल रात्री दिसणारे भेसूर जंगल आज लोभसवाणे दिसत होते. रस्ता एकूणच जंगली तसेच एका डोंगर चढउताराचा होता. काल रात्री जरा 'जाणवणारा' रस्ता होता तसलाच १० चा १५ चा रस्ता होता. काल रात्री वेलदा टाकी पर्यंत आम्ही आलो. तेथून आम्ही अक्कलकुव्याकडे जाण्यासाठी वळालो. रत्यात एकदोन ठिकाणी सुनिलभाउंना सिग्रेटची तलफ भागवण्यासाठी थांबावे लागले. आम्ही मोटरसायकल आलटून पालटून चालवत होतो. मी मागेही हेल्मेट घालूनच बसायचो. भाऊ मात्र आपले बागाईतदार (उपरणे) घालून होते. होता होता आम्ही अक्कलकुवा येथे पोहोचलो. गावाच्या मागेच सातपुड्याचा मोठा पर्वत दिसत होता. सातपुडा हा पर्वत गुजरात पासून महाराष्ट्र-मध्यप्रदेशात आडवा पसरलेला आहे. महाराष्ट्राची व मध्यप्रदेशाची सीमा याच भागातून जाते. अक्कलकुवा हे गाव डोंगराच्या अगदी पायथ्याशी आहे. आम्ही तेथे चहा घेतला. येथून पुढे घाट चालू झाला. मोटरसायकल बर्‍याच वेळा पहिल्याच गियरमध्ये चालवावी लागत होती. समोरून काही जिप मधून लोकं थेट टपावरून प्रवास करत होते. एका बाजूला भली मोठी दरी व एका बाजूला पर्वत कडा असा देखावा होता. गाडी गरम होवू नये म्हणून घाटातल्या दोन पर्वतांच्या खिंडीत जावून थांबलो. तेथून अनेक मोटरसायकलस्वार पार होतांना दिसले. थोडावेळ थांबून आम्ही तेथून निघालो. आता आम्ही पर्वतांमधून चाललो होतो. काही वेळा मध्येच १०-१२ झोपड्या दिसायच्या. रस्त्याचा बराच भाग हा उंचसखल भागातून गेलेला होता. रस्त्यातून अनेक ओहोळ वाहतांना दिसले. तेथे रस्ता किंवा पुल हा भागच नव्हता. भांग्रापाणी ही आश्रमशाळा डोंगरउतारावर आहे. आजुबाजूला मोकळा परिसर होता. निसर्गसानिध्यात असलेल्या या आश्रमशाळा आपल्या शाळांसारख्या नसतात. मुख्याध्यापकांना माझे काम सांगितले. आजुबाजूचे शिक्षक सांगू लागले की येथे पावसाळ्यात तिन तिन महिने लाईट नसते. येथे तुम्ही बसने येवू देखील शकत नाही. रस्त्यात अनेक नद्या ओहोळ वाट अडवतात. तुम्ही देतात त्या कॉम्पुटरचे काय करणार? माझे सह्यांचे काम झालेले होते. आम्ही तेथून निघालो.
हा सातपुड्याच्या घाटाचा रस्ता उंच सखल होता. म्हणजे एकदम उंच चढ वैगेरे काही नव्हते. पण रस्ता वळणदार होता. काही छोटी गावे लागली. उंच घाटातून डोंगरउतारावर शेते मस्त दिसत होती. एकूणच मोसम मस्त होता. नंतर आम्ही मजल मारत मेघा पाटकरांनी प्रसिध्दीला आणलेले धडगाव येथे पोहोचलो. हा अक्राणी तालूका आहे. म्हणजे हेडऑफीस धडगावच आहे पण नाव अक्राणी तालूका आहे. वास्तविक येथून सरदार सरोवर काही किमी आत आहे. पण त्यांचे आंदोलन येथे बहूतेक सरकारी ऑफीसेस असावेत म्हणून येथेच चालले व बाकीच्या अधिकारी नेत्यांना या (शहादा गावाकडून चांगला रस्ता असल्याने) गावापर्यंत येता येत असल्याने ते याच्या पुढे जात नसावेत. येथे मात्र गर्दी होती. बरेचसे गावकरी बाजार करायला आलेले होते. आम्ही तेथे थांबलो. आता दुपारचे ३ वाजले होते. आम्हाला भुक लागली होती, म्हणून आम्ही तेथेच छोट्या हॉटेल मध्ये थोडे खावून घेतले. तेथे सुनिलभाउंच्या ओळखीचे एक शिक्षक भेटले. या भागात बरेचसे नोकरी करणारे लोकं आपले बिर्‍हाड करत नाही. एकटेच राहतात. शनिवार रविवार घरी जातात. बरेचसे शिक्षक हे आठवड्यातून एकदा येतात व पुर्ण आठवड्याच्या सह्या करून जातात. हा भाग म्हणजे सरकारी बदल्यांच्या शिक्षेचा भाग आहे. एखाद्या कर्मचार्‍याला कामाबद्दल शिक्षा द्यायची झाल्यास या भागात त्याची बदली केली जाते. नविन सरकारी कर्मचार्‍याला त्याच्या सुरूवातीची काही वर्षे येथेच काढावी लागतात. आम्ही तेथून निघालो. नंतर आमचे ठिकाण मांडवी हे होते. धडगाव सोडल्यावर मात्र रस्ता चांगला लागला. गावेही थोडी मोठी लागली. डोंगरचढ उतार मात्र तीव्र झाला. घाटात एके ठिकाणी काही छोटी मुले सिताफळे विकत होती. आम्ही ती विकत घेतली. या भागात सिताफळे फार मुबलक प्रमाणात मिळतात. रस्त्याने आम्हाला बरीच नैसर्गीक पणे उगवलेली बरीच सिताफळांची झाडे लागली होती.

साधारणपणे ५ च्या सुमारास आम्ही मांडवी या गावाच्या आश्रमशाळेत पोहोचलो. डोंगरात असल्याने सुर्य बुडाल्यासारखा होता. हि आश्रमशाळा फक्त मुलींसाठी आहे. आम्हाला सही शिक्के घेण्यासाठी ऑफीसात जावे लागले. काम आटोपले तेव्हा सुर्य बुडून अंधार झालेला होता. आता आम्हाला काळोखातून जाणे होते. ह्या रस्त्यांवर लुटालूटीची भिती होती. तरीही निघणे भाग होते. आम्ही तशीच गाडी दामटली. एकतर पुर्ण घाटाचा रस्ता अन त्यात असला भाग. त्यामूळे मनात सतत वाईट विचार येत होते. मोटरसायकल आता सुनिलभाऊच सावधगिरीने चालवत होते. रस्ता पुर्ण अंधारातच होता. केवळ बाजूच्याच रोडसाईन्स मुळे आम्ही कोठे चाललो आहोत ते समजत होते. होता होता आता आम्ही घाटाच्या उतरणीला लागलो. येथून एक रस्ता शहाद्याकडे तर एक रस्ता म्हसावद कडे जात होता. तेथूनच तोरणमाळ या थंड हवेच्या ठिकाणाकडे जाण्याचा मार्ग आहे. तेथे अस्थंबा या गावी अश्वस्थाम्याचे मंदीर आहे. आजही अश्वस्थामा चिरंजीव असल्याने या भागात फिरतो अशी लोकांची श्रद्धा आहे. आम्ही आता बरेच थकलो होतो. शहादा जसेजसे जवळ येत गेले तसे आम्ही तेथेच मुक्काम करायचे ठरवले. साधारण ९ वाजता आम्ही शहाद्यास पोहोचलो. तेथे गेल्यानंतर पहिल्यांदा एक लॉज बुक केली. खुपच थकल्याने मस्त आराम व्हावा म्हणून एसी रुम बुक केली. ताजेतवाने होवून आम्ही जेवण केले. थकव्यामुळे जेवण झाल्यानंतर रुममध्ये टिव्ही चालू असूनही मला झोप लागली.

सकाळी उठल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर नाश्टा करून आम्ही नवापूरकडे निघालो. नंदूरबार नंतर विसरवाडीला आल्यानंतर गाडीत पेट्रोल भरले.
दुपारच्या १२ च्या सुमारास आम्ही नवापूरला पोहोचलो. गाडीतील डिक्कीतील सिताफळे बघीतली असता त्यातली बरीचशी सिताफळे खराब झालेली होती.

दुपारचे जेवण करून मी लगेच नाशिककडे प्रयाण केले. अशा रितीने माझा प्रवासाचा एक अध्याय समाप्त झालेला होता, पण अजुन जळगाव, धुळे जिल्ह्यातल्या निम्या आश्रमशाळांना भेटी देणे बाकी होते.