Wednesday, April 3, 2013

दुष्काळावर मात

दुष्काळावर मात

असेच एक गाव होते. त्या गावाजवळून जाणारा एक नदी होती. नदीकाठी मोठ्ठी आंबराई होती. आंब्यांच्या मोसमात त्या आंब्यांच्या झाडांना रसदार आंबे येत. त्या आंबेराईमुळेच त्या गावाचे नाव आंबेवन पडले होते. ती आंब्याची बाग कुणा एकाची नव्हती. ती त्या गावच्या मालकीची होती. संपुर्ण गाव त्या आंबेराईचे मालक होते. गावची पंचायत त्या झाडांची निगा राखे. पंचायतीने गावातल्या प्रत्येक घरातल्या स्त्री किंवा पुरूषाला कामे नेमून दिली होती. कुणी लहान लहान रोपट्यांची निगा राखे, कुणी झाडांना पाणी देण्याचे काम बघे, कुणी झाडांवरच्या मोहोराची, त्यावर पडणार्‍या रोगाची काळजी घेई तर कुणी येणारा फळाचा बहर काळजीपुर्वक हाताळी, त्यांची तोड करणे, बाजारात विक्री करणे आदी कामे कुणी करी. तालूक्याच्या गावी बाजारात त्या फळबहाराची विक्री करून दरवर्षी त्या गावाला भरपूर उत्पन्न मिळे. येणार्‍या रोख रकमेचा विनीयोग गावकरी आपसात समजूतीने करून घेत. हे सारे त्या गावच्या कित्येक पिढ्यांपासून चालत आलेले होते. गावकरीदेखील आपल्या पुर्वजांचा आदर राखून या आंबराईची श्रद्धापुर्वक देखभाल करत. गावातील प्रत्येक घर या आंबराईशी भावनेने बांधले गेले असल्याने गावकर्‍यांना ती आमराई स्वःताचीच वाटे. सारे गावकरी भांडणतंटा न करता समजूतीने आपाअपल्या वाट्याची कामे करीत. किरकोळ कुरबूर असेलच तर ती चारचौघे लक्ष देवून मिटवून टाकत.

अशा या आमराईची, तेथल्या कामाची महती सर्वदूर पसरली होती. पंचक्रोशीतील लोक या कामाची माहीती घेण्यासाठी, कैर्‍या, आंबे खरेदी करण्यासाठी नेहमी येत. गावकर्‍यांनी अशा भेटीसाठी येणार्‍या लोकांसाठी एक छानशी बाग त्या आमराईच्या सुरूवातीला केली होती. भेटीसाठी आलेले लोक त्या बागेत विश्रांती घेत, न्याहारी, वनभोजन करत. लहान मुले तेथे खेळ खेळत.

आंबेवन गावाच्या पुर्वेला असलेल्या वीस पंचवीस कोस दूर असणार्‍या तवली नावाच्या डोंगर रांगांमधून रांगणी नावाची नदी उगम पावत असे. आमराईपर्यंत येण्यापूर्वी त्या नदीला आणखी चारदोन ओहोळ मिळत. नदीच्या पाण्याचा फूगवटा अगदी उन्हाळा मध्यावर आला तरी आटत नसे. रांगणी नदीच्या पुण्याईने आंबेवन अन त्याच्या आसपासची जमीन ओलीताची होती. ज्या कुणाची शेती होती तो तो शेतकरी चांगली नगदी पीके घेवून सुखाने खातपीत होते. जे शेतमजूर होते ते इतरांच्या शेतावर राबत होते. गावातले सारे जण सुखात होते.

अशा सुखाने नांदणार्‍या आंबेवनाला दृष्ट लागली. दोन वर्ष सतत तवली डोंगररांगांमध्ये पाऊस पडला नाही. दुष्काळाने परिसर होरपळून निघाला. विहीरींनी आपला पान्हा आटवला. जनावरे चार्‍यापाण्याविना विकायची वेळ आली. गडीमाणसे, बायाबापड्या पिण्याच्या पाण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करू लागले. आंबराईची तर होरपळ झाली. उत्पन्नावर परिणाम झाला. शेतकर्‍यांच्या खिशातील पैसा पाण्यापाई संपला. आंबेराईतील चार शहाणेसुरते लोक एकत्र आले. पाण्याच्या प्रश्नावर त्यांनी विचार केला. जर रांगणी नदीच्या वरच्या टोकाला बांध घातला तर तीचे पाणी अडवून ते पुरवून वापरता येईल या निष्कर्षापर्यंत गावकरी आले. पण रांगणी नदीचा उगम हा तवली डोंगररांगातून होत होता तो परिसर वडगावाच्या हद्दीत येत होता. आंबेवनाच्या गावकर्‍यांनी वडगावाच्या लोकांना नदीवरील बांधाबाबत सांगितले. त्या गावाच्याही लोकांनी दुष्काळी परिस्थिती पाहून बांध घालण्याबद्दल दुजोरा दिला. दोन्ही गावाच्या गावकर्‍यांनी सरकारदरबारी आपले म्हणणे मांडले. बांध घालण्यासाठी दोन्ही गावे श्रमदान करायला तयार होती पण सरकारी पैशाविना बांधाचे मोठे काम पुढे जाणे अवघड होते. या सगळ्या प्रयत्नात दुष्काळाचे आणखी एक वर्ष उजाडले. जो काही थोडाफार पाऊस पडला त्याच्या पाण्याने थोडेदिवस तहान भागली पण पाण्याशिवाय परिसर उजाड वाळवंट होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली.

कमी पावसामूळे दुष्काळी परिस्थिती आताशा राज्यामध्ये ठिकठिकाणी निर्माण झाली होती. या दरम्यान आंबेवन आणि वडगावच्या लोकांनी सरकारी मदतीवर अवलंबून न राहता बांध घालण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. दोन्ही गावातील घरटी एक माणूस श्रमदानासाठी खपू लागला. कुणी कुदळ घेवून, कुणी फावडे घेवून, कुणी पाटी घेवून तर कुणी कुदळ आदी हत्यारे घेवून कामावर जावू लागला. बाजूच्या डोंगररातून मुरूम, दगड-माती बंधार्‍याच्या भरावासाठी वापरात येवू लागली. बंधार्‍याचा पहिला थर तयार झाला. तोपर्यंत पावसाळा येवून ठेपला. आलेल्या पावसाने डोंगररांगांतून पाणी वाहू लागले. रांगणी नदीच्या उगमापाशी तयार झालेल्या बांधामध्ये पाणी अडू लागले. त्यामूळे परिसरातील विहीरींमध्ये पाणी भरू लागले. पावसाळ्यातील पाण्यामुळे जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न तात्पूरता मिटला होता. बांधातले पाणी पुढला हिवाळा संपेपर्यंत पुरले त्यामुळे गावकर्‍यांचा हुरूप वाढला. ही बातमी राज्याच्या राजापर्यंत पोहोचली. संपूर्ण राज्यभर दुष्काळाचे सावट असतांना ह्या आनंदाच्या बातमीने महाराजांनी बांधाला स्वत: भेट दिली. दोन्ही गावच्या गावकर्‍यांचे अभिनंदन करून सरकारी मदत जागेवरच जाहीर केली.

महारा़जांनी केलेल्या मदतीमुळे सरकारी यंत्रणा कामाला लागली. बंधार्‍याची उंची वाढवली गेली. बांधाचे पाणी सोडण्यासाठी दरवाजे बसवले गेले. दोन्ही बाजूंनी दोन कालवे खोदण्यात आले. पाणीवाटपाचे वेळापत्रक तयार होवून त्याबरहूकूम पाणी कालव्यांमधून वेळोवेळी सोडवण्यात येवू लागले. जातीने महाराज या प्रयोगाकडे लक्ष देवून होते. या सार्‍या प्रयत्नांमुळे आंबेवन व वडगाव परिसरातील पाण्याची पातळी वाढली. शेतीसाठी पाटामधून पाणी मिळू लागले. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. आंबेवनाची आमराई पुन्हा बहरू लागली.

त्यानंतर आलेल्या आंब्यांच्या हंगामात आंबेवनातील गावकरी तयार आंब्यांच्या पाट्या महाराजांना भेटीसाठी घेवून गेले. महाराजांनी त्या भेटीचा आनंदाने स्विकार करत आंबेवन-वडगाव बंधार्‍याचा प्रयोग संपुर्ण राज्यभर राबवण्याचा आदेश सरकारी अधिकार्‍यांना दिला.

अ) दीर्घोत्तरी प्रश्न:
१) आंबेवनातील दुष्काळापुर्वीच्या स्थितीचे वर्णन करा.
२) दोन्ही गावांनी दुष्काळी परिस्थितीवर कशी मात केली?
३) राज्यात पडलेल्या दुष्काळावर मात करण्यासाठी महाराजांनी काय प्रयत्न केले?

ब)लघूत्तरी प्रश्न :
१) तवली डोंगरावरून कोणती नदी उगम पावत असे?
२) बांध बांधल्यानंतर गावकर्‍यांनी महाराजांना काय भेट दिली?
३) श्रमदान करण्यासाठी गावकरी काय काय घेवून कामे करू लागली?

क) उपक्रमः
१) तुमच्या परिसरात उपलब्ध असणारे पाणी कसे वाचवता येवू शकते याबाबत प्रकल्प अहवाल तयार करा.
२) जे नागरीक पाणी वाया घालवता त्याबद्दल त्यांचे पाण्याबाबत उद्बोधन करा.

No comments: