Thursday, July 13, 2017

जय महाराष्ट्र बोला

जय महाराष्ट्र बोला
अरे बोला बोला जय महाराष्ट्र बोला
कुणाच्या बापाची भीती नाय
बोला दणकूण बोला
तुम्ही जय महाराष्ट्र बोला
अरे बोला बोला जय महाराष्ट्र तुम्ही बोला ||

आता नाही तर कधीच नाही हे ठेवा ध्यानी
सीमाभाग आमच्यात घेवू लक्षात घ्या तुम्ही
उगा पिरपिर करू नका
नाहीतर एकच ठेवून देवू टोला
बोला बोला जय महाराष्ट्र बोला ||1||

बापजादे खपले आमचे सीमालढा देवून
लाठ्या काठ्या खाल्या लई हाल सोसून
खोटे गुन्हे नका दाखल करू
कन्नडीगांनो, झाले मराठी आता गोळा
बोला बोला जय महाराष्ट्र बोला ||2||

मराठी शाळा तुम्ही संपवल्या की हो
कानडीची सक्ती तुम्ही राबवली हो
सोईचे नियम केले हो केले
दमनशास्त्र तुम्ही राबवले हो राबवले
खेळी केली अन गावं खिशात घातले
एक पिढीच संपवली बंद करूनी मराठी शाळा
आतातरी बोला बोला जय महाराष्ट्र बोला ||3||

बेळगाव कारवार भालकी बीदर
आळंगा हल्याळ निपाणी घातले घशात
आतल्या गाठीचे तुम्ही
खोटे आयोग लावले कितीक वेळा
म्हणून बोला बोला जय महाराष्ट्र बोला ||4||

मागच्या पिढ्या संपवल्या मुस्कटदाबी करून
बळजबरी केली कानडीची मार मारून
सांगा कितीदा सोसायच्या मराठीसाठी कळा
म्हणून बोला बोला जय महाराष्ट्र बोला ||5||

नका आता भाषेचे राजकारण करू
नका आणखी सीमाभागाचे लचके तोडू
मराठीला नका लागू देवू कानडी सक्तीच्या झळा
बोला बोला जय महाराष्ट्र बोला ||6||

- पाषाणभेद

Sunday, March 19, 2017

"वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.

"वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.

वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही

तब्बल चार वर्षानंतर, पुन:लेखन करून, संवाद, लावण्या आणि प्रसंगात बदल करून, "वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.

तुम्हां सर्व रसिक वाचकांना आणि लेखन करतांना हुरूप देत आपुलकीचे नाते जपणार्‍या  MisalPav.com, Aisiakshare.com, MaayBoli.com येथील संचालक, सभासद यांना सविनय अर्पण.

ऑनलाईन कम्युनिटी वेबसईट्स वरील (म्हणजेच येथील) मित्र - सुहास साळवे, जयपाल पाटील, प्रसन्न केसकर, विशाल विजय कुलकर्णी, चित्रकार शरद सोवनी (चित्रगुप्त), प्रमोद देव, प्रा. डॉ. दिलीप बिरूटे, चंद्रशेखर अभ्यंकर (तात्या), कैवल्य देशमुख, मदणबाण, प्रसाद ताम्हणकर (परा), सागर भंडारे, राजेश घासकडवी, पराग दिवेकर (आत्मा), राज जैन व इतरांनीही लेखनकामी प्रोत्साहन दिले.
प्रस्तूत पुस्तकलेखनकामी येथील सदस्य किरण भावे यांचा 'किरण फॉन्ट' वापरला आहे.
नव्या स्वरूपातील हे वगनाट्य आपणांस आवडेल याची खात्री आहे.

धन्यवाद.

आपला,
पाषाणभेद उर्फ दगडफोड्या उर्फ सचिन बोरसे!

Cover Page

Last Page

Title Page

Verto Page

ArpanPatrika

Manogat 1

Manogat 2

Loknatyachya nimittane 1

Lokanatyachya nimittane 2

Lokanatyachya nimittane 3

Suchana

Ghoshana

Bhumika

Page1

Page 2

Page 3

Page 21

Page 31

वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही

Thursday, November 17, 2016

मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली

मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली


सांगा तुम्ही मला कशी जावू मी आता बाजारी 
सांगा तुम्ही मला कशी जावू मी आता बाजारी
या मोदी सरकारने, या तुमच्या मोदी सरकारने 
या या मोदी सरकारने 
पाचशे हजाराची नोट बंद केली             ||धॄ||

मार्केटात आता आल्या नव्या नव्या साड्या
घेण्यासाठी आम्हा सार्‍यांच्या पडतात उड्या
लेटेस्ट फॅशन करायची आता पंचाईत झाली
मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली
या या मोदी सरकारने 
पाचशे हजाराची नोट बंद केली              ||१|| 

भाजी पाला घेण्यासाठी मी गेले मार्कॅटात 
मोठ्या नोटा सोडून सार्‍या सुट्टे पैसे नव्हते हातात
दररोजच्या जेवणाचीही पहा कशी चव गेली
मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली   ||२||

बँकेमध्ये नोटा बदलायला भली मोठी लाईन
लाखो रूपये भरले तर इन्कमटॅक्स फाईन
एटीएम झाले बंद पर्स माझी रिकामी केली
मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली   ||३||

हे मात्र छान झाले काळा पैसा बाहेर आला
भ्रष्ट्राचार लाचखोरीचा एक मार्ग बंद झाला
ह्या उपायांनी धनदांडग्यांची दातखीळ बसली
मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली
या या मोदी सरकारने 
पाचशे हजाराची नोट बंद केली            ||४||

- पाषाणभेद

Monday, May 9, 2016

आखाजीचा सण

गवराईचा सन आला गवराईचा सन आला
या ग सयांनो पुजू तिला या ग सयांनो पुजू तिला

सयांनो ग सयांनो या या तुम्ही सार्‍या या
झोका झाडाला टांगला त्याला तुम्ही झोका द्या

आता आला आला वारा झोक्याला तो झुलवितो
आखाजीच्या सनाला ग माहेराला सुखवीतो

माहेराच्या आंगणात आंबा पहा मोहरला
पानोपानी त्याच्या आता कैर्‍या लगडल्या

कैरी हाले कैरी डुले वार्‍यासंगे मागेपुढे
हेलकाव्याने कैरी तुटे तुटूनीया खाली पडे
मायबापभावाच्या डोळ्याला ग पानी सुटे

नको माय तू ग रडू तुझ्या ग कैरीपाई
कैरी आता तुझी नाही कैरी आता तुझी नाही

- पाभे

आखाजीना सन

खान्देशी लेकी आखाजीच्या सणाला माहेराला येतात अन काय गीत म्हणतात पहा -

नदीनं पानी वाहे झुळूझुळू वाहे झुळूझुळू
चला त्यानामा आंगूळ करू आंगूळ करू

माहेरवास्नी सार्‍या उनात उनात ( उनात = आल्यात)
झोका टांगेल शे दारात

आंबानं पान हिरवंगार
झोका जावूदे जोरदार

गवराई चला वं मांडूया
पुजा तिन्ही करूया

आखाजीना सन शे
माहेराला बरकत दे

माय वं माय वं तुन्ह्या लेकीस्ले
सासर मधार सुख दे

Thursday, January 1, 2015

जमला मेळा संतसज्जनांचा

जमला मेळा संतसज्जनांचा

जमला मेळा संतसज्जनांचा
पांडुरंगाच्या भक्तांचा ||ध्रू||

हाती घेवूनीया विणा आणि टाळ
भजनात विसरती काळवेळ
हरपली तहानभुक हरपले देहभान
जमला मेळा...||1||

नको भेटी आणिक तिर्थक्षेत्री
आम्हा वैष्णवांची पंढरीच काशी
माऊलीच्या घरी आलो माहेराला
जमला मेळा... ||2||

विठूरायाचे सावळे मुख
पाहूनिया झाले सर्वसुख
ओलांडला पर्वत यातनांचा
जमला मेळा...||3||

- पाषाणभेद

हेल्मेट वापरासंदर्भातील सल्ले


सर्वप्रथम आपले अभिनंदन की आपण हेल्मेट वापरण्याचा निर्णय घेतला. हेल्मेट वापरणे आपल्याच हिताचे असते.
हेल्मेट निवडतांना काही काळजी घेणे आवश्यक आहे. दुचाकी वाहन चालवतांना हेल्मेटसंदर्भात खाली दिलेले मुद्दे कृपया निट वाचा.

१) तूमच्या डोक्याला बसणारे हेल्मेट निवडा. हेल्मेट निवड करतांना डोक्याला एकदम फिट्ट बसणारे नको अन त्यातून तूमचे डोके त्याच्या आत फिरेल इतकेही ढिले नको.

२) हेल्मेटच्या बाह्यस्वरूपावर जरा लक्ष देणे गरजेचे आहे. उगाच मित्राकडे आहे म्हणून तसेच, भाव-शायनिंग मारण्यासाठी घेतलेले, स्वस्त, रस्त्यावरचे नको.

३) हेल्मेटवर रंगीत रेडीयम असते. बर्‍याचदा रेडीयम विनाईल प्रकारातले असते. ते तसे नसावे. विनाईल कालांतराने फिके पडते. रेडीयम असेल तर रात्रीच्या वेळी प्रकाशमान होवून इतर वाहनांना ते दिसू शकते हा फायदा रेडीयममुळे मिळतो. बर्‍याच हेल्मेटवर केवळ रंग लावलेले आकार असतात त्यांचा उपयोग तसा नसतो. केवळ हेल्मेट आकर्षक दिसते व किंमत वाढते. (याच कारणामुळे माझ्या पहिल्या हेल्मेटवर मी Intel inside चा मोठा लोगो रेडीयम मध्ये करून चिकटवला होता.)

४) हेल्मेट कोणत्या प्रकारात घ्यावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निवडीचा प्रश्न असतो. शारिरीक गरज, खिशाचा सल्ला, चेहेर्‍याचा, डोक्याचा आकार आदी बरेच मुद्दे त्यात येवू शकतात. हेल्मेट घेणे म्हणजे साडी घेण्यासारखे आहे. http://en.wikipedia.org/wiki/Motorcycle_helmet या लिंकवर याची जास्त माहीती करवून घ्या.

५) आपण ढोबळमानाने 'खुले' व 'बंद' प्रकाराचे हेल्मेट (Open and Closed Type of Helmets) असतात असे मानू. 'खुले' म्हणजे केवळ कवटीचे संरक्षण करणारे व 'बंद' म्हणजे कवटी अधिक जबड्याचे (चेहर्‍याचे) संरक्षण करणारे हेल्मेट होय.
'खुल्या' हेल्मेटच्या प्रकारात तुम्ही खर्च केलेल्या पैशांमधून केवळ कवटीचे संरक्षण होते. त्या पैशात थोडी जास्त भर टाकून 'बंद' प्रकारचे हेल्मेट खरेदी करता येवू शकते. पण काही जणांना 'बंद' प्रकारच्या हेल्मेट मध्ये कोंडल्यासारखे भासू शकते. कानांवर इतर वाहनांचे आवाज कमी येवू शकतात असे भासते. (हे केवळ भासच असतात!)
कोंडल्यासारखे भासणे, कमी आवाज येणे आदी भास हेल्मेटच्या वापराच्या सवयीने परिचयाचे होत जातात. कदाचित यामुळे आपल्या वाहनाचा वेग आपसूक मर्यादेत राहतो हा पण एक फायदाच जाणावा.

आता हेल्मेटच्या बाबतीत काही आधिकारीक सुचना:

माझ्या मते भारतातील प्रत्येक दुचाकी चालकाने 'बंद' प्रकारातलेच हेल्मेट घ्यावे. सुरूवातीला नव्या हेल्मेट तुम्हाला त्रासाचे वाटेल पण एकदाका हेल्मेटची सवय झाली की मग चिंता नाही. आवाज कमी येणे, मानेला त्रास होणे, आजूबाजूचे न दिसणे, जीव घाबरणे आदी तक्रारी या 'बहाणे' या प्रकारात मोडतात. माझा तुम्हाला 'बंद' प्रकारातील हेल्मेट घेणे हाच आग्रह असणार आहे.

६) रस्त्यावरचे हेल्मेट कधीही घेवू नये. रस्त्यावरचे हेल्मेट हे रिसायकल केलेल्या हेल्मेटचे असू शकते. त्याचे प्लास्टीक, फायबर कमी दर्जाचे असू शकते. त्याचे पट्टे रिबीटने निट न-बसवलेले असू शकतात. त्याच्या आतील कापडाचा दर्जा कमी असू शकतो. त्यातील फोम, थर्मोकोल कमी दर्जाचे असू शकते. त्याची काच कमी ग्रेडची, अपारदर्शक असू शकते. तो विक्रेता पळून जावू शकतो. तो विक्रेता बिल देवू शकत नाही. आदी.

७) मिलीटरी कँन्टीनमध्ये स्वस्त मिळते म्हणून तेथले हेल्मेट कधीही घेवू नये. मिलीटरी कँन्टीनमध्ये कमी किंवा ठरावीक कंपन्यांचे, ठरावीक आकाराचेच हेल्मेट मिळू शकतात. त्यात तुमचे डोके 'निराळे' असल्यास हेल्मेट तुमच्या डोक्याला निट न-बसणारे असू शकते.

८) हेल्मेटची निवड करतांना एक महत्वपुर्ण पायरी: हेल्मेटचे पुढील फोम किंवा कड तुमच्या भुवईच्या वरतीपर्यंत येवू द्या असेच हेल्मेट निवडा व त्या पद्धतीतच पुढे वापरत चला. ही एक जास्तीच्या संरक्षणासाठीची तरतूद आहे.
सततच्या वापराने पुढेपुढे हेल्मेटच्या आतील थर्मोकोलचा आकार तुमच्या डोक्यानुसार घडेल.

९) हेल्मेट घातल्यानंतर त्याचे पट्टे काळजीपुर्वक बांधा/ लावा. त्याच्या लॉकचा "टक्क" असा आवाज आल्याची खात्री करा. पट्टे न बांधता घातलेले हेल्मेट हे हेल्मेट डोक्यात घालून न घातल्यासारखे आहे.

१०) कालांतराने हे पट्टे ढिले होतात. ते वेळोवेळी हनूवटीला/ मान-चेहेर्‍याला घट्ट होतील असे करत चला.

११) हेल्मेटची काच जास्त वापरामुळे चरे पडलेली असेल, त्यातील गिअरमधून पडत असेल किंवा ढिली झाली असेल तर बदलवून घ्या.

१२) काळ्या रंगाची काच कधीही लावू नका. डोळ्यांना फारच उन दिसत असेल तर हेल्मेटमध्ये गॉगल वापरा.

१३) एकच हेल्मेट हे आयुष्यभरासाठीचे नाही. दोन-पाच वर्षात, आतील थर्मोकोलचा आकार बदलल्यास ऐपतीप्रमाणे बदलणे गरजेचे आहे.

१४) हेल्मेट न वापरणार्‍यांसाठी: एकदा तुम्ही हेम्लेट मोटरसायकल चालवतांना सतत आठ दिवस वापरा. नवव्या दिवशी हेल्मेट न घालता गाडी चालवणे तुम्हाला आवडणार नाही हे नक्की.

वाचकाचा प्रश्नः >>> समोरुन डोळ्यावर उन्हं येत असतील तर काय उपाय करतात?>>>>>>

कृपया सल्ला क्र. ८ वाचा.
८) हेल्मेट निवडतांनातली एक महत्वपुर्ण पायरी: हेल्मेटचे पुढील फोम किंवा कड तुमच्या भुवईच्या वरतीपर्यंत येवू द्या असेच हेल्मेट निवडा व त्या पद्धतीतच पुढे वापरत चला.

या प्रकारात हेल्मेटच्या कडा सरळ कपाळावर येतात. त्यामुळे उन्हाचा त्रास होत नाही. समोरचे उन जरी येत असेल तर काच वर केल्याने फरक पडतो. तसेही डोळ्यावर येणारे उन हे सकाळचे किंवा संध्याकाळचे कोवळे असते. ते डोळ्यांना खुपत नाही. मला सांगा भारतातील शहरांमधील असे कोणते रस्ते एकदम सरळ पुर्व-पश्चिम असतात? अन कोणता प्रवास इतका पुर्व पश्चिम खुप दुरचा असतो?

सर्वात महत्वाचे हेल्मेट वापरणे सुरूवात करणे. यामुळे आपल्या शरिराला, डोळ्याला हेल्मेट ची सवय होते. आधीच पाण्यात पडून बुडेन की काय ह्याची भीती बाळगली तर पोहोता येणार नाही.

वाचकाची शंका: >>> शिवाय हेल्मेट थेट डोक्यावर घातल्याने टाळूला घासून केस गळतात अशी तक्रार मी ऐकली आहे त्यामुळे डोकं आणि हेल्मेटच्या मध्ये आवरण असू दे..

हेल्मेटमुळे आवाज कमी येणे, मानेला त्रास होणे, आजूबाजूचे न दिसणे, जीव घाबरणे आदी तक्रारी आणि हेल्मेट टाळूला घासून केस गळतात या तक्रारी 'बहाणे' या प्रकारात मोडतात.

हेल्मेटमुळे केस गळतात असा कोणताही निश्कर्ष वैद्यकीय संशोधनात निघालेला नाही. १७ वर्ष हेल्मेटच्या वापराने माझ्या टाळूच काय पण डोक्याच्या कोणत्याही भागाला टक्कल पडलेले नाही. डोक्याचे केस गळणे, टक्कल पडणे, (केस अकाली पांढरे होणे) आदी अनुवंशीक-वैद्यकिय आहे. हेल्मेटच्या वापरामुळे झाला तर फायदाच होतो, तोटा नाही.

१५) हेल्मेट घेतेवेळी सोबत दुचाकीला त्याचे लॉक येते ते बसवून घ्या. यामुळे मोटरसायकल चालवल्यानंतर हेल्मेट कोठे ठेवावे हा प्रश्न उद्भवत नाही व त्यामुळे हेल्मेट बरोबर न नेणे हा 'बहाणा' टाळता येतो. लॉकमुळे हेल्मेटचोरीला थोडाफार आळाही घातला जातो.

१६) हेल्मेट सोबत रीप्लेसेबल कुशनिंगची तसेच फोल्डेबल- हिंजेस असलेल्या हेल्मेटची सुद्धा आवश्यकता नाही. यामुळे हेल्मेटची किंमत वाढते. कोणत्याही मशिनरीमध्ये जेवढ्या जास्त असेंब्ली तेवढ्या जास्त तक्रारी. (सोय व संरक्षण हे वेगवेगळे मुद्दे आहेत.)

१७) मुख्य म्हणजे रस्त्यावरचे नियम पाळा. (रस्त्यावरचे नियम पाळण्यामध्ये हेल्मेट घालून वाहन चालवा हा सल्ला असतोच!!)

हॅप्पी ड्रायव्हींग.


Thursday, October 16, 2014

कोवळीक


कोवळीक

आताशा आयुष्यात माझ्या येवून जा
आलास कधीतरी तेव्हा चांगला राहून जा

रुक्ष शुष्क आयुष्याच्या वाळवंटात
आर्त पाण्यासाठी तगमगलेली

कितीदिवस म्हणते मी ही वाट पहायची
कधी भ्रमही होतात तू पुन्हा आल्याची

फुले तर तर भरपुर निघाली
पण अजूनही आस आहे फुलायची

- पाभे

Wednesday, October 15, 2014

अहिराणी गीत: मन्हा सासरनी वाट


अहिराणी गीत: मन्हा सासरनी वाट

मन्हा सासरनी, सासरनी वाट भलती भारी व
मन्हा दादलानी दादलानी मी शे लाडी व||धॄ||

कालदिन तेस्नी लई माले सोनानी पोत
ती पोत घालीनसन मी दिसू रानी व

कालदिन तेस्नी लई माले सोनानी मुंदी
ती मुंदी घालीनसन मी दिसू रानी व

कालदिन तेस्नी लाया माले कबंरपट्टा
कंबरपट्टा घालीनसन मी दिसू रानी व

कालदिन तेस्नी लाया माले कबंरपट्टा
कंबरपट्टा घालीनसन मी दिसू रानी व

कालदिन तेस्नी लाया माले पैठणी शालू
तो शालू घालीनसन मी दिसू रानी व

मन्हा सासरनी, सासरनी वाट लई भारी व
मन्हा दादलानी दादलानी मी शे लाडी व ||धॄ||

(मिसळपाव.कॉम वरील सदस्य इरसाल आणि आर्या१२३ यांच्या सुचनांचे आभार)

- पाषाणभेद

Saturday, February 8, 2014

अकबराचा मोबाईल हरवतो

अकबराचा मोबाईल हरवतो

नेहमीप्रमाणे अकबर बादशाह दरबारात बसला होता. इतर सारे दरबारी आपाअपल्या खुर्च्यांवर बसले होते. दरबाराचे कामकाज चालू होते. नविन टॅक्स सिस्टीम कशी राबवायची, रेपो रेट कमी करायचा का नाही, आधार कार्ड स्कीम बंद करून नविन आयडेंटी कार्ड लागू करावे काय, अनुदानातले गॅस सिलेंडर, अभिनेत्री करूना कपुर हिला पद्मश्री पुरस्कार आदी बरेच विषय चर्चेला होते. एका दिवसात हे सारे विषय काही संपणारे नव्हते हे बादशाहाला अन बाकीच्या दरबार्‍यांनाही सवयीने माहीत झाले असल्याने टंगळमंगळ, विनोद करत चर्चा चालू होती.

बिरबलाचे बादशाह अकबराकडे बारकाईचे लक्ष होते. दरबार सुरू होता तेव्हा बादशाह प्रसन्न दिसत होता. अगदी न्यायालयीन कलमांच्या कंटाळवाण्या अन न-समजणार्‍या चर्चेतदेखील त्याने रस दाखवला होता. पण त्या चर्चेनंतरच अकबराचा चुळबूळपणा वाढला होता. एकदोन वेळा त्याने अंगरख्याच्या खिशातही हात घातला होता.

दरबारी नाष्टा अन चहा झाल्यानंतर बिरबलाने कधी नव्हे ते स्व:तहून दासीला बोलावून अकबराला जर्दापान दिले. तरीपण अकबराचा मुड काही खुलला नव्हता. त्याच्याकडून नेहमीप्रमाणे होणारे विनोद, दरबार्‍यांची खेचाखेची होत नव्हती.

तेव्हढ्यात अकबर बादशाहाने वैतागून मोठ्याने हुजूर्‍याला आज्ञा केली की, "अरे माझा मोबाईल शोध बाबा". नंतर अकबराने सार्‍या दरबाराला ऐकू जाईल अशा आवाजात सांगितले त्याचा मतितार्थ असा की आज दरबारात येण्यापुर्वी राणीच्या महालात असेपर्यंत बादशाहाचा मोबाईल त्याच्या अंगरख्याच्या खिशात नेहमीप्रमाणे होता. दरबाराची वेळ झाली अन नाईलाजाने तो राणीमहालातून दरबारात हजर झाला होता. नंतर चर्चेदरम्यान एकदोन वेळा त्याने मोबाईल मध्ये काही मेसेज वैगेरे बघण्यासाठी खिशात हात घातला तर मोबाईल तेथे नव्हता. म्हणजेच अकबराचा मोबाईल गायब झाला होता.

प्रत्यक्ष अकबर बादशाहाचा मोबाईल गायब झाला हे पाहून सार्‍या दरबार्‍यांची मोबाईल शोधासाठी धावपळ सुरू झाली. राणीसाहेबांच्या हाती मोबाईल चुकून हाती लागला तर त्या मोबाईलमधील नको त्या गोष्टी पाहतील अन मग रात्री खरडपट्टी घेतली जाईल हे मनात येवून अकबरालाही त्याच्या मोबाईलची काळजी वाटू लागली.

बादशाहाचे सिंहासन, बाजूचे पानाचे व पाण्याचे टेबल, दरबारात येण्याचा मार्ग, इतर दरबार्‍यांच्या जागा आदी सार्‍या ठिकाणी सेवकांनी लगबग करत मोबाईलचा शोध घेतला. मुख्य सुरक्षा सचिवाने राजवाड्याचे मुख्य द्वार बंद करण्याचे आदेश दिले. बादशाहाचा मोबाईल सापडेपर्यंत कुणीही राजवाड्याच्या बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली. सार्‍या दरबार्‍यांनी संध्याकाळी उशीरा घरी येवू असल्या अर्थाचे एसएमएस घरी पाठवले. काहींच्या मनात मोबाईल चोरी तर झाला नसेल ना असली शंकाही आली. अकबराच्या शालकाने चतूराई नजरेत यावी म्हणून अकबराच्या मोबाईलवर रींग दिली तर मोबाईलवर रींग जात होती. म्हणजेच मोबाईल कमीतकमी बंद झालेला नव्हता.

अकबराने त्याचा मोबाईल सगळ्यात शेवटी राणीदरबारात वापरला होता व त्यानंतरच तो नाहीसा झाला या निष्कर्षापर्यंत सारे दरबारी आले. आता राणीच्या दरबारात खास विश्वासू सेवक व दरबार्‍यांपैकी बिरबलालाच प्रवेश होता हे सार्‍यांना माहीत होते. संशयाची सुई आपल्याकडे वळत आहे हे पाहून मोबाईल शोधाची सगळी सुत्रे बिरबलाने आपल्या हातात घेतली.

बादशाहाला त्याने विचारले, "महाराज, आपण मोबाईल शेवटचा कधी हाताळला?"

"हाताळला म्हणजे तसा तो नेहमी हातातच असतो", तसल्या गंभीर प्रसंगातही आपली विनोदीबुद्धीची चुणूक दाखवत अकबर पुढे म्हणाला, "पण दरबारात येण्यापुर्वी मी राणीसाहेबांच्या महाली गेलो होतो. थोड्या गप्पा झाल्या, राणीसाहेबांच्या हातून पान खाल्ले अन तेवढ्यात दरबारात येण्यासाठी लावलेल्या वेळेच्या अलर्टने रसभंग केला. अलर्ट बंद करून मोबाईल मी नेहमीप्रमाणे सायलेंट मोडवर टाकला अन तडक दरबारात हजर झालो. रस्त्यात कुठेही थांबलो नाही की काही नाही. असा चालताचालता मोबाईल हरवतो म्हणजे काय?", अकबराने थोड्या रागातच सांगितले.

"महाराज, आपण मोबाईल शेवटचा कधी चार्ज केला होता? अन बॅटरीचा काही प्रॉब्लेम तर नाही ना? म्हणजे बॅटरी लवकर संपणे वैगेरे?" बिरबलाने पुढला प्रश्न विचारला.

"असे बिरबल, हा माझा मोबाईल अगदी लेटेस्ट आहे म्हणजे होता बघ. काही बॅटरीबिटरीचा प्रॉब्लेम नाही. फक्त तो हरवायला नको अन कुणाच्या हातातही पडायला नको. मोबाईल कंपनीला सांगून सिमकार्ड ब्लॉक करता येईल मोबाईल लॉक करता येईल पण त्यात असणार्‍या डेटाचे काय? अन मी तर त्याला पासवर्डही ठेवला नव्हता. काही जोक असलेले मेसेजेस मी राणीसरकारांनाही वाचायला मोबाईल त्यांच्या हातात तेवढ्यापुरता द्यायचो." बादशाहाने काळजीपोटी खाजगी आवाजात बिरबलाला सांगितले.

बिरबल थोडा विचारात पडलेला दिसल्याने अकबराने त्याची रडकहाणी बंद केली. बिरबल बराच वेळ काही बोलत नाही हे पाहून बादशाहा उसासून म्हणाला, "बिरबल, काहीही करून तो मोबाईल मिळव बाबा. मोबाईल न मिळाल्यास मी तूला तुरूंगात टाकीन."

अर्थात 'तुरूंगात टाकीन' वैगेरे ह्या पोकळ धमक्या असतात हे सवयीने बिरबलाला माहीत होते, आता दुपारचे तीन वाजून गेले असूनही मोबाईलचा शोध न लागल्याने अन भुकेने पोटात कावळे ओरडत असल्याने बिरबल थोडा काळजीत होता.

बिरबल काय बोलतो हे ऐकण्यासाठी सार्‍या दरबाराचे कान बिरबलाकडे लागले. बादशाहाच्या शालकाच्या मनात बिरबलाविषयी असलेल्या असूयेने आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या.

शेवटी बिरबल निर्धाराने बोलला, "महाराज, सार्‍या दरबारातल्या अधिकार्‍यांना व सेवक, दासदासींना घरी जाण्याची परवानगी द्यावी. तुम्हीही जेवून घ्या मी पण जेवण करून आलो की मी तुम्हाला तुमचा मोबाईल मिळवून देईन."

बादशाहासकट दरबारातील उपस्थितांना हायसे वाटले. मोबाईल संकट तात्पुरते तरी टळले होते. उद्याचे उद्या बघता येईल असा विचार करून दरबार बरखास्त करण्यात आला. अकबर बादशाहा मुदपाकखान्यात अन बिरबल जेवायला त्याच्या घरी गेला.

पाच वाजेच्या सुमारास बिरबल पुन्हा दरबारात हजर झाला. मोबाईलचा शोध नक्की कसा घेतला जातो याची उत्सूकता लागून इतर दरबारी लांब अंतरावर थांबले. येतांना बिरबलाने मुख्य इलेट्रीशियनला बरोबर आणले होते. येथे मोबाईल शोधाची मारामार असतांना इलेट्रीशियनचे काय काम? का तो हवेत मोबाईल चार्ज करेल? असे विचार बादशाहाच्या मनात आले पण काय घडते हे पाहाण्याचे त्याने ठरवले.

उन कलल्यानंतर सूर्य बुडण्याच्या सुमारास बिरबलाने राणीमहालाच्या काही विश्वासू दासींना व इलेट्रीशियनला घेवून राणीमहालाकडे कुच केले. बरोबर बादशाहाही होताच. राणीमहालात आल्या आल्या बिरबलाने दासींना दरबाराचे दरवाजे, खिडक्या, त्यावरील पडदे बंद करण्यास फर्मावले. सारे जण श्वास रोखून बिरबल नक्की काय करतोय ते पाहत होते.

आता बिरबलाने मुख्य इलेट्रीशियनला राणीमहालाचा मेन स्विच बंद करण्यास सांगितले. मेन स्विच बंद केल्यानंतर राणीमहालात अंधार पसरला. अकबराने ताबडतोप राणीचा हात घट्ट धरला. बिरबल बाजूलाच उभा होता. झालेल्या अंधारात काहीच दिसत नव्हते. तेवढ्यात बिरबलाने त्याच्या खिशातून त्याचा मोबाईल काढला अन अकबराच्या हरवलेल्या मोबाईलचा नंबर डायल केला. जशी पहिली रींग गेली तसा राणीच्या मंचकाकडून उजेड येवू लागला. राणीच्या मंचकाच्या उशीकडची बाजू प्रकाशाने भरून गेली. मोबाईलमधून पुर्ण रींग संपण्याच्याआत बिरबलाने मंचकाच्या दिशेने झपझप पाऊल टाकून उशीजवळचा अकबर बादशाहाचा मोबाईल हस्तगत केला.

आता बिरबलाने मोठ्याने आवाज देवून मुख्य इलेट्रीशियनला मेन स्विच चालू करण्यास सांगितले. मेन स्विच चालू करताच राणीमहाल दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाला. बादशाहाला खेटून उभी असलेली राणी संकोचाने बाजूला झाली. बिरबलाने हसत हसत अकबराचा सापडलेला मोबाईल अकबराच्या हवाली केला.

अकबराने मोबाईल घाईघाईने बिरबलाकडून घेतला व पहिल्यांदा सायलेंट मोड ऑफ केला. मोबाईल राणीच्या किंवा इतर कुणाच्याही हातात न गेल्याचे पाहून त्याचा जीव भांड्यात पडला होता.

आपला हरवलेला मोबाईल अशा प्रकारे चतूराईने शोधून दिल्याबद्दल खुश होवून अकबराने पुर्ण वर्षाचा टॉक टाईम बिरबलाच्या मोबाईलसाठी जाहीर केला.

Friday, December 27, 2013

का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला?

का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला?

का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला? ||धृ||

गेलो तुळशी मंजीरा घ्याया
तेथे न तू गावला राया ||१||

गेलो राऊळी शोधाया
शोध व्यर्थ गेला वाया ||२||

चंद्रभागेकाठी तू न सापडेना
तुझ्याविण मन शांत होईना ||३||

शोध घेतला शोध घेतला
अंती नाही तू भेटला ||४||

पाषाण म्हणे का शोधसी इथेतिथे
चित्ती तुझ्याच विठ्ठल वसे ||५||

Sunday, November 10, 2013

सचिनची निवृत्ती आणि क्रिडा रसिकांच्या प्रतिक्रिया

दै. बातमीपत्र (बातमीपत्रच म्हणजे बातमीपत्र)

सचिनची निवृत्ती आणि क्रिडा रसिकांच्या प्रतिक्रिया

आमच्या वर्तमानपत्राकडे आलेल्या असंख्य प्रतिक्रियांपैकी काही निवडक प्रतिक्रिया खाली देत आहोत.

गोपाळ सुंदर, अमरावती: सचिन म्हणजे क्रिकेटचा देव आहे. देव कधी रिटायर होतो का? लागू म्हणतात देवाला रिटायर करा.

पंकज मोरे, कारसुळ बु.: सचिनची निवृत्तीची बातमी ऐकून डोळ्यात पाणी आले. वडील म्हटले शेतावर जा अन कांद्याला पाणी दे. मी गेलो नाही, घरीच माळ्यावर रडत बसलो.

अवनी बापट, पुणे: सचिनसरांचा खेळ मी लहाणपणापासून पाहते आहे. त्याचे रेकॉर्डचे मी बुक केले आहे. आता मी एमएस्सी (मॅथ्स) करते आहे. लग्नाला अजुन वेळ असल्याने पुढेमागे पीएचडी केली तर याच आकडेवारीचा स्टॅटेस्टीकल डेटा वापरणार आहे.

समीर तांबोळी, असोली ता.वेंगुर्ला,सिंधुदूर्ग: सचिन तेंडूलकर को मै बचपनसे खेलते देख रहा हूं. मच्छीमार्केटपे मैने उनके रिटायरमेंटका बॅनर लगाया है. त्येंला रिटायरमेंटच्या बधायी देतो.

राम गायकवाड, कुरणखेडः मी तर फार उदास झालो बातमी ऐकून. आता भारतीय क्रिकेटसंघाचे कसे होणार? सरकारने ग्रामीण भागातही क्रिकेटचे टॅलेंट शोधले पाहीजे. शाळेत अनुदान दिले पाहीजे.

कामेश शहा, बोरीवली: सचिन तेंडूलकरजी को अभीभी मेच खेलना चाहीये था. उनमे बहोत टॅलेंट है. उनकेउपर मैने चार बार पैसा कमाया, और सात बार गवाया है. उनको रिकवरी करनेके लिए अभी खेलना चाहीये.

समाधान डेंगळे, शिरसोली, धुळे: आम्ही सचिन तेंडूलकरची एकपण मॅच बघणे सोडायचो नाही. आमच्याकडे लाईट जरी गेली तरी शेतातले डिझेल जनरेटर गावात आणून मॅच बघीतली जाते.

प्रिया जोशी, पाषाण, पुणे: मी अन आमचा सिंबॉयसीसचा गृप सगळी जणं क्रिकेटमॅच असली की वैशाली, रुपाली, मॉडर्न किंवा इतर ठिकाणी पडीक असतो. उत्कर्ष तर कधीकधी मला गाडीतून फिरवतोही त्या त्या वेळी. खुप खुप मजा करतो तो त्या वेळी.

દર્પના પટેલ, અમદાવાદ: સચિન સર ખૂબ જ શ્રેષ્ઠ બેટ્સમેન છે. હું તેને આગળ સફળ કારકિર્દી માંગો.

पारूल मेहेता, वारछा, सुरतः सचिनजीके रिटायरमेंट के फंक्शनको सेलीब्रेट करनेके वास्ते हमारे क्लबने एक पार्टी रखी है. उसमे शामील होनेके लिए मैने एक डिझायनर साडी ऑर्डर की है.

हार्दीक तोमर, पलासीया, इंदोरः मै इंदौर क्रिकेट क्लब का सदस्य हूं. हमे सचिनजीके फायनल मैचकी १० तिकटें क्लबकी तरफसे मिली है. हम १७ तारीख को मुंबई मैच देखने यहांसे निकलेंगे. ताज हॉटेल मे रहेनेका बंदोबस्त किया है. देखते है क्या होता है.

सतविंदर भाटीया, (अक्री)राजपुरा, जिला पटीयाला: ओय सचिनसर तो ग्रेट है जी. उनको हार्दीक बधायीयां जी. वो तो बडे शेरकी तरह बैटींग करते थे जी. पाकिस्तानवालोंकी खटीया खडी करते थे जी.

माधव गावडे, वाशी नाका, चेंबूरः सचिनच्या या शेवटच्या मॅचनंतर क्रिकेट बघणे सोडून देईन अशी शपथ आम्ही कॉलनीतल्या अंडरार्म क्रिकेट क्लबच्या मेंबर्सनी घेतली आहे. फार वाईट वाटते आहे.

राज आगलावे, न. ता. वाडी, पुणे: आमच्या राष्टवादी कार्यकर्त्यांनी संगमवाडी पुलावर मोट्टा बॅनर लावलेला आहे शुभेच्छांसाठी. तुम्ही जरूर बघा. शेवटची मॅचचे थेट प्रक्षेपणपण आम्ही आमच्या कॉलनीत पडद्यावर दाखवणार आहोत. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कार्यकर्त्यांची सगळी व्यवस्था केलेली आहे.

विनोद गालफुगे, फुगेवाडी, दापोडी, पुणे: सचिन म्हणजे क्रिकेटचा बादशा. देवच म्हणाना. आता देवच जर मंदीरात नसेल आपलं क्रिकेटमध्ये नसेल तर मंदिरात काय बघणार, नुसती घंटा?

प्रतिक बंदसोडे, चदशां, पाचपाखाडी, ठाणे: क्रिकेट हे एक शरीर आहे. सचिन म्हणजे त्यातले हॄदय आहे. हॄदय आता बंद पडणार. भारतातले क्रिकेट मरणार.

असल्या बर्‍याच प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधीकडे आलेल्या आहेत. यथावकाश आम्ही त्या प्रकाशित करूच. आपल्याही काही प्रतिक्रिया असतील तर त्या आपण येथे जरूर जरूर लिहा.






.
(सदर लेखन केवळ विनोदी अर्थाने घ्यावे. सचिनच्या खेळाचे कौतूक आहेच.).

Sunday, September 22, 2013

असले कसले जेवण केले

असले कसले जेवण केले

जेवण केले अन हात धुतले
धुतलेले हात टॉवेलला पुसले

घरी येतांना खुप भुक लागली
लगेच आयत्या ताटावरती बसले

आमटीत होते पाणीच पाणी
जळक्या पोळ्यांचेही आकार कसले!

ईईई आळणी भेंडी करपा भात
तसेच खावून उपाशी मी उठले

काय नशिबी आले माझ्या
जेवण हे बेचव असले

कित्ती हौसेने आयटीतला नवरा केला
तेथेच आयटीतली बाई मी फसले

सांगितले कितीदातरी त्याला
नको बनवूस जेवण असले कसले

पुढल्या जन्मी एखाद्या शेफशीच
करायचे लग्न मनी ठसले

एकदाचे जेवण केले अन हात धुतले
धुतलेले हात टॉवेलला पुसले

- डू द लुंगीडान्स, पाभे
------------------------
दिर्घोत्तरी प्रश्न:
१) कवितेतली नायिका आधुनिक काळातली असून तिचे विचारही आधुनिक आहेत हे कोठे कोठे जाणवते?
२) कवितेतील नायिकेचा नवरा कसा असावा असे आपणाला वाटते? त्याच्या स्वभाववैशिष्ठ्याची, गुणांचे वर्णन करा. (शिक्षकांसाठी सुचना: हा प्रश्न कविता शिकवून झाल्यानंतर विद्यार्र्थ्यांशी चर्चेला घ्यावा.)
३) आयटीत कामाला असणार्‍या व लग्न झालेल्या पुरूषांसाठी आपल्या काय सुचना आहेत? (हा प्रश्न मुलींसाठी आहे.)
४) आयटीत कामाला असणार्‍या व लग्न झालेल्या स्त्रीयांसाठी आपल्या काय सुचना आहेत? (हा प्रश्न मुलांसाठी आहे.)
---------------------------
एका वाक्यात उत्तरे द्या:
१) आयटीत कोण कोण कामाला आहेत?
२) भेंडीची भाजी कशी बनवावी? (एका वाक्यात उत्तर अपेक्षीत)
३) आयटीशिवाय नोकर्‍या आहेत?
---------------------------
जाहिरात:
आमच्याकडे घरगुती चविचे जेवणाचे डबे मिळतील. मंथली मेंबर्सनी चौकशी करावी.
घरगुती चव असलेले अन्नपदार्थ बनवण्याचे क्लासेस घेतो.
- अन्नपुर्णा मेस, आयटी पार्क (फेज २) जवळ, हिंजेवडी
---------------------------
सरकारी जाहिरात:
अन्नका हर दाना महत्वपुर्ण है|

शोध माझ्यातला

शोध माझ्यातला


मला शोधायचं आहे माणूसपण माझ्यातले
समजण्या मला काय गवसले
अन काय हरवले माझ्यातले
मला शोधायचं आहे माणूसपण माझ्यातले

शुद्ध हवा घेतली का कधी?
निर्मळ पाणी चाखले का कधी?
खळाळता निर्झर कधी का पाहीला?
घाम त्वचेतून कधी का वाहीला?

लहान मुलांवर वा कोणत्या प्राण्यावर?
निर्व्याज प्रेम कधी केले का कुणावर?
मदत का कधी कुठे केली?
न ठेवता आशा परतीची?

घनदाट जंगलातून चाललो कधी अनवाणी?
धावता पडता रडता आले का डोळ्यातून पाणी?
पाहून दु:ख गरीबाचे दाटला का कंठ कधी?
भुकेने कधी जीव तळमळला असे झाले कधी?

एकांती बसता कोणताच विचार नाही मनी
लागली समाधी त्यावेळी जिवंत जागेपणी?
रूप रंग गंध हुंगले कधी श्वासात
असे झाले कधी हरवून गेलो त्यात?

दिला का कधी ठोसा एखाद्या उन्मत्त ठगाला?
मार जरी खाल्ला तरी एकतरी फटका लगावला?
चिड आली का सार्‍या दुनियेची, इतरांच्या वागण्याची?
खरेच का, सबूरीने वागण्याची खोटी रीत जगण्याची?

ज्यांची उत्तरे माहीत नाही पडले प्रश्न सारे
उत्तरांसाठी कसे जावे प्रश्नांना सामोरे
का माहीत आहेत उत्तरे म्हणून प्रश्नच पडू नाही दिले?
मला शोधायचं आहे माणूसपण माझ्यातले

- पाभे

Saturday, August 17, 2013

आहे!?

आहे!?

आहे? आहे? आहे? आहे? साखर आहे?
आहे! आहे! आहे! आहे! साखर आहे!

आहे? आहे? आहे? आहे? गुळ आहे?
आहे! आहे! आहे! आहे! गुळ आहे!

आहे? आहे? आहे? आहे? तेल आहे?
आहे! आहे! आहे! आहे! तेल आहे!

आहे? आहे? आहे? आहे? खोबरे आहे?
आहे! आहे! आहे! आहे! खोबरे आहे!

(नारळ, साबूदाणा, शेंगदाणे, मोहरी, हळद, मीठ..... फिनाईल, घासणी, झाडू इ. आहे? आहे? आहे?)
(नारळ, साबूदाणा, शेंगदाणे, मोहरी, हळद, मीठ..... फिनाईल, घासणी, झाडू इ. आहे! आहे! आहे!)

किती मोजू सांगा? किती घ्यायचे आहे?
साखर ५ किलो, गुळ अर्धा किलो आहे

तेल ३ किलो आहे, तुप पाऊण किलो आहे, मिरची अर्धा किलो आहे
नारळ, साबूदाण, शेंगदाणे, मीठ, मोहरी, हळद मागच्याप्रमाणे आहे

सामान मोजले, चला लवकर ८४३ रुपये काढा, गिर्‍हाईकांची घाई आहे
काय शेठ! इतके पैसे कसे झाले? हा महागाईचा आलेख चढता आहे!

मी काय म्हणतो लिहून ठेवा! आत्ता पैसे नाहीत उधारी आहे!
रामू सगळा माल आत ठेव! माफ करा, उधारी बंद आहे!

- पाभे 

Tuesday, August 13, 2013

शेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी यांची मुलाखत

शेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी यांची मुलाखत


नमस्कार श्रोतेहो.

आज आपल्या स्टूडीओमध्ये ग्रामीण भागातले शेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी आलेले आहेत. त्यांच्या कादंबर्‍या, लेख, कथा, निबंध प्रसिद्ध आहेतच तसेच कवितांचे पीक ते जोमाने दर हंगामात घेतात. पंचक्रोशीतील इतर शेतकवी त्यांच्या उत्पादनातून नेहमीच प्रेरणा घेत आलेले आहेत. त्यांच्या शेतसाहित्याविषयी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत.

मी: नमस्कार भरत कुलकर्णी साहेब.

भरत कुलकर्णी : नमस्कार.

मी: यंदाच्या हंगामाचा "मराठी साहित्य अधिवेशन सेवा संघ परिषदेतर्फे" जाहीर झालेला 'उत्कृष्ट शेतकवी' हा पुरस्कार आपणाला मिळाल्याबद्दल आपले अभिनंदन. मला सांगा हा पुरस्कार मिळाल्यानंतर आपणाला काय वाटले?

भरत कुलकर्णी : हा पुरस्कार देण्यासाठी माझी निवड केल्याबद्दल मी "मसाअसेसपचा" आभारी आहे. मला हे अपेक्षीत नव्हते. ग्रामीण भागातील  शेतकवीला इतका मानाचा पुरस्कार पहिल्यांदाच मिळतो आहे. मला खुप आनंद झाला. या पुरस्काराच्या निमीत्ताने ग्रामीण भागातील शेतकवींमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे. शेतकाव्याचे भरघोस उत्पादन यापुढील काळात अपेक्षीत असल्याने शहरकवींनी साहित्याची काळजी करणे सोडून द्यावे असे मला या निमीत्ताने वाटते.

मी: आपण गेल्या वर्षी पाच कवीतासंग्रह प्रकाशीत केले. तीन कथासंग्रह लिहीले. दोन ललीतगद्य निबंध आपले बाजारात आले. ह्या सार्‍या उत्पादनाबद्दल थोडं आमच्या श्रोत्यांना सांगाना.

भकु: अवश्य. सुरूवातीला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करण्याचा अनुभव पाठीशी आहे. त्याचा फार उपयोग झाला. प्राध्यापकीच्या काळात भरपुर वेळ मिळायचा. महाविद्यालयाच्या पुस्तकसंग्रहाचा मला अभिमान आहे. मला हवी ती पुस्तके मिळाली. यामुळे मी साहित्याचा भरपुर अभ्यास केला. जाणीवा प्रगल्भ केल्या. याच काळात पीएचडीचा अभ्यासही मी करत होतो. "आदिवासींचे  मुक्तलोकसाहित्य व त्यातील ग्रामीणता आधुनिकतेकडे कशी झुकते आहे व त्याचे पुढील शतकात होणारे परिणाम" हा माझ्या प्रबंधाचा विषय होता. त्याच वेळी विद्यापिठाच्या वतीने 'महाराष्ट्रातील आदिवासी, गिरीजन यांची साहित्याबद्दल आस्था' यांचा अभ्यास करण्यासाठीच्या समितीत माझा समावेश केला गेला. त्या निमीत्ताने त्या समितीने संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. चंद्रपुर, भंडारदरा, तापीचे खोरे, धुळे, जळगाव, नंदूरबार, सातपुडा पर्वत, अहवा-डांग (गुजरात) झालच तर नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगाणा, हरसूल, कळवण, बागलाण, अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरेकडचा पट्टा, दक्षीण कोकणातील संगमेश्वर, कणकवली, ठाणे जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा आदी संपुर्ण ठिकाणच्या आदिवासी समाजाचा आम्ही अभ्यास केला. तेथील प्रश्न समजावून घेतले. त्यांच्या जनरीती, उदरनिर्वाह यांचा अभ्यास झाला. तो अनुभव खुपच समृद्ध करून गेला. त्या निमीत्ताने जे जे बघण्यात आले ते ते माझ्या साहित्यपिकात उतरले.

मी: फारच छान. एकुणच तुम्ही केलेल्या कामाची पावती या पुरस्काराने आपणाला मिळाली हे उत्तमच झाले. आता मागच्या वर्षीचा आधीच्या साहित्यउत्पादनाबद्दल अधिक सांगा.

भकु: मागल्या वर्षी जे काही उत्पादन मी घेतले त्याच्या आधीही माझे शेतकवी या प्रकारात उत्पादन मी घेतच होतो. दर पंधरवडी मी दै. लोकजागृतीमंचात ते उत्पादन पाठवायचो. ललीत निबंध हा नगदी माल असतो. तुम्हाला सांगतो, भारतात घडणार्‍या घटना त्यास पुरक ठरतात. त्याच वेळी मी प्राध्यापकपदाचा राजीनामा दिला व पुर्ण वेळ शेतहित्यीक झालो. त्यावेळी मजेचे प्रकाशन या संस्थेने मला शेतसाहित्य या प्रकाराविषयी त्यांच्या दिवाळी अंकात काहीतरी लिहीण्याचा आग्रह केला. माझा लेखसंग्रह तयार होताच. त्यात थोडेफार बदल करून त्यांना तो पाठवला. त्या लेखामुळे माझा उत्साह दुणावला व अधिकाधीक पिक घेण्यास सुरूवात केली.

मी: तुम्ही कोणकोणती साहित्यपिके घेतात?

भकु: शेतकाव्याचा मी पुरस्कर्ता आहे. काव्याची निरनिराळी उत्पादने जसे: समुहगीत, देशभक्तीपरगीत, चित्रपटगीते, विरहकाव्ये, गझला, सुनीते यांचेही मी आंतरपीक घेत असतो. मुक्तछंदकाव्य नेहमीच तयार असते. अर्थात बाकीचेही शेतसाहित्यीक त्याचे उत्पादन घेत असल्याने बाजारात त्याला मागणी कमी असते. भजन, अभंगही हंगामानुसार होते. मागच्या आषाढी एकादशीच्या काळात 'भजनएकसष्ठी ' हा भजनकाव्यसंग्रह देखील बाजारात आला. मजेचे प्रकाशनाचे भटकळांनी त्यासाठी मला अटकळ टाकली होती. कथा, कादंबरी ही पिके तयार होण्यास वेळ लागतो. त्याकडेही लक्ष द्यावे लागते.

'हे कसे करावे?, ते कसे करावे' असे मार्गदर्शन करणारे लेख, लावण्या, चित्रपटगीते ही तशी नगदी पिके आहेत. पण दरदिवशी दोन या प्रमाणात शेतकाव्य किंवा शेतसाहित्य निर्माण करतांना नगदी पिकांकडे थोडे दुर्लक्ष होते हे मान्य करावे लागेल.

मी: शेतकाव्य किंवा शेतसाहित्य ही पिके घेतांनाची प्रक्रिया काय असते?

भकु: शेतकाव्य किंवा शेतसाहित्य तयार करतांना मनाची मशागत चांगली करावी. उन्हाळ्यात प्रखर उन असतांना जातीपातीची ढेकळे संघर्षाचा कुळव वापरून फोडून घ्यावीत. दलितपद्धतीने ढेकळे जास्त चांगली फोडली जातात.
पहिल्या पावसाने शेतपिकासाठी नागरी मनाची जमीन तयार झालेली असतांना सुरूवातीचे दोन आठवड्यात तयार होणारे पावसाळी काव्य हे उत्पादन घ्यावे. आजकाल शहरात या पिकाला फार मागणी आहे. शहरातले काही हौशी लोक आपल्या मित्रमैत्रीणी किंवा कुटूंबासहीत या पिकाचा आस्वाद घेतात. काही जण तर सरळ शेतावरच्या घरात मुक्काम करून त्याचा रस चाखतात. पुणे, मुंबई त्याजवळील मावळ, लोणावळा येथे हे उत्पन्न फार खपते. याप्रकारचे उत्पादन इंटरनेटवरही बरेच केले जाते. इंटरनेटवरील पिकाला स्थळाचे बंधन नसल्याने संकेतस्थळावळ चांगल्या पॅकींगमध्ये ते ठेवले जाते. तेथील ग्राहकही त्याचा आस्वाद घेतात.

हिवाळ्यात पुन्हा मनाची जमीन आनंदाच्या दोन पाळ्या देवून तयार ठेवावी. गादीवाफे करून एखाद्या कादंबरीचे बीज पेरावे. सामाजिक, रहस्यमय किंवा शृंगारीक कंपनीचे बियाणे आजकाल सरकारपुरस्कृत बाजारात मुबलक मिळते. अर्थात त्यात भेसळीचे प्रमाण कितपत आहे ते पाहूनच त्या त्या जातीचे बियाणे घ्यावे. बाजारपेठेत या प्रकारच्या मालाला फार मागणी आहे पण पुरवठा त्यामानाने कमी असल्याने उत्पादनास भाव चांगला मिळतो.

विदेशी त्यातल्या त्यात इंग्रजी (अमेरीका, ब्रिटन) कंपनीच्या सुधारीत वाणांचे संकरीत बियाणे किंवा वाण वापरल्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही आपल्या पिकाला मागणी असते. देशभक्ती या मालाला सध्या मागणी नाही. ते करू नये.
थोडे थोडे पिके घेण्याचे ठिबकसिंचनसाहित्य करण्याचा प्रयत्न करावा. शेतावर मत्सरकिडीचा प्रदुर्भाव झाला असल्यास जाहिरातीच्या पाण्याचा मारा करावा. द्वेषकिडीचा बंदोबस्त करण्यासाठी उलटद्वेष या बुरशीनाशकात साहित्याची बियाणे प्रतिरचना दुप्पट या प्रमाणात बुडवावे मगच पेरणीसाठी वापरावे. अशा प्रकारे साहित्यपिक उत्पादन घ्यावे.

आमच्या कडील काही शेतकाव्यकरी सामुहीक अनुदानीत शेतसाहित्य करून कंटेनर भरून आपला माल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठवत आहेत.

मी: बरं हे झाले साहित्यनिर्मीतीबाबतीत. आता तयार मलाला बाजारपेठेपर्यंत जाण्यासाठी काय काळजी घ्यावी.

भकु: शेतसाहित्यकर्‍यांनी बाजाराचा नियम पाळला तर त्यांच्या मालाला बाजारात उठाव असेल. अन्यथा व्यापार्‍यांच्या तोंडचा भाव त्यांना घ्यावा लागेल. मागणी कमी असतांनाच साहित्यमाल बाजारात पाठवावा. पुणे-मुंबई येथील काही व्यापारी चांगला भाव देत आहेत. सरकारी हमीभाव शेतसाहित्यासाठी नेहमीच मारक असतो. एखाद दुसर्‍या किंवा प्रतिथयश शेतसाहित्यकर्‍याचाच माल विद्यापिठीय अभ्यासक्रमात जातो. त्यासाठी काय काय करावे लागते तो मुद्दा येथे उपस्थित करत नाही. सरकार तरी कोठे कोठे पाहणार?

शहरातली मध्यमवर्गीयच शेतसाहित्याचे मोठे मागणीदार आहेत. ग्रंथपिक-प्रदर्शनचळवळ हा नविन पायंडा उभा राहत असल्याने तेथे माल विक्रीस ठेवावा. शेतसाहित्यमाल हा आकर्षक पॅकींगमध्ये विकल्यास चांगला भाव मिळतो.

मी: शेतसाहित्य व्यापारात काय काय दुर्गूण आहेत?

भकु: काही शेतसाहित्यकर्ते कमी दर्जाचा माल चांगल्या कंपन्यांना विकतात. कंपन्या जाहिरातबाजी करून तो कनिष्ठ दर्जाचा माल बाजारपेठेत खपवतात. हे शेतसाहित्य खरेदी करणार्‍या ग्राहकांच्या हक्काविरूद्ध आहे. ग्राहकांनीच काळजी करून माल विकत घेतला पाहिजे. अलिकडे 'परकिय शेतसाहित्याचे अनुवाद' ह्या मालाचेही उत्पादन खुप होते आहे. अर्थात जग छोटे होते आहे. हे चांगले की वाईट हे काळच ठरवेल.

मी: "मुंबईपुण्यातच उत्तम शेतसाहित्य निर्माण होते" असा एक प्रवाद आहे. त्याबद्दल आपले काय मत आहे?

भकु: "मुंबईपुण्यातच उत्तम शेतसाहित्य निर्माण होते"हा निव्वळ गैरसमज आहे. मला सांगा मुंबई-पुण्यातले शेकडा किती टक्के शेतसाहित्यीक पणजोबांच्या काळापासून मुळचे तेथले आहेत? मला वाटते तो आकडा एक टक्याच्याही खाली असेल. जे जे मोठे शेतसाहित्यीक आज मुंबईपुण्याचे आहेत असे भासवतात ते मुळचे ग्रामीण भागातलेच होते. केवळ शेतसाहित्याचा अभ्यास करण्यासाठी किंवा इतरत्र अर्थार्जन करण्यासाठी ते तेथे गेले व तेथून ते पिके घेतात. मुळचे पाणी उरलेल्या महाराष्ट्राचे आहे.
पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, गोवा-कोकण, सीमावर्ती महाराष्ट्र येथील शेकडो शेतसाहित्य उत्पादक देखील चांगला माल तयार करत आहेत. त्याच मालावर नागरी वस्त्या पोसल्या जात आहेत. एकुणच ग्रामीण भागातच समाधानकारक स्थिती आहे.

मी: भरत कुलकर्णी साहेब, आपल्याबरोबर गप्पा मारण्याचा आनंद काही वेगळाच असतो पण आता वेळेची कमतरता असल्याने आपले विचार अजून ऐकता येणे शक्य नसल्याने या वेळेपुरते आम्ही समाधान मानतो. आपला मौलीक वेळ खर्च करून आपण दिलेल्या मुलाखतीबद्दल आपले आकाशवाणी तसेच आमच्या श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद.

भरत कुलकर्णी: धन्यवाद.
(इतर मराठी संकेतस्थळांवर सदरचे लेखन दुसर्‍या एका नावाने प्रसिद्ध केले आहे.)

Sunday, July 14, 2013

ग बाई तुन्ह नाव शे सुपडाबाई

मंडळी खालील गीत हे अहिराणी भाषेत (खानदेशी नव्हे) लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. ही भाषा मला ऐकून ओळखीची आहे परंतु त्यावर माझे प्रभुत्व नाही. यास्तव काही शब्द कमीजास्त असतील तर ते सांगावेत. (अहिराणी भाषेबद्दल येथे माहीती आहे.)

ग बाई तुन्ह नाव शे सुपडाबाई
तू मन्हाकडे का पाहत नाही?
ग बाई तुन्ह नाव शे सुपडाबाई ||

तुन्हा गळा मा सोनानी माळ
तू पायमा बांधस चाळ
तू लाजत लाजत जाई
ग बाई तुन्ह नाव सुपडाबाई ||

तुन्हा घरावर मी मारस चकरा
तुन्हा बाप व्हई का मना सासरा?
मन्ह प्रितेम का तुले दिसत न्हाई
ग बाई तुन्ह नाव सुपडाबाई ||

तुले पाहीनसन व्हयनू मी येडा
तुन्हासाठी मी बाजार धंदा सोडा
जीव जळस मन्हा थोडा थोडा
एखादडाव मनाकडे जरा लय पाही
तुन्ह नाव शे सुपडाबाई ||

तु सकाळ सकाळ बकर्‍यान्सामांगे जास
मी तठे तुन्हा मांगे मांगे येस
तूले तरीबी मना पत्ता कसा लागत नाही
तुन्ह नाव ग सुपडाबाई ||

तुन्हा भावाले मी मित्र करी लेस
तो पैलवान गडी शे मी घाबरस
आप्ला कार्यमा त्यानी ढनढन परवडणार नाही
तुन्ह नाव ग सुपडाबाई ||

आते पाऊसपानी बरा व्हयेल शे
डांळींबनी बाग मी आता लावेल शे
कांदास्ना पैसाबी मना खिसामा शे
यंदा मोसममधार लगीनले मन्ही काही हरकत नाही
तुन्ह नाव ग सुपडाबाई ||

- पाभे

Saturday, June 1, 2013

उंदीर मांजराचा खाऊ

उंदीर मांजराचा खाऊ

एकदा थंडी वाजते म्हणून
एका माऊने केली गाऊ
तेथला उंदीर मनात म्हणाला
आता गुपचूप खाऊ खाऊ

खाऊ होता माऊसमोर
धीर केला उंदराने
हळूच गेला चालत चालत
मांजरीकडे पाहीले त्याने

खाऊचा वास त्याने घेतला
सुटले पाणी तोंडाला
खाऊ न द्यायचा कोणाला
विचार त्याच्या मनातला

डोळे मिटून सताड पडली
अंग चोरून मनी
मिटक्या मारीत खायचा खाऊ
उंदराने स्वप्न पाहीले मनी

होती निसरडी घराची फरशी
तीवरून त्याचा पाय सरकला
आवाजाने माऊ जागी झाली
आयता खाऊ तिला मिळाला

- पाभे

Saturday, May 18, 2013

कहाणी राजपुत्राची


कहाणी राजपुत्राची

आटपाट नगर होत. नगराचा राजा होता. राजाला लेक होता. खावे प्यावे खेळावे हा त्याचा नित्यक्रम होता. एके दिवशी त्याजकडून आगळीक घडली. सवंगड्यांबरोबर खेळतांना त्याचा पाय नागावर पडला. नागानं त्याला शाप देवून क्षणात जंगलात पाठवलं.

घनदाट जंगलात राजपुत्र रानोमाळी भटकू लागला. कंदमुळं खावून जगू लागला. कोणी माणूस दिसतो का याची चाहूल घेवू लागला. होता होता कित्येक वर्षे गेले.

असाच भटकत असतांना त्याला एका झर्‍याच्या काठी एक साधू दिसला. इतक्या दिवसांत कुणीतरी भेटले याचा त्याला आनंद झाला. त्याने नमस्कार करून जंगलाच्या बाहेर जाण्याचा मार्ग कोणता या अर्थाचा प्रश्न साधूस विचारला. साधूने राजकुमाराबरोबर झालेला प्रसंग मनातून ओळखला. त्याने उपाय सांगितला. "याच झर्‍याचा उगमाकडे काही अंतरावर गेल्यास दरी लागेल. स्वत: झर्‍यात स्नान करून दरीतून पडणार्‍या झर्‍याचे पाणी प्राशन कर. म्हणजे तुझ्या चिंता संपतील". राजपुत्राने साधूस नमस्कार केला असता साधू तथास्तू म्हणून चालता झाला.

साधूने सांगितल्याप्रमाणे राजपुत्र झर्‍याच्या उगमाकडे गेला. तेथे त्याला एक नवयौवना दिसली. राजकुमाराने स्नान करण्यास झर्‍यात उडी मारली असता तो एका डोहात बुडू लागला. ते पाहून त्या युवतीने त्यास पकडले व त्यास डोहाबाहेर काढले. दोघेही पाण्यात असतांना राजपुत्राने त्याच्यावरील कोसळलेल्या प्रसंगाचे वर्णन केले. युवतीस झर्‍याचा प्रवाह माहित असल्याने तिने त्या राजपुत्रास कोसळणार्‍या झर्‍यापर्यंत पोहोचण्याचे मार्गदर्शन केले. राजपुत्राने जंगलातून मुक्त होण्यासाठी अधीरतेने कोसळणार्‍या झर्‍याचे पाणी प्राशन केले. ते पाणी प्राशन करताच राजकुमार व ती युवती राजधानीतील राजवाड्यात अवतिर्ण झाले. हा चमत्कार कसा झाला हा प्रश्न राजपुत्राने युवतीस विचारला असता तिने त्यास सांगितले की, 'मी मध्यदेशाची राजकन्या आहे. एका तपश्चर्यामग्न साधूस मी लहाणपणी चिडवीले असता त्याने मला शाप देवून जंगलात पाठविले. मी त्याची क्षमा मागितली असता एक राजपुत्र तुझ्याकडे पाणी पिण्याबद्दल विचारेल व ते सत्कृत्य तू करताच शापमुक्त होशील असा उ:शाप दिला. योगायोगाने आज तसे घडले व मी शापमुक्त झाले'.

राजाला ही बातमी समजताच त्याने आपल्या परतलेल्या पुत्रास अत्यानंदाने मिठी मारली. त्याबरोबर आलेल्या राजपुत्रीच्या आईवडीलांना तिची हकीकत कळवीली. पुढे सर्वसंमतीने राजपुत्र व राजकन्येचा विवाह थाटात संपन्न झाला.

ज्याप्रमाणे साधूचा आशीर्वाद राजपुत्र आणि राजकन्येस मिळाला त्याप्रमाणे तुम्हांआम्हास मिळो. ही साठाउत्तराची कहाणी पाचाउत्तरी संपुर्ण.

- पाभे

Wednesday, April 3, 2013

दुष्काळावर मात

दुष्काळावर मात

असेच एक गाव होते. त्या गावाजवळून जाणारा एक नदी होती. नदीकाठी मोठ्ठी आंबराई होती. आंब्यांच्या मोसमात त्या आंब्यांच्या झाडांना रसदार आंबे येत. त्या आंबेराईमुळेच त्या गावाचे नाव आंबेवन पडले होते. ती आंब्याची बाग कुणा एकाची नव्हती. ती त्या गावच्या मालकीची होती. संपुर्ण गाव त्या आंबेराईचे मालक होते. गावची पंचायत त्या झाडांची निगा राखे. पंचायतीने गावातल्या प्रत्येक घरातल्या स्त्री किंवा पुरूषाला कामे नेमून दिली होती. कुणी लहान लहान रोपट्यांची निगा राखे, कुणी झाडांना पाणी देण्याचे काम बघे, कुणी झाडांवरच्या मोहोराची, त्यावर पडणार्‍या रोगाची काळजी घेई तर कुणी येणारा फळाचा बहर काळजीपुर्वक हाताळी, त्यांची तोड करणे, बाजारात विक्री करणे आदी कामे कुणी करी. तालूक्याच्या गावी बाजारात त्या फळबहाराची विक्री करून दरवर्षी त्या गावाला भरपूर उत्पन्न मिळे. येणार्‍या रोख रकमेचा विनीयोग गावकरी आपसात समजूतीने करून घेत. हे सारे त्या गावच्या कित्येक पिढ्यांपासून चालत आलेले होते. गावकरीदेखील आपल्या पुर्वजांचा आदर राखून या आंबराईची श्रद्धापुर्वक देखभाल करत. गावातील प्रत्येक घर या आंबराईशी भावनेने बांधले गेले असल्याने गावकर्‍यांना ती आमराई स्वःताचीच वाटे. सारे गावकरी भांडणतंटा न करता समजूतीने आपाअपल्या वाट्याची कामे करीत. किरकोळ कुरबूर असेलच तर ती चारचौघे लक्ष देवून मिटवून टाकत.

अशा या आमराईची, तेथल्या कामाची महती सर्वदूर पसरली होती. पंचक्रोशीतील लोक या कामाची माहीती घेण्यासाठी, कैर्‍या, आंबे खरेदी करण्यासाठी नेहमी येत. गावकर्‍यांनी अशा भेटीसाठी येणार्‍या लोकांसाठी एक छानशी बाग त्या आमराईच्या सुरूवातीला केली होती. भेटीसाठी आलेले लोक त्या बागेत विश्रांती घेत, न्याहारी, वनभोजन करत. लहान मुले तेथे खेळ खेळत.

आंबेवन गावाच्या पुर्वेला असलेल्या वीस पंचवीस कोस दूर असणार्‍या तवली नावाच्या डोंगर रांगांमधून रांगणी नावाची नदी उगम पावत असे. आमराईपर्यंत येण्यापूर्वी त्या नदीला आणखी चारदोन ओहोळ मिळत. नदीच्या पाण्याचा फूगवटा अगदी उन्हाळा मध्यावर आला तरी आटत नसे. रांगणी नदीच्या पुण्याईने आंबेवन अन त्याच्या आसपासची जमीन ओलीताची होती. ज्या कुणाची शेती होती तो तो शेतकरी चांगली नगदी पीके घेवून सुखाने खातपीत होते. जे शेतमजूर होते ते इतरांच्या शेतावर राबत होते. गावातले सारे जण सुखात होते.

अशा सुखाने नांदणार्‍या आंबेवनाला दृष्ट लागली. दोन वर्ष सतत तवली डोंगररांगांमध्ये पाऊस पडला नाही. दुष्काळाने परिसर होरपळून निघाला. विहीरींनी आपला पान्हा आटवला. जनावरे चार्‍यापाण्याविना विकायची वेळ आली. गडीमाणसे, बायाबापड्या पिण्याच्या पाण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करू लागले. आंबराईची तर होरपळ झाली. उत्पन्नावर परिणाम झाला. शेतकर्‍यांच्या खिशातील पैसा पाण्यापाई संपला. आंबेराईतील चार शहाणेसुरते लोक एकत्र आले. पाण्याच्या प्रश्नावर त्यांनी विचार केला. जर रांगणी नदीच्या वरच्या टोकाला बांध घातला तर तीचे पाणी अडवून ते पुरवून वापरता येईल या निष्कर्षापर्यंत गावकरी आले. पण रांगणी नदीचा उगम हा तवली डोंगररांगातून होत होता तो परिसर वडगावाच्या हद्दीत येत होता. आंबेवनाच्या गावकर्‍यांनी वडगावाच्या लोकांना नदीवरील बांधाबाबत सांगितले. त्या गावाच्याही लोकांनी दुष्काळी परिस्थिती पाहून बांध घालण्याबद्दल दुजोरा दिला. दोन्ही गावाच्या गावकर्‍यांनी सरकारदरबारी आपले म्हणणे मांडले. बांध घालण्यासाठी दोन्ही गावे श्रमदान करायला तयार होती पण सरकारी पैशाविना बांधाचे मोठे काम पुढे जाणे अवघड होते. या सगळ्या प्रयत्नात दुष्काळाचे आणखी एक वर्ष उजाडले. जो काही थोडाफार पाऊस पडला त्याच्या पाण्याने थोडेदिवस तहान भागली पण पाण्याशिवाय परिसर उजाड वाळवंट होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली.

कमी पावसामूळे दुष्काळी परिस्थिती आताशा राज्यामध्ये ठिकठिकाणी निर्माण झाली होती. या दरम्यान आंबेवन आणि वडगावच्या लोकांनी सरकारी मदतीवर अवलंबून न राहता बांध घालण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. दोन्ही गावातील घरटी एक माणूस श्रमदानासाठी खपू लागला. कुणी कुदळ घेवून, कुणी फावडे घेवून, कुणी पाटी घेवून तर कुणी कुदळ आदी हत्यारे घेवून कामावर जावू लागला. बाजूच्या डोंगररातून मुरूम, दगड-माती बंधार्‍याच्या भरावासाठी वापरात येवू लागली. बंधार्‍याचा पहिला थर तयार झाला. तोपर्यंत पावसाळा येवून ठेपला. आलेल्या पावसाने डोंगररांगांतून पाणी वाहू लागले. रांगणी नदीच्या उगमापाशी तयार झालेल्या बांधामध्ये पाणी अडू लागले. त्यामूळे परिसरातील विहीरींमध्ये पाणी भरू लागले. पावसाळ्यातील पाण्यामुळे जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न तात्पूरता मिटला होता. बांधातले पाणी पुढला हिवाळा संपेपर्यंत पुरले त्यामुळे गावकर्‍यांचा हुरूप वाढला. ही बातमी राज्याच्या राजापर्यंत पोहोचली. संपूर्ण राज्यभर दुष्काळाचे सावट असतांना ह्या आनंदाच्या बातमीने महाराजांनी बांधाला स्वत: भेट दिली. दोन्ही गावच्या गावकर्‍यांचे अभिनंदन करून सरकारी मदत जागेवरच जाहीर केली.

महारा़जांनी केलेल्या मदतीमुळे सरकारी यंत्रणा कामाला लागली. बंधार्‍याची उंची वाढवली गेली. बांधाचे पाणी सोडण्यासाठी दरवाजे बसवले गेले. दोन्ही बाजूंनी दोन कालवे खोदण्यात आले. पाणीवाटपाचे वेळापत्रक तयार होवून त्याबरहूकूम पाणी कालव्यांमधून वेळोवेळी सोडवण्यात येवू लागले. जातीने महाराज या प्रयोगाकडे लक्ष देवून होते. या सार्‍या प्रयत्नांमुळे आंबेवन व वडगाव परिसरातील पाण्याची पातळी वाढली. शेतीसाठी पाटामधून पाणी मिळू लागले. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. आंबेवनाची आमराई पुन्हा बहरू लागली.

त्यानंतर आलेल्या आंब्यांच्या हंगामात आंबेवनातील गावकरी तयार आंब्यांच्या पाट्या महाराजांना भेटीसाठी घेवून गेले. महाराजांनी त्या भेटीचा आनंदाने स्विकार करत आंबेवन-वडगाव बंधार्‍याचा प्रयोग संपुर्ण राज्यभर राबवण्याचा आदेश सरकारी अधिकार्‍यांना दिला.

अ) दीर्घोत्तरी प्रश्न:
१) आंबेवनातील दुष्काळापुर्वीच्या स्थितीचे वर्णन करा.
२) दोन्ही गावांनी दुष्काळी परिस्थितीवर कशी मात केली?
३) राज्यात पडलेल्या दुष्काळावर मात करण्यासाठी महाराजांनी काय प्रयत्न केले?

ब)लघूत्तरी प्रश्न :
१) तवली डोंगरावरून कोणती नदी उगम पावत असे?
२) बांध बांधल्यानंतर गावकर्‍यांनी महाराजांना काय भेट दिली?
३) श्रमदान करण्यासाठी गावकरी काय काय घेवून कामे करू लागली?

क) उपक्रमः
१) तुमच्या परिसरात उपलब्ध असणारे पाणी कसे वाचवता येवू शकते याबाबत प्रकल्प अहवाल तयार करा.
२) जे नागरीक पाणी वाया घालवता त्याबद्दल त्यांचे पाण्याबाबत उद्बोधन करा.

सोत्रींचा दारूवरचा लेख आणि मी

सोमवारी मिसळपाववरचा सोत्रींचा दारूवरचा लेख वाचला. दारू म्हणजे काय या हे समजवून देणे काही सोपे काम नाही. ते दारू पिण्याइतकेच महत्त्वाचे आणि अवघड काम सोत्रीसारख्या माणसाने खुपच सोप्या पद्धतीने सांगितले आहे. आजकाल लिहीणे सोपे झाल्याने जो तो आपआपले अनूभव लिहीत बसतो. कुणी किल्यावर भटकंतीचे लेख लिहीतो, कुणी वेगवेगळे पदार्थ कसे करायचे ते सांगतो. हे असले अनुभव वाचल्यामुळे इतरांना किती त्रास होत असतो याची लिहीणार्‍याला काय कल्पना? लगोलग दारूवरचे सगळे लेख वाचून काढले. दारू कशी बनते, तीचे प्रकार कसे पडतात, दारू बनवण्याची शास्रीय विधी, ती पिण्यासाठी करावे लागणारे सामाजीक विधी, निरनिराळ्या देशांतल्या दारूबद्दलच्या संकल्पना आदी सारे त्या लेखांत होते.

गावठी दारू तशी काय आपल्याला नवीन नाही, तरीपण शासनाचे नियम वाचून थोडीफार करमणूक झाली. प्रतिक्रिया देणारेही दारूबाबतीत फार जाणकार दिसले. समाजात आपल्याइतकेच दारूत पट्टीचे बुडणारे आहेत हे पाहून आनंद झाला. बर्‍याचशा लोकांच्या खुपशा प्रतिक्रिया आभ्यासू होत्या. लेखक हलकट यांनी तर गावठी दारू बनवण्याची रेसेपी दिल्याने गावठी दारू घरच्या घरी बनवण्याची इच्छा होत होती. पण ती रसायने अन ते डबे, बॅरल, चुल, चाटू आदींचा सेट घरात लावायचा म्हणजे नसता डोक्याला ताप होता. अन मुख्य म्हणजे गावठी दारू तयार करणारा इसम गावठी दारू पाडतांना दारूच्या अंमलाखाली नसावा इतके या लेखातून कळले. दारू पिण्यापेक्षा दारू बनवणे अगदीच किचकट, चिकाटीचा अन बुद्धी शाबूत ठेवून करायचा प्रकार आहे हे माझे मत पक्के झाले. दारू तयार करणार्‍या लोकांबद्दल आदर वाढला. त्यातल्या त्यात गावठी दारू बनवणे हा प्रकार तर भन्नाट होता. कमीतकमी सामूग्री वापरून जास्तीत जास्त नशा देणारी दारू बनवणे हा खरोखरच भन्नाट प्रकार आहे यात शंका नाही. त्यातही जर असल्या दारूच्या भट्टीवर जर पोलीसांच्या धाडी पडल्या तर सगळी मेहनत यांच्या ओठी जाणार! कितीतरी रिस्क या धंद्यात आहे. पोलीसांचे हप्ते सांभाळून, समाजाप्रती आदर राखून, प्रॉफीट मार्जीन कमी ठेवून दारू गाळणे म्हणजे खरोखर लष्कराच्या भाकर्‍या भाजण्यासारखेच आहे. हा धंदा करणार्‍यांना शासनाने काही सवलती जाहीर कराव्यात. अर्थातच त्या सवलती इतक्याही असू नयेत की त्यामूळे असली गावठी दारू म्हणजे सरकारमान्य देशी दारू ओळखली जावू लागेल.

हे असले काही वाचले म्हणजे दारू पिण्याचे ते दिवस आठवतात. सरकारच्या कृपेने आम्ही एका बँकेत कामाला होतो. आमचा संपर्क शेतकरी वर्गाशी होता. आता आमच्या या बँकेत काम करणारी जमात म्हणजे अतिशय दुर्लक्षलेली. त्यांनी काम केले काय अन न केले काय सारखेच. शेतकरी कर्ज मिळवण्यासाठी त्यांची कागदपत्रे स्वःतच करवून आणत. काय शेतमाल गहाण वैगेरे ठेवायचा तो परस्पर गोदामात जमा करत. साहेबांच्या कृपेने आमचे काम केवळ सह्याजीरावाचेच होते. अशी सगळी अनुकूल परिस्थिती असल्याने त्यातही एकदोन सहकारी कर्मचारी आनंदमार्गाला लागलेले असल्याने त्यांच्याबरोबर आम्हालाही आनंदाची सवय जडली. आमची बदली ज्या गावी होती तेथे कुटूंब नेणे सोईस्कर नव्हते. इतर सहकार्‍यांचीही तीच स्थिती होती. त्यामूळे आम्ही सगळे सक्तीचे बॅचलर एकाच खोलीत राहत होतो. मग सकाळपासून आनंद मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू. घरापासून दुर असलो तरी आमच्या खोलीपासून आनंद मिळवण्याचे दुकान जवळ होते. अगदी बाजूची पाच-सहा घरे सोडली की आनंदप्राप्ती होत असे. नंतर नंतर दुकानदार ओळखीचा झाल्याने उधारउसनवार आनंद मिळे. पुढेपुढे तर आनंदाची इतकी सवय लागली की कर्ज मंजूर करवून घेणार्‍यांसमावेत कर्ज मंजूर झाल्याबद्दल कधी कधी स्वखर्चाने या आनंदाचे वितरण व्ह्यायला लागले. यथावकाश व्हिआरएस स्किम लागू झाल्यानंतर नोकरी सुटली. घरी आल्यानंतर आनंदाचे सेवनाचे प्रमाण कमी कमी होवून आताशा ते बंदही झाले. आनंदाचे व्यसनात रूपांतर झाले नाही ही आनंदाची बाब आहे.
दारू पिणार्‍यांचेही प्रकार पडतात. हौसेने दारू पिणारे, कधीतरी पिणारे, अट्टल बेवडे, केवळ पिण्याचे नाटक करणारे, एकटेच पिणारे व्यसनी, दारू पिणे सहन होत नाही तरी पिणारे आदी व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाला आपण किती प्यावी हे समजले पाहीजे. हे काही एकदम फुशारकीचे काम नाही की ते केले म्हणजे तूम्ही मोठे शहाणे, सभ्य वैगेरे. होणार्‍या शारिरिक, सामाजिक परिणामांचे भान राखूनच दारू सेवन केले पाहीजे किंवा न केले पाहीजे.

माझ्या दुरच्या नातेवाईकाचे गावाकडे काळा गुळ, इतर रसायने, मोहफुले खरेदीविक्रीचे दुकान आहे. मोहाची दारू घेण्याचा मोह आताशा होत नाही पण अजूनही त्यांच्याकडे गेल्यावर दुकानात जेव्हा जेव्हा जाणे होते तेव्हा तेव्हा जूने दिवस आठवतात.

एकुणच दारूच्या नशेत जाण्यापेक्षा दारूला आपल्या नशेत आणणे महत्वाचे.
(काल्पनिक)
- पाषाणभेद

एक मुलाखत: गप्पाटप्पा शिळबाबांसोबत

एक मुलाखत: गप्पाटप्पा शिळबाबांसोबत

श्रोतेहो, आज होळीनिमीत्त आपल्या स्टुडीओमध्ये प्रसिद्ध शिळपादक श्री. शिळबाबा आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलून त्यांच्या या आगळ्यावेगळ्या छंदाबाबत माहीती करून घेवूया.

निवेदकः नमस्कार शिळबाबा. होळीनिमीत्ताने आपणाला शुभेच्छा.

शिळबाबा: नमस्कार, नमस्कार. आपणालाही होळीच्या शुभेच्छा!

निवेदकः शिळबाबा, संपूर्ण राज्यात आपल्या शिळपादनाची किर्ती पसरलेली आहे. गावोगावी आपल्या शिळपादनाचे कार्यक्रम होतात. या सर्व कार्याबद्दल आपल्याला काय वाटते?

शिळबाबा: माझ्यासारख्या एकमेव शिळपादकाला मिळालेली किर्ती पाहून मला खुपच समाधानी वाटते. शिळपादन या दुर्लक्षीत गणल्या जाणार्‍या प्रकाराबद्दल श्रोत्यांची जाणीव वाढून त्याचे रसीक वाढत आहेत हे पाहून अभिमानही वाटतो आहे.

निवेदकः मला सांगा, ही शिळपादनाची सवय आपणास कशी लागली?

शिळबाबा: लहाणपणापासून मी स्थूल प्रकृतीचा आहे. मी जन्माला आलो तेव्हाही माझे वजन जास्त होते. घरचे सांगतात की त्या हॉस्पीटलात जन्माला येणारा मी पहीलाच इतक्या जास्त वजनाचा होतो. मोठा होत असतांना माझ्या अंगात आळसाचा शिरकाव झाला. प्रत्येक गोष्टीत मला आळस करण्याची सवय लागली. दुपारचे जेवण झाल्यानंतर मी आहे तेथेच झोपून जात असे. नंतर आई मला पाठीत रट्टा देवून रात्रीच्या जेवणालाच उठवत असे. अशा रीतीने दिवस जात होते. दरम्यान मी शाळेत जाण्याचाही कंटाळा सुरू केला. सुदैवाने घरची परिस्थिती चांगली असल्याने शाळेत जाण्याबद्दल मला कुणी आग्रह करत नसत. वडिलांचा सोनारकीचा धंदा होता. पुढे थोडा मोठा झाल्यानंतर मी पण त्यांच्या सोन्याच्या दुकानात जावून बसत असे. या सर्व परिस्थितीमुळे शिळपादनासाठी माझी शारिरीक स्थिती अनुकूल झाली आणि ती सवय पुढे वाढीस लागली.

निवेदकः अच्छा. पण मग या शिळपादनाच्या सवयीचे छंदात कसे रूपांतर झाले? ती सवय वाढीस कशी लागली?

शिळबाबा: आमचे दुकान पंचक्रोशीत मोठे व प्रसिद्ध होते. दुकानात बसत असतांना मी शिळपादन करत असे. माझी सवय पाहून आमच्या दुकानाच्या मॅनेजरने माझ्यासाठी एक मोठी कॅबीन दुकानात तयार केली. घरून निघून मी दुकानात कॅबीनमध्ये बसत असे. तेथेच जेवण चहा पाणी व्हायचे. सुरूवातीला मी कमी वेळेच्या शिळा वाजवत असे. नंतर नंतर मला जास्त वेळेच्या शिळांची सवय लागली. पुढे मग मला काहीतरी वेगळे करण्याची इच्छा झाली. मी एकदा एका गाण्याच्या मुखड्यावर शिळपादन करण्याचा प्रयत्न केला व तो यशस्वी झाला. पुढे मी निरनिराळ्या गाण्यांच्या मुखड्यांवर सराव केला व तो जमू लागला.

निवेदकः अं फारच छान. बाहेर फाल्गून महिन्याचे फारच छान वातावरण आहे. तूम्ही बसा. आपण आपल्या श्रोत्यांना बाहेरची हवा चाखायला सांगू. मी पण त्यांच्याबरोबर एक ब्रेक घेतो. श्रोतेहो तूम्ही कोठेही जावू नका. आम्ही आलोच एक छोटा ब्रेक घेवून.

निवेदकः (परत ताजेतवाने होवून येतो): श्रोतेहो, आपण प्रसिद्ध शिळ्पादक श्री. शिळबाबा यांच्याशी बोलत आहोत. शिळबाबा, मला सांगा, शिळपादनाची वेळ वाढवण्यासाठी काय काय प्रयत्न केले?

शिळबाबा: तो एक नियमीत सरावाचा भाग आहे. सुरूवातीला फारच कमी वेळ शिळपादन व्ह्यायचे. नंतर नंतर मी खुप सरावाने पोटातील हवानियमन करायला लागलो. यात योग क्रियेचा फार मोठा वाटा आहे. बाबा कामदेव यांच्या आश्रमात मला माझ्या बाबांनी उपचारासाठी सहा महीने पाठवले होते. तेथे शवासन या योगक्रियेचा मी झाडून अभ्यास केला. बाबा कामदेव यांनी मला माझ्यावर मेहेनत घेवून दोन महीन्यातच सर्व अभ्यासक्रम शिकवला आणि सन्मानपुर्वक मी आश्रम सोडला. त्यांनंतर दुकानातील एकांत कॅबीनमध्ये मी शिळपादनाचा रियाज करायला लागलो.

यात आहाराचाही भाग महत्वाचा आहे. मला काही पदार्थांचे नियमीत सेवन करावे लागते. चणे, फुटाणे माझ्या खिशात तर नेहमीच बाळगावे लागतात. हवाबाण हरडे, तत्सम आयुर्वेदीक औषधे यांचे मी नियमीत सेवन करतो.

निवेदकः अच्छा म्हणजे तूम्ही फारच मेहेनत घेतात तर. हे जे तूम्ही शिळपादन करतात ते अचूक कसे करतात? म्हणजे सुर कसा लावतात? त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना जरा सांगाना.

शिळबाबा: मी दुकानात टेपवर गाणी ऐकायचो. त्यात काही अभिजात भारतीय वाद्यांच्या रागावर आधारित कॅसेटस आमच्या मॅनेजरने मला दिल्या. त्या ऐकून मला एखाद्या रागावर आधारित शिळपादन करण्याची कल्पना सुचली व मी ती अंमलात आणली. आधी सांगितल्याप्रमाणे योगक्रियेचादेखील मला उपयोग होतो.

निवेदकः तुमचे कार्यक्रम वैगेरे होतात. त्याबद्दल जरा...

शिळबाबा: कार्यक्रम म्हणजे असे काही नाही, पण एखाद्या बैठकीत जाणे होते. मग माझे शिळपादनाचे कार्यक्रम होतात. मला बंदिस्त ठिकाणी कार्यक्रम करायला आवडत नाहीत. खुले मैदान वैगेरे असेल तर बरे पडते. आणखी एक सांगतो. माझ्या कार्यक्रमाची मी बिदागी काही घेत नाही. जाण्यायेण्याचा खर्च देखील मी आयोजकांकडून मागत नाही. सर्व काही मी मोफत करतो.

निवेदकः तुमच्या काही आगामी योजना आहेत काय? तुमचे काय मत?

आगामी योजना म्हणजे हा जो काही शिळपादनाचा प्रकार आहे त्याला अंतरराष्ट्रीय किर्ती मिळवून देणे जेणे करून सर्वसामान्य जनतेपर्यंत याची माहिती मिळावी व शिळपादन सारख्या दुर्लक्षीत, हलक्या समजल्या जाणार्‍या प्रकाराबद्दल जागृती निर्माण करण्याची माझी इच्छा आहे. बघूया. तुमच्यासारख्यांचे प्रोत्साहन असेल तर ते कार्यही सिद्धीस जाईल.

निवेदकः नक्कीच नक्कीच. आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठिशी आहेतच. शेवटी तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय सांगू इच्छीता?

शिळबाबा: काही संदेश देणे वैगेरे करण्याइतका मी काही मोठा नाही, पण मेहेनत घेतली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जगातला प्रत्येक व्यक्ती शिळपादनात यशस्वी होवू शकतो हेच माझे सांगणे आहे.

निवेदकः शिळबाबा, तुम्ही आज आमच्या स्टूडीओत आलात. आम्ही तुमचे आभारी आहोत. जाता जाता आमच्या श्रोत्यांना आपल्या शिळपादनाची एक झलक म्हणून तूम्ही काहीतरी ऐकवा.

शिळबाबा: मी सुद्धा तूमचा आभारी आहे. माझ्यासारख्या कलाकाराला बोलायला मिळते हे माझ्य भाग्य आहे. आता मी तुमच्या आग्रहाखातर राग 'बहारी ठसधमाल' मध्ये 'आओ सैया खेले होली, जरा नजदीकसे मारो पिचकारी' ही चीज दृतलयीत ऐकवतो. पुन्हा एकदा आपले सर्वांचे आभार.

(ही मुलाखत एकाचवेळी आंतरजालावर निरनिराळ्या संकेतस्थळांवर प्रकाशित केली गेली.)

Monday, February 4, 2013

सिटीबसमधले नाट्य


सिटीबसमधले नाट्य

स्थळ: अर्थातच पुणे. सिटीबस मनपा ते कात्रज डेपो अशी खचाखच भरून जात असते. त्यात एक प्रवासी उभा असतो. कंडक्टर तिकीट, तिकीट ओरडत असतो. नाट्य सुरू.
प्रवासी:
आपलं हे एक द्या हो.
कंडक्टर (वैतागून): हे म्हणजे काय?
प्रवासी: अहो हे म्हणजे तिकीट द्या. एक कात्रज- सर्पोद्यान द्या.
कंडक्टर: काय नागाचा नाच बघायला चालला वाटतं?
प्रवासी: नाही हो. हे आपलं…
कंडक्टर: नुसतं हे आपलं काय? मग सर्पोद्यानात काय नागाला दुध पाजायला चाललात वाटतं?
प्रवासी: नाही नाही. तसं काही नाहीये.
कंडक्टर: मग ह्या पिशवीतल्या नागाला तेथेल्या पाळणाघरात सोडायला चालले वाटतं? नाही म्हणजे पिशवी बरीच मोठी दिसतेय. गारूडी दिसताय अगदी.
(तेवढ्यात बसमधल्या कुणाच्यातरी मोबाईलमध्ये गाण्याची रिंगटोन वाजते. कंडक्टर "मन डोले मेरा तन डोले मेरा दिलका गया खयाल..." या चालीवर नाचतो. आपला हा प्रवासीदेखील पुंगी वाजवायची नक्कल करत त्यात सहभागी होतो.)
कुणीतरी दुसरा प्रवासी ओरडतो: ए गपेए.
प्रवासी (भानावर येत): अहो नाही हो. मी गारूडी नाही वॉचमन आहे कात्रज दूध डेअरीमध्ये. ड्युटीवर चाललो होतो.
कंडक्टरः अच्छा. असं आहे काय! मग हे आधी नाही का सांगायचं? (बोटे विनोदी होईल अशा विशिष्ट पद्धतीने हलवत बोलतो) मग काढा. चला बाहेर काढा. (प्रवासी पिशवी घट्ट पकडतो.) सुट्टे साडेबारा रूपये बाहेर काढा.
प्रवासी: मी काय म्हणतो, काही कमीजास्त नाही का होणार?
कंडक्टरः होईल ना. अपंग आहे का तुम्ही? म्हणजे लुळे, थोटे, बहीरे, मुके, आंधळे (इतर प्रवाशांकडे पाहून): काळे, गोरे, मोरे, पोरे, सोरे पुढे सरकारे!
प्रवासी: अहो, मी चांगला सरळ उभा आहे, निट बोलतो अन ऐकतो आहे? मी कशाला अपंग असणार?
कंडक्टरः तुम्हीच विचारलं होतं ना की काही कमीजास्त नाही का होणार म्हणून? बसमध्ये अपंगांना सवलत असते हे माहीत आहे ना? चला काढा. पटकन काढा. साडेबारा रूपये काढा.
प्रवासी: तरीपण साडेबारा रूपये जरा जास्तच होतात हो. काहीतरी कमी नाहीच होणार का?
कंडक्टरः काय राव, तुम्ही काय मंडईत आहात काय भाजीपाला घ्यायला?
प्रवासी: तसं नाही हो. म्हणजे बघा, महागाई किती वाढलीये. दूध ६५ रूपये लिटर झालं आहे. (रडवेला होत) पेट्रोल डिझेल कितीतरी महाग झालंय. (आणखी रडक्या सुरात) शाळेची फी वाढलीये. टेलरची शिलाई वाढलीये. (आणखीनच रडवेला होत) कटींगचे दर वाढलेय. (अगदीच रडक्या सुरात) सांगा आता सामान्य माणसाने कसं जगायचं या असल्या महागाईत.
कंडक्टर (रडका अभिनय करत रडवेल्या सुरात): नका हो नका रडवू असं. मी पण तुमच्यासारखाच सामान्य आहे. तरीपण महागाई वाढल्यानेच तिकीटाचे पैसे कमी होणार नाही म्हणजे नाही.
प्रवासी: बरं राहीलं. मग असं केलं तर..
कंडक्टर (बोलणे तोडत): नुसते प्रश्न विचारू नका. पटकन पैसे काढा. अन कमी असतील तर जवळचे तिकीट देतो. अन नसतीलच तर बस थांबवतो. उतरून घ्या. बोला काय करू? तिकीट काढता की बस थांबवू?
प्रवासी: नाही हो. आताच मी कलेक्टर कचेरीत गेलो होतो कामाला. तेथून बसमध्ये बसतांना माझे पाकीटच मारले गेले. खिशात फक्त पाच रूपये राहीले बघा. त्यात काही जमतय का?
कंडक्टरः हे पहा, बसच कमीतकमी भाडं सात रूपये आहे. अन तुम्ही बारा वर्ष पुर्ण केलेले वाटत आहात. अपंग वैगेरेही नाहीत. म्हणजे सवलतीचे तिकीटही नाही. मी बस थांबवतो. तुम्ही येथेच उतरुन घ्या. (ड्रायव्हरला ओरडून सांगतो: ओ रामभाऊ, बस थांबवा हो!) काय कटकट आहे. खिशात पैसे नाहीत अन चालले सर्पोद्यानात.
प्रवासी (बसमधून उतरून): चला, आपल्याला थोडीच सर्पोद्यानात जायचे होते? अन ह्या मारलेल्या पाकीटात काय आहे बघू जरा. (चोरलेले पाकीट पाहतो. अन एक एक बिनकामाच्या वस्तू फेकून देत देत बोलतो) ही किराणामालाची यादी. (फेकतो) अगदीच मध्यमवर्गीय दिसतोय तो पुढे उभा होता तो. हं… हि एलआसीच्या हप्त्याची यादी. (फेकून देतो.) हे पाचशे रूपये. ही आपली कमाई. (बाकीचे पाकीट फेकून देत बोलतो) चला आजचा धंदा झाला अन फुकटात प्रवासही घडला.


Sunday, December 16, 2012

मोहन मै तेरे प्रेम की प्यासी


मोहन मै तेरे प्रेम की प्यासी
तेरे चरण की हो जावूं दासी
मै तेरे प्रेम की प्यासी

मेरे नैन तुझको चाहे
तुझे देखते वहीं सुखावे
मेरे मनकी दूर हो जाय उदासी
मोहन रे मै तेरे प्रेम की प्यासी
हरी मै तेरे प्रेम की प्यासी


{{{मोहन मै तोरे प्रेम की प्यासी
तोरे चरण की हो जावूं दासी
हरी रे मै तोरे प्रेम की प्यासी

मोरे नैन तोहे चाहे
तोहे देखते वहीं सुखावे
मोरे मनकी दूर हो जावे उदासी
मोहन मै तो तोरे प्रेम की प्यासी
हरी रे मै तोरे प्रेम की प्यासी }}}

- पाषाणभेद

Saturday, December 8, 2012

रात्र चांदणी


रात्र चांदणी

ही रात्र चांदणी वाटे कधी संपूच नाही
कोडे मिठीतले वाटे कधी सुटूच नाही

शब्द तुझे ऐकण्यास अधीर कान झाले
बोलण्याचे शब्द मात्र मुके कसे झाले?
मुक्या शब्दांचे गीत कधी झाले
ऐकतांना कळले नाही

आकाशी चंद्र असूनी चांदण्याही आहे
सागरास भेटण्या सरीता अतूर वाहे
वेगळी नव्हेत दोघे एकरूप झाली
कुठे ते कळले नाही

प्रीतीच्या फुलांनी आसमंत धूंद झाला
वार्‍यासही आवडूनी तो वाहवत गेला
तुझ्या असण्यात माझी मी तूझी झाले
कधी कळले नाही

- पाषाणभेद

Monday, October 15, 2012

ह्या कन्नडीगांना आलाय माज

ह्या कन्नडीगांना आलाय माज

ह्या कन्नडीगांना आलाय माज
तो माज आता काढू मोडून
अर्रे 'देत नाही देत नाही' म्हणता कशाला
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||धृ||

लई तुरूंगवास करवला रे तुम्ही
काय सहन नाही केलं आम्ही
मराठीसाठी किती रक्त वाहवलं
ह्या कन्नडीगांना आम्हां डिवचलं
लई झालं आता
उठला मराठी माणूस पेटून
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||१||

अरे गल्या-बोळांना नावं आमची
सार्‍या दुकानांना नावं आमची
सार्‍या शाळा रे आमच्या आमच्या
सारी आडनावं आमची आमची
बेळगाव महानगरपालीका आमची
एका ठरावानं होईल का तुमची?
आता चाला तोडू कर्नाटक विधान भवन
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||२||

आहे जसं कन्नडी शासन मुजोर
त्याला सामील केंद्रशासन कमजोर
खेळी दोघांनी केली विधानभवनाची
साक्ष आहे जशी उंदराला मांजराची
बास झालं लई झालं
बंद करा तुमचं दडपशाहीचं संमेलन
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||३||

या सीमेपाई एक पिढी गेली की रं आमची
ही सारी जमीन आमच्या बापजाद्याची
जमवून सारी फौज मराठी माणसाची
ईच्छा पुरी करू महाराष्ट्री जाण्याची
सांगून ठेवतो मुस्कटदाबी करू नका
उगा आमच्यावर वार करू नका
महाराष्ट्रात जाण्यासाठी
आमची तर फोडूच पण तुमचीबी डोकी फोडू
सांगून ठेवतो मिशीला पिळ देवून
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||४||

-(अपुर्ण - योग आलाच तर पुर्ण करेन)

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आपण सार्‍या 'ऑनलाईन मराठी कम्युनिटीजनी' मुजोर कर्नाटक, मरगळलेले मराठी नेते अन नाकर्ते केंद्रशासन यांचा ऑनलाईन निषेध करायला हवा.

- आंतरजालावर आधीच पुर्वप्रकाशीत

-पाषाणभेद

Sunday, October 7, 2012

जंगलातले चालणे


(c) pashanbhed
जंगलातले चालणे


दुर रानात रानात
शीळ घुमली कानात
पाखरांची किलबील
पानात पानात

उभा बाजूला डोंगर
झरा वाहतो समोर
पाणी पिण्यासाठी त्यात
सोडले कुणी जनावर

शिवालय शांत भग्न
गुंतले त्यात मन
थेंब थेंब पाण्याचा
होई अभिषेक अर्पण

होती बरोबर शिदोरी
झाली तीची न्याहरी
दुपारी होईल काहीबाही
त्यालाच काळजी सारी

एकटेच चालायाचे
स्वत:शीच बोलायाचे
जंगल मोठे निबिड
निघून एकटेच जायचे

आला सुर्य माथ्यावर
थेंब घामाचे अंगावर
पायवाट संपता संपेना
चालायाचे खूप अजून

- पाषाणभेद

Sunday, September 9, 2012

हिरवं झालं रानं

हिरवं झालं रानं

हिरवं झालं रानं
हिरवं झालं रानं
तिथंच गाठलं त्यानं
ग बाई
तिथंच गाठलं त्यानं ||धृ||

पायवाट नागमोडी
पांधीतून जायी गाडी
शेतावर सावरूनी
चालले बांधावरूनी
एकल्याच नारंला
तिथंच गाठलं त्यानं ||१||

मोठी झुंबड तिथं झाली
आधाराला नाही सावली
व्दाड वारा पदराशी
खेळला, पाडला पायाशी
सावरू तरी मी कशी
त्यानं ठरवलं झोंबणं ||२||

आधी जरा घाबरले बावरले
पण मी मला नाही सावरले
त्याला अंगाशी ओढले
त्याच्यामधीच भिजले
अस्सा तस्सा आला बरसून
गेला तन चिंब भिजवूनं ||३||

हिरवं झालं रानं
हिरवं झालं रानं ||धृ||

- पाषाणभेद

Sunday, April 29, 2012

पानी आनाया जावू कशी

पानी आनाया जावू कशी

हांडा घेतला बादली घेतली घेतली ग बाई मी कळशी
पन पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||धृ||

दुसरी स्त्री: का गं आसं काय म्हनतीया?

आगं विहीर कोरडी, हापसा तुटका
नाला भाकड, नदी सुकी ग बाई नदी सुकी
मग पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||१||

दरवर्शाची ही रडगानी पावसाळ्यात म्होप पानी
हिवाळा सरता अंगावर काटा पान्यासाठी लई बोभाटा
प्यायाला नाही पानी आन कशी करावी सांगा शेती
मग पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||२||

दिस सारा पान्यात जायी त्याच्यासाठी सारी घाई
दोन मैल गेल्याबिगर पानी काही दिसत न्हाई
चार्‍यापायी गाय गेली, गोर्‍ह्याला कशी टाकू ग पेंढी
मग पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||३||

बायकांचं जीनं आबरूचं कोनी नाही तिला वाली ग
बकरू मोठं केलं अन विकलं जसं खाटकाला ग
दुश्काळानं मढं केलं उपेग काय घेवून फाशी
मी पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||४||

- पाषाणभेद

Thursday, April 26, 2012

काय करू मी माझ्या दिलामधे घकधक होते

काय करू मी माझ्या दिलामधे घकधक होते

शेजारचा पोरगा हा मला पाहूनीया जातो
पाहूनीया माझ्याकडे गालात हसूनीया घेतो
काय करू मी माझ्या दिलामधे घकधक होते

रोज रोज काहीतरी नवे नवे बहाणे बनवी
कधी पेपर घेई कधी नवी रिंगटोन देई
त्याच्या मनामध्ये काय आहे कसे समजावे
काय करू मी माझ्या दिलामधे घकधक होते

काल मी गॅलरीत केस वाळवीत होते
उन्हामध्ये थांबून मी समोर बघत होते
म्हणतो त्याच्या परिक्षेचा निकाल परवा आहे
काय करू मी माझ्या दिलामधे घकधक होते

त्याने माझा फेसबूक आयडी विचारला
मी त्यावेळी त्याला रिअल आयडी दिला
ऑनलाईन जावे की न जावे प्रश्न मला पडे
काय करू मी माझ्या दिलामधे घकधक होते

उसके मन मै क्या है मै कैसे समझू
क्या होता है मेरे दिल मे उसे कैसे बतावूं
आग लगी है दोनो तरफ उसे बुझावू मै कैसे
काय करू मी माझ्या दिलामधे घकधक होते

कुणीतरी माझ्या मदतीला का येईल
मनातला निरोप माझा त्याच्या कानी देईल
पण नको उगीचच मी का पुढाकार घेते
काय करू मी माझ्या दिलामधे घकधक होते

- पाभे

Sunday, April 22, 2012

दुष्काळाच्या झळा

दुष्काळाच्या झळा

दुष्काळाच्या झळा लागूनी जळाला शेतमळा
पाण्यासाठी टाहो पोडूनी सुकला ओला गळा

डाळींबाचे होवूनी हाल द्राक्षबाग ती उखडली
गहू होणे दुरच होते मान मोडून बाजरी पडली

कुठून आणावे पाणी विहीरही सुकली
बांधावरची जुनी बाभूळ आताशा वठली

कोरड्या मातीमध्ये कसे कसावे पाण्यावाचून
पान्हा फुटेना आईला अर्भक रडते ओरडून

दुर दिशेला चुकार ढग आस दाखवी
तेथे जावे वाटतसे पण सोडवेना भुई

कसे जगावे कळेना कसे जगवावे न उमजेना
दुष्काळाने मन कोरडे पण पाणी येई डोळा

- पाषाणभेद

Friday, April 20, 2012

|| अवतार शंकरमहाराज ||

श्री. शंकरमहाराज

अवतार शंकरमहाराज
दर्शन देवूनीया
धन्य केले आम्हा आज
अवतार शंकरमहाराज ||धॄ||

किती तुमचे गुण गावू
तुम्ही आमचे सखा बंधूभाऊ
किती तुमचे गुण गावू
तुमचे नाव मुखी घेता
सोपे होई कामकाज ||१||
अवतार शंकरमहाराज ||धॄ||

अजाणबाहू दोन्ही कर
अष्टवक्र लाभले शरीर
आजानुबाहु दोन्ही कर
मस्तक झुकवूनीया
शरण आलो तुम्हा आज ||२||
अवतार शंकरमहाराज ||धॄ||

देशोदेशी दिल्या भेटी
तुम्ही दीनांचे जगजेठी
देशोदेशी दिल्या भेटी
लीला केल्या अनंत
भक्तीचे उलगडूनी गुज ||३||
अवतार शंकरमहाराज ||धॄ||

तुम्ही सारे धर्म भजती
सार्‍या भाषा तुम्हा येती
तुम्ही सारे धर्म भजती
अनंत तुमची नावे
स्मरण्या कसली आली लाज? ||४||
अवतार शंकरमहाराज ||धॄ||

कपाळी भस्म गंध टिळा
मिस्कील तेज नजर डोळा
कपाळी भस्म गंध टिळा
प्रेमळ दृष्टी ठेवा
कृपा करा आम्हांवर रोज ||५||
अवतार शंकरमहाराज ||धॄ||

उद्धरला जन्माचा पाषाण
तुमच्या भक्तीला लागून
उद्धरला जन्माचा पाषाण
पाप भंगले सारे
मुद्दलासहीत फिटे व्याज ||६||
अवतार शंकरमहाराज ||धॄ||

दुधपोहे

आंतरजालावर "दुधपोहे" (किंवा "दुध पोहे" ) असे शोधले असल्यास काहीच मिळाले नसल्याने ही पाककृती देत आहे.

तसे "दही पोहे" बनवतात पण त्यासाठी लागणारे जिन्नस जसे- दही, मसाला, कोथंबीर आदी बॅचलर असलेल्यांकडे उपलब्ध असेलच असे नाही.

झटपट नाश्टा बनवण्यासाठी व भुक भागविण्यासाठी दुधपोहे उत्त्तम पर्याय आहे.
(लहाणपणी 'मला काहीतरी खायला दे' असली माझी भुणभुण ऐकून माझी आई मला 'दुधपोहे' झटकन बनवून देत असे हे लख्ख आठवतेय! असो.)

जेव्हा तुम्ही घरी एकटे असतात व नाश्टा बनविण्याचा कंटाळा येतो तेव्हा दुधपोहे करणे फारच सोपे असते.

पाककृती:
१) मोठ्या आकाराच्या वाटीत कप-दिड कप दुध घ्या.


२) मुठभर पातळ पोहे त्यात टाका.


३) वरील दुधपोह्यांत चवीनुसार साखर घालून चमच्याने ढवळा. पोहे पातळ असल्याने लगेच एकजीव होतात.

दुधपोहे खाण्यासाठी तयार आहेत.
(फोटो आंतरजालावरून साभार)