Tuesday, October 22, 2019

Its my Ignis, a visible light


Its made for such tough environment.
So let drive it in an entertainment.

Whether its snow or rain
Going further is a gain.

It's smart and stout and sturdy
Like a tall brother who is faithful and hardy.

No matter I call him anytime
Its my Ignis, a visible light.

- Pashanbhed
20/10/2019

Thursday, October 17, 2019

भक्ति गीत: सप्तशॄंग गडावर जायचं

मला ग बाई वाट गावली, माझ्या नशिबानं
सप्तशॄंग गडावर जायचं, नवरात्रीत चालून ||धृ||

हाती धरली कावड
गोदेच्या निर्मळ पाण्यानं ||१||

गड झाला हिरवा
साथ दिली पावसानं ||२||

घर माझं भरलं
धन धान्याच्या राशीनं ||३||

जगण्याची रीत दावली
देवी सप्तशॄंगीनं ||४||

नवसाला पावली आई
आशीर्वाद दिला तिनं ||५||

पुजा करून ओटी भरीन
कुंकू लावीन हातानं ||६||

सगे सोयरे झाले सोबती
पायी चालती आनंदानं ||७||

दर्शनाची आस लागली
घाईनं उचलते पाऊलं ||८||

कृपा असू द्यावी भक्तांवरी
विनवणी करी पाषाण ||९||

सप्तशॄंग गडावर जायचं, नवरात्रीत चालून ||धृ||

१७/१०/२०१९

Sunday, October 13, 2019

जुळे नवरे, जुळ्या नवर्‍या

एका पुरूषांच्या जुळ्यांच्या जोडीचे
स्त्री जुळ्यांच्या जोडीशी जुळले

(जोड्या स्त्री-पुरूषांच्या होत्या. आधीच खुलासा केला. कारण कुणी कलम ३७७ चा विचार करतील!)

जुळले ते जुळले
कुणा न कळले

ज्याच्यात्याच्या जोडीदाराचा हातात हात घालूनी
प्रत्येक जोडी हनिमूनास निघाली

एकत्र मजा करायचा विचार नेक
भटकायचे ठिकाण ठरवले एक

बूक केले छानसे सी फेसींग हॉटेल थ्री स्टार
रूम शेजारी शेजारी नंबर दोनशे तिन, दोनशे चार

दिवसभर फिरले डोंगरावर
खाल्ले पिल्ले पोटभर

सेल्फी काढल्या घालून गळ्यात गळे
व्हाट्सअ‍ॅप फेबूवर स्टेटस शेअर केले

हॉटेलातले जेवण त्यांनी एकत्र केले संध्याकाळी
हनिमून मात्र एकट्याने साजरा करण्याची रात्र झाली

दोन्ही नवर्‍या वॉशरूममध्ये गेल्या फ्रेश व्हायला
नवरे दोनही थांबले बाहेर, लागले वाट पहायला

एक नवरी आधी आली बाहेर, दुसरीला लागला वेळ
निरोप घेतला एकमेकींचा, हनिमूनचा खेळायचा होता खेळ

बाहेर येवून ती नवरी एका नवर्‍याबरोबर निघाली
निरोप घेवून दुसर्‍या नवर्‍याचा, ह्या जोडीने रूमकडे जाण्याची घाई केली

हॉटेलच्या गार एसी रूममध्ये गोष्ट वेगळी घडली
दोनशे तिनची नवरी दोनशे चारच्या नवर्‍या बरोबर गेली

- पाभे
१३/१०/२०१९

Monday, September 30, 2019

लहानांसाठी गोष्ट: पावसाचा ढग

पावसाचा देव आहे इंद्र. इंद्राकडे पाऊस पाडणारे अनेक सरदार असतात. ते सरदार पृथ्वीवर पाऊस पाडत असतात. हे सरदार म्हणजे मोठे मोठे काळे ढग असतात. ते पाणी साठवतात आणि पाऊस पृथ्वीवर पाडतात.

एकदा एका ढगाला इंद्राने पृथ्वीवर पाऊस पाडण्यासाठी पाठवले. पण तो ढग पाऊस न पाडता एका राज्याच्या मैदानावरील मुलांचा खेळ बघण्यात रमून गेला. ही गोष्ट इंद्राला समजल्यावर त्याने त्या ढगाला पाण्याचा ढग न राहण्याचा शाप दिला. आता त्या ढगात पाणी साठून राहू शकत नव्हते. तो ढग पाण्याविना पांढरा दिसू लागला. मग त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप झाला. त्याने इंद्राची माफी मागीतली. इंद्राने त्याला 'पृथ्वीवर तू चांगले काम करशील अन मगच पुन्हा स्वर्गात येशील', असा उषा:प दिला.

त्यानंतर पृथ्वीवर धुके पसरले. त्या धुक्यातून तो ढग पृथ्वीवरील एका राजाच्या राज्यात मानव रुपाने उतरला. तो आता एक सामान्य मानव झाला होता. राज्यातील एका गावात तो लोहाराचे काम करू लागला. निरनिराळे औजारे बनवणे, घराच्या उपयोगी वस्तू बनवणे असली कामे तो करू लागला. परंतु त्या राज्याची जनता दुष्काळामुळे त्रस्त झालेली होती. गेली सलग काही वर्षे तेथे पाऊसच पडला नव्हता. पाऊस नसल्याने त्या राज्यात दुष्काळ पडला होता. जनता वाटेल ती कामे करून पोटासाठी अन्न मिळवत होती. रोगराई अन भूक यामुळे जनता चोर्‍या करणे, लुबाडणे या गोष्टी करू लागली होती. राज्यात अदांधुंदी माजली होती. राज्याचे होणारे हाल पाहून राजाला खंत वाटत होती. प्रजेची काळजी घेणारा राजा असल्याने प्रजेची स्थिती पाहून तो दु:खी झाला. जो कुणी राज्याला दुष्काळी स्थितीतून बाहेर काढेल त्याला योग्य ते इनाम देण्याची घोषणा राजाने केली. या लोहाराने ही घोषणा ऐकली आणि राज्याला दुष्काळातून बाहेर काढण्याचा प्रयत्न आपण केला पाहीजे असे त्याला वाटू लागले.

दुसर्‍या दिवशी तो तरूण लोहार राजाकडे गेला. राज्याच्या दुष्काळाबद्दल मदत करण्याबाबत त्याने राजाकडे इच्छा प्रगट केली. राजाने त्या तरूणाकडे पाहीले अन राजाला त्याबद्दल आशा वाटू लागली. त्याच्या बाबत राजाचे चांगले मत बनले. राजाने त्याला लागेल ते संसाधने देण्याची तयारी दर्शवली पण दुष्काळ हटला पाहीजे अशी मागणी केली. त्या तरूणाने राज्यातील तरूण आणि शेतकर्‍यांची मदत घेवून झाडे लावण्याची तयारी केली. झाडांसाठी खड्डे खणले. बी बियाणे तयार केले. डोंगरउतारांवर चर खणले. आहे त्या नद्या स्वच्छ केल्या. त्या नद्यांची खोली वाढवली. धरणांतला गाळ काढून तो गाळ शेतांमध्ये टाकला.

या कामानंतरच्या हंगामात पावसाळ्यात त्या राज्यात थोडा पाऊस पडला. त्या तरूणाच्या प्रयत्नाने दुष्काळावर मात करण्याच्या झालेल्या कामांमुळे पाऊस जरी थोडा पडला होता तरी त्या पावसाचे पाणी स्वच्छ अन खोल केलेल्या नद्यांमधून वाहीले. ते पाणी निरनिराळ्या धरणांमध्ये साठून राहीले. राज्यात शेतांमध्ये असलेल्या विहीरींना पाणी लागले. त्या हंगामात शेतात चांगली पिके आली. राज्यातील दुष्काळ हटला. लोकांना खायला अन्न अन जनावरांना चारा भेटू लागला. लोक आनंदाने आणि समृद्धीने राहू लागले. गुन्हेगारी नष्ट झाली. रोगराई पळून गेली. आधीच ठरल्याप्रमाणे राजाने त्या तरूणाला शेतीसाठी जमीन बक्षीस रुपाने एका गावात दिली.

इकडे इंद्र आकाशातून त्या राज्याकडे पाहत होता. तरूणाच्या रुपात शाप असलेल्या ढगाने दुष्काळ हटवण्याचे केलेले प्रयत्न पाहून तो आनंदी झाला. त्याने त्या तरूण असलेल्या सरदार ढगाला शापमुक्त केले आणि पुन्हा वर स्वर्गात बोलवून घेतले. तेव्हापासून तो ढग पावसाचे पाणी घेवून पुन्हा पाऊस पाडू लागला.

३०/०९/२०१९

Saturday, September 28, 2019

व्हाटसअ‍ॅप चा एसएमएस मेसेज

तो: हॅलो.

ती: हं बोला.

तो: काय गं, झोप झाली का?

ती: हो आताच उठले. आज जरा जास्तच गाढ झोप लागली होती. पोस्टमनची आरोळीदेखील नाही ऐकू आली.

तो: हं.

ती: तुमची बहीण सकाळी येईल का दुपारी? तुम्ही पाठवलेले व्हाटसअ‍ॅप बघितले. उद्या त्यांचे जेवण बनवावे लागेल का त्यासाठी विचारते आहे.

तो: सकाळी येणार आहे. पण ती दुसरीकडे उतरली आहे. आपल्याकडे आली तर येईल. मी त्या व्यतिरिक्त एक वेगळा अन महत्वाचा एसएमएस पाठवलेला होता तो वाचला का?

ती: तुमचा तोच व्हाटसअ‍ॅप चा मेसेज वाचला ना. म्हणून तर विचारले की तुमची बहीण सकाळी येईल का दुपारी? तुम्ही व्हाटसअ‍ॅप केले आहे ना तेच बोलत आहात ना?

तो: अग, एसएमएस चा मेसेज म्हणतोय मी. व्हाटसअ‍ॅपचा मेसेज नाही.

ती: तुम्ही ना माझे व्हाटसअ‍ॅपच काढतात जेव्हा पहावं तेव्हा. वाचला ना मेसेज व्हाटसअ‍ॅपवरचा.

तो: अग मी एसएमएस बद्दल बोलतोय. जुन्या मोबाईलमध्ये, पुर्वी व्हाटसअ‍ॅप होते का? महत्वाचे काय? एसएमएस का व्हाटसअ‍ॅप?

ती: एसएमएस नाही वाचला. वाचते.

तो: व्हाटसअ‍ॅप मध्ये किती तरी गृप्सचे मेसेजेस असतात. माझा मेसेज खाली गेलेला असू शकतो ना?

ती: हं

तो: पहिल्यांदा काय पाहशील मोबाईल उघडल्यावर?

ती: तुमचं ना नेहमीचंच आहे. झालं चालू लेक्चर. अहो, मी तुमची बहीण येणार असल्याचा मेसेज वाचला अन लगेच चहा बनवायला घेतला माझा. डोकं नका दुखवू आणखी.

तो: अगं मी एसएमएसवरचा मेसेज बोलतोय.

ती: तेच तर मी मेसेज वाचला तुमचा. उद्या बहीण येतेय तुमची तो.

तो: देवीच्या देवळात गेली अन तेथे गणपती दिसला तर पहिल्यांदा कुणाचे दर्शन घेशील?

ती: हां मला ज्याचे दर्शन घ्यायचे ते घेईल.

तो: अगं एसएमएस कुणाकडून आला ते लगेच समजते अन तो पटकन वाचता येतो. अन ते व्हाटसअ‍ॅप मेसेज सारखे पाचशे पाचशे येत नाहीत गं. तुझ्यासाठी महत्वाच्या होता एसएमएस म्हणून पाठवला होता.

ती: हं ठेवता का फोन, तरच वाचता येईल मला.

तो: वाच बाई एसएमएस वाच. व्हाटसअ‍ॅप, व्हाटसअ‍ॅप नको खेळू.

ती: हं...या घरी संध्याकाळी ऑफीसातून.

- पाभे

तुझ्या भेटीला आलो दत्ता

तुझ्या भेटीला आलो दत्ता
सत्वरी या आता ||
तुझ्या मंदीराची केली वाट सोपी
नसे काही चिंता, मनी आस मोठी
वाट पाही दर्शनाची, तुम्ही प्रकटा ||
भक्तांची दु:खे करुनीया दूर
दिले जीवनात सुख भरपूर
सर्वांचा वाली तू तूच आमचा त्राता ||
पाहूनिया रुप होईल मनाची शांती
नसे आस कसली, तिच विश्रांती
सखा तूच गुरू तूच तूच होई दाता ||
ब्रम्हा विष्णू महेश तिन लोक शक्ती
तुझ्या ठाई एक झाले, व्यापूनी सृष्टी
रुप दाखवा तुम्ही दारी आलेल्या भक्तां ||
- पाषाणभेद
२८/०९/२०१९

पाहूणा पाऊस

मी म्हणाले पावसाला तू येतोस कधी
ब-याच दिवसात भेटला नाही
तो म्हणाला मी तर येतच असतो नेहमीसारखा
पण तूच माझ्याशी बोलत नाही


मग मी त्याचे स्वागत करायचे ठरविले
अगदी जवळ गेल्यासारखे भासविले
पण त्याचे मनात काही वेगळेच असेल
जवळ येवून त्याने सा-यांनाच कवेत घेतले

Tuesday, September 24, 2019

पाभेचा चहा

चहा पिणे अन पाजणे हे काही आपल्याकडे पुर्वी नव्हते. पुर्वी चहा नव्हताच. लोक गुळपाणी देवून स्वागत करायचे. नंतर कधीतरी बोस्टन टी पार्टी झाली. अमेरीका स्वातंत्र्य झाली. ब्रिटीश भारतात आले. चीन मधल्या चहाला शह देण्यासाठी त्यांनी चहाची भारतात लागवड केली अन त्यानंतर चहा भारतात उत्पादीत होत गेला. चीन नंतर भारत चहा उत्पादनात दोन क्रमांकावर गेला. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात रेल्वेस्थानकांवर चहा विकला जावू लागला. चहाची विक्री जाहीरात करून केली गेली. चहा पिणे कसे चांगले हे जाहिरात करून सांगितले जायचे. नंतर लोक चहाचे चाहते झाले. मला आठवते ब्रूक ब्राँडचा चहा एका लाल रंगाच्या तिन चाकी हातगाडीवर आठवडे बाजारात विकायला यायचा. तो घ्यायला गर्दी व्हायची.
बरे चहाचे प्रकार तरी किती? साधा चहा, स्पेशल चहा, सुंठ घातलेला चहा, मसाला चहा पत्ती चहा, भरपुर दूधाचा चहा, काढा, तुळशी अन गवत टाकलेला गवती चहा, आयुर्वेदीक चहा, ब्लॅक टी, लेमन टी, ग्रीन टी, हर्बल टी, पिवळा चहा, बॉबी, कट, टक्कर, मारामारी, अगदी मनमाडी चहा देखील आहे.
तुम्हाला आण्णाचा चहा अन नानाचा चहा माहीत आहे काय? आपल्या दुकानात गिर्‍हाईक आले तर त्याला खरोखर चहा पाजायचा असेल तर नोकराला आण्णाचा चहा आणायला सांगायचे. अन तेच फुटकळ टाईमपास करणारे गिर्‍हाईक असेल तर नानाचा चहा मागवीत अन तो येत नसे, किंवा उशीरा येत असे अन गिर्‍हाईक तो पर्यंत कंटाळून निघून जात असे.
अनेक देशोदेशी चहा तयार करण्याचे अन तो पिण्याचे तंत्र निरनिराळे असते. चिनी चहा, कोरीयातला चहा, जपानमधला चहा, अमेरीकेतला चहा.
चहाची बहीण कॉफी अगदी निराळी. तिने तर मोठमोठ्या कॉफीशॉपच्या कंपन्या काढल्या ज्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड झाल्या. पण कॉफी हा लेखाचा विषय नाहीये.
चहा हा ताजा केलेला असेल तरच चांगला. उकळून कडक झालेला चहा हा अ‍ॅसीडीटीला आमंत्रण ठरतो. काही जण चहा अजिबात पित नाही. अर्थात असे लोकं विरळेच. मग ते दूध तरी घेतात. हातावरचे पोट असणारे कित्येक जण भूक मारण्यासाठी चहा पितात. काही जण चहाबरोबर पाव, टोस्ट, बटर, खारी, नानकटाई, स्लाईस आदी खावून भूक भागवतात. चहासाठी लोकं फिरायला जातात. लोक निमित्त काढून चहा पितात. काही जण दिवसाला दहा बारा कप चहा पितात. चहा प्यायला बोलावणे हा आदरसत्काराचा भाग मानल्या जावू लागला. एखाद्याला भेटायला घरी गेलो अन चहा दिला नाही तरी लोक नाराज होतात. चहाचे पाणीदेखील पाजले नाही असा उल्लेख करतात.
जुनी गोष्ट आहे. खरी आहे. माझ्या पाहण्यात एक चहा विक्रेता आहे. नव्वदच्या दशकातली. तो सायकलवर चहा खेड्यापाड्यात विकत असे. आमच्या गावाजवळ रेल्वे जाते अन तेथल्या नदीवर रेल्वेपुलआहे. एकदा रेल्वे पुलावरून तो सायकल ढकलत चालला होता. तिकडून रेल्वे आली अन हवेच्या झोतामुळे तो उंच पुलावरून खाली कोसळला. नदीत पाणी वगैरे होते की नाही ते माहीत नाही. पण तो जबर जखमी झाला. नंतर हॉस्पीटलात राहीला. त्यानंतर त्याला कोणतेही अन्न पचेनासे झाले. काहीही खाल्ले तर ते बाहेर पडत असे. नंतर त्याच्या घरच्यांनी वेगवेगळ्या अन्नपदार्थांचा त्याचेवर प्रयोग केला. काहीच पचेनासे झाले. नंतर शेवटी ते अशा निष्कर्षापर्यंत आले की त्याला चहा पचतो! मग सुरूवातीला चहाचे पाणी अन नंतर काही दिवसांनी थोड्या जास्त दूधाचा चहा हाच त्याचा आहार झाला. बरे एवढाच आहार असूनही ती व्यक्ती शारीरिक कष्ट करत असे. किराणा दुकान चालवत असे. सायकल चालवत असे. तर चहा विकतांना अपघात झाला अन शेवटी चहाच त्याचा आहार बनला. जवळपास दहा एक वर्षे ती व्यक्ती चहावरच होती. तुम्हाला खोटे वाटेल हे. नंतर आम्ही गाव बदलले. त्या व्यक्तीनेही गाव अन व्यवसाय बदलला. मध्ये काही काळ गेला अन ती व्यक्ती शहरातल्या एमआयडीसीत एका कंपनीत सायकलवर जेवणाचे डबे पुरवतांना दिसली. शारीरिक ठेवण तशीच शिडशीडीत राहीली होती. असो.
खेडेगावात दूधाची कमतरता असते. जे दूध निघते ते सकाळीच शहरात विकायला पाठवले जाते. मग एखाद्या लहानग्याला हातात पेलाभर किंवा पाच दहा रूपयाचे दूध घ्यायला ज्याचे घरी दूभते असते त्याकडे पाठवतात. तर एकदा एका ठिकाणी मी पाहूणा गेलो होतो. खेडेगावच ते. दूध मिळालेच नाही. साखर नव्हती, गूळ होता. मग त्या माऊलीने गुळाचाच काळा चहा मला पाजला. मला तर त्याचे काही वाईट वाटले नाही कारण तसली परिस्थीती मला माहीत होती. पण त्या माऊलीच्या डोळ्यात पाणी दिसले. अशासाठी की आलेल्या पाहूण्याला बिन दूधाचा, बिन साखरेचा चहा पाजला. त्याच्याच जवळपासचा अनुभव असा की एका माऊलीने चहा बनवला. तेथेही दूध नव्हते. साखरेचे नाही आठवत पण त्या माऊलीने पावडरचे दूध बनवले अन मग मला चहा पाजला.
चांदवडला आम्ही लहान असतांना देवीच्या दर्शनाला गावातून पायी गेलो. येतांना ढग भरून आले. अन जोरात पाऊस चालू झाला. आम्ही पूर्ण भिजलो. गाव तर लांब होते. आडोशाला काहीच नाही. रस्त्यात एका झोपडीत आम्ही गेलो. तेथे विस्तवाचा उबारा भेटला. तेथे त्या मालकाने चहा करून दिला. पण तेव्हढ्यात जोराचा वारा आला अन त्या वार्‍याने झोपडीचे एका बाजूचे कूड उघडे पाडले. आम्हाला वीजच कोसळली की काय असे वाटले पण तसे काही झाले नव्हते. असा प्रसंग लक्षात ठेवणारा चहा अन असे चहाचे अनुभव.
आताशा अनेक चहाचे ब्रांड तयार झालेले आहेत. अमूक चहा, अमृततुल्य इत्यादींची फ्रांचायजीचा धंदा झाला आहे. (म्हणूनच या लेखाला मी "पाभेचा चहा" असे नाव दिले आहे हे चतुर वाचकांच्या लक्षात आलेच असेल. तर आपण आता आपला लेखक पुढे काय म्हणतो आहे ते पाहूया.)
तर अशा ब्रांडांच्या किंवा फ्रांचायजींच्या चहाच्या दुकानात पु.ल. म्हणतात तसे आपले खायचे पान घेवून पानाच्या दुकानासारखे पान तयार करण्यासारखे वाटते. तेथे आपूलकी नसते. विक्रेता केवळ किती कप धंदा झाला याचा विचार करतो. एका कपात दोन जण चहा पिवू शकत नाही. उभे राहून चहा पिणे अन तेथून निघून जाणे एवढेच साध्य होते. चहा बरोबर गप्पा होत नाहीत. किंबहूना गप्पांसाठी चहाच्या दुकानात गेले तर त्याची लज्जत काही औरच असते. या नव्या कार्पोरेट चहाच्या दुकांनात हे साध्य होत नाही. उकळीचा चहा तेथे भेटत नाही. आधीच उकळलेला अन थर्मासमधला रेसेपीदार, त्यांचा प्रोप्रायटरी फॉर्मुला असणारा चहा तेथे भेटतो. त्यामुळे तसला फ्रांचायजीचा चहा पिवून खरा चहा पिण्याचे समाधान होत नाही. आणि तो चहा तुलनेने थंडदेखील असतो हा माझा अनुभव आहे. उकळीच्या चहातली मजा नाही त्यात. तो चहा फक्त पोटात जातो. त्याने पोट भरत नाही. ते चहाचे दुकान म्हणजे त्या दुकान मालकाची अधिकची आर्थिक गुंतवणूक असते. अन टपरीवरचा चहा म्हणजे त्या दुकानदाराचा संसार असतो.
असो. चहात पाणी टाकतात किंवा पाण्याचा फुळकट चहा असतो तसे लेखात अनेक संदर्भ येवून हा चहावरचा लेख मोठा होवू शकतो. चहा पोहे अन त्या बरोबरचे किस्से, चहा बरोबर खायचे पदार्थ घेवून केलेला लेख, चहा कशात घेतात त्या वस्तू, त्यांची ठेवण. असे केले तर हा लेख म्हणजे चहाचा मळाच होईल. म्हणून असो.
चहा हा फक्त चहाच नसतो तर तो एक आपूलकीचा धागा असतो. आणि असेच धागे काढत काढत अन ते विणून विणून त्याचे असले लेखवस्त्र होते.
अन हो, तुम्ही प्रतिक्रीया देवूनही हा चहालेख वाढवू शकतात ना!
( हा चहाचा लेख मागच्या आठवड्यात लेखनाच्या आधनावर ठेवला होता. मग एक एक अनुभवाच्या, प्रसंगांची सामग्री यात टाकत गेलो. अन आज हा चहा लेख उकळी पावला अन तो तुम्हाला गाळून (मुद्रीतशोधन करून) देतो आहे. त्याचे प्राशन करा अन कसा झाला आहे तेही सांगा.)
- पाषाणभेद
२४/०९/२०१९

Thursday, September 5, 2019

दोरीवरचे कपडे

दोरीवर कपडे कसेही वाळत असतात
कपडे वाळत असतांना ते कसे दिसतात?

शर्ट कधी हॅंगरला चिमट्याने टांगलेला असतो
फाशी दिलेल्या कैद्यासारखा हालत असतो
(यावरूनच फाशीला इंग्रजीत हॅंग करणे म्हणत असतील.)

पॅन्टही अशीच असते हवेत तरंगत
दोन पाय आधांतरी भुतासारखे लटकत

नाडीच्या परकरांची गोष्ट निराळी असते
भडक रंगाचे तंबूच वाटतात सर्कसचे

साडी घालून घडी बसते वाळत
वा-याने तिचा पदर असतो हालत

किरकोळीच्या गोष्टी टॉवेल सॉक्स रुमाल
गणतीत नका घेवू बाकीचे कपडे आहेत कमाल

दोरीवर पडतात अंडरपॅन्ट बनियन ब्रा अन निकर
वाईट दिसतात, काढून घ्या, तसेही वाळतात लवकर

गाऊन उलटा असतो, खाली डोके वर पाय
त्यात बाई घातली अन गाऊन खाली सरकला तर काय?

कपडे वाळत असतांना आपण बाहेरून बघतो
पण वा-याची मात्र मजा असते, तो आतून पाहतो

- पाषाणभेद
०४/०९/२०१९

Monday, September 2, 2019

पाय सरावले रस्त्याला

पाय सरावले रस्त्याला
मी चाललो, चाललो इतका की
रस्ता ओळखीचा झाला
दुसरी वाट धरावी तर
पाय सरावले रस्त्याला ||ध्रू||
खाच खळगे नेहमीचे झाले
नवे नव्हते वाटले
अडथळे तसेच होते
पायात काटे खुपसले
काट्यांनी तरी जावे कोठे
त्यांना कोण सोबती मिळाला?
पाय सरावले रस्त्याला ||१||
अडचणी अनंत आल्या
उभ्या राहील्या समोर
नेट लावून सामोरी गेलो
प्रश्न अनेक पुढे कठोर
जंजाळ पसरले समोर असता
एक पक्षी अचूक उडाला
पाय सरावले रस्त्याला ||२||
"कसा आहेस तू
ठिक आहेस ना?"
"मदत लागली काही तर
मी तयार आहे ना!"
ना कुणी अशी उभारी दिली
काय करायचे त्या ओळखीला?
पाय सरावले रस्त्याला ||३||
मीच माझी केली मदत मग
हात केला मलाच पुढे
घेतला हातात हात
डाव्या हातात उजवा पडे
माझाच मी वाटाड्या झालो
इतर न कुणी आले सोबतीला
पाय सरावले रस्त्याला ||४||
- पाषाणभेद
०१/०९/२०१९

Friday, August 2, 2019

तू मी अन पाऊस

पाऊस! पाऊस!!

पाऊस! पाऊस!! झाला सारा 
भणाणलेला त्यासवे आला वारा
वारा उडवीतो माझे मन
मनामध्ये तू आहेस खरा

चिंब मी भिजलेली
माझ्यासवे तुझे भिजले तन
हिरव्या रानात घेवूनी कवेत
मीच हरवले माझे मन

पाणी आले पानोपानी
झाडे भिजली रानोरानी
मिठीत तुझ्या मी आलंगूनी
विसरले मी, गेले हरवूनी

- बी ऑलवेज लाईक मी
- ऑलवेज युवर्स पाभे
०३/०८/२०१९

Sunday, July 28, 2019

इंद्रधनू

इंद्रधनू

(आकाशात इंद्रधनुष्य पाहील्याने माझी मुलगी हरखली आहे अन ती मला बोलावते आहे.)

आकाशी ते इंद्रधनू आले 
अहा!
चला बाबा बघा 
ते पहा! ते पहा!!

कितीक मनोहर मोदभरे
आकाशीचे रंग खरे
कमान तयाची वाकली
माझ्यासवे पहा बरे

दवबिंदूवर प्रकाश पडूनी
आले ते वर उसळूनी
उल्हासीत झाले मी
चटकन या तुम्ही

वर्ण वरी घेई तांबडा
तदनंतर ये नारंगी पिवळा
चमके तो रंग हिरवा निळा
घेवूनी पारवा जांभळा 
आकाशी व्यापली प्रकाशमाला

पर्जन्याचा अधिपती नरेश
भेट जलाचे देई धरेस
त्याच समयी ये सामोरी भास्कर
किरणांस भिडता थेंब नीर
गोफ इंद्राचा घेई आकार

मज न ठावूक; 
राहील न राहील ते काळ किती
ये वायू मग जाय क्षिती
साठवूनी घ्या लोचनी
त्वरा करा तुम्ही; बाबा या लवकरी

- पाषाणभेद
२८/०७/२०१९

Tuesday, July 16, 2019

वरुणच्या जाण्याच्या निमित्ताने - आभासी जगातील प्रत्यक्ष कट्याचे, भेटीचे महत्व

वरुणच्या जाण्याने सगळ्यांनाच दु:ख झाले आहेत. त्यांचे वय काहीच नव्हते. माणूस धडाकेबाज होता. बहूआयामी होता. असे कशामुळे झाले ते नक्की समजले नसले तरी आजारपण अन त्यातून सावरले न जाणे हे मुख्य कारण आहे.

येथे जवळपास बहूतेक जण आभासी नावे घेतलेले आहेत. येथेच नाही तर चेपू, काय्यप्पा, चिवचिवाट आदी ठिकाणी असलीच किंवा इतर नावे धरून आपण वावरतो. एकमेकांशी संवाद, विसंवाद, चर्चा करतो. भांडतो, एकेरीवर येतो, शिव्याही देतो. तरी पण त्यामागे एक माणूस आहे. तोच माणूस माणूसपण जगतांना हे लिहीतो, चर्चा करतो, संवाद साधतो, प्रतिसाद देतो. सार्‍यांशी बोलतो कारण आपण आपल्या मराठीत व्यक्त होवू शकतो म्हणून. कदाचित मिपा मध्यम इंग्रजीत असते तर आपण तेथे व्यक्त नसतो झालो. माझ्या बोलण्याचा, धागा लेखनाचा हा हेतू नाही पुढे तो येईलच.

वरुणच नव्हे तर त्या आधी तात्या, बोका-ए-आझम त्याही आधी कुलकर्णी (नाशिक - यांचे नाव विसरलो. पण अंत्यसंस्काराला गेलो होतो) अन त्याही आधी यशवंत कुलकर्णी यांचे अचानक जाणे झाले.
या सार्‍यांशी आपला परिचय होता. भले आपण प्रत्यक्ष भेटलेलो नसू अन नावानिशी ओळखत नसू परंतु एक प्रकारचा जिव्हाळा होता. प्रत्येकाच्या जाण्यामागे काही ना काही कारण असेल. आपल्याला त्यात पडायचेही नाही. त्यामागची कारणमिमांसाही करायची नाही.

शेवटी वैद्यकियदृष्ट्या मृत्यू हा शारिरीकच होतो. परंतु त्या आधी शारिरीक कारणे सोडली तर मानसीक कारणांनीसुद्धा माणूस आधी मरणपंथाला लागतो. अगदी शेवटची पायरी जरी नसेल तरी काही शारिरीक व्याधी, नोकरी-व्यवसायातील प्रश्न, कौटूंबिक प्रश्न यातून अशा जिव्हाळ्याच्या व्यक्तींना मार्गदर्शन होवू शकते. शेवटच्या मार्गाने जाण्यातून आपण पाहीले अन त्यांना आपण रोखू शकलो तर?
वरुणच्या जाण्यानंतर जी काही चर्चा झाली अन त्याच्या आधी जे परिचित गेले त्यांच्याविषयी जे काही समजले त्यात त्यांच्या त्या मरणपंथाला लागण्याचे कारण कदाचित सापडू शकते असे वाटते. आपण त्यांना परावृत्त करू शकतो अशी दिशा दिसते.

लक्षात घ्या, मी वर बोललो आहे की आपण येथे (किंवा इतरही आभासी माध्यमांत) आपण व्यक्त होतो. आपल्या मराठीत लिहीतो. ज्या गोष्टी आपण घरातही सांगत नाहीत त्या गोष्टी आपण या आभासी जगतात व्यक्त करतो.
काही जण म्हणतील की अशा परिचितांना जाण्यापासून आपण काय करू शकतो? आभासी जगतातले बोलणे अन त्यांची सांगड प्रत्यक्ष जीवनात परिचित समोर आला तर घालावी का? निश्चितच नाही किंवा कदाचित हो. थोडक्यात परिस्थिती सांगत असेल तर योग्य.

म्हणजे असे की य.कू. गेला त्याच्या आधी तो असंबद्ध बोलत होता. कुणा बाबाची त्याने दिक्षा घेतली होती. वय नसतांनादेखील तो जास अध्यात्माचे बोलत होता. आपल्यापैकी कुणीतरी त्यास तो जाण्याआधी भेटणारही होते. भेटणार्‍या व्यक्तीला तशी कुणकुणल लागली होती, परंतु ती भेटीची ती वेळ त्यांना साधता आली नाही. नाशिकचे कुलकर्णी गेले तो तर खरोखर अपघात होता. त्याला कुणीच टाळू शकले नसते. बोकाशेठ गेले त्यानंतर त्यांच्या आजारपणाबद्दल समजले. तात्या गेला तेव्हा त्याचा येथेच काय पण इतरांशीही त्याचा संपर्क नव्हता. आता वरुण गेला तेव्हा तो आजारपणातून नुकताच सावरत होता. अगदी लोकसभा निवडणूका संपल्यानंतर कर्जतला कट्टा करण्याइतपत तो उत्साही होता. अगदी दोन दिवस आधीपर्यंत तो फोनवरून कुणाच्या ना कुणाच्या संपर्कात होता. त्याच कट्याच्या बोलण्यात काहीतरी सापडले असते असे मला वाटते. तो कट्टा आधी झाला असता तर?
तर मुद्दा असा की असल्या अभासी जगतात मरणपंथाला लागण्याच्या आधी ती व्यक्ती कदाचित त्या दृष्टीने लिहू शकते. ते वाचणार्‍या सर्वांना जरी समजले नसले तरी एखाद दुसर्‍या जाणकाराला बरोबर समजू लिहू, किंवा तशी शंका तरी येवू शकते. प्रत्यक्ष भेट, कट्टा झाला तर ती व्यक्ती समोर असू शकते. त्यावेळी आपण त्याची प्रत्यक्ष खात्री करून घेवू शकतो. तो बोलतो कसा? वागतो कसा? त्याचे जेवणखाण कसे आहे? आहार विहार कसा आहे? आधीपेक्षा त्याच्यात शारिरिक- मानसिक किती बदल झाला? त्याच्या लिखाणातून काही धागा लागतो का? असा मी जरी विचार करणार नसेल परंतु इतर दुसर्‍याने आधीच केला असेल अन त्याबाबत त्या व्यक्तीला तेथे किंवा लिखाणाच्या माध्यमातून त्यास त्या धोक्याबाबत आधीच सुचीत करता येईल. कट्यात सहभागी झाला तर ती व्यक्ती कदाचित त्याच्या कोषातून बाहेरही पडेल. नवा मार्ग सापडेल. जे त्याच्या सख्या मित्रांना समजणार नाही, घरच्यांना समजणार नाही ते आभासी मित्रांना समजेल अन तेच आभासी मित्र कट्यात प्रत्यक्ष भेटले तर? अभासी जगतातले असंबद्ध वागणे त्याच्या जवळच्यांपर्यंत पोहोचले तर? खाजगी आयुष्यात आपण तेवढी ढवळाढवळ करणार नाही असा व्यावसायीक दृष्टीकोन काही पाळतील पण एखाद्याने जरी नाही पाळला तरी त्यायोगे तशी व्यक्ती गैरमार्गाला लागणे किंवा अगदी थेट मरणाच्या दारातून एखादा बाहेर पडण्यास मदत तरी होईल.
जग खुप वेगाने पुढे जात आहे. कामासाठी कुणाला वेळ अपुर्ण पडतो. त्यात शहरीकरणामुळे अन नोकर्‍यांमुळे घनिष्ठ मित्र दुरावत चालले आहे. म्हणूनच मिपा काय चेपू, काय्यपा अशा माध्यमांतून आपण व्यक्त होतो. त्यातही कट्टा केला तर अपरिचित व्यक्तीचा परिचय चांगल्या कामात रुपांतरीत होवू शकतो.

कालपासून विचार करून माझे मन थार्‍यावर नसल्याने हे लिखाण कदाचित विस्कळीत असेल. मार्गदर्शन - कौन्सिलिंग करण्याचा मी व्यावसायीक नसल्याने माझा मुद्दा निट मांडला गेला नसेल परंतु त्यात काही तथ्य असू शकते. योग्य विचार नसतील तर धागा उडवला तरी काही हरकत नाही.

वरुणला आदरांजली.

निर्झर

निर्झर

निर्झर होता एक बारीकसा; हिरव्या डोंगरातून वाहतसा
असुनी तो लहान छोटा; ठावूक नव्हत्या पुढल्या वाटा ||

धरतीवरच्या वर्षावाने; जीवन त्याचे सुरू जहाले
धरणी जाहली माता ती; अल्लड खट्याळ उदकाची ||

नित नवीन भरून जलाने; ठावूक त्याला भरभरून वाहणे
चंचल उत्कट उल्हासीत पाणी; घेवूनी जायी दो काठांनी ||

पुढेच मिळाली सरिता त्याला; सवे वाहण्या पुसे खळाळा
विचारही न करता तो मिळाला; निर्मळ नदीत एकरूप जाहला ||


- पाषाणभेद
१५/०७/२०१९

पावसाविषयी असूया

पावसाविषयी असूया

पाहून माझे खुप हाल झाले
पावसाने केले तुझे केस ओले

गवतावर पडताच पाऊल शहारले अंग
भान हरपले जगा विसरले भिजण्यात दंग

पाऊस फिका पडला थेंब पडताच गाली
तुझ्या केस झटकण्याने तुषार पडले खाली

ओली करून साडी पाऊस मातलेला
बरसतो पुन्हा झिम्माड तुझ्या अंगाला

गिरकी घेतली, उड्या मारल्या, हात पसरले
विषाद वाटला माझाच तु पावसाला कवेत घेतले

- पाषाणभेद
०७/०७/२०१९

असा पाऊस

असा पाऊस


नभातून पडावा पाऊस
मनात उतरावा पाऊस

धरतीमध्ये थेंब थेंब
रुजवावा पाऊस

झाडांवरल्या थेंबातूनी
झरावा पाऊस

कौलांच्या पागोळ्यांतूनी
ओघळावा पाऊस

हातातल्या ओंजळीत
पकडूनी प्यावा पाऊस

अधिर ओठांचा स्पर्शाने
हलकेच चुंबावा पाऊस

ललनेच्या केसांतूनी
झटकावा पाऊस

गावा पाऊस घ्यावा पाऊस
पाऊस घेवून आपणही व्हावे पाऊस

- पाभे
३०/०६/२०१९

Wednesday, June 26, 2019

व्हाईट नॉईज काय आहे भाऊ? रात्रपाळी आणि झोप यासाठी उपयोगी.

मित्रांनो,

आपणापैकी बरेच जण नाईट शिप्ट करत असतील. नाईट शिप्टमुळे दिवसा आपल्याला झोपणे क्रमपाप्त, आवश्यक आहे. परंतु घरातील व्यक्ती, आजूबाजूचे लोकं हे सुद्धा आपल्याबरोबर नाईट शिप्ट करतात का? तर नाही.

जेव्हा जेव्हा आपण नाईट शिप्ट करुन आल्यानंतर दिवसा झोपतो त्या वेळी घरातील व्यक्ती, लहान मुले, आजूबाजूच्या घरी राहणारे व्यक्ती, कुटूंब हे त्यांचे दिवसाचे दिनक्रम व्यतीत करत असतात. जेव्हा आपण झोपतो, तेव्हा आपल्या आजूबाजूला इतर सारे आवाज येत असतात. कुणी टिव्ही पाहत असतो, वाहने जात असतात, लहान मुले खेळत असतात इत्यादीमुळे आपली झोप विस्कळीत होत असते. अशावेळी हा व्हाईट नॉईज आपल्या कामी येतो.

काय आहे व्हाईट नॉईज?
व्हाईट नॉईज हा असा कमी वारंवारतेचा (लो फ्रिक्वेन्सी) आवाज असतो जो इतर आवाजांना रोखतो (शिल्ड) करतो. तुम्ही हा लेख किंवा ईमेल वाचण्याआधीही तुमच्या घरात व्हाईट नॉईज वापरतच होते. पण त्यालाच व्हाईट नॉईज म्हणतात हे तुम्हाला कदाचित माहीत नसावे. घरातील पंख्याचा आवाज हा व्हाईट नॉईजचे उदाहरण आहे. कमी वारंवारतेचा हमींग साऊंड (लो फ्रिक्वेन्सी) जो सतत येत असतो तो व्हाईट नॉईज असतो.

व्हाईट नॉईजचा उपयोग कसा करायचा?
या फाईल्स जास्त मोठ्या असल्याने ईमेलमध्ये न देता इंटरनेटवर शेअर केल्या आहेत. या लिंकमधील झीप फाईलमध्ये व्हाईट नॉईजच्या फाईल्स आहेत. या फाईल्स डाऊनलोड करून एक्ट्राक्ट करा आणि तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह करा. जेव्हा तुम्हाला झोपायचे आहे तेव्हा या फाईल्सपैकी कोणतीही एक ऑडीओ फाईल प्ले करा. तुमच्या कानांना सोसवेल इतपत मोबाईलचा आवाज वाढवा. सुरूवातीला एक दोन दिवस थोडेसे वेगळे वाटेल पण नंतर हळूहळू याची सवय होईल. यातील कोणत्याही आवाजाच्या फाईल्स साधारण दहा मिनीटे प्ले होतात. मोबाईलच्या ऑडीओ प्लेअरमध्ये केवळ एकच आवाज सतत प्ले (कन्टिन्यू प्ले) मोडमध्ये प्ले करा. या ऑडीओ फाईल्समध्ये अनेक आवाजांच्या फाईल्स आहेत, जसे - मुळचा व्हाईट नॉईज, फॅनचा आवाज, मोटर, पाऊस इत्यादी. व्यक्तीश: मला तरी 01WhiteNoise.mp3 या फाईलचा आवाज सुट झालेला आहे. व्यक्तीपरत्वे आवड निराळी असू शकते.

लक्षात ठेवा:
व्हाईट नॉईज तुम्ही तुमच्या खाजगी कामासाठी वापरत आहात. घरातील इतर कुणी व्यक्ती तुमच्यासोबत झोपत असतील तर कदाचीत त्यांना हा आवाज आवडणारदेखील नाही. त्यांनी या आवाजाबद्दल नावड दाखवली तर त्यांच्या इच्छेचा सन्मान करा आणि हा आवाज तात्पुरता बंद करा हि नम्र विनंती.

आणखी एक, या आवाजाच्याही खुप आहारी जावू नका. अति तेथे माती हि म्हण लक्षात ठेवा. जेव्हा जेव्हा तुम्हाला झोप घेणे अति आवश्यक आहे तेव्हा किंवा लाईट गेल्यावर पंखे बंद झाले तर या आवाजाचा उपयोग करा.

आपल्याला या माहितीचा कितपत उपयोग झाला ते आवर्जून कळवा.

आपला,
पाषाणभेद

Sunday, June 23, 2019

कुरबुर झाली

कुरबुर झाली
(काल रात्री साडे तीन वाजता पाणी बचतीवर एक पथनाट्य लिहीले. एका व्हाट्सअ‍ॅप गृपमध्ये सदस्य दुर्गविहारी अन दीपक११७७ यांनी झोप घेत चला अन काही कुरबुर झाली असेल असे विनोदाने लिहीले. सकाळी मी ते वाचले अन मग त्यांना देण्याचे उत्तर या गीतलेखनातून लिहीले.)

तुझ्यासंग माझ्यावालीकुरबुर झाली ग कुरबुर झालीत्यानेच माझी झोपायाचीग झोपायाची पंचाईत झाली ||धृ||
काल मी तुला नाही दाखवलासिनेमा प्लेक्समंदीआवड तुला पाहायाची अंधारातसिनेमा कोप-यामधीतिकीट नाही मिळाले तरयेवढ्यावरून चिडलीअन मगतुझ्यासंग माझ्यावालीकुरबुर झाली ग कुरबुर झाली||१||

नाही घेतली ग घेतली मी तुलासाडी जरी पैठणीचीनाही भरवला मी तुला नाही भरवलाकाल तुला पेस्ट्री केक मावावालाविसरलो मी तुझा वाढदिवसमाफी मला मागावी लागलीअन मगतुझ्यासंग माझ्यावालीकुरबुर झाली ग कुरबुर झालीत्यानेच माझी झोपायाचीग झोपायाची पंचाईत झाली||२||
- विसराळूभेद पाषाणभेद२३/०६/२०१९(अन कुरबुर वगैरे काही नाही, नाईट शिप्ट असल्याने जागा होतो!)

पथनाट्य: बचत पाण्याची, समृद्धी जीवनाची!


पथनाट्य: बचत पाण्याची, समृद्धी जीवनाची!


कलाकारः सुत्रधार आणि दोन सहकारी कलाकार (दोघांकडे एक एक वाद्य असेल तर उत्तम.)
(शक्य असल्यास पथनाट्य सादरीकरणाआधी स्थानिक जनतेच्या अवलोकनार्थ, वातावरण निर्मीतीसाठी पाण्याच्या अपव्ययाचे, दुष्काळाचे प्रातिनिधीक छायाचित्रे असलेला फलक लावावा.)

एक सहकारी कलाकार (पाणीवाल्याच्या भुमिकेत ): पाणी घ्या पाणी, पाणी घ्या पाणी!

दुसरा सहकारी (स्त्री भुमिकेत): अरे ए पाणीवाल्या कसे दिले पाणी?

पाणीवाला: शंभर रुपयाचा एक ग्लास पाणी, पाणी घ्या पाणी.

स्त्री:
काय! शंभर रुपयाला एक ग्लास!
अरे बाबा काल तर होते स्वस्त, आज लाव थोडे रास्त.
काल होता ग्लास नव्वदला!
आज अचानक का भाव वाढवला?

पाणीवाला:
बाई, अहो आज मोठ्या मार्केटमध्ये
पाण्याचे टँकर आले होते कमी.
आम्ही तर साधे पाणीविक्रेते,
आम्हाला स्वस्त मिळण्याची कसली हमी?
हे पाणी विकून तुम्हाला
पोटाला मिळायला पाहीजे आम्हाला.

स्त्री:
बरं बरं बाबा दे
चारच ग्लास पाणी दे.
आज कसेतरी घेवू धकवून.
पण उद्या नक्की ये.

सुत्रधार: मंडळी तुम्ही आम्ही पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आताच विकत घेतो. पण ते प्रवास करतांना, बाहेर जातांना. पाण्याची अशीच परिस्थीती असेल तर भविष्यात दररोजच्या वापराचेही पाणी आपल्याला ग्लासच्या मापात अन भाजीसारखे विकत घ्यायला लागेल हे सत्य आहे.

आता मंडळी या बातम्या ऐका.
ए गोंद्या वाच जरा या बातम्या.

(सहकारी कलाकार बातम्या वाचतो)
पाण्यासाठी दोन गावात मारामारी.
जिल्ह्यात पाण्याचे टँकरांची शंभरी गाठली.
पिण्याच्या पाण्यासाठी धरणाचे दरवाजे बळजबरी उघडले.
दुष्काळामुळे गावकर्‍यांचे शहराकडे रोजगाराठी स्थलांतर.
गावात पाण्याचे नळ नसल्याने मुलांची लग्ने होत नाहीत.
गावात पाण्याचे स्त्रोत आटले, विहीरी आटल्या.
५ किमीवरून पाणी आणण्यात महिलांचा दिवस जातो.
३०० लिटर पाणी चोरीची तक्रार पोलीसठाण्यात दाखल.


सुत्रधार: तर मंडळी, या अन अशा बातम्या आपण रोज वाचतो. वाचतो की नाही?
सहकारी (एका सुरात): हो वाचतो
सुत्रधार: रोज टिव्ही वर पाहतो.
सहकारी (एका सुरात): हो पाहतो.
सुत्रधार: दररोज वाचता, दररोज पाहता मग यातून काही बोध घेता का?
सहकारी (एका सुरात): नाही.


सुत्रधार: बघा मंडळी, पाण्याच्या बाबतीत किती उदासीनता आपण बाळगून असतो.

(माडीवरच्या इमारतीतून एक बाई गीत गात गात खाली अंगणात सडा मारत आहे. )

{गीत}

चला बाई सकाळ झाली चला सडा मारू
सडा मारून रस्ता साफ करू ॥ध्रू॥ 

किती छान आहे अंगण, सड्या विणा का राहू द्यावे कोरडे?
दररोज सडा मारून सुंदर दिसते माझे अंगण पहा हे गडे
मोठ्ठी रांगोळी काढून रंग त्यात चला आता भरू 
चला बाई सकाळ झाली चला सडा मारू ॥१॥

{बाईंचे गाणे संपते.} 

सहकारी एक: अहो या बाई पहा. राहतात वरच्या मजल्यावर अन वरून सडा मारतात खालच्या रत्यावर.

(एक माणूस गाणे गुणगुणत नळाच्या पाण्याने गाडी धुवत आहे) 

{गीत}
धुवां धुवां धुवां धुवां
कैसा है ये धुवां
प्यार कीआग तुने लगाई
और उठा है यह धुवां

{चाल बदलून}
धुवा धुवा धुवा धुवा
आपली गाडी मस्तपैकी धुवा
कसली आग अन कसले काय
पाणी आले नळाला आपले काय जाय
मग 
धुवा धुवा धुवा धुवा
धुवा धुवा धुवा धुवा


सहकारी दोन: हे गृहस्थ पहा, गाडी सरळ नळाच्या पाण्याला नळी लावून धुवत आहेत.
सहकारी एक: अन या बाई पहा. दररोज सकाळ संध्याकाळ घरासमोरील अंगण धुतात. स्वच्छता पाहीजे त्यांना.
सहकारी दोन: या मावशी पहा, किती तरी पाणी कपडे धुण्यासाठी चुकीचे वापरत आहेत.
सहकारी एक: ते भाऊ पहा, सरळ नदीतच त्यांची जनावरे धुवत आहेत.


सुत्रधार: मंडळी, असे पाणी वाया घालवू नका. पाणी महत्वाचे नैसर्गीक वरदान आहे. सर्व सजीवांना पाण्याची आवश्यकता आहे. जितका मानवाचा पाण्यावर हक्क आहे तितकाच हक्क इतर सजीवांचा पाण्यावर आहे. कित्येक विकसनशील देशांत जनावरे जे पाणी पितात तेच पाणी तेथल्या नागरीकांना नाईलाजाने प्यावे लागत आहे. त्याने तेथील रोगराईदेखील वाढली आहे.


सहकारी एक: पाणी जपुन वापरा, पिण्याचे पाणी इतर कामासाठी वापरू नका.
सहकारी दोन: सडा मारू नका. वाहन कमी पाण्यात धुवा. धुणी भांडी स्वच्छ करतांना पाणी कमी वापरा.
सहकारी एक: नळाच्या तोट्या बंद करा. पाणी वाया जावू देवू नका.
सहकारी दोन: पावसाचे पाणी अडवा, जिरवा. तरच पाण्याची समृद्धी येईल.
सहकारी एक: बचत पाण्याची, समृद्धी जीवनाची!


सुत्रधार: चला मित्रांनो, आज आपण पाणी बचतीचा संकल्प करू. आपल्या मुलाबाळांच्या पुढच्या पिढीसाठी पाणी राखून ठेवू.


(सुत्रधार अन सहकारी रांगेत हात जोडून उभे राहतात अन गीत गातात)

नका वाया घालवू पाणी
वाया घालवाल तर होईल पाणीबाणी || धृ||

नका मारू सडा
होईल राडा रोडा
नका पाणी फेकू
नका शिळे पाणी टाकू
नका धुवू घोडा अन गाडी
तसे केले तर होईल पाणीबाणी||११||

पाणी शिळे होत नसते
पाणी वरदान असते
पाणी जीवन अनमोल
तुम्ही जाणा त्याचे मोल
ऐका तुम्ही पाषाणाची वाणी
वाया घालवाल तर होईल पाणीबाणी ||२||

- पाषाणभेद
२३/०६/२०१९

दे दे दे दे दे दे दे

दे दे दे दे दे दे दे
अगं दे दे दे दे दे दे
जास्त वेळ नाही पण एकदा तरी दे
जास्त वेळ नाही पण थोडा वेळ तरी दे
किती वेळ झाला सारखा हातात घेते
तु जशी मालकीण मी पण मालक आहे
माझ्याच घरात मला चोरी झाली
मालकपणाची शान थोडी तरी दाखवू दे
दे दे दे दे दे दे दे
सारखं सारखं नवर्याला घालून पाडून बोलते
(चाल सोडून:-
भाजी आणा, दळण आणा, इस्त्री करा, डबा भरा)
महत्वाचे ते काम सोडून इतर कामे करवते
वैतागलो मी आता मला विरंगुळा हवा थोडा
सारखा रिमोट हातात ठेवते थोडा मला पण दे
सगळी क्रिकेट मॅच नाही पण हायलाईट्स तरी पाहूदे
दे दे दे दे दे दे दे
अगं दे दे दे दे दे दे
जास्त वेळ नाही पण एकदा तरी दे
जास्त वेळ नाही पण थोडा वेळ तरी दे
अगं दे ना गं
- पाषाणभेद
१८/०६/२०१९