Sunday, July 19, 2020

कथा: अधांतरी त्रिकोण

विषय मराठी युवकभारती (प्रथम भाषा), इयत्ता: बारावी
महाराष्ट्रीय राज्य पाठ्यपुस्तक अवलोकन व टिप्पणी संशोधीत खाजगी मंडळ, पुणे-१२
अशासन निर्णय क्रमांक - नअभ्यास-१२१३/ (प्रअ ८६२) एएसडीएफ/४ दिनांक ३१/०४/२० अन्वये विस्थापन करण्यात आलेल्या समितीच्या दिनांक ३०/०२/२० रोजीच्या बैठकीत हा पाठ या अशैक्षणीक (कोरोना काळ) वर्षापासून निर्धारीत करण्यात येत आहे.
विद्यार्थी तसेच शिक्षकांसाठी सुचना: सदर पाठ आपल्या स्मार्ट फोनमधील दक्षशिक्ष या अ‍ॅपद्वारे पाठावरील क्यू. आर. स्कॅनरद्वारे स्कॅन केल्यास अध्यापनास उपलब्ध आहे.
पाठ क्रमांक: ५ - कथा: अधांतरी त्रिकोण ले. पाषाणभेद (जन्मतिथी उपलब्ध नाही ते मृ. शके १६६१ किंवा ६२)
=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*
अप्रसिद्ध समिक्षक, विनोदी लेखक, कवी, टिकाकार, प्रतिसाद लेखक. लहाणपणापासूनच ते आंतरजालावर लेखन करत असत. तेथील टिका वाचून टिकाकार झाले. विविध वाडःमयप्रकार हाताळले. इतर टिकाकारांना तोंड दिले. पाभेचा चहा, युगलगीतः बाई इथंच ठोकू का हा खिळा?, मुक्त'पिठीय' लेख: अमेरीकेचे राष्ट्रप्रेम आदी असंख्य लेख आंतरजालावर प्रसिद्ध. द्वितीय आंतरआकाशगंगा मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद भुषविले.
प्रस्तूत पाठात लेखकाने बालपण ते तरुणपणाचे चित्र रेखाटले आहे. कथानायक आपल्या अभ्यासाकडे लक्ष देवून इतर सर्व गुण आपल्या अंगी कसे बाणवत होता याचे विवेचन केले आहे. मैत्री, कष्ट, चांगला स्वभाव, खिलाडू वृत्ती, गरीबांविषयी- सर्व धर्मांविषयी कणव आदी गुण कथानायकात विषद होतात. आजच्या युवकांमध्ये हे गुण अंगी बाणावेत ह्या उद्दात्त हेतूने प्रस्तूत पाठ लिहीला आहे असे लेखकाने आम्हास खाजगी बैठकीत सांगितलेले आहे.
=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*

कथा: अधांतरी त्रिकोण

माझे नाव अमृत. आमचा मालेगावला कापडाचा कारखाना होता. निरनिराळ्या प्रकारचे कापड त्यात तयार होत असे. गावाच्या बाहेर मोठी जागा असल्याने आमचा कारखाना तेथे होता. गावात राहण्यापेक्षा आम्ही कारखान्याच्या आवारातच राहत असू. तेथे आमचा बंगला होता. बंगल्यातल्या वरच्या मजल्यावर माझी खोली होती. तेथेच मी अभ्यास करत असे. एखाद्या वेळी तेथे अभ्यासाला रहिम येत असे. अभ्यास करण्याऐवजी आम्ही मस्तीच जास्त करत असू. बंगल्याच्या बाजूची चिंच आणि जांभळाचे झाड टेरेसच्या उंचीची असल्याने आम्ही ती फळे पाडण्याचा प्रयत्न करत असू. आम्हाला ते जमत नसे. मग आमचे माळी काका लांब बांबूला आकडा लावून आम्हाला चिंच आणि जांभळे काढून देत. 

एका बाजूला असलेल्या कारखान्याच्या मोठ्या पटांगणाच्या बाजूला काही कामगारांची घरे होती. त्या घरांत मोजके, जे गरजू कामगार होते त्यांचीच राहण्याची सोय वडीलांनी केलेली होती. इतर कामगार आसपासच्या वस्त्यांमधून येत. कामगार आणत असलेल्या सायकलीपैकी लहान सायकल घेवून मी ती चालवायला तेथेच शिकलो.  मैदानात मी आणि कामगारांची मुले खेळत असू. आताच्यासारखा अभ्यास तेवढा काही नव्हता. तेव्हा मी काय असेल सहावी सातवीत. दुपारी बारापर्यंत शाळा सुटली की पूर्ण संध्याकाळपर्यंत आम्ही निरनिराळे खेळ खेळत असू. पकडापकडी, चोर पोलीस आदी खेळण्यासाठी किंवा लपण्यासाठी कारखाना आणि आमचा बंगला तेथील विस्तीर्ण पटांगण अगदी योग्य जागा होती. त्यात करीमचाचा यांचा मुलगा असलेला रहिम आणि वडीलांविना पोरकी झालेली देवीका हमखास असे. तसे आम्ही तिघेही एकाच वयाचे होतो. देवीकाला आम्ही सारे देवू म्हणत असू. तिची आई आणि मावशी आमच्याच कारखान्यात रंगकाम करणार्‍या विभागात काम करत असत.

मधूनच आम्हाला आठवण झाली की आम्ही कारखान्यात चक्कर मारत असू. आम्हाला तेथे पाहून वडील रागवत. कारखाना म्हटला की तेथे रांगेने यंत्रमाग, कापडाची रिळे, दोर्‍यांच्या बॉबीन्स आदी सामान पसरलेले असायचे. एकदा एक नवे मशीन कारखान्यात आणले आणि ते बसवतांना अपघात होवून करीमचाचा जायबंदी झाले. त्यांचा डावा पाय अधू झाला. त्या अपघातानंतर  ते कुबडी घेवून कारखान्यात हलके काम करायचे किंवा मेन गेटवर आल्या गेल्या मालाची नोंद ठेवायचे. कारखान्यातल्या वजन काट्यावर आम्ही वजन करणे, त्यात बसून झोका खेळणे आदी करत असू. मी मालकाचा मुलगा असल्याने कुणी हरकत घेत नसे. पण आता ते सारे आठवले की हसू येते. आम्हा लहान मुलांबरोबर नशीबाने कोणताही अपघात झाला नाही.

आमचा कारखाना एक प्रकारचे मोठे कुटूंबच होते. दिवाळीच्या दिवसांत फटाक्यांची रेलचेल असे. वडील हौसेने फटाके आणत आणि आम्ही लहान वयाची मुले फटाके फोडण्यास संध्याकाळपासून सुरूवात करत असू. रहिम तसा धिट होता. तो लहान फटाके हातामध्ये वात पेटवून फेकत असे. देवू तशी भित्री अन भोळी असल्याने तो नेमका तिच्या बाजूलाच फटाके फोडत असे. ते पाहून देवूची आई त्याला रागवे. मग मात्र तो पण शांतपणे इतर ठिकाणी फटाके फोडत असे.

ईदच्या दिवशी रहिमची आई, अमीनाबी, आम्हाला घरी खिरखुर्मा पाठवत असे. मला मात्र त्यांच्या घरीच तो खायला आवडत असे. ईदच्या दिवशी त्यांच्या चाळीतील अनेक कुटूंबे तेथे आलेली असत. तेव्हा खिरखुर्मा सगळ्यांना देतांना तिची बिचारीची धांदल उडत असे. एकतर खिरखुर्मासाठी काचेच्या वाट्या कमी पडत आणि त्यात लोकांची गर्दी. मग माझी आई स्वत:च कपाटातून काचेच्या वाट्या घेवून येई आणि रहिमच्या आईला मदत करत असे. आज मी मोठा झालो असलो आणि इतर ठिकाणी खिरखुर्मा खाल्लेला असला तरी त्या वेळच्या खिरखुर्म्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. तशी चव त्यानंतर कधीही चाखायला मिळालेली नाही. 
 
गणपतीच्या दिवसात रहिमचाचा मातीचा गणपती तयार करत असत. त्यांच्या हातात कला होती. दरवर्षी ते नव्या पद्धतीचा गणपती बनवत. मला आठवते, मी नववीत असतांना माझ्या आग्रहामुळे त्यांनी त्या वर्षी झुल्यावरचा गणपती केला होता. त्यांनी कारखान्यातले सामान वापरून तो झुला हलता केला होता. तो इतका आकर्षक झाला होता की तो देखावा पहायला अगदी सोयगाववरूनही लोक आले होते.

या दरम्यान आम्ही लहान मुले मोठी झाले होतो. दहावीला मला चांगले गुण मिळाले. आई तर अगदी आनंदून गेली होती. देवूला तर माझ्यापेक्षा कितीतरी अधीक गुण मिळाले होते. हुशारच होती ती. रहिम मात्र कमी गुण मिळाले म्हणून नाराज झाला होता. तसे त्याचे गुणही काही कमी नव्हते. चांगले ६२% होते ते. आणि गणितात तर त्याला दिडशे पैकी थोडेथोडके नव्हे तर १३५ गुण मिळाले होते. बिचार्‍याने इंग्रजीत मार खाल्ला होता.

माझा मोठा भाऊ अरिहंत हा वडीलांबरोबर कारखान्याचे काम बघत असल्याने मी सुद्धा कारखाना सांभाळण्याच्या कामाला आईचा तिव्र विरोध होता. मी शिकून काहीतरी वेगळे करावे अशी तिची इच्छा होती. तिच्या माहेरी, माझा मामाचा मुलगा पारस हा सीए झालेला होता. मी पण सीए च करावे असे त्याने आईला भरवलेले होते. सीए केले तर पुढे मी मोठा झाल्यावर कारखान्याच्या व्यापाला उपयोगात येईल असे त्याने वडीलांना सांगितले होतेच. आता आमचे अजून दोन कारखाने गावाच्या जवळ असणार्‍या एमआयडीसीत झाल्याने कामाचा ताणही वाढलेला होता. झालाच तर फायदाच होणार असल्याने माझी सीए होण्यास वडीलांची काहीच हरकत नव्हती. आईला देखील मी काहीतरी वेगळे करण्याचे समाधान लाभत होते.

या सर्व कारणांमुळे टीएनजे कॉलेजमध्ये मी कॉमर्समध्ये प्रवेश घेतला. माझ्याच वर्गात देवीकाही होती. रहिमने सायन्सला प्रवेश घेतला. त्याचा माझा वर्ग आता वेगळा झालेला होता.

लहाणपणापासून देवीका माझ्या सोबत असल्याने तिच्याकडे मी काहीसा आकर्षित झालेलो होतो. रहिमलादेखील ती आणि तिलाही रहिम आवडत असावा असे मला वाटायचे. एक दोन वेळा मी त्यांना एकत्र बघून रहिमचा मला राग आलेला होता. देवू मात्र माझ्या वर्गात असल्याने मला तिच्याबरोबर जास्त वेळ राहता येत असे. आम्ही दोघेही माझ्या स्कुटरवरून कॉलेजला जात असू. तिचा आणि माझा खाजगी क्लास एकच होता. देवू आणि मी जास्तीत जास्त वेळ एकत्रच राहत असू. कॉलेजमध्ये वर्गमित्र आम्हाला एकमेकांच्या नावाने बोलवून चेष्टादेखील करत असत. तिच्या मनात काय आहे याचा मला पत्ता नव्हता. बरे, ती मला आवडते म्हणजे ते प्रेमच आहे असे मला वाटत नव्हते. मुख्य म्हणजे ती अभ्यासू होती. गरीबी जवळून पाहिली असल्याने तिला अभ्यासाचे महत्व पहिल्यापासुन पटलेले होते. त्यात बारावीचे वर्ष म्हणजे मोठा अभ्यास होता. शिकून तिला प्राध्यापक व्हावेसे वाटते असे तिने मला कित्येकदा सांगितलेले होते.

रहिम त्याच्या प्रॅक्टीकल्स आणि कॉलेज, क्लासमधून जेव्हा वेळ मिळे तेव्हा आमच्या मिसळे. जेव्हा जेव्हा ती रहिमशी बोले तेव्हा माझ्या मनात आक्रंदन सुरू होई. त्यांची घरेही आजूबाजूलाच असल्याने ते दोघेही माझ्या व्यतिरीक्त एकत्र असत. रहिम जरी माझा मित्र होता तरी देवीकेच्या बाबतीत त्याची मला असूया वाटत असे. देवीकाने केवळ माझ्याशीच बोलावे असे मला वाटे. मी मोठ्या घरातला आणि ती एका सामान्य घरातली असल्याने ती मला आपल्या प्रेमाबद्दल हो म्हणणार नाही असेही मला मनात वाटे. या लहान मोठेपणाच्या समजानेच ती रहिमशी मैत्री राखून असावी असेही एक मन म्हणत असे.

बारावीची परीक्षा संपली. आम्हा दोघांना चांगलेच गुण मिळाले होते. आम्ही दोघांनी रितसर त्याच कॉलेजध्ये पदवीसाठी प्रवेश घेतला. रहिमला इंजिनीअरींगच्या सीईटी परिक्षेत उत्तम गुण मिळाल्याने पुण्याच्या गव्हर्नमेंट कॉलेजला प्रवेश मिळाला. करीमचाचा तर एकदम आनंदून गेले होते. त्याला होस्टेलवर सोडायला मी त्याच्याबरोबर पुण्याला गेलो असतांना रहिमने त्याचे मन मोकळे केले. देवीकाबद्दल माझे जसे प्रेम होते तसेच त्याचेही देवीकावर प्रेम होते. मी जसे तिला माझ्या प्रेमाबद्दल विचारू शकलो नाही तसे त्यानेही तिला कधी विचारले नव्हते की तसे भासू दिले नव्हते. देवू त्याच्याबद्दल किंवा माझ्याबद्दल असलाच विचार करत असेल याची त्यालाही खात्री नव्हती. मी त्याला होस्टेलवर सोडून निघालो तेव्हा तो हमसून हमसून रडला. देवू बद्दल तो जास्तच भावनाशील होता. मी देखील माझे देवूबद्दलचे मत त्याला सांगितले. प्रेमात गरीब श्रीमंत असला प्रकार नसतो याबद्दल तो मला अन मी त्याला खात्री देत होतो.

रहिमला सोडून मी गावी परतलो. माझे आणि देवूचे कॉलेज सुरू झाले. ती आता माझ्याबरोबर कॉलेजला येत नसे. परंतु आमचे नेहमीसारखे सरळ आयुष्य चालू झाले. रहिम जरी तेथे नव्हता तरी देवू काही त्याच्याबद्दल बोलत नव्हती. त्यांचा संपर्क आता होत नव्हता. त्याच्याबद्दल ती माझ्याकडे चौकशी करत नव्हती. माझ्याशी ती हसून खेळून राहत असे. कॉलेजमधल्या अभ्यासाविषयी गप्पा मारत असे. मैत्रीच्या पलिकडे बोलायला ती चुकूनही तयार नसे.

त्यावर्षी बाहेर पाऊस पडत होता. देवू अन तिची आई पावसात भिजत आमच्या घरी आल्या. देवूच्या आईने देवूचे लग्न ठरल्याची बातमी दिली. नवरा मुलगा त्यांच्याच समाजातला, सरकारी नोकरीत, पीडब्ल्यूडीत वरिष्ठ इंजिनीअर या पदावर होता. मुख्य म्हणजे तो देवूला पुढे शिकायला मदतही करणार होता. तिच्या एकंदरीत वर्तवणूकीवरून ती अगदी आनंदी भासत होती. माझ्या आईने साखर भरवून तिचे तोंड गोड केले. मला तर तो एक धक्काच होता.

त्या वर्षीच्या दिवाळीनंतर लगेचच देवूचे लग्न मुलाच्या गावीच लागणार होते.

फटाक्यांविना त्या वर्षीची माझी दिवाळी मात्र सुन्न होती.

- पाषाणभेद
१९/०७/२०२०

+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=
स्वाध्याय कृती
+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=
१) कृती करा.
(१) कथानायकाने सांगितलेल्या लहाणपणाच्या गमती: अ) ________________ आ) ______________
(२) कथेतील मुलगा खेळत असलेले खेळ: अ) ________________ आ) ______________
(३) कथेतील तिन पात्रे: अ) ________________ आ) ______________इ)______________
२) खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा.
(१) माळी काका लांब बांबूला आकडा लावून पैसे काढून देत असत.
(२) त्या वेळच्या खिरखुर्म्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे.
(३) गणपतीच्या दिवसात करिमचाचा मातीचा गणपती तयार करत असत. त्यांच्या हातात कला होती.
(४) देवूच्या आईने देवूचे लग्न ठरल्याची बातमी दिली.
३) थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) अमृत रहिमला होस्टेलमध्ये सोडायला का गेला होता?
(२) देवीका आनंदात का होती?
(३) देवीका अन तिची आई लग्नाची बातमी सांगायला अमृतच्या घरी का गेल्या?
४) दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा पुन्हा भरा.
(१) देवीकाबद्दल माझे जसे ______ होते तसेच त्याचेही देवीकावर _______ होते. (अभ्यास, प्रेम, मन)
(२) आम्ही दोघेही माझ्या _________ कॉलेजला जात असू. (सायकल, स्कूटर, कार)
(३) देवू तशी भित्री अन _______ असल्याने तो नेमका तिच्या बाजूलाच फटाके फोडत असे. (अभ्यासू, कष्टाळू, भोळी)
५) व्याकरण
(अ) खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा.
(१) कारखाना म्हटला की तेथे रांगेने यंत्रमाग, कापडाची रिळे, दोर्‍यांच्या बॉबीन्स आदी सामान पसरलेले असायचे.
(२) मला तर तो एक धक्काच होता.
(आ) खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समासाचे नाव लिहा.
(१) भोळीभाबडी
(२) पटांगण
६) स्वमत
(अ) "फटाक्यांविना त्या वर्षीची माझी दिवाळी मात्र सुन्न होती", या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
(आ) "तिच्या एकंदरीत वर्तवणूकीवरून ती अगदी आनंदी भासत होती.", या वाक्याचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
७) उपक्रम
पस्तुत पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांची यादी करा. त्यासाठी वापरले जाणारे मराठी शब्द लिहा.
८) तोंडी परीक्षा
'माझ्या जीवनातील आनंदाचे क्षण' या विषयावर पाच मिनीटांचे भाषण सादर करा.

Saturday, July 11, 2020

पोस्ट वॉरंटी वाहन दुरूस्ती, रिपेअर सेंटर्स, गॅरेजेस इत्यादी बाबत चर्चा

एका व्हाअ‍ॅ गृपमधील झालेल्या चर्चेचा धाग्याच्या रुपाने गोषवारा घेतला गेला आहे. आपली मते येथे मांडावीत जेणे करून पुन्हा चर्चा होवून मत मतांतरात नवे मुद्दे पुढे येतील.  

आपले जे काही वाहन असते भले ते दुचाकी असो, चारचाकी असो, तर ते वाहन वॉरंटी कालावधीत आपण अधिकृत देखभाल केंद्रात त्याची देखभाल करून घेत असतो. वॉरंटी कालावधी संपला की सर्वच कंपन्यांचे वार्षिक देखभाल करार असतात. असा करार केला तर, तिन अथवा चार प्रिव्हेंटिव्ह सर्वीसेस वर लेबर चार्जेस मध्ये सुट, स्पेअर पार्टवर सुट अशी ऑफर असते. तसेच किरकोळ दुरुस्तीचे पैसे ते लावत नाहीत.
आपल्यापैकी बरेच जण असा वार्षिक देखभाल करार आपल्या वाहनासाठी करत असतील.

काही जण असा करार करण्याऐवजी आपल्याला आवडेल त्या खाजगी गॅरेज मध्ये कसलाही करार न करता मनाप्रमाणे प्रिव्हेंटीव सर्वीस करवून घेतात. अनेक जण तर वाहनाकडे दुर्लक्ष करून असली प्रिव्हेंटीव्ह सर्वीसकडे लक्ष न देता वाहन केवळ ब्रेकडाऊन झाल्यावरच गरज असेल तरच दुरुस्ती करवून घेतात किंवा आवश्यक तो स्पेअर जुगाड करून चालवून घेतात.

वॉरंटी संपल्यानंतरच्या कालावधीत वाहनाचा वार्षिक देखभाल करार करावा का? भले तो करार अथोराईज्ड सर्वीस सेंटर मध्ये नसेल पण वार्षिक करार असेल तर आपण तिन चार महिन्यात वाहनाची सर्वीस आपण बळजबरी का होईना करवून घेत असतो.

काही म्हणतील की असल्या देखभाल करार करण्यापेक्षा तो न करवून ते पैसे वाचवून वाहन आपण आपल्या मर्जीच्या सर्वीस स्टेशनला सर्वीस करु शकतो.

तर मंडळी, चर्चेचा मुद्दा हाच आहे. वाहन वॉरंटी कालावधी संपल्यानंतर कसे देखभाल करावे?
पिरिऑडीक देखभाल करार करावा का?
न केल्यास वाहन कसे मेंटेन करावे?

=================================

अथोराईज्ड सर्वीस किंवा तत्सम सेंटरमध्ये गाडी दुरूस्त अथवा ठरावीक कालावधीच्या मेंटेंनंस करारामुळे होणारे फायदे:-
- अथोराईज्ड सर्वीस सेंटर मध्ये (किंवा तत्सम ठिकाणी ) ठरावीक कंपनी किंवा मेकच्याच गाड्या येत असतात. ( उदा. टाटा च्या मोठ्या गाड्यांसाठी वेगळे अन लहान गाड्यांसाठी वेगळे सर्वीस सेंटर आहेत.)
- कंपनी प्रशिक्षीत कामगार, मेकॅनीक उपलब्ध असतात. एखादा नवीनच मेकॅनीक जरी असेल तरी तो त्याच त्याच गाड्यांवर काम करून त्याचा हात बसून जातो. 
- त्यांच्या कडच्या मेकेनीकला महिन्याचा पगार ठरलेला असल्याने कामे येवोत अथवा कमी येवोत त्यांना पगाराची शास्वती असते. 
- काही मोठी अडचण (प्रॉब्लेम) असलेल्या गाड्या त्यातील मेकॅनीकला अनुभवानुसार दुरूस्तीला दिल्या जातात. 
- गाडीच्या देखभालीसाठी सर्व टुल्स, स्पेअर्स हे एकाच छताखाली मिळतात. त्यामुळे कामाचा उरक वाढतो. उदा. इंजीनचे काम कराचे असेल तर काही गिअर किंवा पार्ट काढण्यासाठी योग्य तेच टुल लागते.
- तिन अथवा चार प्रिव्हेंटिव्ह सर्वीसेस वर लेबर चार्जेस मध्ये सुट, स्पेअर पार्टवर सुट अशी ऑफर असते. तसेच किरकोळ दुरुस्तीचे पैसे ते लावत नाहीत.
- शक्यतो असे सेंटर स्वच्छ, प्रकाश असलेले, प्रसन्न असतात. जेवणाच्या वेळा, सुटीच्या वेळा, रजा आदी असल्याने त्याचा सुयोग्य परिणाम कामावर होतो.
- स्पेअर हे डुप्लीकेट असण्याचा प्रश्न येत नाही. किंमत ठरलेली असते. त्यामुळे ग्राहकाला फसवले गेल्याचा फील येत नाही. 
- ग्राहकाच्या सुविधेतेमध्ये चहा, पाणी, स्वच्छतागृह आदी सर्व असते. ( अर्थात याची किंमत बिलात वसूल होत असणार पण ती सर्व ग्राहकांमध्ये विभागली जाते.) 
- जे जे स्पेअर ठरावीक कालावधीत बदलावेच लागतात ते ते बदलल्या जातात किंवा तसा सल्ला तरी दिला जातो.
- वाहन दुरूस्तीचा इतिहास हा नोंद केला जातो. त्याचे किलोमिटर रंनींग, काय दुरूस्ती केली ते ते सारे नोंद असल्यामुळे वाहन खरेदी- विक्रीच्या वेळी हा उतारा पाहील्यास ग्राहकाचा फायदा होतो.
- देखभाल करार हा संपूर्ण भारतातील सर्वीस स्टेशन मध्ये लागू होत असल्याने प्रवासी वाहन भारतात कोठेही मेंटेन होवू शकते.
- रोड साईड असीस्टंट उपलब्ध असल्याने रस्त्यात कोठेही गरज असेल तर त्यांची माणसे वाहन दुरूस्तीला येवू शकतात.
- अपघातग्रस्त वाहनांची देखभाल आणि इंन्शूरंसची कामे अथोराईज्ड सर्वीस किंवा तत्सम सेंटरमध्ये केल्यास ग्राहकाला मानसीक त्रास कमी होतो. 
- आजकालची वाहने ही कॉम्पूटराईज्ड किंवा सेंसर बेस्ड असल्याने त्याचे सॉप्टवेअर, ब्लॉक डायग्राम ह्या अथोराईज्ड ठिकाणीच उपलब्ध असतात.  

----------------------------------------------------
अथोराईज्ड सर्वीस किंवा तत्सम सेंटरमध्ये गाडी दुरूस्त अथवा ठरावीक कालावधीच्या मेंटेंनंस करारामुळे होणारे तोटे:-
- अथोराईज्ड सर्वीस सेंटरमध्ये केवळ चालू काम केले जाते असा ग्राहकाचा समज होवू शकतो.
- वाहन आपल्या परोक्ष देखभाल, दुरूस्त केले जाते. वाहनाच्या अगदी जवळ उभे राहू दिले जात नाही. काचेपलीकडून पहावे लागते. 
- स्पेअर, ऑईल आदींच्या किंमती बाजारापेक्षा महाग वाटू शकतात. ( परत त्यात टॅक्स पेड बील असते.)
- दुरूस्ती करणारे मेकॅनीक्स पगारी असल्याने ग्राहक पुन्हा आला नाही तरी त्यांचा पगार चालू असतो.
- एखादा स्पेअर किंवा पार्ट गरज असल्यास संपूर्णच बदलावा लागतो. (उदा. वायरींग मध्ये काही प्रश्न असेल तर संपूर्ण वायरींग सेट किंवा वायर हारनेसच बदलावा लागतो. वायर जोडणे, टेप मारून चिकटवणे आदी प्रकार सहसा होत नाहीत. यामुळे दुरूस्तीची किंमत वाढते.)
- देखभाल करण्यासाठी वाहन ठरावीक जागीच (अर्थात शहरात किंवा संपूर्ण देशात त्यांची साखळी-चेन असते) न्यावे लागते. त्यातही वेटींग लिस्ट आदी प्रकार क्वचित होत असतील.
------------------------------------
आपल्या ओळखीच्या किंवा रोड साईडच्या सेंटर/ गॅरेजमध्ये वाहन ठरावीक कालावधीच्या मेंटेंनंस करार न करता दुरुस्तीचे फायदे:

- आपल्या ओळखीचे रिपेअर सेंटर/ गॅरेज असल्यामुळे मित्राच्या नात्याने देखभालीत सल्ला मिळू शकतो.
- आपल्या डोळ्यासमोर वाहन दुरूस्त होते.
-  एखादा स्पेअर किंवा पार्ट गरज असल्यास त्यातील काही भागच दुरूस्त करून दिला जातो. त्याने खर्चात बचत होते.
- बाजारभावापेक्षा कमी भावात स्पेअर, पार्टस यांच्या किंमती असू शकतात.
- रोडसाईड गॅरेज कोठेही उपलब्ध असल्याने आपण आपल्या मर्जीनुसार तेथे वाहन नेवू शकतो.
- मेंटेनंस करार केलेला नसल्याने तो करार करण्याची किंमत वाचू शकते.
--------------------------------------------
आपल्या ओळखीच्या किंवा रोड साईडच्या सेंटर/ गॅरेजमध्ये वाहन ठरावीक कालावधीच्या मेंटेंनंस करार न करता दुरुस्तीचे तोटे:

- आपल्या ओळखीच्या किंवा रोड साईडच्या सेंटर/ गॅरेजमध्ये अनेक कंपनी किंवा अनेक मेकच्या गाड्या येत असतात. त्यामुळे तेथे कंपनी प्रशिक्षीत कामगार, मेकॅनीक उपलब्ध असेलच असे नाही. एखादा नवीनच मेकॅनीक असेल तर त्याला एखादे तंत्र किंवा एखादी गाडी नवी वाटू शकते.  
- त्यांच्या कडच्या मेकेनीकला महिन्याचा पगार ठरलेला नसल्याने कामे येवोत अथवा कमी येवोत त्यांना पगाराची शास्वती नसू शकते. बहूदा एखादाच मेकॅनीक सगळ्या गॅरेजची मदार सांभाळतो. 
- त्यातील मेकॅनीकला देखील काही कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम असल्यास दुसर्‍याची मदत घेण्यावर मर्यादा येतात. 
- गाडीच्या देखभालीसाठी सर्व टुल्स, स्पेअर्स हे एकाच छताखाली न मिळाल्याने चालढकल केली जाते. त्यामुळे कामात दिरंगाई, स्पेअरमध्ये चालढकल केली जाते.
- रोडसाईड गॅरेजवाल्यांकडे योग्य ते टुल्स असतातच असे नाही.
- शक्यतो असे सेंटर अस्वच्छ, प्रकाश नसलेले, कळकट असतात. जेवणाच्या वेळा, सुटीच्या वेळा, रजा आदी  नसल्याने त्याचा अयोग्य परिणाम कामावर होतो.
- स्पेअर हे डुप्लीकेट असण्याचा संभव होवू शकतो. किंमत ठरलेली नसते. त्यामुळे ग्राहकाला फसवले गेल्याचा फील येवू शकतो. 
- ग्राहकाच्या सुविधेतेमध्ये चहा, पाणी, स्वच्छतागृह आदी नसते.
- जे जे स्पेअर ठरावीक कालावधीत बदलावेच लागतात ते ते बदलल्या जातीलच याची खात्री नसते.
- "चलता है", ही प्रवूत्ती या ठिकाणी पहायला मिळते. 
- वाहन दुरूस्तीचा इतिहास नोंद केला जात नाही.
- देखभाल करार केल्यास हा फक्त त्याच सर्वीस स्टेशन मध्ये लागू होत असल्याने आपले वाहन इतर ठिकाणी दुरूस्त केल्यास आर्थीक बोजा ग्राहकावर पडतो.
- रोड साईड असीस्टंट उपलब्ध  नसल्याने रस्त्यात कोठेही गरज असेल तर त्यांची माणसे वाहन दुरूस्तीला येवू शकत नाहीत.
- अपघातग्रस्त वाहनांची देखभाल आणि इंन्शूरंसची कामे तेथे होत नसल्यास दुसरीकडे नेवून दुरूस्ती करावी लागते.
- आजकालची वाहने ही कॉम्पूटराईज्ड किंवा सेंसर बेस्ड असल्याने त्याचे सॉप्टवेअर, ब्लॉक डायग्राम तेथे उपलब्ध असतीलच असे नाही. 

--------------------------------------------
काही सदस्यांचे प्रतिसाद (नामोल्लेख टाळलेला आहे.):

गाडीने आवाज केला की डॉक्टर कडे न्यावं ह्या मताचा मी आहे

कुठल्याही पॅकेज मध्ये ते घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्याचा जास्त फायदा असतो.
त्यापेक्षा फायरिंग नीट ऐकावं, चार चाकी असेल तर Malfunction light लागतोच, तो लागला की न्यावं गॅरेजमध्ये ह्या मताचा आहे मी

गाडीचं आयडलिंग, फायरिंग रोज ऐकत असू तर बिनसल्यावर लगेच जाणवतं. 

प्रायव्हेट garage वाला आपल्या दोस्ती खात्यात घेतलेला आहे. तो योग्य वेळी योग्य सल्ला देतो

--------------------------------------------
हे झाले ब्रेकडाऊन मेंटेनन्स.

प्रिव्हेंटिव मेंटेनन्स असेल तर वाहन रात्रीतून कधीही बाहेर चालवायला छातीठोक काढता येते.  

वेळोवेळी स्पेअर जसे  स्पार्क प्लग, टायर रोटेट बॅलसींग, दुचाकीमध्ये कार्बोरेटर साफ करणे, गाडी धुणे आदी कामे होवून जातात.

अन तुम्हाला जसा मित्र गॅरेजवाला मिळाला तसे सगळ्यांनाच मिळेल असे नाही. 

--------------------------------------------
>>> गाडीने आवाज केला की डॉक्टर कडे न्यावं ह्या मताचा मी आहे

असहमत

>>> प्रायव्हेट garage वाला आपल्या दोस्ती खात्यात घेतलेला आहे. तो योग्य वेळी योग्य सल्ला देतो

सहमत

वकील, डॉक्टर प्रमाणे विश्वासू गॅरेज वाला पकडायचा... चुकीचा सल्ला देणार नाही इतपत विश्वास त्याने कमावला पाहिजे. आणि आपल्याकडून आळस झाला तर त्याने चार शिव्या दिल्या पाहिजेत इतका अधिकार त्याला दिला पाहिजे.

मित्र आहे, ओळखीचा आहे म्हणून कधीही रेटमध्ये घासाघीस करू नये, हवे तर त्याच्याकडून एखादेवेळी हक्काने पार्टी घ्यायची पण तो सांगेल तितके पैसे द्यायचे आणि वर थोडे पैसे त्याच्याकडे काम करणाऱ्याला न विसरता द्यायचे.
--------------------------------------------
येस, पैशांच्या बाबतीत मी कधीच घासाघीस करत नाही,

म्हणून मी घरी नसेन तर गाडी  घरून पिकप आणि ड्रॉप केली जाते

शिवाय 
preventive maintenance चं म्हणाल तर मी प्रत्येक मोठ्या ट्रिप पूर्वी गाडी त्याच्याकडे देतो, एक चेकअप होतं, break oil, coolant topup वगैरे. 

जोडीला दर 6 महिन्याने मी स्वतःच गाडी नेऊन देतो आणि सांगतो चालवून बघ, जे गरजेचं वाटेल ते कर

झालंच तर तो करतो, काम नाही केलं तर consultation चार्जेस घेतो
त्यामुळे नातं नीट राहिलेलं आहे
--------------------------------------------
गॅरेजवाल्यांचा, वाहन दुरुस्त करणार्यांचा स्वभाव हा सर्वांशी मैत्री करणारा असाच असतो. 
तो अनेकांचा मित्र असतो. मग आपल्यालाही तो जवळचा वाटू शकतो.

अन आपण जसा गॅरेजवाल्याचा विचार करतो तसा तो त्याच्या ग्राहकांचाही करतच असेल ना?
मला तर कित्येकदा नायट्रोजन भरण्याचेही पैसे अथोराईज्ड वाल्यांनी अशा देखभाल करारामुळे लावलेले नाहीत.

-------------------------------------------- 
एकाचा अनुभव:

मारुती स्विफ्ट डिझायर ची फ्री सर्व्हिस संपल्यावर विक्रेत्याने बरीच विनवणी केली की वार्षिक देखभाल चा करार करा, पण माझा विक्रेत्याच्या गॅरेज मधला अनुभव होता तो चांगला नव्हता, खूप गाड्या असल्यामुळे आणि सगळे पगारी नोकर असल्यामुळे गाडीची व्यवस्थित देखभाल आणि सर्व्हिसिंग होत नव्हती, 
फक्त बिल वाढवण्याकडे कल होता, मग मी माझ्याच ओळखीच्या मारुती मकेनिक ला घरी बोलावून किंवा त्याच्या गॅरेज मध्ये जाऊन सर्व्हिसिंग करू लागलो, त्यात वेळ वाचत होताच, पैसेही वाचत होते आणि आपल्यादेखत काम होत होते.

बुलेट च्या बाबतीत तीच परिस्थिती होती, एका दिवशी 70 ते 80 गाड्या सर्व्हिसिंग करायचा त्यांचा प्रयत्न असायचा, जो कधीच सफल  होत नसे, मग गाडी फक्त धुवून परत करणे वगैरे होऊ लागले,
माझ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न मिळताच मी माझ्या बुलेट मकेनिक कडे जाण्यास सुरवात केली, आता तो व्यवस्थित काम करतो, माझ्या प्रश्नांची उत्तरे देतो, अनुभवी आहे
--------------------------------------------
एकाचा प्रश्न: अगदीच ब्रेकडाऊन झाली तर गॅरेजमध्ये जाणारे यांचा अनुभव काय?

त्याला आलेले उत्तर: नियमित देखभाल केली तर गाडी ब्रेक डाउन होण्याचे प्रमाण नगण्य असते.

आणखी दुसरे उत्तर: ब्रेक डाउन होई पर्यन्त वाट का म्हणून पहायची? गाड़ी वर बसलात कि तुमचा जीव त्या गाडीच्या भरविष्या वर असतो। 50 रुपये वाचवून हात पाय तुटलेले अनेक पाहिलेत.
250 रुपये खर्च करून गाड़ी नीट ठेवणे चांगले कि ब्रेक डाउन नंतर 25000 खर्च करावे हे चांगले?

आणि हेल्मेट न वापरून हार घालून घेतलेले ...
--------------------------------------------
माझ्या मते,
आपली गाडी म्हणजे
चार चाकी / दुचाकी किती रनिंग झाल्यावर सर्व्हिसिंग करायची गरज आहे , याची माहिती आपल्या विश्वासू माणसाकडून करून घ्यावी.
उगाच रनिंग नाही, पण एक वर्षे झाले म्हणून सर्व्हिसिंग करू नये.
तसेच खाजगी, चांगल्या ओळखीच्या माणसाकडून सल्ला घेणे आणि त्या प्रमाणे योग्य मोबदला देऊन काम करणे, हे ठीक राहील.
--------------------------------------------
प्रिवेंटिव मेंटेनेंस चे शेड्यूल ओनर्स मैन्युअल ला दिलेले असतात. तेव्हड़े जरी पाळले तरी आपले वाहन कुठलाच त्रास देत नाही. स्वानुभव आहे.

निव्वळ प्रीवेंटिव मेंटेनेंस मुळे माझी "यक्षज्ञ" वाहन आज 21 व्या वर्षी ही मस्त चालत आहे. नुकताच (कोरोना लॉक डाउन पूर्वी) 4 दिवसात 1800 किलोमीटर फिरून आलो. नियमित ऑयल चेंज, टायर रोटेशन, रेगुलर सर्विसिंग मुळे हे शक्य झाले.
--------------------------------------------
एकदम बरोबर...
पैशासाठी कटकट केली नाही की मालक आणि कारागीर पण खुष असतात...
आणि अनावश्यक दुरूस्ती सांगत नाहीत आणि आवश्यक टाळत नाहीत....
माझा गेरेज वाला पण सांगतो

ये बदलना पडेगा...
तर कधी अभी चार छे महीना चलाओ फीर देखते है
वेळी अवेळी धाऊन पण येतात.
------------------------------------------- चर्चा समाप्त ---------------------------------------


वाहनाचे मालक आपण जरी असलो तरी वाहन हे एक यंत्र आहे असे समजून त्याची योग्य ती काळजी एका यंत्राप्रमाणे घेतली तर वाहन आपल्याला चांगला अनुभव देवू शकते. ते कोठे दुरूस्त करायचे हा मात्र ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

( सदर लेखाच्या लेखकाचा कोणत्याही वाहन कंपनीशी किंवा अथोराईज्ड सर्वीस किंवा तत्सम सेंटर अथवा गॅरेजशी संबंध नाही.) 

माझा प्रश्न: भारतात किंवा परदेशात, विकसीत देशात वाहन धारक ग्राहक आणि वाहन विक्रेते, रिपेअर करणारे यांच्या बाबतीत जी काही मानसीकता असते त्याचा पद्धतशीर अभ्यास करवणारी अभ्यास शाखा किंवा अभ्यासक्रम विकसीत झाला आहे काय? किंवा एखादा विषय, किंवा असा अभ्यास लेखन करणारे पुस्तक अभ्यासक्रमात आहे काय?  

- पाषाणभेद
११/०७/२०२०