Monday, June 28, 2021

वडीलांना काव्यसुमनांजली

तुमच्या जाण्याने जग सुने झाले
सुख सारे असूनही भासे काहीतरी उणे ||

किती आठव काढावी
किती स्मृती जपावी
त्या आठवांनी डोळा पाणी आले
तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||१||

रिक्त झाली तुमची नेहमीची जागा
तुम्ही दिसणार तेथे आम्हा असे आशा
असे कसे मधूनच जग सोडूनिया गेले?
तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||२||

कार्ये केली अनेक; ओंजळ भरून दिले दान
दया केली दीनांवर; सदा काळजी काळीज भरून
रिक्त राहीले स्वतः केले दुसर्‍यांचे भले
तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||३||

आयुष्यातले दु:ख कधी जाणवू दिले नाही
शरीराच्या कष्टाने डोळा पाणी आणले नाही
काळाने तुम्हाला असे अकाली का नेले?
तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||४||

(माझे वडील जाण्याला आज सव्वा महिना झाला. वडीलांना हाक मारण्यास मी पोरका झालो. त्यांच्या आठवणी तर येतच राहतील.
आजच्या जागतिक फादर्स डे निमित्ताने ही काव्यसुमनांजली वडीलांना अर्पण.)

- पाषाणभेद
२०/०६/२०२१

"वैरी भेदला" या विनोदी वगनाट्याचे ई पुस्तकाचे आज ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुन:प्रकाशन

 http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/vairi_bhedala_sachin_boras...

https://www.facebook.com/Vagnatya/photos/a.395135740861318/395135597527999



येथील मुख्य पानावर "वैरी भेदला" हे विनोदी वगनाट्य असलेले माझे ई पुस्तक आज ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुन:प्रकाशीत झालेले आहे.

सदर पुस्तक हार्डकॉपी स्वरूपात 2017 सालीच अमिगो पब्लिशरतर्फे प्रकाशीत झालेले होते.

सदर पुस्तक आपण विनामूल्य स्वरूपात "वैरी भेदला" विनोदी वगनाट्य येथून किंवा ई साहित्य प्रतिष्ठान- नाटक विभाग येथील नाटक विभागातून डाऊनलोड करून वाचावे.

"वैरी भेदला" या पुस्तकासाठी आपणास कोणतेही मूल्य देण्याची गरज नाही. हे पुस्तक विनामूल्य आहे. आपण ते वाचावे आणि आपल्या ओळखीच्या वाचकांत विनामूल्य वाचनास देण्याचे करावे ही विनंती.

हे ई पुस्तक वाचल्यानंतर आपण तीन मिनिटात तीन गोष्टी करू शकतात.

1. आपणास हे पुस्तक कसे वाटले ते फोन, व्हाटस अ‍ॅप मेसेज किंवा ईमेल करून लेखकाला कळवू शकतात.
2. ई साहित्य प्रतिष्ठानला ईमेल करून हे पुस्तक कसे वाटले ते सांगावे.
3. आपले मित्र तसेच सर्व मराठी लोकांना या पुस्तकाबद्दल आणि ई साहित्य प्रतिष्ठानबद्दल सांगा.

कळावे.

आपला,
पाषाणभेद उर्फ सचिन बोरसे
982 Three4 O2554

कथा: पोळी शब्दाच्या इतिहासातील उल्लेखाची

कथा: पोळी शब्दाच्या इतिहासातील उल्लेखाची

चेहरापुस्तकावर पोळी आणि चपाती यापैकी योग्य मराठी शब्द कोणता यावर वाद झडत असतांना इतिहासाची पाने चाळतांना काही ऐतिहासीक पुरावे हाती लागले.

त्यातील एक संदर्भ म्हणजे, संस्कृतग्रंथ "भुकंबलीतम: - वेदोपदेश" (प्राकृतातः भुकबळी) .
सदर ग्रंथ संत पाषाणभेद ( जन्मसाल: उपलब्ध नाही, मृत्यू: शके १६६१ किंवा ६२) यांनी लिहीलेला आहे.
( "भुकंबलीतम: - वेदोपदेश" ग्रंथ प्राकृतात अनुवाद दगडफोड्या यांनी "भुकबळी" या नावाने केला आहे. (रचनाकालखंड उपलब्ध नाही.)
(सदर दोनही ग्रंथांची उपलब्धता अतिशय दुर्मीळ आहे. इच्छूकांनी शोध घ्यावा.‌)

सदर ग्रंथात "पोळीयस्य कारणेन" (पोळीच्या कारणाने) या अध्यायात तत्कालीन भिकारी अन एक साधूजन यांच्या भुकेची तुलना एक धनवान सावकार कसा करतो याचा स्पष्ट उल्लेख आहे. पोळी न मिळाल्याने भिकारी जग सोडतो आणि तो साधू त्या सावकाराकडून पोळी मिळवून ती खाऊ घालण्यासाठी त्या भिकार्यास जीवदान देतो अशी कथा आलेली आहे.

ती कथा येथे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

कथा सुरू होते आहे:

प्राचीन काळी मर्‍हाटी राज्यात जनटक प्रांतात त्रिकंस्थान नावाचे एक गाव होते. गाव तसे लहानच होते. गावाच्या आसपास शेती करणारे आणि त्या अनुषंगाने व्यवसाय करणारे राहत असत. पर्जन्यछायेच्या प्रदेशात हे गाव येत असल्याने दुष्काळ तर गावाच्या पाचवीलाच पुजलेला होता. अनेकदा बियाणे पेरावे अन ते उगवण्याआधीच पक्षांचे अन्न व्हावे अशी परिस्थीती होती. होता येईल तितके अन्न उगवावे अन ते पुरवून पुरवून वापरावे, इतर वरकामे करून जीवन जगावे अशी तेथल्या गावकर्‍यांना सवय झालेली होती.

गावात एक औंदाजी नावाचा गरीब राहत होता. गावाच्या सीमेवर त्याची झोपडी होती. मजूरी करून दिवस कंठत तो म्हातारा झालेला होता. आताशा त्याचेकडून काही काम होत नसे. दिवसभराचे कोरान्न मिळवायला तो काम करण्यासाठी इतरांकडे याचना करत असे पण त्याच्या शारिरीक विपन्नावस्थेकडे पाहून कोणताही स्त्री-पुरूष त्याला दया म्हणून चतकोर शाक भाकरी देत असे. औंदाजी बापडा देखील त्याला आता सरावला होता. एक पाय ओढत तो चारपाच दारी भिक्षा मागे अन आपल्या पोटाची खळगी भरण्याइतके अन्न मिळवून आपल्या झोपडीत जाऊन पडत असे. गेला आठवडा औंदाजीच्या पायाचे दुखणे वाढलेले होते. त्यातच अन्न न मिळाल्याने त्याला ग्लानी येत होती. कसेबसे पाण्यावर दिवस काढत होता बापडा.

त्याच समयाला त्रिकंस्थान गावाच्या दामाजी सावकारांकडे नातवाच्या बारशाच्या समारंभ होता. पंचपक्वान्नाची जेवणे नुकतीच आटोपल्यामुळे मंडळी सुस्तावलेली होती. विडा पान खाऊन वडीलधारे वामकुक्षी घेत होती. स्त्रीया माजघरात आवराआवर करत होत्या. लहान मुले वाड्यातल्या चौकात खेळत होती. अशा समयाला औंदाजी आपला दुखरा पाय सरकत सरकत तेथे भिक्षा मागण्यासाठी आला. त्याने फार काही नको, फक्त चतकोर अर्धी पोळी अन प्यायला पाणी द्या अशी विनंती तेथे केली. सुस्तावलेल्या दामाजी सावकारांनी पाहुण्यांसमोर आपली आब दाखवण्यासाठी औंदाजीला पोळी, भाजी, पाणी देण्यास साफ नकार दिला. इतकेच नव्हे तर त्या वाड्यासमोरून लगेच निघून जाण्यास त्याला फर्मावले.

पोटातली दोन दिवसांची भुक, उन्हाचा त्रास, आजारी शरीर, झालेले वयोमान या सगळ्यांचा एकत्रीत विपरीत परिणाम होवून औंदाजीने सावकाराच्या वाड्याच्या पायरीवरच आपले प्राण सोडले.

हे सर्व पाहुणे अन सावकारासमोर घडले. सावकारासही आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला व तो त्याने सगळ्यांना बोलून दाखवला. घटना तर घडून गेली होती. आता पश्चाताप करण्यात काही अर्थ नव्हता. कदाचित औंदाजीला तेथेच मरण यावे अशी नियतीची इच्छा असावी.

याच दरम्यान संत पाषाणभेद तेथे अवतिर्ण झाले. काखेत झोळी, हातात कमंडलू, पायी खडावा, अंगात कफनी, डोईस मुंडासे, कपाळी रेखीव चंदनी सूर्य अशा वेशात ते सावकाराच्या वाड्यासमोर उभे ठाकले. आपल्या उंच आवाजात ओमकाराचे स्मरण करून त्यांनी सावकाराकडे कोरडा शिधा मागितला. परंतु सावकार, तेथील पाहुणे, स्त्रीया इत्यादी मंडळी औंदाजीच्या शवाभोवती गोळा झालेली होती. संतांकडे कुणाचेही लक्ष नव्हते. अजून दोन वेळा ओमकार करून भिक्षा मागून जर नाही मिळाली तर पुढल्या घरी जाण्याचा संतांचा विचार होता तितक्यात सावकाराचे लक्ष त्यांच्याकडे गेले. सावकाराने घडलेला सगळा प्रकार पाषाणभेदांच्या कानावर घातला. तसेच थोडी वाट पाहून औंदाजीला पोळी भाजी तसेच गोडान्न देण्याची त्यांच्या मनीची प्रांजळ भावना होती हे देखील सावकार वदले.

संत पाषाणभेदांनी आपल्या ठाई असलेल्या आंतरीक ज्ञानाने सर्व काही आधीच जाणले होते. झालेल्या घटनेत सावकाराची काही चूक नव्हती. भिक्षा देणे न देणे हे सर्वस्वी दात्याच्या मनात असते. त्याला भिक्षेकरी आक्षेप घेवू शकत नाही, तसेच कसलाही श्राप देणे हे देखील उचीत नाही हे ते जाणत होतेच.


त्यांनी सावकारास मानसीक धीर दिला आणि सावकाराने त्यांचे चरण धरले. थोडे मागे सरत लगोलग संत पाषाणभेदांनी औंदाजीचे शव उचलले आणि ओसरीवर ठेवले. शवाच्या बाजूस डोळे मिटून सिद्धासनात त्यांनी बैठक घेत ईश्वराचे स्मरण केले. आपली प्रार्थना संपवत संत पाषाणभेदांनी उपचार म्हणून आपल्या कमंडलूतील पाणी औंदाजीच्या पापण्यांना आणि कपाळाला लावले. पुन्हा एकवार संतांनी ईश्वराचे स्मरण केले. अगदी थोड्या कालाने औंदाजीच्या शरीरात श्वास वास करू लागला. हाती पायी थरथर जाणवली. पुढच्याच क्षणाला औंदाजीने डोळे उघडले. समस्त मंडळींच्या आश्चर्यास पारावार उरला नाही. वयस्कर स्त्रीयांनी आपल्या सुना-मुलांना औंदाजीसाठी पोळी भाजी घेवून येण्यास पिटाळले. सावकारांच्या आनंदाला तर पारावार उरला नाही. त्यांनी औंदाजीला बसते केले अन पोळी भाजीचा पहिला घास आपल्या हाताने त्याला भरवला. 'पोट भरून खा अन तुझ्या दुखर्‍या पायाच्या उपचाराची जबाबदारीही मी घेतो', हे सावकारांचे बोलणे ऐकून औंदाजीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. काय घडले हे तो समजून चुकला होता. मनोमन त्याने संताचे आभार मानले. पाहूणे मंडळीही ते द्रृष्य बघून भावूक झाली होती.

उपस्थित सज्जन भावनेतून सावरत असतांना सावकारांना संत पाषाणभेद भिक्षा मागण्यासाठी आल्याची आठवण झाली. ते सभोवार पाहू लागले. पण संत पाषाणभेद तेथे होतेच कोठे? ते तर तेथून केव्हाच निघून गेले होते. तेथील सज्जनांनी संत पाषाणभेद निघून गेल्याच्या दिशेने श्रद्धेने हात जोडले.

"भुकंबलीतम: - वेदोपदेश" (प्राकृतातः भुकबळी) या ग्रंथातील "पोळीयस्य कारणेन" (पोळीच्या कारणाने) हा अध्याय येथे संपतो.

"पोळी" या शब्दाच्या अर्थाचे विवेचन:
जनटक प्रांत तसेच त्रिकंस्थान नावाचे एक गाव महाराष्ट्रातच नाशिक भागात होते असे विद्वान इतिहासकारांचे मत आहे. "भुकंबलीतम: - वेदोपदेश" (प्राकृतातः भुकबळी) या ग्रंथाची रचना कालखंड हा शके १६६१ च्या आधीचा असावा. तो संत पाषाणभेद ( जन्मसाल: उपलब्ध नाही, मृत्यू: शके १६६१ किंवा ६२) यांनी लिहीलेला आहे. त्याकाळी महाराष्ट्र प्रांतात पाकृतात पोळी हा शब्द असल्याचे या ग्रंथवाचनावरून सिद्ध होते. थोडक्यात 'पोळी' हा अस्सल मराठी शब्द आहे.

तसेच सदर ग्रंथांत अनेक मराठी शब्दांचा उलगडा होऊ शकतो इतके शब्द आलेले आहेत. वेळोवेळी आपण ते अभ्यासू या.

३०/०४/२०२१

आमचीबी आंटी जन टेस

आमचीबी आंटी जन टेस

गावात कायबी काम नव्हतं आजकाल. सगळे निसते बशेल. कोरूनामुळं नाम्याचं रसाचं गुर्‍हाळबी बंद पडेल व्हतं.
त्येच्यायच्या त्या कोरूनाच्या. सकाळ संध्याकाळचा आमच्यावाला आड्डा आसा बंद पडेल. वावरातबी कांदे काढेल व्हते, आन या येळेला भाव काय मिळाला नाय. टॅक्टरचा हप्ता घरातून द्यावा लागला, आता बोला.

या कोरूनाची आंटी जन टेस करून घ्या, आंटी जन टेस करून घ्या म्हनून मलेरीया डाक्टर आन आशाबाई गावात फिरत व्हती. मलेरीया डाक्टर लई बाराचं हाय बरं का आमच्या आरोग्य शेंटरवरचं. कायम आशाबाईला बरूबर घेवूनच फिरतं लेकाचं.

जाऊद्या, आपल्याला काय म्हना.

तर मलाबी वाटलं की आपलीबी करून घ्यावी आंटी जन टेस. आंटी जन टेसला काय काय करावं आसं कोनाला तरी विचारावं आसं वाटत व्हतं. कारन, आंटीपर्यंत ठिक हाय पन जन म्हणजे जनता. आता ती आंटी आन मी, समद्या जनांसमोर काय आन कसं करनार आसा मला प्रेश्न पडला. कोनाला विचारायचीबी लय लाज वाटत व्हती. जनांसमोर काय झालं तर गावात त्वांड दाखवायला जागा नव्हती. सगळे सगे सोयरे गावातच. तसं झालं तर कायम तोंडाला पट्टी लावावी लागणार आशी भिती मनात आली. पन आंटी काय करनार, ती कशी आसंल, ती काय काय देईल, न देईल या विचारानं रात्रीची झोपबी येईना झाली.

संज्या आन राम्या तसं आंटी टेस करून आल्यालं व्हतं, पन त्यांना विचारावं म्हंजे आगीत हात घालन्यासारखं व्हतं. आन संज्या तर माझी हिरॉईन करीनाच्या शेजारीच राहतो. भाड्या मुद्दाम माझ्यासमोर तिचं खरं नाव करूना मोठ्यानं बोलत राहतो. माला सांगा, कोरूनाच्या काळात आसं चिडवनं बरं हाय का? ऊस जळलं त्याच्या वावरातला अशानं. कांदा करपलं उन्हाळ्यातला त्याचा.

जाऊद्या, आपल्याला काय म्हना.

मनाचा हिय्या करून लालचंद मारवाड्याच्या दुकानातून मुद्दाम वीस किलो तांदूळ घेतांना या आंटी जन टेसची थोडी माहीती काढली. त्ये म्हनलं की, आधार कार्ड घेवून जा आन लायनीत थांब. नंबर आला की आंटी टेस व्हईल.

आता या आंटी जन टेसला आधार कार्ड नंबर देऊन लायनीत थांबायचं म्हनजे लई काळजी वाटू लागली. आंटीनं आधार नंबर कुनाला दिला आन त्ये आपल्या घरी पत्ता काढत आलं म्हणजे? आंटीनं काय काळाबाजार केला तर काय आशी चिंता मनाला लागून राहीली.

धडगत करून आरोग्य शेंटरला गाडी लावली. सकाळी गेलेलो. बाहेर धा बारा जनांची लाईन व्हती. वळखीचं कुनीच नव्हतं हे बरं होतं. मधी आसलेली आंटी जन, लोकांना कवा भेटल आसं वाटत व्हतं. एकानं आधार नंबर घेतला. नाव बीव लिहून घेतलं. एक आडूसा होता. तिथंच आंटी आसल, अन जन, लोकं तिथंच तिला भेटत आसतील आसं वाटलं. एवढ्या गर्दीत आंटीला भेटनं काय बराबर वाटंना. पन एकदा का व्हईना भेट झाली म्हंजे आपलं गाडं पुढं रेटता येईल आसा विचार मनात आला.

माझ्यावाला लंबर आला आन मी आडूशामागे गेलो. तवा आंटी बिंटी काय दिसली नाय.

तिथं दवाखान्यासारखं मांडलेलं व्हतं अन एक नर्स व्हती. मंग त्या पोरीनंच नाकात कायतरी खुपासलं. आन जा म्हनाली.

लय फसगत झाली राव. द्राक्षे काढणीला यावे आन पाऊस पडून सगळा माल बेचीराख व्हावा, अगदी पावडरी मारायलाबी येळ मिळू नये आसं झालं. आसं कुठं आसतंय व्हय?

आशी झाली आमच्यावाली आंटी जन टेस.

जाऊद्या, आपल्याला काय म्हना.

- पाषाणभेद
२६/०४/२०२१

Tuesday, June 8, 2021

कथा: पोळी शब्दाच्या इतिहासातील उल्लेखाची

कथा: पोळी शब्दाच्या इतिहासातील उल्लेखाची

चेहरापुस्तकावर पोळी आणि चपाती यापैकी योग्य मराठी शब्द कोणता यावर वाद झडत असतांना इतिहासाची पाने चाळतांना काही ऐतिहासीक पुरावे हाती लागले.

त्यातील एक संदर्भ म्हणजे, संस्कृतग्रंथ "भुकंबलीतम: - वेदोपदेश" (प्राकृतातः भुकबळी) .
सदर ग्रंथ संत पाषाणभेद ( जन्मसाल: उपलब्ध नाही, मृत्यू: शके १६६१ किंवा ६२) यांनी लिहीलेला आहे.
( "भुकंबलीतम: - वेदोपदेश" ग्रंथ प्राकृतात अनुवाद दगडफोड्या यांनी "भुकबळी" या नावाने केला आहे. (रचनाकालखंड उपलब्ध नाही.)

(सदर दोनही ग्रंथांची उपलब्धता अतिशय दुर्मीळ आहे. इच्छूकांनी शोध घ्यावा.‌)
सदर ग्रंथात "पोळीयस्य कारणेन" (पोळीच्या कारणाने) या अध्यायात तत्कालीन भिकारी अन एक साधूजन यांच्या भुकेची तुलना एक धनवान सावकार कसा करतो याचा स्पष्ट उल्लेख आहे. पोळी न मिळाल्याने भिकारी जग सोडतो आणि तो साधू त्या सावकाराकडून पोळी मिळवून ती खाऊ घालण्यासाठी त्या भिकार्यास जीवदान देतो अशी कथा आलेली आहे.

ती कथा येथे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
कथा सुरू होते आहे:
प्राचीन काळी मर्‍हाटी राज्यात जनटक प्रांतात त्रिकंस्थान नावाचे एक गाव होते. गाव तसे लहानच होते. गावाच्या आसपास शेती करणारे आणि त्या अनुषंगाने व्यवसाय करणारे राहत असत. पर्जन्यछायेच्या प्रदेशात हे गाव येत असल्याने दुष्काळ तर गावाच्या पाचवीलाच पुजलेला होता. अनेकदा बियाणे पेरावे अन ते उगवण्याआधीच पक्षांचे अन्न व्हावे अशी परिस्थीती होती. होता येईल तितके अन्न उगवावे अन ते पुरवून पुरवून वापरावे, इतर वरकामे करून जीवन जगावे अशी तेथल्या गावकर्‍यांना सवय झालेली होती.

गावात एक औंदाजी नावाचा गरीब राहत होता. गावाच्या सीमेवर त्याची झोपडी होती. मजूरी करून दिवस कंठत तो म्हातारा झालेला होता. आताशा त्याचेकडून काही काम होत नसे. दिवसभराचे कोरान्न मिळवायला तो काम करण्यासाठी इतरांकडे याचना करत असे पण त्याच्या शारिरीक विपन्नावस्थेकडे पाहून कोणताही स्त्री-पुरूष त्याला दया म्हणून चतकोर शाक भाकरी देत असे. औंदाजी बापडा देखील त्याला आता सरावला होता. एक पाय ओढत तो चारपाच दारी भिक्षा मागे अन आपल्या पोटाची खळगी भरण्याइतके अन्न मिळवून आपल्या झोपडीत जाऊन पडत असे. गेला आठवडा औंदाजीच्या पायाचे दुखणे वाढलेले होते. त्यातच अन्न न मिळाल्याने त्याला ग्लानी येत होती. कसेबसे पाण्यावर दिवस काढत होता बापडा.

त्याच समयाला त्रिकंस्थान गावाच्या दामाजी सावकारांकडे नातवाच्या बारशाच्या समारंभ होता. पंचपक्वान्नाची जेवणे नुकतीच आटोपल्यामुळे मंडळी सुस्तावलेली होती. विडा पान खाऊन वडीलधारे वामकुक्षी घेत होती. स्त्रीया माजघरात आवराआवर करत होत्या. लहान मुले वाड्यातल्या चौकात खेळत होती. अशा समयाला औंदाजी आपला दुखरा पाय सरकत सरकत तेथे भिक्षा मागण्यासाठी आला. त्याने फार काही नको, फक्त चतकोर अर्धी पोळी अन प्यायला पाणी द्या अशी विनंती तेथे केली. सुस्तावलेल्या दामाजी सावकारांनी पाहुण्यांसमोर आपली आब दाखवण्यासाठी औंदाजीला पोळी, भाजी, पाणी देण्यास साफ नकार दिला. इतकेच नव्हे तर त्या वाड्यासमोरून लगेच निघून जाण्यास त्याला फर्मावले.

पोटातली दोन दिवसांची भुक, उन्हाचा त्रास, आजारी शरीर, झालेले वयोमान या सगळ्यांचा एकत्रीत विपरीत परिणाम होवून औंदाजीने सावकाराच्या वाड्याच्या पायरीवरच आपले प्राण सोडले.

हे सर्व पाहुणे अन सावकारासमोर घडले. सावकारासही आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला व तो त्याने सगळ्यांना बोलून दाखवला. घटना तर घडून गेली होती. आता पश्चाताप करण्यात काही अर्थ नव्हता. कदाचित औंदाजीला तेथेच मरण यावे अशी नियतीची इच्छा असावी.

याच दरम्यान संत पाषाणभेद तेथे अवतिर्ण झाले. काखेत झोळी, हातात कमंडलू, पायी खडावा, अंगात कफनी, डोईस मुंडासे, कपाळी रेखीव चंदनी सूर्य अशा वेशात ते सावकाराच्या वाड्यासमोर उभे ठाकले. आपल्या उंच आवाजात ओमकाराचे स्मरण करून त्यांनी सावकाराकडे कोरडा शिधा मागितला. परंतु सावकार, तेथील पाहुणे, स्त्रीया इत्यादी मंडळी औंदाजीच्या शवाभोवती गोळा झालेली होती. संतांकडे कुणाचेही लक्ष नव्हते. अजून दोन वेळा ओमकार करून भिक्षा मागून जर नाही मिळाली तर पुढल्या घरी जाण्याचा संतांचा विचार होता तितक्यात सावकाराचे लक्ष त्यांच्याकडे गेले. सावकाराने घडलेला सगळा प्रकार पाषाणभेदांच्या कानावर घातला. तसेच थोडी वाट पाहून औंदाजीला पोळी भाजी तसेच गोडान्न देण्याची त्यांच्या मनीची प्रांजळ भावना होती हे देखील सावकार वदले.

संत पाषाणभेदांनी आपल्या ठाई असलेल्या आंतरीक ज्ञानाने सर्व काही आधीच जाणले होते. झालेल्या घटनेत सावकाराची काही चूक नव्हती. भिक्षा देणे न देणे हे सर्वस्वी दात्याच्या मनात असते. त्याला भिक्षेकरी आक्षेप घेवू शकत नाही, तसेच कसलाही श्राप देणे हे देखील उचीत नाही हे ते जाणत होतेच.त्यांनी सावकारास मानसीक धीर दिला आणि सावकाराने त्यांचे चरण धरले. थोडे मागे सरत लगोलग संत पाषाणभेदांनी औंदाजीचे शव उचलले आणि ओसरीवर ठेवले. शवाच्या बाजूस डोळे मिटून सिद्धासनात त्यांनी बैठक घेत ईश्वराचे स्मरण केले. आपली प्रार्थना संपवत संत पाषाणभेदांनी उपचार म्हणून आपल्या कमंडलूतील पाणी औंदाजीच्या पापण्यांना आणि कपाळाला लावले. पुन्हा एकवार संतांनी ईश्वराचे स्मरण केले. अगदी थोड्या कालाने औंदाजीच्या शरीरात श्वास वास करू लागला. हाती पायी थरथर जाणवली. पुढच्याच क्षणाला औंदाजीने डोळे उघडले.

समस्त मंडळींच्या आश्चर्यास पारावार उरला नाही. वयस्कर स्त्रीयांनी आपल्या सुनामुलांना औंदाजीसाठी पोळी भाजी घेवून येण्यास पिटाळले. सावकारांच्या आनंदाला तर पारावार उरला नाही. त्यांनी औंदाजीला बसते केले अन पोळी भाजीचा पहिला घास आपल्या हाताने त्याला भरवला. 'पोट भरून खा अन तुझ्या दुखर्‍या पायाच्या उपचाराची जबाबदारीही मी घेतो', हे सावकारांचे बोलणे ऐकून औंदाजीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. काय घडले हे तो समजून चुकला होता. मनोमन त्याने संताचे आभार मानले. पाहूणे मंडळीही ते द्रृष्य बघून भावूक झाली होती.

उपस्थित सज्जन भावनेतून सावरत असतांना सावकारांना संत पाषाणभेद भिक्षा मागण्यासाठी आल्याची आठवण झाली. ते सभोवार पाहू लागले. पण संत पाषाणभेद तेथे होतेच कोठे? ते तर तेथून केव्हाच निघून गेले होते. तेथील सज्जनांनी संत पाषाणभेद निघून गेल्याच्या दिशेने श्रद्धेने हात जोडले.

"भुकंबलीतम: - वेदोपदेश" (प्राकृतातः भुकबळी) या ग्रंथातील "पोळीयस्य कारणेन" (पोळीच्या कारणाने) हा अध्याय येथे संपतो.

"पोळी" या शब्दाच्या अर्थाचे विवेचन:
जनटक प्रांत तसेच त्रिकंस्थान नावाचे एक गाव महाराष्ट्रातच होते असे विद्वान इतिहासकारांचे मत आहे. "भुकंबलीतम: - वेदोपदेश" (प्राकृतातः भुकबळी) या ग्रंथाची रचना कालखंड हा शके १६६१ च्या आधीचा असावा. तो संत पाषाणभेद ( जन्मसाल: उपलब्ध नाही, मृत्यू: शके १६६१ किंवा ६२) यांनी लिहीलेला आहे. त्याकाळी महाराष्ट्र प्रांतात पाकृतात पोळी हा शब्द असल्याचे या ग्रंथवाचनावरून सिद्ध होते. थोडक्यात 'पोळी' हा अस्सल मराठी शब्द आहे.

तसेच सदर ग्रंथांत अनेक मराठी शब्दांचा उलगडा होऊ शकतो इतके शब्द आलेले आहेत. वेळोवेळी आपण ते अभ्यासू या.

३०/०४/२०२१