Saturday, December 21, 2019

प्रवासात लागणार्‍या वस्तूंची यादी - General Travel Checklist

मागे येथे प्रथमोपचार पेटी - First Aid Box असा धागा काढला होता. त्याचा कितपत अन कुणाला उपयोग झाला ते माहीत नाही पण मराठीत असा शब्द शोधतांना किंवा मराठीत चर्चा करतांना याचा उपयोग झाला असावा. होते काय की कायप्पावर लिहीलेले कायमचे राहत नाही. म्हणून कुठेतरी कायमस्वरूपी असण्यासाठी येथे लेखन असावे असे वाटते. कायप्पावर झालेल्या चर्चेचा धागा व्हावा असे वाटत असल्याने येथे लिहीतो आहे.

तर आपण नेहमी किंवा अधेमधे, सतत किंवा कधीकधी प्रवास करतो. तो प्रवास अगदी काही तासांपासून काही दिवसांपर्यंतचा असू शकतो. तसेच तो प्रवास पायी, सायकलपासून ते थेट आगगाडी, बस, खाजगी कार, आगबोट इत्यादी विविध वाहनांमधूनही होत असतो. अशा प्रकारच्या प्रवासासाठी तयारीचा वेळ काही वेळा अगदी काही मिनिटांचाही असू शकतो. अशा कमी वेळात लगेचच तयारी करुन प्रवासाला निघणे होते. मग आहे ते सामान पिशवीत भरले जाते किंवा महत्वाची वस्तू राहून जाते. गेलेल्या ठिकाणी मग आपल्याला लागणारी वस्तू पुन्हा घ्यावी लागते.

प्रवासाच्या तयारीला काय काय गोष्टी लागू शकतात याची संभाव्य यादी कुणी केलीही असेल. मला आठवते की खूप पूर्वी मायक्रोसॉप्टच्या ऑफीससूटमध्ये एका अ‍ॅप्लीकेशनमध्ये अशी विस्कळीत यादीचे टेम्प्लेट होते. इंटरनेटवर शोध घेतांना अशा रितीची चेकलिस्ट भेटूही शकते पण ती इंग्रजीत आहे आणि ती आपल्या राहणीमानाप्रमाणे नसावी. अर्थातच अशी यादी परिपूर्ण असूच शकत नाही. कारण व्यक्तीपरत्वे गरजा भिन्न होत जातात. मला एखादी गोष्ट आवश्यक असेल ती दुसर्‍याला अवांतर वाटेल.

खाली अशा प्रवासाला लागणार्‍या किंवा प्रवासात उपयोगी पडणार्‍या वस्तूंची यादी दिलेली आहे. सदर यादी वस्तूंच्या कोणत्याही क्रमाने नाही. सदर यादीत एका ओळीत एकच वस्तू येईल अशी बनवली आहे जेणे करून याची प्रिंट घेवून प्रवासाला निघण्यापुर्वी टिकमार्क करत वस्तू गोळा करायला सोप्या व्हाव्यात.

आपण हि यादी नजरेखालून घाला. काय वस्तू असाव्यात, काय नसाव्यात ते येथे लिहा म्हणजे चर्चाही होईल अन यादीपण परिपुर्ण होत जाईल.

टूथ ब्रश
पेस्ट
दाढीचे सामान
कंगवा
सेफ्टी पीन्स
सौंदर्यप्रसाधने
अंडरपॅंट, बनीयन
टॉवेल
साबण
प्रवासात उलटी न होवू देणारी गोळी (अ‍ॅव्होमीन किंवा इतर)
रक्तदाब, मधूमेह किंवा नेहमी लागणारी औषधे, क्रिम
डोकेदूखीवरचा बाम, आयोडीन, अमृतांजन, झेंडू तत्सम
इस्त्री केलेले ड्रेस
एक्स्ट्रा पिशवी
प्लॅस्टीक कॅरी बॅग
एखादी स्लिपर, चप्पल
गरम कपडे, मफलर, टोपी
कानात घालायचा कापूस
नाईट पॅंट, रात्रीचे कपडे
चष्मा घर
उन्हाची टोपी, गॉगल
छत्री, रेनकोट (हवामानाप्रमाणे)
मोबाईल
चार्जर, पॉवरबँक
हेडफोन
सेल्फी स्टिक
कॅमेरा
चटई
फळे कापण्याचा चाकू
जूने वर्तमानपत्र
पैसे, सुट्टे पैसे
क्रेडीट, डेबीट, ट्राव्हल कार्ड
फास्टॅग रिचार्ज केले का?
लिहीण्यासाठी पेन
कागद
जेथे जायचे तेथले फोन क्रमांक (कागदावर लिहीलेला असावा. मोबाईल कधीही दगा देवू शकतो.)
महत्वाचे फोन क्रमांक लिहीलेला कागद
जाण्याचा रस्ता असलेला नकाशा, पत्ता इ.
वाहनासंदर्भात कागदपत्र जसे आर सी बूक, ड्रायव्हींग लायसन्स
पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड
आपल्या पत्याचे ओळखपत्र (आपल्याकडच्या बॅगांमध्ये असे ओळखपत्र टाकून ठेवावे. हरवल्यास बॅग परत मिळण्याची शक्यता वाढते. स्वानूभव आहे.)
जेवणाचा शिधा किंवा डबा
इतर वेळेचा खाऊ
बिस्कीट, मॅगी
लहान मूल असल्यास त्यांचा खाऊ, दूधाची सोय.
पाण्याच्या बाटल्या
फर्स्ट एड
स्वतःची गाडी असल्यास गाडीसाठीच्या वस्तू वाढतात त्या लक्षात ठेवणे. (जसे आरसी बूक, स्टेपनी, गाडीतले ऑईल, हवा, पाणी, पेट्रोल, लायसन्स इत्यादी.)
इतर सदस्य बरोबर असतील तर या यादीतील वस्तू त्यांच्या गरजेप्रमाणे परत वरतून चेक करत येणे.
ट्रेकींग, एखादी मोहीमेसाठी प्रवास असेल तर गरजेप्रमाणे पुन्हा या वस्तू वरतून चेक करत येणे.
अधिकच्या वस्तू.....
--------------------------
--------------------------
--------------------------
--------------------------
--------------------------
--------------------------
--------------------------
--------------------------
--------------------------
--------------------------
--------------------------
--------------------------

Monday, December 16, 2019

माहेर, सासर

माहेर, सासर
नदीच्या त्या किनारी साजण माझा उभा
कधीचा वाट बघतो माझी जीवाचा तो सखा
अल्याड गाव माझे त्यात मी राहिले
पल्याड त्याचे गाव कधी नाही पाहिले
चिरेबंदी साचा भक्कम असे माझे घर
नाही दिसत येथून घर त्याचे आहे दूर
मनात त्याची सय मध्येच जेव्हा येते
त्याचाकडची वाट नजरेला खुणावते
मनी लागली हुरहुर कसे असेल सासर
कसे का असेना मी शेवटी सोडेन माहेर
- पाषाणभेद
०८/१२/२०१९

बाटाट्याचे उपयोग

बाटाट्याचे उपयोग
स्वयंपाकघरात गाल फुगवून बसला होता बटाटा
अंगावरल्या डोळ्यांनी मला पाहत होता ||

माझ्याशी बोलायला लागला तो जेव्हा
खरे नाही वाटले मला तेव्हा
तुम्हालाही वाटेल मी सांगे हा प्रसंग खोटा ||

"
खाण्यामध्ये उपयोग माझे आहेत खूप मोठे
तरी तुम्ही का बोलतात डोक्यात आहे कांदे बटाटे
नाकाने सोलाल कांदे तर आहे तुमचाच
तोटा ||

कांद्याचे वाढले ना रे बाजारी भाव
चढ्या दराने गंजले सारे रंकराव
आता मला आला आहे मान मोठा ||

कधीही मी कामी येई जेव्हा नसे भाजी ताजी
कोणत्याही भाजीत मिसळून जाण्या मी राजी
बहुगुणी असा सगळ्या भाज्यांत शहाणा मोठा ||

माझी करा रस्सा भाजी सुकी भाजी मटार बटाटा भाजी
किंवा करा मिक्स भाजी नाहीतर पाव भाजी
कुकरमध्ये उकडून घ्या किंवा मेथी पालकात टाका ||

खिचडीत टाका बघा चव कशी छान न्यारी
वांगी बटाटा भाजी आवडीने खातात सारी
माझ्यासवे बनवा सार भाजी घेवून टमाटा ||

माझे बनवा वेफर्स, फिंगर चिप्स, काप कापून
छोटे उद्योग झालेत मोठे त्या साऱ्याला विकून
पिकवून शेतकरी व्यापारी हाती मोजती नोटा ||
"

इतक्यात घाईने आई आली स्वयंपाकघरात
प्रश्न विचारी आज काय देवू तुला डब्यात?
बटाटा कर मी म्हटले अन केला त्याला बाय बाय टाटा ||

- पाषाणभेद
०९/१२/२०१९

Thursday, December 12, 2019

Use Dipper at Night: हाय बीम लो बीम, अप्पर- डिप्पर बीम बाबत चर्चा

Use Dipper at Night: हाय बीम लो बीम, अप्पर- डिप्पर बीम बाबत चर्चा
मिसळपाव.कॉम म्हणा किंवा शेजारचे मराठी सोशल फोरम म्हणा, त्यात महत्वाचे चर्चेचे विषय लिहीले जातात की जे समाजाला उपयोगी पडू शकतात. मागे वाहनांसंदर्भात हेल्मेटचा विषय आला असता, त्यातील विचार बरेच इतर ठिकाणी कॉपी केले होते. इतर ठिकाणी ज्यांनी वाचले ते त्यांच्या उपयोगी आले असेल तर आपल्या या सोशलीझमचा फायदाच म्हणायचा.
दुसरे असे की जर अशा सोशल फोरवरील काही मुद्दे असोत किंवा धागे असोत ते शासनातले अधिकारी व्यक्ती, मंत्री की ज्यांच्या हातात नियम बनवणे आणि राबवणे शक्य आहे त्यापर्यंत जर गेले आणि त्यांनी गंभीरपणे यातील तथ्थे जाणून घेवून जर उपायोजना करण्याचा प्रयत्न केला तर अशा पाळल्या गेलेल्या नियमांमुळे नागरीकांचे जगणे अधीक सुखावह होवू शकते.
वरील प्रस्तावना अजून समजली नसेल तर खालील लेख वाचून समजू शकते. थोडक्यात लेख आधी आणि वरील प्रस्तावना नंतर असे असते तर ते अधिक योग्य असते हे लक्षात यायला लेख वाचावा लागेल. लेखाची प्रकृती थोडी गंभीर आहे.
काल मी शहरातल्या उपनगराच्या रस्त्याने रात्री पायी जात होतो. तेव्हा समोरून वाहने येत होती. त्यात चारचाकी आणि दुचाकी होत्या. सदर वाहनांच्या हेडलाईटचा प्रकाश हा सरळ डोळ्यांवर येत होता. एका वाहनाचा प्रकाश इतका तिव्र होता की माझेच नव्हे तर माझ्या मागे येणार्‍या पादचार्‍याचेही डोळे दिपले. त्याने आणि मी तेथेच थांबून घेतले. त्याच्या आणि माझ्यात डोळ्यांवर आलेल्या हेडलाईट संदर्भात संवाद झाला.
असाच मुद्दा आमच्या वाहनविषयक व्हाटसअ‍ॅप वर चर्चेला आला होता. त्या क्षणीक बीजचर्चेला या धाग्याच्या निमित्ताने सार्वजनीक रुप देण्याचा प्रयत्न आहे. ( सर्वसामान्यपणे तांत्रीक इंग्रजी प्रतिशब्द बोलतांना जास्त वापरले जात असल्याने लेखातही तेच वापरले आहेत.)
वाहनांचे हेडलाईट्स - हाय बीम - लो बीम - अप्पर लाईट - लोअर डिप्पर लाईट
वाहनांमध्ये जे हेडलाईट्स असतात त्यात दोन सेटींग असतात. बटन दाबून हेडलाईट्स हाय बीम - लो बीम - अप्पर बीम - लोअर बीम (डिप्पर) अशा प्रकारे ते चमकवता येवू शकतात. रात्रीच्या वेळी असे हेडलाईट शहरात - जेथे रस्त्यावरील (स्ट्रीट) लाईट्स असतात तेथे - वाहन कायम लो बीमवर चालवणे गरजेचे आहे. नव्हे तसा नियमच आहे. आणि असा नियम आहे हेच बहूदा बर्‍याच वाहनचालकांना माहीत नाही. केवळ कार किंवा मोठ्या गाड्याच नव्हे तर लहान अगदी दोन चाकी वाहनांचेही हेड लाईटस आताश: प्रखर असतात. अशा अपर बीममुळे समोरच्या वाहनधारकांचे डोळे दिपतात.
जेथे स्ट्रीट लाईट्स नसतात तेथे, ग्रामीण रस्त्यांवर अपर बीमवर वाहन चालवायला हरकत नाही. परंतू तेथेही समोरून वाहन येत असल्याचे दिसल्यास दोनही वाहनांनी डिपर किंवा लो बीमवर वाहन चालवावे. हाच नियम आपले वाहन इतर वाहनापासून साधारण २०० ते ३०० मिटर मागे असते तेव्हापासून आपले वाहन लो बीमवर चालवणे गरजेचे आहे असा समजायला हरकत नाही. असे केल्याने आपल्या वाहनाचे हेडलाईटस पुढच्या वाहनाच्या आतील मागे बघण्याच्या (IRVM) काचेमध्ये चमकत नाही.
वाहन कायम लो बीमवरच चालवणे हे दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांनी गरजेचे आहे. आणि हा नियम असल्याने तो पाळायलाच हवा.
हाय बीम वाहन चालवणे आणि जंगली प्राणी सुरक्षा
हा एक नवा मुद्दा माझ्या लक्षात आलेला आहे. यात किती तथ्य असावे ते सांखिकीयदृष्ट्या आणि इतर संशोधनाने सिद्ध व्हावे लागेल याची मला कल्पना आहे.
तर आजकाल अज्ञात वाहनाच्या धडकेने जंगलातले प्राणी (हरीण, बिबटे किंवा इतर प्राणी) गतप्राण होण्याच्या बातम्या आपण वर्तमानपत्रात वाचतो आहे. लक्षात घ्या की या पृथ्वीवर आपला जसा हक्क आहे तसाच प्राणी, वनस्पती यांचाही हक्क आहे. रात्री वाहनचालक आपले वाहन अपर बीमवर चालवत असल्याने या जंगली प्राण्यांचे डोळे दिपतात. ते गोंधळून जातात आणि ते तेथेच उभे राहत असतील किंवा ते बचावासाठी  इतरत्र पळत असतील किंवा वाहनांवर हल्ला करण्याच्या हेतूने ते वाहनाकडे झेपावत असतील. कारण काही का असेना पण मानवाप्रमाणेच या प्राण्यांचे डोळे वाहनांच्या तिव्र प्रकाशाने दिपतात आणि ते वाहनाखाली येवून गतप्राण होतात.
पुन्हा सांगतो या मुद्यावर प्राण्यांची मानसीकता, त्यांचे प्रकाशाप्रती होणारे वर्तन या सर्वांगाने संशोधन होणे गरजेचे आहे.
वाहनातील हाय बीम - लो बीम हेडलाईट योग्य कसे वापरावे?
आपण येथ पर्यंत वाचत आलात तेव्हा आपल्याला हेडलँपमधील हाय बीम आणि लो बीम किती महत्वाचे आहे याचे महत्व पटले असेल. हाय बीम - लो बीम योग्य कसे वापरावे हे खालील प्रकारे समजावून घेता येते.
- जेथे स्ट्रीट लाईटस आहेत (शहरात) तेथे वाहन कायम लो बीमवरच चालवावे. यात चारचाकी तर येतातच पण दुचाकी वाहनेही येतात.
- ग्रामीण भागात वाहतूक नसेल तेव्हा हाय बीम ठिक आहे. पण तेथेही आजकाल वाहने जास्त धावत असल्याने लो बीमच योग्य आहे. वाहनाचा वेग विनाकारण न वाढवता वाहन चालवायचे असल्यास (डिफेन्सीव ड्रायव्हींग) हेडलँप लो बीमवर योग्य आहे.
- काही वाहनात डॅशबोर्डजवळ हेडलाईटचे सेटींग करायचे बटन असते. त्याची पोजीशन कायम शुन्य ठेवावी. ड्रायव्हरच्या उंचीनुसार एखादी पातळी वर किंवा खाली त्या त्या वेळी बदलली तर हरकत नाही. पण खरोखर तशी आवश्यकता नसते.
- समोरील वाहन किमान ५०० मिटर दुर असेल तर आपल्या वाहनाचे बीम लो करणे योग्य आहे आणि ते सभ्यपणाचे लक्षण आहे.
- आपल्या पुढे एखादे वाहन असल्यास म्हणजेच आपण किमान ३०० मिटर मागे असल्यास आपल्या वाहनाचे दिवे हे लो बीम करणे योग्य आहे आणि ते सभ्यपणाचे लक्षण आहे.
- पासींग लाईटचा उपयोगदेखील आपण हाय बीमसाठी तात्पुरता करू शकतात.
- पासींग लाईट ओव्हरटेक करतांना योग्य भान ठेवून चमकवावा. दुसर्‍या वाहनाने आधी चमकवला असता आपण त्याला अनुमोदन (अ‍ॅक्नॉलेज) द्यावे आणि पहिल्यांदा त्याने पासींग मागीतले म्हणून आपण त्याला योग्य वाट करून द्यावी - ओव्हरटेक करू नये. हे देखील सभ्यपणाचे लक्षण आहे आणि चांगले वाहन चालवण्याच्या एथिक्समध्ये येते.
हॅलोजन लॅम्प आणि पांढरा प्रकाश असणारे दिवे
आजकाल वाहनांत हॅलोजन लॅम्प आणि पांढरा प्रकाश असणारे दिवे येतात. काही मॅन्यूफॅक्चररच ते नव्या वाहनात आधीच बसवून वाहन विकतात. ( यात कायद्याचे उल्लंघन होते का हे पाहणे आरटीओचे काम आहे. ते जबाबदारीने वागतात का हा वादाचा मुद्दा आहे.)
आपल्या वाहनांत जर असे दिवे आधीच बसवून आलेले असतील तर आपण ते दिवे काढून केवळ इतरांसाठी साधे पिवळे दिवे बसवू एवढे समाजाप्रती संवेदनशील आपण निश्चित नाही. ( हे वाक्य फार दु:खाने लिहावे लागते आहे.) पण आपले वाहन जुने असेल तर आपल्या वाहनात असे हॅलोजन किंवा पांढरा प्रकाश देणारे दिवे शक्यतो बसवू नये. जास्तीचे दिवे, फॉग लँप, मोटरसायकलींच्या हॅन्डलजवळ तिव्र प्रकाशाचे एलईडी लावणे असे प्रकार शक्यतो टाळावेत. (यात जास्त आवाजाचा सायलेंसर, रिवर्स हॉर्न आणि जास्त किंवा निराळा आवाज असलेले हॉर्न बसवणे देखील येते.) अशा प्रकारच्या दिव्यांची खरोखरच आवश्यकता आहे का हा प्रश्न मनाला विचारावा. इतरांनी केले म्हणून मी पण केले पाहीजे हि वृत्ती नसावी. अर्थात वाहन घेणे ही एक लग्झरी समजली जाते. ठिक आहे तसे समजा. वाहनाचा आतील भाग कितीही सजवा पण वाहनाच्या बाह्य भागात काही बदल करणे, इतरांना हानी पोहोचेल असे बदल करणे कायद्याने कितपत योग्य आहे त्याचा विचार करावा. नियम आणि कायदे हे आपल्या भल्यासाठी असतात. भले आपल्याला आपल्या जीवाची काळजी नसेल पण खाजगी वाहन रस्त्यावर आले तर ते सार्वजनीक होते. तेथे सामाजीक वर्तनच केले पाहीजे. समाजाप्रती आपली जी जाणीव आहे ती प्रगल्भ ठेवली पाहीजे.
पोलीस, आरटीओ - सरकारी खात्यांची कर्तव्ये
पोलीस, वाहतूक पोलीस शाखा, आरटीओ यांनी वेळोवेळी निरनिराळ्या माध्यमातून या नियमांबद्दल जागरूकता आणणारे कार्यक्रम केले पाहीजे. भारतीय लोकांत - समाजात ब्रेनवॉश केल्याशिवाय एखादी गोष्ट त्यांच्या डोक्यात शिरतच नाही. एखादा नियम, कायदा त्यांच्या डोक्यात भिनवावा लागतो तरच तो अंगवळणी पडतो. आरटीओ, पोलीसांनी झेब्रा क्रॉसींगबाबत बर्‍यापैकी जाणीव केली आहे. त्यामुळे वाहने जरी झेब्रा कॉसींगवर (अजूनही!) थांबत असतील पण कमीतकमी (!) झेब्राक्रॉसींगच्या पुढे तर थांबत नाहीत हा असल्या शिकवणूकीचा (की पोलीसांनी दंड घेतल्याचा) फायदाच समजायचा! (समजले नसेल तर वाक्य पुन्हा वाचा.)
असलीच जागरूकता, वारंवार सांगणे, ब्रेन वॉश करणे हे अपर बीम, लोअर बीम ( हाय बीम- लो बीम, अप्पर- डिप्पर), रिव्हर्स हॉर्न, मोठ्या आवाजाचे सायलेंसर, पांढरे, हॅलोजन, तिव्र प्रकाश देणारे हेडलँप, टेल लँपला सजवणे, वाहनात बाह्य बदल करणे या बाबतीत पोलीस, वाहतूक पोलीस शाखा, आरटीओ तत्सम शासकीय खाते आदींनी जनतेत केले पाहीजे. वेळोवेळी जनतेला सजग केले पाहीजे. अपर बीम आणि तत्सम नियम, कायदे वारंवार सांगितले पाहीजे.
मला एक आश्चर्य वाटते, आवाज मोठे असणारे सायलेंसर गाडीला लावतात तर मग त्याला सायलेंसर का म्हणतात. विनोद सोडा, पण आपण समाजाप्रती किती सिरीअस आहोत हेच ही बाह्य लक्षणे दाखवतात. असो.
या असल्या अपर लोअर, हाय लो बीम वर एक युट्यूबवर बंगलोरच्या आदीत्य कुमार - विषयम मेडीआ याने "EDUCATED SUTIYA... ARE YOU ONE OF THEM?" हे टायटल असणारा विडीओ अपलोड केला आहे. वाहनांविषयी, अपर बीम विषयी असलेल्या भारतीय मानसीकतेला "एज्यूकेटेड सुतीया....त्यातले आपण तर नाही ना?" हे शिर्षक अगदी परफेक्ट फिट होते आहे. या विडीओला फक्त ६०४ व्हूज, ५ लाईक्स, १ डिसलाईक आणि एक कमेंट मिळालेले आहेत. (तो एक डिसलाईक देणारा एज्यूकेटेड सुतीया असावा.) याच्या विरूद्ध "जेसीबीकी खुदाईला" या विडीओला किती लाईक्स आणि किती व्ह्यूज मिळाले असतील याची गणती आपल्यापैकीच बर्‍याच जणांच्या तोंडावर असेल. खरोखर आपण एज्यूकेटेड सुतीया आहोत का याच ज्याने त्याने विचार करायचा आहे. काल रात्री रस्त्याने जातांना माझे आणि माझ्या बरोबर चालणार्‍या पथीकाचे डोळे समोरच्या वाहनाच्या प्रकाशाने दिपले तेव्हा मी असलेच उद्गार काढले होते. माणसे शिकून शिक्षित झालीत पण सुशिक्षीत झाली नाहीत.
एका वाहन बनवणार्‍या कंपनीने डिप्पर या नावाने गर्भनिरोधक बाजारात आणले होते. कारण बर्‍याच ट्रक्सवर "Use Dipper at Night" हे स्लोगन लिहीलेले असते. यामुळे वाहनधारकांमध्ये कितपत आणि नक्की कोणत्या "विषयाची" जागरूकता झाली असेल याची आपल्याला कल्पना आली असेलच. हे असले धेडगूजरी आणि आपलाच फायदा होणारे जाहिरातीचे प्रयोग त्या त्या कंपन्यांनी थांबावावेत आणि या बाबतीवर खर्च होणारा पैसा योग्य ठिकाणी सत्कारणी लावावा. रस्ते अपघात खूप होत आहेत. या बाबतीत सरकार आपली जबाबदारी टाळू शकत नाही. सरकारला वाहनधारक, वाहनचालक, वाहन मॅन्यूफॅक्चरर आदींकडून खूप पैसा मिळतो आहे. त्यातील काही भाग हा सोशल अवेअरनेस या कारणाखाली खर्च करून या अशा न पाळल्या जाणार्‍या वाहतूक नियमांबाबत जागरूकता आणली पाहीजे.
वाहतूक पोलीस रात्री ड्युटी संपवतात. वाहतूक पोलीस आपले मित्र आहेत. त्यांच्या कामाचे तास खूप आहेत याची मला जाणीव आहे. त्यांच्या संख्येत अधीक वाढ करून त्यातील अधीकचे पोलीस रात्री काही प्रमाणात शहरात नाकेबंदीसाठी नेमून करून असे नियम न पाळणारे वाहनधारक - जे अप्पर लाईट लावून, सायलेंसर बदलून किंवा प्रखर हेड लँप लावून, रिव्हर्स हॉर्न लावून वाहन चालवतात - त्यांना समज दिली पाहीजे. प्रसंगी कायद्याचा बडगा दाखवला पाहीजे. पण यात दंड वसूल करायला अजून एक निमित्त भेटले असे व्हायला नको. राज्यात स्पिडगन असलेल्या नव्या गाड्या पोलीस खात्यात दाखल झाल्या आहेत. त्या देखील असे अपर बीम असलेली वाहने पकडू शकतात.
हा लेख शासनापर्यंत हस्ते परहस्ते जावा. शासन जे काही करते आहे त्यात सुयोग्य बदल व्हावा अशी या लेख लिहीण्यामागे प्रेरणा आहे. सोशल मिडीया फार अ‍ॅक्टीव्ह असल्याने मिसळपाव.कॉम सारख्या माध्यमातून तो लोकांपर्यंत जावा अशी इच्छा आहे. या लेखाच्या भरपूर कॉपी होवोत. हा लेख कॉपीराईट वगैरे मुक्त आहे. कुणाचे नाव नाही लिहीले तरी चालेल. छोटी वाक्ये, परिच्छेद कॉपी झालेत तरी हरकत नाही. पण समाजाच्या तळापर्यंत वाहतूकीच्या नियमात असे काही आहे याची जाणीव होणे महत्वाचे आहे. कारण वाहतूकीचा किंवा वाहन चालवण्याचा परवाना कसा मिळतो हे आपण जाणतोच. त्यात वाहतूकीच्या नियमांबाबत शिक्षण किती होते या बाबतीत संशोधन करावे लागेल.
लेखात काही तृटी असतील तर त्या जरूर सांगा. आणि हा लेख संपल्यानंतर पहिले दोन परिच्छेद पुन्हा वाचा.
ट्रकवर जसे मागे लिहीतात तसे या लेखाच्या शेवटी लिहीतो की: Use Dipper at Night - रात के समय डिप्पर इस्तेमाल किजीए - आणि हो, या वाक्याचा कृपया योग्य तो अर्थ घ्या. हॅपी अ‍ॅन्ड सेफ ड्रायव्हींग!

Saturday, December 7, 2019

अहो डॉक्टर, काढा वेंटीलेटर

अहो डॉक्टर, काढा वेंटीलेटर

अहो डॉक्टर
काढा की माझे वेंटीलेटर
मला काही झाले नाही
बघा मी लिहीन सुद्धा लव लेटर
(कोरस: हिला द्या हो डिसचार्ज लेटर)

न मी आजारी न मी बेचैन
डोकेदुखी नाही मला न तापाची कणकण
पण मग का देता मला तुम्ही इंजेक्शन?
काढा की माझे वेंटीलेटर

थोडे औषध मी घेते थोडे तुम्हीपण घ्या ना
माझ्या हृदयाची धडधड कान देवून ऐकाना
सलाईन ऑक्सीजन दुर करा अन घ्या माझे टेंपरेचर
काढा की माझे वेंटीलेटर

इसीजी नका करू तुम्ही
पल्सही नका पाहू कोणी
लॅब टेस्ट नका सांगू, बंद करा तो समोरचा मॉनिटर
काढा की माझे वेंटीलेटर

पलंगावर स्पेशल रूमच्या, मी आहे झोपलेले
काळजी घेण्या नर्स नाही मग तुम्ही का दुर? 
इकडे या अन ऐका पलंगाची कुरकुर
काढा की माझे वेंटीलेटर
अहो काढाना!

(सदरचे उपचार या खाजगी रुग्णालयात हिंदीतही उपलब्ध आहेत. रुग्णांनी लाभ घ्यावा.)
- डॉ. पाभे (हार्ट (फेल) तज्ञ)
०७/१२/२०१९

ओ डॉक्टर निकालो वेंटीलेटर

ओ डॉक्टर निकालो वेंटीलेटर

ओ डॉक्टर निकालो मेरा वेंटीलेटर
मुझे नही कुछ हुवा
चाहे तो लिखवा लो मुझसे लव लेटर
(कोरसः न न ना, इसे दे दो डिसचार्ज लेटर)

न मै बिमार हू न मै परेशान हू
सभी तरीकेसे मै तंदूरूस्त हू
फिर क्यू देते है मुझे इंजेक्शन?
निकालो मेरा वेंटीलेटर

थोडी दवाई मै खाती हू वो आप भी खा लो
दिलकी बिमारी मेरी थोडी आप ले लो
सलाईन ऑक्सीजन हटवा दो बढा है मेरा टेंपरेचर
निकालो मेरा वेंटीलेटर

इसीजी मत तुम देखो
पल्सही मत चेक करो
लॅब टेस्ट करने मत बोलो, बंद करो वो मॉनीटर
तुम बस निकालो मेरा वेंटीलेटर

स्पेशल रूम मे लेटी हू मै बिस्तर पर
नर्स भी नही यहां आप आ जावो इधर
सारे लोग करते है वो हम करे तो क्या है प्रॉब्लेम?
निकालो मेरा वेंटीलेटर
निकालो ना!

- डॉ. पाभे (हार्ट (फेल) तज्ञ)
०७/१२/२०१९

Friday, December 6, 2019

कव्वाली: तुला पाहिले की

कव्वाली: तुला पाहिले की

किती तुझी आठवण यावी किती मी तुझ्यासाठी झुरावे
काही बंधन नाही त्याला तुझ्यासाठी मी मरावे
दुर जरी असशील तू माझ्या मनाला तू ओढून नेते
पण तुला पाहिले की काळजात धकधक होते

किती तू वार केले माझ्या हृदयावर
खोल जखमा वरून केल्या त्यावर
नाही कधी जरी रक्ताचा थेंब त्यातून वाहीला
तुझ्या नजरेचा बाण तेथे गुंतून राहिला
त्या कत्तलीने मी कसा मेलो ते माझे मला ठावूक
पाहिले एकवार तू अन मी जळून गेलो खाक
नको आता तरी तू वेळ लावू पुन्हा सामोरी ये ग ये
तुला पाहिले की काळजात धकधक होते

सागरामध्ये असते पाणी, पाण्याचीच वाहते नदी
मी तुझाच आहे अन तुझ्याविना राहिलो का कधी?
तुझा चेहेरा समोर जेव्हा जेव्हा येतो
समोर तू नाही दिसत म्हणून विव्हल मी होतो
लाख येवोत इतर सुंदर ललना समोर माझ्या
तुझ्या सुंदरतेसमोर काय कथा त्यांची, त्या असती
सा-या फिक्या
नाक डोळे रंग रूप चेहेरा बोलणे चालणे वेगळे ग तुझे
तुझ्या वर मी मरतो लाख वेळा केवळ एकदा नव्हे ते

तू माझी प्रेरणा तू
नदी तू जीवन तू
माझे जगणे तू
माझे तगणे तू
माझे मरणे तू
मला तारणारी तू
तू माझे आकाश अन चांदणे तू
रात्रीच्या अंधारातील प्रकाश तू
डोंगरावरील घनदाट झाडी तू
गर्द उन्हातली माझी सावली तू
तू माझा आधार तू
माझ्या जीवनाची साथीदार तू

तुच माझ्या दिलाची धडधड धडधड
तुझ्याविना राहू कसा मी, होते तडफड
तुझा हात हाती यावा हिच मनाची तगमग
वाढते ती जेव्हा जेव्हा तू समोर माझ्या येते
तुला पाहिले की काळजात धकधक होते

- पाषाणभेद
५/१२/२०१९

Saturday, November 30, 2019

संदीपची हुषारी

"राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी विद्यानिकेतन हायस्कूल मधील संदीप सर्जेराव कवडे या विद्यार्थ्याची निवड" अशी पेपरमधील बातमी वाचून सर्जेरावांना आपल्या मुलाचा अभिमान वाटला.
"मी साखर कारखान्यावर जावून येतो ग. वेळ लागेल. जेवणाची वाट पाहू नको. गोविंदाला टॅक्टर घेवून डिझेल भरायला पाठवून दे. पैसे टेबलावर काढून ठेवलेत",
सर्जेराव सकाळच्या कामाचे नियोजन करत आपल्या बायकोला सुचना देत होते.
पिंपळदचे सर्जेराव कवडे मोठी आसामी होती. ते प्रतिथयश प्रयोगशील शेतकरी तर होतेच पण सोबतच त्यांचा तालूक्याच्या एमआयडीसीतल्या जागेत एक जॉबवर्कचा कारखानाही होता. सकाळपासून त्यांच्याकडे कामाची रीघ असे. त्यांना बोलायलाही सवड नसे. शेतामध्ये ऊस, कांदे अशी पिके ते घेत. झालेच तर सोबतीला टमॅटो, भाजीपालाही करत. शेतीत गडीमाणसे असल्याने त्यांच्यावर फार लक्ष ठेवून कामे करवून घ्यावी लागत. आताची साखर कारखान्यात जाण्याची लगबग म्हणजे तेथे जनरल बॉडी मिटींग होती अन सर्जेराव तांत्रीक संचालक होते. नवीन क्रशर कशापद्धतीने बसवायचा म्हणजे ऊसाचे गाळप वेगाने चांगले होईल यावर त्यांना आज बोलायचे होते.
"आता साखर कारखान्यावर जातच आहात तर या महिन्याची साखरही घेवून या. ड्रायव्हरकडे कार्ड दिलेय मी. तो आणेल. पण त्याला तेवढा वेळ द्या म्हणजे तो गेटवर जाईल अन घेवून येईल", सौ. रंजना सर्जेराव कवडे गृहीणीच्या काळजीने बोलल्या. साखर कारखान्याचे सभासद असल्याने त्यांना दर महिन्याला त्यांच्या शेअर्सवर त्या वाट्याची साखर मिळत असे. आता कारखान्यावर चक्कर होतच आहे तर साखरही आणणे होईल या हिशोबाने त्या बोलल्या.
"आणि हो, संदीपच्या शाळेत या पंधरा तारखेला, पुढच्या आठवड्यात, शनिवारी वार्षिक स्नेहसंमेलन आहे. कमीतकमी तो दिवस तरी मोकळा ठेवा."
"पाहू. शनिवारचे तसे नियोजन करतो घरीच थांबण्याचे. पण ऐनवेळी काही काम निघाले तर सांगता येत नाही", सर्जेराव सावध बोलले. कामाच्या गडबडीतून बाहेर पडून संदीपचा कार्यक्रम पाहणे शक्य होईल का या बाबतीत ते शाशंक होते.
"संदीप घरी आला की त्याला परवा आपल्या फॅक्टरीत मी घेवून जाईन याची आठवण दे", सर्जेराव पायात बूट चढवित म्हणाले अन ड्रायव्हरला गाडी साखर कारखान्याकडे घ्यायला सांगितली.
संदीप - सर्जेरावांचा धाकटा मुलगा इयत्ता आठवीत तालूक्याला जात असे. आपल्या मुलाच्या स्नेहसंमेलनातील नाटकातील भाग वडिलांनी पहावा अशी संदीपच्या आईची इच्छा असल्याने शनिवारी मोकळा वेळ ठेवण्याची तिने सर्जेरावांकडे आग्रह धरला होता. संदीप जात्याच हुषार अन लहाणपणापासून चपळ होता. निरनिराळे खेळ अन अभ्यासात तो दर इयत्तेत त्याची चुणूक दाखवत असे. त्यामुळे चांगले शिक्षण भेटावे म्हणून सर्जेरावांनी त्याला तालूक्याच्या चांगल्या शाळेत घातले होते. अर्थात तालूका अन शाळा फार काही लांब नव्हती. किंबहूना त्यांचे गाव हे तालूक्याच्या गावाचे उपनगरच गणले जात होते. घरापासून शाळा केवळ पाच सहा किलोमिटर अंतरावर होती. शाळेसाठीचे इतके दुरचे अंतर तर शहरातदेखील असते. शाळेत जा ये करण्यासाठी घरापर्यंत शाळेची बस यायची. त्यामुळे त्या बाबतीत संदीपच्या आईला काही काळजी नव्हती. सकाळी डबा घेवून संदीप सात सव्वासातला घरून निघत असे अन दुपारी साडेतीन पर्यंत घरी येत असे. संदीप वेळच्यावेळी अभ्यास करत असल्याने त्याच्याकडे सर्जेराव अन रंजनाबाईंना लक्ष द्यायची गरज नव्हती.
सर्जेराव कामात व्यस्त जरी असले तरी त्यांचे घराकडे लक्ष होते. संदीपपेक्षा मोठी मुलगी दहावीला होती. अन सर्वात मोठा मुलगा इंजिनीअरींग च्या दुसर्‍या वर्गात होता. मोठा मुलगा आपला स्वत:च्या फॅक्टरीकडे बघेल अशा हिशोबाने त्याला मॅकॅनिकल शाखा घ्यायला लावली होती. झालेच तर त्याने पुढे जावून साखर कारखान्यात मशीन पार्ट्स पुरवठा करण्याचे काम मिळवावे अशीही त्यांची इच्छा होती. आतापासून संदीपलाही ते अधून मधून कारखान्यावर घेवून जात असत.
स्नेहसंमेलनातल्या नाटकात भाग घेतल्यानंतर शाळेतून घरी आल्यानंतर संदीप त्याच्या नाटकातल्या भागाची तयारी करत असे. घराच्या बाजूला अंगणात एका मोबाईलमध्ये नाटकाचे संवाद मोठ्याने लावून तो त्याबरोबर बोलत हालचाली करत असे. बाजूला एक दोन गडी माणसे त्याचे श्रोते होत असत. मग संदीपची आई
कामाचा खोळंबा होत आहे असे पाहून त्या गडीमाणसांना बोलून कामाला लावत असे. या शनिवारचा संदीपचा कार्यक्रम बघण्यासाठी त्याच्या घरातले सदस्य आतूर झाले होते. तो कार्यक्रम पहायला संदीपचा आतेभाऊ सतिश गुरूवारीच आला होता. सतिशदेखील संदीपच्याच वयाचा सातवीतला विद्यार्थी होता. आपल्या मामेभावाच्या तालमीला संध्याकाळी तो हजर होता. संदीपच्या पाठांतराची त्याने जातीने तयारी करून घेतली. पाठांतर अर्थातच छान झाले होते. रात्री जेवण करतांना संदीपच्या वडिलांना उद्या संदीपला सुटी असल्याचे समजले. जेवण संपत आले तेव्हा त्यांनी संदीपला उद्या शुक्रवारी बँकेत एक चेक जमा करायला सांगितला. संदीपला बँकेच्या व्यवहाराची माहिती व्हावी हा त्यांचा हेतू होता. संदीपनेही आनंदाने होकार भरला अन जेवणानंतर टिव्ही बघून तो अन सतिश झोपले.
दुसर्‍या दिवशी, शुक्रवारी स्नेहसंमेलनाच्या आदला दिवसाची सुटी असल्याने संदीप जरा उशिरा उठला. आईने केलेला उपमा अन दूध पिवून तो अन सतिश बँकेत जायला तयार झाले. खांद्यावरील बॅगेत त्याने चेकचे पाकीट अन पिण्याच्या पाण्याची बाटली घेतली. मग संदीप आणि सतिश यांची जोडगोळी सायकलीवर बँकेत जायला निघाली. जिल्हा सहकारी बँकेची शाखा तशी जवळच बाजारपेठेतील गल्लीत होती. बैठ्या इमारतीत बँकेचे कामकाज चाले. लहान गाव असल्याने बँकेच्या शिपायापासून ते मॅनेजरपर्यंत सारे जण संदीपला सर्जेरावांचा मुलगा म्हणून ओळखतच होते. या आधीही संदीप किरकोळ कामे करायला बँकेत आलेला होता. बाजूला अंगणात वाहने थांबवायची जागा केलेली होती तेथे त्यांनी सायकल उभी केली. मुख्य मार्ग लोखंडी दरवाजा आणि त्याला साखळी अशा रचनेचा होता. तेथे बँकेत सुरक्षारक्षक असलेले रामभाऊ चौरे हे आपली बंदूक घेवून उभे होते. त्यांनी संदीपला आज तुझे बाबा नाही आले का तुझ्या बरोबर? असे विचारून त्याच्या सोबत असलेल्या सतिशची चौकशी केली. त्यांना उत्तर देवून हे दोघे भाऊ आत शिरले. सकाळचे सव्वादहा वाजायची वेळ असल्याने अजून बँकेत फारशी वर्दळ नव्हती. सगळा स्टाफ आलेला होता. मॅनेजरसाहेब त्यांच्या कॅबीनमध्ये कुणाशीतरी बोलत होते. कॅश काऊंटरवर चार पाच जण उभे होते. कॅशीअर कॅश मोजण्याच्या कामात मग्न होता. बाजूला तिन क्लार्क त्यांच्या कामात होते. त्यापैकी दोघांसमोर एक एक व्यक्ती खुर्चीवर बसलेली होती.  
संदीपने आपल्या बॅगेतून पेन आणि चेक काढला आणि कॅश काऊंटरच्या बाजूला भरणा करण्याच्या स्लिप असलेल्या टेबलकडे गेला.  सतिशही त्याच्या बाजूला असलेल्या बाकावर बसण्याच्या तयारीत होता. संदीपने बॅग सतिशकडे दिली आणि तो चेक जमा करण्याचे चलन लिहू लागाला. तेव्हढ्यात मुख्य दारातून एक दाढी राखलेला व्यक्ती आत शिरला आणि आत येताच त्याने हातातील पिस्तूल दाखवत ओरडला,
"खबरदार, कुणीच हलू नका. जागेवर उभे रहा. कुणी मोबाईलदेखील काढू नका. नाहक मला गोळ्या झाडाव्या लागतील."
या अशा ओरडण्याने बँकेत उपस्थित असणार्‍या सर्व लोकांच्या मनात भिती दाटली. बँकेत दरोडा पडलेला होता. नक्की काय करावे हे कुणालाच सुचेनासे झाले.
त्यानंतर आलेल्या आणखी दोन जणांनी सुरक्षारक्षक असलेल्या रामभाऊंच्या हातातली बंदूक हिसकावली आणि एकजण त्यांच्या जवळच थांबला. उरलेला दुसरा व्यक्ती मॅनेजरसाहेबांच्या कॅबीनकडे पळाला. कॅश काऊंटरवर त्यांचा एक साथीदार आधीच रांगेत पैसे भरण्याच्या बहाणा करत उभा होता. तो कॅशिअरवर ओरडला, "गडबड करू नको. आहे ती कॅश ड्रावरमधून काढून वर टेबलावर काढून ठेव." त्याने हाततल्या पिशवीत पैसे भरण्याची तयारी केली.
कॅश काऊंटरजवळ हि गडबड उडाली असतांनाच सतिश आणि संदीपने पाहिले की मधल्या मोकळ्या जागेत एक जण हातात पिस्तूल घेवून उभा आहे आणि दुसरा मॅनेजरच्या कॅबीनकडे पळत जात आहे. त्या दरोडेखोराने पळत जावून मॅनेजर साहेबांसमोरील व्यक्तीला खुर्चीतच बसायला सांगितले आणि मॅनेजरसाहेबांना त्यांच्या खुर्चीला दोरखंडाने बांधले. इकडे तो दाढी असलेला इसम हातातील पिस्तूल रोखत कॅशीअरकडे जाण्यासाठी वळाला. तेव्हढ्यात संदीपने त्या दरोडेखोराचे आपल्याकडे लक्ष नसल्याचे पाहून चपळाईने सतिशला बाकावरून उठवले आणि तो बाक मोठ्या ताकदीनिशी त्या पिस्तूलधारीच्या पायाकडे ढकलला. ते ढकलत असतांनाच तो मोठ्याने ओरडला, "सतिश पळ, रामभाऊकाकांना सोडव."
संदीपच्या ओरडण्याने सतिशलाही क्षणभर काय करावे ते समजले नाही. पण तो तात्काळ सावरला आणि दरवाजाकडे पळाला. संदीपच्या आवाजाने आणि सतिशच्या पळण्याने दाढी असलेला दरोडेखोर भांबावला. तेवढ्यात त्याच्या पायांवर संदीपने ढकललेला बाक आदळला. त्या वेदनेने तो कळवळला आणि तोल जावून खाली पडला. तेव्हड्या वेळात सतिश रामभाऊंकडे पोहोचला होता. रामभाऊंची बंदूक घेतलेला दरोडेखोर थोडा आरामातच होता. सतिशने त्याला धक्का दिला. रामभाऊही संधी बघतच होते. त्यांनी तात्काळ शेजारच्या दरोडेखोराकडून आपली बंदूक हिसकावली आणि बंदूकीच्या दस्त्याने त्या दरोडेखोराला मारले. त्याचा ताबा आता रामभाऊंनी घेतला होता.
मुख्य पिस्तूलधारी दरोडेखोर बाकामुळे पडलेला पाहून आणि रामभाऊंनी एका दरोडेखोराला ताब्यात घेतलेले पाहून बँकेच्या दोन कर्मचार्‍यांनी काऊंटरवरून उडी मारून त्याच्या हातातले पिस्तूल ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला. बँकेत आलेल्या एका ग्राहकाने त्या दरोडेखोराच्या हातावर जोरदार पाय मारला. त्या दणक्याने ते पिस्तूल त्या दरोडेखोराच्या हातातून गळून बाजूला फेकले गेले. एका कर्मचार्‍याने ते पिस्तूल ताब्यात घेतले.
इतक्या वेळात मॅनेजरसाहेबांनी संधी साधून पायाच्या गुढग्याने त्यांच्या टेबलाखाली बसवलेल्या संकटकाळी सायरन वाजवायचे बटन दाबले. तात्काळ सायरनचा भोंगा वाजू लागला. हे सर्व इतक्या कमी क्षणात घडले की कॅश काऊंटरवरचा आणि मॅनेजर साहेबांच्या कॅबीनमधले दोघेही दरोडेखोर भांबावून गेले. भोंगा वाजायला सुरूवात होताच बँक ज्या रस्त्यावर होती तेथील आजूबाजूच्या दुकानातील लोक काय घडले हे पाहण्यासाठी बँकेच्या दिशेने धावले. त्यात जे पुढे होते त्यांना घडलेला प्रकार तात्काळ लक्षात आला. त्या लोकांनी प्रथम रामभाऊंच्या ताब्यातील दरोडेखोराला पकडले. सर्वत्र आरडाओरड चालू झाली. त्या गर्दीतील कुणीतरी व्यक्तीने पोलीसांना फोन केला.
आता ते चारही दरोडेखोर गावातल्या आणि बँक कर्मचार्‍यांच्या ताब्यात होते. मॅनेजरसाहेबही आता दोरखंडातून सुटलेले होते. बाहेर वाहनाचा सायरन वाजवत पोलीस आले. त्यांनी ताबडतोप परिस्थीतीवर नियंत्रण मिळवले आणि चारही दरोडेखोरांना ताब्यात घेतले.
पोलीस इन्स्पेक्टरांना बँकेच्या मॅनेजरांनी घडलेली सारी गोष्ट सांगितली. दरोडेखोर कसे आले, त्यांनी लोकांना कसे धमकावले आणि संदीप व सतिश यांनी ज्या चतूराईने धावपळ करत बाजू उलटवली ते ऐकून इन्स्पेक्टर अगदी आश्चर्यचकीत झाले. इतक्या कमी वयाच्या संदीपने बाक फेकून आपल्या धाकट्या आतेभावाला ज्या सुचना दिल्या ते ऐकून त्यांनी संदीपच्या चतूराईचे कौतूक केले. सतिशनेही त्याची कामगिरी चोख बजावलेली होती. त्याच्या धावपळ करण्याने इतर दरोडेखोरांचे लक्ष पांगले होते. इन्स्पेक्टर साहेबांनी त्या दोघा मुलांचे तोंडभरून कौतूक केले. त्यांनी तात्काळ संदीपच्या वडीलांना फोन करून हि बातमी सांगितली. सरकारदरबारी उच्चपदी या दोन मुलांच्या धाडसाची बातमी मी स्वतः सांगून शुर बालकांसाठी असलेल्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी शिफारस आणि त्यासाठी पाठपुरावा करेन याचे आश्वासन दिले.
दुसर्‍या दिवशी संदीपच्या शाळेच्या स्नेहसंमेलनात संदीप आणि सतिशचा भव्य सत्कार करण्यात आला. कधी वेळ न मिळणारे सर्जेराव या सत्कारसमारंभाला आणि संंदीपच्या नाटकाला आवर्जून उपस्थित होते हे सांगणे न लगे.

Monday, November 25, 2019

यशाचे आता गा मंगल गान

यशाचे आता गा मंगल गान

विजय मिळाला, आनंद झाला,
यशाचे आता गा मंगल गान
बिगूल वाजला, रणभेरी वाजल्या,
समरगीत गावूनी घ्या तानेवरती तान     ||धृ||

बलाढ्य असा तो शत्रू होता,
तोफा बंदूका शस्त्रसज्जता
फंद फितूरी किती करविली,
अंती आपणच ठरलो विजेता
विजयाचे गीत म्हणा आता, अन नर्तन करा बेभान ||१||

युद्धखोरपणा उगा नका दाखवू,
शत्रृ रणांगणी पाहून घेवू
युद्धभुमी प्रिय आम्हा वीरांस,
लढता लढता मरण पत्करू
शरणागती नसे कदापी,  ध्वजासवे उंच करू आमची मान ||२||

- पाषाणभेद
२५/११/२०१९

Monday, November 18, 2019

वेदनाच मला मिळू दे

नकोत आनंददायी संवेदना
हे प्रभो वेदनाच मला मिळू दे
हरवू दे माझा मी पणा
त्यासाठी मजला धिर दे
सुख असे हे की डाचते मला ते
तेच ते कणखर मनाला पंगू बनवते
भौतिकाच्या मागे न लागो शाश्वत असा अशिष दे
ऐहीक श्रीमंत असूनही मदतीचा हात नाही
कशाला मग उगाचच मी दानशूर मिरवत राही
तुझ्या हातांची सर येण्याची मजला बुद्धी दे
तावून निघावे भट्टीत सोने मग दागिणा बनण्या
त्यासम माझे मन होवूदे तयार तुझ्या कडे येण्या
घण संकंटांचे घाल पाठी, मळली वाट मला न दे
- पाषाणभेद
१७/११/२०१

Tuesday, November 12, 2019

देशभक्ति समुहगीत: भारतभूचे सुपुत्र आम्ही

देशभक्ति समुहगीत: भारतभूचे सुपुत्र आम्ही

भारतभूचे सुपुत्र आम्ही तिचीच आम्ही पूजा करू
अन तिचेच गावू गान
वंदन करुनी भारतभूला त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम || धृ||

देशासाठी कितीक झटले
कितीक हुतात्मे अमर जाहले
स्मृती तयांची आज येतसे
स्वात्रंत्र्यासाठी लढले अन तयांनी त्यागले प्राण
त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम ||१||

हातामध्ये घेवूनी तिरंगी झेंडा
गर्जले सैनीक पुढे चला लढा
शस्त्रे चालवूनी शत्रू मारीले
ध्वज फडकवती अन त्यापुढती तुकवती मान
त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम ||२||

भारतभूचे सुपुत्र आम्ही तिचीच आम्ही पूजा करू
अन तिचेच गावू गान
वंदन करुनी भारतभूला त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम ||धृ||

- पाषाणभेद
१२/११/२०१९

Monday, November 11, 2019

मी पुन्हा येईन

घेतले तू उधार पैसे
आता देत नसशील 
करण्यास ते वसूल
मी पुन्हा येईन

जात असले मी माहेरी
करू नका तुमची थेरं
पाहण्या ते सारं
मी पुन्हा येईन

नाही लिहीता येत पेपर
कॉपी जरी करशील
काय ते तपासण्यास
मी पुन्हा येईन

मला न दाखवता
व्हाटस अप मेसेज पाहता
काय ते पाहता ते पाहण्यास
मी पुन्हा येईन

लेख वगैरे लिहीता येथे भारी
पण या कवीतेला
प्रतिक्रीया देतात की नाही ते पाहण्या
मी पुन्हा येईन

- पाषाणभेद
११/११/२०१९

आंघोळ : एक कंटाळवाणी क्रिया

सदर लेख मिसळपाव.कॉम या संकेतस्थळाच्या दिपावळी २०१९ च्या दिवाळी अंकात छापला (हार्डकॉपी तसेच सॉप्टकॉपीत) गेला आहे.

(खालील लेख प्रचंड कंटाळवाण्या लेखकाचा अतिप्रचंड कंटाळवाणा आहे अन तो त्याने अगदी आळसात लिहिला आहे. लेख पूर्ण करण्यासही कित्येक दिवस - नव्हे, महिने लागलेले असल्याने तो आपणस कितपत रुचेल हे माहीत नसल्याने आपआपल्या जबाबदारीवर तो वाचावा. झोप येण्यासाठी वाचावयास उत्तम आहे. तरीही धीर करून वाचताना आळस आल्यास जिथल्या तिथेच थांबून एक आंघोळ करून यावी. किमानपक्षी तोंड धुऊन पुन्हा वाचनास बसावे. झालेच तर एक पाभेचा चहा मारावा. त्याही पुढे जाऊन वाचल्यास लेखाखाली प्रतिक्रिया देऊन आपण फारच सक्रिय आहोत असे सिद्ध करायच्या भानगडीत पडून नये. मस्तपैकी आळस करून लेखाला कचर्‍याची कुंडी दाखवावी किंवा ऑनलाइनच्या जमान्यातल्यासारखे 'इग्नोर' मारावे. लेख वाचून प्रचंड कंटाळा आल्यास याच लेखकाचा आंघोळ: एक उत्साहवर्धक क्रिया हा लेख वाचून आंघोळ करून ताजेतवाने व्हावे.)
आंघोळीचा मला फार तिटकारा आहे. अगदी आळसच म्हणा ना! फार म्हणजे फारच. लहानपणी मला बळजबरीने आंघोळ घालायचे. ते अगदीच लहानपणी असावे. शालेय वयात कित्येकदा मी आंघोळीची गोळी घेऊन शाळेत गेलो आहे. तसाही प्रत्येक बाबतीत आळस हा माझ्या अंगाअंगात मुरलेला आहे. आंघोळीचेच पाहा ना! ती पाणी गरम करायची प्रक्रिया करा.. इलेक्ट्रिक हीटरचे बटण दाबा.. मग गरम पाणी येईल याची वाट पाहा. गॅस हीटरची तीच तर्‍हा. पूर्वी तांब्याचे बंब असायचे गरम पाण्यासाठी. आता तांब्याचे म्हणजे पाणी पिण्यासाठी तांब्या असतो तो नाही, तर तांबा हा धातू असतो. तुमच्यापैकी कुणी ते पाहिले नसतील. खेडेगावात अजूनही दिसतील. आताशा ते बंब गॅल्वनाइज पत्र्याचे असतात. पूर्वी ते तांब्याच्या धातूचे असायचे. एक दोन-अडीच फुटी उंचीचा अन दीड-पावणेदोन फुटी व्यासाचा तांब्याच्या पत्र्याचा दंडगोल असायचा अन मध्ये एक नळकांडे असायचे. खाली जाळी अन वरती झाकण असायचे. हा संच एका तिवईवर ठेवलेला असायचा. त्यात वरतून थंड पाणी घालण्याची सोय असायची अन खाली नळातून गरम पाणी बाहेर काढता यायचे. मधल्या पोकळ नळकांड्यात वरतून लाकडे टाकायची अन खालून ते पेटवायची, असा प्रकार असायचा.
हे बंब प्रकरण प्रचंड म्हणजे प्रचंड कंटाळवाणे काम असायचे. नळकांड्याच्या आत जाणारी लाकडे फोडून ठेवा.. ती लाकडे ज्याला बंबफोड म्हणत ते महिन्याच्या हिशोबाने वखारीतून आणा.. त्याचा साठा करा.. सकाळी उठून बंब पेटवा.. सगळ्यांच्या आंघोळी होईतो त्यात वेळोवेळी लाकडे अन थंड पाणी टाकत बसा.. गरम पाणी काढा.. राख काढा.. नसते उपद्व्याप. त्यापेक्षा मस्तपैकी आंघोळ न करता राहिलेले किती उत्तम! नको ती गरम पाण्यासाठी एवढी मरमर अन नको ती आंघोळ. मी तर कित्येक सकाळी अशा न-अंघोळीच्या घातलेल्या आहेत.* (*वाचकहो, हे वाक्य तीन-चार प्रकारे लिहिले होते. पण पुरोगामी टच असल्याचे हे योग्य वाटले आणि हेच कायम ठेवले.)
.
हे झाले बंबाच्या बाबतीत. बंब नसल्यास एका भांड्यात पाणी घेऊन ते पाणी गॅसवर तापवावे लागते.. बादलीतून बाहेरून गार पाणी प्रथम आणायचे.. ते त्या भांड्यात ओतायचे.. मग तापलेले पाणी परत बादलीत घेऊन ती बादली मोरीत नेऊन अंघोळ करायची.. किती ते उपद्व्याप! त्यातल्या त्यात सोलर असेल तर ठीक असते. पण गॅस हीटर असो, सोलर हीटर असो किंवा इलेक्ट्रिकल हीटर असो, त्रास हा असतोच. एक नळ चालू करून ते गरम केलेले पाणी बादलीत काढा अन दुसरा थंड पाण्याचा नळ चालू करून आधीचे गरम पाणी कोमट करण्यासाठी त्यात थंड पाणी मिसळा. त्यासाठी गरम अन थंड पाण्याचे कॉक चालू करावे लागतात. असे दोन दोन नळ - एक गरम पाण्यासाठी अन एक थंड पाण्यासाठी सुरू करावे लागतात. कित्ती कित्ती कंटाळवाणे काम आहे की हा नळ गरम पाण्याचा अन हा थंड पाण्याचा हे लक्षात ठेवणे?* (*मटा - गूगल ट्रान्सलेशन मेथड.) अन त्यातही एक नळ घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने अन दुसरा नळ घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने फिरवावा लागतो. म्हणजे ते कंटाळवाणे कामही लक्षात ठेवा. परत गरम पाणी खूपच गरम असेल तर त्यात हात घालून किती गरम आहे ते पाहावे लागते. पुन्हा त्यात उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या ऋतूप्रमाणे गरमपणाचे प्रमाण कमी जास्त असते. त्या पाण्यात आपल्याला सोसवेल असे थंड पाणी योग्य प्रमाणात मिसळणे खूपच कंटाळवाणे काम आहे.
हे झाले बादलीत पाणी काढण्याबद्दल. शॉवरसाठी हीच क्रिया जास्त कंटाळवाणी होते. न भिजता शॉवरच्या बाहेर राहून दोन्ही नळ योग्य त्या प्रमाणात फिरवायचे. नंतर योग्य तापमानाचे गरम अथवा गार-कोमट पाणी येईपर्यंत वाट पाहायची. सकाळी सकाळी खरोखर कंटाळवाणे काम आहे हे. एवढे केल्यानंतर आपल्याला आंघोळीसाठी कामगारांच्या भाषेतल्यासारखी 'चाल' भेटते. तुम्ही म्हणाल की आता बाजारात पाण्याचे तापमान दाखवणारे नळ आले आहेत ते. अहो, पण त्याचे तापमान आधी सेट करावेच लागेल ना? अन निरनिराळ्या ऋतूसाठी निरनिराळे तापमान कसे लक्षात ठेवायचे? आजकाल हवामान इतके बेभरवशाचे झाले आहे की एका दिवशी थंडी, दुसर्‍या दिवशी पाऊस अन तिसर्‍या दिवशी कडकडीत उनही पडते. एवढे कष्ट आंघोळीसाठीच्या पाण्यासाठी घ्यायचे फारच कंटाळवाणे काम आहे.
आता तुमचे (म्हणजे माझ्यासाठीचेच. शास्त्र असते ते म्हणण्याचे.) योग्य तापमानाचे पाणी काढून झाले तर मग प्रत्यक्ष आंघोळीला बसावे लागते. हे आंघोळीला बसणे फारच कंटाळवाणे काम आहे. त्यापेक्षा शॉवरखाली उभे राहणे हे एकदम सोपे आहे. पण शॉवरखाली उभे राहिले अन अंघोळीदरम्यान साबण हातातून सटकला, तर तो उचलायला खाली वाकणे खूपच कंटाळवाणे काम असते. साबण जर लांब घरंगळत गेलेला असला, तर तेथपर्यंत जाणे हे फरशीवरून सटकण्यालाही कारणीभूत ठरत असते. त्यामुळे मनात ती धाकधूक असते. जरी डोके धुवायचे नसेल तरी पंचवीस टक्के डोके या शॉवरमुळे भिजतेच भिजते. मग ते आणखी जास्त टक्के डोके भिजणार नाही याची काळजी घेत आंघोळ करावी लागते. त्यापेक्षा पाटावर बसून व बादलीत पाणी घेऊन केलेली आंघोळ परवडते. शॉवरखाली आंघोळ ही जास्त जागरूक राहून करावी लागते अन पाटावर बसून केलेली आंघोळ जास्त आळशीपणात होते, हे माझे निरीक्षण आहे. बसून आंघोळ करण्यात साबण सटकला तर जास्त लांबवर घरंगळत नाही. आपल्या शरीराच्या परीघातच तो पडतो अन त्यामुळे चेहर्‍याला साबण फासला असतानाही अंदाजाने चाचपडत हाताने शोधता येतो. बसून केलेल्या आंघोळीमध्ये डोके ओले करायचे नसल्यास शंभर टक्के आपण त्यात यशस्वी होतो, हा मोठा फायदा आहे. डोके ओले न केल्याने पुढे आंघोळ संपल्यानंतर ते पुसण्याचा प्रश्नच येत नाही. वाचलेला वेळ इतर आळशीपणात घालवता येतो. तसेही डोके धुवायचे असल्यास शॅम्पू, कंडीशनर वगैरेच्या पुड्या ओल्या हातांनी कशा फाडायच्या? हा मोठाच प्रश्न असतो. कारण आंघोळीच्या सुरूवातीला आळशीपणा होत असल्याने त्या पुड्या कातरीने न कापण्याचा आळशीपणा या वेळेपर्यंत नडतो. मग दातांनी त्या पुड्या फाडाव्या लागतात. बसून आंघोळ केल्यास त्या पुड्या वेळेवर हाताशी, किमानपक्षी पायाशी येतात हा मोठा फायदाच आहे. आंघोळीचा आणखी एक प्रकार म्हणजे टब बाथ. सर्वसामान्यांना याचा लाभ होत नाही, पण मग एखाद्या हॉटेलातल्या मुक्कामी याची चव बर्‍याच जणांनी चाखलेली असते. हा स्नानाचा एकदम शाही अन एकदम आळशी प्रकार आहे. पूर्ण टब पाण्याने भरून घ्यायचा. मग त्या पाण्यात शिरायचे. गुलाबाच्या पाकळ्या, साबणाचा फेस, जोडीने आंघोळ आदी सिनेमातल्यासारखे प्रकार तुमच्या डोळ्यासमोर आलेही असतील.
.
आंघोळ एकदाची संपल्यास पाटावरून उठावे लागते किंवा शॉवरच्या बाहेर यावे लागते. मग टॉवेल शोधणे, अंग, डोके पुसणे इत्यादी क्रिया कराव्या लागतात. परदेशात ( म्हणजे अमेरिका हं) आतापर्यंत वॉशिंग मशीनमध्ये कपडे सुकवण्यासाठी जसा ड्रायर असतो, तसा माणूस सुकवण्याचा ड्रायर वापरातही आला असावा. मला हे परदेश म्हणजे अमेरिका, नॉर्वे, स्वीडन, कॅनडा, इंग्लंड आदी उत्तर गोलार्धातील देश फार आवडतात. तेथील थंड हवामानामुळे आंघोळीची गरज नसणे अन आंघोळ न करता आठवडेच्या आठवडे तसेच राहणे किती आनंददायक असू शकते, हे तेथे राहिल्यावरच समजेल.
अशी आंघोळ एकदाची पार पडल्यावर कोरडी अंतर्वस्त्रे परिधान करणे हा एक उपद्व्यापच असतो. अंडरपँटमध्ये पाय घालण्यासाठी एक पाय ओल्या फरशीवर - लादीवर असतो अन एक पाय आधांतरी हवेत असतो. दोन हातातली उघडी अंडरपँट तोंडाचा आ करून पायाचा घास घेण्याच्या तयारीत असते. या वेळी हटकून ओला पाय त्या पँटच्या कापडावर घासला जातो अन ती पँट ओली होते. त्यामुळे पाय लवकर त्यात जात नाही. बाथरूमध्ये शेकडा ६७.८९%* घसरून पडण्याचे प्रकार याच वेळेस होतात. (*अशी आकडेवारी लिहिल्यास अन त्यातही शेकडा, टक्केवारी आकडे वापरल्यास लेखक किती शास्त्रीय विचारसरणीचा आहे यावर वाचकांचा विश्वास बसतो. हे रहस्य मी तुम्हाला आपले जवळचे संबंध आहेत म्हणून सांगितले आहे. इतर कुणाला सांगू नका.)
आंघोळ झाल्यानंतर बाहेर येऊन इतर कपडे घालणे हे एक काम असते. ते आटोपल्यानंतर केस सुकवणे बाकी असते. आळस हा माझा मित्र असल्याने मी जास्त केस ओलेच करत नाही. मग ते कोरडे करणे आठवड्याच्या हिशोबाच्या मानाने कमी होते. तरीही आंघोळ केल्यानंतर किमान केस विंचरावे तर लागतातच. तेल लावणे होत असल्यास हात तेलकट होतात अन मग ते तेलकट हात हँडवॉशने किंवा साबणाने पुन्हा धुवावे लागतात. ते झाल्यानंतर पावडर लावणे, बॉडी डिओ मारणे करावे लागते. ते एक वाढीव काम असते. महिलांच्या बाबतीत नटणे, सजणे आदी प्रकार असल्याने त्याला वेळेचे बंधन नसते.
आपल्याला (की दुसर्‍याला?) कोणता सुवास आवडतो त्या सुवासाची पावडर, डिओ दुकानात जाऊन निवडणे हे आंघोळीच्या अनुषंगाने येणारे कंटाळवाणे काम आहे. साबण निवडतानाही तसेच होते. किती ते साबण, त्याचे प्रकार अन सुगंध! माणूस वेडाच होईल निवडताना. उत्तर कोरियातल्या किम जाँग सरकारने तेथल्या सर्वसामान्य नागरिकांना एकाच रंगाचे - शक्यतो राखाडी रंगाचे अन एकाच प्रकाराचे शर्ट-पँट शिवायची परवानगी दिली आहे. मोदी सरकारनेही या साबण, पावडर अन डिओ-सुगंध तयार करणार्‍या कंपन्यांवर असले निर्बंध येथे लादायला हवे. एकाच आकार, प्रकार अन सुगंधातील साबण, पावडर, शॅम्पू, डिओ तयार करण्याची परवानगी सरकारने द्यायला हवी. त्यातून कितीतरी माणसांचे अन स्त्रियांचे मानवी तास/ वेळ या उत्पादनाच्या निवडण्याच्या वेळेतून वाचतील. नागरिक स्वच्छ भारत अभियानात या वाचलेल्या वेळेचा सदुपयोग करतील. तसेही आंघोळ करणे हे ही स्वच्छ भारतमध्येच गणले गेले पाहिजे. म्हणजे मोदी सरकारच्या अशा आकडेवारीत आणखी भर पडेल अन सरकार या उपक्रमाचे फुगवलेले आकडे ते आणखी फुगवू शकतील.
हे असले आंघोळीदरम्यानचे वेळखाऊ, कंटाळवाणे प्रकार करण्यापेक्षा आंघोळ न करता दिवसच्या दिवस आळशीपणात घालवणे हा एक उत्तम उपाय आहे, असे माझे ठाम मत आहे. आंघोळ न करण्यामुळे पाणी वाचवले जाऊन पर्यावरणाच्या संवर्धनास आपण एक प्रकारे मदतच करत असतो.

Saturday, November 2, 2019

आमचं ठरलयं, संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय

आमचं ठरलयं, संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय


चल उठ मराठी गड्या पुन्हा एकदा लढ लढा
बोल की आता आमचं ठरलयं
आमचं ठरलयं अन
संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय ||धृ||

नको कानडी सोन्याचा घास
लावील तो आम्हाला फास
किती मार आता सहन करायचा?
मुकाट अन्याय किती सोसायचा?
सरकारनं अपमानाचं जीणं केलंय
म्हणूनचं आमचं ठरलयं अन
संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय ||१||

आमचंच आहे कारवार निपाणी
बिदर खानापूर भालकी
कोणाची टाप नाय म्हणण्याची
बेळगावसगट हे पण घेवूच की
सहीशिक्कामोर्तब आम्ही केलंय
आमचं ठरलयं अन
संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय ||२||

आमच्या आजानं खाल्ली काठी
आमच्या बापानं खाल्ली लाठी
नाही घाबरत आम्ही त्याला
जरी पडली ती आमच्या पाठी
तिन पिढ्यांनी संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलंय
आमचं ठरलयं अन
संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय ||३||

कानडी गड्या घे आता ऐकून
सीमाभाग हा माझाच सांगतो ठासून
शस्त्राविना हि लढाई मी लढणार
मराठीभाषीक शेवटी एक होणार
जय महाराष्ट्र कधी बोलतोय असं मला झालंय
आमचं ठरलयं अन
संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय ||४||

- पाषाणभेद
एक नोव्हेंबर (सीमाभागासाठीचा काळा दिवस) २०१९ 

Tuesday, October 22, 2019

Its my Ignis, a visible light


Its made for such tough environment.
So let drive it in an entertainment.

Whether its snow or rain
Going further is a gain.

It's smart and stout and sturdy
Like a tall brother who is faithful and hardy.

No matter I call him anytime
Its my Ignis, a visible light.

- Pashanbhed
20/10/2019

Thursday, October 17, 2019

भक्ति गीत: सप्तशॄंग गडावर जायचं

मला ग बाई वाट गावली, माझ्या नशिबानं
सप्तशॄंग गडावर जायचं, नवरात्रीत चालून ||धृ||

हाती धरली कावड
गोदेच्या निर्मळ पाण्यानं ||१||

गड झाला हिरवा
साथ दिली पावसानं ||२||

घर माझं भरलं
धन धान्याच्या राशीनं ||३||

जगण्याची रीत दावली
देवी सप्तशॄंगीनं ||४||

नवसाला पावली आई
आशीर्वाद दिला तिनं ||५||

पुजा करून ओटी भरीन
कुंकू लावीन हातानं ||६||

सगे सोयरे झाले सोबती
पायी चालती आनंदानं ||७||

दर्शनाची आस लागली
घाईनं उचलते पाऊलं ||८||

कृपा असू द्यावी भक्तांवरी
विनवणी करी पाषाण ||९||

सप्तशॄंग गडावर जायचं, नवरात्रीत चालून ||धृ||

१७/१०/२०१९

Sunday, October 13, 2019

जुळे नवरे, जुळ्या नवर्‍या

एका पुरूषांच्या जुळ्यांच्या जोडीचे
स्त्री जुळ्यांच्या जोडीशी जुळले

(जोड्या स्त्री-पुरूषांच्या होत्या. आधीच खुलासा केला. कारण कुणी कलम ३७७ चा विचार करतील!)

जुळले ते जुळले
कुणा न कळले

ज्याच्यात्याच्या जोडीदाराचा हातात हात घालूनी
प्रत्येक जोडी हनिमूनास निघाली

एकत्र मजा करायचा विचार नेक
भटकायचे ठिकाण ठरवले एक

बूक केले छानसे सी फेसींग हॉटेल थ्री स्टार
रूम शेजारी शेजारी नंबर दोनशे तिन, दोनशे चार

दिवसभर फिरले डोंगरावर
खाल्ले पिल्ले पोटभर

सेल्फी काढल्या घालून गळ्यात गळे
व्हाट्सअ‍ॅप फेबूवर स्टेटस शेअर केले

हॉटेलातले जेवण त्यांनी एकत्र केले संध्याकाळी
हनिमून मात्र एकट्याने साजरा करण्याची रात्र झाली

दोन्ही नवर्‍या वॉशरूममध्ये गेल्या फ्रेश व्हायला
नवरे दोनही थांबले बाहेर, लागले वाट पहायला

एक नवरी आधी आली बाहेर, दुसरीला लागला वेळ
निरोप घेतला एकमेकींचा, हनिमूनचा खेळायचा होता खेळ

बाहेर येवून ती नवरी एका नवर्‍याबरोबर निघाली
निरोप घेवून दुसर्‍या नवर्‍याचा, ह्या जोडीने रूमकडे जाण्याची घाई केली

हॉटेलच्या गार एसी रूममध्ये गोष्ट वेगळी घडली
दोनशे तिनची नवरी दोनशे चारच्या नवर्‍या बरोबर गेली

- पाभे
१३/१०/२०१९

Monday, September 30, 2019

लहानांसाठी गोष्ट: पावसाचा ढग

पावसाचा देव आहे इंद्र. इंद्राकडे पाऊस पाडणारे अनेक सरदार असतात. ते सरदार पृथ्वीवर पाऊस पाडत असतात. हे सरदार म्हणजे मोठे मोठे काळे ढग असतात. ते पाणी साठवतात आणि पाऊस पृथ्वीवर पाडतात.

एकदा एका ढगाला इंद्राने पृथ्वीवर पाऊस पाडण्यासाठी पाठवले. पण तो ढग पाऊस न पाडता एका राज्याच्या मैदानावरील मुलांचा खेळ बघण्यात रमून गेला. ही गोष्ट इंद्राला समजल्यावर त्याने त्या ढगाला पाण्याचा ढग न राहण्याचा शाप दिला. आता त्या ढगात पाणी साठून राहू शकत नव्हते. तो ढग पाण्याविना पांढरा दिसू लागला. मग त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप झाला. त्याने इंद्राची माफी मागीतली. इंद्राने त्याला 'पृथ्वीवर तू चांगले काम करशील अन मगच पुन्हा स्वर्गात येशील', असा उषा:प दिला.

त्यानंतर पृथ्वीवर धुके पसरले. त्या धुक्यातून तो ढग पृथ्वीवरील एका राजाच्या राज्यात मानव रुपाने उतरला. तो आता एक सामान्य मानव झाला होता. राज्यातील एका गावात तो लोहाराचे काम करू लागला. निरनिराळे औजारे बनवणे, घराच्या उपयोगी वस्तू बनवणे असली कामे तो करू लागला. परंतु त्या राज्याची जनता दुष्काळामुळे त्रस्त झालेली होती. गेली सलग काही वर्षे तेथे पाऊसच पडला नव्हता. पाऊस नसल्याने त्या राज्यात दुष्काळ पडला होता. जनता वाटेल ती कामे करून पोटासाठी अन्न मिळवत होती. रोगराई अन भूक यामुळे जनता चोर्‍या करणे, लुबाडणे या गोष्टी करू लागली होती. राज्यात अदांधुंदी माजली होती. राज्याचे होणारे हाल पाहून राजाला खंत वाटत होती. प्रजेची काळजी घेणारा राजा असल्याने प्रजेची स्थिती पाहून तो दु:खी झाला. जो कुणी राज्याला दुष्काळी स्थितीतून बाहेर काढेल त्याला योग्य ते इनाम देण्याची घोषणा राजाने केली. या लोहाराने ही घोषणा ऐकली आणि राज्याला दुष्काळातून बाहेर काढण्याचा प्रयत्न आपण केला पाहीजे असे त्याला वाटू लागले.

दुसर्‍या दिवशी तो तरूण लोहार राजाकडे गेला. राज्याच्या दुष्काळाबद्दल मदत करण्याबाबत त्याने राजाकडे इच्छा प्रगट केली. राजाने त्या तरूणाकडे पाहीले अन राजाला त्याबद्दल आशा वाटू लागली. त्याच्या बाबत राजाचे चांगले मत बनले. राजाने त्याला लागेल ते संसाधने देण्याची तयारी दर्शवली पण दुष्काळ हटला पाहीजे अशी मागणी केली. त्या तरूणाने राज्यातील तरूण आणि शेतकर्‍यांची मदत घेवून झाडे लावण्याची तयारी केली. झाडांसाठी खड्डे खणले. बी बियाणे तयार केले. डोंगरउतारांवर चर खणले. आहे त्या नद्या स्वच्छ केल्या. त्या नद्यांची खोली वाढवली. धरणांतला गाळ काढून तो गाळ शेतांमध्ये टाकला.

या कामानंतरच्या हंगामात पावसाळ्यात त्या राज्यात थोडा पाऊस पडला. त्या तरूणाच्या प्रयत्नाने दुष्काळावर मात करण्याच्या झालेल्या कामांमुळे पाऊस जरी थोडा पडला होता तरी त्या पावसाचे पाणी स्वच्छ अन खोल केलेल्या नद्यांमधून वाहीले. ते पाणी निरनिराळ्या धरणांमध्ये साठून राहीले. राज्यात शेतांमध्ये असलेल्या विहीरींना पाणी लागले. त्या हंगामात शेतात चांगली पिके आली. राज्यातील दुष्काळ हटला. लोकांना खायला अन्न अन जनावरांना चारा भेटू लागला. लोक आनंदाने आणि समृद्धीने राहू लागले. गुन्हेगारी नष्ट झाली. रोगराई पळून गेली. आधीच ठरल्याप्रमाणे राजाने त्या तरूणाला शेतीसाठी जमीन बक्षीस रुपाने एका गावात दिली.

इकडे इंद्र आकाशातून त्या राज्याकडे पाहत होता. तरूणाच्या रुपात शाप असलेल्या ढगाने दुष्काळ हटवण्याचे केलेले प्रयत्न पाहून तो आनंदी झाला. त्याने त्या तरूण असलेल्या सरदार ढगाला शापमुक्त केले आणि पुन्हा वर स्वर्गात बोलवून घेतले. तेव्हापासून तो ढग पावसाचे पाणी घेवून पुन्हा पाऊस पाडू लागला.

३०/०९/२०१९

Saturday, September 28, 2019

व्हाटसअ‍ॅप चा एसएमएस मेसेज

तो: हॅलो.

ती: हं बोला.

तो: काय गं, झोप झाली का?

ती: हो आताच उठले. आज जरा जास्तच गाढ झोप लागली होती. पोस्टमनची आरोळीदेखील नाही ऐकू आली.

तो: हं.

ती: तुमची बहीण सकाळी येईल का दुपारी? तुम्ही पाठवलेले व्हाटसअ‍ॅप बघितले. उद्या त्यांचे जेवण बनवावे लागेल का त्यासाठी विचारते आहे.

तो: सकाळी येणार आहे. पण ती दुसरीकडे उतरली आहे. आपल्याकडे आली तर येईल. मी त्या व्यतिरिक्त एक वेगळा अन महत्वाचा एसएमएस पाठवलेला होता तो वाचला का?

ती: तुमचा तोच व्हाटसअ‍ॅप चा मेसेज वाचला ना. म्हणून तर विचारले की तुमची बहीण सकाळी येईल का दुपारी? तुम्ही व्हाटसअ‍ॅप केले आहे ना तेच बोलत आहात ना?

तो: अग, एसएमएस चा मेसेज म्हणतोय मी. व्हाटसअ‍ॅपचा मेसेज नाही.

ती: तुम्ही ना माझे व्हाटसअ‍ॅपच काढतात जेव्हा पहावं तेव्हा. वाचला ना मेसेज व्हाटसअ‍ॅपवरचा.

तो: अग मी एसएमएस बद्दल बोलतोय. जुन्या मोबाईलमध्ये, पुर्वी व्हाटसअ‍ॅप होते का? महत्वाचे काय? एसएमएस का व्हाटसअ‍ॅप?

ती: एसएमएस नाही वाचला. वाचते.

तो: व्हाटसअ‍ॅप मध्ये किती तरी गृप्सचे मेसेजेस असतात. माझा मेसेज खाली गेलेला असू शकतो ना?

ती: हं

तो: पहिल्यांदा काय पाहशील मोबाईल उघडल्यावर?

ती: तुमचं ना नेहमीचंच आहे. झालं चालू लेक्चर. अहो, मी तुमची बहीण येणार असल्याचा मेसेज वाचला अन लगेच चहा बनवायला घेतला माझा. डोकं नका दुखवू आणखी.

तो: अगं मी एसएमएसवरचा मेसेज बोलतोय.

ती: तेच तर मी मेसेज वाचला तुमचा. उद्या बहीण येतेय तुमची तो.

तो: देवीच्या देवळात गेली अन तेथे गणपती दिसला तर पहिल्यांदा कुणाचे दर्शन घेशील?

ती: हां मला ज्याचे दर्शन घ्यायचे ते घेईल.

तो: अगं एसएमएस कुणाकडून आला ते लगेच समजते अन तो पटकन वाचता येतो. अन ते व्हाटसअ‍ॅप मेसेज सारखे पाचशे पाचशे येत नाहीत गं. तुझ्यासाठी महत्वाच्या होता एसएमएस म्हणून पाठवला होता.

ती: हं ठेवता का फोन, तरच वाचता येईल मला.

तो: वाच बाई एसएमएस वाच. व्हाटसअ‍ॅप, व्हाटसअ‍ॅप नको खेळू.

ती: हं...या घरी संध्याकाळी ऑफीसातून.

- पाभे

तुझ्या भेटीला आलो दत्ता

तुझ्या भेटीला आलो दत्ता
सत्वरी या आता ||
तुझ्या मंदीराची केली वाट सोपी
नसे काही चिंता, मनी आस मोठी
वाट पाही दर्शनाची, तुम्ही प्रकटा ||
भक्तांची दु:खे करुनीया दूर
दिले जीवनात सुख भरपूर
सर्वांचा वाली तू तूच आमचा त्राता ||
पाहूनिया रुप होईल मनाची शांती
नसे आस कसली, तिच विश्रांती
सखा तूच गुरू तूच तूच होई दाता ||
ब्रम्हा विष्णू महेश तिन लोक शक्ती
तुझ्या ठाई एक झाले, व्यापूनी सृष्टी
रुप दाखवा तुम्ही दारी आलेल्या भक्तां ||
- पाषाणभेद
२८/०९/२०१९

पाहूणा पाऊस

मी म्हणाले पावसाला तू येतोस कधी
ब-याच दिवसात भेटला नाही
तो म्हणाला मी तर येतच असतो नेहमीसारखा
पण तूच माझ्याशी बोलत नाही


मग मी त्याचे स्वागत करायचे ठरविले
अगदी जवळ गेल्यासारखे भासविले
पण त्याचे मनात काही वेगळेच असेल
जवळ येवून त्याने सा-यांनाच कवेत घेतले

Tuesday, September 24, 2019

पाभेचा चहा

चहा पिणे अन पाजणे हे काही आपल्याकडे पुर्वी नव्हते. पुर्वी चहा नव्हताच. लोक गुळपाणी देवून स्वागत करायचे. नंतर कधीतरी बोस्टन टी पार्टी झाली. अमेरीका स्वातंत्र्य झाली. ब्रिटीश भारतात आले. चीन मधल्या चहाला शह देण्यासाठी त्यांनी चहाची भारतात लागवड केली अन त्यानंतर चहा भारतात उत्पादीत होत गेला. चीन नंतर भारत चहा उत्पादनात दोन क्रमांकावर गेला. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात रेल्वेस्थानकांवर चहा विकला जावू लागला. चहाची विक्री जाहीरात करून केली गेली. चहा पिणे कसे चांगले हे जाहिरात करून सांगितले जायचे. नंतर लोक चहाचे चाहते झाले. मला आठवते ब्रूक ब्राँडचा चहा एका लाल रंगाच्या तिन चाकी हातगाडीवर आठवडे बाजारात विकायला यायचा. तो घ्यायला गर्दी व्हायची.
बरे चहाचे प्रकार तरी किती? साधा चहा, स्पेशल चहा, सुंठ घातलेला चहा, मसाला चहा पत्ती चहा, भरपुर दूधाचा चहा, काढा, तुळशी अन गवत टाकलेला गवती चहा, आयुर्वेदीक चहा, ब्लॅक टी, लेमन टी, ग्रीन टी, हर्बल टी, पिवळा चहा, बॉबी, कट, टक्कर, मारामारी, अगदी मनमाडी चहा देखील आहे.
तुम्हाला आण्णाचा चहा अन नानाचा चहा माहीत आहे काय? आपल्या दुकानात गिर्‍हाईक आले तर त्याला खरोखर चहा पाजायचा असेल तर नोकराला आण्णाचा चहा आणायला सांगायचे. अन तेच फुटकळ टाईमपास करणारे गिर्‍हाईक असेल तर नानाचा चहा मागवीत अन तो येत नसे, किंवा उशीरा येत असे अन गिर्‍हाईक तो पर्यंत कंटाळून निघून जात असे.
अनेक देशोदेशी चहा तयार करण्याचे अन तो पिण्याचे तंत्र निरनिराळे असते. चिनी चहा, कोरीयातला चहा, जपानमधला चहा, अमेरीकेतला चहा.
चहाची बहीण कॉफी अगदी निराळी. तिने तर मोठमोठ्या कॉफीशॉपच्या कंपन्या काढल्या ज्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड झाल्या. पण कॉफी हा लेखाचा विषय नाहीये.
चहा हा ताजा केलेला असेल तरच चांगला. उकळून कडक झालेला चहा हा अ‍ॅसीडीटीला आमंत्रण ठरतो. काही जण चहा अजिबात पित नाही. अर्थात असे लोकं विरळेच. मग ते दूध तरी घेतात. हातावरचे पोट असणारे कित्येक जण भूक मारण्यासाठी चहा पितात. काही जण चहाबरोबर पाव, टोस्ट, बटर, खारी, नानकटाई, स्लाईस आदी खावून भूक भागवतात. चहासाठी लोकं फिरायला जातात. लोक निमित्त काढून चहा पितात. काही जण दिवसाला दहा बारा कप चहा पितात. चहा प्यायला बोलावणे हा आदरसत्काराचा भाग मानल्या जावू लागला. एखाद्याला भेटायला घरी गेलो अन चहा दिला नाही तरी लोक नाराज होतात. चहाचे पाणीदेखील पाजले नाही असा उल्लेख करतात.
जुनी गोष्ट आहे. खरी आहे. माझ्या पाहण्यात एक चहा विक्रेता आहे. नव्वदच्या दशकातली. तो सायकलवर चहा खेड्यापाड्यात विकत असे. आमच्या गावाजवळ रेल्वे जाते अन तेथल्या नदीवर रेल्वेपुलआहे. एकदा रेल्वे पुलावरून तो सायकल ढकलत चालला होता. तिकडून रेल्वे आली अन हवेच्या झोतामुळे तो उंच पुलावरून खाली कोसळला. नदीत पाणी वगैरे होते की नाही ते माहीत नाही. पण तो जबर जखमी झाला. नंतर हॉस्पीटलात राहीला. त्यानंतर त्याला कोणतेही अन्न पचेनासे झाले. काहीही खाल्ले तर ते बाहेर पडत असे. नंतर त्याच्या घरच्यांनी वेगवेगळ्या अन्नपदार्थांचा त्याचेवर प्रयोग केला. काहीच पचेनासे झाले. नंतर शेवटी ते अशा निष्कर्षापर्यंत आले की त्याला चहा पचतो! मग सुरूवातीला चहाचे पाणी अन नंतर काही दिवसांनी थोड्या जास्त दूधाचा चहा हाच त्याचा आहार झाला. बरे एवढाच आहार असूनही ती व्यक्ती शारीरिक कष्ट करत असे. किराणा दुकान चालवत असे. सायकल चालवत असे. तर चहा विकतांना अपघात झाला अन शेवटी चहाच त्याचा आहार बनला. जवळपास दहा एक वर्षे ती व्यक्ती चहावरच होती. तुम्हाला खोटे वाटेल हे. नंतर आम्ही गाव बदलले. त्या व्यक्तीनेही गाव अन व्यवसाय बदलला. मध्ये काही काळ गेला अन ती व्यक्ती शहरातल्या एमआयडीसीत एका कंपनीत सायकलवर जेवणाचे डबे पुरवतांना दिसली. शारीरिक ठेवण तशीच शिडशीडीत राहीली होती. असो.
खेडेगावात दूधाची कमतरता असते. जे दूध निघते ते सकाळीच शहरात विकायला पाठवले जाते. मग एखाद्या लहानग्याला हातात पेलाभर किंवा पाच दहा रूपयाचे दूध घ्यायला ज्याचे घरी दूभते असते त्याकडे पाठवतात. तर एकदा एका ठिकाणी मी पाहूणा गेलो होतो. खेडेगावच ते. दूध मिळालेच नाही. साखर नव्हती, गूळ होता. मग त्या माऊलीने गुळाचाच काळा चहा मला पाजला. मला तर त्याचे काही वाईट वाटले नाही कारण तसली परिस्थीती मला माहीत होती. पण त्या माऊलीच्या डोळ्यात पाणी दिसले. अशासाठी की आलेल्या पाहूण्याला बिन दूधाचा, बिन साखरेचा चहा पाजला. त्याच्याच जवळपासचा अनुभव असा की एका माऊलीने चहा बनवला. तेथेही दूध नव्हते. साखरेचे नाही आठवत पण त्या माऊलीने पावडरचे दूध बनवले अन मग मला चहा पाजला.
चांदवडला आम्ही लहान असतांना देवीच्या दर्शनाला गावातून पायी गेलो. येतांना ढग भरून आले. अन जोरात पाऊस चालू झाला. आम्ही पूर्ण भिजलो. गाव तर लांब होते. आडोशाला काहीच नाही. रस्त्यात एका झोपडीत आम्ही गेलो. तेथे विस्तवाचा उबारा भेटला. तेथे त्या मालकाने चहा करून दिला. पण तेव्हढ्यात जोराचा वारा आला अन त्या वार्‍याने झोपडीचे एका बाजूचे कूड उघडे पाडले. आम्हाला वीजच कोसळली की काय असे वाटले पण तसे काही झाले नव्हते. असा प्रसंग लक्षात ठेवणारा चहा अन असे चहाचे अनुभव.
आताशा अनेक चहाचे ब्रांड तयार झालेले आहेत. अमूक चहा, अमृततुल्य इत्यादींची फ्रांचायजीचा धंदा झाला आहे. (म्हणूनच या लेखाला मी "पाभेचा चहा" असे नाव दिले आहे हे चतुर वाचकांच्या लक्षात आलेच असेल. तर आपण आता आपला लेखक पुढे काय म्हणतो आहे ते पाहूया.)
तर अशा ब्रांडांच्या किंवा फ्रांचायजींच्या चहाच्या दुकानात पु.ल. म्हणतात तसे आपले खायचे पान घेवून पानाच्या दुकानासारखे पान तयार करण्यासारखे वाटते. तेथे आपूलकी नसते. विक्रेता केवळ किती कप धंदा झाला याचा विचार करतो. एका कपात दोन जण चहा पिवू शकत नाही. उभे राहून चहा पिणे अन तेथून निघून जाणे एवढेच साध्य होते. चहा बरोबर गप्पा होत नाहीत. किंबहूना गप्पांसाठी चहाच्या दुकानात गेले तर त्याची लज्जत काही औरच असते. या नव्या कार्पोरेट चहाच्या दुकांनात हे साध्य होत नाही. उकळीचा चहा तेथे भेटत नाही. आधीच उकळलेला अन थर्मासमधला रेसेपीदार, त्यांचा प्रोप्रायटरी फॉर्मुला असणारा चहा तेथे भेटतो. त्यामुळे तसला फ्रांचायजीचा चहा पिवून खरा चहा पिण्याचे समाधान होत नाही. आणि तो चहा तुलनेने थंडदेखील असतो हा माझा अनुभव आहे. उकळीच्या चहातली मजा नाही त्यात. तो चहा फक्त पोटात जातो. त्याने पोट भरत नाही. ते चहाचे दुकान म्हणजे त्या दुकान मालकाची अधिकची आर्थिक गुंतवणूक असते. अन टपरीवरचा चहा म्हणजे त्या दुकानदाराचा संसार असतो.
असो. चहात पाणी टाकतात किंवा पाण्याचा फुळकट चहा असतो तसे लेखात अनेक संदर्भ येवून हा चहावरचा लेख मोठा होवू शकतो. चहा पोहे अन त्या बरोबरचे किस्से, चहा बरोबर खायचे पदार्थ घेवून केलेला लेख, चहा कशात घेतात त्या वस्तू, त्यांची ठेवण. असे केले तर हा लेख म्हणजे चहाचा मळाच होईल. म्हणून असो.
चहा हा फक्त चहाच नसतो तर तो एक आपूलकीचा धागा असतो. आणि असेच धागे काढत काढत अन ते विणून विणून त्याचे असले लेखवस्त्र होते.
अन हो, तुम्ही प्रतिक्रीया देवूनही हा चहालेख वाढवू शकतात ना!
( हा चहाचा लेख मागच्या आठवड्यात लेखनाच्या आधनावर ठेवला होता. मग एक एक अनुभवाच्या, प्रसंगांची सामग्री यात टाकत गेलो. अन आज हा चहा लेख उकळी पावला अन तो तुम्हाला गाळून (मुद्रीतशोधन करून) देतो आहे. त्याचे प्राशन करा अन कसा झाला आहे तेही सांगा.)
- पाषाणभेद
२४/०९/२०१९

Thursday, September 5, 2019

दोरीवरचे कपडे

दोरीवर कपडे कसेही वाळत असतात
कपडे वाळत असतांना ते कसे दिसतात?

शर्ट कधी हॅंगरला चिमट्याने टांगलेला असतो
फाशी दिलेल्या कैद्यासारखा हालत असतो
(यावरूनच फाशीला इंग्रजीत हॅंग करणे म्हणत असतील.)

पॅन्टही अशीच असते हवेत तरंगत
दोन पाय आधांतरी भुतासारखे लटकत

नाडीच्या परकरांची गोष्ट निराळी असते
भडक रंगाचे तंबूच वाटतात सर्कसचे

साडी घालून घडी बसते वाळत
वा-याने तिचा पदर असतो हालत

किरकोळीच्या गोष्टी टॉवेल सॉक्स रुमाल
गणतीत नका घेवू बाकीचे कपडे आहेत कमाल

दोरीवर पडतात अंडरपॅन्ट बनियन ब्रा अन निकर
वाईट दिसतात, काढून घ्या, तसेही वाळतात लवकर

गाऊन उलटा असतो, खाली डोके वर पाय
त्यात बाई घातली अन गाऊन खाली सरकला तर काय?

कपडे वाळत असतांना आपण बाहेरून बघतो
पण वा-याची मात्र मजा असते, तो आतून पाहतो

- पाषाणभेद
०४/०९/२०१९

Monday, September 2, 2019

पाय सरावले रस्त्याला

पाय सरावले रस्त्याला
मी चाललो, चाललो इतका की
रस्ता ओळखीचा झाला
दुसरी वाट धरावी तर
पाय सरावले रस्त्याला ||ध्रू||
खाच खळगे नेहमीचे झाले
नवे नव्हते वाटले
अडथळे तसेच होते
पायात काटे खुपसले
काट्यांनी तरी जावे कोठे
त्यांना कोण सोबती मिळाला?
पाय सरावले रस्त्याला ||१||
अडचणी अनंत आल्या
उभ्या राहील्या समोर
नेट लावून सामोरी गेलो
प्रश्न अनेक पुढे कठोर
जंजाळ पसरले समोर असता
एक पक्षी अचूक उडाला
पाय सरावले रस्त्याला ||२||
"कसा आहेस तू
ठिक आहेस ना?"
"मदत लागली काही तर
मी तयार आहे ना!"
ना कुणी अशी उभारी दिली
काय करायचे त्या ओळखीला?
पाय सरावले रस्त्याला ||३||
मीच माझी केली मदत मग
हात केला मलाच पुढे
घेतला हातात हात
डाव्या हातात उजवा पडे
माझाच मी वाटाड्या झालो
इतर न कुणी आले सोबतीला
पाय सरावले रस्त्याला ||४||
- पाषाणभेद
०१/०९/२०१९

Friday, August 2, 2019

तू मी अन पाऊस

पाऊस! पाऊस!!

पाऊस! पाऊस!! झाला सारा 
भणाणलेला त्यासवे आला वारा
वारा उडवीतो माझे मन
मनामध्ये तू आहेस खरा

चिंब मी भिजलेली
माझ्यासवे तुझे भिजले तन
हिरव्या रानात घेवूनी कवेत
मीच हरवले माझे मन

पाणी आले पानोपानी
झाडे भिजली रानोरानी
मिठीत तुझ्या मी आलंगूनी
विसरले मी, गेले हरवूनी

- बी ऑलवेज लाईक मी
- ऑलवेज युवर्स पाभे
०३/०८/२०१९

Sunday, July 28, 2019

इंद्रधनू

इंद्रधनू

(आकाशात इंद्रधनुष्य पाहील्याने माझी मुलगी हरखली आहे अन ती मला बोलावते आहे.)

आकाशी ते इंद्रधनू आले 
अहा!
चला बाबा बघा 
ते पहा! ते पहा!!

कितीक मनोहर मोदभरे
आकाशीचे रंग खरे
कमान तयाची वाकली
माझ्यासवे पहा बरे

दवबिंदूवर प्रकाश पडूनी
आले ते वर उसळूनी
उल्हासीत झाले मी
चटकन या तुम्ही

वर्ण वरी घेई तांबडा
तदनंतर ये नारंगी पिवळा
चमके तो रंग हिरवा निळा
घेवूनी पारवा जांभळा 
आकाशी व्यापली प्रकाशमाला

पर्जन्याचा अधिपती नरेश
भेट जलाचे देई धरेस
त्याच समयी ये सामोरी भास्कर
किरणांस भिडता थेंब नीर
गोफ इंद्राचा घेई आकार

मज न ठावूक; 
राहील न राहील ते काळ किती
ये वायू मग जाय क्षिती
साठवूनी घ्या लोचनी
त्वरा करा तुम्ही; बाबा या लवकरी

- पाषाणभेद
२८/०७/२०१९

Tuesday, July 16, 2019

वरुणच्या जाण्याच्या निमित्ताने - आभासी जगातील प्रत्यक्ष कट्याचे, भेटीचे महत्व

वरुणच्या जाण्याने सगळ्यांनाच दु:ख झाले आहेत. त्यांचे वय काहीच नव्हते. माणूस धडाकेबाज होता. बहूआयामी होता. असे कशामुळे झाले ते नक्की समजले नसले तरी आजारपण अन त्यातून सावरले न जाणे हे मुख्य कारण आहे.

येथे जवळपास बहूतेक जण आभासी नावे घेतलेले आहेत. येथेच नाही तर चेपू, काय्यप्पा, चिवचिवाट आदी ठिकाणी असलीच किंवा इतर नावे धरून आपण वावरतो. एकमेकांशी संवाद, विसंवाद, चर्चा करतो. भांडतो, एकेरीवर येतो, शिव्याही देतो. तरी पण त्यामागे एक माणूस आहे. तोच माणूस माणूसपण जगतांना हे लिहीतो, चर्चा करतो, संवाद साधतो, प्रतिसाद देतो. सार्‍यांशी बोलतो कारण आपण आपल्या मराठीत व्यक्त होवू शकतो म्हणून. कदाचित मिपा मध्यम इंग्रजीत असते तर आपण तेथे व्यक्त नसतो झालो. माझ्या बोलण्याचा, धागा लेखनाचा हा हेतू नाही पुढे तो येईलच.

वरुणच नव्हे तर त्या आधी तात्या, बोका-ए-आझम त्याही आधी कुलकर्णी (नाशिक - यांचे नाव विसरलो. पण अंत्यसंस्काराला गेलो होतो) अन त्याही आधी यशवंत कुलकर्णी यांचे अचानक जाणे झाले.
या सार्‍यांशी आपला परिचय होता. भले आपण प्रत्यक्ष भेटलेलो नसू अन नावानिशी ओळखत नसू परंतु एक प्रकारचा जिव्हाळा होता. प्रत्येकाच्या जाण्यामागे काही ना काही कारण असेल. आपल्याला त्यात पडायचेही नाही. त्यामागची कारणमिमांसाही करायची नाही.

शेवटी वैद्यकियदृष्ट्या मृत्यू हा शारिरीकच होतो. परंतु त्या आधी शारिरीक कारणे सोडली तर मानसीक कारणांनीसुद्धा माणूस आधी मरणपंथाला लागतो. अगदी शेवटची पायरी जरी नसेल तरी काही शारिरीक व्याधी, नोकरी-व्यवसायातील प्रश्न, कौटूंबिक प्रश्न यातून अशा जिव्हाळ्याच्या व्यक्तींना मार्गदर्शन होवू शकते. शेवटच्या मार्गाने जाण्यातून आपण पाहीले अन त्यांना आपण रोखू शकलो तर?
वरुणच्या जाण्यानंतर जी काही चर्चा झाली अन त्याच्या आधी जे परिचित गेले त्यांच्याविषयी जे काही समजले त्यात त्यांच्या त्या मरणपंथाला लागण्याचे कारण कदाचित सापडू शकते असे वाटते. आपण त्यांना परावृत्त करू शकतो अशी दिशा दिसते.

लक्षात घ्या, मी वर बोललो आहे की आपण येथे (किंवा इतरही आभासी माध्यमांत) आपण व्यक्त होतो. आपल्या मराठीत लिहीतो. ज्या गोष्टी आपण घरातही सांगत नाहीत त्या गोष्टी आपण या आभासी जगतात व्यक्त करतो.
काही जण म्हणतील की अशा परिचितांना जाण्यापासून आपण काय करू शकतो? आभासी जगतातले बोलणे अन त्यांची सांगड प्रत्यक्ष जीवनात परिचित समोर आला तर घालावी का? निश्चितच नाही किंवा कदाचित हो. थोडक्यात परिस्थिती सांगत असेल तर योग्य.

म्हणजे असे की य.कू. गेला त्याच्या आधी तो असंबद्ध बोलत होता. कुणा बाबाची त्याने दिक्षा घेतली होती. वय नसतांनादेखील तो जास अध्यात्माचे बोलत होता. आपल्यापैकी कुणीतरी त्यास तो जाण्याआधी भेटणारही होते. भेटणार्‍या व्यक्तीला तशी कुणकुणल लागली होती, परंतु ती भेटीची ती वेळ त्यांना साधता आली नाही. नाशिकचे कुलकर्णी गेले तो तर खरोखर अपघात होता. त्याला कुणीच टाळू शकले नसते. बोकाशेठ गेले त्यानंतर त्यांच्या आजारपणाबद्दल समजले. तात्या गेला तेव्हा त्याचा येथेच काय पण इतरांशीही त्याचा संपर्क नव्हता. आता वरुण गेला तेव्हा तो आजारपणातून नुकताच सावरत होता. अगदी लोकसभा निवडणूका संपल्यानंतर कर्जतला कट्टा करण्याइतपत तो उत्साही होता. अगदी दोन दिवस आधीपर्यंत तो फोनवरून कुणाच्या ना कुणाच्या संपर्कात होता. त्याच कट्याच्या बोलण्यात काहीतरी सापडले असते असे मला वाटते. तो कट्टा आधी झाला असता तर?
तर मुद्दा असा की असल्या अभासी जगतात मरणपंथाला लागण्याच्या आधी ती व्यक्ती कदाचित त्या दृष्टीने लिहू शकते. ते वाचणार्‍या सर्वांना जरी समजले नसले तरी एखाद दुसर्‍या जाणकाराला बरोबर समजू लिहू, किंवा तशी शंका तरी येवू शकते. प्रत्यक्ष भेट, कट्टा झाला तर ती व्यक्ती समोर असू शकते. त्यावेळी आपण त्याची प्रत्यक्ष खात्री करून घेवू शकतो. तो बोलतो कसा? वागतो कसा? त्याचे जेवणखाण कसे आहे? आहार विहार कसा आहे? आधीपेक्षा त्याच्यात शारिरिक- मानसिक किती बदल झाला? त्याच्या लिखाणातून काही धागा लागतो का? असा मी जरी विचार करणार नसेल परंतु इतर दुसर्‍याने आधीच केला असेल अन त्याबाबत त्या व्यक्तीला तेथे किंवा लिखाणाच्या माध्यमातून त्यास त्या धोक्याबाबत आधीच सुचीत करता येईल. कट्यात सहभागी झाला तर ती व्यक्ती कदाचित त्याच्या कोषातून बाहेरही पडेल. नवा मार्ग सापडेल. जे त्याच्या सख्या मित्रांना समजणार नाही, घरच्यांना समजणार नाही ते आभासी मित्रांना समजेल अन तेच आभासी मित्र कट्यात प्रत्यक्ष भेटले तर? अभासी जगतातले असंबद्ध वागणे त्याच्या जवळच्यांपर्यंत पोहोचले तर? खाजगी आयुष्यात आपण तेवढी ढवळाढवळ करणार नाही असा व्यावसायीक दृष्टीकोन काही पाळतील पण एखाद्याने जरी नाही पाळला तरी त्यायोगे तशी व्यक्ती गैरमार्गाला लागणे किंवा अगदी थेट मरणाच्या दारातून एखादा बाहेर पडण्यास मदत तरी होईल.
जग खुप वेगाने पुढे जात आहे. कामासाठी कुणाला वेळ अपुर्ण पडतो. त्यात शहरीकरणामुळे अन नोकर्‍यांमुळे घनिष्ठ मित्र दुरावत चालले आहे. म्हणूनच मिपा काय चेपू, काय्यपा अशा माध्यमांतून आपण व्यक्त होतो. त्यातही कट्टा केला तर अपरिचित व्यक्तीचा परिचय चांगल्या कामात रुपांतरीत होवू शकतो.

कालपासून विचार करून माझे मन थार्‍यावर नसल्याने हे लिखाण कदाचित विस्कळीत असेल. मार्गदर्शन - कौन्सिलिंग करण्याचा मी व्यावसायीक नसल्याने माझा मुद्दा निट मांडला गेला नसेल परंतु त्यात काही तथ्य असू शकते. योग्य विचार नसतील तर धागा उडवला तरी काही हरकत नाही.

वरुणला आदरांजली.