Tuesday, November 27, 2018

आर्थिक गुंतवणूक आणि घोटाळे

वीस एक वर्षांपुर्वी नाशकातल्या त्रिमुर्ती चौकात दक्षिण भारतीय लोकांनी एक बंगला भाड्याने घेतला होता. तेथे त्यांनी संसारोपयोगी वस्तू विकण्याचा धंदा सुरू केला होता. म्हणजे लोखंडी खुर्च्या, पातेले, जग, कढई, चटया, कूकर, फॅन, पलंग अगदी पाण्याचा पेला देखील. तर या सार्या वस्तू ते कमी किमतीत विकत. काही दिवसांत त्यांचा जम बसला. त्यावेळी लोकवस्ती नवीनच होती. लोकं वस्तू विकत घेत आणि इतर वस्तूंची आगावू मागणी करत. आगावू मागणीच्या वस्तूसाठी ते लोक आधीच पैसे मागत. गिर्हाईकही स्वस्तात वस्तू मिळते म्हणून पैसे जमा करत. असे सहा सात महीने झाले. एके दिवशी ते दक्षिण भारतीय लोक फरार झाले आणि लोकांचे आगावू घेतलेले पैसे बुडाले.
काही खाजगी गुंतवणूक संस्था जसे की केबीसी, पॅन कार्ड क्लब, ईमू पालन, समृद्ध आदी अशा अनेक खाजगी गुंतवणूक संस्था होत्या की त्यांचे आर्थिक घोटाळे उघडकीस येवून गुंतवणूकदारांचे पैसे बुडतात अशा बातम्या आपण नेहमी वाचतो. सहारा इंडीया किंवा डी. एस. के. यांच्यासारख्या नावाजलेल्या संस्थानीही गुंतवणूकदारांची फसवणूक केलेली आहे. एवढेच नव्हे तर काही सहकारी बँका आणि पतसंस्था आदींनीदेखील गुंतवणूकदारांना फसवल्याची उदाहरणे आहेत. काही प्लॉटमध्ये गुंतवणूक करणार्या, शेळीपालन करणार्या, झाडे लावणार्या संस्था, मल्टी लेव्हल मार्केटींग करणार्या संस्थादेखील अशाच प्रकारे फसवणूक करतात.
असल्या ठेवी स्विकारणार्या संस्था बिगर बँकींग वित्तीय संस्था म्हणजेच नॉन बँकींग फायनांशीअल इन्स्टीट्यूशन म्हणून गणल्या जातात. संस्था या सेबी आणि/ किंवा (आरबीआय) यांच्या मान्यता असणार्या असाव्या लागतात. सेबी, आरबीआय अशा संस्थांवर लक्ष ठेवून असतात. तरीही काही संस्थांनी घोटाळा केलाच तर या नियामक संस्था कायदेशीर हस्तक्षेप करु शकतात. वर उल्लेखलेल्या किती संस्था मान्यताप्राप्त होत्या हा संशोधनाचा विषय आहे.
वरील उदाहरणातील वस्तू विक्रेते किंवा इतर उदाहरणातील वित्तीय संस्था, बँका आदींनी अती लोभ - जसे कमी किंमत, जास्त व्याजदर आदी अमीष दाखवल्याने अनेक मध्यमवर्गीय अशा दुकान किंवा संस्थांकडे आकर्षित झालेले होते. या आर्थिक गुंतवणूकीत शहर, ग्रामीण असा काही भेद नाही. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांपासून ग्रामीण भागातही असे गुंतवणूकदार सापडतात. अनेक वेळा लोक घरे, शेती, दागीने गहाण टाकतात अन पैसे गुंतवतात. या अशा गुंतवणूकीत एक समान धागा आढळतो. सुरूवातीला अशी संस्था गुंतवणूकदारांना आकर्षक व्याजदर नियमीत देण्याचा वायदा केला जातो. तोंडी प्रसिद्धीमुळे एकमेकांचे नातेवाईक, शेजारीपाजारी असे गुंतवणूकदार वाढत जातात. हा एकप्रकारचा कल्टच असतो. सुरूवातीच्या गुंतवणूकीदारांना नंतर येणार्या गुंतवणूकीदारांच्या पैशातून व्याज दिले जाते. काही संस्था हा पैसा शेअरमार्केट मध्ये, वायदेबाजारात लावतात व त्यावर येणार्या नफ्यातून व्याज दिले जाते. कोठेतरी हि साखळी तुटते आणि मग अशा संस्थांचा डोलारा कोसळतो. सुरूवातीचे पैसे सोडवून घेणारे सोडले तर इतर सर्व जण या आर्थिक घोटाळ्यात अडकतात. न्यायालयात जरी असे खटले गेले तरी त्यांचा निकाल वेळेवर कधीच लागत नाही हे सत्य आहे. पै पै जमवून केलेली गुंतवणूक परत मिळत नाही. म्हातारपणी, रिटायरमेंटनंतर लागणारे पैसे, लग्नकार्य, आजारपण आदींच्या खर्चाची तरतूद वाया जाते. कित्येक जणांनी याची हाय खावून आत्महत्या केल्याचीही उदाहरणे आहेत.
या सर्वांवर उपाय काय? खाली काही मार्गदर्शक टिपा दिल्या आहेत जेणेकरून गुंतवणूक अशा आर्थिक घोटाळ्यांमध्ये न जाता चांगल्या ठिकाणी करता येवू शकते.
१) अती लोभ सर्वात वाईट. तो कसल्याही गोष्टीचा का असेना. जास्त व्याजदर मिळावा हि अपेक्षा सर्वांचीच असते. पण अती लोभापायी गुंतवणूक योग्य ठिकाणी करत नाही. गुंतवणूक करतांना अती लोभ ठेवू नका.
२) जास्त व्याजदराचे आकर्षण. बाजारभावापेक्षा जास्त व्याजदर म्हणजे धोका अधिक. अधीक व्याजदराची, दुप्पट, तिप्पट असा उल्लेख असलेल्या योजनांमध्ये गुंतवणूक करु नका.
३) मान्यताप्राप्त संस्था नसणे. बर्याच वेळी अशा संस्था सेबी किंवा/ वा आरबीआय मान्यताप्राप्त नसतात. असल्याच तर त्यांच्या गुंतवणूकदारासाठी अशा संस्था नामसाध्यर्म असणार्या योजना आखतात व त्यामध्ये गुंतवणूक घेतात.
४) संस्था किती विश्वासू आहे याचा तपास न करता केलेली गुंतवणूक वाया जावू शकते.
५) अर्थात विश्वासू संस्थांनीदेखील गुंतवणूकदारांना दगा दिलेला आहे. म्हणजेच आपल्या गुंतवणूकीचे शेवटी जबाबदारी आपलीच (गुंतवणूकदारांचीच) ठरते.
६) आपल्या नातेवाईकाने, शेजार्याने गुंतवणूक केली म्हणजे आपण तेथेच केली पाहीजे असे नाही. सारासार विचार करून निर्णय घ्या.
सुरक्षित गुंतवणूकीचे प्रकार/ योजना:
वर दिलेल्या गुंतवणूकीच्या प्रकारात भान ठेवून गुंतवणूक करावी व त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी असावी. उरला प्रश्न महागाईपेक्षा (inflation) आपल्या गुंतवणूकीतून थोडा जास्त (अगदीच भरमसाठ नाही) परतावा, व्याज कुठे मिळेल किंवा अशा काही योजना आहेत का?
१) पोस्ट, राष्ट्रीयकृत बँकांच्या मुदत ठेवी, क्रिसील, इकरा, केअर अशा क्रेडीट रेटींग्ज देणार्या संस्थांनी दिलेल्या आणि ए+ किंवा ए मानंकनाच्या मुदत ठेवी योजना ( यात बाँडस येवू शकतात) तुलनेने योग्य व्याजदर देवून सुरक्षीततेत वरचढ ठरतात.
२) सारेच म्युच्यूअल फंड शेअर मार्केटमध्ये पैसे लावत नाहीत. डेट फंड हे कंपनी डिपॉझीट, बॉन्ड अशा सुरक्षीत ठिकाणी पैसे गुंतवतात. याचे व्यवस्थापन असेट मॅनेजमेंट कंपनी व्यावसायीकरीत्या करत असते. मुद्दा क्रमांक मधील गुंतवणूकीच्या पद्धतीपेक्षा थोडा जास्त परतावा मिळू शकतो.
३) एखादे म्युच्यूअल फंड बंद जरी झाले तरी नियामक संस्था अशा बंद पडलेल्या अशा फंडाला दुसर्या एखाद्या फंडात एकत्र करते. उदा. आयएनजी वैश्य यांचे फंड बिर्ला सनलाईफ म्युच्यूअल फंडात मर्ज झाले आहे.
आणखी एक दुराव्याचे उदाहरण देता येईल. सहारा या कंपनीने गुंतवणूकदारांची फसवणूक केली त्यामुळे सेबीने त्यांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. पण त्याच कंपनीने स्पॉन्सर केलेला सहारा म्युच्यूअल फंड अजून चालू आहे.
४) ईक्वीटी म्युच्यूअल फंड हे शेअरबाजारात पैसे लावतात. त्यातही किती टक्के पैसे लावतात यावर उपप्रकार पडतात. त्यात मार्केटप्रमाणे परतावा मिळतो. जास्त मुदतीसाठी पैसे ठेवायचे असल्यास हा प्रकार योग्य आहे. अर्थातच म्युच्यूअल फंडातली गुंतवणूक मार्केटवर अवलंबून असते हे लक्षात ठेवावे.
५) शेअर बाजारात तुलनेने जास्त परतावा मिळतो. पण त्यामध्ये गुंतवणूक करतांना कंपनी तोट्यात जावू शकते हे लक्षात ठेवावे.
६) प्लॅट, प्लॉट, शेतजमीन, पोस्ट असो वा म्युच्यूअल फंड असो वा शेअर बाजार, यात गुंतवणूक करतांना योग्य आणि मान्यताप्राप्त आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. आर्थिक व्यवहारात सारे काही आपणच केले पाहीजे हा ध्यास टाळा. असे आर्थिक सल्लागार जरी थोडीफार फी आकारत असतील तरी त्याबदल्यात योग्य सल्ला देत असतात. गुंतवणूकीच्या सार्‍या आतील गोष्टी आपणाला ठावूक असतीलच असे नाही. मार्केटमध्ये काय चालू आहे याबाबतही आपण अनभिज्ञ असू शकतो. सल्लागार त्याच क्षेत्रात काम करत असल्याने माहीतीत तो मार्गदर्शक ठरतो.
७) आयुर्विमायोजना हि गुंतवणूक ठरू शकत नाही. आयुर्विम्याव्यतिरिक्त इतर योजनांमध्ये गुंतवणूक केलीच पाहीजे.

- पाभे

No comments: